Tuesday 30 June 2020

गथ्री, भाटिया, शिरोळ आणि सरकार

गथ्री, भाटिया, शिरोळ आणि सरकार

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

फिनायल अलानीन हे एक अमायनो आम्ल आहे. हे अन्नातून आपल्याला मिळतं. आपण बहुतेक सारे ते पचवतो आणि त्यापासून  प्रथिने बनवतो. पण काहींत जनुकीय दोषांमुळे ही यंत्रणाच नसते. मग अशांच्या  शरीरात फिनायल अलानीन साठत जातं. अगदी घातक प्रमाणात साठत जातं. इतकं साठतं, इतकं साठतं की शेवटी लघवीवाटे उतू जातं. ह्याला म्हणतात फिनाईल-कीटोन-युरिआ. फिनायल अलानीन पचवता न येणे, ह्या आजाराचे हे व्यवच्छेदक लक्षण.  म्हणून मग ह्या आजाराला म्हणतात फिनाईलकीटोनयुरिआ. नाव आहे दमछाक करणारे, म्हणून मग पीकेयू हे त्याचं लघुरूपच रूढ आहे.

आहे की नाही भारदस्त नाव? उगाच खरुज, नायटा, गजकर्ण असं आलतूफालतू, देशी नाही. चांगलं आंग्लभाषाविभूषित नाव. फिनाईलकीटोनयुरिआ!  आजार व्हावा तर असा. होतो ना असा आजार. लाखो में एक अशा एखाद्याला होतो. अमेरिकेत होतो. भारतात होतो. ज्यांना होतो त्यांना काय काय होतं? सुरवातीला  काहीच होत नाही. मग हळू हळू  त्यांचा मेंदू बाद होतो. मूल मतिमंद होतं.  मेंदू बाद झाल्यावर मगच हा आजार असल्याचे कळतं. हळू हळू आपले कुरूप रूप तो उघड करतो.

तसा हा अभिजात आजार. जन्मापासून असणारा. फक्त तो आधी जाणवत नाही. पूर्वी जन्मतः निदान करायची पद्धतच नव्हती. पण आता आहे. जन्माच्या तिसऱ्या दिवसानंतर, टिपकागदावर बाळाच्या रक्ताचा एक थेंब टिपला जातो आणि ह्या वाळलेल्या थेंबावर चाचणी करून फिनाईलकीटोनयुरिआचे निदान करता येते. मग बाळाला  फिनायल अलानीन मुक्त आहार देऊन  मतिमंदत्व आणि आयुष्यभराचे लाजिरवाणे जिणे, टाळता येते. आईबापाची फरपट टाळता येते. अगदी छान नॉर्मल वाढते बाळ. पण जर वेळेत निदान आणि उपचार झाले तर, आणि तरच.

ह्या जन्मतः  तपासणीचा जनक होता एक अमेरिकन डॉक्टर, डॉ. रॉबर्ट गथ्री (१९१६-१९९५). तसा गरिबीतून वर आलेला. म्हणजे आदर्श नायकच की. बापाचे ठिकठिकाणी नोकऱ्या मिळवणे. त्या जाणे. शाळेत यथातथा, मग कमवा आणि शिका योजनेत अखेर विद्यापीठात प्रवेश. मग डॉक्टरकी सकट अगदी अल्प काळात त्याचे इतर पाच डिग्र्या खिशात घालणे. पण डॉक्टर होऊनही याचे मन रमले ते जंतूशास्त्रात. त्यानी ठिकठिकाणी नोकरी केली. छोकरी तर केलीच होती. लवकरच कमावते हात दोन आणि खाणारी तोंडे सहा अशी परिस्थिती आली. त्यात त्याचा दुसरा मुलगा मतीमंद. त्याला सांभाळणे हा आणखी एक व्याप होता. स्वतः डॉक्टर असूनही या मतीमंद मुलाचा नेमका आजार काय याचा काहीही पत्ता लागला नव्हता. त्याला सांभाळायचा मोठा प्रश्न होता त्याच्यासमोर. कित्येक डॉक्टरनी त्याला कायमचे एखाद्या बालसंगोपन गृहात टाकण्याचा सल्ला दिला. पण ह्याला काही तो पटला नाही. सेवा आणि करुणा त्याच्या रक्तातच होती बहुतेक.

