Sunday 24 March 2019

संयत तपस्वी, डॉ. विठ्ठल प्रभू

संयत तपस्वी
|| डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
कामशास्त्रासारखा स्फोटक विषय अतिशय संयतपणे हाताळत विपुल लेखनातून या विषयाचे विविध पैलू मराठीजनांसमोर आणणारे डॉ. विठ्ठल प्रभू यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या कार्याचे नेमकेपण अधोरेखित करणारा लेख..

डॉ. विठ्ठल प्रभू यांचे नुकतेच निधन झाले. तब्बल नऊ दशकांचे निरामय आरोग्य त्यांना लाभले. ‘निरामय कामजीवन’चे लेखक हीच त्यांची ओळख. तशी पस्तीसएक पुस्तके त्यांच्या नावे जमा आहेत, पण हे पुस्तक खास. ‘निरामय कामजीवन’ची पहिली आवृत्ती आली तब्बल ३७ वर्षांपूर्वी- १९८२ च्या पाडव्याला. माझ्या हातात आज ३४ वी आवृत्ती आहे आणि आजही हे पुस्तक तितकेच प्रभावी आणि उपयुक्त आहे. आवृत्तीगणिक डॉ. प्रभूंनी यात प्रयत्नपूर्वक आणि अभ्यासपूर्वक भर घातली आहे. त्यामुळेच आजही हे पुस्तक ताजे, टवटवीत आहे. इतक्या वर्षांत कितीतरी बदल झाले. एड्ससारखे आजार आले, स्त्रीवादी काम-दृष्टिकोन आला, नवीनवी गर्भनिरोधक साधने आली, व्हायग्रासारखे बहुचर्चित औषध आले, पिवळ्या कव्हरातले पोर्न हातातल्या मोबाइलमध्ये अवतरले आणि या साऱ्याबरोबर नवे गैरसमज, नव्या अंधश्रद्धा आणि नवे शोषकही आले. नवे आले, पण जुने नामशेष नाही झाले. डॉ. प्रभूंनी हे सारे यथायोग्य स्वरूपात आणि शब्दांत त्यांच्या पुस्तकात आणले. अतिशय अनुरूप आणि सभ्य भाषा ही त्यांच्या लिखाणाची खासियत. कितीतरी शब्दांना समर्पक आणि सहज रुळलेले मराठी शब्द नाहीत. पण डॉ. प्रभू लिहीत राहिले. शब्द आणि पिढय़ा घडवीत राहिले.
या पुस्तकाला लाभलेली डॉ. भा. नी. पुरंदरेंची पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना अजूनही प्रस्तुत आहे. यात ‘कामजीवन’ हा विषय शाळा-कॉलेजच्या अभ्यासक्रमाचा भाग असावा अशी आजही अमान्य असलेली मागणी आहे. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा पुरस्कार लाभला. कामविज्ञानाला राजमान्यता मिळाली, पण ते तेवढेच. इतकी वर्ष झाली, तरीही ही मागणी कृतीत काही उतरलेली नाही. या विषयावर अहवाल देणाऱ्या सरकारी समितीत डॉ. प्रभू होते. सकारात्मक अहवालही दिला गेला, पण महाराष्ट्राच्या विधानसभेने तो एकमताने नाकारला!
