Tuesday 29 December 2015

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध

राईट टू पी अर्थात शू करण्याचा अधिकार ; तो ही जन्मसिद्ध
डॉ शंतनू अभ्यंकर

पी म्हणजे शू करणे. राईट टू पी म्हणजे शू करण्याचा अधिकार! हा मागितला आहे महानगरातल्या बायकांनी. जाहीरपणे. लाज बीज सोडून, भीड भाड मोडून. करणार काय? प्रश्न अगदी जिव्हाळ्याचा. रोजच्या जगण्यातला.

घराबाहेर पडलं की बायकांना लघवीला जाणं मोठं जिकिरीचं असतं. महिलांसाठी कॉमन टॉयलेट नसणं ही एक मोठीच समस्या आहे आपल्याकडे. बारा-बारा तास, अठरा-अठरा तास घराबाहेर असणाऱ्या महिलांना ही समस्या खूपच भेडसावते. मुंबईत आणि इतर ठिकाणी या विषयी महिलांनी चक्क जाहीर निषेध नोंदवला आहे. घराबाहेर पडल्यावर स्वच्छ आणि सहज उपलब्ध टॉयलेट हवीत, नव्हे हा स्त्रियांचा अधिकारच आहे, असं याचं म्हणणं. किती योग्य आहे ही मागणी, आणि किती साधी. स्वच्छ भारतातचे डिंडिम पिटताना आपण याकडे गांभीर्यानं पहायला हवं.

बाहेर सोय नाही, उघड्यावर बसणं शक्य नाही, अशामुळे कित्येक बायका दिवस दिवस लघवी साठवून धरतात. तशी सवयच लावलेली असते त्यांनी स्वतःला, अगदी लहानपणा पासून. सक्काळी एकदा घराबाहेर पडताना लघवीला जायचं ते थेट घरी परत आल्यावरच पुन्हा जायचं!

या सवयीचे, कोंडमाऱ्याचे शारीरिक दुष्परिणाम या महिलांना भोगायला लागतात. लघवीची इन्फेक्शनस्, पोटदुखी, हसलं खोकलं की कपड्यात थोडीशी लघवी होणं, लघवीच्या तालचक्राबरोबर संडासचंही तालचक्र बिघडणं, एक ना अनेक. पैकी इन्फेक्शन सगळ्यात कॉमन.

आपल्या सगळ्यांच्या युरीनरी ट्रॅकमध्ये रोगजंतू असतातच. फक्त त्यांची लोकसंख्या सातत्यानं अतिशय मर्यादित राखली जाते. कशी?  वारंवार शू केल्यामुळे! म्हणजे होतं असं की ब्लॅडरमध्ये जंतू वाढायला लागतात. आत चांगला अंधार असतो, उबदार असतं; लघवीमधली काही द्रव्य हेच ह्यांचं अन्न, त्यामुळे खाऊही खूप उपलब्ध असतो. यावर जंतू पोसले जातात. वाढतात. अगदी झपाटयानं. पण आपण शू केली की ही सगळी प्रजा बाहेर पडते. शू बरोबर. त्यांचे वाढीचे प्रयत्न गेले पाण्यात! मग थोडे बहुत उरलेले जंतू पुनःश्च हरीओम म्हणून पुन्हा हात पाय पसरायला बघतात.
कल्पना करा तुम्हाला काही कारणानी शूच नाही करता आली...? हे जंतू वाढत रहातील. ब्लॅडर मध्ये चांगला जम बसवतील. त्यातून शू  साठून राहिली की ब्लॅडर फुगतं, त्याच्यातल्या प्रेशर मुळे ब्लॅडरवॉलचा रक्तपुरवठा क्षीण होतो आणि ह्यामुळे जंतुंना आता प्रतीकाराची भीती रहात नाही. रक्तपुरवठा क्षीण झाल्यामुळे या जंतुंविरुध्द प्रतिकारशक्ती नीट काम करू शकत नाही. अशा परिस्थितीत युरिनरी इन्फेक्शन न झालं तरच नवल. हे जंतू आता ब्लॅडर मध्ये घर करतात. लघवीला आग, जळजळ, वारंवार लघवीला लागणं असले सगळे प्रकार. कधी कधी तर इन्फेक्शन पार किडनी पर्यंत जातं. ताप, थंडी वगैरे सुरू. शिवाय अशक्तपणा, बराच काळ टिकणारा.

त्यामुळे दर दोन तासांनी बाथरूमला जाऊन येणं महत्वाचं. पण महिला हे टाळतात. बाहेरची स्वच्छतागृह इतकी अस्वच्छ असतात की नुसत्या वासानीच ओकारी येते... आणि पुरुषांसारखा महिलांना आपला कार्यभाग उघड्यावर थोडाच उरकता येतो? अस्वच्छ ठिकाणी जाणं नको म्हणून मग घर येईपर्यंत कळ काढणं सुरु रहातं. ब्लॅडर बसतं फुगून आणि वर समजावल्याप्रमाणे जंतू वाढीला सुरुवात होते. कधी कधी कळ अगदी असह्य होते. मग गडबडीनं असेल त्या स्वच्छतागृहाचा आसरा घेतला जातो. दुसऱ्या दिवशी जळजळ सुरु झाली की आदल्या दिवशीचं अस्वच्छ बाथरूम आठवतं. पण मुळात लघवी खूप वेळ तुंबवून ठेवल्यामुळे जंतुंची लागण झालेलीच असते. ह्यातली मेख अशी आहे की इन्फेक्शन हे अस्वच्छ ठिकाणी लघवी केल्यामुळे होत नाही. इन्फेक्शन हे तर बराच वेळ लघवी तुंबवून ठेवल्यामुळे होतं.

ठिकाण स्वच्छ असो किंवा अस्वच्छ, वेळोवेळी जंतू बाहेर जाणं महत्वाचं. लघवी न करण्यापेक्षा अस्वच्छ  ठिकाणी केलेली चांगली. यातच स्त्रीयांचे सूख सामावले आहे.

इतक्या प्राथमिक, इतक्या साध्या, इतक्या नेहमीच्या, गरजेच्या गोष्टीसाठी, जाहीर मागणी करावी लागावी ही खूप लाजिरवाणी आणि अस्वस्थ करणारी गोष्ट आहे. जे बिनबोभाट व्हायचं ते गावभर बोभाटा झाल्यावर तरी होतंय का; ते आता पहायचं.

ह्या आणि अशा इतर लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Monday 28 December 2015

दोन घडीचा डाव...


दोन घडीचा डाव...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, सातारा. पिन  ४१२ ८०३; मो. क्र. ९८२२० १०३४९

नाळ पडत आली होती. मी पटकन ते बेंबीशी लोंबणारं वाळकं बोंडूक उपटलं आणि कचऱ्यात दिलं टाकून. बाळाची आई आणि आजी अगदी नाराज झाल्या.
‘ते हवं होतं डागदर’, त्या पुटपुटल्या.
‘कशाला?’
‘पाचवी पुजायला!’
गावाकडे अजूनही चालतो हा प्रकार. बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते.
जर सटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला  मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.
बाळाचं नाव ठेवायचं तेही बाराव्या दिवशी. ‘मुलगा झाला तर तुझं नाव ठेवीन रे, गणपतीबाप्पा’, हे नवसासाठी. अडचणीत असताना. एरवी जन्माआधी बाळाच्या नावाचा विचार सुद्धा करायचा नाही. कारण बाळाचं नाव ठेवणं म्हणजे त्याला एक व्यक्तित्व देणं, नातं जोडणं, कुटुंबाचा भाग मानणं. हे सगळं सदा भलतच अनिश्चित. त्यामुळे हे सगळं सावकाश, आस्ते आस्ते, जपून, बारा दिवसानंतर.
अशा समाजात तान्ह्या बाळाचा मृत्यू ही कितीतरी नियमितपणे घडणारी घटना असणार. स्वातंत्र्याच्या दशकात, शेकडा वीस मुलं वर्षाच्या आत मरायची! आज हा दर शेकडा ३ पेक्षा कमी आहे. पूर्वी हा मुळी नियमच होता, अपवाद नाही.  फूल तो गिरते ही है, फल नही गिरने चाहिये, ही म्हण बरंच काही सांगून जाते.
 जन्मल्यानंतर काही काळात होणारे मृत्यू हे बरेचदा कमी वजनामुळे, कमी दिवसामुळे आणि बाळंतपणातील घोटाळ्यामुळे होतात. जंतू बिंतु नंतर. इतक्या झटपट आपला प्रभाव दाखवण्याची संधी जंतूंना मिळत नाही. बाळंतपणासाठीच्या सुविधा पुरवल्या की ह्याच्या आसपास घडणारे मृत्यू टळतात.
मांडीवर आपलंच मेलेलं मूल घेऊन बसलेली, शोक करणारी आई, हे दृष्य अशा समाजात नेहमीचंच, अगदी शाळेतल्या मुलानंही कधी ना कधी तरी पाहिलेलं. ‘राजहंस माझा निजलाही कविता शाळेच्या पाठ्यपुस्तकात असते ती अशाच समाजात. या कवितेत नुकतंच वैधव्य आलेल्या बाईचं मूलही नुकतंच गेलेलं आहे. ते मांडीवर घेऊन ती ते नेऊपहाणाऱ्यांस बजावते आहे, ‘राजहंस माझा निजला’.
करु नका गलबला अगदी, लागली झोंप मम बाळा
आधीच झोंप त्या नाही, खेळाचा एकच चाळा,
जागताच वाऱ्यासरसा, खेळाचा घेइल आळा

