Monday 26 September 2022

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ ह्या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी, पत्रकार भवन, पुणे इथे पार पडला. त्या समारंभातील माझे भाषण.

 

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ ह्या माझ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ

रविवार दि. २५ सप्टेंबर रोजी, पत्रकार भवन, पुणे इथे पार पडला.

त्या समारंभातील माझे भाषण.

 

‘मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे’ हे माझे नवे पुस्तक लोकवाङमयगृहातर्फे प्रकाशित होत आहे. विशेष आनंदाची गोष्ट अशी की, प्रकाशनपूर्व नोंदणी जाहीर होताच या पुस्तकाची पहिली आवृत्ती संपली!! मी पुण्यात बोलतोय याच मला जाणीव आहे! त्यामुळे, ‘संपली, म्हणजे आवृत्ती मुळात होती तरी किती प्रतींची?’, ह्या तुमच्या मनातल्या प्रश्नाचे उत्तरही देऊन टाकतो. पाचशे.

हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे. त्यामुळे प्रस्तावना, लेखकाचे दोन शब्द, वगैरे कटाप. पण तरीही लेखकाला आपण हा उद्योग का केला हे सांगायची आच असतेच. म्हणून हे भाषण.   

लहानाचा मोठा होताना माझं एक बोट ‘किशोर’ मासिकाने धरलं होतं.  चौथीत असताना मी किशोरचा वाचक झालो आणि आजही वाचक आहेच.  किशोरमधील सुरेश मथुरे यांच्या ‘विज्ञानाचे वाटाडे’, ‘ज्ञानवृक्षाच्या पारंब्या’ आणि   वसंत शिरवाडकर यांच्या  ‘असे हे विलक्षण जग’ अशा लेखमालांनी  माझं चिमुकलं विश्व मोठं  केलं. कॉलेजमध्ये गेलो आणि लोकविज्ञान संघटनेच्या बुद्धिवंत, प्रतिभावंत आणि  लोकविलक्षण चळवळ्या मंडळीत मी आपोआप सामील झालो. विज्ञानवादी विचारांचं बीज इथे रूजलं आणि अंनिसच्या संगतीत फोफावलं.

‘किशोर’मधल्या   शास्त्रज्ञांच्या कथा वाचून मीही शास्त्रज्ञ व्हायचं ठरवलं होतं. पण जगातले बहुतेक महत्वाचे शोध आधीच कुणीतरी लावले आहेत, असा शोध मला लवकरच लागला आणि मी तो नाद   सोडून दिला!

विज्ञानात भर घालण्याचे कार्य माझ्याकडून झालेलं नाही पण, ‘विज्ञानाचा अर्थ आम्हासीच  ठावा, येरांनी वहावा  भार माथी’, असं म्हणण्याचा धीर लोकविज्ञान आणि अंनिसच्या जोरावर मी गोळा केला आहे.    

त्यामुळेच ‘किशोर’चे साक्षेपी संपादक श्री.  किरण केंद्रे यांनी जेंव्हा लहान मुलांसाठी ‘किशोर’मध्ये लिहीण्याचा प्रस्ताव ठेवला, तेव्हा माझ्या मनाची मशागत करणाऱ्या या छापील स्नेह्याविषयीच्या  अपार कृतज्ञतेपोटी, कर्तव्यभावनेतून मी होकार भरला. विज्ञान विषयक लिहायचे हेही ठरलेलेच होते. प्रश्न काय लिहायचे हा होता.  

आपल्या भोवतालचे जग आणि त्याचे ज्ञान देणारे विज्ञान, किती विचित्र, विलक्षण आणि विस्मयकारी आहे हे लक्षात आणून देणारे साहित्य विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. आतडे बावीस फुट लांब असते किंवा  कातडे  सात थरांचे बनलेले असते;  आपल्याला आठ मिनिटांपूर्वीचा सूर्य दिसत असतो किंवा माठ सछिद्र असल्याने पाणी गार होते; असली माहिती त्यात ठासून भरलेली असते. ‘डिस्कवरी’सारख्या चॅनलवरती तर अशा मालिका अहोरात्र पहायला मिळतात.  पण विज्ञानाचा हा सगळा विस्मय, हा सगळा शोध, याचा प्रवास कसा असतो?, हे सगळं कळलं कसं?, आणि ज्यांना कळलं त्यांचा का कळलं?, जेंव्हा कळलं तेंव्हाच का कळलं?, आधी का नाही? साऱ्या संशोधनामागची वैचारिक बैठक काय असते?, चिकित्सक विचार किंवा वैज्ञानिक पद्धती म्हणजे नेमकं काय?, हे भल्याभल्यांना पटकन सांगता येत नाही.  मुलांसाठी आणि मराठीत याविषयी विशेष काही आढळत नाही.  त्यामुळे शास्त्रज्ञ व्हायचं झालं तर विचार कसा करायचा?, विज्ञान नावाची युक्ती आपल्याला नेमकं काय शिकवते?, वैज्ञानिक पद्धती म्हणजे काय? हे सांगणारी लेखमाला लिहायची असं मी ठरवलं.

अर्थात जे मी लिहिले आहे ते म्हणजे या प्रश्नांचे संपूर्ण उत्तर नाही. पण बालबुद्धीला झेपेल, उत्सुकता चाळवेल, एवढं उत्तर निश्चित आहे. सोपं लिहिणं सगळ्यात अवघड असतं असं म्हणतात. त्याचा प्रत्यय हे लिखाण करताना मला वारंवार आला. गीता गुत्तीकर, नागेश मोने, नागेश वाईकर वगैरे शिक्षक मित्रांनी मला  मुलांची शब्दसंपदा, विचाराची पद्धत वगैरे समजावून घ्यायला मदत केली. यांनी आणि प्रा. प्रदीपकुमार माने, प्रा. श्रीनिवास हेमाडे वगैरेंनी  काही लेख तपासूनही दिले. या साऱ्यांचा  मी ऋणी आहे.

शिवाय फ्रांसिस बेकन, बर्ट्रांड रसेल, कार्ल सागान, रिचर्ड फेनमन, रिचर्ड डॉकिंस अशा अनेकांकडून मी मुक्तपणे उचलेगिरी केली आहे. कुणाची शैली तर कुणाची उदाहरणे. अर्थातच ह्या साऱ्याला मराठी साज चढवला आहे, मुलांसाठी योग्य असे बदल केले आहेत. उगाच काढला इंग्लंडच्या राणीचा झगा आणि घातला झाशीच्या राणीला असा हा प्रकार नाही.

चिकित्सक बुद्धिमत्तेचे अनेक फायदे होतात.  माणूस हा मूलतः विचारी प्राणी आहे हा एक मोठाच गैरसमज आहे! उत्क्रांती मानसशास्त्र असे शिकवते की माणूस हा मूलतः अविचारी, भावनाशील, झटपट निर्णय घेण्याला चटावलेला, अंधश्रद्ध प्राणी आहे.  त्यामुळे चिकित्सक विचार कसा करावा, हे शिकावं लागतं. ते आपोआप येत नाही. आपली उपजत समज जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक बाजूला ठेऊन प्रश्नाला भिडण्याची ही नवी सवय अंगी बाणवावी लागते.

चिकित्सक बुद्धीचे अनेक फायदे होतात मुलांची जिज्ञासा वाढते.  जिज्ञासा ही गोष्ट फक्त विज्ञानापुरतीच  मर्यादित नाही तर आपल्या दैनंदिन जीवनातही जिज्ञासू वृत्तीचा फायदाच होतो. जिज्ञासूंना अनेक विषयात गती प्राप्त होते; कारण  प्रश्न विचारण्यात त्यांना  शरम वाटत नाही, अज्ञान मान्य करण्यात शरम वाटत नाही. त्यांचा दृष्टिकोन विशाल बनतो. त्यामुळेच इतरांच्या संस्कृतीबद्दल, कल्पनांबद्दल, मतांबद्दल ते अधिक स्वागतशील असतात.

जे दिसतंय,  जे घडतंय, त्याबद्दल विचार करून काही चाळण्या आणि चाचण्या लावूनच ते निष्कर्षाला येतात.  त्यामुळे ते सहजासहजी फसत नाहीत आणि फसले तरी तिथेच बसत नाहीत. फसगत  मान्य करून, चुका शोधून, पुढे जातात.

चिकित्सक बुद्धिमत्तेमुळे स्वतंत्रपणे काम करण्याची आणि विचार करण्याची सवय लागते.  ती खूप महत्त्वाची आहे. जगावेगळा विचार करणारा माणूसच पुढे जाऊन नेतृत्व म्हणून उभा रहातो.

चिकित्सक बुद्धीने सृजनशीलता देखील वाढते.  शालेय  शिक्षण किंवा एकूणच शिक्षण  ही तर फक्त पहिली पायरी आहे.  जिज्ञासा आणि सृजनशिलता  हातात हात धरून जातात.  या नावीन्याची सुरुवात जुन्याच्या चिकित्सेने होते. म्हणूनच चिकित्सक वृत्तीमुळे कोडी सोडवायला, गणित, विज्ञान यातील कूट सोडवायला तर मदत होतेच पण पुढे व्यवसायातले आणि आयुष्यातले अत्यंत गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायलाही मदत होते. नोकरी असो, मार्केटिंग असो अथवा व्यावसायिक वाटाघाटी असोत; नाविन्याला, नवकल्पनांना, सृजनाला  पर्याय नाही. 

पुस्तकाचे नाव, ‘मला वैज्ञानिक व्हायचे आहे’ असे असले तरी त्यातील विचारपद्धती सर्व क्षेत्रात लागू पडते.  डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी हे लिखाण वाचून खूप नेमका मुद्दा मांडला. त्यांच्या मते, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा; तुम्ही निम्मे कवी  आणि निम्मे  वैज्ञानिक असाल तर खूप पुढे जाता. कवीसारख्याच स्वैर, उच्छृंखल, बेलगाम कल्पना विज्ञानालाही  आवश्यक आहेत.

जीवजंतूंचे आजचे रूप हे मूळ रूपाबरहुकूम नाही; ते अंतिमही  नाही. माणसासकट  सारे सजीव उत्क्रांत होतात.  उत्क्रांतीची ही स्वैर, उच्छृंखल, बेलगाम पण क्रांतिकारी कल्पना!  याच कल्पनेची वीज, वैज्ञानिक पद्धतीच्या मुशीत ढाळली की त्या दामिनीची सळसळ उत्क्रांतीचा वैज्ञानिक सिद्धांत होऊन समूर्त उभी रहाते.

तेंव्हा स्पेस-रेस  असो  वा घोड्यांची रेस असो, अभ्यास युद्धाचा असो वा  बुद्धाचा, इतिहास खोदायचा असो वा खोडायचा असो; चिकित्सक विचार करण्याची सवय असेल, तुम्ही निम्मे कवि आणि निम्मे शास्त्रज्ञ असाल तर इतरांच्या कित्येक योजने पुढे असता.

या पुस्तकाला ज्येष्ठ शास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि मंगला नारळीकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.  ही माझ्यासाठी आनंदाचीच नाही तर मोठी अभिमानाची गोष्ट आहे.  डॉ. जयंत नारळीकरांच्या लिखाणाने आणि व्याख्यानाने प्रभावित होऊनच मी वैज्ञानिक लिखाण करायला प्रवृत्त झालो. अस्सल मराठीतील त्यांचे ओघवते लिखाण वाचून  आणि शुद्ध मराठीतील  फर्डे  वक्तृत्व ऐकून मराठीबद्दल वाटणारी न्यूनत्वाची भावना गळून पडली. मी लिहायला तर लागलोच पण गेली २५ वर्ष दरवर्षी न चुकता आमच्या राज्य स्त्रीआरोग्यतज्ञ परिषदेत शुद्ध मराठीत शास्त्रीय विषयावर भाषणेही ठोकतो आहे. मी उभा राहिलो की आता श्रोत्यांतून ‘जय महाराष्ट्र!’ असा आवाज टाकतात लोकं!  