डॉ. प्रभूंनी लैंगिकता शिक्षणाचा सतत आग्रह धरला आणि कृतीतून तो दाखवूनही दिला. त्यांची पुस्तके, त्यांचे रेडिओवरील कार्यक्रम याची साक्ष आहेत. शेवटी कामजीवन म्हणजे निव्वळ संभोग नाही. लैंगिकता म्हणजे निव्वळ मैथुन नाही. लैंगिकता तर भाषा, वाचा, व्यवहार आणि जीवनदृष्टी व्यापून असते. हे लक्षात घेऊन डॉ. प्रभूंनी तसे लिखाण केले. लैंगिक शिक्षण म्हणजे ‘हे डॉक्टर आता तरुण मुला-मुलींना मानवी संभोगाची सचित्र माहिती सांगणार आणि मोठाच गहजब उडणार’ अशी सांभाळ-काळजी काळजात बाळगणाऱ्या समाजाच्या सगळ्या शंकांना उत्तरे दिली. लोक विचारत, ‘प्राण्यांना कोण शिकवते?’ डॉ. प्रभू सांगत, ‘प्राण्यांची लैंगिकता ही सीझनने बद्ध असते, माणसाची लैंगिकता ही रीझनने, कायद्याने, नीतीने, रीतीने.. त्यामुळे शिक्षण हवेच.’ लोक म्हणत, ‘पाण्यात पडले की पोहायला येतेच की?’ डॉ. प्रभू म्हणत, ‘बरोबर, पण गटांगळ्या खात शिकायचे की तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली- निवड तुमची.’ दबक्या आवाजात प्रश्न येई, ‘हे ऐकून मुलांना आमच्याबद्दल काय वाटेल?’ मिश्कीलपणे उत्तर येई, ‘काय वाटायचंय? निसर्गाचा एक नियम म्हणून हे शिकवायचे आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमाला मुले तुम्हाला जबाबदार धरतात का?’ बावरलेला कुणी विचारी, ‘हे असले काही शिकवले, की मुले ते सगळे प्रयोग करून बघतील.. मग?’ शांत, विचारी उत्तर येई, ‘या वयात उत्सुकता असतेच आणि प्रयोग चालतातच. आपल्या महाकाव्यातही हे आहेच. उलट शिक्षणाने जबाबदार वर्तन वाढीस लागते. प्रयोगशीलतेला, फाजील कुतूहलाला वळण लागते. शिक्षणाने तरुण बिघडतील असे म्हणणे म्हणजे भाषा शिकवली तर मुले फक्त शिव्याच शिकतील असे म्हणण्यासारखे आहे. उलट भाषेवर छान प्रभुत्व असेल तर एकही शिवी न देता तोच परिणाम साधता येतो!’ या आणि अशा शंकांना डॉ. प्रभू चिकाटीने उत्तरे देत राहिले.
या विषयावर काही माहितीपर दृकश्राव्य मुद्रणं करावीत असा विचार होता. मार्गदर्शनासाठी मी त्यांच्याकडे गेलो. सहस्राहूनही अधिक पौर्णिमा पाहिलेला हा तपस्वी खुल्या दिलाने माझे स्वागत करता झाला. आपल्या ज्ञानाचे आणि संदर्भग्रंथांचे भांडार खुले केले त्यांनी. गेले काही महिने अशी यूटय़ूब वाहिनी सुरू आहे आणि आजमितीस त्यास पाच कोटी ऐंशी लाखांवर हिट्स मिळाले आहेत. पण हे सांगताना अभिमानाहूनही खेद अधिक वाटतो. कारण अशा शास्त्रीय माहितीची किती गरज आहे आणि ती पोहोचवण्यात आम्ही डॉक्टर किती कमी पडतो, याची विषण्ण करणारी जाणीव होते मला.