वाजवूं नका पाऊल,
लागेल तया चाहूल
झोपेचा हलका फूल

मग झोपायाचा कुठला, राजहंस माझा निजला

अतिशय करूणरसप्रधान अशी ही कविता आहे. पण कल्पना करा ‘राजहंस माझा निजला’ ही कविता पुन्हा पाठ्यपुस्तकात आली तर त्यातलं कारुण्य आजच्या मुलांनाच काय पण शिक्षकांनाही भावणार नाही. यात कारुण्य कमी आणि भीषणता जास्त आहे असं काही तरी त्याचं मत होईल!
शेतात पेरलेलं उगवेल की नाही हे सांगणं जसं मुष्कील, तसंच हे मानवी बीजही उगवेल की नाही हे सांगणं मुष्कील. मूल तर सोडाच, आई वाचेल का नाही हेही सांगता यायचं नाही. बाळं पटापटा मरायची तशा आयाही पटापटा मरायच्या. १९४७ साली शंभरातल्या दोन आया बाळंतपणात मरायच्या आणि पन्नास एक तरी पुढे महिना दोन महिने अंथरूण धरायच्या. बाळंतरोग नावाचा रोगच होता. तो आता इतिहासजमा झाला जणू. आज हजारात एखादी आई मरते. हा ही दर खूपच जास्त समजला जातो. प्रगत देशात हा लाखात दोन-पाच एवढा आहे.  बाळंतपण म्हणजे दुसरा जन्मच असं म्हणायचे ते काही खोटं नव्हतं. बाळंतीण होणं ही सत्वपरीक्षाच होती. ती उत्तीर्ण होणारीला मान आणि वारंवार उत्तीर्ण होणारीला मरातब मिळणं स्वाभाविकच. बहुप्रसवेचा सन्मान आणि वांझोटीचा धिक्कार ही समाजात उत्क्रांत झालेली भावना आहे. बहुप्रसवा असणं फायद्याचं होतं, बहुप्रसवा असणं धोक्याचंही होतं. बाळंतपण ही जोखीम होती त्या स्त्रीनं घेतलेली. कुटुंबांसाठी, वंशासाठी अशी जीवाची जोखीम घेणारी स्त्री वंदनीय ठरली यात नवल ते काय? जगातल्या सर्व देशात हौतात्म्याचा सन्मान केला जातो. ‘देशासाठी मेलास तर जगलास, स्वतःसाठी जगलास तर मेलास’ वगैरे...! देशासाठी प्रसंगी प्राणांचीही आहुती द्यायला या मुळे माणूस उद्युक्त होतो. तसंच काहीसं हे. ‘स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!’ किंवा ‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता’ वगैरे. मातृत्वाचा इतका पराकोटीचा गौरव, मातृत्वाची जोखीम स्वीकारणारी मनोभूमी तयार करतो. भरपूर संतती असलेली बाई शुभशकुनी आणि अजिबात नसलेली अपशकुनी हे सगळं ओघानंच येतं मग. जिवतीचं चित्रही असंच, बहुप्रसवा स्त्रीचा नितांत गौरव करणारं आणि अप्रसवा, निःसंतानांना हीन लेखणारं. निःसंतान स्त्रीयांना (आणि पुरुषांनाही) जेरीस आणणारे असे कितीतरी वाक्प्रचार, प्रथा, परंपरा सांगाव्यात. अष्टपुत्रा सौभाग्यवती असा आशीर्वाद असो की प्रत्येक अपत्य-शक्य स्त्रीची नारळाने ओटी भरणे असो, वांझोटीच्या नजरेपासून मूल लपवणे असो की निसंतान पुरुषाच्या पौरुषत्वाबद्दलच शंका घेणे असो.
सारी सुखं हात जोडून पुढे उभी असताना गोष्टीतल्या राजाला दुखः मूलबाळ नसल्याचं, त्यातही मुलगा नसल्याचं. बऱ्याच स्तोत्रांच फलित, बऱ्याच व्रतवैकल्यांचा हेतू, बऱ्याच कहाण्यांचं सार एकच, संतती, इच्छित संतती, भरपूर संतती, घराचं नांदतं गाजतं ‘गोकुळ’ होणे.
प्रत्येक बाईला सरासरी पाच-सात मुलं व्हायची. बाळंतीणीची खोली म्हणून एक वेगळी खोलीच असायची प्रत्येक वाडयात. एका कुटुंबात जननक्षम बायका असायच्या ४ ते ५. म्हणजे ३२ वर्षाच्या सरासरी आयुष्यात माणसे सुमारे ३२ जन्म बघायची. लग्न लवकर, मूलही लवकर, त्यामुळे सासू-सुनेची बाळंतपणही एका वेळी व्हायची.
 ३२ जन्म आणि सुमारे तितकेच मृत्यू याची देही याची डोळां बघायची माणसं. यातल्या बहुतेक मरणांची (आणि काही जन्मांची सुद्धा), कारणं अज्ञात, अनाकलनीय.
मृत्यू इतका सातत्यानं जवळ असायचा की वंशवृद्धी हे जीवनध्येय होणं यात नवल ते काय? सरासरी आयुर्मानच मुळी ३२ वर्ष होतं स्वातंत्र्याच्या वेळी. तेच  १९८० साली होतं ४८. आता ६६ वर्ष आहे. अमेरीकेत सध्या आहे ७८ वर्ष.
पुन्हा शेवटचे अंथरूण धरणे ते मरणे, ह्यातलं अंतर अगदी कमी होत तेंव्हा. शामच्या आईची आणि शामची भेट, खरोखरच, नाहीच व्हायची. दुसऱ्या कुणाची ‘आssई’ अशी हाकही भारी दुखःकारी असायची, ते या कोवळ्या वयातल्या आघाता मुळेच.
जखम, जंतू, ताप, खलास! कुठलेतरी कारण...ताप, अती ताप, अति-अति ताप, खलास!! जुलाब, डीहायड्रेशन जुलाब, डीहायड्रेशन, खलास!!! असा सगळा मामला. कुपोषण, अॅनिमिया, शास्त्रीय ज्ञानाचा, उपचारांचा  अभाव ह्या सगळ्याची काळीकुट्ट  चौकट प्रत्येक मरणाला लाभलेली. सर्पदंश, सेप्टिक, साथीचे आजार, यात पटापट माणसं मरून घ्यायची. सकाळी खांदेकरी म्हणून आलेल्यालाच संध्याकाळी कसा खांदा द्यावा लागला याची रसभरीत वर्णनं आपण इतिहासात वाचली आहेत. ‘महीना झाला व्हेन्टीलेटर वर आहेत’, वगैरे भानगड नाही. शेवटच्या आजारपणाचा खर्चही कमी होता तो त्यामुळेच. त्यावेळी तेराव्याच्या जेवणाचा खर्च हा डोईजड होता, आजारपणाचा नाही.
म्हाताऱ्याच खुब्याचं हाड मोडलं की पुढे १५ दिवसात खेळ आटोपायचा. अशी माणसं हाड मोडल्यानं मरायची नाहीत.  पण अंथरुणाला खिळल्याने, छातीत जंतुसंसर्ग होऊन, न्यूमोनियानं मरायची. आता सांध्याच्या ऑपरेशन मुळे सांधा सांधला जातो पण त्याहून महत्वाचं म्हणजे माणूस तत्काळ स्वतःच्या पायावर उभा रहातो. एकदम ‘पंगुम् लंघयते गिरिम्’ असंच होऊन जातं. मरण टळतं ते सांधा बदलल्यामुळे नाही तर माणूस हिंडता झाल्याने. अंथरुणाला खिळण्याची बात नस्से आणि खिळलंच कोणी अंथरुणाला की त्याची यथास्थित काळजी  घेण्याचं शास्त्र भलतंच विकसित झालंय.
जगणं मरणं हे आता एका श्वासाचं अंतर नाही राहीलं. मधे व्हेन्टिलेटर आहे, डायलेसिस आहे, अँन्गिओग्राफ़ी/प्लास्टी आहे, पेसमेकर आहे, केमो/रेडीओ आहे. थकल्या भागल्या अवयवांसाठी अनेकानेक आधार आहेत. क्वचित हे तापकारक होतं. मरण बरं पण उपचार नको असं होतं, नाही असं नाही, पण बहुतेकदा हे उपचार तापहारकच ठरतात.
आरोग्याची व्याख्याच मुळी अशी आहे की, ‘सामाजिक आणि आर्थिक दृष्टया उत्पादक काम करणारी कोणतीही व्यक्ती’ ही आरोग्यसंपन्न समजली पाहिजे. आधुनिक वैद्यकीच्या साथीनं जगणारे बहुतेक जण या व्याख्येनुसार आरोग्यसंपन्न ठरतात.
आजच्या पिढीला जननसोहळा आणि मरणसोहळा कमीतकमी अनुभवाला येतो. ‘आजकाल आयुष्यात अनिश्चितता वाढली आहे. सकाळी घराबाहेर गेलेला माणूस संध्याकाळी परत येईल याची शाश्वती नसते’, वगैरे बोललं जातं, पण आकडेवारी वेगळंच दाखवते. कमावत्या वयात, उमेदीच्या वयात एखाद्याचा मृत्यू होणही अघटीतच. पण हेही आता आणखी कमी वेळा घडतं. हार्ट अॅटक, अपघात वगैरे जालीम शत्रू जमेस धरूनही आकडेवारी हेच दर्शवते की कमावत्या वयात माणसं कमी दगावतात. आयुर्मान वाढलं याचा अर्थ संध्याकाळी माणसं सुरक्षित घरी पोहोचण्याचं प्रमाण वाढलं असाच होतो. आणि आयुर्मान काही थोडंथोडकं नाही चांगलं दुपटीहून अधिक वाढलं आहे.
वाढल्या आयुर्मानाचे काही कल्पनेबाहेरचे परिणाम आहेत. उदाः नियमित पाळी किंवा ट्रॅव्ह्लवाल्यांची तेजी!  नियमित पाळी ही वाढत्या आयुर्मानाची, उशिरा लग्नाची, कुटुंब नियोजनाची देन आहे. शतकभरापूर्वी नियमित पाळी हा प्रकार नव्हता. आपल्या खापरपणजीची कहाणी आठवा. बहुतेकदा लग्न हे पाळी यायच्या आधीच झालेलं. पाळी आली रे आली की सासरी रवानगी. लगेच गरोदरपण, की पाळी बंद. लगेच बाळाला पाजायला, की पाळी बंद. हे होई तोवर पुन्हा दिवस, पुन्हा पाळी बंद; पुन्हा अंगावर पाजणे, पुन्हा पाळी बंद; पुन्हा दिवस, पुन्हा अंगावर पाजणे... असं आपले चालूच. म्हणजे नियमित पाळी ही भानगडच नाही. शेवटी पाळी तरी जायची नाहीतर पणजी तरी जायची! पण पाळी आधी पणजीच जाण्याची शक्यता जास्त.
म्हणजे निसर्गावस्थेत नियमित पाळी ही ‘अनैसर्गिक’ गोष्ट आहे. पाळी बंद होऊन पुढे जगणं हे ही ‘अनैसर्गिक’ आहे. रानटी अवस्थेत असं होत नाही. १९४७ साली सरासरी आयुष्य ३२ वर्ष त्यामुळे पाळी न येणारी बाई अगदी क्वचित दिसायची. मुळात असायचीच नाही आणि असली तर जराजर्जर झाल्यामुळे बहुदा घरात घरात असल्यामुळे दिसायची तर नाहीच नाही. आज भारतात पाळी येणाऱ्या महिलांपेक्षा न येणाऱ्यांची संख्या वाढते आहे.
त्या काळी साठी शांत हा उत्सवचा दिवस, आणि  सहस्रचंद्रदर्शन म्हणजे महोत्सव. आता मुळी रिटायरमेंटच वयच साठ. म्हणजे मालकाला खात्री आहे की साठी होईपर्यंत हा माणूस पगार देण्याइतपत काम नक्की करू शकेल. वाढत्या आरोग्यपूर्ण आयुष्याचा हा परिणाम. साठी झाली की माणसं खुशीत असतात. दुसरी इनिंग सुरु झाली म्हणतात. मजेत लांब लांब ट्रीपला जातात. ट्रॅव्ह्ल वाले चांगलेच गबर होतात. ‘माझा प्रवास’ वाले गोडसे गुरुजी यात्रेला बाहेर पडले तर घरी कोण हलकल्लोळ माजला. काशीयात्रा म्हणजे सगळी निरवानिरव करूनच करायची यात्रा होती. आता युरोप, सिंगापूरच्या ट्रिपा पत्ते खेळता खेळता ठरतात आणि कोपऱ्यावरच्या न्हाव्याकडे जावं इतक्या सहजतेने लोक जाऊन येतात.