तेंव्हा प्रेरणादायी नारळीकर दांपत्याचे शब्द उद्धृत करण्याचा मोह मला आवरत  नाही. ते लिहितात, ‘या पुस्तकात विज्ञानाबद्दल आणि त्याच्या प्रभावाबद्दल खूप काही सांगितले आहे. किशोरांना सहज समजेल आवडेल असे हे लेखन आहे. विविध प्रश्नांची उत्तरे विज्ञान कसे शोधते हे सोप्या भाषेत सांगितले आहे. सतत प्रयोग करणे, विधाने तपासून पाहणे, निरीक्षणे नोंदवणे, तर्कशुद्ध विचार करत शक्य तेथे निष्कर्ष काढणे, गृहीतके चुकीची ठरल्यास ती बदलणे सुधारणे या रीतीने विज्ञानाची प्रगती होते.  हे सारे इथे रंजक उदहरणातून येते. पुरातन धर्मसंस्थापकांनी विविध गोष्टींच्या बद्दल केलेले तर्क सत्य म्हणून स्वीकारायचे, की विज्ञानाने पुरावा देत सिद्ध केलेली विधाने स्वीकारायची हे वाचकांनी ठरवायचे आहे. असे विवेकी विचार शिकवणारे लिखाण फार जरुरी आहे. लहानांप्रमाणे मोठ्यानाही वाचायला आवडेल, विचार करायला उद्युक्त करेल असे हे लेखन आहे.’

मुखपृष्ठ आणि आतील चित्रे काढणारे श्री. सतीश भावसार यांचे विशेष आभार. मुद्दाम जरा विद्वजड शब्दात सांगायचे झाले, तर  पुस्तक विज्ञानाच्या तत्वज्ञानावरचे आहे. तरीही हलकेफुलके आणि मुलांना आवडेल असे आहे. हा खेळकर मूड चित्रांत सहज उतरला आहे. मुलांच्या डोळ्यातील कुतूहल त्यांनी नेमके पकडले आहे.

हे पुस्तक लोकवाङमयगृहातर्फे  प्रकाशित होत आहे याचा विशेष आनंद आहे. सातत्याने चिकित्सक पुस्तके प्रसिद्ध करण्याच्या त्यांच्या परंपरेचा पाईक होण्याची संधी, यानिमित्ताने मला मिळाली असे मी समजतो. लोकवाङमयगृहाचे श्री. राजन बावडेकर, श्री. संजय कोकरे आणि श्री. संजय क्षीरसागर यांची विशेष मदत झाली. त्यांना मनःपूर्वक लाल सलाम.  

लहान मुलांच्या पुस्तकाची इतकी किंमत पाहून मलाही जरा आश्चर्य वाटलं. मग माझ्याच भाव वधारला आहे  असं समजून जरा हुरूप वाटला. मग साम्यवादी  संस्थेचे हे  नफेखोर पुस्तक कोण विकत घेणार असाही प्रश्न पडला. पण राजन बावडेकर  म्हणाले, ‘काही काळजी करू नका डॉक्टर, आम्हाला मार्केट चांगलं समजतं!’ आता प्रकाशनाच्या आधीच आवृत्ती संपल्यामुळे, त्यांची अटकळ किती बरोबर होती ते सिद्धच झालं आहे.

बऱ्याच दशकांनी त्यांनी बालवाङमयाला हात घातला आहे. यापूर्वी त्यांनी रशियन पुस्तकांची मराठी भाषांतरे उपलब्ध केली होती. तो प्रयोग बंद पडला ह्याचा मला विशेष आनंद आहे. कारण लहान असताना त्यांच्याच एका पुस्तकातील, ‘रात्रभर कडाक्याचा बर्फ पडल्याने बैल कडक झाला होता. चिमुकल्या व्हालदीमीरच्या आईला बैल सोलायला बराच वेळ लागला’, वगैरे वाचून ते पुस्तक माझ्या हातून गळून पडलं होतं आणि मी ते पुन्हा उचललंच नाही. हे पुस्तक मात्र आबालवृद्ध वाचक हृदयाशी कवटाळून ठेवतील अशी मला आशा आहे.

विज्ञान नावाच्या विचार पद्धतीचा शोध लागल्यापासून मानव समाजाची प्रत्येक निकषावर प्रगतीच होते आहे. कोव्हिड, युक्रेन युद्ध वगैरे पहाता हे विधान धाडसी वाटेल.  पण हे मी म्हणत नाहीये. स्टीफन पिंकर, युवहाल हरारी सारख्या अभ्यासकांचे हे पुरावाधिष्ठित   विधान आहे. विज्ञानाचा शोध पाच सातशे वर्षच जुना आहे. आणि गेल्या हजार वर्षाची आकडेवारी पहिली तर असं लक्षात येईल की आज उपासमारीने जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे अतिपोषणाने मरतात. युद्धात जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे आत्महत्या करतात आणि  साथीत जेवढी माणसे मरतात त्यापेक्षा जास्त माणसे वृद्धापकाळाने मरतात.   कोव्हिड, युक्रेन युद्ध वगैरे ह्या प्रगतीच्या आलेखातील उतार आहेत. ते तात्पुरते ठरायचे असतील, हा आलेख सतत चढता रहायला हवा असेल, तर विज्ञान, विवेक, मानवता, आणि उदारमतवादाला पर्याय नाही. हे पुस्तक  म्हणजे प्रगतीच्या ह्या चाकांना वंगण घालण्याचा एक प्रयत्न आहे. बालक-पालक वाचकांनी तो गोड मानून घ्यावा ही विनंती.

 

Saturday 17 September 2022

नवभारत: अमृत महोत्सवी वैचारीक मासिक

नवभारत: अमृत महोत्सवी वैचारिक मासिक.  
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई  

‘नवभारत’चा अंक नुकताच हाती पडला आणि ह्या परिचयमालेत ‘नवभारत’बद्दल लिहावे असे प्रकर्षाने वाटले. हे पुस्तक नाही, तरीही असे वाटले. आपल्यासारख्या ग्रंथप्रेमींनी दखल घ्यावी असे, वाईच्या प्राज्ञपाठशाळेतर्फे प्रसिद्ध होणारे हे नावाजलेले मासिक. यावर्षी या मासिकाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात आपलाही सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचा योग या वैचारिक मराठी मासिकाला लाभला आहे ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. मराठीतील रंजक, तसेच विशिष्ट विषयाला वाहिलेली अनेक मासिके बंद पडत आहेत. मात्र याच काळात ‘नवभारत’ इतका काळ तग धरून आहे हे विशेष.
मात्र त्याच बरोबर जाने-फेब्रु-मार्च असा हा अंक आत्ता (सप्टेंबर) हाती पडत आहे ही बाबही दुर्लक्षित करण्यासारखी नाही. कोव्हिडमुळे रुळावरून घसरलेली गाडी अजूनही रुळावर आलेली नाही. पाऊणशे वर्षानंतरही आर्थिक ओढाताण सुरूच आहे. स्थायी निधी उभारणे, वर्गणीदार वाढवणे, जाहिरातदारांना वारंवार आवाहन करणे, अंक अधिकाधिक दर्जेदार करणे असे सगळे प्रयत्न संपादक, संचालक आणि विश्वस्तांनी वारंवार केले आहेत आणि ते वारंवार अर्धसफल झाले आहेत. मराठी भाषेला आणि महाराष्ट्र देशाला हे भूषणावह नाही.  

 सुरुवातीपासूनच एक भारदस्त आणि विद्वजड मासिक म्हणून ‘नवभारत’चा बोलबाला आहे. नवभारत म्हणजे निद्रानाशावर अक्सीर इलाज, असेही पुलं गमतीने म्हणत. मासिकाच्या माजी संपादक/संचालक/विश्वस्तांची नावे पाहूनच आपली छाती दडपून जाते. आचार्य शं. द. जावडेकर, आचार्य स. ज. भागवत, हरी कृष्ण मोहनी, प्रो. वि. म. बेडेकर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, मे. पुं. रेगे, वसंत जोशी, रा. ग. जाधव, वसंत पळशीकर, यशवंत सुमंत, देवदत्त दाभोळकर, सरोजा भाटे, श्री. मा. भावे अशी उज्वल परंपरा ‘नवभारत’ला लाभली आहे. सध्या मराठी विश्वकोशाचे प्रमुख संपादक, श्री. राजा दीक्षित हे ‘नवभारत’चेही संपादक आहेत.  
वाद-विवाद-संवाद, खंडन-मंडन या परंपरेचा जिवंत झरा नवभारताच्या पानोपानी वाहत असतो. परंपरेशी सांधा न तोडता, भारतीय समाजाचे आधुनिकीकरण कसं करता येईल, याचं चिंतन येथील लेखनातून प्रकर्षाने दिसून येते. पाश्चात्य तत्त्वज्ञानाचे आकलन आणि मूल्यमापन भारतीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात करायला हवे, हा आग्रहही येथे दिसतो

अनेक दिग्गजांनी नवभारतात लिखाण केले आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, संस्कृती, तत्त्वज्ञान, इतिहास असा कोणताही विषय नवभारतला वर्ज्य नाही. अगदी भारतीय परंपरेतील मदिरेचा परामर्ष चक्क तर्कतीर्थांनी एका लेखामध्ये घेतला होता! बुद्धिवाद, विवेकवाद, धर्म हे विषय वारंवार चर्चेला आले आहेत. नीतीला धर्माचा आधार लागतोच का? केवळ
विवेकावर नीती अवलंबून राहू शकते का? या प्रश्नांची चर्चा वारंवार घडत आहे. धर्म आणि विज्ञान यावर दोन दिवसीय कार्यशाळा घेऊन त्यावर नवभारतने त्यावर दोन विशेषांकही काढले होते. महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीची दाखल नवभारतने घेतली आहे. दलित साहित्य, अस्पृश्यता निर्मूलन, मंदिर प्रवेश, दलितांवरील अत्याचार याबाबत नवभारतने प्रगतिशील भूमिका घेतली आहे. मंडल कमिशनबाबतही ‘नवभारत’मधील लिखाण आजही वाचकांच्या आठवणीत आहे. मे. पुं. रेगे यांनी दोन्ही बाजूंकडून होणाऱ्या अतिरेकाचीही विवेकी दखल घेतली आहे. हे सारे जुने लिखाण, जुने अंक ते अभ्यासून काहींनी पीएचडी मिळवली आहे. प्राज्ञपाठशाळेची गाजलेली प्रकाशनेही सवलतीत उपलब्ध आहेत. (संपर्क नीता गायकवाड 02167220006
9423866556)

एखाद्या विषयाचा अतिशय विस्तृत, समतोल आणि सर्वांगीण परामर्श घ्यायचा झाला तर त्याला मासिकच हवे. वृत्तपत्रांच्या पुरवण्या किंवा टीव्हीवरच्या चहाटळ चर्चांमधून हे काम होऊ शकत नाही. ही निकड लक्षात घेऊन आणि दीर्घ लेख छापणे सोयीचे व्हावे म्हणून अमृत महोत्सवी वर्षांमध्ये ‘नवभारत’ने त्रैमासिक रूप धारण केले आहे. ताज्या अंकातील संपादकीय आणि अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यास ‘नवभारत’ ही काय चीज आहे, हे लक्षात येईल.  

एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले, त्यांच्यावरील दोन लेख प्रस्तुत अंकात समाविष्ट आहेत. या अंकापासून, किशोर बेडकीहाळ
यांच्या निगरणीखाली, पन्नास वर्षांपूर्वी इंग्रजीत प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या पुस्तकांचा परिचय करून देणारी लेखमाला सुरू झाली आहे. राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रश्नांचा मागोवा घेणारी ही पुस्तके. या अंकात अशोक चौसाळकर यांनी ‘द ओरिजीन्स ऑफ टोटॅलीटेरीयनीजम’ या अॅना अॅरंट यांच्या पुस्तकाचा आणि मनोज पाथरकर यांनी ‘द सोसायटी ऑफ स्पेक्टेकल’ या गाय दिबोर्ड लिखित पुस्तकाचा परिचय करून दिला आहे. विख्यात कवी प्रमोद कोपर्डे हे एकविसाव्या शतकातील नवी मराठी कविता या समीक्षात्मक सदराचे समन्वयक आहेत. कविता हा आत्मनिष्ठ साहित्यप्रकार आहे या भूमिकेतून इथे कवितासंग्रहांची निवड केली आहे आणि ही समीक्षा काही प्रसिद्ध कवींनीच केलेली आहे. सदर अंकात अंजली कुलकर्णी यांनी, योजना यादव यांच्या, ‘मरी मरी जाय शरीर’ या कवितासंग्रहाचे रसग्रहण केले आहे. प्रातिनिधिक असे १२ संग्रह येथे चर्चिले जातील.  

