Friday 31 December 2021

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग १ झंप्या, भुपी आणि गूगल आज्जी

 शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी भाग १

झंप्या, भुपी आणि गूगल आज्जी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
हॅलो दोस्त मंडळी,
हा झंप्या आणि ही, त्याची बहीण भुपी. दोघे शाळेत आहेत भुपी मोठी आहे. आहे सातवीत. झंप्या छोटा. तो आहे पाचवीत.
झंप्या आहे मोठा लाघवी आणि तरतरीत. त्याचे मोठ्ठे मोठ्ठे, डोळे तर सतत कुतुहलाने इकडे तिकडे बघत असतात. मोठ्या डोळ्यांसाठीच झंप्या फेमस आहे.
भुपी तशी इतर चार मुलींसारखी आहे. पण तिचे केस खूप लांब आहेत. ती लांब वेण्यांसाठी फेमस आहे. पण एरवी शांत आणि मितभाषी का काय म्हणतात तशी भुपी, झंप्याशी भांडताना एकदम वाघ आहे. सॉरी वाघीण आहे!
एकमेकाना चिडवणे हा दोघांचा मुख्य टाइमपास आहे आणि फावल्या वेळात काहीतरी खटाटोप करून बघणे हा उप-टाइमपास. आता हेच बघा ना, येणाऱ्या जाणाऱ्या कोणाही पाहुण्याने झंप्याला विचारले, ‘तू मोठा झाल्यावर काय होणार?’
यावर झंप्याचं वर्षानुवर्ष ठरलेले उत्तर आहे, ‘मी भुपीपेक्षा उंच होणार!!’
वर्षानुवर्ष हे उत्तर ऐकताच भुपी त्याला वेडावून दाखवते आणि दारामागे दोघांच्या उंचीच्या रेषा काढलेल्या आहेत त्याची आठवण करून देते.
दारामागे दोघे अगदी लहान असल्यापासूनच्या खुणा आहेत. दर दोन तीन महिन्यांनी दोघांचा ऊंची मोजण्याचा कार्यक्रम असतो. झंप्या, सध्या तब्बल सात सेंटीमीटरनी बुटका आहे. पण ते सध्या. झंप्याच्या भाषेत सांगायचं तर, ‘आगे आगे देखो होता है क्या!’
झंप्या बावळट असून त्याला यडा बनवणे कुणालाही शक्य आहे असा भुपीचा ठाम विश्वास आहे. तर भुपी चक्रम असून, आपणच हुशार आहोत असा झंप्याचा घट्ट समज आहे. एकदा असाच दोघांचा वाद झाला. शेवटी झंप्यानी भुपीला विचारलं, ‘सीनियर म्हणजे काय?’
‘मोठा!’
‘बरोबर, मग आता सांग तू दुसरीत होतीस तेंव्हा मी कितवीत होतो?
‘सीनियरला!’
‘बघ म्हणजे तू दुसरीत आणि मी सीनियरला!’ सीनियर, म्हणजे जणू कॉलेज असल्यासारखा आव आणत, झंप्या म्हणाला.
असं काही झालं की भुपी चिडते. त्याला जरा बदडते. पूर्वी बिचारा सारखा मार खायचा. पण आता त्याची पॉवर वाढली आहे. आता तो मार खात नाही. पूर्वी हा मार खायचा आणि भुपीनी ह्याचा फटका चुकवला, तर रडत रडत, ‘ती भुपी बघ ना, मला तिला मारू देत नाहीय्ये!’ अशी आजीकडे तक्रार करायचा.
आजी म्हणजे गूगल आजी. ही आजी या दोघांची अतिशय लाडकी आणि ही दोघं आजीची लाडकी. आईबाबा गावाकडे असतात. ही दोघं इथे शहरात रहातात. आजीबरोबर. शिक्षणासाठी. तिघांचं मेतकूट अगदी छान जमतं.
या दोघांना लाडाच्या वेगवेगळ्या नावानं हाका मारणं हा जणू आजीचा छंदच. भुपीला ती कधी पिल्लू म्हणते, कधी मनी म्हणते, कधी माऊ म्हणते तर कधी मनीमाऊचं पिल्लू म्हणते आणि झंप्याला चॉम्स, चॉकी, लाडू, बंब्या अशी अनेक नावं आहेत. मुळात झंप्या आणि भुपी हीसुद्धा लाडाचीच नावे आहेत. झकासचं झालंय झंप्या आणि भुदेवीचं झालंय भुपी.
खरंतर वर्गातल्या मित्रमैत्रीणींसमोर असल्या नावानं हाक मारणं दोघांना आता आवडत नाही. पण आजीला कोण सांगणार? झंप्यानी खूपच डोळे वाटरले तर आजी त्याला झकासराव म्हणते!
पण आजीचीच गेम आजीवर उलटवायची म्हणून दोघांनी मिळून आजीला, गूगल आजी, असं नाव ठेवलं आहे,!! पण ह्याला कारण आहे बरं. आजी एकदम स्मार्ट आहे. अगदी गूगल इतकी स्मार्ट. तिला वाट्टेल ते विचारा, तिच्याकडे उत्तर असतंच. गणित, विज्ञान, व्याकरण असं काहीही विचारलं तरी ती उत्तर देतेच. अगदी बरोबर उत्तर देते. देणारच. ती शास्त्रज्ञ होती. डॉक्टर होती पण नंतर माणसाच्या गुणसुत्रांवर तिनी खूप संशोधन केले होते. त्यासाठी ती जग फिरली होती. तिच्या लॅबमध्ये तिनी माकडे पाळली होती. त्यातल्या माकडांची नावे होती, चॉम्स, चॉकी, लाडू आणि बंब्या! आणि माकडीणींची नावे होती, मनी, माऊ आणि पिल्लू!!
आजही ती रोज काहीतरी वाचत असते. इंटरनेटवर बसत असते. तिच्या परदेशी मित्रांचे फोन येतात तिला. त्यांच्याशी फाडफाड इंग्लिश बोलते ती. इंग्लिशमधून जोक मारते आणि स्वतःही खोखो हसते.
जोकची तर आजीला भारी आवड. आजी फनी आहे. अगदी तूफान फनी. आता कालचंच बघा ना. झोपताना झंप्यानी आजीकडे गोष्टीसाठी हट्ट धरला. साधीसुधी नाही, भुताची गोष्ट हवी असा हट्ट धरला. मग आजीनी गोष्ट सांगायला सुरुवात केली.
‘एक होतं भूत. एकदा त्याच्या मुलाची, म्हणजे बेबी भुताची बर्थडे पार्टी होती!’
बेबी भुताची बर्थडे पार्टी!! ह्या कल्पनेनीच झंप्याला इतकं हसू आलं की तो हसता हसता कॉटवरुन खाली पडला. कसला आवाज झाला म्हणून भुपी बघायला आली. भुताची बर्थडे पार्टी म्हटल्यावर तीही हसायला लागली.
आजी पुढे सांगू लागली, ‘थोड्याच वेळात सगळी भुतावळ जमली. माळरानावरची हडळ आली. तिनी केक आणला होता. पिपळावरचा मुंज्या पावभाजी घेऊन आला. पाण्यातली आसरा कोल्ड्रिंक घेऊन आली. पिशाच्च, वेताळ, सैतान, संमंध आणि खवीस असे एकाच गाडीतून आले. ब्रम्हराक्षसाची स्कूटर पंक्चर झाली म्हणून हाकामारी जाऊन त्याला आपल्याबरोबर घेऊन आली. बर्थ डे पार्टीत सगळ्यांनी हीsss धम्माल केली. भूतंच ती, त्यांनी भरपूर धुडगूस घातला. वेताळानी, राजा विक्रमादित्याची गोष्ट सांगितली. सैतानानी, देवादिकांच्या गोष्टी सांगून सगळ्यांना घाबरवून सोडलं. अगदी पाचावर धारण बसली सगळ्यांची. पिशाच्च, सैतान, संमंध आणि खवीस ह्यांचा हिपहॉप डान्स तर बेफाट झाला.’ आजीनी अगदी रंगवून रंगवून वर्णन केलं.
दोघेही आता पेंगुळले होते. आजी म्हणाली, ‘शेवटी सगळ्यांचा ग्रुप फोटो झाला. पण त्यात जरा गोचीच झाली.’
‘काय झालं?’, भुपी.
अगं फोटो मुळी कोराच आला. कोण्णीच नव्हतं त्यात.’
‘का बरं?’ भुपी.
‘अगं कसं असणार? भुतं मुळी नसतातच ना! मग फोटोत तरी कुठून येणार?’
आजीचे हे लॉजिक ऐकून दोघेही गार झाली. भुपी तर फिदीफिदी हसायला लागली. काय बोलावं हे कोणालाच सुचेना.
‘शेवटी खूप दुपार झाली म्हणून सगळे आपापल्या घरी गेले! झोपा बरं आता.’ आजीनी गोष्ट आवरती घेतली.
झंप्या चमकला.
‘दुपार झाली? म्हणजे पार्टी संध्याकाळी नव्हती?’ झंप्या.
‘भुतांना कुठला संध्याकाळी वेळ? रात्री तर सगळी भुतं बिझी! त्यामुळे त्यांच्या बर्थ डे पार्ट्या सगळ्या पहाटे!!’ आजी.
झंप्या आता पुरता बुचकळ्यात पडला होता. शेवटी म्हणाला,
‘काहीतरीच हां तुझं. भुताची गोष्ट तर सांगते मग म्हणते भुतं नसतात. मी सांगतो भुतं असतात. कित्ती लोकांना दिसल्येत. आमच्या शाळेत तर भूत पाहिलेली तीन मुलं आहेत.’
‘काही ठिकाणी तर भूत बंगले असतात. काही लोकं प्लॅंचेट करतात. ते कसं करतात मग?’ भुपी तावातावाने म्हणाली.
‘करू देत. भुतं नसतात, पण काही जणांना ती आहेत असं वाटतं. त्याची कारणे आहेत. सांगीन मी उदया. झोपा बरं!’
उद्या आजी काय सांगणार याचा विचार करत दोघं गाढ झोपून गेली.
पूर्वप्रसिद्धी
किशोर
जानेवारी २०२१

Tuesday 21 December 2021

अंग बाहेर येणे

अंग बाहेर येणे  
डॉ. शंतनू अभ्यंकर 

संसाराचा गाडा ओढून जीर्णशीर्ण झालेले आपले शरीराचे मुटकुळे घेऊन सुरकुतलेल्या आज्जी माझ्या पुढ्यात बसलेल्या असतात. 

‘काय होतंय?’ असं विचारताच त्या म्हणतात; ‘आता काय सांगायचं प्वोरा तुला; तू तर माझ्या नातवावाणी दिसतोयस, ग्वोरापान!’

माझं कौतुक मी सराईतपणे कानाआड करतो पण जे काही होतंय ते सांगणं आज्जींना जड जातंय एवढं मला समजतं. शेजारी बसलेला, पेन्शनीकडे झुकलेला, आज्जींचा लेक हळूच सांगतो, ‘तेsss अंग बाहेर येतंय म्हणतीए.’

मग आपोआपच माझ्या डोळ्यापुढे त्यांच्या घरी घडून गेला असणार असा प्रसंग येतो. बरीच वर्ष हे दुखणं आईनी अंगावर काढले असणार. मग नुकतेच ‘दूर देशीचे प्रौढ लेकरू’ गावी आलं असणार. माजघरातील मिणमिण उजेडात त्या वृद्ध काकणांनी आधी त्याला कुरवाळले असणार आणि मग जरा आडवळणाने आपली व्यथा सांगितली असणार. मग इतके दिवस न बोलल्याबद्दल आईने लेकाची बोलणी खाल्ली असणार. तरीही दवाखान्यात यायला का कू केली असणार. आता आज्जी इतक्या संकोचणार की तपासणीसाठी निजणार ते पदराने चेहरा झाकूनच!! हे सगळं दरवेळी तस्सच घडलेलं असतं आणि घडतं.  

अंग बाहेर येणे म्हणजे योनीमार्गातून आतले अवयव बाहेर डोकावणे. जसा खिसा उलटा बाहेर येतो तसं काहीतरी. सुरवातीला गर्भ पिशवीचे तोंड, मग थोडासा भाग (Uterine prolapse) आणि कधीकधी तर संपूर्ण गर्भपिशवी योनीमार्गाबाहेर सरकलेली आढळते (Procidentia). या गर्भ पिशवीच्या पुढे मूत्रमार्ग आणि मूत्राशय असते आणि मागे मलाशय असते. हे अवयव, गर्भपिशवी बरोबर, खाली उतरतात. अर्थात खाली उतरतात याचा अर्थ हे अवयव बाहेर डोळ्यांना दिसतात असं नाही. तर बाहेर आलेल्या योनीमार्गाच्या त्वचेखाली यांचे फुगवटे आहेत, हे लक्षात येतं.  

