Friday 31 December 2021

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग १ झंप्या, भुपी आणि गूगल आज्जी

 शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग १

झंप्या, भुपी आणि गूगल आज्जी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
हॅलो दोस्त मंडळी,
हा झंप्या आणि ही, त्याची बहीण भुपी. दोघे शाळेत आहेत भुपी मोठी आहे. आहे सातवीत. झंप्या छोटा. तो आहे पाचवीत.
झंप्या आहे मोठा लाघवी आणि तरतरीत. त्याचे मोठ्ठे मोठ्ठे, डोळे तर सतत कुतुहलाने इकडे तिकडे बघत असतात. मोठ्या डोळ्यांसाठीच झंप्या फेमस आहे.
भुपी तशी इतर चार मुलींसारखी आहे. पण तिचे केस खूप लांब आहेत. ती लांब वेण्यांसाठी फेमस आहे. पण एरवी शांत आणि मितभाषी का काय म्हणतात तशी भुपी, झंप्याशी भांडताना एकदम वाघ आहे. सॉरी वाघीण आहे!
एकमेकाना चिडवणे हा दोघांचा मुख्य टाइमपास आहे आणि फावल्या वेळात काहीतरी खटाटोप करून बघणे हा उप-टाइमपास. आता हेच बघा ना, येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही पाहुण्याने झंप्याला विचारले, ‘तू मोठा झाल्यावर काय होणार?’
यावर झंप्याचं वर्षानुवर्ष ठरलेले उत्तर आहे, ‘मी भुपीपेक्षा उंच होणार!!’
वर्षानुवर्ष हे उत्तर ऐकताच भुपी त्याला वेडावून दाखवते आणि दारामागे दोघांच्या उंचीच्या रेषा काढलेल्या आहेत त्याची आठवण करून देते.
दारामागे दोघे अगदी लहान असल्यापासूनच्या खुणा आहेत. दर दोन तीन महिन्यांनी दोघांचा ऊंची मोजण्याचा कार्यक्रम असतो. झंप्या, सध्या तब्बल सात सेंटीमीटरनी बुटका आहे. पण ते सध्या. झंप्याच्या भाषेत सांगायचं तर, ‘आगे आगे देखो होता है क्या!’
झंप्या बावळट असून त्याला यडा बनवणे कुणालाही शक्य आहे असा भुपीचा ठाम विश्वास आहे. तर भुपी चक्रम असून, आपणच हुशार आहोत असा झंप्याचा घट्ट समज आहे. एकदा असाच दोघांचा वाद झाला. शेवटी झंप्यानी भुपीला विचारलं, ‘सीनियर म्हणजे काय?’
‘मोठा!’
‘बरोबर, मग आता सांग तू दुसरीत होतीस तेंव्हा मी कितवीत होतो?
‘सीनियरला!’
‘बघ म्हणजे तू दुसरीत आणि मी सीनियरला!’ सीनियर, म्हणजे जणू कॉलेज असल्यासारखा आव आणत, झंप्या म्हणाला.
असं काही झालं की भुपी चिडते. त्याला जरा बदडते. पूर्वी बिचारा सारखा मार खायचा. पण आता त्याची पॉवर वाढली आहे. आता तो मार खात नाही. पूर्वी हा मार खायचा आणि भुपीनी ह्याचा फटका चुकवला, तर रडत रडत, ‘ती भुपी बघ ना, मला तिला मारू देत नाहीय्ये!’ अशी आजीकडे तक्रार करायचा.
आजी म्हणजे गूगल आजी. ही आजी या दोघांची अतिशय लाडकी आणि ही दोघं आजीची लाडकी. आईबाबा गावाकडे असतात. ही दोघं इथे शहरात रहातात. आजीबरोबर. शिक्षणासाठी. तिघांचं मेतकूट अगदी छान जमतं.
या दोघांना लाडाच्या वेगवेगळ्या नावानं हाका मारणं हा जणू आजीचा छंदच. भुपीला ती कधी पिल्लू म्हणते, कधी मनी म्हणते, कधी माऊ म्हणते तर कधी मनीमाऊचं पिल्लू म्हणते आणि झंप्याला चॉम्स, चॉकी, लाडू, बंब्या अशी अनेक नावं आहेत. मुळात झंप्या आणि भुपी हीसुद्धा लाडाचीच नावे आहेत. झकासचं झालंय झंप्या आणि भुदेवीचं झालंय भुपी.
खरंतर वर्गातल्या मित्रमैत्रीणींसमोर असल्या नावानं हाक मारणं दोघांना आता आवडत नाही. पण आजीला कोण सांगणार? झंप्यानी खूपच डोळे वाटरले तर आजी त्याला झकासराव म्हणते!