जीवन ऐसे नाव असणारा हा दोन घडीचा डाव आता चांगला चार घडीचा झाला आहे. बदलत्या जीवनशैली बरोबर मरणशैलीही बदलली आहे. उगीच पूर्वीच्या काळी असं नव्हतं असं म्हणून कुढण्यात काय अर्थ आहे? पूर्वीच्या काळी असं नव्हतंच. तो काळ गेला आता आरोग्यपूर्ण, दीर्घायुष्याची वेळ आली आहे.

Monday 14 December 2015

गर्भ आणि त्याचा निःपात

गर्भ आणि त्याचा निःपात
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. जि. सातारा. ४१२ ८०३
मोबाईल: ९८२२० १०३४९

नुकत्याच आलेल्या बातमी नुसार, रॉबर्ट डिअर नावाच्या एका अमेरिकन माणसानं, तिथल्या कॉलोरॅडो राज्यातल्या, ‘प्लॅण्ड  पेरेंटहुड’ संस्थेच्या गर्भपात केंद्रावर हल्ला केला. त्यात दोन माणसं आणि एक पोलीस ऑफीसर मारले गेले. इतर अनेक जखमी झाले. तासाभराच्या धुमश्चक्रीनंतर रॉबर्ट डिअरला अटक करण्यात आली. हल्यामागचं कारण असं आहे की कोणाही स्त्रीने गर्भपात करून घेणं ह्या डिअर सायबांना मान्य नव्हतं. हे धर्म संमत नाही म्हणून.
आपल्याकडे गर्भपात विधीसंमत आहे. पण अमेरिकेमध्ये मात्र सरसकट असं नाही. उलट गर्भपाताला पाठींबा आणि विरोध हा तिथे अत्यंत भावनिक आणि चक्क निवडणूकीचा मुद्दा आहे. जगातील अत्यंत प्रगत देशातही असे धर्ममार्तंड आहेत. त्यांचे कट्टर अनुयायीही आहेत. हा ही दहशतवादच आहे. अगदी अमेरिकन कायद्यातील व्याख्येनुसार सुद्धा! अमेरिकन माध्यमं त्याला तसं लेबल लावत नसली तरीही.
  यापूर्वी आयर्लंड या कट्टर कॅथॉलिक देशात वेळेवर गर्भपात न केल्यामुळे एका भारतीय डॉक्टरचा मृत्यू ओढवला. हे मूल तिला हवं होतं पण परिस्थितीच अशी उद्भवली की तिचाच जीव धोक्यात आला. गर्भपात न केल्यास ही मरणार हे दिसत असून सुध्दा, कायद्यावर बोट ठेऊन तिला गर्भपात नाकारण्यात आला. जिवंतपणी गर्भहत्येचं पातक करून, ख्रिस्तवासी झाल्यावरच्या  नरकयातना कोणाला नको होत्या. जित्या जागत्या बाईच्या जीवापुढे तिच्या पोटातला गोळा महत्वाचा ठरला.  शेवटी दोघंही देवाघरी गेले! बाईचा जीव धोक्यात असेल तेव्हातरी अॅबॉर्शनला  परवानगी दया अशी याचना तिथल्या स्त्रिया करत होत्या. शेवटी, ‘आमच्या शरीराची आणि आरोग्याची एवढी काळजी वाटते ना तुम्हाला, मग आम्ही आमच्या पाळीच्या तारखाही सरकारला कळवतो’, असं म्हणून तिथल्या स्त्रियांनी, ट्वीटर वरून, आपल्या पाळीच्या तारखा थेट पंतप्रधानांना कळवायला सुरुवात केली!  हा अगदी आंतरराष्ट्रीय मामला झाल्यावर तिथल्या सरकारनं नुकताच कायदा थोडासा(च) सैल केला आहे.
‘प्रो लाईफ’ हा पश्चिमी देशातला गर्भपात विरोधी कंपू. गर्भालाही जीव असतो, स्वतंत्र अस्तित्व असतं, त्याचा रक्तगट, जनुकीय रंगरूप आईपेक्षा वेगळं असतं. मग त्याला मारायचा अधिकार अन्य कुणाला कसा? हा यांचा प्रश्न.
‘प्रो चॉइस’ हा गर्भपाताचा पर्याय असावा असं सांगणारा  गट. यांचं म्हणणं असं की जन्म झाल्या शिवाय, किमान आईवेगळं अस्तित्व शक्य झाल्या शिवाय गर्भ हा स्वतंत्र व्यक्ती होऊच शकत नाही. सर्वस्वी परपोषित,परावलंबी अशा गर्भाला स्वतंत्र व्यक्ती मानणं हा पराकोटीचा ताणलेला युक्तीवाद आहे. ह्या न्यायानी, पुरुष/स्त्री बीज वगैरेचाही स्वतंत्र अस्तित्व म्हणून विचार करता येईल; कारण जैवशास्त्रीय दृष्टया यातील पेशी आपल्या पेक्षा ‘वेगळ्या’ असतात. एवढंच कशाला शरीरातील प्रत्येक पेशी ही ‘जिवंत’च असते. रक्ताचा नमुना घेऊनही त्यातल्या पेशी डॉक्टर मारतच असतात! जिवंत पेशींचा जगण्याचा हक्क मान्य करायचा तर, एखाद्याचं अपेंडिक्स काढणंही चुकीचंच म्हणायचं काय?
शिवाय नकोसं असताना राहिलेलं मूल, हे मूल म्हणून कितीही गोंडस असलं, तरी त्या कुटुंब साठी ती न पेलणारी जबाबदारीच असते. विवाहपूर्व संबंधातून, विवाहबाह्य संबंधातून, बलात्कारातून निपजलेली संतती असेल तर त्या आईला आयुष्यभर हे भोवतं. नव्यानं आयुष्य सुरु करताना ही मुलं मोठाच अडसर ठरतात. अशी मुलं पोसायची जबाबदारी शेवटी समाजावर येऊन पडते. या अनाथ पण अश्राप मुलांना सुजाण पालकत्व पुरवणं ही मोठी जोखीम असते. ही झेपली नाही तर बाल गुन्हेगारी, व्यसनीपणा असे प्रश्न निर्माण होतात.
लुळी, पांगळी, मरणासन्न आजारांनी ग्रस्त संतती, जन्माला येणार आहे हे जर आधी कळू शकतं, तर मग अशी संतती जन्माला न घालण्याचा अधिकार त्या त्या स्त्रीला/कुटुंबाला असलाच पाहिजे. अशी संतती जन्माला घालणं आणि पुढे लालन, पालन, पोषण करणं ही त्या आई-बापाला आणि कुटुंबाला विनाकारणच शिक्षा आहे. उलट हा जन्मानंतर रोज थोडा थोडा होणारा गर्भपातच आहे.  तेव्हा गर्भपाताचा पर्याय हा उपलब्ध असायला हवा. म्हणून हे प्रो चॉईस!
प्रो लाईफवाले म्हणतात; ‘कुठला जीव काय दैव घेऊन जन्माला येईल हे कुणी सांगावं? बेथोवेन, हा पाश्चात्य संगीताचा बेताज बादशहा, हा त्याच्या आई-बापाचा पाचवा मुलगा होता! घ्या!! म्हणजे जर गर्भपाताचा पर्याय बेथोवेनच्या मातापित्यास उपलब्ध असता तर आपण एका अभिजात संगीतकाराला मुकलो असतो!’
यावर प्रो चॉइसवाल्यांचं, तोडीसतोड उत्तर असं की ‘त्या’ रात्री ‘त्या’ माता पित्यांनी ‘ती’ क्रीया करण्याचा ‘तो’ निर्णय घेतला म्हणूनच बेथोवेन शक्य झाला. म्हणजे एखाद्या दिवशी संभोग न करणं म्हणजे देखील बेथोवेनला जनन नाकारणंच नव्हे काय? आता याला काय उत्तर आहे?  हिटलर हा देखील त्याच्या पितरांचा चौथा मुलगा होता. पाचवेपणाचा सांगीतिक कर्तृत्वाशी जसा काडीचाही संबंध नाही तसाच चौथेपणाचा अपत्याच्या क्रौर्याशी नाही.  थोडक्यात संभाव्य बेथोवेनला जीवानिशी  मारल्याचा आरोप पोकळ आणि बिनबुडाचा आहे.
गर्भपातबंदी ही दारूबंदी सारखी असते. ती अमलात आणणं महाकर्मकठीण. उलट अशा परिस्थितीत असा मामला चोरीचा बनतो आणि हळूहळू बोंबलत उरकावा लागतो. सगळ्याच बेकायदा सेवांप्रमाणे मग याचेही दर चढे रहातात. पिळवणूक, शोषण आणि असुरक्षित गर्भपात वाढत जातात. यातच काही बायका मरतात. आयर्लंड आणि अमेरिकेमध्ये असे परिणाम दिसतात.
गर्भपाताचा भारतीय कायदा त्यामानानं अतिशय सुटसुटीत आणि व्यवहार्य आहे. आपल्याकडे स्त्रियांच्या आरोग्यासाठी तो वरदान ठरला आहे.
यानुसार पाचव्या महिन्यापर्यंत गर्भपात करता येतो. आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे गर्भातील दोष ओळखता येतात आणि गर्भपाताचा निर्णय पाचव्यानंतरही घ्यायची वेळ येते. अशा परिस्थितीत कायद्यात गर्भपाताची मुभा नाही. तीही मिळावी अशी मागणी आहे. त्यावर विचारही चालू आहे. तंत्रज्ञानानुसार कायदाही बदलेल ही अपेक्षा.


Thursday 10 December 2015

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!