काही वृत्तपत्रांच्या रविवार आवृत्त्या अशी माहिती मिरवत असतात. पण या आडून स्वत:चीच जाहिरात जास्त केलेली असते. शास्त्रीय माहिती दुय्यम आणि आत्मगौरव जास्त अशी स्थिती असते. डॉ. प्रभूंनी असला प्रकार टाळला. अत्यंत सुसंस्कृतपणे, संयतपणे त्यांनी
र. धों. कर्वेची पताका पुढे नेली. प्रचंड वाचन, अभ्यास, काव्य-नाटय़-विनोदाची उत्तम जाण असणारा हा मर्मज्ञ रसिक एक आनंदयात्री होता. जयवंत दळवी, कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे अशा भाषाप्रभूंशी त्यांचा स्नेह होता. त्यामुळेच की काय, कामशास्त्रासारखा स्फोटक विषय असूनही त्यांची लेखणी कधीही चळली नाही. एक सामाजिक कर्तव्य म्हणून त्यांनी आपली लेखणी चालवली आणि अनेकांच्या आयुष्यात आनंदाचे मळे फुलवले. याच भावनेतून ते ‘फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया’शी जोडले गेले. इथल्याच सहकाऱ्यांबरोबर त्यांनी पुढे ‘काऊन्सिल ऑफ सेक्स एज्युकेशन अ‍ॅण्ड पेरेंटहुड (इंटरनॅशनल)’ ही संस्था सुरू केली. उत्सुक डॉक्टरांसाठी अभ्यासक्रम, परिषदा, नियतकालिक असे मोठे काम उभे केले. या त्यांच्या कामानिमित्त याच संस्थेने २००२ साली द गोल्डन लॅम्प पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. असे इतरही अनेक पुरस्कार त्यांच्या वाटय़ाला आले.
आजही किती तरी मुले, मुली, स्त्री, पुरुष काहीना काही आणि काहीच्या काही शंका घेऊन येतात. कामसमस्यांपैकी ८० टक्के समस्यांना माहितीचा डोस पुरतो. औषध लागतच नाही. पण लिंगाचा आकार वाढवण्यासाठी, ‘सेक्सची पॉवर’ वाढवण्यासाठी, पूर्वायुष्यातील झालेली चूक सुधारण्यासाठी, हस्तमैथुनाचे दुष्परिणाम घालवण्यासाठी ‘शर्तीली दवा’ विकणारे ठायी ठायी ठाण मांडून बसले आहेत. मेंदूत अपुऱ्या आणि चुकीच्या माहितीची जळमटे असलेली जनता यांच्या जाळ्यात अलगद सापडते आहे आणि अक्षरश: नागवली जाते आहे. यात दोष खरे तर तज्ज्ञ डॉक्टरांचा आहे. आम्ही खुलेपणाने बोलत नाही, योग्य आणि शास्त्रीय माहिती पोहोचवत नाही, म्हणून या लिंगवैदूंचे फावते. ही एक मोठीच गरज डॉ. प्रभूंनी त्यांच्यापरीने भरून काढली.
कामसमस्या हा आम्हा डॉक्टरांच्या दृष्टीने दुय्यम विषय. कॉलेजमध्ये याची ओळख शून्य टक्के. बलात्कारपीडिता कशी तपासावी; याशिवाय कोणतीही कामसमस्या, अगदी स्त्रीआरोग्याच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमातही अंतर्भूत नव्हती आणि आजही नाही. एकलव्य होऊन अभ्यास करणे हाच उपाय. असले रुग्ण येतात, पण असतात अगदी गांगरून गेलेले. मुळात कोणाकडे जावे या दुविधेत पडलेले. स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ, गुप्तरोगतज्ज्ञ की सार्वजनिक मुताऱ्यांत जाहिराती लावणारे स्वयंघोषित लिंगवैदू? शिवाय येणारे रुग्ण चाचरत बोलणार, नुसतेच घुटमळणार, भलतेच काहीतरी सांगणार. काय बोलावे, कोणत्या शब्दांत आपले गाऱ्हाणे मांडावे, हीच त्यांची एक मोठी समस्या. कोणते शब्द अश्लील समजले जातील आणि कोणते शिष्टसंमत, हा मनात गोंधळ. संकोच जितका रुग्णाला वाटतो तितकाच डॉक्टरांनाही वाटत असतो. पुरेसा वेळ तर नसतोच. मग डॉ. प्रभूंचे ‘निरामय कामजीवन’ हे पुस्तक मी त्यांना वाचायला द्यायला लागलो. दोघांनीही संपूर्ण पुस्तक वाचल्याशिवाय माझ्याकडे यायचं नाही, असे सांगायला लागलो आणि हे पुस्तक रामबाण ठरू लागले. सुमारे ८० टक्के लोकांना पुन्हा माझ्याकडे येण्याची गरजच पडायची नाही. जे यायचे त्यांच्या मनातली भीती संपलेली असायची. समस्या मांडायला नेमके पारिभाषिक शब्द त्यांना पुस्तक वाचून मिळालेले असायचे. मलाही सारे काही ग-म-भ-न-पासून सुरू करावे लागायचे नाही. काही किमान शास्त्रीय पूर्वज्ञान बोलताना गृहीत धरता यायचे. हे पुस्तक केवळ पुस्तक नसून ‘औषधी पुस्तक’ आहे हे माझ्या लक्षात आले! पुढे काही निमित्ताने डॉ. प्रभूंचे माझ्या दवाखान्यातही येणे झाले. मी चक्क त्यांना दारातच साष्टांग नमस्कार घातला. विठ्ठलाचे पायी माथा टेकल्याचे समाधान लाभले! एखाद्या नव्या औषधाच्या शोधाइतकीच त्यांची कामगिरी वंदनीय होती.