पण आजीचीच गेम आजीवर उलटवायची म्हणून दोघांनी मिळून आजीला, गूगल आजी, असं नाव ठेवलं आहे,!! पण ह्याला कारण आहे बरं. आजी एकदम स्मार्ट आहे. अगदी गूगल इतकी स्मार्ट. तिला वाट्टेल ते विचारा, तिच्याकडे उत्तर असतंच. गणित, विज्ञान, व्याकरण असं काहीही विचारलं तरी ती उत्तर देतेच. अगदी बरोबर उत्तर देते. देणारच. ती शास्त्रज्ञ होती. डॉक्टर होती पण नंतर माणसाच्या गुणसुत्रांवर तिनी खूप संशोधन केले होते. त्यासाठी ती जग फिरली होती. तिच्या लॅबमध्ये तिनी माकडे पाळली होती. त्यातल्या माकडांची नावे होती, चॉम्स, चॉकी, लाडू आणि बंब्या! आणि माकडीणींची नावे होती, मनी, माऊ आणि पिल्लू!!
आजही ती रोज काहीतरी वाचत असते. इंटरनेटवर बसत असते. तिच्या परदेशी मित्रांचे फोन येतात तिला. त्यांच्याशी फाडफाड इंग्लिश बोलते ती. इंग्लिशमधून जोक मारते आणि स्वतःही खोखो हसते.
जोकची तर आजीला भारी आवड. आजी फनी आहे. अगदी तूफान फनी. आता कालचंच बघा ना. झोपताना झंप्यानी आजीकडे गोष्टीसाठी हट्ट धरला. साधीसुधी नाही, भुताची गोष्ट हवी असा हट्ट धरला. मग आजीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
‘एक होतं भूत. एकदा त्याच्या मुलाची, म्हणजे बेबी भुताची बर्थडे पार्टी होती!’
बेबी भुताची बर्थडे पार्टी!! ह्या कल्पनेनीच झंप्याला इतकं हसू आलं की तो हसता हसता कॉटवरुन खाली पडला. कसला आवाज झाला म्हणून भुपी बघायला आली. भुताची बर्थडे पार्टी म्हटल्यावर तीही हसायला लागली.
आजी पुढे सांगू लागली, ‘थोड्याच वेळात सगळी भुतावळ जमली. माळरानावरची हडळ आली. तिनी केक आणला होता. पिपळावरचा मुंज्या पावभाजी घेऊन आला. पाण्यातली आसरा कोल्ड्रिंक घेऊन आली. पिशाच्च, वेताळ, सैतान, संमंध आणि खवीस असे एकाच गाडीतून आले. ब्रम्हराक्षसाची स्कूटर पंक्चर झाली म्हणून हाकामारी जाऊन त्याला आपल्याबरोबर घेऊन आली. बर्थ डे पार्टीत सगळ्यांनी हीsss धम्माल केली. भूतंच ती, त्यांनी भरपूर धुडगूस घातला. वेताळानी, राजा विक्रमादित्याची गोष्ट सांगितली. सैतानानी, देवादिकांच्या गोष्टी सांगून सगळ्यांना घाबरवून सोडलं. अगदी पाचावर धारण बसली सगळ्यांची. पिशाच्च, सैतान, संमंध आणि खवीस ह्यांचा हिपहॉप डान्स तर बेफाट झाला.’ आजीनी अगदी रंगवून रंगवून वर्णन केलं.
दोघेही आता पेंगुळले होते. आजी म्हणाली, ‘शेवटी सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. पण त्यात जरा गोचीच झाली.’
‘काय झालं?’, भुपी.
अगं फोटो मुळी कोराच आला. कोण्णीच नव्हतं त्यात.’
‘का बरं?’ भुपी.
‘अगं कसं असणार? भुतं मुळी नसतातच ना! मग फोटोत तरी कुठून येणार?’
आजीचे हे लॉजिक ऐकून दोघेही गार झाली. भुपी तर फिदीफिदी हसायला लागली. काय बोलावं हे कोणालाच सुचेना.
‘शेवटी खूप दुपार झाली म्हणून सगळे आपापल्या घरी गेले! झोपा बरं आता.’ आजीनी गोष्ट आवरती घेतली.
झंप्या चमकला.
‘दुपार झाली? म्हणजे पार्टी संध्याकाळी नव्हती?’ झंप्या.
‘भुतांना कुठला संध्याकाळी वेळ? रात्री तर सगळी भुतं बिझी! त्यामुळे त्यांच्या बर्थ डे पार्ट्या सगळ्या पहाटे!!’ आजी.
झंप्या आता पुरता बुचकळ्यात पडला होता. शेवटी म्हणाला,
‘काहीतरीच हां तुझं. भुताची गोष्ट तर सांगते मग म्हणते भुतं नसतात. मी सांगतो भुतं असतात. कित्ती लोकांना दिसल्येत. आमच्या शाळेत तर भूत पाहिलेली तीन मुलं आहेत.’
‘काही ठिकाणी तर भूत बंगले असतात. काही लोकं प्लॅंचेट करतात. ते कसं करतात मग?’ भुपी तावातावाने म्हणाली.
‘करू देत. भुतं नसतात, पण काही जणांना ती आहेत असं वाटतं. त्याची कारणे आहेत. सांगीन मी उदया. झोपा बरं!’
उद्या आजी काय सांगणार याचा विचार करत दोघं गाढ झोपून गेली.
पूर्वप्रसिद्धी
किशोर
जानेवारी २०२१

