Saturday 27 April 2024

आहे का ही खरी?

 नात ‘इरा’ कडे पाहून सुचलेली कविता 


इतकी छान, गोरी पान, आहे का ही खरी?

नितळ अंग, गोरा रंग, नाजुकशी ही परी ?


झिप्र्या काळ्याभोर तिच्या, केसांच्याही लडी 

गालाभोवती, फेर धरुन, घालती, फुगडी.


इवले हात, इवले पाय, बोटे इवली, इवली.

तळवे सारे लाल गुलाबी, इवली लाल नखुली 


दोनच दात, लुकलुकतात, गालावर खळी 

मुशू मुशू, आले हशू, साखर उधळी 


काळे भोर, दोन टपोर, डोळे चंद्र-वाती 

पापण मोर, चंद्राची कोर, टकामका पहाती 


इवले हात, इवले पाय, पसंतच नाही 

लवकर मोठं होण्याची हो, हीला झाली घाई


हीला घेउन कुशीत आई, विमानाने जाई

तेवढ्यापुरते पंख हीचे, पायलट काका घेई 


ग्वालियरची राणी जणू, गाव पहिलं, वाई

तीन महिन्यांत, चार राज्ये, फिरून आली बाई 


लेखांक ३ कळीकाळाशी नातं

 

लेखांक ३

कळीकाळाशी नातं

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

होलोसीन नामे युगात, सुमारे ख्रि.पू. ९७०० वर्षांपूर्वी, पृथ्वी हलकेच तापू लागली. हे ही ग्लोबल वॉर्मिंगच पण खूपच संथ आणि नैसर्गिक.  उत्तर युरेशियावरची बर्फाची चादर अलगद उत्तरेला ओढली गेली आणि   होलोसीन युगाची सुरवात झाली.  बर्फाच्या जागी हिरवी कुरणं आणि गवताळ प्रदेश आले. जमीनीने मोकळा श्वास घेतला.  म्हणूनच शेती पसरली. मेंढपाळ आणि गुराखी फैलावले. त्यांचे पावे आणि गाणी आली. शेतीने स्थिरता, समृद्धी आणि संस्कृती आली.  

भटक्यांना फार पोरं सांभाळताच येत नाहीत. आता घरचे मांस आणि दूधदुभते आले. पोरं शेळ्यांच्या, गाईच्या दुधावर वाढवता येऊ लागली. वरचे अन्नही सहज देता येउ लागलं. अंगावरून पोर लवकर सुटल्याने बायकाही पुन्हा गरोदर राहू लागल्या. लोकसंख्या वाढली. आणखी एक झालं. तान्हेपणी दुधातील लॅक्टोज पचवणारे विकर (एनझाईम) ‘लॅक्टेज’ शरीरात तयार होत असतं.  प्रौढत्वी  हे बंद होऊन जातं.  पण शैशव संपूनही, निज शैशवास जपणे ज्यांना जमलं; म्हणजे ज्यांची ‘लॅक्टेज’ निर्मिती सुरूच राहिली; अशीच प्रजा ह्या बदलत्या दुधाळ आहाराला तोंड देऊ शकली. अशांचीच संतती फोफावली. दुधातील लॅक्टोज न पचवणारे उत्क्रांतीच्या स्पर्धेत मागे पडले. चक्क दुधखुळे ठरले ते. पण आजही आपल्या त्या दुधखुळ्या पूर्वजांचे काही वंशज टिकून आहेत. ह्यांना, दुधाशिवाय आयुष्य कंठणे किंवा बिन लॅक्टोजवाले कृत्रिम दूध वापरणे एवढे दोनच पर्याय आहेत.   ह्यांच्या (आणि पुढे उल्लेख केलेल्या त्या ग्लुटेन न पचवू शकणाऱ्यांच्या) आढळाचे नकाशे काढले तर? जिथे शेती आणि दूध दुभते पोहोचेल तिथे या दूधखुळयांची प्रजा कमी कमी होत जाईल. थोडक्यात पृथ्वीच्या कोणत्या भू भागात  शेती कधी  पसरली याचाच नकाशा हाती आल्यासारखं झालं की हे.  एक लक्षात घ्या, शेती पसरली म्हणजे कुदळ फावडं घेऊन शेतकऱ्यांच्या झुंडी विविध दिशांना पसरल्या नाहीत तर ‘शेती’ ही कल्पना, ही युक्ती, पसरत गेली.