पुढे त्याची भेट डॉ. रॉबर्ट वॉर्नर यांच्याशी झाली. ते पीकेयूवाली  मुले तपासत असत. ह्यांच्या रक्तातील फिनायलअलानीन वेळोवेळी तपासावं लागे आणि  तपासण्यासाठी दरवेळी तब्बल वीस मिली रक्त घ्यावे लागे. तेंव्हा ह्यासाठी सोपी, पद्धत त्यांना हवी होती. डॉ. गथ्रीनी मदतीची तयारी तर दाखवलीच पण तीनच दिवसात टेस्टही पुढ्यात ठेवली. आता निव्वळ पाच थेंबात भागणार होतं!

गथ्रीची युक्ती सोपी होती. पेशंटचे रक्त टिपकागदाच्या टिकलीवर टिपून घ्यायचे. प्रयोगशाळेत बॅसिलीस सबटीलीस हे जंतू वाढवायचे (कॉलनी). मग त्यावर काही जंतूरोधके टाकून त्यांची वाढ रोखायची. मग त्या जंतूंच्या कॉलनीत कागदाच्या रक्तलांछित टिकल्या ठेवायच्या.  रक्तात फिनायलअलानीन  असेल तर ते जंतूरोधकाचा नाश करते आणि जंतू प्रच्छन्नपणे वाढतात. नसेल तर वाढत नाहीत. ह्या जंतूंच्या वाढीवरून फिनायलअलानीन आहे वा नाही हे ओळखता येईल अशी डॉ. गथ्रीची अटकळ. इतकेच काय, पेशंटची रक्तलांछित टिकली आणि  ज्ञात प्रमाणात फिनायलअलानीन लावलेल्या टिकल्यांची तुलना करून, फिनायलअलानीनचे प्रमाणही ठरवणे शक्य झाले. (बॅक्टेरिअल इन्हीबिशन अस्ये) डॉ. रॉबर्ट वॉर्नर यांचा प्रश्न अशा रीतीने सुटला होता.

योगायोग असा की गथ्रीच्या सख्ख्या भाचीला पीकेयू असल्याचे निदान झाले!! मग मात्र  गथ्रीने  पिकेयूचा पिच्छा सोडला नाही. भाची होती सव्वीस वर्षाची. पिकेयूचे निदान होता होता इतका काळ लोटला होता. तिचा मेंदू आता पूर्णपणे बाधित झाला होता. अपरिवर्तनिय बदल झाले होते. उपचार होता फिनायलअलानीन नसलेले अन्न देणे. पण आता उपाय करून काय उपयोग. झालेली इजा काही भरून येणार नव्हती.  

गथ्री विचारात पडला. लवकरात लवकर  निदान झाले तर? अगदी जन्मतः निदान झाले तर?  तर ही सारीच शोकांतिका टाळता येईल की. जन्मतःच ‘अशा’ बाळांसाठी  ती टिकलीची तपासणी करता येईल. फिनायल अलानीन सापडेल अशा बाळांना योग्य आहार सुरु करता येईल. बाळं वाचतील.  पण ‘अशा’ म्हणजे कशा? जन्मतः अशी बाळे इतर बाळांसारखीच तर दिसतात. कुशंका यावी असं काही म्हणजे काही आढळत नाही त्यांच्यात. मग आता एकच उपाय उरला. जन्मतः सगळ्याच बाळांची चाचणी करणे! गथ्रीने ह्या कल्पनेचा पाठपुरावा केला. लवकरच हा प्रस्ताव अमलात आला. लवकर निदान झाल्यामुळे मतिमंदत्व टाळता येऊ लागले. लवकरच (१९६१) दोघां बहिणींची छबी असलेले  पोस्टर अमेरिकाभर  झळकले. दोघीही पिकेयूवाल्या. थोरली मतीमंद, पिकेयूमुळे मेंदू-बाधा झालेली. तर दुसरी, जन्मतः तपासणीत पिकेयू-बाधीत आढळलेली पण योग्य आणि वेळीच झालेल्या पथ्योपचारामुळे अगदी ठणठणीत.