Tuesday 21 December 2021

अंग बाहेर येणे

अंग बाहेर येणे  
डॉ. शंतनू अभ्यंकर 

संसाराचा गाडा ओढून जीर्णशीर्ण झालेले आपले शरीराचे मुटकुळे घेऊन सुरकुतलेल्या आज्जी माझ्या पुढ्यात बसलेल्या असतात. 

‘काय होतंय?’ असं विचारताच त्या म्हणतात; ‘आता काय सांगायचं प्वोरा तुला; तू तर माझ्या नातवावाणी दिसतोयस, ग्वोरापान!’

माझं कौतुक मी सराईतपणे कानाआड करतो पण जे काही होतंय ते सांगणं आज्जींना जड जातंय एवढं मला समजतं. शेजारी बसलेला, पेन्शनीकडे झुकलेला, आज्जींचा लेक हळूच सांगतो, ‘तेsss अंग बाहेर येतंय म्हणतीए.’

मग आपोआपच माझ्या डोळ्यापुढे त्यांच्या घरी घडून गेला असणार असा प्रसंग येतो. बरीच वर्ष हे दुखणं आईनी अंगावर काढले असणार. मग नुकतेच ‘दूर देशीचे प्रौढ लेकरू’ गावी आलं असणार. माजघरातील मिणमिण उजेडात त्या वृद्ध काकणांनी आधी त्याला कुरवाळले असणार आणि मग जरा आडवळणाने आपली व्यथा सांगितली असणार. मग इतके दिवस न बोलल्याबद्दल आईने लेकाची बोलणी खाल्ली असणार. तरीही दवाखान्यात यायला का कू केली असणार. आता आज्जी इतक्या संकोचणार की तपासणीसाठी निजणार ते पदराने चेहरा झाकूनच!! हे सगळं दरवेळी तस्सच घडलेलं असतं आणि घडतं.  

अंग बाहेर येणे म्हणजे योनीमार्गातून आतले अवयव बाहेर डोकावणे. जसा खिसा उलटा बाहेर येतो तसं काहीतरी. सुरवातीला गर्भ पिशवीचे तोंड, मग थोडासा भाग (Uterine prolapse) आणि कधीकधी तर संपूर्ण गर्भपिशवी योनीमार्गाबाहेर सरकलेली आढळते (Procidentia). या गर्भ पिशवीच्या पुढे मूत्रमार्ग आणि मूत्राशय असते आणि मागे मलाशय असते. हे अवयव, गर्भपिशवी बरोबर, खाली उतरतात. अर्थात खाली उतरतात याचा अर्थ हे अवयव बाहेर डोळ्यांना दिसतात असं नाही. तर बाहेर आलेल्या योनीमार्गाच्या त्वचेखाली यांचे फुगवटे आहेत, हे लक्षात येतं.  

अंग बाहेर येणे हा वयस्कर स्त्रियांमध्ये आढळणारा प्रकार आहे. विशेषतः गरीब, ग्रामीण, वर्षानुवर्ष काबाडकष्ट करणाऱ्या, कुपोषित, बहुप्रसवा महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. वयस्क, स्थूल महिला, बद्धकोष्ठता, सततचा खोकला अशा कारणेही अंग बाहेर येते. बरीच आणि पाठोपाठची बाळंतपणे, अवघड, वेळखाऊ, चिमटा/वाटी (Forceps/Ventouse) लावून वगैरे झालेली बाळंतपणे, मोठ्या आकाराची बाळे या साऱ्यामुळे कटी तळाच्या स्नायूंना इजा होते. ते अशक्त होतात आणि परिणामी अंग बाहेर येते. 

कधी कधी अगदी खात्यापित्या घरच्या स्त्रियांमध्ये किंवा तरुणींमध्ये देखील हा प्रकार आढळतो. अशावेळी मुळातील आधाराच्या दोऱ्याच सैल आणि अति लवचिक असल्याचा हा परिणाम असतो. काही वेळा पिशवी काढल्यावर देखील उरलेला योनीमार्ग असा उलटा बाहेर येतो. पण हे प्रकार क्वचित दिसतात तेंव्हा त्याबद्दल इथे इतकेच पुरे. 

गर्भपिशवी एखादा तंबू ठोकावा तशी कटीभागामध्ये ठोकलेली असते. तंबुला जशा तळाशी मध्यावर आणि माथ्याशी दोऱ्या लावून, तो ताणून धरलेला असतो, तशी गर्भपिशवीदेखील तळाशी, मध्यावर आणि माथ्याशी ताणून धरल्यासारखी असते. पैकी तळाच्या दोऱ्या आणि स्नायू बहुतेक भार वाहत असतात. मधल्या आणि वरच्या दोऱ्या या शोभेच्या मात्र. या तळाच्या दोऱ्या आणि/किंवा स्नायू सैल झाले की गर्भपिशवी आपली जागा सोडून कटी भागातून योनीमार्गात उतरते आणि कधीकधी पूर्ण बाहेर पडते. अशा महिलांना बरेच त्रास होतात. सतत कंबर दुखणे, चालताना, बसताना त्रास होणे, सतत जड जड किंवा ओढल्यासारखे वाटणे (उभ्याने काम केले की हा त्रास वाढतो. झोपून आराम वाटतो.), खाज, स्त्राव असे अनेक. अशा स्थितीत शरीरसंबंध सुखावह कसे रहातील? पण याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. पेशंटही नाही आणि डॉक्टरही नाही. एकदा कटीतळाचा आधार लेचापेचा झाला की बाकीचे अवयवही जागा सोडून खाली सरकतात. त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली म्हटल्यावर दुसरे काय होणार? मग मूत्रमार्ग खाली उतरला असेल (cystocele), तर लघवीवर नियंत्रण नसणे, वारंवार लघवीला इन्फेक्शन होणे, अंग आत ढकलल्याशिवाय लघवी न होणे, असे त्रास होतात. कधी कधी आतडी, मलाशय वगैरेही खाली उतरतात (Rectocele) आणि त्यांचेही फुगे दिसायला लागतात. 