नवभारत जगवणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. सुशिक्षित आणि पुढारलेल्या महाराष्ट्रात आज ‘नवभारत’ला स्वतःच्या पायावर उभे राहता येईल इतके वर्गणीदार नाहीत. लोक वेळोवेळी देणग्या देतात, साहित्य संस्कृती मंडळाचे अनुदान मिळते, विश्वस्त आणि संपादक कोणताही मोबदला न घेता काम करतात आणि कोंडयाचा मांडा करत हा संसार चालवला जातो.  

आपण वाचकांनी एक सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक जबाबदारी म्हणून नवभारतचे वर्गणीदार होऊन सहकार्य करावे अशी माझी कळकळीची विनंती आहे.  

आपल्या पुढाकाराने या अमृत महोत्सवी वर्षात ‘नवभारत’ला नवसंजीवनी मिळेल अशी खात्री वाटते.

Friday 16 September 2022

नर मादी ते स्त्री पुरुष: पुस्तक परिचय

नर-मादी ते स्त्री-पुरुष
लेखक डॉ. मिलिंद वाटवे
पुस्तक परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई 

‘नर-मादी ते स्त्री-पुरुष’, हे डॉ. मिलिंद वाटवे यांचे अतिशय वाचनीय आणि मननीय पुस्तक आहे. 
डॉ. वाटवे हे जीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून आईसर पुणे मध्ये कार्यरत होते. पण या वैज्ञानिकाला साहित्याची गोडी आणि लिहिण्याची हातोटी असल्यामुळे त्यांचे हे विज्ञान विषयक लिखाण ललितरम्य झाले आहे. 

नर आणि मादी या शब्दांमध्ये केवळ जीवशास्त्रीय आशय भरला आहे. मात्र स्त्री-पुरुष हे जरी नर-मादीच असले तरी त्यांच्याकडून आशा आणि अपेक्षा सर्वस्वी भिन्न आहेत. स्त्री-पुरुष ही निव्वळ जीवशास्त्रीय नाही तर सांस्कृतिक, सामाजिक संकल्पना आहे. 

मात्र नर-मादी ते स्त्री-पुरुष हा प्रवास समजावून घ्यायचा तर डार्विनचं बोट धरून चालावं लागतं.
डार्विन म्हटलं की ‘माकडापासून माणूस निर्माण झाला’, असं सांगणारा एक म्हातारा आपल्या डोळ्यापुढे येतो; पण जीवशास्त्रामध्येच नाही तर आता मानवी प्रज्ञेच्या प्रत्येक क्षेत्रात डार्विनची कल्पना आपला प्रभाव गाजवू लागली आहे! 

शेपट्या का झडल्या?, अपेंडिक्स का आक्रसले?, अंगठा का वळला?, त्याचे काय फायदे झाले?, यासारख्या प्रश्नांची उत्तरे डार्विन देतोच पण माणूस कपडे का घालतो?, संभोग समयी एकांत का शोधतो? आणि तो बाहेरख्याली का असतो?, अशा प्रश्नांची उत्तरे देखील उत्क्रांतीशास्त्रातून मिळतात. उत्क्रांती मानसशास्त्र अशी एक नवीनच अभ्यासशाखा आता उदयाला आली आहे. माणसाच्या वागणुकीचे अनेक पैलू या शाखेने तपासायला घेतले आहेत. या साऱ्याचा धावता आढावा डॉ.वाटवेंनी या पुस्तकात घेतला आहे.


ह्यातील अनेक विधाने वाचून वाचक मुळापासून हादरतो. समाज म्हणून जगताना काही जोडीनेच राहण्याचे गुणधर्म आणि काही टोळीने राहण्याचे गुणधर्म, असे आपण जगत असतो. त्यामुळे काही वेळेला धड ना जोडीचे आणि धड ना टोळीचे अशी आपली पंचाईत होते तर काही वेळेला या दोन्हीचे मिश्रण भलतेच स्फोटक रूप धारण करते! 
परस्परांबद्दल प्रेम असणे ही देखील उत्क्रांतीतून उपजलेली भावना आहे!!
 स्त्री-तत्व म्हणजे निर्माण, सृजन, जतन आणि पुरुष-तत्व म्हणजे शोषण, वापर, विनाश ही कल्पना कवीकल्पना आहे आणि विज्ञानाच्या कसाला उतरत नाही!!!


पण निव्वळ विज्ञानच नाही तर इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र या साऱ्याचा सांगोपांग विचार करून डॉ. वाटवेंनी आपली मते साधार मांडली आहेत. 

 आपल्यासारख्या उष्ण कटिबंधातील देशात कपडे अंगभर कपडे घालणे म्हणजे प्रतिष्ठा ही कल्पना मुघल आणि युरोपियन आक्रमणाची देन आहे. कपडे घालण्यातली प्रतिष्ठा, नग्नतेची शरम, असुरक्षितता आणि पापभावना या साऱ्याचा परिपाक म्हणून आपण कपडे घालतो. पूर्वीच्या चित्रशिल्पादी कलाकृतीमध्ये, राजा असो वा प्रजा, केवळ कमरेचे वस्त्र लेवून असल्याचे आपल्याला दिसतात.... थोडा विचार केला तर हा युक्तिवाद पटावा असा आहे.


ह्या वाचनातून आपली भाषाही समृद्ध होते. हायपोथेसिसला ‘अभ्युपगम’ ह्या जडजंबाळ शब्दाऐवजी वादमत; सेक्सुअल रीप्रोडक्शनसाठी मिथुनवीण; म्युटेशनला ‘उत्परिवर्तन’ ऐवजी गुणघात असे काही अर्थवाही आणि सोपे शब्द डॉक्टर वापरतात. रॅशनलायझेशनला त्यांनी विवेकाभास म्हटले आहे. पण विवेकीकरण किंवा बाष्पीभवनच्या चालीवर विवेकीभवन असे शब्द सुचवावेसे वाटतात. हा विषय प्रथमच समजावून घेणाऱ्याच्या मानाने पुस्तक अधिक सविस्तर असायला हवं होतं असंही वाटतं. सकाळ प्रकाशनने आपल्या लौकिकाला साजेल अशी सुबक छपाई केली आहे संदीप देशपांडे यांचे मुखपृष्ठ हे अल्परेषी पण बहुगुणी आहे.

एका अनवट शास्त्रीय विषयावर एक वाचनीय पुस्तक सादर केल्याबद्दल अभिनंदन.

Thursday 15 September 2022

गौळण: वांड्मय आणि स्वरूप

गौळण वाड़्मय आणि स्वरूप 
लेखक डॉ. रामचंद्र देखणे
पुस्तक परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर 
 
डॉ. रामचंद्र देखणे हे मराठी संस्कृती अभ्यासकांतील एक भारदस्त नाव. आजवर त्यांची ४९ पुस्तके प्रसिद्ध झाली असून, ‘गवळण वांग्मय आणि स्वरूप’’ हे त्यांचं तब्बल पन्नासावे पुस्तक. संस्कृतीच्या अभ्यास करता करता ५० पुस्तकांचे नवनीत त्यांनी वाचकांना सादर केले आहे. ते निव्वळ अभ्यासकच नाहीत तर भारुड, कीर्तन वगैरे परंपरांचे सादरकर्ते देखील आहेत. ते नुसते बोलके अभ्यासक नसून कर्ते अभ्यासक आहेत.
 
गवळण हा मराठी काव्य आणि गीताचा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार. मुख्यत्वे कीर्तनातून आणि तमाशातून ही गवळण लोकांच्या भेटीला आली. वरून कीर्तन आतून तमाशा असो वा उलट असो, त्यात गौळण ही असणारच. या गौळण परंपरेचा अभ्यास डॉ. देखणे यांनी इथे मांडला आहे. 

नेमकी ही गवळण आली कुठून? यातून नेमकं कोणत्या तत्त्वज्ञान सांगायचे आहे? संतांच्या आणि तमाशाच्या बोर्डावरच्या गवळणींमध्ये आज आपल्याला शृंगारिक, अश्लील आणि भडक उल्लेख का असतात? तमाशातली मावशी एक लोकप्रिय पात्र; ही मावशी आली कुठून? आणि ती इतकी लोकप्रिय कशी झाली? मथुरेच्या बाजाराचा प्रसंग, प्रसंगी बीभत्स का होतो? अशा प्रश्नांचा मागोवा डॉ. देखणे येथे घेतात. 

या साऱ्या लिखाणाचे स्वरूप अभ्यास असं असलं तरी डॉ. देखणे मोठ्या भक्तीभावाने या परंपरेकडे पाहतात. त्यातील तेज, मार्दव आणि सौंदर्य ते आवर्जून दाखवून देतात. त्यातील न्यून दुर्लक्षित करतात किंवा झाकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्याचे उदात्तीकरणसुद्धा करतात. परमार्थाची गुटिका गोड लागावी म्हणून तिला शृंगाराच्या शर्करेत घोळलेले आहे असे डॉ. देखणे यांचे म्हणणे. प्रत्यक्षात यातील कवने वाचल्यावर ह्या निष्कर्षाबद्दल शंका वाटते. शृंगाराची पंचपक्वान्ने पचनी पडावीत म्हणून सोबत परमार्थाचे तोंडीलावणे पुरवले आहे असे वाटते. 

पुस्तकात अनेक संतांच्या आणि शाहिरांच्या गवळणी आहेत. डॉ. देखण्यांनी केलेल्या विवेचनाच्या चौकटीत त्या वाचल्यावर त्या अधिक अर्थवाही होतात. अगदी सिनेसंगीतातील गवळणींपर्यंतचा विचार इथे केला आहे. 

अर्थात गवळणीत गवळण राधा गवळण. 
राधा हे भारतीय संस्कृतीतील एक गूढ पात्र आहे. महाभारतात कृष्ण आहे पण रासक्रीडा नाही, गोपी नाहीत आणि राधाही नाही. पुढे हरिवंश, विष्णुपुराण यातही राधेचा उल्लेख नाही. भागवतात राधेचा ओझरता उल्लेख आहे. या राधा कृष्णाच्या प्रेमविलासावर बाराव्या शतकात जयदेवाने गीतगोविंद लिहिले आणि आणि ही राधाकृष्ण कथा भारतभर पसरली. पार मणिपुरी नृत्यापासून ते केरळच्या कथकलीपर्यंत भारताच्या प्रत्येक प्रांतात राधाकृष्ण आहेतच. 
बहुतेक सगळ्या गवळणींमध्ये राधा-कृष्ण म्हणजे प्रकृती-पुरुष हा संकेत आलेला आहे. राधा कृष्णाला रती आणि रस असेही समजले गेले आहे. चैतन्य संप्रदायात राधा ही परकीया आहे त्यामुळे तिचं प्रेम अधिक उत्कट समजले गेलेले आहे. मधुराभक्ती संप्रदायात ती कृष्णाच्या वामांगातून उत्पन्न झाल्याचे समजले गेले आहे. तिला कृष्णाची स्वामिनीही मानले गेले आहे. त्यामुळे त्यांचा शृंगार आणि त्याची शारीर वर्णने ही अंतिमतः अध्यात्मिक साज लेऊन येतात आणि लिहिणाऱ्यांना आणि वाचणाऱ्यांनाही सुसह्य होतात. तंजावरच्या, प्रतापसिंहराजे भोसले यांच्या पदरीच्या, मुद्दूपलनी या गणीकेने लिहिलेले राधिकासांत्वनम् हे तेलुगु काव्य मात्र अपवाद. (त्याचे मी केलेले मराठी भाषांतर आता पुस्तकरूपात येऊ घातले आहे.)   

काही गवळणी मात्र गंमतीशीर आणि आज धक्कादायक वाटतील अशा आहेत. राधा ही वयानी कृष्णापेक्षा बरीच मोठी आहे. त्याची मावशी आहे. ती एकदा बाळ कृष्णाला खेळवायला म्हणून आग्रहाने घरी घेऊन जाते आणि त्याचे मनोहर रूप पहाताच, हा बालक तरुणपणी किती देखणा दिसेल असा रतीभाव तिच्याठायी जागृत होतो. एकनाथ महाराज वर्णन करतात...

हृदयमंचकी बसविला, एकांत समय देखिला 
हळूच म्हणे कृष्णाला, 
लहान असशी.