हे शुभवर्तमान सांगायला मग डॉ. गथ्रीनी बराच प्रवास केला. देशोदेशीच्या डॉक्टरना हे पटवून दिलं आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने गॅलेक्टोसेमिया, मॅपलसिरप युरीन डिसीज अशा  आणखी सुमारे तीस निरनिराळ्या  आजारांसाठी जन्मतः करण्याजोग्या चाचण्या शोधून काढल्या. वेळेत निदान आणि उपचार झाल्यामुळे कित्येकांची एरवी निरर्थक ठरली असती अशी आयुष्ये अर्थपूर्ण झाली, सुफळ संपूर्ण  झाली.

हे तंत्र सर्वांना उपलब्ध व्हावं म्हणून त्यानी खूप खस्ता खाल्या. ज्या कंपनीला त्यानी तपासण्यांचे  हक्क विकले ती कंपनी किट्स तर पुरेसे तयार करेचना पण वर अव्वाच्यासव्वा दाम मागू लागली. कंपनीची किंमत होती  अडीचशे डॉलर. मग गथ्रीनी स्वतः सहा डॉलरात किट्स बनवले, त्यापायी कोर्ट कज्जे लढवले. शेवटी स्वस्त आणि सार्वत्रिक तपासणी त्यानी अंमलात आणलीच. गरिबीनी रंजलेला समाज आजारांनीही गांजलेला असतो. ‘हेल्थ इज वेल्थ’ हे खरंय पण ‘वेल्थ इज हेल्थ’ हेही तितकंच खरंय. आरोग्य राखण्यासाठी फारसा पैसा लागत नाही पण आजार जर झाला तर तो रोखण्यासाठी पैसाच पैसा लागतो. ज्याच्या गाठीशी पैसा तो उत्तम उपचार विकत घेऊ शकतो. जो गरीब तो लवकरच ह्या जगाचा निरोप घेतो. पिकेयूग्रस्त मुलांना जन्मभर फिनायल अलानीन मुक्त अन्न देणं हे एक आर्थिक आव्हानही असतं. मग हे पथ्याचं अन्न स्वस्तात मिळावं म्हणून तो लढला. गथ्री हा असा कर्ता सुधारक होता. वर्णविरोधी चळवळीत तो होता, अणुचाचण्याविरुद्धच्या चळवळीत तो होता.

आता काळ बदलला. गथ्रीचे तंत्र आता कोणीच वापरत नाही. त्याचा तो टिपकागद मात्र अजून वापरात आहे. त्याला म्हणतातच गथ्री कार्ड.  आता जमाना टांडेम मास स्पेक्ट्रोस्कोपीचा आहे. ही अधिक नेमकी, अधिक बिनचूक, अधिक सोपी, अधिक स्वस्त चाचणी. पण अर्थात म्हणून गथ्रीचे महत्व कमी होत नाही. उलट या वाटेवरच्या त्याच्या पहिल्यावाहिल्या पाऊलखुणा आजही आपल्याला स्फूर्तीदायी ठरतात.  आजही अशा दुर्मिळ आजारांचे निदान जिकिरीचे आहे. आजही अशा व्यक्तींचे जिणे  मुश्किलच आहे. पण गथ्रीसारखी सेवाभावी आणि करूणार्द्र माणसे आजही आहेतच.

जयपूरचा साडीवाला विकास भाटीया तुम्हाला माहीत आहे? किंवा बंगलोरचा प्रसन्न शिरोळ हा बडा मॅनेजर? शक्यच नाही माहित असणं. काही अभागी जीवांनाच असली माणसं माहित असतात. ही दोन्ही असामान्य माणसे आहेत. दोघांनाही दुर्दैवाने मुलं झाली ती अगदी दुर्मिळ आजारांनी ग्रस्त.

श्री. विकास भाटीयांना पाठोपाठ तीन मुलं झाली आणि  तिनही मुलं पायरूव्हेट कार्बोक्सायलेज डिफिशिअन्सीनी तान्हेपणीच दगावली. त्यांचे निदान होणे, ते निधन होणे हा प्रवास, तीनदा भोगावा लागलेला हा भोग, खूप खडतर होता.