अंग बाहेर येणे, हे किरकोळ असेल तर काही विशेष उपचार लागत नाहीत. वजन कमी करणे, खोकला, बद्धकोष्ठ यावर जरूर ते उपचार करणे, जड काम टाळणे, कटी तळाचे खास (केगेलचे) व्यायाम वगैरेचा कमी अधिक फायदा होतो. फायदा होतो म्हणजे बाहेर आलेले अंग आत जात नाही पण त्यापासूनचा त्रास मंदावतो. आतमध्ये बसवायची, गर्भपिशवी आतच राहील अशी योनीमार्गात ठेवायची प्लास्टिकची रिंग (Pessary) वगैरे प्रकार केले जातात. केले जातात म्हणण्यापेक्षा केले जायचे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण याचा फारसा उपयोग होत नाही. रिंग घालणे, काढणे, स्वच्छ करणे, त्यातून कधी जखम उद्भवली तर निस्तरणे, सगळेच जरा कटकटीचे असते. त्यामुळे या त्रासावर अक्सीर इलाज म्हणजे ऑपरेशन करून घेणे. त्यामुळे त्रास असेल तर ऑपरेशनला पर्याय नाही. वयस्कर स्त्रीयांमध्ये गर्भ पिशवी काढून, इतर अवयव वरती ढकलून, योग्य जागी टांगले जातात. मूत्राशय, आतडी, मलाशय असे एकेक भाग नीट तपासून, पुन्हा मूळ स्थानी सरकवून, आवश्यक ती बांधबंदीस्ती करून, टाके घातले जातात. तरुण महिलांमध्ये, ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांच्यामध्ये, गर्भपिशवी न काढता ती नुसतीच वर टांगण्याची शस्त्रक्रिया करता येते.  

नेमके कोणते अवयव, किती प्रमाणात बाहेर आले आहेत?, लघवीवर नियंत्रण सुटले आहे का?, पेशंट आयुष्याच्या आणि पुनरुत्पादनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे?, या सगळ्या बाबी विचारात घेऊन शस्त्रक्रियेचे स्वरूप ठरवले जाते. सहसा योनीमार्गे, क्वचित पोट उघडून आणि आता काही प्रकारात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ऑपरेशनचा ताबडतोब आणि चांगला परिणाम होतो. सुमारे 20% पेशंट मध्ये काही वर्षानी, खरंतर काही दशकांनी, पुन्हा असा काही प्रकार उद्भवू शकतो. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार दुरुस्त करावा लागतो. 

अंग बाहेर येणे हा प्रामुख्याने गरीबाघरचा आजार. कॉलेजमध्ये शिकताना अशा भरपूर केसेस बघायला मिळतात. डॉ. पुरंदरे, डॉ. शिरोडकर वगैरे भारतीय डॉक्टरांनी अशा या शस्त्रक्रियांच्या तंत्रात महत्वाची भर घातली आहे. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी तंत्रे विख्यात आहेत. सर्जरी शिकताना सुरवातीपासून बिलरॉथ, हॅलस्टेड, वर्धाईम्स वगैरेंचा भारदस्त वावर असतो. अचानक पुरंदरे आणि शिरोडकर भेटतात आणि बरं वाटतं; दूर देशी कोणी गाववाला भेटावा तसं.

Friday 17 December 2021

रविंद्र मनन, रविंद्र वीणा आणि रविंद्र झंकार

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १७ डिसेंबर २०२१ 
पुष्प १४ 
आजचे पुस्तक क्रमांक (५)  (अ, ब आणि क)
पुस्तकाचे नाव 
*रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार*
(कविता)
लेखक काका कालेलकर 



रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार
डॉ. शंतनू अभ्यंकर 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक आणि रसिक परंपरांचे प्रतिनिधी आहेत.  त्यांच्या गीतांजलीला  जागतिक वाङमयात विशेष स्थान आहे.  गीतांजलीतील प्रत्येक गीतात व्यक्त झालेल्या रवींद्रांच्या जीवन तत्वज्ञानाची उकल,  रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार या तीन पुस्तकातून  आचार्य कालेलकर यांनी आपल्या सोप्या शैलीत केली आहे.  प्रत्येक पुस्तकात मूळ बंगाली गीत, त्यातील भाव विशद करणारे मननीय चिंतन आणि कठीण बंगाली शब्दांचे अर्थ देण्यात आले आहेत. गीतांचे मराठी भाषांतर नाहीये.  

हे सर्व आपले कारावासातील साथी श्री. बिसेन यांच्या मदतीने कालेलकर यांनी केले आहे.  कारावास हा अशा पद्धतीने त्यांच्या आणि रसिक वाचकांच्या पथ्यावरच पडला म्हणायचा.  एकूण 157 गीतांपैकी 129 गीते इथे आहेत उरलेली 28 गीते राहिली ती राहिलीच. बहुतेक पुन्हा तुरुंगात टाकले असते तर जमले असते!! 