अंग बाहेर येणे हा वयस्कर स्त्रियांमध्ये आढळणारा प्रकार आहे. विशेषतः गरीब, ग्रामीण, वर्षानुवर्ष काबाडकष्ट करणाऱ्या, कुपोषित, बहुप्रसवा महिलांमध्ये हा जास्त प्रमाणात आढळतो. वयस्क, स्थूल महिला, बद्धकोष्ठता, सततचा खोकला अशा कारणेही अंग बाहेर येते. बरीच आणि पाठोपाठची बाळंतपणे, अवघड, वेळखाऊ, चिमटा/वाटी (Forceps/Ventouse) लावून वगैरे झालेली बाळंतपणे, मोठ्या आकाराची बाळे या साऱ्यामुळे कटी तळाच्या स्नायूंना इजा होते. ते अशक्त होतात आणि परिणामी अंग बाहेर येते. 

कधी कधी अगदी खात्यापित्या घरच्या स्त्रियांमध्ये किंवा तरुणींमध्ये देखील हा प्रकार आढळतो. अशावेळी मुळातील आधाराच्या दोऱ्याच सैल आणि अति लवचिक असल्याचा हा परिणाम असतो. काही वेळा पिशवी काढल्यावर देखील उरलेला योनीमार्ग असा उलटा बाहेर येतो. पण हे प्रकार क्वचित दिसतात तेंव्हा त्याबद्दल इथे इतकेच पुरे. 

गर्भपिशवी एखादा तंबू ठोकावा तशी कटीभागामध्ये ठोकलेली असते. तंबुला जशा तळाशी मध्यावर आणि माथ्याशी दोऱ्या लावून, तो ताणून धरलेला असतो, तशी गर्भपिशवीदेखील तळाशी, मध्यावर आणि माथ्याशी ताणून धरल्यासारखी असते. पैकी तळाच्या दोऱ्या आणि स्नायू बहुतेक भार वाहत असतात. मधल्या आणि वरच्या दोऱ्या या शोभेच्या मात्र. या तळाच्या दोऱ्या आणि/किंवा स्नायू सैल झाले की गर्भपिशवी आपली जागा सोडून कटी भागातून योनीमार्गात उतरते आणि कधीकधी पूर्ण बाहेर पडते. अशा महिलांना बरेच त्रास होतात. सतत कंबर दुखणे, चालताना, बसताना त्रास होणे, सतत जड जड किंवा ओढल्यासारखे वाटणे (उभ्याने काम केले की हा त्रास वाढतो. झोपून आराम वाटतो.), खाज, स्त्राव असे अनेक. अशा स्थितीत शरीरसंबंध सुखावह कसे रहातील? पण याबद्दल फारसं कोणी बोलत नाही. पेशंटही नाही आणि डॉक्टरही नाही. एकदा कटीतळाचा आधार लेचापेचा झाला की बाकीचे अवयवही जागा सोडून खाली सरकतात. त्यांच्याही पायाखालची जमीन सरकली म्हटल्यावर दुसरे काय होणार? मग मूत्रमार्ग खाली उतरला असेल (cystocele), तर लघवीवर नियंत्रण नसणे, वारंवार लघवीला इन्फेक्शन होणे, अंग आत ढकलल्याशिवाय लघवी न होणे, असे त्रास होतात. कधी कधी आतडी, मलाशय वगैरेही खाली उतरतात (Rectocele) आणि त्यांचेही फुगे दिसायला लागतात. 

अंग बाहेर येणे, हे किरकोळ असेल तर काही विशेष उपचार लागत नाहीत. वजन कमी करणे, खोकला, बद्धकोष्ठ यावर जरूर ते उपचार करणे, जड काम टाळणे, कटी तळाचे खास (केगेलचे) व्यायाम वगैरेचा कमी अधिक फायदा होतो. फायदा होतो म्हणजे बाहेर आलेले अंग आत जात नाही पण त्यापासूनचा त्रास मंदावतो. आतमध्ये बसवायची, गर्भपिशवी आतच राहील अशी योनीमार्गात ठेवायची प्लास्टिकची रिंग (Pessary) वगैरे प्रकार केले जातात. केले जातात म्हणण्यापेक्षा केले जायचे असे म्हणणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण याचा फारसा उपयोग होत नाही. रिंग घालणे, काढणे, स्वच्छ करणे, त्यातून कधी जखम उद्भवली तर निस्तरणे, सगळेच जरा कटकटीचे असते. त्यामुळे या त्रासावर अक्सीर इलाज म्हणजे ऑपरेशन करून घेणे. त्यामुळे त्रास असेल तर ऑपरेशनला पर्याय नाही. वयस्कर स्त्रीयांमध्ये गर्भ पिशवी काढून, इतर अवयव वरती ढकलून, योग्य जागी टांगले जातात. मूत्राशय, आतडी, मलाशय असे एकेक भाग नीट तपासून, पुन्हा मूळ स्थानी सरकवून, आवश्यक ती बांधबंदीस्ती करून, टाके घातले जातात. तरुण महिलांमध्ये, ज्यांना संततीची अपेक्षा आहे त्यांच्यामध्ये, गर्भपिशवी न काढता ती नुसतीच वर टांगण्याची शस्त्रक्रिया करता येते.  

नेमके कोणते अवयव, किती प्रमाणात बाहेर आले आहेत?, लघवीवर नियंत्रण सुटले आहे का?, पेशंट आयुष्याच्या आणि पुनरुत्पादनाच्या कोणत्या टप्प्यावर आहे?, या सगळ्या बाबी विचारात घेऊन शस्त्रक्रियेचे स्वरूप ठरवले जाते. सहसा योनीमार्गे, क्वचित पोट उघडून आणि आता काही प्रकारात दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. ऑपरेशनचा ताबडतोब आणि चांगला परिणाम होतो. सुमारे 20% पेशंट मध्ये काही वर्षानी, खरंतर काही दशकांनी, पुन्हा असा काही प्रकार उद्भवू शकतो. तो त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार दुरुस्त करावा लागतो. 

अंग बाहेर येणे हा प्रामुख्याने गरीबाघरचा आजार. कॉलेजमध्ये शिकताना अशा भरपूर केसेस बघायला मिळतात. डॉ. पुरंदरे, डॉ. शिरोडकर वगैरे भारतीय डॉक्टरांनी अशा या शस्त्रक्रियांच्या तंत्रात महत्वाची भर घातली आहे. त्यांच्या नावाने ओळखली जाणारी तंत्रे विख्यात आहेत. सर्जरी शिकताना सुरवातीपासून बिलरॉथ, हॅलस्टेड, वर्धाईम्स वगैरेंचा भारदस्त वावर असतो. अचानक पुरंदरे आणि शिरोडकर भेटतात आणि बरं वाटतं; दूर देशी कोणी गाववाला भेटावा तसं.

Friday 17 December 2021

रविंद्र मनन, रविंद्र वीणा आणि रविंद्र झंकार

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १७ डिसेंबर २०२१ 
पुष्प १४ 
आजचे पुस्तक क्रमांक (५)  (अ, ब आणि क)
पुस्तकाचे नाव 
*रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार*
(कविता)
लेखक काका कालेलकर 



रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार
डॉ. शंतनू अभ्यंकर 

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक आणि रसिक परंपरांचे प्रतिनिधी आहेत.  त्यांच्या गीतांजलीला  जागतिक वाङमयात विशेष स्थान आहे.  गीतांजलीतील प्रत्येक गीतात व्यक्त झालेल्या रवींद्रांच्या जीवन तत्वज्ञानाची उकल,  रवींद्र मनन, रवींद्र वीणा आणि रवींद्र झंकार या तीन पुस्तकातून  आचार्य कालेलकर यांनी आपल्या सोप्या शैलीत केली आहे.  प्रत्येक पुस्तकात मूळ बंगाली गीत, त्यातील भाव विशद करणारे मननीय चिंतन आणि कठीण बंगाली शब्दांचे अर्थ देण्यात आले आहेत. गीतांचे मराठी भाषांतर नाहीये.  

हे सर्व आपले कारावासातील साथी श्री. बिसेन यांच्या मदतीने कालेलकर यांनी केले आहे.  कारावास हा अशा पद्धतीने त्यांच्या आणि रसिक वाचकांच्या पथ्यावरच पडला म्हणायचा.  एकूण 157 गीतांपैकी 129 गीते इथे आहेत उरलेली 28 गीते राहिली ती राहिलीच. बहुतेक पुन्हा तुरुंगात टाकले असते तर जमले असते!! 

मला रवींद्र-गीतांचा आणि  रवींद्र-संगीताचा पहिला परिचय झाला तो शाळेत.  शाळेच्या सभागृहाबाहेर रवींद्रनाथांचा पूर्णाकृती पुतळा होता आणि शेजारी ‘व्हेअर द माइंड इज विदआऊट फियर’ ही त्यांची प्रसिद्ध  कविता लिहिलेली होती. ती आपोआप पाठच झाली. शाळेत चित्रकला आणि शिल्पकला शिकवण्यासाठी शांतिनिकेतनचे स्नातक असलेले, रवींद्र डे नावाचे, बंगाली बाबू शिकवायला होते.  त्यांनी आम्हाला शांतिनिकेतनची गोष्ट सांगितली.  चित्र आणि शिल्पकला तर त्यांना अवगत होतीच, पण सतार, तबला आणि गायनकलाही अवगत होती.  त्यांनी ‘चांडालिका’, ‘आम्रपाली’ अशी नृत्यनाट्ये बसवली. रवींद्रनाथांची अतिशय सुमधुर अशी गाणी आम्हाला शिकवली. ‘ओरे गृहबाशी’, ‘ए नहे मोर प्रार्थना’, ‘अंतर्मन विकसित कारो’, ‘एकला चालो रे’ ही गाणी चालींसकट आजही लक्षात आहेत. बंगाली भाषेवर आणि गीत-संगीतावर मी लट्टू झालो ते  तेंव्हापासून. पुढे पुलंचे, ‘रविंद्रनाथ: तीन व्याख्याने’, वाचलं आणि पुलंना पत्र लिहिले! मम भाग्य एवढे थोर की त्यांनी उत्तर दिलं. तो अक्षय अक्षरठेवा आजही मी जपून ठेवला आहे. 

त्यामुळे कालेलकरांची ही तिन्ही पुस्तकं दिसताच मी घेतली आणि कवितासंग्रह मुळीच वाचू नयेत, अशा पद्धतीने वाचली.  म्हणजेच सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचतच गेलो. तिथे  ‘अंतर्मन विकसित कारो’सारखी परिचित गीते भेटली आणि तिथेच  ‘सतार’ किंवा ‘ए नहे मोर प्रार्थना’सारख्या साक्षात्कारी कविता आपले तळपते वैभव दाखवत मनात रूजल्या.  

आजही एखाद्या आर्त किंवा कृतार्थ क्षणी  रवींद्रनाथांची एखादी ओळ मनात तरळून जाते आणि जणू दीपोत्सव सुरू होतो. अतिशय तरल, अतिशय भावगर्भ, अर्थपूर्ण, प्रासादिक, रसाळ आणि गेय रचना हे रवींद्रनाथांच्या काव्याचे वैशिष्ठ्य. 

शिवाय बंगाली आणि मराठीमध्ये बरेच साधर्म्य आहे. कालेलकरांची टिप्पणीही रसग्रहण म्हणावे अशी आहे.   त्यामुळे थोडा प्रयत्न करताच अर्थाचा बराच उलगडा होतो.  काहीवेळा अर्थाचा अनर्थही होतो.  ‘भीषण किंवा दारुण सुंदर’ म्हणजे ‘खूप सुंदर’; ‘बोका’ म्हणजे ‘वेडा’, असे काही अनर्थकारी शब्द. 

रवींद्रनाथ हे खरे आनंदयात्री कवी.  शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध याद्वारे या सृष्टीचैतन्याचा आस्वाद मोठ्या रसिकतेने घ्यावा, उगाच संसार असार आहे अशा निरीच्छ,  नकारात्मक दृष्टिकोनापेक्षा हे जीवन हे तर सौंदर्याचे आणि आनंदाचे निधान आहे; हा त्यांचा दृष्टिकोन. त्यांच्या ‘सतार’ या गीताचा, मीच केलेला स्वैर मराठी अनुवाद इथे देतो आहे. मूळ बंगाली गीताच्या गद्य रसास्वादावर आधारलेला हा मराठी पद्यावतार आहे. तेंव्हा वाचकांपैकी जाणकारांनी ह्यातील गोच्या जरूर लक्षात आणून द्याव्यात आणि हे गौडबंगाल आणखी उलगडावे.  


सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll 

दिवसाचा सरला मेळा 
मैफिलीच्या झाल्या वेळा 
मांडेल ‘तो’च  स्वरखेळा  
साथ द्यायला तुझी सतार
 
सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

उघड तुझे तू सताड दार
अवकाशाचा घे अंधार 
सप्तलोकीची शांती अपार 
भुवना भरु दे अपरंपार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

विसर जुन्या सूरांचे सार,
तमी दे अर्पून गीत, असार 
विसर होती तुझी जुनी सतार 
छेडी नव्याने नवे हत्यार 

सोडवी आता जुनी सतार 
घडव नव्याने तुझे हत्यार (वाद्य) 
तारा नूतन, कर झंकार llधृll

यातील रविंद्रनाथांनी केलेली प्रार्थना तर प्रतिभेची आणि सच्च्या आळवणीची परिसीमा आहे. तुझी मदत मला नकोय, कीव, करुणा,  दया, बक्षीस; काही काही नकोय.  मला स्वतःला सबळ करायचे आहे. एवढं साधेल असं तू बघ; अशी जगावेगळी मागणी टागोर करतात. क्षणभर असं वाटतं की रविंद्रनाथांचा हा सांगाती,  ‘बोट धरोनीया चालविशी’ असा नाहीये. उलट रविंद्रनाथच  त्याला बोट धरून चालवत आहेत;  आपल्याला काय हवं ते दाखवताहेत.    

ए नहे मोर प्रार्थना/ही न माझी प्रार्थना 

विपत्तीमध्ये तू माझं रक्षण कर ही माझी प्रार्थना नाही
विपत्तीमध्ये मी भयभीत होऊ नये एवढीच माझी इच्छा
माझ्या दुःखी व्यथित मनाचे तू सांत्वन कर अशी माझी अपेक्षा नाही 
दुःखावर मला विजय मिळवता यावा एवढीच माझी इच्छा
माझ्या मदतीला कोणी आलं नाही तरी माझी तक्रार नाही
माझं मोडून पडू नये एवढीच माझी इच्छा 
माझी फसवणूक झाली तर तू मला सावरावस अशी माझी अपेक्षा नाही 
माझं मन खंबीर रहावं एवढीच माझी इच्छा 
माझं तारण तू करावस ही माझी प्रार्थना नाही 
तरुन  जाण्याचं सामर्थ्य माझ्यात असावं एवढीच माझी इच्छा 
माझं ओझं हलकं करुन तू माझं सांत्वन केलं नाहीस तरी माझी तक्रार नाही 
ते ओझं वाहायची शक्ती मात्र माझ्यात असावी एवढीच माझी इच्छा 
सुखाच्या दिवसांत नतमस्तक होऊन मी तुझा चेहरा ओळखून काढीनच 
मात्र दुःखाच्या रात्री सारं जग जेव्हा माझी फसवणूक करेल तेव्हा तुझ्या विषयी माझ्या मनात शंका निर्माण होऊ नये एवढीच माझी इच्छा
भावानुवादकर्ता (मला तरी) अज्ञात 

कॉलेजमध्ये असताना ही कविता माझ्या टेबलासमोर लावलेली होती. कॉलेज संपलं. मित्रांची पांगापांग चालली होती. रूममधल्या माझ्या सख्ख्या मित्राने माझी आठवण म्हणून कवितेचा कागद ठेऊन घेतला. आजही तो त्याच्या टेबलवर विराजमान आहे. 
परवा एका पेशंटनी त्याला विचारलं, ‘ही कविता तुम्ही कुठून मिळवली?’ मग त्यानी कवितेची  गोष्ट सांगितली. 
तो पेशंट म्हणतो कसा, ‘ओह, शांतानू, आमी ताके कोबिता सीखीयेची! (त्याला मीच शिकवली ही कविता!)’ 
आणि कवितेमुळे माझे लाडके सर, रवींद्र डे,  मला पुन्हा भेटले.

मी अल्बर्ट एलिस

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनक १८ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ६
पुष्प १४ 
पुस्तकाचे नाव 
मी अल्बर्ट एलिस  
लेखक अंजली जोशी 
शब्द प्रकाशन 
पाने ३४०  
किंमत रू ३९०/-  

परिचयकर्ता डॉ शंतनु अभ्यंकर

 ‘मी अल्बर्ट एलिस’, हे डॉ. अंजली जोशी यांनी लिहिलेलं मराठीतील एक महत्त्वाचे पुस्तक आहे.  ही एक  चरित्रात्मक कादंबरी आहे.  
डॉ. अल्बर्ट एलिस हे  अमेरिकन मानसोपचारतज्ञ. हे औषध देणारे डॉक्टर नव्हेत. हे सल्ला देणारे डॉक्टर.  विवेकनिष्ठ मानसोपचार शास्त्र ही त्यांची देणगी.  या कादंबरीतून अल्बर्ट एलिस यांचे व्यक्तिमत्त्व, विचार आणि कार्य कसे विकसित होत गेले  याची तोंडओळख आपल्याला होते.
आजवर आपण बरीच  स्वमदत पुस्तके वाचली असतील.  ती वाचून आपण काही दिवस भारावूनही गेला असाल आणि पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असेही झाले असेल. 
प्रचंड प्रेरित होऊन आपण माळ्यावरून कॅनव्हासचे बूट काढले असतील आणि महिन्याभरात ते आल्यापावली माळ्यावर गेले असतील किंवा एखाद्या अपमानाने खट्टू होऊन तुम्ही वर्षानुवर्ष कुढत बसला असाल किंवा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर या रिपूंशी दोन हात करता  करता  तुम्ही थकत किंवा वहावत किंवा  बहकत गेला असाल. ‘लोक काय म्हणतील’ नावाच्या पिशाच्च-भयापोटी तुम्ही कितीतरी इच्छा आकांक्षा मारल्या असतील किंवा अनिच्छेने लोकानुनयाचा मार्ग धरला असेल. सगळं कळतंय पण वळत नाही, अशी अवस्था तर कितीतरी वेळा कितीतरी बाबतीत झाली असेल....      
पण या साऱ्यावर उतारा  म्हणून हे पुस्तक नाही बरं. अल्बर्ट एलिस यांची ही चरित्रात्मक कादंबरी म्हणजे सेल्फहेल्प  पुस्तक नाही.  पण आपला जीवन विषयक दृष्टिकोन बदलण्याची क्षमता या पुस्तकांमध्ये आहे.  
एखाद्या प्रसंगाकडे आपण कसे पाहतो, आल्या प्रसंगाला  आपण कसा प्रतिसाद देतो, यावर सगळं काही अवलंबून आहे; हा अल्बर्ट एलिस यांचा प्रमुख सिद्धांत. 
तत्क्षणी, जणू प्रतीक्षिप्त, म्हणून होणारी प्रतीक्रिया ही बरेचदा चुकीची आणि नंतर पश्चाताप पावायला लावणारी असते. डॅनियल काहनमननी लिहिलेल्या ‘थिंकिंग फास्ट अँड स्लो’ मध्ये या विचारासाठी शास्त्रीय पुष्टी सादर केली आहे. या प्रतिसादावर आपण नियंत्रण मिळवू शकलो, सर्वात विवेकी, सुलभ, सुकर (आणि फायदेशीर) प्रतिसाद निवडण्याची सवय आपण लावून घेऊ  शकलो तर आपलं जीवन आनंदी होईल, असं त्यांचं सांगणं.  

हे शिकण्याची पद्धत म्हणजे विवेकनिष्ठ विचारपद्धती आणि हे वापरण्याचे तंत्र म्हणजे   विवेकनिष्ठ मानसोपचार. वेड्यांइतकीच  शहाण्यांसाठीही  ही विचार-वाट आहे. आपले आपणच यातून शिकत जायचं, सुधारत जायचं आहे. अनेक पर्यायांपैकी योग्य पर्याय कोणता, हे निवडण्याचा आधार म्हणजे विवेकनिष्ठ विचार.  ही संपूर्ण कल्पना अल्बर्ट एलिस यांना सुचली कशी, त्यांनी ती प्रत्यक्षात अंमलात आणली कशी, त्यावरचे अभ्यास केले कसे आणि स्वतःच्या आयुष्यात बदल घडवले कसे; हे या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळते. 

• परिस्थितीचे विवेकी मूल्यमापन, 
• नव्या संदर्भात परिस्थितीचे आकलन, 
• हास्य आणि विडंबन रसाचा वापर, 
• बागुलबुवांना थेट सामोरे जाणे आणि 
• अतार्किक विचारांना खुले आव्हान देणे 
अशी पंचतंत्रे डॉक्टरांनी सांगितली आहेत. कादंबरीच्या माध्यमातून ह्या तंत्रांच्या उत्क्रांतीचा अंदाज येतो. 

अल्बर्ट एलिस यांना काही आजारांमुळे लहानपणापासूनच भरपूर पथ्ये पाळावी लागत होती. मैदानी खेळ बंद, सलग वाचन बंद. असं झाल्यावर त्यांनीही स्वतःला तो जगप्रसिद्ध प्रश्न विचारला; *मीच का?*
  
पण ह्या प्रश्नाला कुरवाळत रडण्यापेक्षा त्यांनी या, अविवेकी प्रश्नाला मनातून हद्दपार कसं करायचे याचे तंत्र शोधून काढले. अडचणी आणि निराशा  त्यांच्याही पदरी आली. पण आपल्या विचारांना योग्य वळणावर आणण्यासाठी त्यांनी चार संदेश सूत्रे तयार केली होती.
१) काही मिळवायचे असेल तर श्रमाला पर्याय नाही.
२) प्रतिकूल परिस्थिती हे आपल्याला मिळालेले वरदान आहे.
३) अपरिवर्तनीय परिस्थितीबाबत ऊर पिटून घेण्यापेक्षा तिचा स्वीकार योग्य.
४) हे ही दिवस जातील. 
(अर्थात हे सांगायला एलीस कशाला हवा? ‘कष्टेवीण फळ नाही’, ‘आपत्ती हीच प्रगतीची संधी’, ‘तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे’  आणि ‘हे ही दिवस जातील’; ही ज्ञान मौक्तिके तर रिक्षाच्या मागे लिहिलेली असतात!)

पण हे सारं शहाणपण सुसूत्रपणे मांडण्याचं काम एलीस यांनी केलं. त्याला अभ्यासाची जोड देण्याचं काम त्यांनी केलं. परस्पर विसंगत पर्यायातून निरक्षिर विवेक करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले.  प्रत्यक्ष व्यवहारात, उपचारात याचा तंत्रशुद्ध उपयोग त्यांनी केला. ही त्यांची महती.  
हे पुस्तक वाचून प्रेरित होणे आणि डॉ. अल्बर्ट एलीस यांचे अन्य लिखाण अभ्यासणे (जे  फारसे मराठीत उपलब्ध नाही),  त्यांची विचारधारा समजावून घेणे आणि शक्यतर अंगी बाणवणे ही पुस्तकाची महती.

Wednesday 15 December 2021

चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान

आम्ही पुस्तकप्रेमी 
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल 
आठवडा १४ 
दिनांक १६ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक ४  

पुस्तकाचे नाव 
*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान*
(प्रबंध) 
लेखक सदाशिव आठवले 
प्राज्ञपाठशाळा, वाई. 
पाने ९८  
प्रथमावृत्ती १९५८, 
तिसरी आवृत्ती १९९०; किंमत रू १००/- 

*चार्वाक इतिहास आणि तत्वज्ञान 
परिचयकर्ता डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई*

चार्वाक हे नाव आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. या नावाचा संबंध बुद्धीप्रामाण्यवादाशी  आहे अशी ओझरती माहिती असते आपल्याला. चार्वाक, लोकायत किंवा बाहर्स्पत्य तत्वज्ञान म्हणून ही विचारधारा प्रसिद्ध आहे.  
चार्वाक दर्शनाचा, म्हणजेच तत्वज्ञानाचा थोडक्यात आढावा घेणारे पुस्तक म्हणजे, ‘चार्वाक इतिहास आणि तत्त्वज्ञान’.  

प्राज्ञपाठशाळेची बरीच प्रकाशने  गाजली. पण त्यातलं हे आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी लिहिलेले ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ विशेष गाजले.  

