Wednesday 26 October 2022

घर थकलेले संन्यासी

 

घर थकलेले संन्यासी

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

ते घर वेगळंच होतं अगदी. अगदी थकलेले होतं. मुख्य दरवाजावरची गणेशपट्टी सुद्धा तिरकी झाली होती. त्यामुळे गजानन खाली घसरतो आहे आणि शारदेने  पाय चेपता चेपता त्याला धरून ठेवला आहे, असं एक मजेदार दृश्य आपोआपच तयार झालं होतं.  कोण्या ऐतिहासिक काळी यज्ञ केला म्हणून कोण्या शेठजींनी माझ्या पूर्वजांना ते घर दान दिलं होतं म्हणे. मग ते तिथे पाठशाळा चालवायचे. जुना वाडा होता तो. एका बोळात,  उत्तरेला, तोंड उघडायचं त्याचं.  मग काही दिवसांनी घराच्या मागील दारी प्रशस्त रस्ता झाला. मग घराचे तोंड फिरवून घेतलं गेलं. मुख्य दार आता बरोबर उलट, म्हणजे दक्षिणेला झालं. मग काही दिवसांनी घराच्या पूर्वेला आणखी एक रस्ता झाला. मग घराचे दार पुन्हा बदललं आणि ते पूर्वाभिमुख झालं. असं हे घर. घर फिरलं की वासे फिरायचे!

दार ज्यावेळी उत्तरेला होतं तेव्हा अंगण, ओसरी, ओसरीवर झोपाळा, मग माजघर, एका बाजूला देवघर, मागे सोपा, बाळंतीणीची खोली,  विहीर आणि  परसदार असा सगळा पसारा होता. मग घर उलटलं. परसदार होतं त्याचं  अंगण झालं. सोप्याची ओसरी झाली. माजघर मात्र मध्यावरच राहिलं आणि पूर्वीच्या ओसरीवर स्वयंपाकघर झालं. अंगणाचे परसदार झाले. परसाकडेला ‘पायखाना’ही (टॉईलेट ब्लॉक) आला.  पुन्हा एकदा दिशा बदलली तेंव्हा पूर्वेकडे प्रवेशद्वार झाले. पूर्वीच्या देवघराची बैठकीची खोली  झाली. मग ओसरीवरचा झोपाळा. मग तिथेच स्वयंपाकघर. डावीकडे माजघर. मध्ये जाड भिंतीतून जिना. माडीवरही खोल्या, खोल्या, खोल्या होत्या. तळमजल्यावरच्या ज्या खोलीवर माडी असायची, त्या खोलीच्या नावाने ती ओळखली  जायची. म्हणजे ओटीची माडी, माजघरची माडी वगैरे.

मग त्यात आणखी बदल झाले. शेजारच्या मोकळ्या जागेत माझ्या आजोबांनी गाळे बांधले. त्या काळातला मॉलच तो.  ते गाळे भाड्याने दिले. उत्पन्न सुरू झाले. आणखी काही नवीन बांधकाम केलं. या भानगडीत घराचा अगदी चक्रव्यूह झाला.  मी लहान होतं तेव्हा घराला तीन दिशांना तीन दारं होती. शिवाय बाहेरून थेट माडीवर जाता येईल असे दोन जिने होते. घरातून जीना होता तो वेगळाच. एकूणच नव्या पाहुण्याला चकवण्याला आणि चुकवण्याला हे घर खूपच सोयीचं होतं. चोर-पोलीस, लपाछपी वगैरे खेळायला बांधल्यासाखेच होते. दारे, खोल्या, जिने, असा चक्रव्यूह तर होताच पण याच्या भिंती चांगल्या अडीच तीन फूट रुंद होत्या. त्यामुळे भिंतीतली कपाटे, कोनाडे, अंबारी(जिन्याखालची जागा) अशाही लपण्यासाठी सोयीच्या जागा होत्या.

भिंती, छप्पर, दारे, खिडक्या असं इथल्या प्रत्येक गोष्टीत वैविध्य होतं.  जमीनही सगळीकडे सारखी  नव्हती.  माजघर,  माजघरची माडी हे सारवलेलं. मधूनच ताज्या सारवणाचा गंध सोडणारे. इथे केर काढायला केरसुणीच हवी, हे कुंच्याचे काम नाय. स्वयंपाकघरात शहाबाद फरशी. बरीच वरखाली झालेली. गच्चीत कोबा. इतरत्र बहुतेक मोझेक टाईल्स. विविध रंगांच्या, विविध ठिपक्यांच्या, जसे पैसे जमतील तसे बसवलेल्या. आता विविध ठिकाणी उखडलेल्या. बसायला कुठे पाट, कुठे जाजम, कुठे घोंगडी, कुठे सतरंजी  शिवाय बैठकीच्या खोलीत लीनोलियम अंथरलेला आणि एक सोफासेट सुद्धा. हे सगळ्यात उच्चभ्रू स्वागत.

जरा काळजीपूर्वक बघितलं की नवं आणि जुनं यांचा समसमा संयोग दिसून यायचा. स्वयंपाकघरात एका  ठिकाणी पायाचे दगड स्पष्ट दिसायचे. पण त्याचे अनेक उपयोग होते. त्यावर नारळ फोडता यायचा. तो इतरत्र फोडला तर फरशी फुटायची भीती असायची. शिवाय या पायाच्या दगडावरनं दोन-तीन खांब वरचे छत कसेबसे तोलून धरत होते. त्याच्यावर तुळया, वासे आणि त्याच्यावर पाटणी नावाचे लाकूड काम केलेले. त्यानुसार घरात ‘खण’ पाडलेले. मागच्या खोलीत वाश्यांना,  लाकडी दांड्या, आडव्या आडव्या लावल्या होत्या. या खास कपडे वाळत घालण्यासाठी. या दांड्यांवर काठीने कपडे वाळत घालून ते पसरवणे हा मोठा कौशल्याचा भाग होता.

छपराला काही ठिकाणी पत्रा होता. पत्रा हा खूपच इंटरेस्टिंग प्रकार होता. मुख्य म्हणजे तिथून दरवर्षी होणारा बुवासाहेबाच्या जत्रेतला तमाशा अगदी थेट दिसायचा. उन्हाळ्यात पत्रा प्रचंड तापायचा आणि खोलीत गेलं की भट्टीत गेल्यासारखे वाटायचं. थंडीत पत्रा प्रचंड थंड पडायचा आणि फ्रीजमध्ये गेल्यासारखं वाटायचं. पावसाळ्यात पत्र्यावरील आवाजावरून पाउसमान ओळखता यायचं. पण त्यातील सारी छिद्र  आपले  अस्तित्व दाखवून जायची. पण उन्हाळ्यात पत्र्यावरती वाळवण मस्त वाळायची आणि रात्री गाद्या घालून थंडगार हवेत झोपता यायचं. मग काका गोष्ट सांगायचा. अर्थात भुताची. समोरच्या पिंपळावर एक पिवळे घुबड रहाते  आणि मध्यरात्री येऊन ते कानात फुंकर मारतं आणि मग आपण बहिरे होतो; हे अशुभ वर्तमान काकानी पत्र्यावरच दिलं होतं. पुढे बरेच दिवस आमच्या काळजाचा थरकाप करायला ही गोष्ट पुरेशी होती.