पण आता जे शेतात पिकवता येतं तेच प्रमुख अन्न झालं. बाकी वनस्पती मागे पडल्या. अन्नातील शिकारीचा हिस्सा घटला.  प्रथिने कमी आणि कार्बोदके उदंड झाली. त्यामुळे आणखी एक झालं. गहू वगैरे धान्यांत ‘ग्लुटेन’ असतं. हे पचवता येणारी उदरेच शेतीवर निर्वाह करू शकतात. स्वाभाविकच अशीच प्रजा फोफावली. ग्लुटेन हजम न होणारे आजही आहेत. त्यांना ग्लुटेन युक्त पदार्थ (बार्ली, राय, ओट्स आणि गहू) टाळण्याचा सल्ला दिला जातो.  शेतीमुळे, कंदमुळं  शोधून खाताना पोटात शिरणारी जैव विविधता आता आक्रसली. पोटाचं पचन-सामर्थ्य जरा उणावलंच. यामुळे शेतकरी दादा आणि ताई  काही काही जीवनसत्वे, खनिजे आणि अमायनो अॅसिडस यांच्या बाबतीत कदान्न खाऊ लागले.  त्याचा दुष्परिणाम दात, नजर, चयापचय, हाडे, इन्शुलीन अशा अनेकांगाने झाला.

शेती वरुणराजाच्या मर्जीवर अवलंबून; त्यामुळे पोटं आता ऋतुचक्राला बांधील झाली. मला नक्की माहीत नाही पण, ‘आली सुगी फुगले गाल गेली सुगी मागचे हाल’ ही म्हण तेंव्हाच्याही भाषेत असणारच असणार. कडकडीत दुष्काळ आणि बंपर पीक क्वचित घडणार. अभाव आणि उपासमार ही सार्वकालिक अवस्था. अशा अभावग्रस्त अवस्थेला मानवी शरीर प्रतिसाद देत उत्क्रांत होत होतं. अशा उत्क्रांतीच्या खुणा आपल्याला आजही दिसतात.

उदा: पीसीओडी म्हणून एक आजार आहे. ह्यात बायका स्थूल असतात, बीजनिर्मिती क्वचित होते. अशा जाड आणि अल्प-प्रसवा बायका उत्क्रांतीच्या ओघात टिकल्याच कशा? ह्याचं एक संभाव्य उत्तर असं; पीसीओडी हा खरंतर ‘आजार’ नव्हे तर ‘शरीर प्रकृती’ म्हणायला हवं. अन्नाची शाश्वती नव्हती, उपासमार पाचवीलाच पुजली होती तेंव्हा जाड असणं फायद्याचं होतं. तेवढी चरबी एक दोन दुष्काळ तारून नेत  असे. अशा बायकांना कमी बीज निर्मितीमुळे कमी मुलं होतात. त्यांचे पालन पोषण नीट होत असल्याने त्यातली जगतही असावीत. हे ही फायद्याचं ठरत असावं. म्हणून अशा शरीर प्रकृतीच्या बायका त्याकाळी फोफावल्या. उत्क्रांतीच्या शर्यतीत टिकल्या. आज अभावग्रस्त जीणे संपले आहे. आज आहारात गोडधोड, चरबीयुक्त अन्न तर पूर्वीपेक्षा खूपच जास्त आहे.  त्यामुळे पीसीओडी प्रकृती आज गुण न ठरता, दोष ठरत आहे. आज पीसीओडीवाल्या बायकांना स्थौल्य आणि वंध्यत्व भेडसावत असतं; डायबेटीस, ब्लड प्रेशर असे सह-आजार सहज जडतात.

