Friday 22 September 2023

जगी व्याधी नाही असा कोण आहे?

 

जगी व्याधी नाही असा कोण आहे?

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

 

मी बेल वाजवली. एक सुस्वरूप जोडपं आत आलं. या बसा झालं आणि फाइल टेबलावर सरकवत, हलक्या आवाजात ती म्हणाली ‘आम्हाला हे मूल नकोय. गर्भपात करायचा आहे.’ दोघंही दृष्ट लागण्यासारखे देखणे होते, अगदी सुस्वरूप आणि ऐटबाज होते. कपडे आणि हिऱ्यांचे डेकोरेशन बघता, गडगंजही  असावेत.  

‘का? का नकोय?’

‘ते लंगडं होणार आहे! त्याचे पाय वेडेवाकडे आहेत, फेंगडे आहेत, दोष आहे पायात. असलं वेडंविद्र मूल आम्हाला नकोय.’ फाईल आणखी पुढे ढकलत ती  म्हणाली.

बापरे एकाच वाक्यात त्यांनी त्या  बाळाला लंगडं, फेंगडं,  वेडं आणि विद्रं ठरवलं  होतं. सहसा असं कोणी बोलत नाही. मला काय बोलावं सुचेना. आवाजात अर्जन्सी आणि हालचालीत अधीर असे ते दोघे, मी काहीच बोलत नाही  म्हटल्यावर आपोआपच जरा शांत झाले.

मी फाईलमधील रिपोर्ट पाहू लागलो. त्या बाळाचे एक पाऊल किंचित दुमडलेले होते. आतल्या बाजूला वळले होते.

‘गर्भपात करायचाच आहे का? पण हा दोष तसा विशेष नाहीये.’ मी म्हणालो.

‘पण जो आहे तो दोषच आहे ना?’ त्यांच्यातला तो, ठामपणे, खर्जातल्या दमदार आवाजात म्हणाला. 

‘आता तर पाचवा चालू आहे. आत्ता गर्भपात त्रासदायक ठरू शकतो.’ त्यांना जाणीव असावी म्हणून मी सांगू लागलो.

‘पण आधी कळलं तर आम्ही आधी येणार ना? हा दोष तर पाचव्यातच कळतो.’ मला निरुत्तर करत, पुन्हा तो.

‘पण तुमची पहिलीच खेप आहे, गर्भपाताचा त्रास  आणि दोष तसा सहज बरा होण्यासारखा आहे.’

‘आम्ही गूगल करून आलोय डॉक्टर. आधी प्लास्टर, मग ऑपरेशन मग पुन्हा खास बूट असा सगळा प्रकार आहे. नकोच ते.’ आता तीही तितक्याच ठामपणे सांगू लागली.

‘अहो, पण हे सगळं केल्यावर अगदी नॉर्मल होणार आहे बाळ, काही त्रास होता याचा मागमूसही राहणार नाही.’

सोनोग्राफीची त्रिमिती चित्रही त्यांच्या  सोबत होती. आता त्यांनी, ती बाहेर काढली. त्यात ते इवले पाऊल, त्याचा अनैसर्गिक बाक अगदी स्पष्ट दिसत होता. बाळाचा पाय वाकडा पडणार हे कोणीही सांगावं. त्यासाठी पाय पाळण्यात दिसायचीही गरज नाही.

चित्र दाखवत मी म्हणालो, ‘हेच तर मी म्हणतो आहे. उपचारच  नाही घेतले, तर हा दोष म्हणायचा. पण नीट उपचार तर तुम्ही घेणारच, मग एवढी काळजी कशाला?’

दोघेही त्या चित्रांकडे हतबुद्धसे  बघत होते. ज्या आधुनिक तंत्रज्ञानाने निदान शक्य केले होते त्यानेच निर्माण केलेली ही प्रतिमा मात्र त्या बाळाच्या मुळावर उठली होती. त्या होणाऱ्या आई-बाबाला घाबरवून टाकत होती.   कीव आणि कारुण्याची हलकी छटा माझ्या चर्येवर उतरली असावी.  

‘कित्ती काळजी घेतली आम्ही.’ त्यांच्यातली ती अगदी  तळमळून सांगू लागली, ‘ह्याला सिगरेटसुद्धा  सोडायला लावली मी!’ अपराधी सुरात तिने सांगितले.

 ‘मग चांगलं झालं की. तेवढाच फायदा.’