काही भागावर कौलं  होती. माकडं  आली की त्या कौलांची फारच दैना  व्हायची. माकडांच्या उड्यांनी शाकारणीनेही कुठे कुठे आ वासला होता. पुढे कौले काढून सगळीकडेच पत्रे झाले. पत्र्याचा मुख्य फायदा म्हणजे सुरवंट  बंद झाले. कारण कौलात सुरवंट फार. ते खोलीत सगळीकडे पडायचे. बाकी पाली, कोळी, सरडे, साप, झुरळे, डास, पिसवा, ढेकूण, विंचू, उंदीर, घुशी, चीचुंद्र्या, मांजरे यांचा तर मुक्त संचार होता. लाकूडकामाच्या अंगांगी वाळवी भिनली होती.  रात्री माळ्यावर एक वटवाघूळ आणि दोन पाकोळ्या मुक्कामी असायच्या. बाहेर वळचणीला पोपट, पारवे, चिमण्या सतत घरटी बांधायच्या. शिवाय घराबाहेर बरेच आडोसे होते. त्यात कुत्री, डुकरं, कोंबड्या, शेळ्या, गाढवं  रात्री वस्तीला असायचेच.

एकदा एक परदेशी पाहुणा आमच्या घरी आला आणि नेमकं एक अबलख गाढव दारात उभं. तत्परतेने आणि मोठ्या प्रेमाने तो त्या गाढवाच्या गळ्यात पडला. जवळपास पप्पीच  घेतली त्यानी  गाढवाची. गाढवाला हा मुका मार असह्य झाला आणि दुगाण्या झाडत ते निघून गेलं. त्या गोऱ्या साहेबाची अशी समजूत की हे गाढव पाळलेले आहे त्यामुळे तो त्याच्याशी सलगी करायला गेला. पुढे गाढवही गेलं.... आणि गोराही गेला.

दारांचे या घरात बरेच प्रकार होते. अडसर घालता येईल अशी दारे, दिंडी दरवाजा असलेले दार, पत्र्याचे दार. सिमेंटच्या पत्र्याचे दार, खिट्टी असलेली, खीळ असलेली, कडी कोयंडा, असलेली बोलट असलेली आणि काहीच नसलेली अशी अनेक प्रकारची दारे. शिवाय प्रत्येक दाराचा विशिष्ट आवाज होता. तो अगदी ओळखीचा.

असे कितीतरी आवाज होते त्या घरात. झोपाळ्याच्या कड्या सतत कुरकुरायच्या. दारं, खिडक्या, कड्या, काचा असं सगळंच वाजायचं तिथे.  शिवाय पावलांचे आवाज होते. प्रत्येक व्यक्तीची चाहूल वेगळी आणि प्रत्येक खोलीतली चाहूल वेगळी.  माजघरात वेगळा स्वर, जिन्यावरून वेगळा स्वर, लीनोलियमवर वेगळा, धाब्यावर वेगळा. वरच्या मजल्यावर कुणी जोरात पळत असेल तर माती पडायची, त्याचा आवाज. शिवाय उंदीर घुशी फिरणार त्याचाही वेगळा विशिष्ठ आवाज होता.

आणि या घराच्या आम्हां रहिवाश्यांचेही आवाज चांगले कमावलेले होते. घर इतकं मोठं  असल्यामुळे., बाबांना बोलाव  म्हटलं की चार आळ्या पलीकडेही ऐकू जाईल अशी जोरदार हळी ठोकावी लागायची. माणसं आणि वस्तू या घरामध्ये हरवूनच जायची. वस्तू हरवणं तर अत्यंत सोपं  होतं आणि त्या सापडणं महाकर्मकठीण.  अडकित्ता, किल्या, चष्मा वगैरे वस्तू शोधून आणणे हा आमच्यासाठी व्यायाम प्रकारच होता. शिवाय अडकित्ता शोधता शोधता पानाचा डबा कोणत्या तरी खोलीत विसरायचा. तो शोधायला वेगळी मोहीम आखावी लागायची. शिवाय काही गोष्टी अमक्या ठिकाणी का ठेवल्या आहेत याचा काहीही शोध लागणं शक्य नव्हतं. चिंच, ही वरच्या मजल्यावर,  माजघरच्या माडीतल्या कोनाड्यात, एका माठात साठवलेली असायची. ती तिथून जाऊन आणावी लागायची. किंवा खायची असेल तरी तेवढी सफर करावी लागायची. काथ्या अंबारीत ठेवलेला होता. चांदीची भांडी माळ्यावर होती. पण नेहमीच्या नाही. ‘आरोग्य हीच संपत्ती’, असं खडूने लिहिलेल्या तुळईशेजारच्या पाटणीला  एक झडप होती. त्याच्या आड माळा होता. तिथे चांदीच्या भांडी एका दुरडीत ठेवलेली होती.

अंधाऱ्या माजघरात खुंटीला टांगलेले देवादिकांचे, पूर्वजांचे, फोटो होते. ते तिथे का होते आणि कोणाला दिसणे अपेक्षित होते कोणास ठाऊक. एक चित्र अगदी डोळ्यापुढे आहे. चेहऱ्यावर उग्र भाव धारण केलेला शंकर, शेजारी पार्वती, कार्तिकेय, गणपती, नंदी आणि मागे हिमालय. कुठल्यातरी जुन्या कॅलेंडरवरचे चित्र असावे. पण ते फ्रेम करताना, माझ्या एका चुलत आजोबांचा फोटो, तळाशी सरकवून दिला होता. रंगीबेरंगी शंकराच्या कॅलेंडर चित्राच्या पायाशी, काळ्यापांढऱ्या रंगातले, खप्पड चेहऱ्याचे, दाढीचे खुंट वाढलेले माझे चुलत आजोबा अगदी केविलवाणे दिसत. पण माजघरात एक विलक्षण सोय होती. थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंडगार असायचं ते. शिवाय बाकी ठिकाणी भिंतींना ओल, पोपडे वगैरे प्रकार होते, इथे नाही. इथे दोन दोऱ्या होत्या. यावर असंख्य कपडे टाकलेले असायचे. नेमका आपल्याला पाहिजे तो कपडा कधी सापडायचा नाही. पण मागे कधीतरी हरवलेला मात्र सापडायचा. अशी त्या दोरीमध्ये दिव्यशक्ती होती.