पाहिलंत, कुठे हजारो वर्षांपूर्वीचा दुष्काळ नावाचा कळीकाळ आणि कुठे आजचा सुकाळ, पण नीट शोधलं आणि नीट जोडलं तर नातं सापडतं दोघात.

 

 

Saturday 20 April 2024

लेखांक ४. साथी जुन्या आणि नव्या

लेखांक ४

साथी जुन्या आणि नव्या

 

डॉ शंतनु अभ्यंकर वाई

 

शेती पाठोपाठ वाडी आली. वस्ती आली. सांडपाणी, उकीरडे, हागणदारी आणि डबकी आली. माणसं दाटीवाटीने रहायला लागली. गुरंढोरं, कोंबड्या, कुत्री, गाय-बैल आले. परडी आली, खुराडी आली, गोठे आले, गोमाशा आणि गोचीड आली. पिसवा, उंदीर आणि कीड आली.

अधिकचे पिकू लागल्यावर ते विकू लागण्यासाठी देवाणघेवाण, व्यापार उदीम, बाजार हाट आले. माणसं लांब लांब प्रवास करू लागली. मोठी मोठी शहरे वसली.  अनोळखी प्रदेश आणि प्रजेच्या संपर्कात येऊ लागली. जंत आणि जंतूंनाही नवे  प्रदेश आणि प्रजा मिळाली आणि एरवी अशक्य असणारा आजाराचा नवाच प्रकार जन्मां आला. ह्याला म्हणतात साथीचे आजार. अल्प आणि विरळ लोकवस्तीत साथीचे आजार पसरायला फारशी  माणसेच नसतात. साथीच्या आजारांचे निव्वळ स्थानिक तरंग उठतात, त्यांच्या लाटा होऊच शकत नाहीत. पिनवर्म, सालमोनेला (विषमज्वर) आणि स्टॅफीलोकॉकस ह्यांचा प्रवास व्यक्ती ते व्यक्ती होत होता पण हे आजार तेंव्हा साथीत रूपांतरीत होऊ शकले नाहीत. 

आणखीही एक गडबड झाली. शिकार आणि ती फाडून खाणे यामुळे अनेक प्राणी आणि त्यांच्या अंगाखांद्यावरचे परोपजीवी यांच्याशी माणसाचा संपर्क येतच होता. पण ही ओझरती भेट बहुदा संपर्कापुरतीच ठरायची. संसर्ग क्वचितच व्हायचा. टेप वर्म, लिव्हर फ्ल्यूक, त्रिपॅनोसोम  वगैरे जंत आणि जंतू प्राण्यांकडून माणसांत येत. पण एका व्यक्तीकडून दुसरीकडे ते थेटपणे संक्रमित होत नव्हते. त्यामुळे भटक्या शिकारी मानवात साथी नव्हत्या.

पण पाळीव प्राणी आले आणि त्यांच्या निकट  साहचर्यामुळे  कित्येक व्हायरस, बॅक्टीरिया आणि परोपजीवी जीव जंतूंना माणूस नावाचे नवे घर मिळाले. देवी (आता अवतार समाप्त), गोवर, कांजीण्या  ह्यांचे पूर्वज फक्त प्राण्यांतच मुक्कामी असायचे. टुणकन उडी मारून ते मनुष्य प्राण्यांत शिरले, चांगले मुरले आणि आता परतीचं नाव नाही. इथे जरी ‘टुणकन उडी’ म्हटलं असलं तरी ते गंमत म्हणून.  प्रत्यक्षात असं नव्या प्राण्यांत घर करायचं तर अत्यंत गुंतागुंतीचे अडथळे, बरेचसे योगायोगाने पार करावे लागतात. अशा मुशाफिरीतला गोवर हा बहुतेक  पहीला. गो-वंशातील आणि मानवातील क्षयरोगातही खूप साम्य आहे पण मूळ दुखणं कोणत्या बाजूला होतं हे नक्की नाही. अजूनही हा प्रकार सुरूच आहे. एडस्, सार्स, आणि अगदी अलीकडे  कोव्हिड ह्यांच्या बाबतीत ही चर्चा आपण वाचलीच असेल.