बाई मी निगेटीव्ह गं निगेटीव्ह...!
डॉ.शंतनू अभ्यंकर.  मो.क्र. ९८२२० १०३४९
आजकाल बरेच पालक लग्नाआधीच डॉक्टरी सल्ला घ्यायला येतात. ह्यात एक प्रश्न हमखास असतो, ‘डॉक्टर, मुला-मुलीचा ब्लड ग्रुप एकच आहे, काही प्रॉब्लेम नाही ना?’
ब्लडग्रुपचा आणि वैवाहिक सौख्याचा; पुढे मुलं होण्याचा किंवा न होण्याचा काही एक संबंध नाही. आई बापाचा ब्लडग्रुप एक असला काय किंवा वेगळा वेगळा असला काय सगळं सारखंच. उलट त्यातल्या त्यात एक असलेला बरा; उद्या एकाला रक्ताची गरज लागली तर दुसऱ्याचं काढून भरता येईल! पण हा प्रश्न येतो खास. काही ज्योतिषीही ‘एक नाड आहे, तेव्हा आता ब्लडग्रुप बघा’, असा शहाजोगपणाचा सल्ला देतात. या नाड या प्रकरणाचा आणि ब्लडग्रुपचा अर्थाअर्थी संबंध आजवर तरी कोणी सिद्ध केल्याचं माझ्या माहितीत नाही. या सल्ल्या मुळे ज्योतिषी मॉडर्न आणि वैज्ञानिक  ठरतो, बस्स!
 त्यातून जर मुलीचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल तर मग विचारूच नका.
मुलीचा ब्लड ग्रुप निगेटीव्ह असणं हा अधुनिक पत्रिकेतला मंगळ आहे जणू. पण पारंपारिक पत्रिकेतल्या मंगळाइतकाच हाही निरुपद्रवी आहे. पुरेशी दक्षता घेतल्यास हा मंगळ आपण निष्प्रभ करू शकतो. मंगळाच्या मुलीचं लग्न जसं अवघड होऊन बसतं तसंच हे. निगेटीव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काहीतरी वाईट असतं एवढीच माहिती सर्वसामान्यांना असते. खरं सांगायचं तर वाटतो तितका हा निगेटीव्ह पणा वाईट किंवा धोकादायक नाही. मंगळा इतक्याच ह्याही बाबतीतील श्रद्धा या  अंधश्रद्धाच आहेत.
मुळात निगेटीव्ह हा शब्द नकारात्मक नाहीये. काहीतरी वाईट आहे असा अर्थ अभिप्रेत नाही. निव्वळ एरवी दिसणारी काही प्रथिनं (antigens) ह्या लोकांच्या रेड ब्लड सेल्स वर नसतात एवढंच.
यातला मुख्य तोटा म्हणजे या व्यक्तींना कधी काळी रक्त भरायची गरज पडली तर ब्लडग्रुप रेअर असल्या मुळे रक्त सहजासहजी मिळत नाही. हा तोटा अर्थात स्त्री पुरुष अशा दोघांना लागू आहे. दुसरा तोटा असा की गर्भाचा ब्लडग्रुप जर पॉसिटीव्ह असेल तर आईच्या शरीरात त्या सेल्स विरुद्ध रासायनिक अस्त्र तयार होतात आणि ही त्या गर्भाच्या रेड सेल्स विरुद्ध लढा पुकारतात. त्यात गर्भाच्या रेड सेल्स मरतात, गर्भाला अॅनिमिया होतो , कावीळ होते...!
पण इतकं सगळं असूनही निगेटिव्ह रक्तगट हा लग्नात अडथळा ठरू नये असं मी म्हणतो कारण....
बाळाला होणारा हा आजार तिसऱ्या चौथ्या खेपेस होतो; आजकाल इतकी मुलं कुणी होऊ देत नाही. त्यामुळे ह्या आजाराचं प्रमाण बरंच घटलं आहे.
हा होऊ नये म्हणून प्रभावी लस, अँटी डी चे इंजेक्शन, उपलब्ध आहे. अँटी डी चे हे इंजेक्शन डिलिव्हरी नंतर ७२ तासात द्यायला हवं. हे सगळ्यांना माहीत असतं आणि हे इंजेक्शन आवर्जून दिलंही जातं पण त्या आधीही गरोदरपणातच, सातव्या महिन्यात,  हे घ्यायला हवं. पण बहुतेक वेळा हे विसरलं जातं, डॉक्टरांकडूनच! डिलिव्हरीच नाही तर प्रीटर्म डिलिव्हरी, गर्भपात होणे/करणे, एक्टॉपिक असं काहीही झालं तरी हे इंजेक्शन घेतलंच पाहिजे.
पोटातल्या बाळाच्या आजाराची तीव्रता किती? बाळाच्या अंगात रक्त किती कमी? कावीळ किती? ह्याचं निदान आता गर्भातच होऊ शकतं, अगदी गर्भाला रक्त भरण्यापर्यंत उपचार करता येतात. बाळ जन्माला यायच्या आधीच हे होऊन जातं.
इतकं सगळं करून जन्मतः झालाच बाळाला त्रास तर त्यावरही प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.
थोडक्यात बाकी सगळं जुळत असेल तर निव्वळ निगेटिव्ह ब्लड ग्रुपला घाबरू नये.

लग्नाआधी ब्लडग्रुप बघू नये तर बघावं तरी काय? पारंपारिक पत्रिकेसारखी आधुनिक, वैज्ञानिक पत्रिका नाही का मांडता येणार? येईल... पण त्याबद्दल पुन्हा केव्हातरी.

हायमेनोप्लास्टी:- गेलेले हायमेन आणि कौमार्य परत मिळवा!

हायमेनोप्लास्टी

गेलेले हायमेन आणि कौमार्य परत मिळवा!
डॉ.शंतनू अभ्यंकर. फोन ९८२२० १०३४९

हायमेन हा योनीवर पातळ पापुद्र्यासारखा पडदा. हा कौमार्याचं प्रतीक मानला गेलाय. मानला गेलाय असं म्हणायचं कारण म्हणजे प्रत्यक्षात हायमेनवरून कौमार्यपरीक्षा ही अगदीच बेभरवशाची असते. मैदानी खेळ, मर्दानी खेळ (उदाः घोडेस्वारी) वगैरेंमुळेही हायमेन फाटलेलं असू शकतं आणि काही वेळा शरीर संबंध येऊनही ते फाटत नाही. पण पारंपारिक समजूत अगदी उलट आहे.
पुरुषांसाठी नाही का एखादी कौमार्य परीक्षा? आहे की! म्हणजे असू शकते. पुरुषांच्या लिंगावरील एक बारीक त्वचेची तार ही प्रथम संभोगावेळी तुटते. पण हे तर हायमेन पेक्षा कितीतरी  बेभरवशाचं, त्या मुळे ह्याची जास्त चर्चाच होत नाही. शिवाय पुरुषप्रधान संस्कृतीला योनीशुचिता मानवते, शिस्न सुचिता बाधते, असा खाक्या.
थोडक्यात एखादी व्यक्ती संभोग-शून्य आहे वा नाही हे खात्रीने सांगता येत नाही! तिचा शब्द आणि तुमचा विश्वास हाच पुरावा.
लग्नानंतर पहिल्या रात्री संभोग केल्यावर योनीमार्गातून रक्तस्त्राव झाला तर ती स्त्री कुमारिका होती असं समजलं जातं. कित्येक समाजात रक्त लागलेलं बेडशीट, कपडे कुटुंबाला सादर करावे लागतात. ह्यात स्त्री कुमारिका होती हे जसं बघायचं असतं तसंच तो पुरुषही नपुंसक नाही, ही ही खात्री करून घ्यायची असते. ना विज्ञान, ना डॉक्टर, ना समुपदेशन; न कळत्या वयात झालेलं लग्न, या सगळ्या परिस्थितीवर उपाय म्हणून समाजानं हे असले मापदंड योजलेले. मुलगा मुलगी दोघंही टीनअेजर असायचे त्या काळी कुटुंबियांचा हा भोचकपणा चाल्लोन जायचा. पण आता दोघही चांगले पंचविशीचे वगैरे असताना ह्या प्रथेला अर्थ उरत नाही. पण त्या प्रथेचं ओझं आपण अजून वागवत आहोत.  
शिक्षणामुळे परिस्थिती  पालटली. लग्न उशिरा उशिरा व्हायला लागली. शारीरिक वाढ झालेली, लैंगिक भूक लागलेली. ही भागवायची समाजमान्य सोय मात्र नाही. लहान वयात लग्न व्हायची तेंव्हा मुलगा/मुलगे वयात येताच लैंगिक शमनाची सोय घरातच उपलब्ध होती. आता तसं नाही. त्यातून मुलामुलींना एकत्र येण्याच्या, रहाण्याच्या अनेक संधी. मैत्रीचं रुपांतर शारीरिक जवळकीत कधी होतं हे कळत सुद्धा नाही. पण हे नातं काही कारणानं लग्नात रुपांतरीत होऊ शकत नाही. मग पहिल्या रात्रीच्या कौमार्यतपासणीचं टेन्शन येतं. तपासलंच उद्या नवऱ्यानी, तर उगीच घोळ नको. म्हणून मग हायमेनोप्लास्टीची मागणी केली जाते.
पण हे असलं काही मेडिकल कॉलेजात शिकवत नाहीत. सीझर, नसबंद्या, क्युरेटींग वगैरे शिकवतात. ज्येष्ठांचा सल्ला घेऊन आणि थोडी कल्पना शक्ती आणि कौशल्य वापरूनच ही शस्त्रक्रिया शिकली  जाते आणि केली जाते.
नुकताच जर कौमार्यभंग झाला असेल तर ही शस्त्रक्रिया सोपी जाते. हायमेनचे उरलेले तुकडे एकमेकाशी पुन्हा शिवले जातात. अगदी बारीsssक कशिदा काम करावं लागतं. जर ही मुलगी शरीर संबंधांना सरावलेली असेल तर योनीमार्गाच्या तोंडाची अंतःत्वचा वापरून जरा कष्टपूर्वक हा पडदा विणला जातो.
एका वैद्यकीय परिषदेमध्ये यावर घमासान चर्चा झडली. “आपण कुमारी नसताना तसं भासवणं हा खोटेपणा आहे.” एक अगदी तरूण फॅशनेबल फिरंगी पेहरावातली मुलगी हे बोलत होती,  “ह्याला डॉक्टरनी मदत करायची म्हणजे एखाद्या गुन्हयाला खतपाणी घातल्या सारखंच आहे. हे अनैतिक आहे. समाजातल्या अनैतिकतेला आपण मदत केल्यासारखं आहे. जे नाही ते आहे असं दाखवण्यासाठी आपण आपलं शल्यकौशल्य का खर्च करावं? केवळ पैसे उकळता येतात म्हणून?”  
यावर काहीजण म्हणाले, ‘विवाहपूर्व संबंध ठेवणं, ते लपवणं हा सर्व त्या स्त्रीचा खासगी मामला आहे, तिच्या नीतिमत्तेचा प्रश्न आहे, तो तिनी सोडवायचा आहे. आमची भूमिका नीती निरपेक्ष आहे. तीचं वागणं मला पटतं का नाही, नीतीनुसार आहे का नाही, हा मुद्दा नसून तिच्या अडचणीतून तिला सोडवण्यासाठी मी माझं वैद्यकीय ज्ञान वापरतो आहे. हे तर आपण रोजच करतो. यात काही चूक नाही. उद्या एखाद्या मुलीचा लग्नाआधीच गर्भपात करायचा असेल तर तुम्ही तो बिनबोभाट करताच नं? मग हायमेनोप्लास्टीलाच हरकत का?’
“अहो पण ह्यात फसवणूक आहे, त्या सासरच्या कुटुंबाची. ती कुमारी नाहीये. निव्वळ आपल्या शस्त्रक्रियेमुळे ती कुमारी आहे असं भासवलं जाईल. जे नाही ते आहे असं दाखवायला आपण का मदत करायची?” पुन्हा तरुणी. आता आणखी चढ्या सुरात.
यावर वक्त्यांनी दिलेलं उत्तर बेफाट होतं, “ऑपरेशनने तिरळेपणा घालवता येतो, चष्म्याचा नंबर घालवता येतो, मॅमोप्लास्टी मुळे स्तन उभार होतात; याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? ह्या सगळ्या सर्जरीज, जे नाही ते आहे असं भासवणाऱ्याच आहेत.” थोडा पॉज घेऊन ते म्हणाले, “इतकंच काय, पावडर, लिपस्टिक, ऊंच टाचेच्या चपला हे सुद्धा सगळं जे नाही ते आहे असं दाखवण्याच्या प्रयत्नाचाच भाग आहे?” यावर मस्कारा, आयशॅडो, रूज आणि पावडर भिजवत,    थरथरत्या लिपस्टिकनी, टॉकटॉक बूट वाजवत  ती बाहेर पडली.  