कृष्ण म्हणे राधिकेसी, 
मंत्र आहे माझ्यापाशी,
थोर होतो निश्चयेसी, 
पाहें पा आता. 

तव बोले वनमाळी, 
थोर होतो हेची वेळी
डोळे झाकी तू वेल्हाळी, दावी विंदान.

एवढे बोलून कृष्ण तरुण रुपात सामोरा ठाकतो. राधा हरखते कृष्णाला आलिंगन देणार इतक्यात....

असता सुखे एकांतासी, भ्रतार आला त्या समयासी
उभा राहून द्वारासी, 
हाक मारी.

ऐकता भ्रताराचे वचन, घाबरले राधिकेचे मन,
धरी कृष्णाचे चरण, 
सान होई. 

कृष्ण बोले हास्य मुखे, 
मंत्र विसरलो या सुखे!!
भक्तवत्सला मनमोहना, शरण्ये का जनार्दना 

ऐकुनी राधेचे वचन, 
सान झाला!!

पण अखेर कृष्ण हसत हसत पुन्हा लहान होतो आणि राधे बरोबर आपलाही जीव भांड्यात पडतो. 


पुस्तकाचे मुखपृष्ठ श्री. संदीप देशपांडे यांनी यथायोग्य सजवले आहे. 
काही ठिकाणी द्विरुक्ती आहे तर काही ठिकाणी त्रीरुक्ती सुध्दा आहे. त्यामुळे संपादकीय कामाला अजूनही वाव आहे. 

साऱ्या परंपरेची इथे कौतुकाने केलेली नोंद आहे. मात्र ह्या परंपरेचे समाजशास्त्रीय, राजकीय, स्त्रीवादी विश्लेषण होण्याची गरज आहे. ते इथे नाही. ही या पुस्तकातली उणीव आहे.

Wednesday 14 September 2022

निवडक नरहर कुरुंदकर: पुस्तक परिचय

पुस्तक – निवडक नरहर कुरुंदकर
संपादक: खंड एक (संपादक विनोद शिरसाठ) 
खंड दोन (भाग १ संपादक विश्वास दांडेकर)
खंड दोन (भाग २ संपादक विनोद शिरसाठ) 
पुस्तकाचा प्रकार वैचारिक  
भाषा – मराठी
पृष्ठे.. अनुक्रमे २६०/३१८/२७२
मूल्य. अनुक्रमे .रू.३५०/३२५/३५०
प्रकाशक – देशमुख आणि कंपनी 
प्रकाशनकाल. अनुक्रमे प्रथमावृत्ती २०१३/२०१५/२०१७

परिचय कर्ता - डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

निवडक नरहर कुरुंदकर
खंड एक (संपादक विनोद शिरसाठ) 
खंड दोन (भाग १ संपादक विश्वास दांडेकर)
खंड दोन (भाग २ संपादक विनोद शिरसाठ) 

पुण्याला, पौड रोडवर पुस्तक पेठ म्हणून एक दुकान आहे. लेखक आणि पक्के विक्रेते संजय भास्कर जोशी यांचे हे दुकान. अगदी लहान वयात जोडोनिया धन उत्तम वेव्हारे, ते उदासपणे वेच करायचं असं ठरवून, त्यांनी जाणूनबुजून एका बड्या कंपनीतून निवृत्ती पत्करली आणि ते पुस्तकाच्या व्यवसायाला लागले. पण माणूस अंतरबाह्य लेखक आणि वाचक. त्यामुळे उत्सुकता म्हणून आत शिरलेले गिऱ्हाईक खिसा हलका झाल्याशिवाय मुळीच बाहेर पडत नाही. पण या माणसाच्या बोलण्याचे कसब असं, की इतकं होऊनही माणसांची पावलं पुन्हा पुन्हा या दुकानाकडे वळतात. 
सांगायचा मुद्दा मी असाच एकदा सुखेनैव या जाळ्यात शिरलो आणि जड पुस्तकं आणि हलका खिसा घेऊन बाहेर पडलो. 

त्यात हाती लागले तीन मौलिक ग्रंथ. निवडक नरहर कुरुंदकर! एकूण तीन खंड, एक व्यक्तिवेध आणि बाकीचे दोन ग्रंथवेध. श्री. भास्कर जोशी सांगत होते, कुरुंदकर अजूनही टॉप सेलिंग लेखक आहेत! पण हे दुकानाचे स्थानमाहात्म्य असावे किंवा माझी आवड लक्षात घेऊन केलेली टिप्पणी असावी!! असो. 

व्यक्तिवेध या भागात कुरुंदकरांनी लिहिलेले २१ लेख आहेत शिवाय कुरुंदकरांविषयी इतरांनी लिहिलेले चार लेखही या खंडात आहेत.   

त्यांची खासियत अशी की अपरिचित विषयावरील त्यांचे लिखाण वाचताना आपण सहज त्या विषयात तज्ञच झालो आहोत असे वाटायला लागते. इतके प्रवाही, मुद्देसूद आणि एकमेकांत गुंफलेली त्यांची विचार माला असते. आपल्याला विषय परिचित असला तरीही कुरुंदकरांकडे असलेली दृष्टी, साक्षेप आणि व्यासंग आपल्याकडे नसतो त्यामुळे आपण कल्पनाही केली नसते अशा कोनातून ते आपल्याला आपल्याच विषयाचे दर्शन घडवतात. काही इतिहासकालीन व्यक्ती काही समकालीन व्यक्ती आणि काही स्वतः विषयीचे लेखन यात समाविष्ट आहे. 
लोकहितवादी आणि सावरकर यांच्यावरचे लेख विशेष वाचनीय आहेत. विशेषतः ऐतिहासिक व्यक्तींच्या जातीनुसार त्यांची अप्रतिष्ठा करण्याच्या सांप्रतच्या काळात तर नक्कीच हे वाचायला हवेत. ‘मी आस्तिक का नाही?’ असा एक लेख आहे. बहुतेक अस्तीकांपेक्षा मी धार्मिक वांड्.मय अधिक वाचलेले आहे, सबब मी आस्तिक नाही, असे उत्तर ते देतात!! 

निवडक नरहर कुरुंदकर: खंड दोन हा प्रस्तावनांना आणि ग्रंथ समीक्षेला वाहिलेला आहे. याचे दोन भाग आहेत. 
प्रस्तावना अनेक कारणे लिहील्या जातात. बरेचदा कोणा नामवंताकडून भलामण एवढाच हेतू असतो. पण लेखकाच्या प्रतिपादनाच्या अगदी विरुद्ध मत मांडणाऱ्याही प्रस्तावना असतात आणि त्या छापणारे मोठ्या मनाचे लेखकही असतात. कधी आकृतीबंधाच्या मर्यादेमुळे लेखकाला सारेच मुद्दे मांडता येत नाहीत, मग प्रस्तावनाकार सांधेजोड करून देतो. 

ग्रंथवेध (भाग एक), हे सुमारे पावणे तीनशे पानी जाडजूड पुस्तक. आठ विविध पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना यामध्ये समाविष्ट आहेत. ‘श्रीमानयोगी’ची प्रस्तावना तर मला तरी कादंबरीपेक्षा अधिक भावलेली आहे. अशाच विचारांची चमक आपल्याला या आठही प्रस्तावनांमध्ये ठाईठाई दिसते. वसंत कानेटकर यांच्या हिमालयाची सावली या नाटकाची प्रस्तावना देखील अतिशय वाचनीय आहे. या नाटकामध्ये ‘हिमालय’ हा नायक नसून त्याच्या सावलीचेच हे नाटक आहे, असे आग्रही प्रतिपादन कुरुंदकरांनी केले आहे. कुरुंदकरांचे अफाट वाचन, सखोल चिंतन, इतिहास, संस्कृती आणि साहित्याचे आकलन पाहून आपण स्तिमित होतो. कोणताही विषय त्यांना वर्ज्य नाही आणि कोणतेही मत अकारण नाही. आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ ते बिनतोड युक्तिवाद करतात. या प्रस्तावना वाचणे ही एक बौद्धिक मेजवानीच आहे.

ग्रंथवेधच्या दुसऱ्या भागात एकूण पंधरा लेख आहेत. आमटेच्या 'ज्वाला आणि फुले' पाठोपाठ लेख येतो तो सुमती देवस्थळी यांच्या श्वाईटझरबद्दलच्या पुस्तकानिमित्ताने. मुद्दाम निमित्ताने असे लिहिले आहे. कारण इथे पुस्तकाची चर्चा नसून आमटे आणि श्वाईटझर यांच्या कार्याची, दृष्टीकोनाची आणि मान-मान्यतेची तुलना केली आहे. केशवसुत, सुर्वे आणि मनोहर यांच्या कवितांचे रसग्रहण इथे आहे. ‘गांधीहत्या आणि मी’ची परखड निर्भत्सना आहे. मात्र सगळ्यात चकित करणारा लेख आहे तो ओशोंच्या ‘संभोगातून समाधीकडे’ बद्दल. एक वेळ तुम्ही मूळ पुस्तक नाही वाचले तरी चालेल, पण कुरुंदकरांचे केलेली चौफेर चिकित्सा वाचलीच पाहिजे. संभोग, समाधी आणि संस्कृती या साऱ्या बद्दल वाचकांच्या जाणीवा प्रगल्भ करणारे हे प्रसन्न आणि संयत लिखाण आहे. 

पुस्तके मित्रासारखी असतात. 
हे तीन भारदस्त ग्रंथ म्हणजे तीन भारदस्त मित्रच जणू. दुरून दर्शनाने दबकून जायला होते, पण जवळीक वाढली की मोठे रसाळ, मधाळ आणि गोष्टीवेल्हाळ आहेत ही पुस्तके.

Tuesday 13 September 2022

कबीर: मंगेश पाडगावकर

कबीर
मंगेश पाडगावकर

परिचय डॉ. शंतनू अभ्यंकर 

‘कबीर’, हे मंगेश पाडगावकरांनी कबीराच्या निवडक रचनांचे केलेले मराठीमधील भाषांतर.
‘जल मे कुंभ, कुंभ मे जल है
बाहेर भीतर पानी
फुटा कुंभ, जल जल ही समाना
यही तथ कहो गीयानी’

असं अद्वैतत्वज्ञान दोन ओळीत सांगणारा प्रतिभावंत कबीर. याची ओळख आपल्याला काही म्हणी, वाक्प्रचारातून आणि भजनातून होत असते तो नेमके कशाला भजतो याचा शोध घ्यायचा असेल तर हे पुस्तक उत्तम आहे. 
या १४२ पानी पुस्तकाला, तब्बल ४२ पानी चिंतनाची जोड लाभली आहे. हे चिंतन कबीराची खरी ओळख व्हायला मदत करते. मुळात हे चिंतन वाचल्याशिवाय कबीराकडे वळण्यात अर्थ नाही. त्या अफाट कवितांइतकेच हे चिंतनही मनोहरी आहे. 
कबीराचा जन्म, त्याचे आयुष्य आणि मृत्यू हे सारे इतिहासात लुप्त झाले आहे. त्याबाबतच्या दंतकथा तेवढ्या शिल्लक आहेत. पण या दंतकथांतून आणि त्याच्या काव्यातून कबीराबद्दल काही अंदाज आपण बांधू शकतो. 
कबीर हा भल्याभल्यांना चकवणारा संत. राम, रहीम, हरी, अल्ला असे सगळे शब्द त्याच्या कवितेत येतात आणि मग तो हिंदू का मुसलमान, असा प्रश्न पडतो. खरंतर तो धर्मापलीकडे पोहोचलेला, धर्म-जात वगैरे भेद विसरून गेलेला असा माणूस होता; हे सरळ सरळ उत्तर आहे. पण हे उत्तर सुचूच नये आणि दुसऱ्यांनी कधी सुचवलं तर पटूच नये इतक्या टोकाचा धर्माभिमान आणि जात्याभिमान, देवभोळी, धर्मसोवळी आणि जातओवळी माणसंच उराशी बाळगून असतात. शिवाय हे उत्तर अत्यंत गैरसोयीचे आहे. देव-धर्म-जातीच्या सुखाची कांबळ-वाकळ सोडून कोण कशाला बाहेर पडेल? पण असल्या, धर्माच्या सत्य स्वरूपापेक्षा त्याच्या अवडंबरावर प्रेम करणाऱ्या माणसांवर, कबीराने टीकेचे आसूड ओढले आहेत; पण लक्षात कोण घेतो? राम, हरी, मुकुंद हे शब्द वैष्णवांना सोयीचे झाले; अगम, अकथ, अगोचर वाचून पाहून निर्गुणवाद्यांची चंगळ झाली. पण मी कुठल्याही एका पंथाचा अनुयायी नाही, जे मनाला पटलं तेच मी शब्दात सांगितलं असं कबीर म्हणतो. 
‘करत विचार मनही मन उपजी
ना काही गया आया.’
जे माझ्या मनाला पटले ते सांगितले, मी ज्ञानासाठी आणखी काही धुंडाळलेले नाही अशी ग्वाही तो देतो. 
संसाराच्या जोखडातून मुक्तीआड येणाऱ्या मायेलाही कबीराने बऱ्याच शिव्या दिल्या आहेत. माया म्हणजे आग, वेश्या, महाठगीन असा सूर कबीर काढतो. पण लवकरच कबीर यातून बाहेर पडतो आणि मग सारी मायावी सृष्टी हीच ईश्वर स्वरूप आहे अशी दृष्टी येते. आपणही सृष्टीचे अंश आहोत, तेंव्हा स्वतःत आणि सर्व जीवमात्रांत ईश्वरी अंश आहे ही समज दाटून येते. त्याला जणू मुक्तीचा मार्ग सापडतो. तो म्हणतो, 
 