जंतुंप्रमाणेच जंतही माणसाबरोबर उत्क्रांत झाले आहेत. अगदी ६२०० वर्षापूर्वीच्या अवशेषांतही फ्लॅट वर्म (शिस्टोसोमा) नावाचा जंत आढळला आहे. माणूस-गोगलगाय-महिषवंश-माणूस असं त्या काहींचं गुंतगुंतीचं जीवनचक्र आहे. म्हशी, रेडे वगैरे पाळायला लागल्याशिवाय हे चक्र फिरत राहाण्याइतका निकटचा संपर्क शक्य नाही. हवामानाबरोबर शेती पसरली, कालवे पसरले तसा हा आजारही पसरला असं दिसतं.

खरंतर हे जंत, जंतू वगैरेंना आपली काही पडलेली नसते. ते बिचारे अन्न, संरक्षण आणि प्रजननासाठी सोयीची जागा शोधात येतात. या पैकी व्हायरस लोकांना तर अन्न पाणीही लागत नाही. पेशीत प्रवेश करून, तिथलंच मटेरीयल वापरुन ते पिल्लावतात. यातली बरीचशी मंडळी आली-गेली तरी आपल्याला त्याचा पत्ता लागत नाही. आपल्याला आजार होतात, बहुतेक लक्षणे उद्भवतात ती यांच्या असण्यामुळे नाही, आपल्याला तक्रारी उद्भवतात त्या  आपली प्रतिकारशक्ती यांच्याविरुद्ध उभा  दावा  पुकारते म्हणून. ताप, सूज, वेदना, लाली,  खाज, पुरळ, लसीका ग्रंथी सुजणे आणि एकूणच रोगट  अवयवाचा कार्यनाश होणे हे सगळे ह्या लढाईचे परिणाम. हे जीवनावश्यक असलं तरी दरवेळी उपयोगी ठरतंच असं नाही. कधीतरी अती प्रतिकार, अती सूज, अती कार्यनाश हा आपल्याच नाशाला कारणीभूत होतो.  कोव्हिडमुळे झालेले बरेचसे मृत्यू हे प्रतिकारशक्ती मोकाट सुटल्याने (सायटोकाईन स्टॉर्म) झालेले आहेत. तथाकथित इम्यूनिटी बूस्टर्स  विकून आपल्या तुंबड्या भरणाऱ्यांच्या औषधाने, प्रत्यक्षात इम्यूनिटी वाढतच नव्हती हे बरेच झाले म्हणायचे. नाहीतर या (राज)वैद्याच्या औषधाने, धनाबरोबर आणखीही अनेकांचे प्राण गेले असते आणि तो खरोखरच यमराज सहोदर  ठरला असता.

कोव्हिड मूळचा वटवाघूळतला जंतू. तो माणसांत संक्रमित झाला आणि हाहाकार उडाला.  बदलत्या वातावरणात उडणारे, पळणारे, पोहणारे, सरपटणारे अनेक जीव आपलं घरटं हलवतील, स्थलांतराचे मार्ग बदलतील, विणीचे हंगाम बदलतील.   नवनवे  जंतू, नवनव्या जनतेच्या संपर्कात येतील. बरेचसे हल्ले आपण परतवून लावू पण काही लढाया जंतूही जिंकतील. नव्या नव्या साथी येतच रहातील. अगदी धरा जरी तापली नाही, घरटी जरी हलली नाहीत, तरीही हे होईलच. पण धरा ज्वराने हे सारं खूप वेगे वेगे होईल, सारं अपूर्व, अनपेक्षित, अकल्पित असेल. 