मात्र, आजही त्यांच्याप्रति माझी आणि समाजाची आदरभावना पूर्णत: व्यक्त झालेली नाही असेच वाटते. आजही कामजीवन निरामय नाही, आजही लैंगिकता शिक्षणाची हेळसांड चालूच आहे, आजही आदरांजली वाहताना ओंजळ रिकामीच आहे याची अस्वस्थ जाणीव राहीलच राहील.
(लेखक स्त्रीआरोग्य आणि प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)
shantanusabhyankar@hotmail.com

Monday 11 March 2019

पण लक्षात कोण घेतो?


पण लक्षात कोण घेतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

बाळाची काळजी घेण्याच्या, जितकी घरे तितक्या तऱ्हा असतील. बाळ म्हणजे सृजनाची खूण, भविष्याची ठेव, पूर्वजांच्या ऋणाची परतफेड...पण ह्या काव्यात्म, रेशमी अनुभवाला गैरसमजुतींची कसर अगदी सहज लागते. पण लक्षात कोण घेतो?
आता हेच पहा ना, जन्मतः बाळाला अंघोळ घाललायची कित्ती कित्ती घाई. नुकतेच जन्मलेले बाळ अतिशय बेंगरूळ दिसते. ते टयांह्यां टयांह्यां रडत असते, ओले असते. केस चिकटलेले, चेहरा, डोकं जरा चेपलेलं, सर्वांगावर चिकटा चिकटलेला, रक्त लागलेलं, डोळे घट्ट मिटलेले; असं ते बाळ पहाताच आईच्या काळजात चर्रर्र होतं. हेची फळ काय मम तपाला, असं म्हणत ती मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेते. पाहिजे होतं मिल्कपावडरच्या डब्यावरचं गुटगुटीत बाळ आणि पदरात पडलं हे ध्यान!! पण चिंता नसावी. बाळ आपलं रूप झपाट्यानी पालटतं आणि काही दिवसात अगदी राजस दिसायला लागतं. त्याला सजवायची, घाई करू नये. जन्मतः बाळाला तेल माखून, न्हाऊ घालून, त्याच्या अंगावरचा चिकटा काढून, पॉलिश करून घेण्याची काही गरज नसते. उलट पहिले एकदोन दिवस बाळाला मुळी अंघोळ घालूच नये. त्याच्या अंगावरचा पांढरा चिकटा त्याच्या संरक्षणासाठी असतो. त्यांनी उबही रहायला मदत होते. तो काढून उलट तोटाच होतो. तेंव्हा तो आपोआप सुकून, पडू द्यावा.