या पुस्तकामध्ये नऊ प्रकरण आहेत.   सुरुवातीला विषय प्रवेश मग चार्वाकाची  सूत्रे आणि त्यांचा ऐतिहासिक मागोवा लेखकानी घेतलेला आहे.  मग चार्वाकवाद नेमका काय आहे याचं वर्णन केलेले आहे.  

फक्त प्रत्यक्षप्रमाण हेच प्रमाण मानणारे असे हे चार्वाकवादी  लोक होते.  वेद अपौरुषेय नाहीत, त्यात केवळ पूर्वजांनी रचलेल्या कविकल्पना आहेत;  मोक्ष, पुनर्जन्म, स्वर्ग-नरक या कल्पनांपेक्षा आजूबाजूच्या जगाचा सुखदुःखासहीत स्वीकार करणे हे अधिक श्रेयस्कर आहे, अशी त्यांची मांडणी आहे. मोक्ष मिळावा म्हणून आहे त्या आयुष्यात स्व-पीडन  करून घेणे; साधनसामुग्रीची, संसाधनांची नासधूस करणे; जीवनाकडे सतत निराश आणि नकारात्मक दृष्टीने पाहणे; हे जीवन केवळ माया  असून सर्वस्वी  दुःखमय आहे, संसार असार आहे, वगैरे वगैरे भ्रम सतत उराशी कुरवाळत बसणे या सगळ्यावर चार्वाकांनी कठोर टीका केली आहे. 

चार्वाक नामे कोणी एकच  ऋषी किंवा मुनी  नव्हता असं दिसतं.  चार्वाकांनी लिहिलेले  एकसंघ असे लिखाण, ग्रंथ,  इतिहासाच्या पोटात लुप्त झाले आहेत. कदाचित असा एखादा ग्रंथ त्यांनी निर्माण केलाही  असेल.  पण सातत्याने आणि सगळीकडूनच विरोध असल्यामुळे असा ग्रंथ इतिहासाच्या पोटात गडप झाला असण्याची शक्यता जास्त आहे. 
चार्वाक दर्शन असा ग्रंथच उपलब्ध नसल्यामुळे,  चार्वाकांचे नेमके विचार काय होते, हे आपल्याला त्यांच्या विरोधातल्या लिखाणातून कळतं.  भारतीय तत्वज्ञान परंपरेत पूर्वपक्ष-उत्तरपक्ष अशा पद्धतीने विचार मांडण्याची, मंडन-खंडनाची पद्धत होती.  त्यामुळे चार्वाकांच्या टीकाकारांनी पूर्वपक्षांमध्ये, ‘चार्वाक असे असे म्हणतो’ अशी मांडणी केलेली दिसते आणि मग ते मत  खोडून काढण्यासाठी उत्तरपक्ष लिहिलेला दिसतो. अशा पद्धतीने अप्रत्यक्षरीत्या आपल्याला चार्वाकांचे विचार समजावून घ्यावे लागतात.  

खरंतर वेद नाकारणाऱ्या  तीन विचारधारा इतिहासात दिसतात. चार्वाक, बौद्ध आणि जैन.  बौद्ध आणि जैनांनी वेद नाकारले तरी पुनर्जन्म, स्वर्ग-नरक वगैरे कल्पना ते बाळगून होते.  जे प्रत्यक्ष आहे तेवढेच प्रमाण असं मानणारे फक्त चार्वाकच. 

 सृष्टीबद्दल कुतूहल तर दोन्ही पक्षांना होतं, पण विज्ञान कल्पनेचा शोध लागण्याआधी, स्वर्ग-नरक ‘आहे’ आणि ‘नाही’ हे दोन्ही युक्तिवाद तितकेच पोकळ होते.  अर्थात त्याकाळी आसपास काय घडते, कसे घडते, हे समजण्यासाठी पंचेंद्रिय हीच मर्यादीत साधने  माणसाकडे होती.  आता आपल्या डोळ्यांना दुर्बिणी आणि सूक्ष्म दर्शक फुटले आहेत,  कानांना रडार फुटले आहेत. असे करता करता आपल्या पंचेंद्रियांना एरवी  गोचर नाही, अशी सूक्ष्म आणि महा सृष्टी आपला मेंदू आता कवेत घेऊ शकतो. माणसाच्या आकलनाची क्षितिजं कितीतरी विस्तारली आहेत. त्यामुळे तेंव्हापेक्षा शब्दप्रामाण्य नाकारणे, अतिनैसर्गिक कारणमीमांसा नाकारणे,   हा  आता, कितीतरी सबळ, घडीव, ठाशीव आणि ठोस युक्तिवाद आहे. 

हा विस्तार झाला तो काही ठाम ग्रह आणि  आग्रह उराशी   बाळगल्यामुळे. ह्यातले काही येणेप्रमाणे.. 
• हे विश्व भौतिक आहे. 
• ते मानवी जाणिवेच्या बाहेर स्वतंत्रपणे अस्तित्वात आहे. ही माया नाही.  
• याचे स्वरूप आपल्याला समजावून घेता येतं. 
• कोणत्याही बाह्य, परस्थ, अतींद्रिय, दैवी शक्तीशिवाय आसपासच्या सृष्टीचा अर्थ लावणे शक्य आहे.  
• त्रिकालाबाधित सत्य असे काही नसते. 

असा विश्वास उराशी बाळगून आजचे विज्ञान काम करते.

 चार्वाकांनी अशासारखाच काही विश्वास मर्मबंधातली ठेव जपावी तसा जपला.  पण त्यांची विचारधारा होऊ शकली नाही. चार्वाक कुठल्या राजसत्तेवर, समाजावर फार प्रभाव पाडू शकले  नाहीत  आणि आता तर केवळ सावली पाहून आपण मूळ विचारांचा अंदाज बांधू शकतो. 

पाखंडी विचारांना थेट देहदंड सांगणारे कितीतरी धर्म आहेत. पण काळाच्या ओघात इतके पाखंडी विचार हिंदूभूमीत  दर्शन म्हणून टिकले; नेस्तनाबूत झाले पण नष्ट नाही झाले; खंडन करण्यायोग्य वाटल्याने का होईना, उद्धृत केले गेले; हे आक्रितच म्हणायचे. हिंदू म्हणजे जगण्याची समृद्ध अडगळ आहे म्हणे,   त्यातील समृद्धी हीच असावी बहुतेक. ‘अत्त दीप भव’, असं सांगणाऱ्या बुद्धाचाही अवतार करणाऱ्या या संस्कृतीने ‘चार्वाकावतार’ कसा  मानला नाही हेच नवल वाटतं मला.  

म्हणूनच हे पुस्तक सर्वांनी वाचावं;  तुम्ही आस्तिक असा वा नास्तिक असा वा अज्ञेयवादी असा.  समविचारी असाल तर प्रगल्भ होण्यासाठी आणि विरोधी असाल तर शत्रूचे डावपेच लक्षात घेण्यासाठी, हे वाचलेच पाहिजे.

‘प्रत्यक्ष हेच प्रमाण’ हे विचार बीज पुढे युरोपात फोफावलं आणि प्रबोधन युग सुरू झालं. १६६० साली; म्हणजे पन्हाळ्याहून सुटकेच्या साली बरं का; स्थापन झालेल्या, त्या जगप्रसिद्ध रॉयल सोसायटीचं बोधवाक्यच मुळी ‘नलीस इन व्हर्बा’ असं आहे. म्हणजे शब्दप्रामाण्य नाकारा. कुणाचा  शब्द हे महत्वाचे  नसून रोकडा  पुरावा हवा. 
कल्पना करा हे ‘नलिस इन व्हर्बा’चं बीज चार्वाक-काळीच इथे रुजलं असतं तर? तर प्रबोधन युग इथे अवतरलं असतं आणि ते सुद्धा काही शतके आधी!

वाडा चिरेबंदी आणि दायाद वारसा वाडा त्रयीचा

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

उत्तम मध्यम

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ

*आम्ही पुस्तकप्रेमी*
पुस्तकपरिचय अभियान 
सात दिवस सात पुस्तके 
वाचाल तर वाचाल   

आठवडा १४                
दिनांक -  १३ डिसेंबर २०२१ 
आजचे पुस्तक क्रमांक  
पुप्ष. १४ (१)       
पुस्तकाचे नाव - *हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ*     
 *कादंबरी* 
लेखक: *भालचंद्र नेमाडे*
 किंमत  रू. ६५० /-
प्रकाशन --- पॉप्युलर प्रकाशन 
आवृत्ती  ---   पहिली (२०१०)      
पृष्ठ संख्या :  ६०५
परिचय कर्ता - डॉ. शंतनु अभ्यंकर
हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ 
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

विशाल कालपटावर बेतलेल्या कादंबऱ्या मला विशेष आवडतात.  हजारो वर्षापूर्वी सुरू होणारे  कथानक, पिढ्या पिढ्या ओलांडत पुढे चालत येतं आणि समकालीन होतं; हे मोठं  अचंबित करणारं  असतं. ही किमया आणि कारागिरी त्या लेखकाची. हजारो वर्षापूर्वीचे काल्पनिक जग आपल्या डोळ्यापुढे उभं करणं, हे म्हटलं तर सोपं  आहे.  कारण त्याकाळी नेमकं काय आणि कसं घडलं किंवा घडलं असतं याबद्दल तुम्हाला कोणीच चॅलेंज करू शकत नाही.  सगळा कल्पनेचा खेळ.  पण अशा कादंबऱ्यांमध्ये नुसती कल्पनारम्यता नसते.  अशा उत्तम कादंबऱ्यात हजारो वर्षापूर्वीचे जीवन, नातेसंबंध आणि ताणतणाव यांचा प्रभाव, आजही आपल्या जीवनावर कसा आहे, हे मोठ्या खुबीने दाखवलेलं असतं.  इतकंच काय, पण माणूस या भू गोलावर कुठेही  असला, तरी इथून तिथून सारखाच; हाही निष्कर्ष लिखाणाच्या ओघात आपल्याला प्रतीत होतो.  प्राचीन माणसाचे   वागणे मग समकालीन वाटायला लागतं आणि आजचं आपलं वागणं आदिम वाटायला लागतं! अशी भावनिक आणि मानसिक अदलाबदल हादेखील अशा प्रकारच्या कादंबऱ्यांचा एक महत्त्वाचा मानदंड.  
इथला नायक तर पुरातत्त्ववेत्ता. त्याला निव्वळ मढी उकरायची नाहीत तर जाणिवांचा मागोवा घ्यायचा आहे. हे भलतेच महत्वाकांक्षी काम आहे. म्हणूनच विशाल काळपट निवडला आहे. अनेक कथा उपकथा गुंफल्या आहेत. तरीही विण घट्ट आहे.

अशा सगळ्या कसांवर खरी उतरणारी ही कादंबरी. भालचंद्र नेमाडे यांची,  ‘हिंदू, जगण्याची समृद्ध अडगळ’.  तब्बल ६०५ पानांची ही कादंबरी, मोहेंजोदारोच्या काळापासून सुरू होते ती आजच्या काळात संपते. 

खंडेराव हा पुरातत्त्ववेत्ता मोहेंजोदारोला उत्खननात गुंतलेला असतो आणि वडील गेल्याची माहिती त्याला तिथे मिळते.  वडील इकडे, मोरगावला, खानदेशात. ते पारंपारिक शेतीवाडीत गुंतलेले हा पाकिस्तानातून निघतो आणि मजल दरमजल करत गावी पोहोचतो.  मोहेंजोदारोशी लागेबांधे असलेला हा नायक आपल्याला मोहेंजोदारोपासून मोरगावपर्यंतचा, तेंव्हापासून आजवरचा, संस्कृतीचा प्रवासही  घडवतो.

खंडेरावचे पूर्वज, त्या पूर्वजांचे पूर्वज, असा एक स्तिमित करणारा विस्तीर्ण पट आपल्यापुढे उलगडत जातो आणि संस्कृती ही काय चीज आहे याबद्दलची आपली समजून विस्तारत जाते.  भाषा, रितीरिवाज, कपडेलत्ते, गाणी बजावणी, म्हणी वाक्प्रचार, खाणेपिणे, व्यवसाय धंदे आणि यातलं मान्यअमान्य, चालेल- न चालेल, पथ्यापथ्य याबद्दलच्या विविध कल्पना; यांचं मनोहारी दर्शन लेखक घडवतो.  ही जुनी संस्कृती कधी माणसांच्या मानेवर जोखड म्हणून समोर येते तर कधी अभिमानानं मिरवायचा  रत्नहार म्हणून समोर येते.  
या कादंबरीतली बहुतेक पात्र, विशेषतः स्त्रिया, आपल्या इच्छेविरुद्ध, संस्कृतीच्या दबावाखाली वागतात आणि जगतात. चकलीच्या सोऱ्याच्या दबावामुळे पिठाची जशी नक्षीदार चकली होते; तसंच हे. सोऱ्याचा दाब नाकारलात तर तुम्ही निव्वळ पिठाचा (लोळा)गोळा  ठरता. दाब स्वीकारलात की तुमचे स्वातंत्र्य जाते.  एकसाचीपणा येतो. ही इथल्या पात्रांची अडचण आहे. साऱ्या मानवतेचीच ही अडचण आहे. ही प्रभावीपणे मांडली आहे. म्हणून ही कादंबरी महान आहे.  