दैनिक सकाळ 

शुक्रवार 

१९.०४.२०२४


Friday 12 April 2024

हवामान अवधान लेखांक २

लेखांक २ रा

 

आस्मानी आणि सुलतानी

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे आणि यामुळे धरा ज्वरामुळे निर्माण होणारे प्रश्न अधिकच बिकट  होत आहेत.

 

आता यातून मार्ग काढायचा, भविष्यकाळाचा वेध घ्यायचा, तर भूतकाळाचा नेटका अभ्यास असायला हवा. नव्या तंत्रज्ञानाने इतिहासाची  आणि प्रागैतिहासाची नवी दालने खुली  केली आहेत. पृथ्वीने कधी आणि किती उन्हाळे, हिवाळे पाहिले आणि तत्कालीन सजीव सृष्टीने या अरिष्टाचा कसा सामना केला, हे आता समजावून घेता येतं. एकच उदाहरण पाहू. माणसाच्या प्रतिकारशक्तीच्या अभ्यासातून, कोणती शस्त्रास्त्र तिला कधी प्राप्त झाली हे शोधता येतं. याचा अर्थ उत्क्रांतीच्या ओघात त्या  त्या काळात ती जीवनोपकारक  ठरली. म्हणजे त्या काळी, त्या शस्त्रांनी घायाळ होणारे शत्रू असतील.  मग हे शत्रू कोणत्या वातावरणात वाढतात बरे? अशा बदलाला तोंड देत जगले कोण? तगले कोण? शेष कोण आणि नामशेष कोण?; असा उलटा विचार  करता येतो. भूतकाळाचा वेध घेता येतो. जे शेष राहिले, ह्या संकटाला पुरून उरले, त्यांचे आपण वंशज.

 

अशा संशोधनातून प्रश्न जरी नीट समजला तरी या  मंथनातून जी उत्तरे येतील ती अमृतमय असतील असं नाही. असे उपाय अमलांत आणणे म्हणजे हलाहल पचवण्यासारखंच. कारण हा निव्वळ शास्त्रीय प्रश्न नाही. त्याला अनेक अर्थ-राजकीय कंगोरे आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील प्रचंड मोठी  जनता, भरपूर ऊर्जा वापरून वेगाने प्रगती करण्यास आतूर आहे.  ‘पृथ्वीच्या संपत्तीची लूट तुम्ही केली,  आमच्यावर राज्य गाजवून आम्हालाही लुटलंत आणि आता पोट भरल्यावर, ढेकर देऊन, आम्हाला धरा-ज्वराचा धाक घालून, सबूरी शिकवणे हा अप्पलपोटेपणा आहे’, असं त्यांचं पहिल्या जगाला सांगणं आहे.

 

हा प्रश्न कुठल्याही जागतिक युद्धापेक्षाही भीषण त्यापेक्षाही गंभीर आणि सार्वत्रिक परिणाम असणारा आहे. कसं ते इतिहासातील उदाहरणाने  पाहू.

 

सुमारे १८६० साली, सागर आणि धरेवरील तापमान  थार्मोमिटरने नीट नोंदवायला सुरवात झाली. ते वाढते आहे आणि त्याला मानवी कारणे आहेत हे आता स्पष्ट झाले. कॉलराच्या साथीचा मागोवा घेता घेता एल् निनोचा प्रताप स्पष्ट होत गेला. भारतात एल्  निनोच्या (आणि काही घटकांच्या) परिणामी, १८७६ ते १८७८ असे  महादुष्काळ पडले. एल् निनोमुळे आशियाकडेचे बाष्प पूर्व पॅसिफिक प्रदेशात वाहून नेले गेले. पेरू वगैरे देशात अतिवृष्टी तर आशियात अवर्षण अशी परिस्थिती निर्माण झाली.