मला रवींद्र-गीतांचा आणि  रवींद्र-संगीताचा पहिला परिचय झाला तो शाळेत.  शाळेच्या सभागृहाबाहेर रवींद्रनाथांचा पूर्णाकृती पुतळा होता आणि शेजारी ‘व्हेअर द माइंड इज विदआऊट फियर’ ही त्यांची प्रसिद्ध  कविता लिहिलेली होती. ती आपोआप पाठच झाली. शाळेत चित्रकला आणि शिल्पकला शिकवण्यासाठी शांतिनिकेतनचे स्नातक असलेले, रवींद्र डे नावाचे, बंगाली बाबू शिकवायला होते.  त्यांनी आम्हाला शांतिनिकेतनची गोष्ट सांगितली.  चित्र आणि शिल्पकला तर त्यांना अवगत होतीच, पण सतार, तबला आणि गायनकलाही अवगत होती.  त्यांनी ‘चांडालिका’, ‘आम्रपाली’ अशी नृत्यनाट्ये बसवली. रवींद्रनाथांची अतिशय सुमधुर अशी गाणी आम्हाला शिकवली. ‘ओरे गृहबाशी’, ‘ए नहे मोर प्रार्थना’, ‘अंतर्मन विकसित कारो’, ‘एकला चालो रे’ ही गाणी चालींसकट आजही लक्षात आहेत. बंगाली भाषेवर आणि गीत-संगीतावर मी लट्टू झालो ते  तेंव्हापासून. पुढे पुलंचे, ‘रविंद्रनाथ: तीन व्याख्याने’, वाचलं आणि पुलंना पत्र लिहिले! मम भाग्य एवढे थोर की त्यांनी उत्तर दिलं. तो अक्षय अक्षरठेवा आजही मी जपून ठेवला आहे. 

त्यामुळे कालेलकरांची ही तिन्ही पुस्तकं दिसताच मी घेतली आणि कवितासंग्रह मुळीच वाचू नयेत, अशा पद्धतीने वाचली.  म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतच गेलो. तिथे  ‘अंतर्मन विकसित कारो’सारखी परिचित गीते भेटली आणि तिथेच  ‘सतार’ किंवा ‘ए नहे मोर प्रार्थना’सारख्या साक्षात्कारी कविता आपले तळपते वैभव दाखवत मनात रूजल्या.  

आजही एखाद्या आर्त किंवा कृतार्थ क्षणी  रवींद्रनाथांची एखादी ओळ मनात तरळून जाते आणि जणू दीपोत्सव सुरू होतो. अतिशय तरल, अतिशय भावगर्भ, अर्थपूर्ण, प्रासादिक, रसाळ आणि गेय रचना हे रवींद्रनाथांच्या काव्याचे वैशिष्ठ्य. 

शिवाय बंगाली आणि मराठीमध्ये बरेच साधर्म्य आहे. कालेलकरांची टिप्पणीही रसग्रहण म्हणावे अशी आहे.   त्यामुळे थोडा प्रयत्न करताच अर्थाचा बराच उलगडा होतो.  काहीवेळा अर्थाचा अनर्थही होतो.  ‘भीषण किंवा दारुण सुंदर’ म्हणजे ‘खूप सुंदर’; ‘बोका’ म्हणजे ‘वेडा’, असे काही अनर्थकारी शब्द. 

रवींद्रनाथ हे खरे आनंदयात्री कवी.  शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याद्वारे या सृष्टीचैतन्याचा आस्वाद मोठ्या रसिकतेने घ्यावा, उगाच संसार असार आहे अशा निरीच्छ,  नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा हे जीवन हे तर सौंदर्याचे आणि आनंदाचे निधान आहे; हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्या ‘सतार’ या गीताचा, मीच केलेला स्वैर मराठी अनुवाद इथे देतो आहे. मूळ बंगाली गीताच्या गद्य रसास्वादावर आधारलेला हा मराठी पद्यावतार आहे. तेंव्हा वाचकांपैकी जाणकारांनी ह्यातील गोच्या जरूर लक्षात आणून द्याव्यात आणि हे गौडबंगाल आणखी उलगडावे.  


सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll 

दिवसाचा सरला मेळा 
मैफिलीच्या झाल्या वेळा 
मांडेल ‘तो’च  स्वरखेळा  
साथ द्यायला तुझी सतार
 
सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

उघड तुझे तू सताड दार
अवकाशाचा घे अंधार 
सप्तलोकीची शांती अपार 
भुवना भरु दे अपरंपार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

विसर जुन्या सूरांचे सार,
तमी दे अर्पून गीत, असार 
विसर होती तुझी जुनी सतार 
छेडी नव्याने नवे हत्यार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

यातील रविंद्रनाथांनी केलेली प्रार्थना तर प्रतिभेची आणि सच्च्या आळवणीची परिसीमा आहे. तुझी मदत मला नकोय, कीव, करुणा,  दया, बक्षीस; काही काही नकोय.  मला स्वतःला सबळ करायचे आहे. एवढं साधेल असं तू बघ; अशी जगावेगळी मागणी टागोर करतात. क्षणभर असं वाटतं की रविंद्रनाथांचा हा सांगाती,  ‘बोट धरोनीया चालविशी’ असा नाहीये. उलट रविंद्रनाथच  त्याला बोट धरून चालवत आहेत;  आपल्याला काय हवं ते दाखवताहेत.    

