Monday 15 May 2017

दोन पत्रं

दोन पत्र


विख्यात अभिनेते, डॉ. गिरीश ओक माझे मित्र. एका कार्यक्रमासाठी त्यांनी दोन पत्रं लिहून मागितली, एक पेशंटनी डॉक्टरना लिहीलेलं आणि दुसरं त्याचं डॉक्टरनी दिलेलं उत्तर. सद्यस्थितीत दोन्ही बाजूनी विचार करून समतोल पण तरीही अर्थपूर्ण असं काही तरी मी खरडलंय असं आपलं मला वाटतं. सोबतची पत्र वाचा आणि तुमचं काय मत ते जरून नोंदवा???

महोदय,
बरेच दिवस लिहायचं मनात होतं. आज हिय्या करून पेन सरसावलं आहे. मनात आहे ते थेट सांगतो, रागावू नका, गोड मानून घ्या. शेवटी तुकारामांनी म्हटलेलंच आहे, ‘निंदकाचे घर असावे शेजारी’.
तसं माझं तुमचं काही वैर नाही. पण दरवेळी तुमच्याकडे आलो की पोटात गोळा ठरलेला. आता हा गोळा मोठा मोठा व्हायला लागला आहे. भीती अशी की आता हा कसाई आपल्याला कसा कसा कापतोय? कसा कसा नागवतोय? आपण तर आजारी, संपूर्ण परावलंबी, डॉक्टरशिवाय चालणार तर नाही पण जावं डॉक्टरकडे तर विश्वसनीय ठिकाण नाही. आपलं भलंच होईल या खात्रीऐवजी आपलं भलतंच होईल ही शंका आता कुरतडू लागते.
काय काय ऐकतो आम्ही, कट प्रॅक्टिस करणं प्रत्येकालाच भाग आहे म्हणे आता, खोट्या खोट्या तपासण्या, अनावश्यक ऑपरेशन, अनावश्यक औषधे, त्यातला कट, तपासणीच्या अव्वाच्या सवा फिया, पैसे देऊन विकत घेतलेले डॉक्टरकीचं शिक्षण, मृतालाही व्हेंटिलेंटर लावून मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचे प्रकार सर्रास सुरु असल्याचं ऐकतो... आणि माझा माझ्याच कानावर विश्वास बसत नाही.
पूर्वी आमचे फॅमिली डॉक्टर होते त्यांनी सांगितलेले आम्ही मुकाट ऐकायचो आणी आमचे कधीही वाईट झाले नाही.
फसवणूक तर पदोपदी वाट्याला येते, प्रत्येक क्षेत्रात येते, पण कधी बिल्डरच्या ऑफिसच्या काचा फुटल्याचं ऐकलं नाही. असं कसं? स्वस्त औषधे लिहून द्यायला डॉक्टर टाळाटाळ का करतात? अत्यवस्थ पेशंटला उपचारापूर्वी पैसे का भरावे लागतात? लाखोंची बिलं भरून सुद्धा पेशंट दगावला तर जबाबदार कोण? किरकोळ तक्रारींसाठी तपासण्यांचं मारूतीचं शेपूट का लावलं जातं? दोन डॉक्टरची मतं अजिबात जुळत नाहीत, उलट नेमकी विरुद्ध पडतात, असं कसं? एखाद्या हॉस्पिटलमधे केलेली तपासणी ही दुसऱ्या ठिकाणी नापास का होते? पुन्हा पहिल्यापासून तपासण्या का करायला लावतात? सर्वच डॉक्टर इतके बिझी कसे असतात? कोणालाच ऐकायला, बोलायला, समजावून सांगायला वेळ नसतो, प्रश्न विचारले की नाखूष, असं कसं? इतका सगळा गदारोळ होऊनही डॉक्टरच्या संघटना या गैरप्रकारांबद्दल अगदी क्षीण आवाजात का बोलतात?
मी काही कुणावर वैयक्तिक आरोप करत नाही, पण आम्हाला स्वस्त, खात्रीपूर्वक आरोग्यसेवा मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? डोनेशनोत्पन्न डॉक्टरांच्या ह्या भाऊगर्दीत चांगला डॉक्टर ओळखायचा कसा?
शेवटी एकच प्रश्न, डॉक्टर तुम्ही आजारी पडलात तर हीच व्यवस्था तुमच्याही वाट्याला येणार आहे याची भीती नाही का वाटत तुम्हाला?
तुमचा
एक पेशंट