 

मात्र या आस्मानीने घडलेली उपासमार आणि रोगराई सुलतानीने शतगुणीत झाली. वसाहतवादी, नफेखोर, शोषक ब्रिटिश शासनकर्त्यांची भूमिका माल्थस विचारांनी भारलेली होती. दुष्काळ ही तर भूईला भार झालेली प्रजा कमी करून संतुलन साधणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. ‘धान्य निर्मितीच्या वेगापेक्षा भारतीयांची प्रजा वेगानी वाढत्येय’, (तेंव्हा दोष जनतेचा आहे), हे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांचे उद्गार. त्यामुळे  इथल्या जनतेची अन्नान्न दशा झालेली असताना इथले धान्य ब्रिटनला निर्यात होत राहिले. चार शितं तरी मिळतात म्हणून सरकारी कामांवर जणू भुतंच, अशी खंगलेली, कंगाल माणसं राबू लागली. पुरुषांस, दिवसांस एक पौंड धान्य आणि एक आणा असा दर होता. बायका पोरांना म्हाताऱ्यांना  आणखी कमी होता.  एल् निनोचा फेरा उलटून, पुन्हा पाऊस पडून, प्रजेच्या तोंडी काही पडेपर्यंत, उपासमारीनं आणि प्लेग, कॉलरा वगैरे रोगराईनी कोट्यवधी बळी घेतले.

 

ही सुलतानी निव्वळ वसाहतींतच नाही तर खुद्द इंग्लंडच्या घटक राज्यांतही थैमान घालत होती.   आयर्लंडवर इंग्लंडची सुलतानी होती तेंव्हा बटाटा युरोपात आला (१५९०) आणि  गरीबाघरचा घास झाला. ‘द पोटॅटो इटर्स’ हे व्हॅन गॉंचे चित्र प्रसिद्धच आहे.  पुढे बटाट्यावर बुरशी पडून पीकं गेली (१८४६-४९)  आणि कोट्यवधी  आयरीश माणसे दुष्काळाचा घास झाली. गोरगरीब उपाशी तर मेलेच पण अस्वच्छतेने उवांची बजबजपुरी माजली आणि कित्येक टायफसने मेले; उरलेसुरले कॉलराला बळी पडले. त्यात धनी इंग्लंडने आयर्लंडमधील  धान्याच्या निर्यातीला मोकळीक देऊन, मक्याच्या आयातीवर बंदी घातल्याने (कॉर्न लॉ) परिस्थिती आणखी चिघळली.

 

दुष्काळ अनेकांचा पोषणकर्ताही ठरतो. या महादुष्काळानंतर मलूल प्रांतांवर अधिराज्य गाजवण्यासाठी वसाहतखोरांनी पुन्हा हुंकार भरला.  चहा, कॉफी, उस आणि रबराच्या मळ्यांवर राबायला मजूर सस्यात मिळाले म्हणून  जगभरचे मळेवाले खुश झाले.     पाद्रीही खुश झाले. येशूच्या कळपात वळवायला त्यांना अनाथ मुलं, नाडलेली प्रजा आयतीच  मिळाली. त्यांनी नेटीवांसाठी इस्पितळे उभारली. अनेक ठिकाणी आधुनिक वैद्यकीशी स्थानिकांची ही पहिली ओळख ठरली.   पुढे त्यातूनच  माहिती संकलन आणि संशोधनाची सुरवात झाली. सेवाभावी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व वाढत गेले. लहान मोठे सावकार खुश झाले. त्यांचे  पाश  जनांच्या गळा पडले आणि बलाढ्य देशांचे पाश गुलाम देशांच्या गळा पडले. धनको आणि ऋणको देशांतील तफावत वाढली. थोडक्यात एल् निनोच्या एका फटक्यानी चक्क  ‘तिसऱ्या जगाची’ निर्मिती झाली.