ए नहे मोर प्रार्थना/ही न माझी प्रार्थना 

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा
माझ्या दुःखी व्यथित मनाचे तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही 
दुःखावर मला विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही
माझं मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा 
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही 
माझं मन खंबीर रहावं एवढीच माझी इच्छा 
माझं तारण तू करावस ही माझी प्रार्थना नाही 
तरुन  जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा 
माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही 
ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा 
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच 
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्या विषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा
भावानुवादकर्ता (मला तरी) अज्ञात 

कॉलेजमध्ये असताना ही कविता माझ्या टेबलासमोर लावलेली होती. कॉलेज संपलं. मित्रांची पांगापांग चालली होती. रूममधल्या माझ्या सख्ख्या मित्राने माझी आठवण म्हणून कवितेचा कागद ठेऊन घेतला. आजही तो त्याच्या टेबलवर विराजमान आहे. 
परवा एका पेशंटनी त्याला विचारलं, ‘ही कविता तुम्ही कुठून मिळवली?’ मग त्यानी कवितेची  गोष्ट सांगितली. 
तो पेशंट म्हणतो कसा, ‘ओह, शांतानू, आमी ताके कोबिता सीखीयेची! (त्याला मीच शिकवली ही कविता!)’ 
आणि कवितेमुळे माझे लाडके सर, रवींद्र डे,  मला पुन्हा भेटले.

मी अल्बर्ट एलिस

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १८ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ६
पुष्प १४ 
पुस्तकाचे नाव 
मी अल्बर्ट एलिस  
लेखक अंजली जोशी 
शब्द प्रकाशन 
पाने ३४०  
किंमत रू ३९०/-  

परिचयकर्ता डॉ शंतनु अभ्यंकर

 ‘मी अल्बर्ट एलिस’, हे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेलं मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे.  ही एक  चरित्रात्मक कादंबरी आहे.  
डॉ. अल्बर्ट एलिस हे  अमेरिकन मानसोपचारतज्ञ. हे औषध देणारे डॉक्टर नव्हेत. हे सल्ला देणारे डॉक्टर.  विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र ही त्यांची देणगी.  या कादंबरीतून अल्बर्ट एलिस यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य कसे विकसित होत गेले  याची तोंडओळख आपल्याला होते.
आजवर आपण बरीच  स्वमदत पुस्तके वाचली असतील.  ती वाचून आपण काही दिवस भारावूनही गेला असाल आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असेही झाले असेल. 
प्रचंड प्रेरित होऊन आपण माळ्यावरून कॅनव्हासचे बूट काढले असतील आणि महिन्याभरात ते आल्यापावली माळ्यावर गेले असतील किंवा एखाद्या अपमानाने खट्टू होऊन तुम्ही वर्षानुवर्ष कुढत बसला असाल किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या रिपूंशी दोन हात करता  करता  तुम्ही थकत किंवा वहावत किंवा  बहकत गेला असाल. ‘लोक काय म्हणतील’ नावाच्या पिशाच्च-भयापोटी तुम्ही कितीतरी इच्छा आकांक्षा मारल्या असतील किंवा अनिच्छेने लोकानुनयाचा मार्ग धरला असेल. सगळं कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था तर कितीतरी वेळा कितीतरी बाबतीत झाली असेल....      
पण या साऱ्यावर उतारा  म्हणून हे पुस्तक नाही बरं. अल्बर्ट एलिस यांची ही चरित्रात्मक कादंबरी म्हणजे सेल्फहेल्प  पुस्तक नाही.  पण आपला जीवन विषयक दृष्टिकोन बदलण्याची क्षमता या पुस्तकांमध्ये आहे.  
एखाद्या प्रसंगाकडे आपण कसे पाहतो, आल्या प्रसंगाला  आपण कसा प्रतिसाद देतो, यावर सगळं काही अवलंबून आहे; हा अल्बर्ट एलिस यांचा प्रमुख सिद्धांत. 
तत्क्षणी, जणू प्रतीक्षिप्त, म्हणून होणारी प्रतीक्रिया ही बरेचदा चुकीची आणि नंतर पश्चाताप पावायला लावणारी असते. डॅनियल काहनमननी लिहिलेल्या ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ मध्ये या विचारासाठी शास्त्रीय पुष्टी सादर केली आहे. या प्रतिसादावर आपण नियंत्रण मिळवू शकलो, सर्वात विवेकी, सुलभ, सुकर (आणि फायदेशीर) प्रतिसाद निवडण्याची सवय आपण लावून घेऊ  शकलो तर आपलं जीवन आनंदी होईल, असं त्यांचं सांगणं.  

हे शिकण्याची पद्धत म्हणजे विवेकनिष्ठ विचारपद्धती आणि हे वापरण्याचे तंत्र म्हणजे   विवेकनिष्ठ मानसोपचार. वेड्यांइतकीच  शहाण्यांसाठीही  ही विचार-वाट आहे. आपले आपणच यातून शिकत जायचं, सुधारत जायचं आहे. अनेक पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता, हे निवडण्याचा आधार म्हणजे विवेकनिष्ठ विचार.  ही संपूर्ण कल्पना अल्बर्ट एलिस यांना सुचली कशी, त्यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली कशी, त्यावरचे अभ्यास केले कसे आणि स्वतःच्या आयुष्यात बदल घडवले कसे; हे या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते. 

• परिस्थितीचे विवेकी मूल्यमापन, 
• नव्या संदर्भात परिस्थितीचे आकलन, 
• हास्य आणि विडंबन रसाचा वापर, 
• बागुलबुवांना थेट सामोरे जाणे आणि 
• अतार्किक विचारांना खुले आव्हान देणे 
अशी पंचतंत्रे डॉक्टरांनी सांगितली आहेत. कादंबरीच्या माध्यमातून ह्या तंत्रांच्या उत्क्रांतीचा अंदाज येतो. 