आ. पेशंटसाहेब,
स. न.
तुम्ही मोकळेपणानी लिहिलंत हे बरं झालं. तुमचा युक्तीवाद थोडा विस्कळीत आहे, पण असो. एकूणच पेशंटनी वैतागून एकामागून एक तक्रारी सांगत जाव्यात आणि डॉक्टरनी त्या ऐकता ऐकताच त्यांची मनातल्या मनातल्या संगती लावावी तसं काहीसं वाटलं मला हे.
प्रथमच सांगतो की तुमच्या तक्रारी, आरोप हे काही प्रमाणात मान्यच आहेत. हे सत्यच आहे. तुम्ही लिहिलंय त्यात अतिशयोक्ती आहे, गैरसमज आहेत पण हा तुमचा दोष आहे असं मी म्हणणार नाही. उलट तुम्ही तक्रारींचा पाढा वाचला आहे आता योग्य निदान आणि उपचाराची योजना मी सुचवायची आहे.
लक्षात घ्या, मी ‘सुचवायची आहे’ असं म्हणतोय. करायची आहे असं नाही. मी सुचवलेले उपाय स्वीकारायचे किंवा नाही, हा पूर्णपणे तुमचा अधिकार आहे; आणि इथे सर्व सिस्टीमच पेशंट आहे. याला उत्तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, नियोजन, इंस्युरंन्स असं अनेक कलमी आहे.
सगळ्यात महत्वाचं, आणि हे तुम्हालाही मान्य असेल, की डॉक्टरवर हल्ले करून, दवाखाने जाळून प्रश्न नक्की सुटणार नाही. तुमचा राग थोडा शमेल पण यांनी वातावरण आणखी बिघडेल. ज्या कुणा पेशंटची जी काही तक्रार आहे, ती सांगायची, सोडवायची, त्याचा न्याय करायची यंत्रणा आपल्याकडे खूप जुजबी आहे, वेळकाढू आहे आणि त्यामुळे अशा यंत्रणांना सध्यातरी अजिबात विश्वासार्हता नाही. कायदा हा प्रश्न नीट हाताळत नाही म्हणुनच तर लोक कायदा हातात घेतात. खरी मेख इथे आहे. तक्रारीची योग्य दखल घेतली जात असती तर तुम्ही तरी ‘मला’ कशाला पत्र लिहीलं असतंत; थेट संबंधित अधिकाऱ्यालाच लिहीलं असतंत ना!
एकेकट्या डॉक्टरनी चालवायच्या लहान दवाखान्यांचे दिवस आता भरले आहेत. सतत खळ्ळ-खटॅकच्या छायेत रहाणं अवघड अवघड होत चाललं आहे. बिलात लवचिकता आणि घराजवळ, तुलनेने स्वस्त सेवा  हे या दवाखान्यांचे गुण; पण उपचार आणि बिलातील अपारदर्शकता आणि मोजक्याच प्रकारच्या सेवा हे यांचे तोटे. अशा छोटया दवाखान्यात तुम्ही अमक्या अमक्या डॉक्टरसाठी म्हणून जाता. पण हे बदलत चाललं आहे. अनेक डॉक्टरनी आणि व्यवस्थापनतज्ञांनी  एकत्र येऊन मोठे मोठे दवाखाने व्यावसायिक पद्धतीनी चालवणं ही आता काळाची गरज आहे. इथे हॉस्पिटलला नाव आहे चेहरा आहे, डॉक्टरला अजिबात नाही.
तपासण्यांचे, उपचारांचे, स्टॅण्डर्डायझेशन होणे महत्वाचे आहे. लॅबोरेटरी क्षेत्रात हे आजही काही ठिकाणी झालं आहे. उपचाराच्या क्षेत्रात खूप मोठया प्रमाणावर व्हायला पाहिजे. उपचार हे पूर्वनिश्चित प्रोटोकॉलवर आधारित हवेत. तरच त्यातल्या त्रुटींचा उहापोह होऊ शकतो. हे काम सरकार आणि तज्ञांच्या संघटना असं दोघांनी मिळून करायचं आहे.
तपासण्या आणि उपचारांच्या रास्त किमतीचेही प्रमाणीकरण व्हायला हवे. ह्या साऱ्यातील तफावतीबद्दलच्या तुमच्या तक्रारींचं उत्तर हे आहे.
डॉक्टरनी प्रत्येकाचा आणि प्रत्येकाच्या प्रत्येक नातेवाईकाचा, प्रत्येक प्रश्न, हा तात्काळ झेलला पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. अशा प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यायला, खरंतर प्रत्येक डॉक्टरला अनेक उप-डॉक्टरांची गरज असते. परदेशात त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञ नर्सेस हे काम सांभाळतात. आपल्याकडे परिस्थिती अशी आहे की इथे डॉक्टर जास्त आणि नर्सेस कमी आहेत. संवादाचा अभाव उद्भवतो तो यामुळे. पुढे त्याचा विसंवाद आणि वाद व्हायला मग कितीसा वेळ? खूप मोठ्या प्रमाणावर समुपदेशकांची फौज लागणार आहे आपल्याला. डॉक्टरनी सुचवलेले उपचार आणि व्यवहार यांची सांगड घालायला हे आवश्यक आहे.