Saturday 21 November 2015

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे; या विषयावरील सातारा आकाशवाणीवर प्रसारित माझे भाषण.

जेम्स थर्बरची भन्नाट व्यंगचित्रे


व्यंगचित्र हा सगळ्यांनाच भावणारा प्रकार. वसंत सरवटे, ज्ञानेश सोनार, खलील खान, आर.के. लक्ष्मण वगैरेंची व्यंगचित्रे प्रसिद्ध आहेतच. पण व्यंगचित्र दरवेळी काही न्यूनच अधोरेखित करतं असं नाही.  कित्येकदा मानवी स्वभावाचे अर्क दोन चार फटकाऱ्यात आपल्यापुढे सहज उभे ठाकतात. आपल्याला अशी चित्र हसवतात पण अंतर्मुखही करतात. अशी अंतर्मुख करणारी चित्र रेखाटणारा, मानवी मनाचे खेळ चित्रात नेमके पकडणारा, जेम्स थर्बर हा अमेरिकी व्यंगचित्रकार प्रख्यात आहे. पण हा निव्वळ चित्रकार नव्हता, निव्वळ व्यंगचित्रकार तर नव्हताच नव्हता. तो उत्तम लेखक होता, पत्रकार होता, कथाकार होता. तुम्हाला ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ ही सीरिअल आठवते? ज्या मूळ गोष्टीवर ती बेतलेली होती ती जेम्स थर्बरची, ‘द सीक्रेट लाईफ ऑफ वॉल्टर मिटी’, ही. बायकोच्या आणि जगाच्या अपेक्षांनी कावलेला वॉल्टर मिटी हा या कथेचा नायक. जागेपणीच हा स्वप्नरंजनात मश्गुल होतो आणि थर्बर वाचकांनाही स्वप्न आणि आभासाच्या सीमारेषेवरून हिंडवून आणतो. बारीक सारीक प्रसंग, घटना, व्यक्तींवरील त्याच्या इरसाल टिपण्ण्या आजही दाद घेऊन जातात. आता हेच पहा नं, तो म्हणतो ‘मला स्त्री जातीचा राग आहे, कारण प्रत्येक गोष्ट नेमकी कुठे ठेवली आहे हे त्यांना नेहमीच माहीत असतं.’

‘कार्टून्स बाय जेम्स थर्बर इमेजेस’ असं नुसतं गुगललं की त्याची भन्नाट कार्टून्स आणि त्यांच्या लिंक्स समोर हाजीर होतील. ‘होम’, हे त्याचं असंच एक गाजलेलं चित्र आहे. चित्राची चौकट भरून राहिलेलं एक बंगलेवजा घर  आपल्याला दिसतं. त्या घरावर छत्रछाया धरणारं प्रचंड झाड आहे, समोर व्हरांडा आहे, पण त्या घराच्या मागच्या बाजूनं ते घर एका प्रचंड मोठया स्त्रीनं आपल्या कवेत घेतलं आहे. ती बाई वाकून समोर अंगणात पहाते आहे. तिच्या चेहऱ्यावरचा त्रास, राग, वैताग, त्रागा वगैरे भावना जेमतेम दोनचार रेषात जिवंत झाल्या आहेत ...आणि अंगणातल्या कोपऱ्यात नीट पाहिल्यावर आपल्याला दिसतोय तो इवलासा, दबकत पावलं टाकत येणारा, जरा वेंधळा, घाबरलेला एक माणूस. कोण असतील हे दोघं? आपल्या रागीट स्वभावामुळे उभ्या घरादाराला आपलाच स्वभाव बहाल केलेली ही घरमालकीण तर नाही? ...आणि नको ते घरी परत जाणं आणि पुन्हा तिच्या तावडीत सापडणं, असा विचार करणारा हा मालक दिसतोय. त्या प्रचंड घरापुढे आणि घर व्यापून दशांगुळे उरलेल्या त्या बाईपुढे हा माणूस फारच थोटका दिसतो. पण त्याच्या खुज्या रेखाटनातच त्याच्या मनीच्या भावनांचा अर्क उतरला आहे हे नक्की.

थर्बरचं असंच एक गाजलेलं चित्र. इथे पती-पत्नी अपरात्री अंथरुणात उठून बसलेले दिसतात. पतिराज झोपेत असावेत कारण त्यांचे डोळे मिटलेले आहेत आणि चेहऱ्यावर विलक्षण शांत आणि प्रसन्न भाव आहेत. स्वप्नातच त्यांनी आपल्या हाताचं पिस्तूल करून बायकोवर रोखून धरलंय. बायको मात्र या हल्यानं घाबरलेली आहे , दचकलेली आहे. विस्फारित नेत्रांनी ती नवऱ्याचं हे रूप पहाते आहे. कोणता नवरा खरा? स्वप्नात पत्नीवर पिस्तूल रोखून आनंदी दिसणारा खरा, का जागेपणी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करणारा खरा? मानवी मनाचं खरं रूप ओळखायचं कसं? जागेपणी माणूस कसा मर्यादा सांभाळून रहातो. मग झोपेत संयमाच्या सगळ्या शृंखला गळून पडल्यावर दिसणारं नवऱ्याचं रूप हेच सत्य समजायचं का? चित्रातल्या बायको पेक्षा चित्राच्या प्रेक्षकांच्या मनात थर्बर जास्त प्रश्न निर्माण करतो.

आणखी एक चित्र तर भन्नाटच आहे. एक पार्टी ऐन रंगात आलेली दाखवली आहे. माणसांचे घोळके आहेत, प्रत्येक जण काहीतरी बोलतो आहे. पण एकूणच संभाषणाचं स्वरूप पार्टीत असतं तसंच आहे. मुख्यत्वे गॉसिप चालू आहे. अनुपस्थित व्यक्तींच्या उखाळ्यापाखाळ्या, भानगडींचं चर्वितचर्वण वगैरे वगैरे. अशा गर्दीत एकच सुटाबुटातले विद्वान दिसणारे गृहस्थ एका कोचात नुसतेच कोपऱ्यात बघत बसले आहेत. शेजारच्या कोचावरच्या  दोन उच्चभ्रु स्त्रिया एकमेकींच्या कानात कुजबुजताहेत, ‘ह्यांना खरं तेवढंच माहित असतं बाई!’ (He doesn’t know anything except facts.) म्हणजे उणीदुणी काढण्यात, कुचाळक्या करण्यात रस नसणं, गप्पातही वस्तुनिष्ठ मतं आणि माहिती मांडणं वगैरे त्या गृहस्थाचे अवगुण ठरतात. तो भरल्या पार्टीत एकटा पडतो आणि वाचाळ मंडळी मात्र एकमेकांच्या सहवासाचा आणि गप्पांचा मुक्त आनंद लुटताना  दिसतात. म्हणजे गावगप्पा टाळणं योग्य, की एखाद्या रंगीत संध्याकाळी, गावगप्पांच्या  साथीनं, गाव आणि गप्पा दोन्हीही एन्जॉय करणं चांगलं? थर्बरनं हा निर्णय आपल्यावरंच सोडलेला आहे.


श्रेष्ठ साहित्य आणि श्रेष्ठ चित्रसुद्धा दरवेळी नवा आणि वेगळा अनुभव देतं. प्रश्नांची तयार उत्तर देण्यापेक्षा उकल करण्याची वेगळी दृष्टी देऊन जातं. हे थर्बरच्या अर्कचित्रांना तंतोतंत लागू आहे. खरंतर व्यंगचित्रांबद्दल मी शब्दात काय वर्णन करणार कप्पाळ. तुमची उत्सुकता चाळवणं एवढाच माझा हेतू. ही चित्रं तुम्हाला तुमच्या सुप्त भावभावनांचं दर्शन घडवतील. जेम्स थर्बरच्याच शब्दात सांगायचं तर, ‘टवाळी उपरोध वगैरे प्रकार इतरांची, जगाची चेष्टा करतात. पण खरा विनोदवीर मात्र स्वतःकडे पाहून हसतो, लोकांना हसवतो आणि या भानगडीत लोकांच्या चेहऱ्यावरचे मुखवटे आपोआप गळून पडतात. हे आत्मदर्शन विलक्षण असतं हेच खरं.’

शेल्फारी डॉट कॉम या साईटबद्दल सातारा आकाशवाणीवरून प्रसारित झालेलं माझं भाषण.