जी गोष्ट अंघोळीची तीच तेलाची. जिथे भोक दिसेल तिथे तेल घालायची आपल्या समाजाला वाईट्ट खोड आहे. त्यामुळे बाळाच्या नाकात, कानात, बेंबीत, शीच्या जागी, शूच्या जागी, तेलाचे थेंब सोडले की ‘अंगाला लावणाऱ्या बायांना’ कृतकृत्य वाटतं. खरंतर बाळाच्या कुठल्याही भोकात काहीही घालायची गरज नसते. दिसेल त्या भोकात तेल घालायला बाळ म्हणजे काय शिवणयंत्र  आहे?
पण तेल आणि त्याचे गुणधर्म याचं वेडच आहे. अगदी जगभरातल्या लोकांना. कुठल्याही सफरीला गेलात की लगेच स्थानिक तेल विकणारे  भेटतात. इजिप्तच्या कमल-तेलापासून ते लंकेतल्या दालचिनी-तेलापर्यंत अनेक विक्रेते मला भेटले आहेत. कोणत्याही तेलात केस गळायचे थांबतात, सांधेदुखी पळून जाते आणि संडासला साफ होते! हे तीन गुण किमान असतातच.  बाकी मग तसला ‘स्टॅमिना’ वाढवण्यापासून ते चिरतारुण्यापर्यंत काहीही असू शकतं!! असो.
बाळाच्या कानात तेल ओतले तर कानाचा पडदा तेवढ्या वजनानेही फाटू शकतो. अगदी कांद्याच्या सालीइतका पातळ असतो कानाचा पडदा. तेलाचं वजन तो फाटायला पुरेसं असतं. मग हे तेल मध्यकर्णात जातं. या तेलाच्या थरावर बुरशी इत्यादी जंतू वाढतात. नाजूक अंतर्कर्णाची चांगलीच नासधूस करतात. बाळाची श्रवणशक्ती कमी होते, ते समाजात, शाळेत, मागे पडते आणि पुढे दुर्दैवाची मालिकाच सुरु होते. मुलाच्या आणि कुटुंबियांच्या अंतःकरणाची नासधूस होते. पण सांगूनही हौसेहौसेनी तेल घालणाऱ्या आज्ज्या, रोज भेटतात मला. वर सांगतात तेल घालत्यामुळे कानात मळ साठत नाही. मुळात मळ हा तिथले नैसर्गिक स्त्राव आणि धूळ याचं मिश्रण असतं. चावणे, चोखणे अशा जबड्याच्या हालचालींमुळे जो काही मळ असतो तो आपोआप बाहेर येतो. तो काढण्याची गरज नसते. त्यातून तान्ह्याबाळाचा आणि धुळीचा संपर्क तो किती? पण लक्षात कोण घेतो?
नाकातही तेल घालायची आवश्यकता नसते. उलट तेलाचा अंश श्वसनमार्गात जाऊन न्युमोनिया झाल्याची उदाहरणे आहेत. केमिकल न्युमोनायटीस म्हणतात त्याला.
बेंबीवर तेलही असेच अनावश्यक. तिथेही तेल घातलं की नाळेचं ओलं बोंडूक वाळण्याची क्रिया मंदावते. ओली, लुसलुशीत, निर्जीव, नाळ म्हणजे जंतुना मोकळे रानच की. नाळेला ड्रेसिंग करणे, पट्टी बांधणे, गोमय (म्हणजे गाईचे शेण) लावणे, सारं काही निषिद्ध आहे. गाय कितीही पवित्र असली तरीही. नाळ पडल्यावर कधी कधी बेंबी ओलसर रहाते. खडेमिठाचा खडा त्यावर धरला की ही ओल शोषली जाते. विशेष काही करावं लागत नाही.