त्या भव्यदिव्य  घरातलं  फर्निचरही भव्यदिव्य होतं. एक ऐसपैस टेबल होतं. म्हटलं तर डबल बेड म्हणून उपयोग करता आला असता इतकं ते मोठं होतं. त्याचे ड्रॉवर अगदी खोल होते. साहेबांच्या बाजूने एक ड्रॉवर आणि पक्षकाराच्या बाजूने दुसरा. टेबलाच्या खुर्च्यासुद्धा टेबलासारख्याच भक्कम होत्या. चांगल्या जड होत्या. त्यात कधी कधी ढेकूण व्हायचे. ढेकूणदेखील खानदानी होते. जीन पँट भेदून करकचून चावायची शक्ती होती त्यांत. टेबलावर टांगलेला, पांढरे शुभ्र लॅम्पशेड असलेला, एक दिवा होता. त्याची कड एखाद्या पाकळीसारखी नागमोडी होती. खूप सुरेख होती. टिळक वगैरेंच्या चित्रात तसला दिवा दिसायचा. मग स्फूर्ती वगैरे यायची.

एक देव्हारा होता. काळा. तो शिसवी होता म्हणून काळा होता का काळा होता म्हणून शिसवी म्हणवला जायचा हे एक कोडंच आहे. वाती, कापूर, उदबत्ती, गंध, फुले असा एक मिश्र वास तिथे सतत दरवळत असायचा. त्याला सुरुदार देखणे खांब होते, सुंदर मेघडंबरी होती, बरेच गुप्त कप्पे होते आणि हे सगळं फोल्डिंग होतं. वर्षातून एकदा, गणपतीपूर्वी देवघर रंगवलं जायचं, तेंव्हा ही सगळी आगळीवेगळी माया बाहेर यायची. घरातल्या साऱ्यांच्या जन्मकुंडल्या, शिवलीलामृताची पोथी, केस झडलेली चवरी, शंख आणि त्याची अडणी अशी जणू चौदा रत्न निघायची आणि साफसूफ होऊन परत जागेवर जाऊन बसायची. तोवर जगन शेलारने देवघर रंगवून, आपल्या कोरीव अक्षरांत ‘श्री गजानन लक्ष्मी प्रसन्न’, असं लिहिलेले असायचं.

जगनवर मात्र लवकरच गजानन आणि लक्ष्मी दोघेही प्रसन्न झाले. आधी लाईट आले आणि पाठोपाठ  नळ.  जगनने वायरमन आणि प्लंबरचा कोर्स केलेला आणि  जगन गावातला मोस्ट वॉंन्टेड माणूस झाला.

लाईट आले; मात्र कंदील, मेणबत्त्या, बॅटऱ्या; एम.एस.ई.बी. कृपेने आम्ही कालपरवापर्यंत बाळगून होतो.  लाईटबरोबर वासे, खांब, पाटणी  याच्यावरती वायरच्या रेघा आल्या. लाकूडकाम असल्यामुळे बॅटनपट्टीचा खर्च वाचल्याचा आनंद आला.  जाड काळी पितळी बटणं आली, त्यांचे ठोकळेबाज ठोकळे आले. ते मोठे मोठे झाले. मिक्सर आणि फ्रीज आले आणि अनेक साधने पडद्यामागे घेऊन गेले. त्यांच्यासाठी वेगळे, पॉवरवाले ठोकळे आले. पाणी गरम करायचं पीप आलं आणि डोक्यावर मेन स्वीच घेऊन बाथरूममध्ये जाऊन बसलं. बंब थेट मोडीतच गेला. एक प्रचंड मोठा स्टॅन्ड असलेला पंखा आला. एक रेडिओग्रॅम आला. हा म्हणजे निम्मा रेडीओ आणि निम्मा फोनो. अर्धनारीनटेश्वरच हा.  मग  किल्लीचा, हिज मास्टर्स व्हॉईसवाला, फोनो अडगळीत गेला.

नळ आल्याबरोबर कावड, डोण, विहीर मागे पडले. मग अंगणात असलेला नळ स्वयंपाकघरापर्यंत आला. मग काही दिवसांनी छपरावरच्या टाकीत गेला आणि मग तिथून ठीकठिकाणी फिरला. पण नळाची ही  सलगी भिंतींना काही फारशी पसंत पडली नाही. बऱ्याच ठिकाणचा गिलावाच निघाला.

पण या घराला नुसत्या दारे खिडक्या आणि भिंती नव्हत्या. आपले अष्टबाहू याने अष्टदिशांना पसरलेले होते. घरासमोरचे मैदान, रस्ता, मंडई, शेजार असे सगळे आमचे घरच होते. घरापेक्षा घरा शेजारीच तर आम्ही सतत रमायचो.

घराच्या तिन्ही बाजूने रस्तेच होते. फक्त एका बाजूला शेजार. ते घर बागवानाचं होतं. पण बागवान कोंबड्या, शेळ्या, गाई, कबुतरे, ससे असा शिकारखाना बाळगून होता. त्यामुळे वसुबारसेला बागवानाच्या घरी जाऊन गाईची पूजा व्हायची. त्या घराचा माहोल काही औरच होता. तिथली पाटणी हिरव्या ऑईल रंगांत  रंगवलेली होती आणि त्याच्यावर भडक रंगात रंगवलेली केळी, अननस, द्राक्षं, जांभळं अशी लाकडी फळं लटकवलेली होती. सीझनप्रमाणे इथे काम चालायचं. चिंचा फोडणे, शेंगा सोलणे  ही दोन खूप इंटरेस्टिंग कामं.

घरासमोरच एक मोठं मैदान होतं. त्यावर तर इतक्या तऱ्हा चालायच्या की अख्खं बालपण तिथे गेलं.

तिथे कोपऱ्यात मासळी बाजार भरायचा. कातकऱ्यांच्या बायका टोपलीत मासे, खेकडे घेऊन बसायच्या. खेकड्यांची संथ, फेंगडी, वळवळ सुरु असायची. सुकट बोम्बलाचा उग्र दर्प घमघमत असायचा आणि विळ्यांवरती, माशांची अर्धवट चिरलेली कलेवरे, आ करून आभाळाकडे टपोरे डोळे लावून पडलेली असायची.

शेजारचा मांडववाला त्या मैदानात झिरमिळ्या बनवायचा.  त्याच्याकडे पंखा होता. तो त्या पंख्याच्या मध्यावर दुहेरी दोरा बांधायचा. मग त्या दोऱ्यामध्ये कातरलेल्या कागदाच्या पट्ट्या सरकावयाच्या. पंखा चालू केला की त्या दोऱ्याला आणि कागदाला पीळ बसायचा आणि झिरमिळ्या तयार व्हायच्या. त्याची मोठीमोठी  कनातीची कापडं होती आणि ती घडी घालायची विशिष्ट पद्धत होती.