सार्वजनिक आरोग्यसेवा ही खूप खूप सुधारायला हवी. खाजगी हॉस्पिटलना चॅलेन्ज अशी तोलामोलाची असायला हवी. सरकारी दवाखाने हे सर्वदूर आहेत, फुकट आहेत पण अनास्थेनी त्यांचा कणाच मोडला आहे. तिथे अजून भरपूर पैसा ओतायला हवा, भरपूर स्टाफ हवा, साधन सामुग्री हवी, त्याशिवाय हे सत्र थांबणार नाही. वजनदार राजकीय नेत्यांनाही माझं सांगणं आहे की उगाच अमक्याचं बील कमी करा, तमक्याचं ऑपरेशन फुकट करा असली समाजसेवा कुचकामी आहे. वैयक्तिक संबंधांपोटी एखाद्या पेशंटवर खूष होऊन तुम्ही त्याला मदत करता, याला सरंजामशाहीचा, दौलतजादा केल्याचा वास येतो. तुमचं काम सार्वजनिक आरोग्यव्यवस्था सक्षम कशी होईल हे पहाणं आहे, याकडे लक्ष पुरवलं तर आणखी अनेकांचं भलं होईल.
तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरचा उल्लेख केला आहे. फॅमिली डॉक्टर ही किती उपयुक्त आणि चांगली संस्था होती असं स्मरणरंजन सगळ्यानाच भावतं. लोक मग आपापल्या फॅमिली डॉक्टरच्या नावे कढ काढतात. एका संथ, स्वस्त आणि वैद्यकविश्वावर विश्वास असणाऱ्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून ती संस्था उत्क्रांत झाली होती. अशी रचना डॉक्टरांनी किंवा समाजानी जाणीवपूर्वक तयार केली नव्हती. जीवनशैली बदलली, विद्युतगती, अवास्तव अपेक्षा आणि फट् म्हणता निष्काळजीपणाचा आरोप होण्याची शक्यता अशा वातावरणात फॅमिली डॉक्टर ही संस्था लयास गेली यात नवल ते कसलं? हा मुक्काम सोडून आता बराच काळ लोटला आहे पेशंट साहेब; आता तर तुम्ही स्वतःला ग्राहक आणि आम्हाला विक्रेते ठरवूनही बरीच वर्ष झाली. ह्या मुक्कामी आता पुन्हा जाता येणार नाही.
तुम्ही स्वस्त औषधांचा उल्लेख केलात ते बरं झालं. औषधांच्या किमती आणि दर्जा ह्या दोन्हीची जबाबदारी सरकारची आहे, या बाबत निव्वळ तोंडदेखले उपाय करून डॉक्टरच्याकडे बोट दाखवणं हा अप्रमाणिकपणा आहे, हा झटपट लोकप्रियतेचा मार्ग आहे. यांनी तेवढंच होईल, लोकप्रियता मिळेल, पण समाजमन आणखी गढूळलं जाईल, औषधं स्वस्त होणार नाहीत; याच काय? उलट, किंमत आणि दर्जा सांभाळणारी यंत्रणा सक्षम  केली तर सर्वदूर तत्काळ आणि दीर्घकालीन परिणाम दिसेल.
जीवनशैली बदलली असं आपण सारेच मान्य करतो पण त्याबरोबर मरणशैलीही बदलली आहे त्याचं काय? आज माणसं तेराव्याच्या खर्चाची काळजी करत नाहीत, आयसीयुच्या खर्चाची करतात. ‘अरे जगणं मरणं एका श्वासाच अंतर’, असं बहिणाबाईंनी म्हटलय; पण आता तसं राहिलेलं नाही, मधे व्हेन्टीलेटर आहे, अॅन्जिओग्राफी आहे, अॅन्जिओप्लास्टी आहे, पेसमेकर आहे, डायेलीसीस आहे... अगदी अवयव-दानही आहे. अशा परिस्थितीत शेवटच्या आजारपणाचा खर्च हा फुगत जाणार हे उघड आहे. त्याचं नियोजन करणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. मृत्यू ही कितीही हृदयद्रावक घटना असली तरी तो येण्यापूर्वी केलेल्या धडपडीचं काही तरी मोल असणारच की, ते कोणी तरी भरावं लागणारच की.
चांगला डॉक्टर कसा ओळखायचा हे मलाही सांगता येणं अवघड आहे. पण मी म्हणीन की स्वतःचे ज्ञान जो अद्यावत ठेवतो, उपचारांच्या यशाबरोबर जो अपयशाचीही चर्चा करतो, यशापयशाची आकडेवारी सांगतो, अन्य कुणाचाही सल्ला घ्यायला मदतच करतो... असा कदाचित चांगला असू शकेल. चांगला रिक्षावाला किंवा चांगला बिल्डर किंवा वकील कसा ओळखावा असं मी तुम्हाला विचारलं तर?
तुमचा शेवटचा प्रश्न मात्र मलाही बुचकळ्यात टाकणारा आहे. ह्याच सिस्टीममधून मलाही जावं लागेल ही भीतीही आहेच की. त्यावर अर्थात ताबडतोब उपाय नाही. सिस्टीम बदलण्याचा प्रयत्न करणं आणि आजही जे उत्तम काम करत आहेत त्याचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, आजच्या ह्या सोहळ्यासारखे देखणे समारंभ घडवून आणणं एवढं तर आपण नक्कीच करू शकतो.
तुमचा
एक प्रामाणिक डॉक्टर