शेल्फारी डॉट कॉम

भेळेचा कागदही वाचल्याशिवाय न टाकणाऱ्या माझ्यासारख्या पुस्तकातल्या  किड्याला सातत्यानं खाद्य पुरवणारी साईट म्हणजे शेल्फारी डॉट कॉम. पण भेळेचा कागदही टाकाऊ नसतो हे खरच आहे. एकदा अशाच एका कागदावर ‘लिंग बदला’ या प्रश्नाच्या उत्तरात, ‘नर’चं लिंग ‘वानर’ असं बदललेलं होतं. त्या भेळेपेक्षा हा विनोद चटकदार होता.
शेल्फारीवर तुम्ही गेलात की एक बुकाचं शेल्फच तुमच्या नावानं टाकलं जातं.
आपण वाचलेली पुस्तक या शेल्फात आपणच हारीनं लावायची, आवड नावड कळवायची. आवडलेली पुस्तकं का आवडली आणि नावडलेली का आवडली नाहीत याची चर्चाही आपण करू शकतो. या चर्चेत अन्य समानधर्मा मंडळी बसल्या कॉम्प्यूटरवरून सहभागी होऊ शकतात. भारतीयांच्या संदर्भात बोलायचं तर सध्या चेतन भगत हा इथला ई-सम्राट  आहे. शिवाय माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम याचं ‘अग्निपंख’ ही नेटकरांच्या मनात सातत्यानं आहेच. ‘जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही’ अशा आवेशात बलशाली, समृद्ध आणि महासत्ता भारत असं स्वप्न पेरणाऱ्या कलामांना सलाम करणारी अनेक पत्रं आपण इथे वाचू शकतो. या पत्रातला मजकूर किंवा अन्य काही भावलं तर ते मित्राला ई-मेल करायची किंवा डाउनलोड करायचीही इथे सोय आहे. पुस्तकाचं व्यसन असणाऱ्या अन्य मित्रांनाही आपण या साईटवर आमंत्रित करू शकतो. शेल्फारीचं साप्ताहिक माहिती पत्रकही  आपल्या ई-टपालात येऊन पडायची सोय आहे. आपल्या वाचण्यातल्या किंवा आवडत्या पुस्तकांबद्दल अन्य शेल्फारीकरांनी काही अभिप्राय पोस्ट केला की त्याची सूचनाही आपल्याला ताबडतोब मिळते. मुख्य म्हणजे हे सारे अभिप्राय वगैरे प्रायः सामान्य भाषेत असतात. क्लिष्ट, गुंतागुंतीची, शब्दबंबाळ भाषा; समीक्षा, सौंदर्यशास्त्र वगैरेतल्या विद्वतजड संज्ञा वगैरे प्रकार नाही. सामान्य वाचकांनी सामान्य वाचकांसाठी चालवलेली ही साईट आहे. इंग्रजी साहित्य हे अभ्यास म्हणून नाही तर ध्यास म्हणून वाचणाऱ्यांसाठी ही साईट म्हणजे, पुलंच्या काकाजींच्या भाषेत ‘मोठा मझा आहे’; आणि पी.जी. वूडहाउसच्या भाषेत सांगायचं तर ‘it gives a song on your lips and a spring in your stride! एखाद्या लेखकाचं किंवा पुस्तकाचं नाव अर्धवट आठवत असेल तर तेवढ्याही सुतावरून स्वर्ग गाठण्याची किमया या साईटवर साधली आहे. आपण जॅकल असा शब्द दिला की शीर्षकात जॅकल असलेल्या पुस्तकांची आणि संबंधित लेखकांची यादीच आपल्यासमोर झळकते. ही एक मोठीच सोय आहे. विशेषतः प्रा. विसरभोळे लोकांसाठी. आवडलेलं पुस्तक इथल्या ‘ई’कानातून ‘ई’कत घ्यायचीही सोय आहे. इकानावरून आठवलं पु. भा. भावे दुकान ऐवजी विकान हा शब्द वापरत म्हणे. दुकान या शब्दाची व्युत्पत्ती मराठीशी नातं सांगणारी नाही म्हणून हा बदल. पण आता इंटरनेटच्या ई-बाजारात दुकानही गेलं, विकानही गेलं, हाती उरलं ईकान!

या साईटचा पत्ता मला माझ्या हॉन्कॉन्ग मधल्या मित्रानं दिला, त्याला त्याच्या मेलबोर्नच्या मित्रानी ह्या साईटची शिफारस केली होती आणि या मेलबोर्नकराला आमच्या शेजारच्या वाईकर  प्राध्यापकांनी आमंत्रित केलं होतं. जग जवळ आलं म्हणतात ते हे असं. तुम्हीही या साईटवर जाऊ शकता. कुणाच्याही आमंत्रणाची गरज नाही. जा आणि पुस्तकांच्या आणि पुस्तक प्रेमींच्या गर्दीत हरवून आणि हरखून जा.

Saturday 14 November 2015

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...

आल्या बहु , झाल्या बहु, परंतू...
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. सातारा. पिन ४१२ ८०३
मो.क्र. ९८२२० १०३४९