आसपासची मंडळी बैलगाड्या घेऊन मैदानात यायची आणि मग बैलांना नाल मारायचा एक रंजक कार्यक्रम पार पाडायचा. आधी ते बैलाचे प्रचंड मोठे धूड, पायाभोवती कासऱ्याचा वेढा घालून, आडवे करायचे. मग चारी पाय एकत्र बांधून खुंटावरती उंच धरायचे. मग सटासट पहिले नाल काढायचे. खूर स्वच्छ करायचे. तासून घ्यायचे आणि दुसरे मारायचे. हे सगळं होईपर्यंत बैलाची शिंग धरायला एक भक्कम माणूस बसलेला असायचा. तरी दोन-तीन वेळा तरी बैल बिथरून उठायला बघायचा. हॉ, हॉ म्हणत माणसं त्याला शांत करायची. अंजारायची गोंजारायची. पण एकदा नाल मारून झाले आणि पाय मोकळे सोडले की ते जनावर झटक्यात उभे राहायचं. माझ्या दुप्पट तिप्पट उंचीचा बैल तो. कधीकधी थेट माझ्या डोळ्यात डोळे घालून बघायचा. सांगायचा, माझ्या मनाची मर्जी म्हणून इथे तुमच्या सेवेला आहे पण मर्जी फिरली तर एकेकाला शिंगावर घेईन! मी आपला मनातल्या मनात त्याला नमस्कार ठोकायचो. शेवटी नंदीच तो. त्याच्या मालकासारखा तोही कोपिष्ट असायचा. मी हे इतकी वर्ष कुठे बोललो नाही पण बैल माझे ऐकत असावेत. इतक्या वर्षात कोणाला त्यांनी शिंगावर घेतलं नाही.

बैलगाडीच्या चाकाला धाव (पट्टी) लावायचं काम चालायचं. गोल गोवऱ्या रचून त्यात लोखंडाची पट्टी तापवली जायची आणि मग ती तप्त धाव चाकाभोवती टाकून त्याच्यावर पाणी टाकलं जायचं. चर्रर्र असा रोमांचकारी आवाज यायचा.  गार होताच धाव चांगली घट्ट आवळली जायची. उष्णतेमुळे पदार्थ प्रसरण पावतो वगैरे हे खूप नंतर वाचले, शाळेत.

एरवीही हे मैदान माकडवाले, दरवेशी, गारुडी, डोंबारी, जादुगार यांनी सदैव गजबजलेलं असायचं. कधीही घरातनं बाहेर पडा, तिथे काही ना काही करमणुकीचा कार्यक्रम सुरूच असायचा. कधी सतत सात दिवस सायकल चालवणारा माणूस असायचा, कधी सापाचं शरीर आणि बाईचे मुंडके असलेली नागकन्या असायची, कधी हात असूनही निव्वळ पायाने केस विंचरणारी, ब्रश करणारी, ‘ष्टो’  पेटवून त्याच्यावर चहा करून, तो पिणारी पैरकलावती असायची. एकदा तर गणित करणारे गाढवसुद्धा होतं.  कुठलाही स्टॉल असला तरी ठणाणा  आवाजात गाणी ठरलेली आणि कुठलाही स्टॉल नसला तर शेजारचा मांडववाला होताच.  समग्र दादा कोंडके आणि शोलेचे डायलॉग पाठ झाले आणि पाठ राहिले ते काही उगीच नाही. 

समोरच्या गाळ्यात, चरकाबरोबर सतत घुंगराचा ताल धरणारा गुऱ्हाळवाला, त्याच्या नेत्रदीपक कॅलेंडरांसकट दर उन्हाळ्यात हजर व्हायचा. तिथे आले, लिंबू, बर्फ मिश्रित पुंड्या उसाचा ताजा रस, मीही काढला आहे. शिवाय आईसक्रीमचा पॉट सर्व शक्तीनिशी गरागरा फिरवला आहे. शेजारच्या  भडभुंज्याच्या भट्टीत भुस्सा टाकलेला आहे. तो लाल पिवळा जाळाचा भपका उडवलेला आहे. चार ठिणग्या अंगावरही घेतलेल्या आहेत. दाणे खारवण्यासाठी मिठाचे पाणी टाकल्यावर फसफसत उठणारी वाफ, तापल्या वाळूत जोंधळे टाकताच लाह्या फुटतानाची तडतड आजही कानात आहे आणि त्या धुराने काळवंडलेल्या खोपटात सर्वत्र भरून राहिलेला फुटाण्याचा खमंग दरवळ आजही नाकात आहे.

शिवाय पाच पावलावर मंडई. मैदानात करमणूक कमी पडत असेल तर मंडईत  भरपूर होती. पहाटे पहाटे भाज्यांचे लिलाव चालायचे. मग बाजार बसायला सुरुवात व्हायची. भाजीवाल्यांचे दुकान मांडणे, हलवायाचे दुकान मांडणे, चांभाराचे  दुकान मांडणे हे सगळं अगदी शिस्तबद्ध चालायचे. त्यात एक लय होती, एक क्रम होता, ज्याची त्याची एक एसओपी  होती.

काही गाळे होते. दार उघडताच अगदी दारापर्यंत सामान टिच्चून भरलेले असायचे. मग ही मंडळी ते एकेक करून बाहेर लटकवायची. मग काउंटर पुढे ओढला जायचा. गाळ्याच्या पायऱ्यांवर सामानाच्या राशी रचल्या जायच्या. आता कुठे शेठजींना आत जायची जागा व्हायची. इतकं होईपर्यंत घरातलं कोणीतरी पोरगं शेठजींना सोडवायला म्हणून यायचं. मग शेठजी चहा-नाश्ता करून दुकानात हजर झाले  की गिऱ्हाईक गटवण्याचे पहिले धडे गिरवून पोरगं शाळेमध्ये.

दिवसभर बाजारात गिऱ्हाईकांप्रमाणेच इतरही लोकांची गजबज असायची.  कडकलक्ष्मी स्वतःच्या अंगावर आसूड ओढून जायची.  बहुरूपी पोलिसाच्या वेशात दमबाजी करून जायचे. गोंधळी यायचे ते खाणाखुणांनी मनातलं ओळखून दाखवायचे. देवीचा जग मिरवत वाघ्यामुरळी यायचे. उदपात्र घेऊन फिरणारे फकीर तो धूर मोरपिसाने दुकानात वारायचे. मैदानातली आणि मंडईतली ही सारी अद्भुत मंडळी कधी कधी घरी यायची. समोरच्या पिंपळाखाली भाकरी सोडण्यापूर्वी पाणी किंवा कोरड्यास काही मागायची. 

घराच्या तीनही बाजूला असा सतत कोलाहल. करमणुकीसाठी घराबाहेरही पडण्याची गरज नव्हती. तीनही बाजूला गॅलऱ्या होत्या. घराच्या गॅलरीत जरी उभं राहिलं तरी करमणूकच करमणूक. पण ही सगळी करमणूक बघता बघता, एके दिवशी, त्या थकलेल्या घराच्या एका गॅलरीनेच अंग टाकलं. अगदीच शोभा झाली. 