‘घट घट में वो साई रमता’ 
किंवा 
‘कस्तुरी कुंडलि बसै, मृग धुंढै बन मांहि 
ऐसे घटी घटी राम है, दुनिया देखै नाहि’

आपण तीव्रतेने प्रार्थना केली तर ईश्वर आपल्याला त्रासातून मुक्ती देतो, आपली प्रार्थना कमी पडते आहे, आपणच करंटे आहोत; अशा कल्पना पार करत करत, ईश्वरकल्पना निसरडी आहे, ईश्वर आभाळात वगैरे नसून आपल्या आसपास, चराचरात आणि स्वतःत भरला आहे या जाणीवेपर्यंत, इतर काही संतांप्रमाणे, कबीरही पोहोचला आहे. 
मला नेहमी अशी शंका येते की काही अत्यंत बुद्धिमान आणि प्रतिभासंपन्न संतांनी, ‘देव दानवा नरे निर्मिले’ हे मनोमन ओळखले होते. पण तत्कालीन सामाजिक परिस्थितीमुळे म्हणा किंवा आणखी काही कारणाने म्हणा आपल्या मनातले नास्तिक विचार स्पष्टपणे मांडण्याचे त्यांनी टाळले आहे.
‘आहे ऐसा देव वदवावी वाणी
नाही ऐसा मनी अनुभवावा’

हे तुकारामाचे वचन प्रसिद्धच आहे. 
कबीर हा सर्वधर्मसमभावाचा शिरोमणी म्हणून मिरवला जातो. पण पाडगावकर म्हणतात, ही गोष्ट कबीराच्या अनुभूतीशी जुळणारी नाही. धर्म ही संकल्पनाच कबीराला मान्य नाही, मग कसला आला आहे सर्वधर्मसमभाव? तो कोणत्याही धर्माचा पुराण-प्रेषित, पवित्र-पोथी किंवा पंथ-प्रपंच मानत नाही. हे सारे म्हणजे भक्त आणि ईश्वर यात भिंत निर्माण करणे होय, असं तो सांगतो. थोडक्यात धर्म ही संस्था मान्य करणाऱ्या कोणालाही कबीर परवडणारा नाही. ‘देव न मानणारा देवमाणूस’ असं आगरकरांचे वर्णन केले गेले आहे. तसेच धर्म न मानणारा अध्यात्मिक माणूस असं कबीराचं वर्णन करावं लागेल. कबीर ईश्वर मानतो, माणुसकी मानतो, माणूस आणि ईश्वर अशी एकात्मता मानतो पण अनुभूतीशून्य पुस्तकी पांडित्य, जात आणि धर्म या तीन गोष्टी ठामपणे नाकारतो. 
‘माळा, टोपी घालून बसले, टिळा लाविला यांनी 
आत्मबोध नसताना भुलविती स्वतःस हे भजनांनी’

जाती-धर्माबद्दल तो म्हणतो,
‘स्मरून त्याला सत्य सांगतो, मी नच अंतर राखतसे
कबीर म्हणे त्या निर्मल ज्ञाना, विरळा कोणी जाणतसे.’

टिळा-माळांचे कौतुक कबीराला नाही. 

‘भक्ती वाचून माळ घातली 
रहाटास गाडगी बांधली’ 

असं त्याचं रोकडं सांगणे आहे. अध्यात्मिक क्षेत्रातील जप, तप, योग या गोष्टीनांही तो झटकून टाकतो. या साधनामार्गातून स्वतः कबीर गेला आहे पण नंतर त्यालाच हे सारे हास्यास्पद वाटू लागले आहे.

‘क्रियाकर्म आचार सोडिले, सोडियले तीर्थस्थाना,
सगळी दुनिया होय शहाणी, मला फक्त पागल माना’

असं खुलं आवाहन करतो. काही वेळा नाट्यपूर्ण प्रश्न विचारणे ही देखील कबीराची एक खासियत आहे. 

‘जे तू बाँभन, बँभनी जाया,
तौ आँन बाट व्हैं काहे न आया?
जे तू तुरक, तुरकनी जाया 
तौ भितरी खतनाँ क्यूँ न कराया?’

तू जर ब्राह्मण आहेस तर तू काय वेगळ्या वाटेने जन्माला आला आहेस का? आणि तू जर मुसलमान आहेस तर मग गर्भातच सुंता करून तुला कसं नाही धाडलं? असे बोचरे आणि दाहक प्रश्न कबीर विचारतो.

एकूणच कबीराची कविता विचार-चिंतनाच्या अंगाने जाणारी आहे. मुखड्यामध्ये एखादा तत्त्वज्ञानपर, उपदेशपर संदेश तो सांगतो आणि पुढे त्यासाठीची उदाहरणे देत जातो. बहुतेक संत कविता ज्या वेळेला अत्यंतिक प्रेम, निष्ठा, मधुराभक्ती अशा आशयाची वाटावळणे घेत होती, त्यावेळी कबीराची कविता मात्र, मुख्यतः विचारबहुल असल्यामुळे, ऐंद्रिय संवेदनांच्या वर्णनापेक्षा रूपकांच्या आणि प्रतीकांच्या मार्गाने जात होती. ही ‘कबीरबानी’ अतिशय रांगडी, सिधीसाधी आणि परखड आहे. विविध लोकसमूहातून वावरला असल्यामुळे अनेक बोली शब्द त्याच्या भाषेत येतात. हे कबीराचे वैशिष्ठ्य. आपल्या श्रोत्यांशी आपण थेट संवाद साधला पाहिजे या भावनेतून कबीराचे शब्द आले आहेत.
पाडगावकरांसारख्या बहुआयामी, बहुस्पर्शी प्रतिभा लाभलेल्या कवीने हे समृद्ध भाषांतर केले आहे. डाव्या पानावर मूळ ओळी तर उजव्या पानावर त्यांचा अनुवाद असं हे छापलं आहे. त्यामुळे या काव्याची लज्जत आणखी वाढली आहे. जुने हिंदी वाचून आपल्याला अर्थाचा अंदाज येतो मात्र पाडगावकरांचे भाषांतर वाचतात तो अर्थ रसाळपणे उलगडला जातो.

मासला म्हणून कुमार गंधर्वांनी लोकप्रिय केलेल्या कबीराच्या, ‘झिनी झिनी बीनी चदरिया’ या गीताचा मूळ पाठ आणि नंतर पाडगावकरांनी केलेला हा अनुवाद.

झिनी झिनी बीनी चदरिया, 
काहे कै ताना, काहे कै भरनी, 
कौन तार से बीनी चदरीया 
इंगला पिंगला ताना भरनी, 
सुसमन तार से बीनी चदरिया 
आठ कँवल दस चरखा डोलै, 
पाच तत्तगुन तीनी चदरिया
साईं को सियत दस मास लागै, 
ठोक ठोक के बीनी चदरिया 
सो चादर सूर-नर-मुनि ओढिन, 
ओढिके मैली कीनी चदरिया 
दास कबिर जतन से ओढिन, 
ज्यों की त्यों धर दीनी चदरिया 

तलम मुलायम विणली चादर,
कुठला ताणा, कुठली भरणी 
कुठला दोरा, विणली चादर
इडा पिंगला ताणाभरणी, 
सुषुम्न-दोरा, विणली चादर     
पाचही तत्वे, त्रिगुण, चक्रदश,
अष्टकमल ही विणली चादर 
स्वामी घे दस मांस विणाया 
ठोक ठोकुनी विणली चादर 
पांघरुनी सूरनरमुनि यांनी
मलीन ही केलेली चादर 
अतिशय जपुनी ती वापरूनी
परत दिली कबीराने चादर

Monday 12 September 2022

विवाहबाह्य संबंध आणि नंतर, पुस्तक परिचय

विवाहबाह्य संबंध आणि नंतर
मूळ लेखक डॉ. विजय नागास्वामी 
अनुवाद डॉ. मोहना कुलकर्णी 
पुस्तकाचा प्रकार मार्गदर्शन  
भाषा – मराठी
पृष्ठे.. २४०
मूल्य.....रू.२००
प्रकाशक – मिडिया वॉच 
प्रकाशन काल...प्रथम आवृत्ती ऑगस्ट २०२१
परिचयकर्ता: डॉ. शंतनू अभ्यंकर 

‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर’, या एका अत्यंत स्फोटक विषयावरच्या अभ्यासपूर्ण पुस्तकाचा परिचय मी आज करून देणार आहे. लेखक आहेत डॉ. विजय नागास्वामी हे चेन्नाईतील विख्यात मानसोपचार तज्ञ आणि भाषांतर केलंय डॉ. मोहना कुलकर्णी यांनी. एका अत्यंत उपयुक्त पुस्तकाचं हे उत्तम भाषांतर आहे.
डॉ. विजय नागास्वामी यांची विवाहपूर्व मार्गदर्शनाबद्दल ‘ट्वेंटी फोर बाय सेवन मॅरेज’ आणि वैवाहिक सहजीवनाबद्दलचे ‘फिफ्टी फिफ्टी मॅरेज’ याचेही मराठी अनुवाद उपलब्ध आहेत. हे त्यांचे तिसरे पुस्तक. याचं मूळ  नाव ‘थ्री इज अ क्राउड’. याचा सार्थ मराठी अनुवाद ‘तीन तीगाडा काम बिघाडा’ असं असावं असं मला आपलं वाटतं.  अनुवादक  डॉ. मोहना कुलकर्णी यांनी ‘अफेअर: विवाहबाह्य संबंध आणि नंतर’, या नावाने हे सादर केले आहे.  डॉ. कुलकर्णी स्वतः एमडी (मेडिसिन) असून २५ वर्ष अमरावती येथे खाजगी वैद्यकीय व्यवसाय केल्यानंतर त्यांनी समुपदेशनाचे शिक्षण घेऊन पूर्ण वेळे समुपदेशनाचे काम सुरू केले. ही झाली त्यांची अभ्यासक म्हणून ओळख. पण वाचक मंडळींना डॉ. कुलकर्णींची खरी ओळख म्हणजे ‘किस्त्रीम’चे संपादक कै.शांताबाई आणि कै.मुकुंदराव किर्लोस्कर यांच्या त्या कन्या.

‘कोंबडीशिवाय उरूस नाही आणि भानगडीशिवाय पुरुष नाही’; ‘एक गाव बारा भानगडी’ वगैरे म्हणी आणि शीर्षके काही उगीच उगवलेली नाहीत.   भानगड हा विषय गावगप्पांचा, गरमागरम, खमंग, मसालेदार चर्चांचा असल्यामुळे त्यात गुंतलेल्यांवर सहजच अनैतिकतेचा शिक्का मारून आपण मोकळे होतो. त्यांच्या वैयक्तिक सुखदुःखाकडे, फरफटीकडे फार गंभीरपणे पाहत नाही. वास्तविक अशा मंडळींना आणि त्या परिस्थितीला समजावून घेण्याची आवश्यकता आहे, असा  सूर लेखकाने लावला आहे.