आल्या बहु , झाल्या बहु परंतू या सम हीच!
हजारो बायका आल्या, प्रसूत झाल्या, प्रसूत होऊन गेल्या पण प्रसूची प्रसूती अविस्मरणीय. तीचं नाव प्रसोन्नचित्ता. होती खरीच नावासारखी. दिसायला प्रसन्न, वाणीही प्रसन्न, काळीसावळी, कमलनयनी, आत्मविश्वासाने वावरणारी, उच्चशिक्षित, एका उच्चभ्रू स्वयंसेवी संस्थेत काम करणारी, खेड्यात, आपल्या डॅनिश नवऱ्यासोबत.
आली तीच मुळी अस्खलित इंग्लिश बोलत... आणि बोलता बोलता माझी बोलतीच बंद केली तिनी. तिच्या इतके प्रश्न मला माझ्या एम्.डी.च्या परिक्षकांनीही विचारले नव्हते. प्रत्येक वेळी एक हातभर यादीच असायची प्रश्नांची तिच्याकडे. एका हातात यादी आणि दुसऱ्या हातात नवरा, अशीच यायची ती. दुसरा हात नवऱ्याच्या हातात अशी नाही; दुसऱ्या हातात नवरा अश्शीच यायची ती. तिला स्वतःच्या स्त्रीत्वाचा भलताच अभिमान होता. असं माझं सुरवातीचं मत होतं. मग ते बदललं; तिला स्त्रीत्वाचा अभिमान होता असं म्हणण्यापेक्षा स्त्रीत्वाचं भान होतं असं म्हणेन मी.
सलामीलाच तिनी मला धोबीपछाड टाकला. तिची आणि  तिच्या गरोदरपणाची  माहिती घेऊन झाल्यावर ती म्हणते कशी, ‘मी पुन्हा तुमच्याचकडे दाखवीन असं नाही हां डॉक्टर; तुम्ही मला थरो आणि प्रोफेशनल वाटलात तरंच मी येईन!’
म्हणजे मी तिला तपासण्याआधी तीच मला तपासत होती. थोडा अचंबा, थोडा राग गिळत मी तिला तपासलं. तिच्या परीक्षेला मी उतरलो होतो असं वाटलं. ‘डॉक्टरांना माझ्या शरीराबद्दल आदर असावा असं मला वाटतं, तुमच्या वागण्यातून, बोलण्यातून तपासण्यातून ते मला जाणवलं. थँक यु डॉक्टर.’ मी जरा चक्रावलो. नेहमीपेक्षा वेगळं मी काहीच केलं नव्हतं. मी म्हणालो, ‘पण एका बाईनं, प्रसूतीसाठी एका पुरुष डॉक्टरची निवड करणं, जरा अवघडंच निर्णय असतो.’ एवढं बोलून मी माझा नेहमीचा विनोद केला, ‘बायकांची योग्य काळजी कशी घ्यायची हे पुरुषांनाच चांगलं कळणार, नाही का?’ ती हसली. पण वरवरचं. ‘तसं नाही हो डॉक्टर, बाई-पुरुष वगैरे काही नाही. पण मी आधी मुंबईला डॉ. रिबेका क्लर्कना दाखवायला गेले. त्यांनी पोट तपासायला म्हणून खर्रकन् माझा ड्रेस वर केला, मला विचारलं नाही, सांगितलं नाही!! मला खूप अपमानित वाटलं. खूप लाज वाटली. पुन्हा मी गेलेच नाही.’ हे जरा वेगळंच होतं. अशा प्रकारे कोणत्याही पेशंटनी आपल्या शरीरावरचा आपला हक्क इतक्या रोखठोक भाषेत सांगितला नव्हता.
मी पसंत पडल्यावर पुढच्याच भेटीत तिनी प्रश्नांची सरबत्ती सुरु केली. बरेचसे प्रश्न नेहमीचेच होते. जगप्रसिध्द डॉक्टर, डॉ.गुगल यांच्याकडून,  तिनी परस्पर उत्तरंही मिळवली होती. मी फक्त त्यांना मान्यता द्यायची होती. वजन किती वाढावं, तपासण्या कधी आणि काय काय कराव्यात, व्यायाम कोणते, औषधं कोणती सगळ्याची कोष्टकं तिच्याकडे तयार होती. मला करायला फारच कमी काम शिल्लक ठेवलं होतं तिनी. कळा कशा जाणवतात, बाळाचं डोकं खाली सरकल्याचं कसं जाणावं, वेदना शामक औषधं कोणती, आसनं कोणती, प्रसूतीची प्रगती कशी बघतात, एक ना अनेक...
खरं तर तिला माझी गरजच नव्हती. आदिवासी बायांसारखं ती स्वतः सगळं उरकू शकेल इतकी जय्यत तयारी तिनी केली होती.
नवराही तिच्याइतकाच एन्थू होता. तो प्रसूतीच्या वेळी हजर रहाणार हे त्यानी आल्याआल्याच जाहीर केलं होतं. बेशुद्ध न पडण्याच्या अटीवर मी त्याची उपस्थिती मान्य केली. मग प्रसूतीच्या वेळी बायकोला कसा आधार द्यावा, म्हणजे मानसिकच नाही हं, शारीरिक देखिल, याचा दांडगा अभ्यास त्यानी सुरु केला. दरवेळी मला त्यातली प्रगती तो सांगायचा आणि मी दरवेळी दाद द्यावी अशी अपेक्षा बाळगून असायचा. प्रसूतीची पहिली, दुसरी आणि तिसरी अवस्था, त्यातले फरक, त्या त्या वेळी त्या बाईला होणारे त्रास, नवऱ्यानी करायची कामं, डॉक्टरनी करायची कामं, सगळं मला घडाघडा म्हणून दाखवायचा. मी तेवढ्यात मनातल्या मनात माझ्या कामांची उजळणी करायचो. न जाणो थोड्या वेळानं मलाच ‘पाठ म्हणून दाखवा’ म्हणाला तर? स्तनपानाबद्दल तर तो इतकं हिरीरीनं आणि पोटतीडकीनं बोलला की आणखी थोड्याच प्रयत्नात त्याला स्वतःलाही पान्हा फुटला असता! हा नवरा आमच्या स्टाफमध्येही चांगलाच फेमस झाला. मुळात तो गोरा, त्यातून फॉरेनर, म्हणजे आपोआपच उच्चकुलीन, त्यात त्याचं हे असं वागणं, त्यामुळे उत्सुकता कमालीची. बायकोला दिवस गेले की थेट बारशालाच उगवणारे (ते देखील मुलगा झाला असेल तरच) महाभाग सगळ्यांना माहीत होते. पुरूषाचं तेच रूप स्टाफमान्य होतं. त्यामुळे एक नवरा आपल्या बायकोच्या बाळंतपणात इतका रस घेतो ही विलक्षण घटना होती आणि ती विलक्षण नापसंतही होती. नशीब त्याला मराठी येत नव्हतं, नाही तर आमच्या स्टाफ मधल्या बायकांनी त्याला सुनावलं असतं, ‘कार्य सिद्धीस नेण्यास आमचे सर समर्थ आहेत, तेव्हा तुमची लुडबुड नकोय!’
एकदा आला तो एकदम आठ महीन्याचं पोट वागवत! कमरेवर हात, अवघडलेली चाल... हे आक्रीत पाहून माझ्यासकट सगळ्या स्टाफनी दाहीच्यादाही बोटं तोंडात घातली. मग त्यानी अलगद खुलासा केला. सतत असं सात आठ किलोचं ओझं बाळगून हिंडणं ही काही सहजसाध्य गोष्ट नाही. चालणं, वाकणं, तोल संभाळणं सगळंच अवघड. हा अनुभव स्वतः घ्यावा म्हणून त्यानी नेट वरून ही ‘अनुभवाची पिशवी’ मागवलेली होती. ती पोटावर बांधूनच तो गेले तीन दिवस वावरत होता. रबरी पिशवी त्यात पाणी आणि बॅटरीवर हालचाली करणारं एक बाळही होतं आत! प्रसूच्या कुंकवाच्या धन्याचं हे ‘सतीचं वाण’ पाहून आम्ही थक्क झालो. ‘हे वाण घेतल्यामुळे माझे कित्येक पूर्वग्रह नाहीसे झाले. आम्ही खूप जवळ आलो आहोत आता’, असं काहीतरी तो म्हणाला. (‘This bag has helped me off load a lot of baggage, I feel closer to Prasoo as never before.’)
प्रसूती प्रसंगी बायकोनी नवऱ्याच्या कसं गळ्यात पडावं, नवऱ्यानी पाठीला कुठे कसं चोळावं, बाळाच्या डोक्याला बाहेर येताना कसा आधार द्यावा, नाळ कशी कापावी हे सगळं त्याला पाठ होतं. मनातल्या मनात त्यानी त्याची कित्येकदा उजळणी केली होती. गुळगुळीत कागदावर छापलेली अनेक सचित्र विंग्रजी पुस्तकं तो बाळगून होता. त्यातल्या हसत खेळत प्रसूत होणाऱ्या बायका पाहून मलाच वरमल्यासारखं व्हायचं.
सरकारी इस्पितळी तावून सुलाखून डॉक्टर झालेले आम्ही,  हे असलं काही आमच्या गावीही नव्हतं. देवाची करणी आणि नारळात पाणी; आणि नारळात पाणी, तशा बायका होतात बाळंतीणी; हे आमचं ब्रीदवाक्य. तिथल्या आया, मावश्या, नर्सेस, डॉक्टर कुणाच्या जिभेला हाड म्ह्णून नव्हतं. कामाचा रेटा इतका प्रचंड होता की असून भागणारच नव्हतं. जिभेवर ‘हाड्’ एवढा एकच शब्द होता म्हणाना. पेशंटप्रती सन्मान, आदर हे फक्त परदेशी पुस्तकातले उल्लेख होते. एक दूरस्थ वास्तव होतं. आमच्या आसपास असलं काही नव्हतं. गरोदर स्त्रियांच्या तपासणी विभागात पाउल टाकलं की सिस्टरंच म्हणायच्या, ‘आले बाई, ढेऱ्या कुरवाळणारे...!’ स्त्रीरोग विभागातली चिमणामावशी वेटिंग हॉलमध्ये खणखणीत आवाजात गर्जायची, ‘एsss... पहिल्या पाचजनी उठा गं, आत मुतारीत जावा, चड्या काढून ठेवा आणि आतल्या टेबलावर झोपा!!’ ही असली अघोचर घोषणा ऐकून माझ्या अंगावर काटाच आला होता. मी हटकलं तर चिमणी म्हणाली, ‘मी मुद्दामच तशी बोलते, त्याबिगार त्या बायांबरोबरचे पुरुष बाहेर जातच नाहीत.’ हे मात्र खरंच होतं, तिच्या ह्या वाक्यासरशी सर्व पुरुष हतवीर्य होऊनच्या होऊन शिवाय गर्भगळीत होत्साते बाहेर निघून गेले होते. तिच्याकडे दुर्लक्ष करत मी थेट विभागप्रमुखांना गाठलं. ते मला पुढ्यात घेऊन बसले, माझं शांतपणे ऐकल्यावर मला चहा पाजते झाले आणि म्हणाले, ‘मी तुझ्या एवढा होतो, तेव्हापासून चिमणी इथे आहे, मी त्या वेळी डीनकडे लेखी तक्रार दिली तर तत्क्षणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला!’
डॉक्टरही काही कमी नव्हते.
‘पहिलं काय आहे?’
‘मुलगा’
‘नंतर?’
‘मुलगी’
‘मग आत्ताचं हवंय का नकोय?’
‘हवंय’
‘कशाला?, एक मुलगा आणि एक मुलगी आहे ना? मग आता काय वेगळं होणार आहे? कुत्रं का मांजर?!!!’
अविश्वसनीय, अशोभनीय आणि लज्जास्पद असे संवाद ठायी ठायी चालू असायचे.
तिथल्या पेशंटच्यामानानी प्रसूच्या अपेक्षा आभाळाला पोहोचल्या होत्या. तिनी एकदा मला थेट प्रश्न केला, ‘प्रसूतीच्या वेळी मायांगावरचे केस काढण्याबद्दल (to shave & prepare the perineum) तुमच्या दवाखान्याचं धोरण काय आहे?’
बसल्या खुर्चीत मी आक्रसलो. दवाखान्याला असल्या प्रश्नात धोरण बिरण असतं? मुळात हा प्रश्न असू शकतो? कोणी बाई हे तोंडावर विचारू शकते? हे सगळंच मला धक्कादायक होतं. पण ती मात्र अत्यंत कम्फर्टेबल होती. हे सगळं डॉक्टरांना विचारणं आणि आधी माहीत असणं तिला आवश्यक वाटत होतं. तिला तो तीचा अधिकार वाटत होता. मला मात्र तो डॉक्टरांचा, दवाखान्याचा निसंदिग्ध अधिकार वाटत होता. एकदा आत पाउल टाकल्यावर, आमच्यावर विश्वास टाकल्यावर, आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा नाही का? आम्ही तुमच्या शरीराला भोकं पाडू, नैसर्गिक भोकात नळ्या घालू, तुम्हाला टोचू, फाडू, शिवू, चिकटवू... काय वाट्टेल ते करू; पण करू ते तुमच्या भल्यासाठीच नं? मग आक्षेप घ्यायचा प्रश्न येतोच कुठे?  गेली वीस पंचवीस वर्ष बायका येताहेत आणि मी shave & prepare अशी ऑर्डर खरडतो आहे. एवढं सुद्धा लिहित नाही मी. फक्त s & p. पुढचं सगळं सिस्टर करताहेत. याला कुणाचा आक्षेप असेल, असू शकतो, ही मी तरी कल्पना सुद्धा केली नव्हती. जागा खाजते, पुन्हा केस येताना ते टोचतात असं काहीबाही ती म्हणत होती. थोड्या वेळानं सावरून मी उत्तरलो, ‘टाके बीके घालायच्या वेळी केस मधे येतात...म्हणून काढलेले बरे...’