तेल लावण्या पाठोपाठ अंघोळ येते. बाळराजांची अंघोळ म्हणजे तर काय शाही स्नान! एरवी चांगल्या कर्त्याधर्त्या बायका बाळाला अंघोळ घालायला बाई का लावतात हे एक न सुटलेलं कोडं आहे. एरवी ह्या बायका अगदी कर्तृत्ववान वगैरे असतात. विमाने उडवतात, बंदूक चालवतात, लाखोंचे व्यवहार ह्यांच्या सहीने होतात; पण बाळाला अंघोळ घालायला ह्यांना खास बाई लागते. ती सुद्धा कोणतीही कामवाली चालते. चार घरी धुणीभांडी करणे, चार घरी अंगाला लावायला जाणे, आणि स्वतःची चार मुले असणे, एवढेच ह्यांचे क्वालिफिकेशन. बाळाला अगदी चोळून मोळून अंघोळ घातली जाते. तत्पूर्वी त्याला तेलानी रगडून रगडून पैलवानासारखे  मालिश केलं जाते. इतकं रगडण्याची गरज नसते. अशाने क्वचित हाड मोडल्याची, स्नायू ओढल्याची उदाहरणे आहेत. एक बाई बाळाचे हात पाय एकत्र धरून त्याला झोके देते आहे, असाही एक भयंकर व्हिडीओ एका पेशंटनी मला दाखवला होता. काय करू नये, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवायला, मी तो सेव्ह करून ठेवला आहे.
अंघोळीच्या आधी ह्या तेल लावण्याचा कितपत फायदा होतो कुणास ठाऊक. तेलाचा काही अंश हा बाळाच्या त्वचेतून शोषला जातो, त्वचा तुकतुकीत रहाते हे फायदे म्हणायचे. पण त्याच बरोबर ते बुळबुळीत होतं, हातातून निसटून अपघात होऊ शकतो हे तोटे म्हणायचे. शिवाय तेल कोणते हा तर आजकाल प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तालेवार घरात बदामाचे तेल, नाहीतर तिळाचे तेल, मग खोबरेल तेल, मग गोडं तेल अशी उतरती भाजणी आहे. खरंतर कोणतेही तेल चालतं. कृपया अर्थाचा अनर्थ करून अगदीच इंजिन ऑईल चोळू नये!
मग कढत पाण्यानी अंघोळ. त्यात बाळाला पायावर घेणे, बसवणे, डोक्यावरून पाणी घालणे, उलथे ठेऊन घालणे, पालथे ठेवून घालणे, अशा क्रिया हौसेहौसेनी केल्या जातात. हे सगळं अनावश्यक आहे आणि क्वचित धोकादायक सुद्धा. हे होईपर्यंत बाळ ठोठो बोंबलत असते, क्यांक्यां केकाटत असते. पण ह्या सगळ्यानंतर बाळ गाढ झोपते याचेच बायकांना कौतुक! झोपेल नाही तर काय? इतके रडव रडव रडवल्यावर ग्लानी येणारच की. पण रडण्यानी बाळाला व्यायाम होतो असं एका माउलीच्या, माउलीच्या, माउलीनी मला छातीठोकपणे सांगितलं होतं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचं ते छाती ठोकणे काही संपेना. शिवाय स्वतःची आठ बाळंतपणे झाल्याचा त्यांना लोकोत्तर अभिमान होता आणि माझे एकही बाळंतपण झाले नसल्याचा कांगावा अखंड चालू होता. शेवटी मी म्हटले, ‘अरे व्वा! मग रोज तासभर पाट मांडून, मांडी  घालून बसा आणि मोठ्यांदी गळा काढून तुम्हीही तोच व्यायाम करा!!’
बाळाला बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून; नाही तर त्यांनी सांगितलं असतं, की ‘मी काही तुमच्यासारखा बाहेर जात नाही. त्यामुळे मळतबिळत नाही. मला नुसतं विसळून घेतल तरी चालेल’. बाळ विसळून घेणे ही बाळाला अंघोळ घालण्याची आदर्श पद्धत. करायचं असं की टेबलावर योग्य त्या तापमानाचे पाणी एखाद्या टबमध्ये घ्यायचं आणि बाळाला त्यात हलकेच विसळून घ्यायचं. गार हवा, मग गरम पाणी, पुन्हा गार हवा अशा तापमानाच्या झोक्यांचा बाळाला त्रास होतो. तेंव्हा हे लक्षात ठेऊन सारं काही उरकायचं. अंघोळीनंतर तेल लावायचं. अशानी अंगात उब रहायला या तेलाचा उपयोग होतो.