आपल्या विषयाचा अतिशय सखोल आणि सर्वंकष अभ्यास असल्यामुळे शब्द काय वापरावेत याचा लेखकाने आणि भाषांतरकर्तीने  सखोल विचार केला आहे. म्हणजे अफेअरचे वर्णन करताना फसवणूक, विश्वासघात, दुटप्पीपणा, दगाबाजी असे अनेक नकारात्मक छटा असलेले शब्द टाळून जाणीवपूर्वक ‘प्रतारणा’ असा शब्द लेखक वापरतो. त्याचबरोबर हा शब्द वापरताना या प्रेमत्रिकोणातील कुठल्याही कोनाला तो गुन्हेगार ठरवू इच्छित नाही. भानगडीतल्या तिसऱ्या कोनाला ‘प्रियकर’ किंवा ‘प्रेयसी’ऐवजी ‘प्रेमपात्र’ असा शब्द इथे वापरला आहे.

अफेअर्स सध्या वाढली आहेत, निदान मोबाईल आणि  सीसीटीव्हीच्या जमान्यात ती लक्षात येण्याचे प्रमाण तरी नक्कीच वाढले आहे. पण अफेअर झालं म्हणजे सगळं संपलं असं नाही. या चक्रवातातून सुखरूप बाहेर पडता येते आणि त्यानंतर पती-पत्नीचे नातं अधिक सजगपणे  हाताळून, सहजीवन अर्थपूर्ण, आनंदी व समाधानी बनवणे शक्य आहे, नव्हे आवश्यक आहे अशी लेखकाची भूमिका आहे.

भानगड केली तर काय बिघडलं काय? या प्रश्नाने पहिलं प्रकरण सुरू होतं. लग्न ही कृत्रिम आणि मानवनिर्मित संस्था आहे आणि अनेक जोडीदार असणे हे नैसर्गिक. मग असं असताना आयुष्यभर एकच जोडीदार हे शक्य तरी आहे का? एकावेळी एकापेक्षा अधिक व्यक्तींवर प्रेम करणे शक्य आहे का? एकापेक्षा अधिक जोडीदार राखण्याची प्रथा असलेल्या समाजाचे काय? जर मला विवाहबाह्य संबंधातून प्रेम, परिपूर्ती, कामतृप्ती मिळत असेल तर माझ्या जीवाचा जिवलग मी का सोडू? पुराणातल्या देवादिकांनीही भानगडी केल्या, सगळेजण करतात, तर मी का नाही? अशा अनेक रंजक पण स्फोटक प्रश्नांची चर्चा या प्रकरणात येते.

शेवटी या सगळ्या प्रकरणात/भानगडीत गुंतलेल्या व्यक्तींना काय वाटतं हेच महत्त्वाचे ठरतं. एखाद्या जोडप्याला ही प्रतारणा वाटत असेल तर ती प्रतारणा आहे, कोणाला तसं वाटत नसेल तर ती नाही. पण अशी प्रकरणे म्हणजे काही भयंकर अध:पात, दुष्टावा, कावेबाजपणा, बेफिकीरी किंवा अनादर वगैरे नसते.

पुढे लेखकाने प्रेमप्रकरणाची पाच वैशिष्ट्ये सांगितली  आहेत. 
१.भावनिक जवळीक
२.लैंगिक संबंध
३.गोपनीयता 
४.अपराधभाव 
५.अवलंबनाची गरज 
या पाचपैकी दोन वा अधिक लागू पडत असतील, तर ते ‘प्रेम प्रकरण’ आहे हे निश्चित; अशी शास्त्रीय व्याख्याही केली आहे.

भानगडी म्हणजे बिघडलेल्या संसाराचे लक्षण, एकदा भानगड झाली की लग्न मोडलंच म्हणून समजा, काही माणसं  भानगडबाज असतातच, पुन्हा विश्वास ठेवणे कसं शक्य आहे?, मीच वाईट म्हणून हे माझ्या वाट्याला आलं, प्रेम प्रकरणे काय फक्त पुरुषांचीच असतात?...अशा अनेक मुद्द्यांची चर्चा पुढे आलेली आहे.

प्रेमप्रकरणे होतातच का याचेही सखोल विश्लेषण केलेले आहे. घरी समाधान होत नाही, काहीतरी चेंज हवा, सायबर सेक्स, घडलं बुवा!, फक्त भावनिक नातं असणारी प्रकरणे, मित्रांचे दडपण आणि काही मानसिक समस्यांमुळे अशी प्रकरणे घडतात हे स्पष्ट केले आहे. 

या सगळ्या समस्येचा इतका उहापोह केल्यानंतर आपण पुस्तकाच्या उत्तरार्धाकडे येतो. इथे अफेअर घडल्यानंतर त्यातून तरुन  जाण्यासाठी, संसार टिकवून ठेवण्यासाठी आणि नुकसान भरून काढण्यासाठी काय करायला हवं, याचा सविस्तर चर्चा केली आहे. प्रतारणा वाट्याला आलेली असताना देखील त्रयस्थपणे या प्रश्नाकडे कसं बघायचं, विचार कसा करायचा, याचे मार्गदर्शन या भागात मिळते. नैराश्य, चिंता, तिरस्कार अशा अनेक भावनांची वावटळ मनामध्ये उठत  असतात.  त्यांचं व्यवस्थापन आणि विरेचन कसं करावं याची उपयुक्त माहिती इथे दिलेली आहे.
अफेअर लक्षात येताच तात्काळ कराव्याशा वाटतात पण करू नयेत अशा गोष्टींची यादीच दिलेली आहे. तत्क्षणी घटस्फोटासाठी वकिलाकडे जाणे, सतत माझ्याशी असं का वागलास? असे विचारत राहणे, भानगडीचे सगळे बारीक-सारीक तपशील गोळा करत बसणे, खुन्नस म्हणून आपण एक उलट भानगड करणे, जोडीदाराला सोडून निघून जाणे या गोष्टी टाळाव्यात असं लेखकाच्या म्हणणं आहे.

काय करावे हेही इथे दिले आहे. दैनंदिन व्यवहार नेहमीप्रमाणे लवकरात लवकर सुरू करावेत, स्वतःला वेळ द्यावा, झाल्यागेल्याची चर्चा उगाळत बसू नये, सकारात्मक भावनांचे स्वागत करावे आणि मनाला शांत करणाऱ्या गोष्टी कराव्यात मात्र याचाही अतिरेक टाळावा अशा अनेक गोष्टी लेखक सुचवतो.

प्रतारणा झालेल्या व्यक्तीबरोबरच प्रतारणा करणाऱ्या व्यक्तीचे सारे काही गुलाबी असते असे नाही. तिथेही वाट्याला दुःख असते, शरम, पश्चात्ताप, मानहानी, अपराधभाव, निराशा, चिंता, स्वतःचा तिरस्कार, नाराजी, खिन्नता अशा भावनांची वावटळ त्याच्या/तिच्याही वाट्याला येते. 

शेवटी शहाणपण देगा देवा असं म्हणून क्षमाशीलता आणि विश्वास यावर सहजीवनाची पुनःश्च्य उभारणी शक्य असल्याचे दाखवून देत लेखक पुस्तकाचा समारोप करतो. 
डॉ. कुलकर्णींनी  अतिशय सफाईदारपणे अनुवाद केला आहे. एका शास्त्रीय विषयावरचे हे मूळ इंग्रजी पुस्तक आहे अशी शंकासुद्धा आपल्याला येत नाही. गजानन घोंगडे यांचे मुखपृष्ठ गंमतीशीर आणि अर्थपूर्ण आहे. 
बिनभानगडीचे, म्हणजे अफेअर-प्रूफ लग्न, असं काही नसतंच. त्यामुळे अफेअर झालेल्यांनी आणि न झालेल्यांनी वाचावं असं हे पुस्तक आहे, असं लेखकाचं म्हणणं आहे आणि मी लेखकाशी सहमत आहे.

Sunday 11 September 2022

आठवणीतल्या कविता भाग १ ते ४

आठवणीतल्या कविता भाग १ ते ४
संपादक: पद्माकर महाजन, दिनकर बर्वे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन
परिचयकर्ता डॉ. शंतनू अभ्यंकर

आठवणीतल्या कविता हे संकलन १९९७ साली विकत घेतले, ते बाबांना वाढदिवसाची भेट म्हणून. त्या पाठोपाठ त्याचे तीन खंड आले मग तेही घेतले. दूर सातासमुद्रापलीकडे अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या कुणा आजोबाला आपल्या नातवासाठी ‘पडूं आजारी’ ही कविता हवीहवीशी झाली. भारतातले अनेक मित्र या शोधांत सामील झाले. ती  जाम सापडेना. मग अनेक सुहृद या शोधांत सामील झाले. शोधता शोधता शालेय पुस्तकातल्या इतरही कवितांची सय आली साऱ्यांना. या आठवणींनी सारेच रसिक मन व्याकूळ झालं. जुन्या जुन्या शालेय कविता शोधायचं पिसं या शोधकांना लागलं. मग या साऱ्याचा संग्रह करायची टूम निघाली. त्याचा परिपाक म्हणजे हे संकलनाचे चार खंड.  
या कवितांचा शोध आणि शोधांचे किस्से मोठे मजेदार आहेत ते सारे मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ‘सायंकाळची शोभा’अशी भा.रा.तांब्यांची कुठलीही कविता नाही. भा.रा.तांब्यांची मूळ कविता ‘रासमंडळ गोपीचंदन’ या नावाने आहे; त्यात सायंकाळचे वेगळे काढता येण्यासारखं वर्णनही नाही; पण त्या कवितेच्या निरनिराळ्या कडव्यातल्या काही ओळींची उलट सुलट जुळणी करून, वर काही ओळी भरीला घालून संपादकांनी ‘सायंकाळची शोभा’ ही शालेय कविता जुळवली आहे!! पण ही कविता भा.रा.तांब्यांची म्हणून जनमानसात प्रतिष्ठा पावली आहे. 
‘आहे मनोहर तरी गमते उदास!’ ही कविता म्हणजे समस्यापूर्तीसाठी दिलेला चौथा चरण होय. या समस्यापूर्तीच्या स्पर्धेत ‘सरस्वतीकंठाभरण’ (गणपत राव उर्फ दादासाहेब बापूजी शिंदे) यांची श्लोकमाला उत्कृष्ट ठरली आणि तीच ही प्रसिद्ध कविता. अशा अनेक गमतीच्या गोष्टी या संग्रहाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत पोहोचतात. 
हा संग्रह, भेट म्हणून बाबांना जरी दिला असला तरी तो माझ्याच टेबलावर विराजमान आहे! कधीही काढावा, कुठलेही पान उघडावे आणि कवितानंदात रममाण व्हावे, असे हे हृदयस्पर्शी पुस्तक आहे. पद्माकर महाजन, दिनकर बर्वे, रमेश तेंडुलकर आणि राम पटवर्धन यांनी हा उद्योग आरंभला तेंव्हा त्याला वाचकांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळेल अशी त्यांनाही कल्पना नव्हती. आपला हा व्यापार देहूच्या वाण्यालाही लाजवेल असा  आहे असं त्यांचं मत होतं पण वाचकांचा आश्चर्यकारक आणि भरघोस प्रतिसाद या संकलनाला मिळालेला आहे.
शाळेत असताना कविता आवडत असोत वा नसोत, त्या आपल्या मनात रुतून बसतात हे खरं. मग पुढे कधीतरी त्या रुजून येतात आणि अशी संकलने हाती येताच त्या तरारून उठतात. मी शाळेत असतानाच्या अगदी मोजक्याच कविता या संग्रहात आहेत. पण म्हणी, वाक्प्रचार किंवा सुभाषिते म्हणून कित्येक काव्य-चरणांचा आसपास संचार असतोच. अशा कवितांच्या ओळी आणि मूळ कवितांच्या मखरात इथे अवचित भेटतात. मागच्या दोन-तीन पिढ्यांच्या तोंडी असलेले श्लोक, कविता, इथे पूर्ण रूपात दिसतात. बरेचदा कवितेतील एखादी ओळ किंवा ध्रुवपद तेवढा आपल्याला आठवत असतं आणि संपूर्ण कविता गवसताच  आपला आनंद गगनात मावत नाही. साकी, दिंडी, अभंग, कामदा, स्त्रग्धरा, शार्दुलविक्रडित, मंदाक्रांता, शिखरिणी, इंद्रवज्रा अशा विविध वृत्तांतल्या कविता मोठ्याने म्हणायला खूप मजा येते. साहित्यात कुठे कुठे वाचलेले चमकदार शब्दसमूहांचे मूळ कित्येकदा  कवितांतून आढळते. या सगळ्यात आपण हलकेच हरवून जातो. 
पण सगळ्यात हरखून जावं अशी गोष्ट म्हणजे कवितांबरोबर मूळ पाठ्यपुस्तकात असलेली काही चित्रही इथे दर्शन देतात आणि आपल्याला शालेय जीवनात घेऊन जातात. मग चित्रातील बायकांना आपण काढलेल्या दाढीमिशाही दिसायला लागतात!  ते असो, पण त्या कवितांबरोबर या चित्रांनीही आपल्या मनात नकळत घर केलेले असते. कोण होते हे चित्रकार? हे बरेचसे अनाम आणि उपेक्षित. या   चित्रकारांबद्दलचे टिपण आहे चौथ्या भागात. ते  मुळातून वाचण्यासारखे आहे. 
संकलनाच्या चारही भागाची मुखपृष्ठे पद्मा सहस्त्रबुद्धे यांची आहेत. या आठवणीतल्या कविता आहेत, त्याबद्दलच्या तरल, गूढ, धूसर प्रेमभावना आणि गोड हुरहुर  त्या मुखपृष्ठांतून व्यक्त झाली आहे. आपली नजर या चित्रांवरच खिळून राहते. एका अतिशय मन:स्पर्शी प्रकल्पाला अंतर्मन:स्पर्शी मुखपृष्ठे  लाभली आहेत. माझ्या कडची पुस्तके आता जुनी झाली आहेत. चित्रांचे सौंदर्य लक्षत यावे म्हणून इथे नेटवरून घेतलेली चित्रे टाकली आहेत.  
संपादनाची दिशा स्पष्ट करणारे टिपण, इतर टिपा, पहिल्या ओळीची सूची वगैरे असल्यामुळे या संकलनाचा वापर हौशी तसेच अभ्यासू वाचकांना अतिशय सुलभ झाला आहे. वाचनीय, चिंतनीय, मननीय, संग्राह्य, प्रगल्भतादायक असे हे संकलन आहे. तुमच्या संग्रही असलेच पाहिजे.