‘बरं आठवलं, टाके घालायचे म्हणताय, म्हणजे तुम्ही प्रसूतीच्या वेळी मायांगाला छेद घेता का?’ (विटपछेद, Episiotomy)
‘हो’
‘रुटीनली?’
‘पहिल्या खेपेला रूटीनली घेतो.’
‘अरेरे, तुमचं तसंच धोरण आहे का?’
पुन्हा धोरण!
मी तिला समजावून सांगितलं, ‘बाई गं, माझा एक छोटासा खाजगी दवाखाना आहे. प्रत्येक बाबतीत धोरण बिरण असं माझ्याकडे नाहीये. हां, आता इतक्या वर्षाच्या अनुभवानं मला आणि माझ्या स्टाफला कधी काय करायचं हे माहीत आहे. सहसा आम्ही चुकत नाही. पण धोरण म्हणशील तर असं काही मी कुठे लिहून ठेवलेलं नाही. मायांगाला छेद म्हणशील, तर बहुतेकदा तो घेतला जातो, कारण तोपर्यंत ती बाई इतकी कातावलेली असते की तिची झटपट सुटका महत्वाची असते आणि...’
नाही पण एका नैसर्गिक गोष्टीसाठी वैद्यकशास्त्रानं माझ्या शरीरावर घाला घातल्यासारखं वाटतं मला! हे मला नकोय!!’
माझं रूप मला आता वेगळंच दिसायला लागलं. मला आठ दहा हात फुटले असून; कात्र्या, सुऱ्या, नळ्या, सुया, दोरे, चिमटे घेऊन मी सैरावैरा पळतो आहे. वेळोवेळी बायका दिसल्या की मी त्यांच्या शरीरावर घाला घालून एक छेद घेतोय, लगेच तो शिवतोय, की पुन्हा सैरावैरा पळतो आहे, की पुन्हा दुसरी बाई! माझे इतर डॉक्टर स्नेही देखील या पळापळीत आहेत. कुणी मोतीबिंदूवर घाला घालतो आहे, तर कुणावर आतड्यावर घाला घालून जुलाब बरे केल्याचा आरोप आहे!!  
लवकर प्रसूती व्हावी, आजूबाजूच्या अवयवांना (गुदद्वार, मूत्रमार्ग वगैरे) इजा न व्हावी या उदात्त हेतूनी घेतलेल्या छेदाला ही बाई चक्क ‘हल्ला करणे’ म्हणत होती! शरीरावर घाला घातला म्हणे! जीचं करावं भलं ती म्हणते आपलंच खरं! हां, आता हे बरोबर आहे की ही शस्त्रक्रिया प्रसूतीशास्त्रात सतत वादात अडकलेली आहे. दोन्ही बाजू लावून धरणारे आहेत. पण तो आमचा प्रश्न आहे. त्यात ह्या बाईनं नाक खुपसायचं काय कारण? माझ्या डॉक्टरी इगोलाच आव्हान दिलं होतं तिनी.
प्रयत्नपूर्वक शांत रहात मी तिला समजावलं, ‘आधीच छेद घेतला नाही तर मग कधी वेडी वाकडी इजा होते, नंतर टाके घालणं खूप त्रासाचं होतं... आजूबाजूचे अवयव...अतिरक्तस्त्राव....’
‘पण इंटरनॅशनल रिक्मंडेशन तसं नाहीये.’ हातातला टॅब नाचवत ती म्हणाली. मग मीही माझ्या शेल्फातलं एक जाडजूड पुस्तक काढून, तिला संदर्भ सादर केले. टॅबपेक्षा शंभर पट जाड पुस्तक. वाच बाई वाच, उगीच टीव टीव नको. मला काहीच येत नाही असं समजू नकोस.
शेवटी पहिलीच खेप असली तरी हा छेद टाळायचा आणि टाके पडले तर नंतर, प्रसंगी भूल देऊन, टाके घालायचे अशी तहाची कलमं ठरली. होणाऱ्या (दुष्)परिणामांना आता ती जबाबदार होती. मी शांत झालो. अगदी बरंsss वाटायला लागलं मला. प्रथमच कुठल्यातरी पेशंटनी स्वतःच्या भल्याबुऱ्याची जबाबदारी जाणीवपूर्वक स्वतःच्या शिरावर घेतली होती. ‘बघा हं डाक्तर आता तुमच्याकडे आणून टाकलीय, आता तुम्ही काय ते बघा.’ ह्या असल्या बजावण्याची सवय मला; त्या मानानं ही शांतता वेगळीच होती. आता प्रामणिक प्रयत्नांचीच जबाबदारी माझी होती. मार्ग निवडण्याची  जबाबदारी प्रसूची. तीही शांत झाली. मनासारखा तह झाल्यामुळे तीही खुशीत होती. पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग असेच समाधानी दिसत असतील, अशी एक मिश्कील कल्पना माझ्या मनात तरळून गेली.  तिच्या शरीरावरचा तिचा अधिकार तिनी शाबित केला होता, शाबूत ठेवला होता. मीही तो मान्य केला होता.
येणेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत तिचं काहीतरी म्हणणं होतं, काहीतरी भूमिका होती. कळांचं इंजेक्शन देणं, पाणमोट आपोआप फुटणं / मुद्दाम फोडणं, नाळ कापायची नेमकी वेळ, सीझर, प्रथम स्तनपान, प्रोटीनच्या पावडरी, बाळाची शी पुसणे, तिनी वापरायची अंतर्वस्त्रे, पॅड... सगळ्यासाठी तिच्याकडे विचार होता, त्याला पूरक युक्तिवाद होता! बरीचशी मतं मला मान्य होती. काही किमान अमान्य नव्हती. पण काही अव्यवहार्य होती. छोटया गावातल्या छोटया दवाखान्याच्या म्हणून काही मर्यादा असतात. मी तिची मतं मान्य केली, तिनी माझ्या मर्यादा मान्य केल्या. आम्ही बरोबरीनं चालू लागलो. पण दिवस भरत आले तरी हिच्या शंका, प्रश्न, वाटाघाटी काही केल्या आटोपेनात.
प्रसूती वेळी पाठीवर उताणं झोपावं का उकिडवं बसावं का रांगत प्रसूत व्हावं हाही तिच्यासाठी कळीचा मुद्दा होता. टेबलावर पाठ टेकून झोपून प्रसूत होणं हा तिच्या मते वैद्यकशास्त्रानं नैसर्गिक प्रसूती विरुद्ध रचलेला बनाव आहे. दोन पायावर, चार पायावर (रांगल्यासारखं) अशी प्रसूती ही खरी नैसर्गिक प्रसूती. असं काहीतरी होतानाचा एका गोरीलीणीचा आणि एका चिन्पान्ज़िणीचा जंगलातला ‘नॅचरल’ व्हिडीओही तिनी मला दाखवू केला. त्या व्हिडिओतून मी काय धडा घ्यायचा ते खरं तर मला कळलं नाही. त्यात, त्याच सगळं उरकत होत्या! डॉक्टरंच नव्हता त्यात!! मात्र तिच्या म्हणण्यात अगदीच तथ्य नव्हतं असं नाही. खेड्यापाड्यात घरी प्रसूत होणाऱ्या बायका त्यांना आरामदायी अशाच अवस्थेत प्रसूत होतात. जमिनीवर उकिडवं बसून, छताला टांगलेल्या दोरीला, दाराच्या कडीला लोंबकळत जोर करतात.
‘टेबलावर झोपलं की तपासायला सोपं जातं, जमिनीवर किंवा उकीडवं बसलेल्या बाईला  कसं तपासणार?’
‘हेच ते मी म्हणते ते, सगळं काही डॉक्टरच्या सोयीनी करणार तुम्ही. त्या बाईची सोय...’
‘पेशंटसाठी सुद्धा हेच सोयीचं असतं... बाळाचे ठोके बघावे लागतात... शिवाय सलाईन लावलेलं असतं...’
‘सलाईन?’ ती किंचाळलीच. ‘सलाईन कशाला?’
पुन्हा एकदा धोरण, स्त्रियांच्या शरीरावर वैद्यकीय हल्ला वगैरे सुरु व्हायच्या आतच मी म्हणालो, ‘बाई गं , कधी झालाच रक्तस्त्राव तर गडबडीनं सलाईन द्यावं लागतं, मग ऐन वेळी शीर सापडत नाही, म्हणून आधीच लावून ठेवलेलं बरं. शीर सलामत तो सलाईन पचास!’ मी केविलवाणा विनोद केला. पण ह्या हल्ल्यालाही तिनी साफ नकार दिला. सलाईन तिच्या धोरणात बसत नव्हतं.   
दिसामासानी प्रसू तेजपुंज दिसायला लागली. तीचं हे नैसर्गिक बाळंतपण तीला छान मानवत होतं, पण मला मानवत नव्हतं. सगळं जर का नैसर्गिकच होणार आहे आणि होऊ द्यायचं आहे तर माझ्याकडे येण्याचे कष्ट तरी ही बाई का घेत होती? काही अनैसर्गिक घडलं तर निस्तरायला मी, आणि सगळं नैसर्गिक घडलं तर मिरवायला ही! पुढे पुढे तर ह्या प्रसूच्या प्रसूतीच्या मला चित्र विचित्र भीत्या वाटायला लागल्या. एकदा ही प्रसूतीनंतर मांजरीसारखी वार खाते आहे असं स्वप्न पडलं, तर  एकदा हीचं हीनीच सगळं सुखरूप पार पाडलं आहे आणि ही जाताना बील न देता मला नारळ, थोडे तांदूळ आणि ब्लाउजपीस देते आहे असं स्वप्न पडलं!
यथाकाल तिला प्रसववेदना सुरु झाल्या. तिनी ते ताडलं. बराच वेळ तिनी घरीच काढला, इकडे तिकडे फिरली, बसली, झोपली. अगदीच असह्य झालं तेव्हा नवऱ्याला घेऊन दवाखान्यात आली. आली आणि झाली! मी सुटलो!! नवरा शेजारी होताच, त्यानं फीत कापावी तशा अविर्भावात नाळ कापली आणि तो रीतसर बेशुद्ध पडला. नवरा बेशुद्ध पडला तर काय करायचं हे तिच्या वाचनात नव्हतं, तेव्हा त्याला शुद्धीवर आणायचं  तेवढं काम मी केलं. तिला टाके पडले, ते तिनी माझ्यावर हल्ल्याचे आरोप न करता घालून घेतले. पुढे चार दिवस सगळं सुरळीत होईपर्यंत ती दवाखान्यात थांबली आणि बिल देऊन गेली.
मला वेगळी दृष्टीही देऊन गेली. मी जे शिकलो होतो, करत होतो, ते म्हणजेच रुग्णांची काळजी घेणं असं मी समजत होतो, पण पर्यायी विचारही असतो हे दाखवून गेली. परदेशात उपचारांमध्ये पेशंटच्या सहभागाला खूप महत्व आहे. आपल्याकडे रुग्णांना किती गृहीत धरलं जातं. डॉक्टर म्हणून पेशंटच्या शरीरावर हुकूमत गाजवली जाते. पेशंटच्या वतीनं डोकं चालवायचं काम आपण डॉक्टरवर सोपवलं आहे. डॉक्टरांनीही ते बिनडोकपणे गळ्यात घेतलं आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या मानेवर टांगती तलवार आहे. अर्थात निर्णय प्रक्रियेत पेशंटचा सहभाग हवा असं सांगताना आणखी एक वास्तव लक्षात घ्यायला हवं. अशावेळी पेशंटही प्रसूसारखे हवेत, अभ्यासू, वास्तवाची चांगली जाण असणारे, स्वतःच्या निर्णयाची भली बुरी जबाबदारी स्वीकारणारे. प्रशिक्षित मनुष्यबळही हवं. पाळी चुकण्यापासून, पॅड बदलण्यापर्यंतची चर्चा एखद्या प्रसूसाठी ठीक आहे. एरवी डॉक्टरनी अशी चर्चा करायची म्हटलं तर १०% कामंही उरकणार नाहीत.
एका बाई डॉक्टरनी तपासणीच्या खोलीत तिला पूर्वकल्पना न देता, तिच्या पूर्वपरवानगीशिवाय ड्रेस वर केला म्हणून प्रसू वैतागली होती. मला हा वैताग रास्तच वाटतो. आता s & p असं लिहिताना दरवेळी मला प्रसूची प्रसूती आठवते. सरावल्या हातांनाही किंचित कंप सुटतो आणि मी सिस्टरना बोलावून सांगतो, ‘तुम्ही काय करणार आहे याची कल्पना दया, त्यांना विचारा आणि मगच पुढे काय ते करा.’ सिस्टर माझ्यादेखत तरी मान डोलावतात. इतपत प्रगती मी साधली आहे.

असे अन्य लेख, काही व्यक्तीचित्रं, कथा वगैरेसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा: shantanuabhyankar.blogspot.in