अल्बर्ट एलिस यांना काही आजारांमुळे लहानपणापासूनच भरपूर पथ्ये पाळावी लागत होती. मैदानी खेळ बंद, सलग वाचन बंद. असं झाल्यावर त्यांनीही स्वतःला तो जगप्रसिद्ध प्रश्न विचारला; *मीच का?*
  
पण ह्या प्रश्नाला कुरवाळत रडण्यापेक्षा त्यांनी या, अविवेकी प्रश्नाला मनातून हद्दपार कसं करायचे याचे तंत्र शोधून काढले. अडचणी आणि निराशा  त्यांच्याही पदरी आली. पण आपल्या विचारांना योग्य वळणावर आणण्यासाठी त्यांनी चार संदेश सूत्रे तयार केली होती.
१) काही मिळवायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही.
२) प्रतिकूल परिस्थिती हे आपल्याला मिळालेले वरदान आहे.
३) अपरिवर्तनीय परिस्थितीबाबत ऊर पिटून घेण्यापेक्षा तिचा स्वीकार योग्य.
४) हे ही दिवस जातील. 
(अर्थात हे सांगायला एलीस कशाला हवा? ‘कष्टेवीण फळ नाही’, ‘आपत्ती हीच प्रगतीची संधी’, ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’  आणि ‘हे ही दिवस जातील’; ही ज्ञान मौक्तिके तर रिक्षाच्या मागे लिहिलेली असतात!)

पण हे सारं शहाणपण सुसूत्रपणे मांडण्याचं काम एलीस यांनी केलं. त्याला अभ्यासाची जोड देण्याचं काम त्यांनी केलं. परस्पर विसंगत पर्यायातून निरक्षिर विवेक करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले.  प्रत्यक्ष व्यवहारात, उपचारात याचा तंत्रशुद्ध उपयोग त्यांनी केला. ही त्यांची महती.  
हे पुस्तक वाचून प्रेरित होणे आणि डॉ. अल्बर्ट एलीस यांचे अन्य लिखाण अभ्यासणे (जे  फारसे मराठीत उपलब्ध नाही),  त्यांची विचारधारा समजावून घेणे आणि शक्यतर अंगी बाणवणे ही पुस्तकाची महती.

Wednesday 15 December 2021

चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनांक १६ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ४  

पुस्तकाचे नाव 
*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान*
(प्रबंध) 
लेखक सदाशिव आठवले 
प्राज्ञपाठशाळा, वाई. 
पाने ९८  
प्रथमावृत्ती १९५८, 
तिसरी आवृत्ती १९९०; किंमत रू १००/- 

*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान 
परिचयकर्ता डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई*

चार्वाक हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. या नावाचा संबंध बुद्धीप्रामाण्यवादाशी  आहे अशी ओझरती माहिती असते आपल्याला. चार्वाक, लोकायत किंवा बाहर्स्पत्य तत्वज्ञान म्हणून ही विचारधारा प्रसिद्ध आहे.  
चार्वाक दर्शनाचा, म्हणजेच तत्वज्ञानाचा थोडक्यात आढावा घेणारे पुस्तक म्हणजे, ‘चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान’.  

प्राज्ञपाठशाळेची बरीच प्रकाशने  गाजली. पण त्यातलं हे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी लिहिलेले ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ विशेष गाजले.  

या पुस्तकामध्ये नऊ प्रकरण आहेत.   सुरुवातीला विषय प्रवेश मग चार्वाकाची  सूत्रे आणि त्यांचा ऐतिहासिक मागोवा लेखकानी घेतलेला आहे.  मग चार्वाकवाद नेमका काय आहे याचं वर्णन केलेले आहे.  

फक्त प्रत्यक्षप्रमाण हेच प्रमाण मानणारे असे हे चार्वाकवादी  लोक होते.  वेद अपौरुषेय नाहीत, त्यात केवळ पूर्वजांनी रचलेल्या कविकल्पना आहेत;  मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या कल्पनांपेक्षा आजूबाजूच्या जगाचा सुखदुःखासहीत स्वीकार करणे हे अधिक श्रेयस्कर आहे, अशी त्यांची मांडणी आहे. मोक्ष मिळावा म्हणून आहे त्या आयुष्यात स्व-पीडन  करून घेणे; साधनसामुग्रीची, संसाधनांची नासधूस करणे; जीवनाकडे सतत निराश आणि नकारात्मक दृष्टीने पाहणे; हे जीवन केवळ माया  असून सर्वस्वी  दुःखमय आहे, संसार असार आहे, वगैरे वगैरे भ्रम सतत उराशी कुरवाळत बसणे या सगळ्यावर चार्वाकांनी कठोर टीका केली आहे. 

चार्वाक नामे कोणी एकच  ऋषी किंवा मुनी  नव्हता असं दिसतं.  चार्वाकांनी लिहिलेले  एकसंघ असे लिखाण, ग्रंथ,  इतिहासाच्या पोटात लुप्त झाले आहेत. कदाचित असा एखादा ग्रंथ त्यांनी निर्माण केलाही  असेल.  पण सातत्याने आणि सगळीकडूनच विरोध असल्यामुळे असा ग्रंथ इतिहासाच्या पोटात गडप झाला असण्याची शक्यता जास्त आहे. 
चार्वाक दर्शन असा ग्रंथच उपलब्ध नसल्यामुळे,  चार्वाकांचे नेमके विचार काय होते, हे आपल्याला त्यांच्या विरोधातल्या लिखाणातून कळतं.  भारतीय तत्वज्ञान परंपरेत पूर्वपक्ष-उत्तरपक्ष अशा पद्धतीने विचार मांडण्याची, मंडन-खंडनाची पद्धत होती.  त्यामुळे चार्वाकांच्या टीकाकारांनी पूर्वपक्षांमध्ये, ‘चार्वाक असे असे म्हणतो’ अशी मांडणी केलेली दिसते आणि मग ते मत  खोडून काढण्यासाठी उत्तरपक्ष लिहिलेला दिसतो. अशा पद्धतीने अप्रत्यक्षरीत्या आपल्याला चार्वाकांचे विचार समजावून घ्यावे लागतात.  