कितीही म्हटलं तरी घर थकलेले होतं हेच खरं. मग नवीन ठिकाणी घर झालं आणि माणसांनी घर सोडताच ते थकलेले घर चक्क संन्यस्त झालं. त्याची जिजीविषाच संपून गेली. रिकामं, शांत, आतून बाहेरून पोखरलेलं ते घर, हळूहळू एकएक भिंतही खचत गेली.  भीष्मांसारखं जणू ते उत्तरायणाची वाट पहात होतं. एका उत्तरायणारंभी ते पडलंच. मग उरलेले आम्हीच पाडून टाकले.  कौले-पत्रे विकले, राडे-रोडे विकले, दारं-खिडक्या विकल्या, वासे-तुळया विकल्या, पायाचे दगडही चांगल्या भावाला गेले. कुठल्याश्या भिंतीत, पायात गुप्तधन सापडेल अशी आशा होती ती फळली नाही. आमच्यासारखे आमचे पूर्वजही कफल्लकच होते बहुतेक. दारावरच्या गणेशपट्टीवरचा शारदा-गणेश मात्र मी अजून बाळगून आहे. तेव्हढीच माझी श्रीमंती. ते सुबक, रेखीव, सर्वांगसुंदर शारदा-गणेश आता शोकेसमध्ये मजेत आहेत. गणेश लोडाला टेकून आहे. शारदा त्याचे पाय चेपतेच आहे. इतक्या वर्षात तीही थकलेली नाही आणि यानीही थांब म्हटलेले नाही. त्याच्या चेहऱ्यावर सात्विक समाधान अगदी  तस्सेच विलसत आहे.

ते आमचा नव्या घरातील संसार पाहून आहे असं मी आपलं समजतो.

 

 

Thursday 20 October 2022

लॉर्ड ऑफ द फ्लाईज (देवाघरची फुले?)

 

 

 

लॉर्ड ऑफ द फ्लाईज (देवाघरची फुले?)

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

 

ब्लर्ब

 

एका निर्मनुष्य बेटावर काही शाळकरी मुलं अडकतात... आणि सुरु होतो जगण्याचा संघर्ष.

सुरवातीला सगळं कसं छान छान असतं पण मग हळू हळू त्यांच्यातली जनावरं जागी होऊ लागतात...

आदीम प्रेरणा, सुसंस्कृत वागणुकीचा कब्जा घेतात...

गततट पडतात...

हाणामाऱ्या होतात...

विवेकाचा आवाज दाबला जातो...

नव्या नव्या मिथक कथा जन्म घेतात...

निरागस कोवळी मुलं,

ही देवाघरची फुलं,

शेवटी एकमेकांविरुद्ध जीवघेणे सापळे रचतात...!!!

 

 

लॉर्ड ऑफ फ्लाईज’, ही विल्यम गोल्डींग यांची गाजलेली कादंबरी. नुसतीच गाजलेली आणि नावाजलेली नाही तर या कादंबरीसाठी त्यांना १९८३ सालचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला.

या कादंबरीचं मराठी भाषांतर उपलब्ध आहे आणि ते केले आहे जी.ए.कुलकर्णी यांनी. नाव लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ असंच ठेवलं आहे. पात्रांची नावे आणि वातावरण, यांचंही भारतीयीकरण केलेले नाही. अशा प्रकारच्या भाषांतरामध्ये जो खडबडीतपणा राहतो तो आहेच, पण तरीही मूळ कादंबरीचा आवाका आपल्याला उत्तमरीत्या समजतो. पण  जीएंनी भाषांतराऐवजी, मराठी भावानुवादाची वाट धरली असती तर त्यांच्या सशक्त भाषेने कादंबरीचा ऐवज आणखी सजीव झाला असता असं राहून राहून वाटतं. भाषांतराबद्दल अधिक बोलण्याऐवजी मूळ कादंबरीचे कथानक मी थोडक्यात सांगतो.

कादंबरीची सुरुवात होते ती एका बेटावर अडकलेल्या मुलांच्या समूहाच्या वर्णनाने. जागतिक युद्ध सुरू झाले आहे. आदीस अबाबावरून मुलांना घेऊन चाललेल्या एका विमानावर हल्ला झालेला आहे आणि एका निर्मनुष्य बेटावर हे विमान कोसळले आहे. त्यातल्या राल्फ आणि पिग्गी या जोडीला एक शंख सापडतो. फुंकताच जो स्वप्राणाने, त्याचा आवाज सगळीकडे घुमतो आणि विखुरलेली मुले एकत्र येतात. आपण निर्जन बेटावर अडकलेलो आहोत हे त्यांच्या लक्षात येतं. आता आपले आपणच आहोत, आपणच काय ते ठरवायला हवं, पुढे तगायसाठी काही हालचाल करायला हवी, हे त्यांच्या लक्षात येतं.

सुरुवातीला ही मुलं विलक्षण समंजसपणे वागतात. सगळ्यांनी मिळून झोपड्या बांधण्याची सुरवात करणे, लांबून जाणाऱ्या जहाजांना आपला पत्ता लागावा म्हणून शेकोटी करून धूर करणे, अशी त्यांची धडपड सुरु होते. होता होता या मुलांमध्ये काही सामाजिक संस्था उदयाला येतात. राल्फ नेता म्हणून निवडला जातो.  शंख वाजवताच सगळ्यांनी गोळा व्हायचं असं ठरतं. सभेमध्ये ज्याच्या हाती शंख त्यांनीच फक्त बोलायचं, असंही ठरतं. पण अगदी झपाट्यानं ही सामाजिक जाणीव ओहोटीला लागते. शेकोटी पेटवायचा प्रयत्न करतात, तर त्यातून वणवाच पेटतो! त्या वणव्याच्या झळीत एक लहान मूल गायब होऊन जाते, पण याबद्दल विशेष कुणालाच काही वाटत नाही.

हळूहळू या मुलांच्यात  दोन गट पडतात. जॅक हा अतिशय आक्रमक स्वभावाचा मुलगा. तो खरं तर शाळेच्या समूहगानवृंदाचा मुख्य असतो. म्हणजे कला, सौंदर्य, संगीत याचे किमान भान असते त्याला. पण निर्जन बेटावर, मोठ्यांच्या देखरेखीशिवाय, हळूहळू त्याच्यातला हैवान जागा होतो. शिकार करणे हीच त्याच्या जीवनाची इतीकर्तव्यता ठरते. त्यासाठी तो इतरांनाही उद्युक्त करतो. समूह निर्माण होताच वैयक्तिक विवेक संपतो आणि येशूची आळवणी करण्यात माहीर असलेले जॅक आणि त्याचे मित्र अधिकाधिक हिंस्त्र बनत जातात. पुढे जंगलात आपण सहज दिसू नये म्हणून ही मुलं चेहऱ्याला रंग लावतात, अधिकाधिक आक्रमक, अधिकाधिक क्रूर, अधिकाधिक रानटी, अधिकाधिक पाशवी आणि अधिकाधिक होयबा बनत जातात. या साऱ्या समूहाचं लष्करीकरण होत जाते. आपपरभाव टिपेला पोहोचतो. बेटावरच्या एका माचीवर बालेकिल्ला थाटला जातो. तिथे  परका कोणी आला तर थेट त्याच्यावर ढकलता येईल अशा शिळा रचल्या जातात.