या साऱ्या प्रकारात सर्वात अघोरी प्रकार कोणता असेल तर बाळाला धुरी देणे. रसरसत्या निखाऱ्यावर काय काय जाळून त्याचा धूर बाळाला दिला जातो. त्या धुरात काय दिव्य वायू असतील ते असोत, पण त्यात कर्बद्वीप्राणवायू आणि कर्बप्राणवायू  असतातच असतात. यांनाच मराठीत कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणतात. यातला दुसरा तर एकदा लालपेशीत शिरला की पुन्हा निघत नाही. म्हणजे ती पेशी कायमची बाद. हा प्रकार तर पूर्णतः टाळावा.
बरेचदा बाळाची छाती फुगलेली दिसते आणि ती पिळली तर किंचितसे दूधही येते. याला डाकीणीचे दूध म्हणतात आणि हे पिळून काढणे चांगले असेही समजतात. पण अशा तऱ्हेने दूध पिळणे हानीकारक ठरते. यामुळे दुधाच्या पेशींना इजा होते आणि जर मुलगी असेल, तर तिला पुढे स्तनपानाला अडचण येते. असे दूध आईच्या संप्रेरकामुळे तयार झालेले असते. ते आपोआप, आतल्याआत जिरून जाते. पिळून काढण्याने कधी कधी तिथे इन्फेक्शन होऊन गळू देखील उद्भवू शकते तेंव्हा असे करू नये.
तान्ह्या मुलीच्या बाह्यांगातून थोडा रक्तस्राव झाल्याचही दिसू शकतं. हा ही आईच्या संप्रेरकांचा प्रताप. ह्यालाही काहीही करायची गरज नसते. हा ही स्त्राव आपोआप थांबतो. जुजबी स्वच्छतेपलीकडे काही करावे लागत नाही. उगाच आश्चर्याचे चित्कार काढू नयेत. पदर तोंडावर धरून ‘पदर आल्याची’ अस्फुट चर्चा करू नये. ती फिजूल आहे.
बाळाच्या डोळ्यात काजळ घालणेही असेच चुकीचे आहे. शिवाय ते डायरेक्ट बचाकभर घातलेले असते. त्या काजळातून डोळे शोधावे लागतात. घरी केलेले, चांदीच्या वाटीवर धरलेलं असलं तरीही काजळाची गरज नाहीच. काजळामुळे डोळे मोठे होत असते तर चिन्यांनी आणि जपान्यांनी आपल्याकडून कित्तीतरी काजळ आयात केलं असतं! काजळ घालणारी बोटे अस्वच्छ असली तर डोळ्याला इन्फेक्शन होते, कधी बोट डोळ्याला लागते, काजळीचे कण डोळा ते नाक अशा सूक्ष्म अश्रूनलिकेत अडकून ती वाट बंद होते; असे अनेक प्रकार संभवतात. दृष्ट लागू नये म्हणून हा प्रकार आवश्यक आहे म्हणे. काय काजळ तीट लावायचं ते इतरत्र लावा. पार अंगभर ठिपके ठिपके काढून बाळाचा बिबट्या करा. पण प्लीज डोळ्यात काही घालू नका.