खरंतर वेद नाकारणाऱ्या  तीन विचारधारा इतिहासात दिसतात. चार्वाक, बौद्ध आणि जैन.  बौद्ध आणि जैनांनी वेद नाकारले तरी पुनर्जन्म, स्वर्ग-नरक वगैरे कल्पना ते बाळगून होते.  जे प्रत्यक्ष आहे तेवढेच प्रमाण असं मानणारे फक्त चार्वाकच. 

 सृष्टीबद्दल कुतूहल तर दोन्ही पक्षांना होतं, पण विज्ञान कल्पनेचा शोध लागण्याआधी, स्वर्ग-नरक ‘आहे’ आणि ‘नाही’ हे दोन्ही युक्तिवाद तितकेच पोकळ होते.  अर्थात त्याकाळी आसपास काय घडते, कसे घडते, हे समजण्यासाठी पंचेंद्रिय हीच मर्यादीत साधने  माणसाकडे होती.  आता आपल्या डोळ्यांना दुर्बिणी आणि सूक्ष्म दर्शक फुटले आहेत,  कानांना रडार फुटले आहेत. असे करता करता आपल्या पंचेंद्रियांना एरवी  गोचर नाही, अशी सूक्ष्म आणि महा सृष्टी आपला मेंदू आता कवेत घेऊ शकतो. माणसाच्या आकलनाची क्षितिजं कितीतरी विस्तारली आहेत. त्यामुळे तेंव्हापेक्षा शब्दप्रामाण्य नाकारणे, अतिनैसर्गिक कारणमीमांसा नाकारणे,   हा  आता, कितीतरी सबळ, घडीव, ठाशीव आणि ठोस युक्तिवाद आहे. 

हा विस्तार झाला तो काही ठाम ग्रह आणि  आग्रह उराशी   बाळगल्यामुळे. ह्यातले काही येणेप्रमाणे.. 
• हे विश्व भौतिक आहे. 
• ते मानवी जाणिवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ही माया नाही.  
• याचे स्वरूप आपल्याला समजावून घेता येतं. 
• कोणत्याही बाह्य, परस्थ, अतींद्रिय, दैवी शक्तीशिवाय आसपासच्या सृष्टीचा अर्थ लावणे शक्य आहे.  
• त्रिकालाबाधित सत्य असे काही नसते. 

असा विश्वास उराशी बाळगून आजचे विज्ञान काम करते.

 चार्वाकांनी अशासारखाच काही विश्वास मर्मबंधातली ठेव जपावी तसा जपला.  पण त्यांची विचारधारा होऊ शकली नाही. चार्वाक कुठल्या राजसत्तेवर, समाजावर फार प्रभाव पाडू शकले  नाहीत  आणि आता तर केवळ सावली पाहून आपण मूळ विचारांचा अंदाज बांधू शकतो. 

पाखंडी विचारांना थेट देहदंड सांगणारे कितीतरी धर्म आहेत. पण काळाच्या ओघात इतके पाखंडी विचार हिंदूभूमीत  दर्शन म्हणून टिकले; नेस्तनाबूत झाले पण नष्ट नाही झाले; खंडन करण्यायोग्य वाटल्याने का होईना, उद्धृत केले गेले; हे आक्रितच म्हणायचे. हिंदू म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ आहे म्हणे,   त्यातील समृद्धी हीच असावी बहुतेक. ‘अत्त दीप भव’, असं सांगणाऱ्या बुद्धाचाही अवतार करणाऱ्या या संस्कृतीने ‘चार्वाकावतार’ कसा  मानला नाही हेच नवल वाटतं मला.  

म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावं;  तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक असा वा अज्ञेयवादी असा.  समविचारी असाल तर प्रगल्भ होण्यासाठी आणि विरोधी असाल तर शत्रूचे डावपेच लक्षात घेण्यासाठी, हे वाचलेच पाहिजे.

‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ हे विचार बीज पुढे युरोपात फोफावलं आणि प्रबोधन युग सुरू झालं. १६६० साली; म्हणजे पन्हाळ्याहून सुटकेच्या साली बरं का; स्थापन झालेल्या, त्या जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीचं बोधवाक्यच मुळी ‘नलीस इन व्हर्बा’ असं आहे. म्हणजे शब्दप्रामाण्य नाकारा. कुणाचा  शब्द हे महत्वाचे  नसून रोकडा  पुरावा हवा. 
कल्पना करा हे ‘नलिस इन व्हर्बा’चं बीज चार्वाक-काळीच इथे रुजलं असतं तर? तर प्रबोधन युग इथे अवतरलं असतं आणि ते सुद्धा काही शतके आधी!

वाडा चिरेबंदी आणि दायाद वारसा वाडा त्रयीचा

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

उत्तम मध्यम

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.