या संस्कृतीचा त्या पात्रांना अभिमान आहे.  या संस्कृतीचा त्यांना फायदाही आहे.  पण त्याच बरोबर या समृद्ध संस्कृतीत  आता अडगळ झालेलं  खूप काही आहे.  पण घर म्हटलं की तिथे अडगळ ही  असणारच.  ठेवताही  येत नाही आणि टाकताही  येत नाही, अशी ही  अडचण. त्यामुळेच कादंबरीच्या नावातच या अडगळीला लेखकाने ‘समृद्ध अडगळ’ असं सार्थ नाव दिलेले आहे.  

खंडेरावच्या वडिलांच्या अंत्ययात्रेशी  कादंबरी संपते आणि आपण आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा, विचार करायला लागतो. कितीही नाकारले तरी हे भूत तुमच्या मानगुटीवरून जाम  उतरत नाही. रिचर्ड डॉकिन्ससारखा कट्टर नास्तिकही स्वतःला सांस्कृतिक(दृष्ट्या) ख्रिश्चन म्हणवून घेतो ते काही उगीच नाही. मी वाराणशीला गेलो होतो.  गेलो होतो ते गायनॅक कॉन्फरन्ससाठी.  इतका भरगच्च कार्यक्रम होता की  मान वर करून इकडे तिकडे बघायला अजिबात वेळ नव्हता.  शेवटच्या दिवशी कसाबसा एक तास काढला आणि गंगेच्या घाटावर जाऊन त्या पाण्याला स्पर्श करून आलो.  कधीतरी, कधीकाळी, कुणी आपले बापजादे मजल-दरमजल करत इथवर आले असतील. या पाण्याच्या स्पर्शाने त्यांना कृतार्थ वाटलं असेल. त्यातले काही कधी परत घरीही पोहोचले नसतील.   ही भावना मनात ओथंबुन आली आणि नास्तिक पण सांस्कृतिक(दृष्ट्या) हिंदू मी,  संस्कृतीच्या या समृद्ध अडगळीचं  ओझं वागवत, परत कृष्णाकाठी परतलो.

Friday 26 November 2021

नरनिवृत्ती

 

 

नरनिवृत्ती

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

९८२२०१०३४९

 

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन. महिला दिनाचे हे नर रूप. बालदिन बालांसाठी आणि फादर्स डे फादरांसाठी. पण जे बालही नाहीत आणि फादरही नाहीत अशा पुरूषांचे काय? असा विचार या मागे होता. त्रिनीदादच्या जेरोम तिलकसिंग यांनी १९९९ पासून हा जरा जोमाने सुरू केला.  १९ नोव्हेंबरच का? तर हा ह्या जेरोम तिलकसिंग यांच्या वडिलांचा वाढदिवस म्हणून! आणि हो, १९८९ साली, याच दिवशी, त्यांच्या देशाच्या फुटबॉल टीमच्या वर्ल्ड कपसाठीच्या निवडीमुळे  सारा देश एकवटला होता!! दिवसाची निवड ही अशी तद्दन पुरुषी निकषांवर आणि  पुरुषसुलभ गांभीर्याने   झालेली आहे.  आता हा  पुरुष दिनाचा संसर्ग पसरू लागला आहे. उत्सवी भारतीयांच्या ‘दिन दिन दिवाळीत’ आणखी एका उत्सवाची भर.

या वर्षी स्त्रीपुरुष सौहार्द अशी थीम आहे. सौहार्द म्हणजे मैत्रभाव वाढायचा तर समानधर्मा भेटायला हवा. स्त्रीधर्म(!) आणि पुरुषधर्म यात साम्यस्थळे शोधायला हवीत. म्हणून हा लेखन प्रपंच.

मेनोपॉज म्हणजे काय हे सर्वज्ञात आहे. सर्वश्रुत तरी आहेच आहे. ते नाही का, वाढत्या वयात बायकांची पाळी जाते मग त्यांना काय काय व्हायला लागतं. भर थंडीत घाम फुटण्यापासून ते अंगभर गरम वाफा जाणवण्यापर्यंत किंवा नैराश्यापासून ते डोके फिरण्यापर्यंत! ह्याचं मुख्य कारण स्त्रीबीजग्रंथीतून होणारा स्त्रीरसांचा (Female sex hormones) निर्झर आटणे आणि मुख्य परिणाम म्हणजे जनन क्षमता संपणे.

पुरुषांचेही वय वाढते. पुरुषरस  निवळतात. पण जनन क्षमता अचानक संपत बिंपत  नाही. थोडी मंदावते. पण अखेरपर्यंत  तेवत रहाते.  म्हणूनच जराजर्जर पुरुष बाप झाल्याच्या बातम्या, आपल्याला अधूनमधून वाचायला मिळतात.  एरवीही स्त्रीबीज निर्मिती महिन्यातून एकदा, तर पुरुषबीज निर्मिती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. शनिवारी हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी वगैरे भानगड नाही.

पण वय  वाढल्यावर, पुरुषरस (Androgens) निवळल्यावर; पुरुषांना नाही का काही त्रास होत? होतो ना. वय वाढलं की पुरुषांत देखील अनेक बदल दिसायला लागतात. शारीरिक आणि बौद्धिक थकवा, नैराश्य, चिडचिडेपणा, विस्मरण, स्नायू रोडावणे, पोट सुटणे, केस विरळ होणे, कामेच्छा कमी होणे, ताठरता मिळमिळीत होणे वगैरे. लिंगवैदूंच्या जाहिरातीच्या भाषेत सांगायचं तर,   ‘पूर्वीचा जोम आणि जोश’ आता रहात नाही. कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच हे अनुभव येत असले तरी सुमारे २ ते ५ % पुरुषांत त्रासदायक प्रमाणात ही लक्षणे दिसतात.  

बायकांचे एक बरं  आहे, पाळी बंद होणे, हे ऋतूनिवृत्तीचे वय झाल्याचे, एक व्यवच्छेदक लक्षण आहे.  एक पूर्णविराम.  पुरुषांच्यामध्ये असा पूर्णविराम आढळत नाही.  स्वल्पविराम, अर्धविराम, उद्गारवाचक चिन्ह, मधूनच प्रश्नचिन्ह असं करत करत वाक्य जारी  रहातं.  ते संपतच नाही.  

पण महिलांमध्ये जसा मेनोपॉज (ऋतूनिवृत्ती) तसा पुरुषांमध्ये  अँड्रॉपॉज (नरनिवृत्ती) असतो का? किंवा का असू नये? किंवा असणारच की! अशी चर्चा सतत चालू असते. पण अँड्रॉपॉजची नेमकी आणि सर्वमान्य व्याख्या अजूनही नाही. मुळात अँड्रॉपॉज असा शब्द वापरावा; का त्याला अन्य काही नाव द्यावं, हेही अजून ठरलेले नाही. काहींच्या मते तर  अँड्रॉपॉज हा शब्द निव्वळ मेनोपॉजला  खुन्नस म्हणून काढला आहे! तर काही म्हणतात, मेनोपॉजच्या मानानी अँड्रॉपॉज हा अघळपघळ प्रकार असल्याने त्याकडे फारसे गांभीर्याने कुणी पहातच नाही. गरीब बिच्चाऱ्या पुरुषांना कुढत कुढत, मन मारून जगावं लागतं.

जे बदल होतात ते वयानुरूप होतात?, वाढत्या स्ट्रेसमुळे होतात?, जाडगुलेपणामुळे होतात?, का सोबतच्या डायबिटीसमुळे?, का  इतर  औषधांमुळे? का फक्त आणि फक्त नरनिवृत्तीमुळे आहेत? हा गुंता अजून सुटलेला नाही.

बरचसं पुरुषत्व  टेस्टोस्टेरोन ह्या पुरुषरसाशी निगडीत असतं. टेस्टोस्टेरॉनचा उगम वृषणामधल्या (Testes) लेडीग  पेशींमधला.   वयाबरोबर या कमी होतात. यांना मेंदूकडून येणारे प्रोत्साहनपर संदेश कमी होतात. ह्या संदेशांना प्रतिसाद अशक्त होतो. त्यामुळे टेस्टोस्टेरोन  कमी निर्माण होतो. इतकंच काय,  वयाबरोबर शरीराकडून  टेस्टोस्टेरोनला मिळणारा प्रतिसादही कमी कमी  होत जातो. शरीरसुद्धा, आज वेड्या पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, असं काहीतरी म्हणत असतं.

टेस्टोस्टेरोन  बद्ध (९८%)  आणि मुक्त (२%) अशा दोन्ही अवस्थांत आढळतो. पैकी बद्ध तो निरुपयोगी.  मुक्त तेवढा उपयोगी.  हा मुक्त टेस्टोस्टेरॉन आणि त्याची इतर काही कार्यप्रवण (जैवोपलब्ध Bioavailable)  रूपे  महत्वाची  आहेत.  वयाबरोबर मुक्त टेस्टोस्टेरोनमध्ये वार्षिक १% घट होत रहाते. काही औषधांचा सहपरिणाम म्हणून आणि   वाढत्या वयाशी संबंधित निरनिराळ्या आजारांमध्येही  मुक्त टेस्टोस्टेरोन कमी होतो. पैकी आटोकाट प्रयत्नाने’ आवर्जून आटोक्यात ठेवावा असा घटक म्हणजे, पोटाचा वाढत घेर.

पण अमुक इतक्या प्रमाणात टेस्टोस्टेरोन घटलं  म्हणून तमुक लक्षणे उद्भवली असा एकास एक परिणाम इथे दिसत नाही. त्यामुळे नेमकं संशोधनही जिकिरीचे आहे.

जर का टेस्टोस्टेरॉनच्या कमतरतेमुळे इतकं  सगळं  होत असेल तर ती कमतरता भरून काढणारी तारुण्याची  गुटिका असायला हवी. पण प्रामाणिकपणे सांगायचं तर, नरनिवृत्तीच्या  तक्रारी घेऊन येणाऱ्या, प्रत्येक पुरुषाला सहजपणे हातावर टेकवता येईल, अशी गुटिका नाहीये.  ज्यांचं  अगदीच अडलं  आहे अशांना प्रायोगिक तत्त्वावर, साधक-बाधक विचार करून, टेस्टोस्टेरोन देता येतं.  थेट टेस्टोस्टेरोनच्या गोळ्या विशेष उपयोगी पडत नाहीत.  गोळीतले टेस्टोस्टेरोन शरीरात पोचायच्या आधी लिव्हरमध्ये खाल्लास केले जाते. असं होऊ नये म्हणून काही खास प्रकार वापरावे लागतात. इंजेक्शन,  जेल आणि पॅच (चिकटपट्टी) अशा स्वरूपामध्येही  हे उपलब्ध आहे. पण या साऱ्याच्या सुयोग्य डोसबाबत  आणि सुयोग्य कालावधीबाबत  अजूनही संदिग्धता आहे. आधी ते  काही कालावधी पुरतं देऊन, त्यानंतर त्याचे परिणाम आणि सहरिणाम पहात पहात, आवश्यकतेनुसार ते चालू ठेवायचे आहे. उदाहरणार्थ  प्रोस्टेट वाढणे आणि प्रोस्टेटचा   कॅन्सर देखील टेस्टोस्टेरोनशी संबंधित असतो.  त्यामुळे टेस्टोस्टेरोन द्यायचं झालं तर पीएसए आणि इतर तपासण्या करून दमादमाने द्यावे लागते.

टेस्टोस्टेरॉनमुळे चरबीचं प्रमाण कमी होतं,  हिमोग्लोबिन वाढतं (कधी जरा जास्तच वाढतं), स्नायू जरा पिळदार होतात, काही महिने औषधे घेतली तर हाडांची घनताही वाढल्याचे आढळते. एकूणच बरं वाटायला लागतं. कामेच्छासुद्धा वाढते.  पण काम-गिरी  मात्र पूर्ववत होईल असं नाही.  कारण ती बिघडण्यासाठी इतरही अनेक कारणं असतात (डायबेटीस, तंबाखू वगैरे). गरजेनुसार या बरोबर ते जगप्रसिद्ध  व्हायग्राही देता येते.