या समुहाविरुद्ध उभे ठाकतात राल्फ आणि पिग्गी. पिग्गी हा समाजातल्या विचारशील पण ताकदहीन आणि म्हणून बेदखल वर्गाचे प्रतिनिधित्व करतो.  त्याला भला मोठा चष्मा आहे. दमा आहे. त्यामुळे शारीरिक कष्ट आणि याचं अगदी थेट वाकडं आहे. तो स्वतःला फार शिष्ट समजतो असे जॅकला वाटतं. त्याला तो मुळीच आवडत नाही. त्याची आणि पिग्गीची सतत बोलाचाली होत राहते. पण आपला मुद्दा लावून धरण्यात, पटवून देण्यात आणि प्रसंगी मुद्द्यासाठी भांडण्यात पिग्गी तरबेज आहे. इतका की आपल्या बुद्धिमत्तेचा आणि मुत्सद्देगिरीचा वापर तो आपल्या पापाच्या समर्थनार्थही अगदी लीलया करतो.

एक प्रसंग तर अगदी अंगावर काटा आणणारा आहे.  या निर्मनुष्य जंगलामध्ये भुतेखेते, राक्षस आणि मोठी श्वापदे लपलेली आहेअशी भीती सगळ्याच मुलांच्या मनामध्ये असते. या भीतीला खतपाणी घालणाऱ्या घटनाही घडत राहतात. एकदा होतं असं, की कुठले तरी विमान पाडलं जातं आणि त्याच्या पायलटचे पॅराशुटला लटकलेलं प्रेत त्या बेटावर येऊन अडकते. ते अशा पद्धतीने अडकते की वाऱ्याबरोबर पॅरॅशूट फुलताच ते प्रेत खडकामागून उभे राहून डोकवायला लागते. वारा पडताच ते प्रेत दिसेनासे होते. मांस झडलेले, माशांनी वेढलेले ते प्रेत म्हणजे कोणी श्वापद आहे, अशी त्या मुलांची खात्रीच पटते. साऱ्यांची जाम टरकते. 

सायमन नावाचा एक मुलगा मात्र सर्वांहूनी निराळा असतो. त्याला फिट येण्याचा त्रास असतो. मधूनच तो एकटाच डोंगरावर जात असतो. अशाच एका एकलकोंड्या भटकंतीदरम्यान त्याला श्वापदाचे रहस्य गवसते. तो त्या पॅराशुटच्या दोऱ्या  सोडवतो आणि ते प्रेत  दूर कुठेतरी समुद्रात जाऊन पडते.

श्वापदाच्या रूपाने माणसाच्या मनातली आदीम भीतीच गोल्डिंगनी  आपल्यासमोर मांडली आहे. या भीतीचे व्यवस्थापनदेखील जगभरची माणसं, जगभरच्या संस्कृती काही विशिष्ट तऱ्हेने करतात. अज्ञात श्वापद, त्याच्यापाशी असलेल्या सत्-असत् शक्ती, मग त्याची करुणा भाकणे, वेळोवेळी जयजयकार करणे, त्याच्यासाठी रिंगण धरणे, ताल धरणे, समूहनृत्य, समूहगान, प्रार्थना, नैवेद्य असे सगळे विधी आणि कर्मकांडे हळूहळू त्या बेटावरच्या बालसमाजात उत्क्रांत होत जातात. ‘जंगलीला ठार करा, त्याचे नरडे चिरा, जंगलीचे रक्त सांडा!’ अशी मंत्रावर्तने घुमत रहातात. रानडुकराच्या शिकारीनंतर डुकराचे शीर, श्वापदाचा हिस्सा म्हणून काठीवर टोचून ठेवले जाते. समाजामध्ये देवकल्पनेची  आणि धर्माचरणाची उत्क्रांती कशी झाली हेच जणू गोल्डिंग आपल्याला सुचवत राहतो.

सायमनला जेव्हा श्वापदाबाबतचे सत्य समजतं तेव्हा तो मोठ्या उत्साहाने बाकी साऱ्यांना हे सांगण्यासाठी म्हणून धावत सुटतो. पण बाकी सगळे भलत्याच खेळात मग्न असतात. त्यांना शिकार साधलेली असते. त्यांनी शेकोटी केलेली असते. मांस भाजले जात असते आणि ते होईपर्यंत वेळ जावा म्हणून शेकोटीभोवती  शिकारीचा खेळ मांडलेला असतो. एक जण डुक्कर म्हणून केकाटत, रिंगणात, गोलगोल फिरत असतो, तर इतर सारे जण काठ्यांचे भाले नाचवत, त्याची लुटूपटीची शिकार करत असतात. सायमन काय ओरडतोय, तो काय सांगतोय यात कोणालाच रस नसतो. बेभानपणे आरडत-ओरडत येणारा सायमन म्हणजे जणू श्वापद आहे आणि आता त्याला रिंगणात घेतलं पाहिजे, असं ती मुलं आपापसात ठरवतात. सायमन येतो. श्वापदाचे रहस्य सांगू पाहतो. पण रिंगण रणाऱ्यांना रहस्यभेद नकोच असतो. त्यांच्या दृष्टीने आता शिकारीचा खेळ महत्त्वाचा असतो. ‘जंगलीला ठार करा, त्याचे नरडे चिरा, जंगलीचे रक्त सांडा!’ असा गजर होतो.  क्षणात सायमनला श्वापद म्हणून रिंगणात घेतलं जातं, त्याच्यावर काठ्या पडतात आणि कुठला तरी घाव वर्मी बसून सायमनचा मृत्यू होतो! प्रचंड वादळी पाऊस सुरू होतो. सगळे पांगतात. उधाणलेला समुद्र सायमनचे प्रेत पोटात घेतो. सायमनच्या असण्यानसण्याचा, त्याच्या सत्याप्रतीच्या असोशीचा, आता मागमूसही उरत नाही.

सायमनचा मृत्यू झालाय हे सगळ्यांना माहीत असतं. पण उघडपणे कोणीच तसं बोलत नाही. आपण कसे लांब उभे होतो, कसा अंधार होता, चष्म्याची एकच काच शिल्लक असल्यामुळे आपल्याला अंधुकच कसं दिसतं, आपण कसं काही पाहिलंच नाही; वगैरे पिग्गी हिरीरीने सांगत रहातो. समाजातले विचारवंत, बुद्धिवंत, तत्वचिंतक म्हटले जाणारे, ऐन वेळेला कशी कच खातात याचे हे ढळढळीत उदाहरण.