Monday 1 May 2017

एन.एस.व्ही.कीर्तन

एन.एस.व्ही. कीर्तन
डॉ. शंतनू अभ्यंकर

एन.एस.व्ही. म्हणजे नॉन स्काल्पेल व्हॅसेक्टॉमी, पुरुषांची बिनटाका शस्त्रक्रिया. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेशी तुलना करता ही कितीतरी चांगली आहे. पण अजिबातच लोकप्रिय नाही. उलट जरा बदनामच आहे.
कीर्तन हे लोकशिक्षणाचं पूर्वापार माध्यम. एनएसव्हीची माहिती देणारं आणि महती गाणारं हे कीर्तन; मी केलं, मजा आली, मलाही आणि श्रोत्यांनाही. तुम्हीही करून पहा.  
यातील काळ्या टायपातील भाग हा गद्य आहे, लाल टायपातील गायचा आहे आणि हिरव्या टायपातील भाग हा पद्यमय गद्यात, थोडा ताला सुरात म्हणायचा आहे. काही अभंग, आर्या, गाणी यांच्यातल्या शब्दांची मोडतोड करून ते इथे वापरले आहेत; कीर्तनाचा ‘कीर्तन’पणा शाबूत रहावा म्हणून. तेवढा गुन्हा पोटात घालावा ही नम्र विनंती.

(पेटी, तबला, टाळ, चिपळ्या असा मेळ जमला आहे. पेटी तबल्याच्या एखाद्या झोकदार सुरावटीनंतर भजन सुरु होते. सर्व श्रोत्यांना भजनात सहभागी करून घेतले जाते.)

राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
बोला पुंडलिक वरदा, हाsssरी विठ्ठल
श्री ज्ञानदेsssव तुकाsssराम, पंढरीनाथ महाराज की जय

नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
(ह्या चरणात योग्य तो बदल करून बुवा आपलं नाव उघड करतात)
तेंव्हा मंडळी हे असं आहे, आम्हाला ना गाता येतं ना अभिनय करता येतो, पण...
‘परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू’
अहो कीर्तन करणं म्हणजे महाकर्मकठीण काम. एक वेळ चित्र काढणं सोपं, रंगाचे चारदोन फटकारे इकडून तिकडे ओढले की काम झालं, एक वेळ नृत्य करणं सोप, तबल्याच्या ठेक्यावर जरा हात, पाय,  मान, कंबर हलवली की काम झालं.
नाटक करणंही सोप आहे बरं, अहो दुसऱ्यांनी लिहिलेली वाक्य घडाघडा पाठ म्हणून दाखवली की काम झालं.
आणि चित्रपट काढणं तर सर्वात सोपं...
तिथे कपडे सांभाळायला वेगळा माणूस आहे, तोंड रंगवायला वेगळा माणूस आहे, गाणारा भलताच आहे, फोटो काढणारा आणखी वेगळा आहे, तुमच्याऐवजी साहसे साकारणारा वेगळा आहे, दिग्दर्शक आहे, कला दिग्दर्शक आहे, संगीत दिग्दर्शक आहे, नृत्य दिग्दर्शक आहे, इतकच काय मारामारीसाठीही वेगळा दिग्दर्शक आहे.
पण किर्तनाच तसं नाही. अहो कीर्तन करायचं म्हणजे
वाणी शुद्ध हवी, विचार उत्तम हवेत, शब्दोच्चार स्पष्ट हवेत, भाषा ओघवती हवी आणि वक्तृत्व अमोघ हवं, अवांतर वाचन हवं आणि पाठांतर दांडगं हवं. तुम्हाला गाता यायला हवं, तुम्हाला बजावता यायला हवं (चिपळ्या वाजवून दाखवतो) थोड नृत्यही आलं तरी चालेल.(बुवा नाचुनही दाखवतात)
नामदेवानी म्हटलेलंच आहे,
‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी
सर्व सांडुनी माघारी, वाटे विठ्ठल रखुमाई,  
परेहून परते घर, तेथे राहू निरंतर’
पण आम्ही तर सुरवातीलाच सांगून टाकलंय...
नाही गायनाचा गळा, नाही अभिनयाच्या कळा,
परी उभा कीर्तना, अभ्यंकरांचा शंतनू
मग आता तुम्ही असं विचाराल मंडळी, की हे भलतं धाडस आम्ही केलंच कसं? याचं कारण आजच्या आख्यानाचा विषय. अहो मोरोपंतांनी म्हटलेलं आहे....
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’
पण आम्ही म्हणतो,
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तुम्ही म्हणाल, ही एनएसव्ही काय भानगड आहे? आणि ‘विषय सर्वथा नावडो’चा आम्ही ‘आवडो’ कसा काय केला? कोणत्या अधिकारात केला? मायबाप हो, एवढा अपराध पोटात घालावा. हे आम्ही का केलं ते सविस्तरपणे उत्तररंगात सांगणारच आहे पण उत्तररंगात चंचूप्रवेश करण्यापूर्वी, विषयप्रवेश करण्यापूर्वी, पूर्वरंगाची अखेर नामस्मरणाने व्हायला हवी, अहो परंपराच आहे तशी.
तेंव्हा म्हणा...
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम
राम, राम, राम, राम, सीताराम सीताराम   
बोला पुंडलिक वरदा, हारी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय
(बुवा हार घालून घेतात, बुक्का लावला जातो, तबक फिरवलं जातं)
खरंतर उत्तररंगात परंपरा मोडण्याबद्दल मी बरंच काही सांगणार आहे. तेंव्हा नामस्मरणापेक्षा थोड्या वेगळ्याच ढंगात उत्तररंगाचे सुरवात करुया... म्हणा...
(बुवा राम राम सीताराम सुरु करतात आणि मधूनच पुढील ओळी गातात)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(पुन्हा राम राम सीताराम... अगदी पुंडलिक वरदा पर्यंत होतं आणि पुन्हा)
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
ट्युबेक्टॉमी म्हणजे बायकांचे नसबंदीचे ऑपरेशन. जसं मघाशी मी  सांगितलं की एनएसव्ही हे पुरुषांचे तसे हे बायकांचे. तर माझं म्हणण असं की....
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको

(... आणि आता पुंडलिक वरदाच्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsssरे मित्रांनो
साधे-सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.
आलं का लक्षात मित्रांनो, आज आख्यान लावलंय ते पुरुष नसबंदीचं...आणि या आख्यानासाठी कथा निवडली आहे भारतमातेची.
फारफार वर्षापासून, नव्हे शतकानुशतकापासून भारतमाता नामेकरून एक मोठी देवता या भूतलावर वास करून आहे. कशी आहे ही?
(वंदे मातरम् गाऊन त्यातील वर्णन विषद करून सांगतात.)
मोठी जगन्मान्य देवता आहे ही. अहो हजारो वर्षाच्या हिच्या इतिहासात हजारो दैत्यांनी हिच्यावर घाला घातला पण ही बधली नाही. उलट यातल्या बऱ्याचश्या हल्लेखोरांना हिनी आपलसं केलं. इक्बालनी म्हणूनच ठेवलंय,
कुछ बात है के हस्ती, मिटती नहीं हमारी
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-जमाँ हमारा
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्तां हमारा
तर अशी ही भारतमाता, हिच्यावर एकदा लोकसंख्यासूर नावाच्या राक्षसानी जोरदार हल्ला केला. आधी व्हायचं काय की भरपूर संतती जन्मायची आणि त्यातली  भरपूर मरायची.  पण पुढे पुढे अन्न पाणी सुधारलं, साथी कमी झाल्या, आणि माणसं चांगली म्हातारी होईपर्यंत जगू लागली. पण इथेच अडचण आली. या लोकसंख्यासुराची भूक भयंकर, इतक्या सगळ्या प्रजेच्या पोटाला काय घालायचं हा प्रश्न पडला, इतक्या सगळ्यांनी खायचं काय, ल्यायचं काय, इतक्या सगळ्या हातांना काम काय, इतक्या सगळ्या डोक्यांना शिक्षण कस द्यायचं, एक ना अनेक प्रश्न... हा लोकसंख्यासूर आता भारतमातेचेच लचके तोडायला लागला... कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ म्हणतात ना ते हे असं.
भारतमातेच्या पोटी, लेकरे कोटी कोटी.... अशी अवस्था झाली आणि
समर्थांनी म्हटलेलंच आहे,
लेकुरे उदंड झाली, ते तो लक्ष्मी निघोनी गेली;
बापुडी भिकेस लागली, काही खाया मिळेना.
लेकुरे खेळती धाकुटी, येके रांगती येके पोटी,
ऐसी घरभरी झाली दाटी, कन्यापुत्रांची.
पण भारतमाता हरली नाही, ती डरली नाही, ती लढायला सिद्ध झाली. रघुनाथ धोंडो कर्वे, म्हणजे आपल्या भारतरत्न धोंडो केशव कर्व्यांचे चिरंजीव बरं, हे तिचं लेकरू, तिच्या मदतीला धावलं. इतरही अनेक होते. (काही नावे घालायला हवीत) मग भारतमातेची लेकरं, लोकसंख्या नियंत्रणाच्या मागे लागली. पण तिथेही तऱ्हेतऱ्हेच्या लोकांचे तऱ्हेतऱ्हेचे सल्ले...
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा
मग डॉक्टर आले, संशोधक आले, समाजसेवक आले, मायबाप सरकारही मदतीला धावले...
कुणी म्हणाले निरोध वापरा, कुणी म्हणाले तांबी बसवा, कुणी म्हणाले गोळ्या खा किंवा इंजेक्शने घ्या, आणि कुणी म्हणाले
आधी प्रपंच करावा नेटका,
व्हावी इप्सित संतती बरंका
पण मग साधता आकडा नेमका
मार्ग आप्रेशनचा धरावा
 पण हे करायचं कुणी??
यातला निरोध वापरायचा... बाप्यांनी
पण...
तांबी??? बायांनी वापरायची
गोळ्या??? बायांनी खायच्या
इंजेक्शने??? बायांना टोचायची...
आणि आप्रेशने???... तीही बायांचीच करायची.
का म्हणून?  सांगा ना, का म्हणून??? अहो निसर्गानी मूल होऊ द्यायची जबाबदारी स्त्रियांवर टाकलेलीच आहे, त्यात आपण काही बदल करू शकत नाही मग मूल न होण्याची तरी जबाबदारी पुरुषांनी घ्यायला नको का?
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
या पुरुषप्रधान संस्कृतीनी बायकांवर फार फार अत्याचार केले आहेत, काही कळत, काही नकळत, बायकांसाठी हे विश्व जणू वणवा झालं आहे...
विश्व रागे झाले वन्ही,
मग अशा वेळी पतींनी काय केल पाहिजे?
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
या वणव्यात पतीनी पाणी व्हायचं आहे. मूलं न होऊ द्यायची जबाबदारी स्वतःवर घ्यायची आहे. लोक म्हणतील, आलाय मोठा बायकोवर प्रेम करणारा! पाडगावकरांना भेटला होता असा एक माणूस, म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही,
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही
आमचं काही आडलं का? प्रेमाशिवाय नडलं का?”
तेंव्हा पाडगावकर त्याला एवढंच म्हणाले,      
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
पण तुमचं आणि आमचं अगदी सेम नसतं!
तेंव्हा कुणीही काहीही म्हणू द्या, जर तुमचं तुमच्या बायकोवर खर्रखुर्र प्रेम असेल तर लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करा, उलटून बोलू नका, उलट लोकांचे हे शब्द, हे शस्त्र झालेले शब्द, हे बोल ही संधी माना, त्यातून बोध घ्या,
विश्व रागे झाले वन्ही, पती सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पती मानावा उपदेश
...आणि हे निव्वळ भावनिक आवाहन नाही बरं... मी म्हणतो त्याला वैद्यकनीतीचा, वैद्यकरीतीचा, वैद्यकशास्त्राचा आणि वैद्यकविवेकाचा भरभक्कम आधार आहे.
पुरुषांचं हे ऑपरेशन सोपं आहे... बायकांचं ऑपरेशन, महाकर्मकठीण... बायकांचं एकूणच सगळं अवघडच असतं म्हणा... पुरुषांच्या या ऑप्रेशनमध्ये आता बिनटाक्याची पद्धत आली आहे. नॉनस्काल्पेल व्हॅसेक्टॉमी म्हणजेच एन.एस.व्ही. म्हणतात त्याला.
म्हणूनच तर मी म्हणालो,