 

म्हणूनच आस्मानी बरोबरच सुलतानीचा अभ्यासही हवा.

 

 दै. सकाळ 

१२.४.२४

Saturday 6 April 2024

हवामान अवधान:- लेखांक १

धरा-ज्वर आणि मानव रोगजर्जर 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई 

सर्व ऋतुंची नावे ‘ळा’ ने संपतात आणि म्हणून, वर्षातून निदान तीनदा, ‘आला उन्हाळा/पावसाळा/हिवाळा; आरोग्य सांभाळा’  असा यमक जुळवत मथळा देता येतो. आरोग्याचा आणि हवामानाचा संबंध एवढाच नाहीये!  तो अधिक सखोल आणि जटील आहे. धरा-ज्वर आणि परिणामी हवामान बदलाची हवा असताना तो समजावून घेणे आवश्यक आहे. 

जास्तीजास्त इतके आणि कमीतकमी इतके अशा हवामानाच्या एका अरुंद पट्ट्यामध्येच आपण, आपली पिकं, आपले पाळीव प्राणी, आपले रोगजंतू, आपले मित्रजंतू, गुरंढोरं जगात असतो; नव्हे जगू शकतो. सुसह्य हवामानाच्या ह्या दोन काठांमध्येच मानवी जीवनाचा आणि  संस्कृतीचा प्रवाह वाहू शकतो.  याला म्हणतात गोल्डीलॉक्स झोन. गोल्डीलॉक्सची लोककथा प्रसिद्ध आहे. अस्वलांच्या गुहेत शिरलेली ही गोड मुलगी; पाहते तो काय एक बेड खूप मोठं, एक खूप छोटं आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. एका बाउल मधलं पॉरिज खूप गरम, एकातील खूप गार आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. वातावरणाचे तापमान (आणि इतरही अनेक घटक) हे असे  ‘जस्ट राईट’ असावे लागतात. जेंव्हा गोष्टी ‘जस्ट राईट’ असतात तेंव्हाच आपण सर्वाधिक  सुखासमाधानाने नांदू शकतो.

ही मर्यादा ओलांडली गेली की साऱ्या रचनेवर ताण येतो. दुष्काळ पडतात, पूर येतात, पिकं जातात, कुपोषण, उपासमार होते; अशी भुकी कंगाल प्रजा रोगराईला बळी पडते. ही रोगराई सुद्धा विलक्षण असते. नव्या वातावरणाला साजेसे नवे जंतु पसरतात. आपला त्यांचा आधी सामना झालेला नाही, तेंव्हा असे अपरिचित आजार झपाट्याने पसरतात. डास, माशा, पिसवा, उंदीर अशांची प्रजा वाढते आणि मलेरीया, कॉलरा, प्लेग सारखे चिरपरिचित आजारही पसरू लागतात. नैसर्गिक उत्पातांच्या पाठोपाठ बेघरांचे, बेकारांचे, अनाथांचे, निराधारांचे तांडे शहरांच्या दिशेने निघतात. मनोरुग्णांची संख्या वाढते. 
  
‘हेल्थ इज वेल्थ’; तेंव्हा रोगिष्ट प्रजा समृद्धी निर्माण करू शकत नाही. मग दैन्य आणि दारिद्र्य पसरतं. दरिद्री देश उत्तम आरोग्य व्यवस्था उभारू शकत नाही; कारण ‘हेल्थ इज वेल्थ’ इतकेच, ‘वेल्थ इज हेल्थ’ हे ही खरेच आहे.  जे विकल असतात त्यांचा आधी बळी जातो आणि इतरांचे कालांतराने प्राण जरी नाही तरी त्राण तरी जातातच. हा सारा उत्पात केवळ माणसापुरता सीमित नाही. ऋतुचक्राचा आस उडाल्यावर सारी सृष्टीच डळमळली तर त्यात आश्चर्य नाही. सृष्टीत आपण कस्पटासमान, तेंव्हा जग पुनरपि सावरण्याची आपली क्षमता तशी मर्यादित. 