असाच बाळाची टाळू भरणे नावाचा एक प्रकार आहे. हा करू दिला नाही तर आलेल्या बाईचा डायरेक्ट अपमान होतो म्हणे. लगेच तिचा पापड मोडतो. यात आलेली बाई बाळाच्या डोक्यावर तेल थापटते. तेल राहून, केस चिकटून, खवडे झाले तरी चालतील पण टाळू भरणार म्हणजे भरणार! मुळात तेलानी असं काही होत नाही. टाळू न भरणाऱ्या इतर संस्कृती या पृथ्वीतलावर नांदत आहेत. त्यांच्या अपत्यांची टाळकी टाळू न भरताही शाबूत आहेत. बाळाची टाळू म्हणजे त्याच्या कवटीच्या हाडातील मऊ मोकळे अंतर असते. बाळाचा वाढता मेंदू मावावा म्हणून अशी सोय असते. शिवाय प्रसुतीच्या वेळी अशा लिबलिबीत लवचिक कवटीमुळे बाळाचे डोके थोडे निमुळते होते आणि सुलभतेने बाहेर येते. पुढे १८ महिन्यापर्यंत ही जागा हाडांनी भरून जाते, चांगली टणक होते. तेल थापटून टाळू भरून येत नाही. शिवाय जर भरून येत असेल तर मग एकच का? अशी किमान अजून एक  जागा असते बाळाच्या डोईस. कमी दिवसाच्या बाळाला तर अधिक असतात. त्याही भराव्यात. पण बायकांना या जागांचा पत्ता नसल्यामुळे सारा भर माथ्यावर तेल थापटण्याकडे. बिच्चाऱ्या बाकीच्या टाळू! मुकाट्यानी आपोआप भरून येतात.
बाळाला भेटायला येणारेही असेच उच्छाद आणतात. मुळात भेटायची, बाळ पहायची उत्सुकता असणे यात गैर काही नाही. माकडातही अशी वागणूक शास्त्रज्ञांनी नोंदवली आहे! पण जावं ते थोड्या दिवसांनी, जरा आई आणि बाळ स्थिरस्थावर झाल्यावर. तात्काळ भेटायला गेलं नाही तर आपलं महत्व कमी होईल असं काहींना वाटतं. मग दवाखान्यातच भेटायला जायचं, हात साबणाने स्वच्छ न धुताच बाळाला मांडीवर घ्यायचं, त्याला मांडीवर घेऊन डोलवायचं, त्याच्या हातात मळकी नोट ठेवायची, मग ते ती नोट तात्काळ तोंडात घालणार...!!! अशी सगळी गंमत चालू रहाते.
येणारे जाणारे तरी किती, त्याला काही सुमारच नाही. त्या आईला ना पुरेशी विश्रांती मिळते, ना बाळाला घ्यायला वगैरे पुरेसा निवांतपणा, ना प्रायव्हसी. काही समाजात तान्ह्या बाळाला अजिबात बघायला जात नाहीत, गेले तरी हात लावत नाहीत. हे बेस्ट आहे. काही लोकांत मात्र येईल ती बाई बाळ हाताळणार, त्याला तेल लावून त्याची टाळू भरणार. वर असं काही टाळावं म्हणलं तर तिचा अपमान होणार.  मेलीनं मूल माझ्या मांडीवर दिलं नाही म्हणणार.
अशा किती गोष्टी सांगाव्यात? एक ना अनेक. शेवटी मी तर माझ्या दवाखान्यात प्रत्येक खोलीबाहेर पाटी लावून टाकली आहे...
मी तर इवले इवले मूल; अगदी नाजूक नाजूक फूल.
भेटण्यासाठी तुम्ही आतुर; पण डॉक्टर मात्र चिंतातूर.
बाहेरून येता कुठून कुठून; कपडे, अंग, हात मळवून.
आत्ता भेट फक्त लांबून, नंतर बोलावीन हाक मारून.
ह्यानी मात्र भलताच फरक पडला आहे. एरवी येणारे यायचे, काय करायचे ते करायचे आणि जायचे. आता येणारे येतात, काय करायचे ते करतात आणि जाताना मला सांगून जातात, ‘डॉक्टर, तुम्ही कविता छान करता हं!’