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

 एन.एस.व्ही वरच्यावर करता येतं, ‘ये बाहर की बात है...’ बायकांच्या ऑपरेशनसाठी पोट उघडावं लागतं, ‘ये अंदरकी बात है...’ यामुळे पोटात इन्फेक्शन; आतडी, मूत्राशय वगैरेला इजा असे धोके टळतात. स्त्री नसबंदीच्या प्रत्येक केसमध्ये  ती स्त्री, हे दोन्ही धोके पत्करत असते. बायकांचं अगदी बिनटाक्याचं ऑपरेशनही, पुरुष नसबंदीपेक्षा कितीतरीपट गुंतागुंतीचं आणि धोक्याचं आहे. पण लक्षात कोण घेतो? संसाराच्या रामरगाड्यात वैतागलेल्या बायकोचा विचार कोण करतो? तेंव्हा माझं सांगणं एवढंच आहे की...

अनुदिन अनुतापे तापल्या बायका ह्या
परमदिनदयाळा निरसी मोह माया  
अचपळ मन तूझे नावरे आवरीता
एन.एस.व्ही.त शीण नाही धाव रे धाव आता
एन.एस.व्हीत शीण नाही, एन.एस.व्ही बाबतच्या शंकाकुशंकांनी अचपळ झालेलं तुझं मन आवर आणि एन.एस.व्ही सेंटरकडे धाव. बायकोला ऑपरेशन करून घ्यायला, ट्युबेक्टॉमी करून घ्यायला भाग पाडू नकोस, ती करते म्हणाली तर तू नको म्हण...

नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

तर अशी ही बहुगुणी एन.एस.व्ही....  लिंगाच्या थोडं खाली अर्ध्या सेंटीमीटर छेदातून करता येते. अहो हा छेद घ्यायला पातं, म्हणजे ब्लेडसुद्धा लागत नाही. इतका छोटा छेद की हा बंद करायला टाका घ्यायला लागत नाही. थेंबभरसुद्धा रक्त वहात नाही आणि कोणतीही खूण रहात नाही.
बुंद ना गिरा एक लहू का, कछु ना रही निसानी
नाsss लागी, ‘नस’पे कटार
सगळी भूल द्यायची गरज नसते... जागेवर भूल देऊन काम भागतं, हे फारच महत्वाचं आहे. भूलीत नाही म्हटलं तरी धोके फार.
शिवाय हे झटपट किती...तपासणीपासून ते ऑपरेशनपर्यंत सारा मामला, दोन एक तासाची बात. पण तरीही हे कोणी करून घ्यायला पुढे येत नाही. पेशंट विचारत नाहीत, डॉक्टर बोलत नाहीत... अहो एखादा नरशार्दुल, एखादा नरपुंगव, एखादा नरसिंह, एखादा नरोत्तम झालाच तयार तर त्याची  बायको, त्याची  स्त्री, सखी, सचिव, भार्या, सौभाग्यवती, ती सती-सावित्री, पतिव्रता, म्हणते, ‘नको बाई माझंच करा, आमच्या ह्यांना फार काम असतं.’
कारण काय तर...
ह्यांनी म्हणे अशक्तपणा येतो...
कष्ट करता येत नाहीत...
सेक्स पॉवर कमी होते...
या ऑपरेशनमुळे पौरुषाला बाधा येते, तो कष्ट करू शकत नाही, तो माणूस एकदम कंडम बनतो, कंडोम नाही हं, कं ड म. दोन्हीत फरक आहे.... असे अनेक गैरसमज आहेत.
पण असं ज्या लोकांना वाटतं, त्याबद्दल निव्वळ त्यांना मूर्ख म्हणून आपली जबाबदारी संपत नाही. त्यांच्या या गैरसमजामागे त्यांचाही काही युक्तिवाद असतो. तो समजावून घेणं आणि दुरुस्त करणं महत्वाचं आहे. पारंपारिकरीत्या आपल्याकडे पुरुषत्वाचा संबंध शक्तीशी आणि स्त्रीत्वाचा सहनशक्तीशी जोडला आहे.