पण माझा मुद्दा तिनी जणू ऐकलाच नव्हता; ‘सहा महीने शरीरशुद्धीसाठी जात होते मी. शिवाय स्प्राऊटस्, फोलीक अॅसीड,  प्रि-कंसेप्शन योगा, चहा-कॉफी बंद आणि त्यातून हे असं. डॉक्टर, आमचं  मूल आम्हाला शोभेल असं नको का? हे असं अपंग मूल नकोय आम्हाला. आम्हाला परफेक्ट मूल हवंय!’

‘अहो पण इथे कोण परफेक्ट आहे? तुम्ही आहात का?’ मी जरा चढया सुरांत विचारलं; ‘मी आहे का? आत्ता काही टेस्ट केल्या तर कोणते आजार होऊन गेले, कोणते होऊ शकतात अशी कुंडली मांडता  येईल सगळ्यांचीच.’  

‘डॉक्टर काय सांगू तुम्हाला, हे असं कळल्यापासून आसपास सारखी अधू माणसे दिसतात. तीन-चार पायऱ्यांकडेही डोंगराकडे पहावं तसं पहाणारी, गर्दीत मागे मागे मागे पडणारी; परवा एअरपोर्टवर  व्हीलचेअरवरून टॉयलेटच्या दाराशी, हताशपणे झटापट करणारी एक मुलगी  दिसली. म्हणजे, आधीही ही माणसं होतीच की,  पण त्यांच्या अडचणी मला जाणवल्या नव्हत्या. नुसतं म्हणायला दिव्यांग हो, पण तशा सोई सुविधा कुठे आहेत? तुमच्या दवाखान्यातही पायऱ्या चढूनच यावं लागतं.’ तीनी आवंढा गिळला.

‘समजा, हा गर्भ पाडला, मग पुढच्यावेळी सगळं सुरळीत होईल याची खात्री आहे का? पुढच्यावेळी आणखी काहीही असू शकतं, क्वचित काही यापेक्षा गंभीरही!’ आता मात्र ते विचारात पडले.

पुढे बराच वेळ मी त्या दोघांना समजावत होतो. किरकोळ, दुरुस्त होण्याजोग्या व्यंगासाठी टोकाचं पाऊल कशाला? अर्थात  त्यांचीही काही बाजू होती. आणखीही व्यंग असली तर?, शाळेतली चिडवाचिडवी, हिणवणे, आई-बापालाच बोल लावणारे लोक, साध्या टॉयलेटसारख्या सुविधांचा अभाव,  लग्न, पुढच्या पिढीत हे उतरलं तर, अशा चिंता होत्या. निदान या बाळापुरत्या तरी त्या लागू नाहीत अशी मी खात्री दिली. अशा बाळांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची आणि  अशाच  अन्य पेशंट-कुटुंबियांची गाठ घालून देईन असं आश्वस्त केलं. शेवटी निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे असंही  बजावलं. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल असंही सांगितलं. अखेर सध्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याच्या बोलीवर ते बाहेर पडले.

हे  प्रकार आता वाढत चालले आहेत. सोनोग्राफीमुळे,  अनेक व्यंग, मूल पोटात असतानाच समजतात. त्यातील काही दुखणी  सरळ सरळ जीवघेणी असतात. मुलाचे डोकेच तयार झालेले  नाही. कवटी, छाती किंवा पोट उघडे  असून सारे अवयव बाहेर डोकावत आहेत वगैरे. इथे गर्भपातच हिताचा. निर्णय सोपा. यातले काही जीवघेणे आजार मुळी उशीराच लक्षात येतात. उशीराही गर्भपाताचा हक्क मिळावा म्हणून बराच झगडा द्यावा लागला. अखेर तो हक्क मिळाला आहे.

दोन टोकाच्या केसेसमधे परीस्थिती बरी असते; पेशंटला गर्भपाताला प्रवृत्त किंवा परावृत्त करणे एवढेच काम असते.  पण काही मधलेअधलेही आजार असतात. उदा: कमरेचा मणका उघडा असणे. यात ऑपरेशन करून  मूल नीट चालू शकेल का?  हा तर प्रश्न असतोच पण शी-शूवर नियंत्रण, मेंदूची नीट वाढ, असेही अनेक प्रश्न असतात. सोनोग्राफीनेही ते अनुत्तरित रहातात. काही आजारांत मुलाची काळजी हे पूर्ण वेळचे काम ठरू शकते. सतत सेवेकरी लागू शकतात. कोणाच्या तरी, म्हणजे बहुदा आईच्याच, करिअरला ब्रेक लागू शकतो. कधी  अनेक ऑपरेशने लागू शकतात. ती कमी अधिक यशस्वी  ठरू शकतात. काही उपचार त्या कुटुंबाच्या ऐपतीबाहेर असतील तर असून नसल्यासारखेच.    या साऱ्याचा मानसिक आणि आर्थिक ताण काहींना झेपतो, काहींना नाही.  म्हणूनच ज्या त्या जोडप्याने घेतलेला निर्णय ज्या त्या वेळी बरोबरच असतो. त्यांनी त्याचे वैषम्य किंवा गंड बाळगो नये.