पुढे जॅक विरुद्ध राल्फ अशी दुफळी माजते. हळूहळू जॅकचा  वरचष्मा निर्माण होतो. त्याच्या बालेकिल्ल्यावर यायचं असेल तर एक निमुळती वाट तेवढी असते. या वाटेवरून कोणी यायचं, कोणी जायचं, यासाठी चौक्यापहारे बसवले जातात.  हळूहळू जॅकच्या समूहाचं लष्करीकरण आणि रानटीकरण पूर्ण होतं. पिग्गीचा चष्मा पळवला जातो. आता तो जवळपास आंधळा झाला आहे. जॅकशी चर्चा करायला, चार समजुतीच्या गोष्टी सांगायला, समेट साधायला, मोठ्या उमेदीने शंख उराशी धरून, पिग्गी बालेकिल्ल्यावर जाऊ पाहतो. अतिशय निर्दयपणे वरून प्रचंड शिळा ढकलून त्याचा खून करण्यात येतो! पिग्गीच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या होतात आणि शंखाच्याही.  आत्तापर्यंत शंख म्हणजे सत्तेचं, अधिकाराचं आणि जबाबदारीचं प्रतिक. सुरवातीला शंखध्वनीनेच तर सगळे गोळा झालेले असतात. पिग्गीबरोबर शंखाचा अंत म्हणजे साऱ्या शहाणीवेचा अंत.

आता गोष्टी वेगळ्याच थराला जातात. जॅक विरुद्ध राल्फ असा उभा संघर्ष सुरु होतो. याला काही विशिष्ठ, जबरदस्त कारण असतं, असंही नाही. निव्वळ टोकाचा  आपपरभाव.  सारी मुले जॅकच्या पक्षात ओढली जातात.  त्यातल्या त्यात सॅम आणि एरिक या जुळ्या भावांची जोडगळी राल्फला मदत करू पाहते. पण समूहाच्या धारदार नजरेपुढे त्यांचेही प्रयत्न तोकडे पडतात.  जॅक आणि त्याची टोळी आता राल्फच्या  पुरते विरुद्ध गेले आहेत. त्याचा संपूर्ण बिमोड केल्याशिवाय त्यांना चैन नाही. आपापल्या काठ्यांना चांगल्या अणकुचीदार बनवत ते दुसऱ्या दिवशीची तयारी करत असतात.  दुसऱ्या दिवशी शिकार ठरते. पण डुकराची नाही, राल्फची!

सॅम आणि एरिक राल्फला सावध करतात. तो लपून बसतो पण त्याला शोधून काढण्यात येतं. तो प्रतिकार करतो, पण तो ज्या जाळीत लपून बसलेला असतो तीच पेटवून देण्यात येते. खोकत खोकत तो बाहेर येतो. सैरावैरा पळायला लागतो. पाहता पाहता हा जाळ वणवा होऊन सारे बेट वेढून घेतो. प्रचंड मोठ्या ज्वाला उठतात. सगळं बेटच धडधडून पेटतं.  पुढे राल्फ आणि त्याच्या मागावर इतर सर्व मुलं असा पाठलाग सुरु होतो.  सत्तास्पर्धेतला जीवघेणा संघर्ष आता सुरू झालेला असतो. डोंगरावरून उड्या मारत, झपाट्याने राल्फ पुळणीवरती येतो आणि संपूर्ण शक्तीपात झाल्यामुळे धाडकन तिथेच कोसळतो.

तितक्यात, कोणीतरी समोर आहे असं वाटून तो मान वर करून बघतो, तर पांढऱ्या शुभ्र वर्दीतील एक नौसेनाधिकारी त्याच्यासमोर उभा. तो अधिकारी  त्याला मोठ्या प्रेमाने आधार देतो. इतक्यात पाठलाग तिथे पोहोचतो. सारी मुले स्तब्ध होतात. नौसेनाधिकारी चक्रावून जातो. ‘हा काय प्रकार आहे? तुम्हीच ना ती बेटावरती एकाकी पडलेली ब्रिटिश मुलं? तुमच्याकडून यापेक्षा चांगल्या वर्तनाची अपेक्षा होती!  हे काय चालवले आहे तुम्ही? शिकार शिकार खेळताय का? मजा आली असेल ना तुम्हाला? निळंशार आकाश, निवळशंख  पाण्याचे झरे, धमाल केलेली दिसते तुम्ही!!’

‘पण काय रे, ह्या शिकारीच्या खेळात कोणी बळी बळी नाही ना पडले?’

‘पडले ना, दोघे!’

राल्फला आता रडू कोसळते. तो हमसून हमसून रडायला लागतो. आता इतरही मुलं रडायला लागतात. साऱ्यांची निरागसता, साऱ्यांचे बाल्य जणू होरपळून गेलेले असते आणि हा त्याचाच शोक असतो.

पुन्हा एकदा सवयीच्या जगाशी मुलांची गाठ पडते आणि कादंबरी संपते.

कोणत्याही चांगल्या कलाकृतीची असते तशीच अनेकार्थता हे या कादंबरीचे सगळ्यात मोठे  वैशिष्ठ्य. नियंत्रण ठेवणारा कोणी नसेल तर मुलं कशी बिघडू शकतात हे या कादंबरीतून दिसतं. आदिम समाजाची जडणघडण आणि उत्क्रांती या कादंबरीत दिसते.

डुकराचे शीर काठीवरती टोचून श्वापदासाठी नैवेद्य म्हणून ठेवलेलं असतं. त्याच्या भोवती माशाच माशा घोंघावत असतात. ते शीर म्हणजे ‘माशांचा स्वामी’, लॉर्ड ऑफ द फ्लाईज! लॉर्ड ऑफ द फ्लाईज ह्याचा एक अर्थ, सैतान असा सुद्धा होतो.  फिटच्या एका झटक्यात सायमनचा आणि त्या शिराचा संवाद होतो. ते शीर सायमनला सांगते, ‘माझ्यापासून तुझी सुटका नाही. कुठेही गेलास तरी मी आहेच!’ जणू आदीम  प्रेरणांपासून, सैतानी भावनांपासून, अदृष्ट शक्तींपासून  माणसाची सुटका नाही असंलेखकाला सुचवायचं आहे.  त्यामुळे कादंबरीचे शीर्षक ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ (माशांचा स्वामी), असं आहे.

गोल्डिंग हा तर कसलेला कथाकार आहे. संपूर्ण कादंबरी तृतीय पुरुषी निवेदनातून उलगडत जाते. प्रत्यक्ष पात्रांना काय वाटते याचे वर्णन त्यांच्या शब्दात येत नाही. पात्रांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून आपल्यापर्यंत निवेदक ते पोहोचवत राहतो. सगळीच पात्र पौगंडावस्थेतील. काही अगदी लहान. तेंव्हा त्यांच्या शब्दात सारं नेमकेपणानी मांडण्यावर मर्यादा आल्या असत्या.

छोट्या छोट्या प्रसंगातून गोल्डिंग अनेक बारकावे आपल्यापुढे उभे करतो. सुरवातीला खोड्या काढतानाही लहानग्यांना इजा होणार नाही अशा बेतानी मोठी मुले खोड्या काढतात. पण एकूण सगळीच पात्र, ही अगदी काही तासापर्यंत मोठ्यांच्या आज्ञेत राहणारी, त्यांच्याशी आदराने वागणारी, सांगेल ते ऐकणारी, अशी आदर्श शालेय मुलं असतात. पण ही बंधने अचानक गळून पडतात आणि मग त्या मुलांमध्ये सैतानच जागा होतो. डुक्कर अगदी टप्प्यात येउनही वर्मी घाव घालण्याची हिंमत जॅकला, सुरवातीला, होत नाही. त्याच्यावरचे संस्कार अजूनही त्याला पुरते हिंस्त्र बनू देत नाहीत.  पण पुढे काही दिवसातच तो या धुवटपणावर विजय मिळवतो आणि बेलाशक शिकार करू लागतो. अगदी खूनाचा कटही रचतो!