शारीरिक कष्ट करणं, मूल होणं आणि संभोगसूख देता-घेता येणं या वास्तविक तीन स्वतंत्र क्रिया आहेत आणि एकमेकांशी फारशा संबंधित नाहीत!!!!
शारीरिक कष्टासाठी शरीर सुदृढ हवं पण पुरुष बीजाची किंवा लिंगाला ताठरता येण्याची अजिबातच आवश्यकता नाही.
 मुलं होण्यासाठी पुरुष बीज तयार होणं आणि शरीरसंबंध जमणं हे आवश्यक आहे, पण यासाठी तुम्ही बॉडी-बिल्डर असायची गरज नाही. अहो इथेच पहा ना, इथले बरेचसे पुरुष बॉडी-बिल्डर नाहीत आणि बऱ्याचशा पुरुषांना मुलंही आहेत. उलट अगदी धडधाकट असलेल्या, सैन्यात अधिकारीपदी असलेल्या, बॉडीबिल्डींग किंवा इतर खेळात चॅम्पियन असलेल्या व्यक्तींनाही मूल होण्यात अडचण असू शकते. पुरुष बीज निर्माण करणारी यंत्रणा आणि शारीरिक शक्ती यांचा थेट संबंध नसतो.
आणि कामसुखासाठी? लिंगाला ताठरता येण्यासाठी? पुरूषबीज तयार होण्याची गरज नाही. शरीरसंपदाही यथा तथा असली तरी चालते. उलट कामसौख्यासाठी, दांपत्यसुखासाठी मन सदासतेज असावं लागतं. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला आस्मान दाखवणारे गडी, पलंगावर सखीला चांदसितारे दाखवतीलंच असं नाही. कारण पलंग म्हणजे आखाडा नाही. कामसौख्य हे शारीरिक शक्तीचं प्रदर्शन नाही.
म्हणूनच नसबंदी केल्यामुळे पुरुषांची शारीरिक शक्ती, कामेच्छा, कामशक्ती  संपतबिंपत नाही. संभोगसूखवीर्यपतन वगैरे जैसे थे रहातं. वीर्य हे पुरूषबीज आणि इतर अनेक स्त्रावांचं मिश्रण असतं. ऑपरेशननंतर त्यात पुरूषबीज मिसळत नाही एवढंच.  वीर्यातले बाकी घटक तयार होतच असतात. लैगिक भावना, लिंगाला होणाऱ्या संवेदना वगैरे कशावरच या ऑपरेशनचा दुष्परिणाम होत नाही.
म्हणून म्हणतो...
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
ना लागी ‘नस’पे कटार
उलट नको असलेल्या गर्भारपणाची भीती दूर झाल्यामुळे आता सुखेनैव संभोगसुखाचा अनुभव घेता आणि देता येतो.
मन घायल पर तन पे छायी मिठी टीस सुहानी...
नाsss लागी ‘नस’पे कटार
मोरोपंतांच्या काव्यात ढवळाढवळ करण्याची धिटाई मी का केली ते आता तुमच्या लक्षात आलं असेल.
एनएस व्ही सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा आवडो
तेंव्हा म्हणा...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.

पुनरुत्पादनाच्या प्रत्येक पायरीचा आपल्या समाजानी उत्सव केला आहे. पाळी आली की नहाण विधी आहे, लग्न ठरलं की साखरपुडा आहे. लग्न म्हणजे तर दोन्ही घरचा अगदी प्रतिष्ठेचा प्रश्न, ती चमक-दमक, तो माहोल, व्वा, भाई वा! पुढे पहिल्या रात्रीसाठी खास चिडवाचीडवी आहे, धार्मिक विधीही आहे. दिवस राहिल्यावर डोहाळे जेवण आहे, बागेतलं आहे, झोपाळ्यावरचं आहे, अगदी चंद्रावरचं सुद्धा आहे. मूल झाल्यावर पेढे-बर्फीचं उत्साही वाटप आहे आणि ध्वनीक्षेपकांची भिंत उभारून गाव दणाणून टाकणारं बारसं सुद्धा आहे. पण पुनरुत्पादनाची  क्षमता संपवणं, म्हणजे नसबंदी करून घेण्याचा काही उत्सव अजून निघाला नाहीये. तेंव्हा ज्यादिवशी, ‘नुकतच आमच्या मोठ्या दिरांचं एनएसव्हीच ऑपरेशन झालं; उद्या पूजेला या बरंका अशी नसबंदी नारायणाची निमंत्रण येतील तो सुदिन.’
बोला...
नको नको नको नको ट्युबेक्टॉमी नको नको
(... आणि आता पुंडलिक वरदा च्या चालीत...)
बोला... एनएसव्ही ऑपरेशsssन  कराsss रे मित्रांनो
साधे सोपेsss आराsssमात
बिनटाका शस्त्रक्रिया की जय
पुरुषनसबंदी की जय.