Friday 2 September 2022

मच्छर, मलेरिया आणि चिन्युर्वेद

 

मच्छर, मलेरिया आणि चिन्युर्वेद 

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

एक साला मच्छर आदमी को हिजडा बना देता है!! तसंच झालंय. डास आणि त्याच्या उदरातील ते मलेरियाचे जंतू यांनी आदमी, औरत, बच्चा आणि एकूणच हिवताप निर्मूलन कार्यक्रमाला हिजडा बनवून टाकलं आहे!!

मलेरियाचे चार प्रकार आहेत. पैकी फाल्सीपारम हा सगळ्यात दाहक. सर्वार्थाने. सगळ्या मलेरीयातले मिळून निम्मे पाप याचे.  सर्वात जास्त मृत्यू यामुळे होतात. सर्वाधिक मातामृत्यू, गर्भपात आणि उपजत मृत्यू याच्याच कारणे घडतात. आणि नुकसान फक्त मेल्यामुळेच  होतं असं थोडच आहे? आजारपण, बुडालेले उत्पन्न, जडलेला अॅनिमिया, त्यातून  उणावलेली उत्पादन क्षमता; हे हिशोबात धरलं तर मलेरिया, न मरतासुद्धा, बराच महागात पडतो. शिवाय हा गरीबाघरचा आजार. उघडी गटारे, नाले, डबकी यांच्याकाठच्या नागड्या जनतेला जडणारा. मलेरियाचा पिचका फटकासुद्धा गरिबाघरी वर्मी लागतो.

मलेरियाच्या जंतूंचा प्रवास हा माणसातून अॅनाफलीस डासाच्या मादीत आणि डासीणीतून माणसात असा होत राहतो. नर डास माणसाला चावत नाहीत. हे अतिशय गुंतागुंतीचे जीवनचक्र आहे. यातली डासीणीतली कडी उलगडून दाखवली ती सर रोनाल्ड रॉस यांनी. हा शोध २० ऑगस्ट १८९७चा. म्हणूनच २० ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक मच्छर दिन’ म्हणून साजरा केला जातो. माणसांनी डासांविरुद्ध उभा दावा मांडला असला तरी,  डासांनी ‘जागतिक माणूस दिन’ मुक्रर केल्याचं माझ्या माहितीत नाही. माणूस त्यांच्या खिजगणतीतही नसावा. पण एक साला मच्छर माणसाला किती अगतिक करून सोडतो बघा!

तर, सर डॉ. रोनाल्ड रॉस यांचा जन्म १८५७सालचा. अलमोऱ्याचा. आईबाप ब्रिटिश. शिक्षण इंग्लंडात. डॉ. रॉस भारतीय सैन्यात डॉक्टर होते. अंदमान, बर्मा, चेन्नई, उटी असं अनेक ठिकाणी त्यांनी काम आणि संशोधन केलं. अचानक त्यांची बदली राजपुतान्याला झाली. तिथे मलेरिया कमी. मग बऱ्याच प्रयत्नांनी त्यांनी मलेरियाग्रस्त पोस्टिंग मिळवलं आणि अभ्यास सुरु ठेवला. आपल्या अभ्यासातून त्यांनी मलेरियाचे जंतू हे रक्तपिपासू डासीणीच्या पोटात आणि तिथून अंतिमतः तिच्या लाळेच्या ग्रंथीत पोहचतात हे सिद्ध केलं. अशी डासीण डसली की लाळेद्वारे जंतू आपल्या शरीरात टोचले जातात आणि आपल्याला मलेरिया होतो.  हे संशोधन ‘अर्थपूर्ण’ ठरले.

कारण मलेरिया आणि अशा अनेक आजारांचे संशोधन निव्वळ मानवी पीडामुक्तीच्या प्रेरणेतून झालेले नाही. वसाहतीतील गरीब बिच्चाऱ्या प्रजेच्या नक्त कळवळ्यापोटी झालेले नाही.  हे आजार विषुवृत्तीय साम्राज्य विस्ताराला अडथळा ठरत होते, म्हणून  त्यावरील संशोधनास युरोपीय प्रोत्साहन मिळालं.  सुएझ आणि पनामा कालवे खणले जात होते तेंव्हा अनेक मजूर अनेकानेक साथींना बळी पडत होते.  अनेक भूशास्त्रीय आव्हानांसहित हे जीवशास्त्रीय आव्हानही होते. सुएझला जाऊन, परिस्थिती अभ्यासून मलेरियारोधक उपाय सुचवण्याचे काम डॉ.रॉस यांनी केले. त्यांच्या एकूण कामगिरीसाठी १९०२ सालचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

अर्थात हेतू काहीही असो, या संशोधनाचा उपयोग भारताला झालाच झाला. कोणे एके काळी भारतात मलेरिया अगदी आटोक्यात आला होता. भारत सरकारने, १९५३ साली, डीडीटीच्या सहाय्याने मलेरियाविरुद्ध लढा पुकारला. पाच वर्षात अगदी नाट्यमय फरक पडला. इतका की राष्ट्रीय मलेरिया ‘नियंत्रण’ कार्यक्रम हे नाव बदलून, राष्ट्रीय मलेरिया ‘निर्मुलन’ कार्यक्रम असं महत्वाकांक्षी बारसं करण्यात आलं (१९५८). मलेरियाने मृत्यू मुळी शून्यावर आले. यश अगदी नजरेच्या टप्प्यात आलं.

ही मुख्यत्वे क्लोरोक्वीनची कमाल. ‘ताप? कदाचित हिवताप असेल, क्लोरोक्वीन खा!’ आणि या ओळीखाली गोळ्यांचा चित्ररूप डोस. आंतरदेशीय पत्रावर छापलेली ही माहिती अनेकांना आठवत असेल. एखादा आजार किती सर्वहारक असू शकतो आणि त्याचे उपचार, निदान प्रथमोपचार, किती सर्वतारक असू शकतात याचे हे उत्तम उदाहरण. आफ्रिकेतील काही देशात तर क्लोरोक्वीन टपऱ्यांवरती आणि हातगाड्यांवरसुद्धा उपलब्ध होतं. आफ्रिकी शाहिरांनी क्लोरोक्वीनवर लावण्यासुद्धा रचल्या आहेत! क्लोरोक्वीन नावाचं साधंसुधं औषध; असं वाटलं, याने  कोट्यवधी जीव वाचले आहेत, वाचत आहेत आणि वाचत रहातील.

 पण या यशामुळे यंत्रणा हुरळून गेली, थोडा गाफिलपणा आला, डास डीडीटीला पुरून उरले आणि मलेरियाचे जंतू क्लोरोक्वीनला पुरून उरले. सुरवातीला क्लोरोक्वीनला सहजी बळी  पडणारा फाल्सीपारम आता क्लोरोक्विन पचवू लागला! इतिहासात सात वर्ष, तीस वर्ष, चाललेली युद्ध आहेत. पण माणूस विरुद्ध हिवताप  हे तर शतकानुशतके चाललेले युद्ध. क्लोरोक्वीनचा शोध लागला आणि माणसाची सरशी झाली. यावर मात करणारे फाल्सीपारम  उत्क्रांत झाले आणि मलेरियाची सरशी झाली. डीडीटीचा शोध लागला आणि माणसाची  सरशी झाली. डीडीटीचे घातक परिणाम लक्षात आले, वापर थांबला आणि पुन्हा मलेरीयाने डोकं वर काढलं. गाडी पुन्हा निर्मुलनावरून नियंत्रणाकडे आली (राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम). कीटकनाशक-भारित मच्छरदाण्या, कीटकनाशक फवारे, डासांची अंडी खाणारे गप्पी मासे, झटपट निकाल देणाऱ्या नैदानिक तपासण्या आणि नवी, आर्टेमिसिनीन गटातील, मलेरिया संहारक औषधे, अशी आता नवी सूत्रे आहेत. आर्टेमिसिनीन गटातील ही नवी औषधे, वरदान म्हणावीत इतकी प्रभावी आहेत. त्यामुळे सध्या माणसाचे पारडे जड आहे. पण अजूनही जय पराजय निश्चित ठरलेलाच नाही. तेंव्हा ‘सुखदु:खे समेकृत्वा, लाभालाभौ जयाजयौ’ असं म्हणत,  ‘ततो युद्धाय युज्यस्व’ला पर्याय नाही.

या क्लोरोक्वीनचा आणि आर्टेमिसिनीनचा इतिहासही रंजक आहे.

क्लोरोक्वीन हे क्विनीनचे परिष्कृत रूप. क्विनीन हे सिंकोनाच्या खोडापासून बनवलेले. सिंकोना ही दक्षिण अमेरिकेतली  एक वनस्पती. पेरू आणि बोलिव्हियात तापावर उतारा म्हणून सिंकोनाची ख्याती. सतराव्या शतकात युरोपीयनांनी दक्षिण अमेरिकेचा ताबा घेतला. तोवर तिथे मलेरिया नव्हता म्हणे. युरोपीयनांनी मलेरिया नेला. तो तिथे पसरला. तापावरील स्थानिक उतारा होता सिंकोना वनस्पतीचा रस. हा हिवतापावर गुणकारी असल्याचे लक्षात आले आणि  आणि युरोपला सिंकोना माहित झाले. मग त्यातील गुणकारी घटक अलग करण्यात यश आलं. तो घटक क्विनीन. मग त्याचे कृत्रीम रूप शक्य झाले, ते क्लोरोक्वीन. क्लोरोक्वीनचा दणक्यात वापर सुरु झाला. मलेरियाला चांगलाच दणका बसला. पण अती वापरामुळे, लवकरच ह्याला दाद न देणारे फाल्सीपारम उगम पावले आणि क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरलं.