टेस्टोस्टेरॉनचे असे अनेक इच्छित परिणाम दिसत असले तरी त्याने ईप्सित साध्य होतं का, म्हणजे नरनिवृत्ती सुखावह होते का? ते सरसकट सगळ्यांना द्यावे का? हे प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. यासाठीचा पुरावा तसा लेचापेचा आहे.

थोडक्यात नरनिवृत्ती असतेही आणि नसतेही, त्याला उपचार आहेतही आणि नाहीतही.  मुळात बायकांचे सगळेच गहन आणि गूढ असतं असा समज आहे.  पण पुरुषांची ‘ही’ भानगड अजून भल्याभल्यांना उलगडलेली  नाही.

स्त्री पुरुष सौहार्दासाठी एवढे साम्य सध्या रगड.

जागतिक पुरुष दिनाच्या शुभेच्छा.

 

प्रथम प्रसिद्धी

लोकरंग पुरवणी लोकसत्ता

२७/११/२०२१

 

 

 

Monday 1 November 2021

राधिकासांत्वनम्

 

राधिकासांत्वनम्

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

तंजावरचं मराठी राज्य म्हणजे एक वेगळंच रसायन. इथे मराठी भाषिक राजे, तमिळ भाषिक प्रजेवर राज्य करत होते आणि राज्य व्यवहाराची भाषा होती तेलगू. ह्या असल्या संस्कृती  संकरातून काही निराळेच साहित्य-कला–नृत्य-नाट्य जन्माला आलं.

राजे प्रतापसिंह  (राज्यकाळ १७३०-१७६३) स्वतः काव्य शास्त्र विनोदात रमणारे. कृष्ण मंजिरी, उमा संहिता, पारिजात नाटक  इत्यादि कलाकृतींचे कर्ते. त्यांचा दरबारात  दूरदूरच्या साहित्यिकांची  आणि कलाकारांची  गजबज. छिन्नैया, पोंनीया, शिवनंदम आणि वादिवेळू  हे बंधु ह्या दरबारातले मानकरी. यांनी  कर्नाटक संगीताचा आणि भरतनाट्यमचा पाया रचला.

पण तंजावरची प्रसिद्धी कलांइतकीच कलावंतिणींसाठीही होती. देवदासी, देवरंडीयल, कलावती, गुडिसानी, भोगदासी, नगरशोभिनी, राजगणिका    अशी, काही आज आपल्याला धक्कादायक वाटतील अशी, नावं होती. एक समृद्ध, अभिमानानी मिरवली जाणारी परंपरा होती.  ह्या स्त्रिया ‘शैय्येशू रंभा’ तर होत्याच पण त्यातल्या बऱ्याच   चौदा विद्या  आणि चौसष्ठ कलांमध्ये पारंगत होत्या. ह्या गणिकांनाही  पत  होती, प्रतिष्ठा होती. जमीनी, वर्षासने होती. एकूणच कोणत्याही मंदिराची अथवा राजमंदीराची पत-प्रतिष्ठा तिथे असलेल्या नगरवधूंवर ठरायची. 

तर अशा ह्या काळात राजे प्रतापसिंहांची भोगपत्नी होती; मुद्दूपलनी (१७३०-९०). अनुपम सुंदर, बुद्धिमान, हजरजबाबी, चतुरबुद्धी आणि शृंगारनिपुण अशी ही नारी; बहुभाषा कोविद होती. सात ओळींची, सप्तपदी  अशी स्वतंत्र काव्य रचणारी होती.

तर अशा या मुद्दूपलनीची एक रचना आहे, राधिकासांत्वनम्.

इथे सांत्वन म्हणजे मऱ्हाठी सांत्वन नाही. हे तेलुगू सांत्वन. सांत्वन म्हणजे रुसवा काढणे. अतिशय शृंगारिक, भावनाप्रधान, बिनधास्त  आणि प्रसंगी अश्लील म्हणावं असं हे काव्य आहे. अर्थात श्लिलाश्लिलतेच्या कल्पना कालसापेक्ष असतात. राधा-कृष्ण आणि इलाची  गोष्ट सांगतासांगता ती राजे राजवाड्यांच्या अंतःपुराचीच नाही,  तर स्त्रियांच्या अंत:करणाचीही दारे सताड उघडून दाखवते.

या काव्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत.  मुख्य म्हणजे हे एका स्त्रीने लिहिलेले आहे. ही कवयत्री कोणी उच्चकुलीन, उच्चभ्रू,  विदुषी नाही तर चक्क एक गणिका आहे.  आपल्या विहित  कामात ती माहीर आहे.  तिने केलेल्या कामक्रीडेचा वर्णनावरून हे अगदी सहज स्पष्ट होतं.  स्वतःबद्दल तिला अभिमान आहे. सोबत  विलक्षण आत्मविश्वास आहे आणि आश्चर्यचकित करणारा मोकळेपणाने आहे.  कुठलाही आडपडदा न ठेवता, जे सांगायचे ते थेटपणे सांगण्याची तिची धमक आहे.

मराठीमध्ये कोण्या स्त्रीने, इतकं शृंगारीक लिहिलेले माझ्यातरी माहितीत नाही. अठराव्या शतकात नाही, एकोणिसाव्या, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातही नाही. अश्लीलता  हा प्रांत पुरुषांचा.  अर्थात याचा अर्थ स्त्रियांनी तसे लिहिलंच नसेल, लिहीतच नसतील किंवा लिहिणारच नाहीत असं नाही. बहुतेकदा हे लिखाण, इतरही  साऱ्या भावभावनांच्या  आणि कलांच्या आविष्काराबरोबर, काळाच्या उदरात गडप झालेले असणार.

राधा-कृष्णाच्या कथेने भल्याभल्यांना मोहात पाडले आहे.  पण राधाकृष्णाची बहुतेक   प्रेमकाव्ये  कितीही  सुंदर, कितीही  उत्तान, शृंगारिक आणि कामूक वर्णनांनी परीप्लुत असली  तरी अखेरीस राधाकृष्णाचे  मिलन म्हणजे; पुरुष आणि प्रकृतीचे मिलन,  जीवाशिवाची भेट, आत्म्याचे परमात्म्याशी मिलन,   असा काहीतरी शेवट करून एकदम अध्यात्मिक होऊन जातात.  मुद्दूपलनी असला गुळमुळीतपणा अजिबात करत नाही.  कृष्ण आणि राधा, कृष्ण आणि या काव्यातील प्रेमत्रिकोणाचा तिसरा कोन, इला,  यांचे नाते अगदी जमिनीवरचे, मानवी, शारीर आणि जैविक आहे, असा तिचा अखेरपर्यंतचा सूर आहे.  ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा प्रकार तिने केलेला नाही

नमनालाच आजी तंजनायकीच्या प्रसिद्ध गणिका कुळात आपला जन्म झाल्याचं ती सांगते. पुढे  कलाकारी, विद्याव्यासंग, लोकप्रियता याबद्दल तर ती सांगतेच, पण स्वतःचे मोहक सौंदर्य आणि तिनी काही लेखक, कलावंतांना दिलेला उदार आश्रय याबद्दलही सांगते. मग राधिकासांत्वनमची मुख्य कथा सुरू होते.  

राधा-कृष्णाच्या प्रणयलीला तर सगळ्यानाच माहीत आहे. या काव्यातील पोक्त, कृष्णनूरक्त  राधा,  तरुण्याबांड  कृष्णाचे आणि  तारुण्याने मुसमुसत्या  इलाचे लग्न लावून देते. कृष्ण इलेवर असा काही भाळतो की राधा रहाते बाजूला. आता राधेला पश्चात्ताप होतो. विरहाने पोळलेली राधा, कृष्णाला विनवून परत बोलवते.  तो येतो. पण डिवचली गेलेली राधा त्याला  मुळी जवळसुद्धा  येऊ देत नाही. त्याला  राधेची आर्जवं करायला लागतात, नाकदुऱ्या   काढायला लागतात, अगदी पायही धरावे लागतात. तरीही राधा त्याला धिक्कारते. चक्क लाथ मारते! मग कृष्ण आपले हुकूमी अस्त्र काढतो. आपल्या कामलीलांनी तिचे अंगप्रत्यंग चेतवतो. कामाग्नी भडकून  उठतो आणि दोघांचे मिलन होतं. राधिका सांत्वन सुफळ संपूर्ण होतं.

यातील दोन्ही नायिका अगदी मुद्दूपलनी सारख्याच आहेत. रुपगर्विता, कामातूर पण तितक्याच  हळव्या आणि हट्टी. इला, प्रथमच हे भोग अनुभवणारी कुमारिका;    तर राधा, अनुभवी, प्रौढ,  प्रेमस्वरूप कृष्णसखी आणि इथला कृष्ण; आपला नेहमीचाच, दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जीवाला.  

पण सारा भर आहे तो ह्या दोन नायिकांच्या मनतरंगांवर. यातल्या दोन्ही नायिका कृष्णावर वर्चस्व गाजवणाऱ्या  आहेत. प्रेम आणि त्याच्या साऱ्या शारीर अविष्कारात बरोबरीने शरीक होणाऱ्या आहेत. आपल्याला जे हवे ते उघडपणे मागून घेणाऱ्या आहेत. तृप्तीची  अनुभूती मोकळेपणानी  व्यक्त करणाऱ्या आहेत. वयात येणे, कोवळा आणि प्रौढ असे दोघींचे  संभोगानुभव, वीरह, असूया, स्व-पीडन, प्रेम-द्वेष अशी भावनांची लपाछपी, असं बरंच काही मुद्दूपलनी उलगडून दाखवते आणि दाखवते ते एक स्त्रीच्या नजरेतून दाखवते. हा नजारा  थक्क करणारा  आहे. हे काही अचकट विचकट शिमग्याचं गाणं नाही. अतिशय भावोत्कट आणि कामोत्कट असं रसाळ काव्य आहे.

राधाकृष्ण आणि कृष्णइलाच्या अंगसंगाच्या, अत्यंत सविस्तर, शृंगारिक आणि उत्कट वर्णनासाठी हे काव्य गाजलं. मुद्दूपलनी  हे सारं काव्य शुक मुनि आणि राजा  जनक यांच्या संवादातून मांडते. इतकं थेट आणि इतकं मोकळंढाकळं वर्णन आणि तेही एका बाईनं करणं समाजाला रूचणार नाही हे ओळखून  ही युक्ति योजली आहे की त्या काळातल्या प्रथेला अनुसरून हे लिहिले आहे; हे कळणे अवघड आहे.

ह्या काव्याला महाराजांची, दरबाऱ्यांची, रसिकांची बरीच वाहवा मिळाली. पुढे ब्रिटिश साम्राज्याचा उदय झाला. राजेशाही प्रथापरंपरा काळाच्या पोटात गडप झाल्या.   इतिहासात अशा कित्येक मुद्दूपलनींची   कित्येक काव्य काळाच्या पोटात गडप झाली असतील. तसंच हेही व्हायचे होते.  पण नागरत्नम्मामुळे (१८७८-१९५२) तसं काही झालं नाही.

नागरत्नम्मा ही देखील एका गणिकेचीच मुलगी. म्हैसूरची.   वयाच्या पाचव्याच वर्षी देवदासी म्हणून सोडलेली.  इंग्रजी, संस्कृत वगैरे बरोबरच ती व्हायोलिन आणि नृत्य निपुणही झाली. रसिक आणि संस्थानिकांकडे तिला निमंत्रणे येऊ लागली. बक्कळ पैसा मिळवला तिनी. इतका की इन्कम टॅक्स भरणारी ती पहिली नृत्यांगना!!!

पण एके रात्री तिला दृष्टान्त झाला. त्यागराज ह्या कर्नाटक संगीताच्या महागुरूंच्या स्मृतिसेवेत तीने स्वतःला वाहून घेतले. संन्यस्त जीवन स्वीकारत तीने आपली सारी पुंजी ह्या गुरूंच्या कार्याला, स्मारकाला वाहिली. तिनी नावारूपाला आणलेल्या ‘त्यागराज आराधना’ संगीत महोत्सवात आजही बडेबडे कलाकार आवर्जून आपली सेवा रुजू करत असतात.