हे भविष्याचे कल्पना चित्र नाही. हे आपल्या आसपास, संथपणे पण निश्चितपणे घडते आहे. पृथ्वीचा पारा चढतोय हे आता अटळ सत्य आहे.

पृथ्वीचे तापमान जर सतत गार, गरम होतच  असतं तर आत्ताचा तापही या निसर्गचक्राचा भाग असेल,  हा तापही चढेल आणि उतरेल,  मागील तापातून माणूस जगला वाचला त्याअर्थी याही तापातून निभावून जाईल अशी भाबडी आशा काहींना असते. पण हा धरा-ज्वर वेगळा आहे. पूर्वीच्या तापाशी तुलना करता, एकविसाव्या शतकाच्या अखेरीस चांगला तीन चार डिग्री सेल्सियसने पारा चढेल, असा अंदाज आहे. पृथ्वी चांगली जख्ख म्हातारी आहे. वीस तीस मिलियन वर्षांचा इतिहास आहे तिला पण ती अशी तापाने फणफणल्याची नोंद तिच्या जुन्या केसपेपरवर आढळत नाही. पूर्वीही हिमयुगांची आवर्तने झाली आहेत आणि दरम्यानच्या काळात वसुंधरा तापली होतीच; पण इतकी नाही.  इतकंच नाही तर हा पारा झपाट्याने चढेल ही देखील गंभीर गोष्ट आहे. पूर्वीही पृथ्वीला ताप आला होता पण इतक्या झपाट्याने तो वाढला नव्हता. पारा वेगेवेगे  वाढल्यामुळे वाढत्या तापमानाशी जुळवून घेणं कित्येक जीवमात्रांना अशक्य होईल. 

ह्याला जबाबदार आहोत आपण, मनुष्य जात. माणसाला अग्नीचा शोध लागला, पुढे शेती, औद्योगिक क्रांती अशी माणसाची ऊर्जेची भूक वाढतच गेली आणि कळत नकळत वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जाऊ लागला. तापमान वाढीत याचा मोठा वाटा आहे.  मनुष्यहस्ते घडलेल्या या पापाचं माप म्हणजे वातावरणातील कर्बवायू प्रमाणात पूर्वीपेक्षा सुमारे 40%नी  वाढ. आपण जणू पृथ्वीला कर्बवायूची आणि कसली कसली गोधडी लपेटून, सूर्याची उष्णता इथेच राहील अशी व्यवस्था केली आहे.

माणसाच्या वावराचा, नैसर्गिक संसाधनांच्या वापराचा ठसा अधिकाधिक खोल, रुंद आणि गडद होतो आहे. पृथ्वीच्या जीवनातलं  सद्य युग म्हणजे होलोसीन युग. ११,७०० वर्षापूर्वी सुरू झालेले हे नूतनतम युग. होलोसीन  युगाकडून, जेमतेम 200 वर्षांमध्ये, आपली वाटचाल ‘अँथ्रोपोसीन’ युगाकडे व्हायला लागली आहे. अँथ्रोपोसीन म्हणजे मनुष्यमात्रांचे युग, छे, छे, हे तर ‘मात्र मनुष्य’ युग. इथे केवळ एकाच प्राण्याचे  अधिराज्य आहे. आज भूतलावरील  पृष्ठवंशीय प्राण्यांत 98% वाटा माणूस आणि त्याच्या  पाळीव प्राण्यांचा आहे, म्हणजे बघा.   ‘विपुलाच पृथ्वी’च्या देण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आपण पहिल्यांदा ओरबाडून घेतलं ते 1980 च्या सुमारास.  तेव्हापासून हे रोज सुरू आहे. व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे. 
पुढील काही लेखांकात ह्याचे आरोग्यविषयक परिणाम आपण पाहणार आहोत. 

दै.सकाळ
५एप्रिल २०२४