सुरुवातीला हाच जॅक नेता म्हणूनसुद्धा निवडून आलेला नसतो. पण हळूहळू शिकारीवर त्याचा हात बसतो आणि त्या जोरावर तो संपूर्ण टोळीवर आपलं नियंत्रण राखायला लागतो. त्याला आता शिकारीची चटकच लागते. वर्चस्व गाजवण्याचे साधन म्हणजे शिकार हे त्याला कळून चुकते. सुरवातीला, सर्वांसमक्ष मोठ्या मानभावीपणे, तो शेकोटी सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारतो पण शिकारीच्या नादात शेकोटी सांभाळणाऱ्या मुलांनाच आपल्या साथीला घेतो. शेकोटी विझते आणि नेमकी त्याचवेळी एक बोट त्या बेटाच्या अगदी जवळून जाते. सुटकेची शक्यता जॅकच्या बेजबाबदारपणामुळे मावळते. राल्फ आणि जॅक मध्ये संघर्षाची ठिणगी पडते. प्राधान्य कशाला याबद्दल दोघांच्या कल्पना अगदी भिन्न असतात. चिल्यापिल्यांची  काळजी, निवारा, शेकोटी, धूर, सुटका या राल्फच्या भावना असतात; तर शिकार, वर्चस्व, बेधडक जगणे, प्राप्त परिस्थितीत तगून रहाणे अशा जॅकच्या.

श्वापदापासून पासून आपण सावध राहायला पाहिजे असा पावित्रा राल्फ घेतो, तर, ‘दिसूदेच तर श्वापद,  मी त्याच्याशी दोन हात करायला तयार आहे, आपणच त्याची शिकार करू’; असा अतिशय आक्रमक आत्मविश्वास जॅक सगळ्यांच्या मनामध्ये जागवतो. पण हा काहीसा आंधळा विश्वास जॅकला अचानक समूहप्रियता मिळवून देतो आणि या बेभरवश्याच्या वचनावर जॅक नेता म्हणून उच्चपदी पोहचतो. जनतेला भुलवायला खोटी का असेना, पण आश्वासने लागतात असे गोल्डिंग दाखवून देतो.  

शेकोटी हे देखील एक अतिशय सशक्त असं रूपक आहे. मूळ समाजाकडे परतण्याची ओढ या आगीतून धगधगत रहाते.  सुटका व्हावी म्हणून या शेकोटीची कल्पना येते. पिग्गीच्या मोठ्या भिंगाच्या चष्म्यामुळे शेकोटी प्रज्वलित होते. पण पहिल्याच शेकोटीची मोठी होळीच पेटते. त्यात एक मूल जातं. अक्राळ शक्तीवर नियंत्रण सहजसाध्य नसतंच. हळूहळू या शेकोटीवर त्यांना नियंत्रण मिळवता येतं. पण तरी देखील सर्वात शेवटी जवळपास सगळ्या बेटालाच वणवा लागतो. शेकोटी आणि धूर हवा म्हणणाऱ्या, राल्फचा जीव जायची वेळ येते आणि या प्रचंड, अकल्पित,  राक्षसी आगीतून निर्माण झालेल्या धुरामुळे या मुलांची सुटका होते.

सुटका करतो तो एक नौदल अधिकारी!  म्हणजे पुन्हा एकदा हिंसेकडून हिंसेकडे असाच प्रवास सुरू राहतो. युद्धानी सुरु झालेली कादंबरी, त्यातली रानटी बनलेली मुलं, त्यांची सुटका होते ती देखील एका युद्धनौकेकडून! कादंबरीतील अनेक विरोधाभासांपैकी हा अगदी मनात खोल रुतून बसतो.

श्वापद आणि त्याचं प्रत्यक्षात नसणे हे प्रतीकही अतिशय विचार प्रवृत्त करणारे आहे. देव दानवा नरे निर्मिले हे मत लोकां कवळू दया, असं लेखक सांगू पहातो.

पिग्गीचा चष्मा हे देखील एक उत्कृष्ठ  रूपक आहे. चष्म्याशिवाय या विचारवंत पिढीला आसपासच्या जगाची मुळी कल्पनाच येत नाही. चष्मा हे जणू विज्ञानाचं, सदसद्विवेकाचं प्रतिक आहे.  मुलांच्या मारामारीत आधी एक काच फुटते आणि पिग्गी निम्मा आंधळा होतो. या चष्म्यातूनच अग्नी निर्माण करणे शक्य असते. अग्नीवर नियंत्रण मिळवायचं तर चष्म्यावर नियंत्रण हवं. हे लक्षात घेऊन शेवटी तर जॅक चष्माच पळवून  नेतो  आणि पिग्गी पूर्ण आंधळा होतो.

या कलाकृतीवर, आर.एम. बाल्लान्टाईन यांच्या, कोरल आयलँड’ या कादंबरीचा ठसा आहे. राल्फ आणि जॅक ही नावेही त्यातीलच. या कादंबरीत राल्फ, जॅक आणि पीटरकिन ही तीन मुलं अपघाताने एका बेटावर अडकतात मात्र शहाण्यासारखं वागून ती आपले नायकत्व वारंवार सिद्ध करतात. त्या बेटावर रानटी लोक असतात. त्यातील काही ख्रिश्चन मिशनऱ्यांनी सुधारलेले  आहेत.  पण अजूनही बरेच रानटी आहेत. अगदी आपल्या देवाला प्रसन्न होण्यासाठी नरबळी देणारेही आहेत. मग अर्थातच आपल्या गौरवर्णाला आणि ‘उच्च ब्रिटीश कुळाला’ जागून ही मुलं सगळ्यांना सुधारतात वगैरे.

ही कथा वाचून गोल्डिंग यांना प्रश्न पडला, की खरंच जर मुलं अशी बेटावर अडकली तर ती अशीशहाण्यासारखे वागतील का? का लवकरच त्यांच्यातल्या पशुवृत्ती जागृत होतील? या प्रश्नाचा शोध म्हणजे ही कादंबरी. अधिकाधिक रानटी व्हायचे का अधिकाधिक समाजाभिमुख व्हायचे, हे द्वंद्व, दोन प्रमुख पात्रांच्याद्वारे इथे वारंवार उभे राहते. आप्पलपोटेपणा, दंभ, इथे ठायी ठायी दिसतो. सैतान आपल्यात आहेच, आपण उपजत रानटीच आहोत,  मात्र हे बीज अंकुरु द्यायचं की नाही एवढंच आपण ठरवू शकतो. ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’चे सार सांगायचे तर एवढेच.

प्रथमप्रसिद्धी

संवादसेतू

दिवाळी २०२२