साठच्या दशकातील गोष्ट. व्हिएतनाम युद्ध ऐन भरात होतं. उत्तर व्हिएतनामी फौजांइतकच डासांनी आणि मलेरीयानी अमेरिकन सैन्याला  घायाळ केलं होतं. क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरत होतं. युद्धात शहीद होणाऱ्यांपेक्षा चौपट सैनिक  हिवतापाने गारद होत होते.   अमेरिकेतील वॉल्टर  रीड  प्रयोगशाळेनी दोन लाखावर रसायने तपासली. त्यातून मेफ्लोक्विन बनवलं, हालोफँट्रीन बनवलं; पण जेमतेमच यश पदरी आलं.  हो ची मिन्हच्या उत्तर व्हिएतनामी फौजांचीही काही वेगळी परिस्थिती नव्हती. एजंट ऑरेंज इतकाच (एखाद्या प्रदेशातील झाडी नष्ट करणारे, अमेरिकेने बेमुर्वतखोरपणे वापरलेले रसायन) हिवताप या सैन्याला हुडहुडी भरवत होता.

उत्तर व्हिएतनामने चीनपुढे हात पसरले. या संकटातून सोडवा अशी करुणा भाकली. आणि चेअरमन माओ यांच्या आदेशाने सुरु झाला मलेरियारोधक औषधाचा शोध. मे २३, १९६७ रोजी सुरवात झाली. म्हणून हा प्रोजेक्ट ५२३. शास्त्रज्ञांची फौज कामाला लागली. ह्याद्वारे, पारंपारिक चिनी जडीबुटीतील, चिनी आयुर्वेदातील, चिन्युर्वेदातील म्हणूया आपण, हजारो पारंपारिक वनस्पती अभ्यासल्या गेल्या. या जडीबुटी-मंथनातून अखेरीस ६४० कल्क, काढे, आसव  वगैरेची यादी करण्यात आली. त्यातील गुणकारी घटक वेगळे केले गेले. त्यांचे जैव-रासायनिक गुणधर्म तपासण्यात आले, पण व्यर्थ. या शोधादरम्यान गे होंग विरचित ‘तातडीच्या उपचारांचा निघंटू’ (इ.स. २८१-३४०) या प्राचीन चिनी ग्रंथात क्विन्घौ या वनस्पतीच्या ज्वरहारक गुणांचा   उल्लेख सापडला होता. पण क्विन्घौच्या अनेक उपजाती होत्या. त्या बाबत स्पष्टता नव्हती. झाडाचा नेमका कोणता भाग वापरायचा हेही सांगितलेले नव्हते. बहुतेक वनस्पती उकळून काढा करून दिल्या जात. गे होंग यांच्या मते क्विन्घौ मात्र निव्वळ गार पाण्यात भिजवून त्यात उतरलेला अर्क तेवढा वापरायचा आहे. हे वाक्य कळीचे ठरले. आजवर प्रयोगात ह्याचेही काढे बनवले जात होते. ती पद्धत बदलताच क्विन्घौने (Artemisia annua) आपले गुण प्रकट केले.  अनेक प्रयोगांती  या चिनौषधीतील गुणकारी घटक लक्षात आला, तो होता आर्टेमिसिनीन (१९७२).

तो जमाना सांस्कृतिक क्रांतीचा होता. हा तर सामरिक महत्वाचा गुप्त कार्यक्रम होता. संशय हा वातावरणाचा  स्थायीभाव होता. या शास्त्रज्ञांना रेड गार्डसची भीती होती. लहरी वरिष्ठांची दहशत होती. जरा जपून आणि गुप्तपणे काम करावं लागत होतं. कोणाची वक्रदृष्टी पडली तर हेरगिरीचा आरोप ठेवतील, सारी सॅपल्स जप्त होतील, कागदपत्र नष्ट करतील अशी चिंता होती. अर्थातच या अडथळ्याच्या शर्यतीमुळे खूप वेळ गेला. आर्टेमिसिनीनचे त्रिमितीरूप ठरवणे बरेच जिकीरीचे गेले. पण अखेरीस जमले. हे जमल्यामुळे कारखान्यात उत्पादनाचा मार्ग मोकळा झाला नाहीतर निव्वळ झाडावर अवलंबून रहावे लागले असते. आज नऊ तऱ्हांनी हे बनवता येतं. 

तत्कालीन चीनमध्ये संशोधनाच्या नावाने आनंदच होता. प्राण्यांवर (१९७१) आणि पुढे मनुष्यप्राण्यांवर (१९७२) जे अभ्यास झाले ते यथातथाच होते.  पण मुळात औषधच इतकं उपयुक्त आणि प्रभावी होतं की यथातथा चाचण्यातही ते सोन्यासारखं झळाळून दिसलं. आता माओचा अस्त झाला होता. सांस्कृतिक क्रांती शमली होती. डेंग झायोपिंग नवे सर्वेसर्वा होते आणि साम्यवादी-बाजार-अर्थव्यवस्थेचा (communist market economy) बोलबाला होता. नव्या औषधाचे बाजारमूल्य डोळ्यात भरताच, डेंग यांच्या दोन मुलांच्या देखरेखीखालील, एका स्वतंत्र कंपनीकडे हे संशोधन सुपूर्द करण्यात आले. तरीही जगापुढे ही माहिती यायला १९८० साल उजाडले.

या संशोधनासाठी २०१५ सालचा नोबेल पुरस्कार प्रा. युयु टू, या (अस्सल चिनी नावाच्या,) संशोधक  बाईंना मिळाला. राष्ट्रीय चिन्युर्वेद संशोधन संस्थेच्या माध्यमातून हे सारे संशोधन पर पडले. क्विन्घौ ही वनस्पती प्रथम नजरेस आणली ती त्यांनीच, त्यातील आर्टेमिसिनीन वेगळा केला तो त्यांनीच, त्यात आवश्यक रासायनिक बदल केले तेही त्यांनीच,  पहिले मानवी प्रयोग केले ते त्यांनीच; इतकेच नाही तर त्या औषधाच्या सुरक्षिततेची खात्री पटवण्यासाठी त्यांनी स्वतःही ते सेवन केले होते!  

हे औषध मलेरियाच्या जंतूंचा नायनाट करते हे माहित असलं तरी नेमके कसे, हे अजूनही समजलेले नाही. फ्री रॅडीकल, डीएनए, अमिनो अॅसिड अथवा पेप्टाइडवर हल्ला; अशा अनेक शक्यता आहेत. पण कार्यकारणभाव माहित असणे ही औषधाच्या वापरासाठी अत्यावश्यक पूर्वअट नाही! हे वाचून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण आधुनिक वैद्यकीत वापरल्या जाणाऱ्या कित्येक औषधांची नेमकी कार्यपद्धती आपल्याला आजही अज्ञात आहे. औषधाची परिणामकारकता आणि सुरक्षितता सिद्ध होणे महत्वाचे. नेमका कार्य-मार्ग समजला तर उत्तमच आहे, पण आवश्यक नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने २००१साली आर्टेमिसिनीनला मान्यता दिली. आज आर्टेमिसिनीनला,  जगभर, हिवताप विरोधात प्रथमपूजेचा आणि प्रथमास्त्राचा मान आहे. ही आधुनिक वैद्यकीची खासियत. एकदा औषध उपयुक्त आणि सुरक्षित सिद्ध झालं की ते झाडपाल्याचं आहे, का चिन्युर्वेदीक आहे,  का इंका आहे का अॅझ्टेक याचा जराही मुलाहिजा न बाळगता सरळ ते आपलंसं केलं जातं! मात्र जोवर उपयुक्तता आणि सुरक्षितता सिद्ध होत नाही तोवर, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर हा हेका कायम ठेवला जातो.  बुरशी, जीवाणू, एचआयव्ही, कॅन्सर वगैरेविरुद्धही  आर्टेमिसिनीनने काही प्रताप दाखवला आहे. त्याचाही अभ्यास सुरु आहे.

क्लोरोक्वीन निष्प्रभ ठरले आणि हे चिनी औषध हाताशी आले. मलेरिया निदान आटोक्यात तरी राहिला. उद्या हे औषध निष्प्रभ ठरणार नाही कशावरून? ठरेलच. आणि पर्यायी औषध अजून तरी दृष्टीपथात नाही मग मलेरिया पुन्हा डोकं वर काढणारच. पण औषधाला प्रतिकार निर्माण होण्याआधीच मलेरियाला चीत करणे शक्य आहे. नवी नवी औषधे  हा उपाय नाहीये तर प्रभावी औषधे स्वस्तात उपलब्ध करून, त्यांचा  झटपट, सर्वदूर वापर  ही गुरुकिल्ली आहे. आर्टेमिसिनिनने शंभर दोनशे रुपयात  काम होऊन जातं. पण इतकेही पैसे परवडणारी जनता या धरणीवर आहे. त्यामुळे योग्य औषधोपचाराविना माणसं आजही मलेरियाला बळी पडत आहेत. औषध नुसतं असून भागत नाही. ते गरिबांपर्यंत, म्हटलं तर फुकटात, पोहोचावे लागते, तरच त्याचा प्रभावी वापर करता येतो. नफ्याच्या हव्यासापोटी औषधे महाग होत जातात. हतबल जनता आणि सरकारे ती वापरण्याचे अर्धेकच्चे प्रयत्न करत राहतात. माणसं मरत राहतात. खिसे भरत राहतात.

 

प्रा. युयु टू या राष्ट्रीय चिन्युर्वेद संस्थेच्या संशोधक. त्यांच्या मते पूर्वजांनी जे सांगून ठेवलं आहे त्यातील हेम ओळखण्याची दृष्टी आपल्याकडे नाही. इसवी सनाच्या तिसऱ्या चौथ्या शतकातील हे निरीक्षण आज कामी आलं. धन्य ते द्रष्टे चिनी ऋषी, धन्य ते चिनी मुनी, धन्य ती चिनौषधी, धन्य तो चिन्युर्वेद! हा अभिमान वृथाभिमान अथवा दुराभिमान ठरायचा नसेल तर त्याला वैज्ञानिकतेची चौकट हवी हे ही त्यांनी नमूद केले आहे. 

गूढगंभीर प्राचीन ग्रंथात अशी अनेक रत्ने दडलेली असतीलही. अज्ञाताच्या पोटात अनंत शक्यता वास करून असतात. पण शक्यता म्हणजे शोध नव्हे. त्या शक्यता प्रत्यक्षात आल्या नाहीत तर त्यांना परीकथांहून अधिक किमत नाही. प्रश्न असा आहे की आर्टेमिसिनीनचे श्रेय कुणाचे? प्राचीन चिनी मुनींचे का वैज्ञानिक पद्धतीचे? ही आणि इतर शेकडो झाडपाल्याची औषधे तापावर गुणकारी असल्याचे निरीक्षण निर्विवादपणे प्राचीन  आहे. पण ह्या शेकडोंतील हीच सर्वात प्रभावी आणि सुरक्षित आहे; ह्यातील अमका घटक हिंवतापावर गुणकारी आहे; त्याची निर्मिती अशा तऱ्हेने शक्य आहे; माणसांत ते अमुक इतके प्रभावी आणि तमुक इतके सुरक्षित आहे; अन्य औषधांशी असेअसे सख्य अथवा वैर आहे; वगैरे ज्ञान केवळ त्या वंदनीय चिनी मुनिवर्यांच्या कल्पना, शास्त्र, पद्धती, ग्रंथ आणि तंत्र वापरून शक्य तरी होते का? ही सारी माहिती शोधण्याची तंत्रे, आधुनिक विज्ञानाची देन आहेत. जुन्यातील सामर्थ्य ओळखण्याची दिव्यदृष्टी आधुनिक विज्ञानाच्या सहाय्यानेच शक्य आहे. चिन्युर्वेदातील एक औषध आधुनिक विज्ञानाच्या कसास उतरल्यामुळे अख्खा चिन्युर्वेद आपोआप तर्कसिद्ध ठरत नाही.     क्विन्घौबद्दल  एक निरीक्षण उपयुक्त सिद्ध झाले पण त्याच बरोबर चिन्युर्वेदातील इतर शेकडो चिनौषधींबाबत हजारो निरीक्षणे गैरलागू सिद्ध झाली!

निरीक्षण ही तर पहिली पायरी. स्वागतशील आणि दिशादर्शक. नामदेवाच्या ह्या पायरीला नमस्कार केल्याशिवाय मंदिरात कसे शिरणार? पण म्हणून त्या पायरीवरच अडून राहिलो, पुढची पायरी चढायचेच नाकारले, या पायरीलाच विठ्ठल म्हणून पुजत बसलो, तर खऱ्या विठ्ठलाचे दर्शन कधीतरी  होईल का?  

प्रथम प्रसिद्धी

अनुभव

सप्टेंबर २०२२