तर अशा ह्या नागरत्नम्माच्या वाचनात हे काव्य आलं. श्री व्यंकटनरसू यांनी संपादित केलेली ही पहिली छापील आवृत्ती १८८७ सालची. तिनी  त्याची महती जाणली आणि काळाच्या उदरात गडप होऊ पहाणारे हे माणिक मोठ्या कष्टाने वाचवले. आपल्यासारख्याच एका  गणिकेने लिहिलेले काव्य म्हटल्यावर तिला त्याबद्दल विशेष ममत्व. अव्वल इंग्रजी काळातली ही आवृत्ती अर्धवट तर होतीच पण संस्कृतिरक्षणाच्या दृष्टीने  शुद्धीकरण केलेलीही होती. शुद्धिकरणाच्या या उत्साहात काही महाभागांनी तर मुद्दूपलनी हे स्त्रीवाचक नाम  बदलून मुद्दूपिल्लई असे पुरुषवाचक  केले होते आणि त्यातला शृंगार सुसह्य करून घेतला होता!   

बऱ्याच प्रयत्नानी, १९१० साली, नागरत्नम्मानी हे काव्य मूळ स्वरूपात प्रकाशित केलं. पण अठराव्या शतकात दरबारी मान्यता असलेलं हे काव्य दीडशे वर्षानंतर तेलगू साहित्यविश्वात अश्लील ठरलं.  आता काळ बदलला होता. दीडशे वर्षात  तेलुगु समाजातही अनेक बदल झाले होते.  मुख्य म्हणजे तंजावरचे राज्य ब्रिटीशांना अंकित झालेले होते.  जमाना राणी विक्टोरियाचा होता आणि मंडळी स्वतःकडे  आणि स्वतःच्या संस्कृतीकडे, ब्रिटिश नितीमत्तेचच्या  चष्म्यातून पहात होती. श्लिलअश्लीलतेच्या नव्या कल्पनांचा वावर होता. देवदासी कायद्याचा बोलबाला होता.  देवदासी आणि गणिका हा आता अप्रतिष्ठेचा विषय होता.

   आघाडीच्या लेखक कवींनी  हे काव्य लज्जास्पद आणि स्त्रियांनी वाचण्या-ऐकण्यास अयोग्य ठरवलं. एका  ‘धंदेवालीनी’, ‘बाजारबसवीनी’, ‘वेश्येनी’ लिहिलेलं असल्यामुळे हे लिखाण बदनाम ठरणं अगदी सोपं आणि स्वाभाविक झालं. ‘असल्या’ बाईला कुलीन शालीनता कुठली असायला? मोठा गदारोळ उठला. इतकं उघड आणि इतकं कामूक काव्य आणि तेही एका गणिकेने लिहिलेले म्हटल्यावर अनेकांची माथी भडकली. ‘ह्या असल्या बायका हा असला निर्लज्जपणा करणारच’, असा एकूण सूर होता. मग, ‘पुरुषांनी वाट्टेल ते, वाट्टेल तसं,  लिहिलेले चालते आणि बायकांनी थोडे जरी कामोत्कट  लिहिले तर लगेच ते अश्लील ठरवणारे तुम्ही कोण?’, ‘दोन डझन तथाकथित अश्लील कडव्यांसाठी अख्ख्या कवीतेवर बंदी का?’ असे प्रश्न उपस्थित झाले.    हा सगळा वादाचा घोळ आणि टीकेचा लोळ पहाता इंग्रज सरकारने ह्या (आणि अशाच आठ इतर जुन्या) पुस्तकांवर सरळ  बंदीच घालून टाकली (१९११).

नंतर पूलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मुख्य म्हणजे स्वातंत्र्य मिळालं.  मद्रास प्रांताचे आणि नवनिर्मित आंध्रप्रदेशचे पहिले मुख्यमंत्री टी. प्रकाशन हे, आपल्या यशवंतरावांसारखेच,  मोठे रसिक आणि जाणकार नेते होते. त्यांनी स्वातंत्र्यानंतर ही बंदी उठवली आणि म्हणाले, ‘तेलुगू साहित्य हारात मी आज काही तेजस्वी मोती ओवले आहेत.’ 

हे काव्य सगळं जुन्या, संस्कृतप्रचुर  तेलुगूत आहे. तेलुगू प्रबंधकाव्याच्या परंपरेला अनुसरून,  छंदोबद्ध  आणि  वृत्तबद्ध आहे.  मला तेलुगू येत नाही. ह्याचा  इंग्रजी अनुवाद माझ्या वाचनात आला.  संध्या मूलचंदानी यांनी तो  केला आहे (द अपीजमेंट ऑफ राधिका, पेंग्विन प्रकाशन). तो मुक्तछंदात आहे. पण त्यातूनही काव्याची उत्कटता मनाला स्पर्शून जाते आणि माझ्यासारख्या कोणाला हे काव्य इंग्रजीतून मराठीत आणायला भाग पाडते. म्हणजे तसं बघायला गेलं तर हे चुलत भाषांतर. तेंव्हा अर्थ आणि आशयाच्या कित्येक गोच्या ह्यात असतीलही. जाणकारांनी त्या जरूर दाखवाव्यात. पण ह्या काव्याचे हे परावर्तित सौंदर्यही बहुत देखणे आहे. इतके की मूळ  काव्य किती भरदार, किती बहारदार, किती रसाळ आणि लालित्यपूर्ण असेल ह्या कल्पनेनीच मी मोहरून गेलो. वेरूळ अजिंठ्याला जावं आणि मानवाचे आणि काळाचे नख लागलेल्या त्या  कलेच्या मूळ रूपाच्या नुसत्या कल्पनेनेच  डोळे भरून  यावेत, तसं झालं मला.

इंग्रजी भाषांतर ओळीला ओळ अशा पद्धतीने केले आहे.  त्यातून आपल्याला अर्थ तर समजतोच  पण बऱ्याच ठिकाणी मूळ शब्द काय असेल हेही ओळखता येते. ‘द स्टीलर  ऑफ हार्टस’, म्हणजे चित्तचोरटा, ‘वन हू वएर्स  द कौस्तुभ जेम’, म्हणजे कौस्तुभधारी, वगैरे वगैरे.  मी छंदोबद्ध भाषांतर करण्याचा निर्णय घेतला.  छंदोबद्ध असल्याशिवाय भाषांतर मुळी अठराव्या शतकातील वाटणारच नाही. मूळ  छंद/वृत्त काय आहे याचा अंदाज अर्थातच इंग्लिश ओळी वाचून येत नाही.  मग काही ओळी वाचायच्या, एखादी ओळ सुचेल तशी  लिहायची आणि मग कारागिरी करत करत इतर ओळी जुळवायच्या; असा प्रकार मी करत गेलो. समवृत्त भाषांतर करायचे तर या कामात मदत करणारा  तेलुगू जाणकार हवा.  मला प्रयत्न करूनही असा माणूस  सापडला नाही.  

भाषेचा पोत कसा  असावा याचा विचार करता करता मी ठरवलं की, मुद्दूपलनी तंजावरऐवजी जर पुणे दरबारी असती तर तिने हे काव्य कसे रचले असते; अशी कल्पना करत मी  भाषांतर पूर्ण केलं. फार जुने  शब्द वापरले तर दुर्बोधतेची शक्यता आणि फार नवे वापरले तर काळ-संदर्भ हरवण्याची शक्यता लक्षात घेत, ही तारेवरची कसरत पार पडली. अभंग, मंदाक्रांता, मालिनी, दिंडी, हरिभगिनी  आणि लावणीसदृश ठेक्यात बसणाऱ्या काही चाली मी वापरल्या. काही ठिकाणी पद्यमय संवाद लिहिले. अशा युक्त्या वापरून हे भाषांतर केलेले आहे.

इंग्रजी भाषांतर मुक्तछंदात असलं तरीही उत्तम आहे. मूळ काव्याशी जितके इमान राखता येईल तितके  भाषांतरकर्तीने राखलेले आहे. पण प्रश्न इमानाचा नाही.  इंग्रजी आणि तेलगू या दोन्ही भाषा दोन भिन्न संस्कृतीतून येतात. ही एक मोठी मर्यादा ठरते.  भाषा आणि संस्कृती या अगदी राधाकृष्णासारख्या एकजीव झालेल्या  असतात.  त्यामुळे तेलुगुमधून इंग्रजीत भाषांतरताना बरंच काही मागे रहातं. त्यामानाने तेलगु आणि मराठी, राधा आणि इलासारख्या आहेत. त्यांच्या प्रेमाचा मूळ सखा, म्हणजे संस्कृत आणि संस्कृती, एकच आहे. त्यामुळे तेलुगुतून इंग्रजीपेक्षा तेलुगूतून मराठीत भाषांतर हे निश्चितच सोपे आहे.  इंग्रजीमध्ये मदनाला ‘लव गॉड’ असा  एकच  शब्द जागोजागी वापरला आहे.  मदनाला कितीतरी सुंदर शब्द आहेत.  कामदेव आहे, रतिदेव  आहे,  रतिकांत आहे, मंन्मथ  आहे,  स्मर, कंदर्प, मनसीजा आहे. इतके सारे शब्द आणि त्याबरोबर येणारे अर्थ इंग्रजीत कसे यावे बरे? तीच गोष्ट हत्ती किंवा कमळ अशा शब्दांबद्दल.  हत्ती आणि कमळाला तेलुगू, मराठी, संस्कृतात; एकूणच भारतीय भाषांत कितीतरी सुंदर, अर्थवाही,  समानार्थी शब्द आहेत. इंग्लिशमध्ये एलिफंट आणि लोटस, एवढ्यावरच भागवावं लागतं. सगळेच शब्द अर्थाचे आणि संदर्भांचे एक गाठोडे बरोबर घेऊन येतात. उग्रदेव म्हणजेही शंकर आणि भोलेनाथ म्हणजेही शंकरच; पण दोन्ही शब्दातून मनात उभ्या रहाणाऱ्या  प्रतिमा किती भिन्न आहेत. ही प्रतिमासृष्टी परक्या भाषेत घेऊन जाणे अशक्यच.

तर अशा या हटके काव्याच्या, हटके भावानुवादाचा मासला, खास ‘चौफेर’च्या वाचकांसाठी, त्यांची दिवाळी (आंबट)गोड व्हावी म्हणून. 

 

ह्या अत्यंत उत्कट काव्याची सुरवातच राधेच्या बहारदार वर्णनाने होते.  

 

थोरांनी नावाजली, गौरांगी सर्वांहुनी,

शकुंतला, शुकभाषिणी, नंदाक्का राधा ही.

आणि तिचे ते डोळे, नसते जर कृष्णकळे;

का  हरी कटाक्ष पुरे,  चमकाया नयनदले?

आणि तिची कायाही, सौदामिनी माया-ही,

म्हणून घननिळ्याठायी,  अंगांगी भिनली ही. 

आणि तिची सानपदे, कलिकांचे जणू झुबके,

म्हणून श्याम स्पर्शाने, मोहरले, फुलले ते.

आणि तिची वक्षस्थळे, नसती जर गिरिशिखरे,

साहिती कैसे प्रहार, केले जे कृष्ण बळे?

 

मग षोडशा इलेचं वर्णन येतं.

 

कृशांगा, नाजुकांगा, वेणीसंभार सोसवेना;

सलज्जा, मृगनयना, गच्च मिरवी  स्तनांना;

यौनजंघा, कृशकटीही; चाल वक्री, गाली लाली;

मुखमोती दिव्य ज्योती, देवी इला, यौवना ही

 

नुकत्याच वयात आलेल्या इलेला मोठ्यांच्या जगाबद्दल, स्वाभाविकच, विलक्षण कुतूहल आहे. अशा अल्लड वयात तीही कृष्णावर भाळते आणि तिच्या मनात कृष्णप्रेमाची कारंजी  उसळून येतात.

 

लपंडावी  डोळे झाकाया, फक्त मुरारी हवा इलेला.  

शिवशिवीचा खेळ रंगता,हिचे इशारे पळता पळता.

नदीकिनारी साधून मौका,  इला झोंबते हरीच्या अंगा.

सदैव हरी-सह, हरीच सहचर, खेळ मिषे सुखस्पर्श अनावर.

सख्यांस कौतुक सखिचे नवथर!

उधळून यौवन, धीट, खोडकर!!

इला भाळली श्री कृष्णावर!

 

कृष्ण आणि राधेचं  काय काय  चाललंय हे तिच्या नजरेतून सुटत नाही. सतत ती स्वतःची तुलना राधेशी करत रहाते.

 

गच्च कलशसे  उरोज, राधा, जेंव्हा अर्पी राक्षसदमना;

न्यूनपणाची होऊन बाधा,  मनी खंतावे उगाच इला.