मात्र कित्येकदा अत्यंत छोटंसच काही व्यंग असतं. छोट्याशा उपचारांनी, शस्त्रक्रियेनी किंवा कालांतराने भरून येणारं असतं आणि गर्भपात करून द्या अशी मागणी येते. पर्फेक्शनचं खूळ कोणतीही तडजोड स्वीकारायला तयार नसतं. ज्यांना परवडतं ते तर निव्वळ पायाला सहा बोटं आहेत म्हणूनही गर्भपात करा म्हणतात! मग शब्दात पकडण्याचा खेळ सुरू होतो,

प्रश्न येतो, ‘एक दोष दिसतोय याचा अर्थ न दिसणारे अन्यही असू शकतात, हो ना?’

‘असू शकतात.’ डॉक्टर.

‘मग नको हे मूल.’

पण एकही दोष न दिसताही कित्येक दोष असू शकतातच की. जगी व्याधी नाही असा कोण आहे? असे फुसक्या कारणाने केलेले गर्भपात म्हणजे कायद्याचा गैरवापर आहे. देवानं दिलेलं लेकरू समजून,  जसं असेल तसं निमूट स्वीकारणारे बरे म्हणायचे.  अपंगत्वाबद्दल समाजाने अधिक सहनशील आणि स्वागतशील असायला हवं. गर्भपात हे एक जीव संपवणेच आहे. समाज आणि कायदा मात्र त्या दृष्टीने याकडे बघत नाहीत.

एरवीही क्वचितच कुणा डॉक्टरच्या किंवा पेशंटच्या मनात केल्या कृत्याबद्दल अपराधभाव असतो. डॉक्टर, पेशंट, समाज सगळ्यांचीच मानसिकता लोकसंख्या स्फोटाच्या भयछायेत घडलेली आहे. तेंव्हा लोकांची संख्या कमी करणारा  प्रत्येक उपाय, म्हणून गर्भपातही, आपण वंद्य मानला आहे. खास अपवाद म्हणून वापर अपेक्षित असताना तो आम झाला आहे. चार चॉकलेटं मटकवावीत इतक्या सहजतेने बायका गर्भपाताच्या गोळ्या मटकावत असतात.  

ओठ फाटलेला असणे, हृदयाला अत्यंत छोटे छिद्र असणे, नाळेत दोनच्या ऐवजी एकच रक्तवाहिनी असणे.., बाळ घडण्यातल्या अशा अनेक  त्रुटी सोनोग्राफीत दिसतात. त्या दिसतात म्हटल्यावर नोंदल्या जातात. नोंदल्याच आहेत म्हटल्यावर पेशंटला सांगितल्या जातात आणि मग ‘आत्ताच्या आत्ता गर्भपात करा’ पासून ‘तुम्ही सांगताय ना डॉक्टर, मग ठीक आहे,’  पर्यंत प्रतिक्रिया उमटतात.

सोनोग्राफीत न ओळखता  येणाऱ्या व्याधी, जन्मल्यानंतरच कळणाऱ्या गोष्टी याबद्दल या परफेक्शनिस्टांचे काय म्हणणे असते? नजीकच्या भविष्यात बाळाला अमुक वयात तमुक आजार होईल, ते पाच किंवा पंचवीस वर्षच जगेल, असेही  ज्योतिष शक्य आहे; मग अशा बाळांना जन्म द्यायचा की नाही?  

अर्थात हे भविष्यात, इतका पुढचा विचार कोणी करत नाही. होणाऱ्या आईबापाला तात्काळ येणाऱ्या अडचणींच्या पायऱ्या दिसत असतात आणि  वर्तमानात, माझ्याही  दवाखान्याला, चारच का असेनात, पायऱ्या आहेतच की.

 

 

प्रथम प्रसिद्धी

लोकसत्ता

चतुरंग पुरवणी

२३.९.२०२३