ओठ आरक्तही देता राधा, इला तुळीतसे ओष्ठ सौष्ठवा;

दंतपंक्ती त्या सहज चमकता, फिके जाणी स्मित आपुले इला,

शेजघरी ने कृष्णा, राधा;

म्हणे ‘आले मी’, इला बाला!!

मजेत हसती श्रीकृष्ण-राधा!

 

राधा छोटी इला  मोठी होण्याची आतुरतेने वाट पहाते आहे. तिनी इलेला खास खुराक चालू केला आहे. तारुण्याच्या एकेक खुणा दिसायला लागताच राधा आनंदून जाते.

 

कधी म्हणे विनोदे राधा, 

‘ही मला सवत होई का?’

पण पाहताच इलेला,

उरी उधाण ये मायेला,  

कुस्करी मग वारंवार,

चुंबीते गोबरे गाल.

 

‘ही मला सवत होई का?’; राधेच्या मनातला हा खेळकर  संदेह खरंतर पुढे काय घडणार आहे ह्याचा सूचना देतो. पहिल्याच प्रसंगात पुढील नाटकाचा अर्क सांगून टाकायचा, पण पुढचा खेळच इतका रसरशीत मांडायचा  की रसिकाचे चित्त मुळी  विचलितच  होणार नाही, हा तर भल्या भल्या साहित्यिकांचा आवडीचा खेळ. असा चित्तवेधक खेळ मुद्दूपलनी पानोपानी मांडत जाते. इलेला ऋतुप्राप्ती  होते..

 

आणि अचानक, पण वेळेवर,

ऋतुप्राप्तीची सुटे वावटळ. 

त्या वादळवाऱ्याच्या संगे,

वाहून गेले भोळे शैशव.

 

आणि उमलत्या शरीराबद्दल वर्णन येते..

 

वक्षस्थळे अशी उत्तुंग,

लज्जित हो शैल शृंग.    

वाढता उभार गच्च,

इला; स्तंभित! सलज्ज. 

मानसरोवरी फुलल्या;

वर्खलिप्त जुळ्या  कळ्या.

 

मग इलेचा नहाण विधी केला जातो.  त्याचे सविस्तर वर्णन येते. पाठोपाठ इला आणि कृष्णाच्या लग्नाचंही वर्णन येते. अर्थात हे वर्णन आपल्याला परिचित असेच आहे. इला-माधवाच्या सोहळ्याला दिपवतील असे ‘उत्सव बहू थोर होत’, आपण आसपास पहातो आणि अनुभवतो आहोतच. कृष्णाला लग्नासाठी नटवणाऱ्य गोपीनचे वर्ण वाचून एक मात्र नक्की समजते, पार्लरवाल्या  बायकांचा धंदा तेंव्हाही तेजीत होता आणि अगदी ‘नरवर कृष्णासमान’ही  तेंव्हा उत्साहानी  नटत होते!

पण लग्नानंतर राधा इलेला जो उपदेश देते आणि कृष्णाला जो ढोस देते तो मात्र बहारदार आहे. मधुचंद्राची रात्र आहे. ह्याला ‘शोभिनी’  असा तेलुगू शब्द आहे, म्हणे. ह्या मानानी मऱ्हाठी मधुचंद्र म्हणजे अगदी बीजगणितातील समीकरण आहे; हनी+मून=मधू+चंद्र!! ग्रामीण भागात याला  ‘सोळक’ असा एक शब्द प्रचलित आहे, म्हणजे होता. पण ते असो. राधा इलेला काय सांगते हे महत्वाचं आहे.

 

‘प्रेमिक जेंव्हा दे आलिंगन

साधून घेई उरोज मर्दन,

तो गालीचे घेता  चुंबन,

लाज, फिरव तू मान, तरीपण,

ओठां देतां ओठ हो निक्षण[1].  

 

जेंव्हा होईल मैथुन मंथन

स्पंदनास तू दे प्रतिस्पंदन

 

कामश्रमे तो थकला जर, तर;

बेलाशक  हो आरुढ त्यावर.

 

दे विश्वास अन् दे प्रोत्साहन.

जाण असे तो प्रीत पुरुषोत्तम

काम निपुण तो प्रेमिक उत्तम,

दे, कोमल तन, कोमल दे मन,

प्रीत मनस्वी, तुझाच प्रीतम.’

 

आणि इतकं सगळं सांगून वर ती म्हणते,

 

‘उगीच बोलले बाई मी तर  

मनी जाणीसी सारे तू तर.

‘प्रेमा नाही नियम, सीमा,

कामगुरूंचा[2] हा सांगावा.’

 

इलेस बोलून इतुके राधा

म्हणे, ‘आवर जा, आली घटिका.

जा सामोरी  रतीभोगाला.

शुभस्य शीघ्रम्, उशीर कशाला?’

 

आणि मग ती कृष्णाला दटावते. राधा कृष्णाची मामी आहे. त्याला सीनियर आहे आणि ‘कृष्णानुभवी’ तर आहेच आहे. इलेबाबत ती हळवी आहे. हे सगळं तिच्या बोलण्यातून जाणवतं.

 

‘मुक्या कळ्यांसम उरोज नाजुक,

माझ्या छातीसम ना साजूक,

नको नखांचा व्रण निळानिळा,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘ओठ तिचे पालवी कोवळी,

माझे तर ते घट्ट पोवळी,

चावा घ्या चिमणीचा कवळा

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘मांड्या सोपासम केळीच्या,

तुझ्या कुस्तीने माझ्या भरल्या,

जपून तिच्या अंगाशी खेळा,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘कठोर कांचन माझी काया,

लता जणू ती, तनू  कोमला,

धिटाई हळू, बुजेल इला,

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

‘ती नच मी अन् मी नच ती,

रतीक्रीडेला ती नवखी,

मातबर तुम्ही; ती बाला, 

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

पुन्हा एकदा सगळं बोलल्यावर राधा म्हणते..

 

‘तुम्हास ठाऊक कामिनी तन मन, 

कशास सांगू उगाच मी मग?

प्रीत प्रवीण हे रंगनायका;

सांभाळा तुम्ही गोपाळा!’

 

कशाला सांगू म्हणाली तरी तिच्या सूचना काही संपत नाहीत..

 

‘स्पर्श असू दे मृदुल मुलायम,

झोंबाझोंबी नको आज तर. 

घे जीव्हेने  ओठही स्पर्शून,

चावाचावी नको आज तर.’

 

‘घे गालांचे चुंबन अलगद,

बोचरी आठवण नको आज तर. 

तट्ट स्तनाग्रे, स्पर्शे अलगद,

कळ्या चुरडणे नको आज तर.’

 

‘ओढून  घेई मिठीत सैलसर,

गच्च आवळणे नको आज तर. 

हळू कुरवाळून घे सांभाळून,

जोराजोरी नको आज तर.’

 

आणि पुन्हा एकदा शेवटी, ‘मी उगीचच बाई बोलले’ हे आहेच!

 

‘कशी बाई मी, काय बोलते?

प्रणयपटूला प्रेम शिकवते?

जे जाणीसी तू, मीही जाणते

काममंथना, बंधन नसते!

मीलनात रत होता दोघे,

माझी मसलत कोण ऐकते?’

 

 

पण वरपांगी पोंक्त सल्ले देणारी राधा पुढच्याच क्षणी खिन्न होते. कृष्णाचा विरह तिला वेढून टाकतो. कृष्णाचे आणि  इलेचे आता काय चालले असेल, हे सतत तिच्या मनात येत रहाते.

 

अतापावेतो.. 

असेल त्याला अंकित झाली

सोडून लज्जा झाली मोकळी

असेल बोलत अस्फुट काही

कवेत  त्याच्या भ्रांत न राही

अतापावेतो.. 

मिठीत दाटली असेल काया

अंगांगाला स्पर्श अन्, माया

शिकवून सारी असतील झाली

तिला गुपिते मी जपलेली

अतापावेतो.. 

 

पण तिकडे मात्र इला अजून सावरलेली नाही.

 

भेदरली, परी  धीट असे  ती

बुजलेली, परी बेपर्वाही

अखंड बडबड, मधून मौनही

मिटल्या दिठी, कधी नजर थेटही

शरीरी उमटे गोड शिरशिरी

विसंगतींची सोज्वळ मूर्ती 

शरीरसुखाची कधी परिपूर्ती?

 

शेवटी शरीर सुखाची परिपूर्ती होते. दुसऱ्या दिवशी राधा येते आणि इलेचा अवतार पाहून कृष्णाला खडसावते, हे इथे काळेनिळे कसे झाले? केस इतके कसे गुंतले? हा सगळा तुझ्या द्वाडपणाचा  आणि तुझ्याच दांडगाईचा परिणाम, दुसरं काय? वर म्हणते..

 

नाही कशी मुळी लाज

हवी मजा, वरती माज

पुरूषांचे नीत्य  काज

बाईच्या मनीची आस

कोणी ना पुसे त्यास

 

अर्थातच ह्या लटक्या रागाचा आणि विशेषतः शेवटच्या दोन ओळींचा अर्थ कृष्ण झटक्यात लक्षात घेतो. इथे तिथे काळेनिळे आणि गुंतलेले केस हीच राधाबाईंच्या मनीची आस  आहे हे जाणून..

 

लागट लाडीक बोल  बोलती

खट्याळ खोड्या सतत चालती

अधीर स्पर्श अन् मीठी घट्टशी 

मल्लयुद्ध जणू  परस्परांशी

 

फुलले डोळे, कान तापले

मांड्यांचे आवर्तन चाले

सहज समागम तनमन डोले

स्मित फुलते कधी हास्य खळाळे

 

लटका तंटा, नकार लटके

असे सुखांती मीलन घडले

राधा हरी एकरूप झाले

 

पण इतकं सगळं झालं तरी, ‘काल रातीला काय घडलं?’ हा प्रश्न राधेला अजूनही सतावतो आहे. स्त्री-नीतीला  अनुसरून आडवळणाने प्रश्न येतो..

 

 

‘सांगा ना मज सारे काही

काल रात्री जे घडले नाही!’

साळसुदसा सवाल येई.

 

कूटनीतीचा कृष्ण शिरोमणी

सालसभावे उत्तर देई,

‘तू अनुभवी, तू मोठी राधीके

रंगी प्रितीच्या रंगू, ये प्रिये!

उगाच चर्चा व्यर्थ कशाला?

ये फुलवी मम  अंगांगला.’

 

‘प्रीतम तू तर झपाटलेला

पुरती मोहित दिसते इला.

तिनी केले का सुस्तगतीने

जे झाले ना काल रातीला?’

 

कृष्ण उत्तर देत नाही. जे घडलेच नाही असं प्रश्नकर्तीचेच म्हणणे आहे, तर उत्तराचा सवाल येतोच कुठे? पण राधाही सवाल सोडत नाही. शेवटी ती थेटच विचारते आणि कृष्ण अर्थातच इलेची निंदा करून स्वतःला सोडवून घेतो.  

 

‘नाही, पण तू सांग मला आधी,

तिला कितीदा चुंबला हरी?’

‘नाही राधीके इतुके आठवत

चव ओठांची कडवट, कडवट’

 

‘उरोज  असशील घट्ट  दाबले’

‘कुठले? ते तर इवलेइवले’

 

‘मांड्या मस्त  मजेच्या होत्या?’

‘कांड्या, त्या तर, सांगितले ना?’

 

‘सुंदर तनु का घेतली वेढुन?’

‘छे! वेलीसम होती लपेटून’

 

‘चेतवी कशी ती सर्वांगाला?

झाले का सुख तुला अन् तिला?

तिचा गुलामही असशील झाला?’

‘कुठले ती तर नवखी प्रांजला

तिला न माहीत अ-भोग लीला!’

 

‘तिला भोगता तृप्ती  पावला?’

‘नव्यात नाही जुन्यात जी मजा;

कुठे ती बाला? कुठे कौशला?’

 

आणि इथे साहित्य, संगीत, नृत्य निपुणा; बाळकृष्णानुग्रहप्राप्त; ताताचार्य  आशीर्वादप्राप्त आणि सोन्यामोत्याच्या अनेक ऊंची भेटी देणारे, तंजावर नृपति  राजा  प्रतापसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली;    मुद्दूपलनी विरचीत,   ‘राधिका सांत्वनम्’  नामे  शृंगारप्रबंधाचा प्रथमाध्याय समाप्त होतो.

 

 

प्रथम प्रसिद्धी

चौफेर

दिवाळी अंक २०२१

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



[1] चुंबन

[2] वात्सायन