श्री. प्रसन्न शिरोळ यांना एकोणीस वर्षाची मुलगी आहे, निधी. निधीला लायसोसोमल स्टोरेज डिसॉर्डर आहे. आहे एकोणीस वर्षाची. बीकॉम झाली आहे पण तिला सतत व्हेन्टिलेटर लावूनच जगावं लागतं. गेली एकोणीस वर्ष तिची आई, जणू तिची  चोवीस तासाची नर्स आहे.

अशा बहुतेक दुर्मिळ आजारांची कारणे अत्यंत गुंतागुंतीची. आपण अन्न खातो. बहुतेक अन्नघटक म्हणजे भलेथोरले रेणू असतात. यांचे बारीक बारीक तुकडे करूनच ते पचवले जातात. म्हणजे अन्नमार्गात शोषले जातात. शोषून घेतल्यानंतर या कच्या मालातून आपले शरीर घडते. म्हणजे पुन्हा हे छोटे छोटे रेणू जोडून मोठे रेणू बनतात आणि  त्यातून आवश्यक ते अवयव बनवले जातात. स्नायू, त्वचा, मेंदू, सर्वकाही. अन्नाचे हे विघटन आणि त्यापासुन शरीराचे पुनर्घटन म्हणजेच चयापचय  क्रिया. मर्फीचा नियम सांगतो की जर गोची होऊ शकत असेल तर ती होतेच. तशी ती चयापचयक्रियेत  हरएक पायरी वर होऊ शकते आणि होतेही. मग तिथून पुढे सारी यंत्रणा कोलमडते. शरीराचे सुटे भाग नीट बनतच नाहीत. शर्करा, मेद अथवा प्रथिनांत हवी ती रचना साधत नाही, नकोशी द्रव्ये शरीरात साठत जातात आणि सर्वत्र हाहाकार उडतो. म्हणजे फक्त विटांच्या किंवा फक्त वाळूच्याच भिंती बांधल्या किंवा वायरी वापरताना उघडया वायरी वापरल्या तर जे घराचं होईल ते आपल्या शरीराचं होतं.

हे आजार दुर्मिळच नाहीत  तर अतिदुर्मिळ. डॉक्टरांनी परीक्षेला ऑप्शनला टाकलेले आजार हे.  त्यांची शंका आली तर महागड्या तपासण्यांचा प्रश्न आणि तपासण्या परवडल्या तर उपचार... किंवा उपचार नाहीतच ही विषण्ण जाणीव. आजार दुर्मिळ जरी असला, अगदी लाखोमें एकास होणारा जरी असला, तरी ज्याला होतो त्याला तो शंभर टक्के होतो. त्याचे दुखः बावनकशीच असतं.

असं दुखः श्री. विकास भाटिया आणि श्री. प्रसन्न शिरोळ यांच्या वाट्याला आलं. पण वैयक्तिक दुखा:चे हलाहल पचवून ते इतरांचे अश्रू पुसायला पुढे सरसावले.  मग डोकं आणि तंत्रज्ञान वापरून अशा आजारग्रस्तांसाठी त्यांनी संघटना काढली (www.merdindia.com किंवा www.ordindia.org). हेल्पलाईन सुरु केली (+91 8892 555 000). जाणीव जागृतीची मोहीम काढली. पिकेयू सारख्या आजारात विशिष्ट अन्न हेच औषध आहे. तेंव्हा हा भार विमा कंपन्यांनी उचलावा असा युक्तिवाद मांडला. सरकार दरबारी खेटे घातले. आता सरकारही मदत, मार्गदर्शन वगैरे देऊ करते आहे (https://diet4life.fssai.gov.in/index.html आणि  https://mohfw.gov.in/diseasealerts/rare-diseases). केरळ, गोवा, मुंबई आणि लखनौला काही आजारांची जन्मतः तपासणी सुरु झाली  आहे. भारतमातेच्या सर्वच लेकरांना ही उपलब्ध व्हावी असा त्यांचा प्रयत्न आहे. पण अजून खूप रेटा  लावायला हवा. जोरदार मागणी व्हायला हवी.

आज भारतात ह्या तपासण्या खूप महाग आहेत. पण त्या महाग असण्याचे एक कारण, त्या क्वचित वापरल्या जातात हेही आहे. जर सर्वच बाळांची  जन्मतः अशी तपासणी केली तर मास प्रॉडक्शनच्या नियमांनी किमत १५००रू वरून २५०रू पर्यंत उतरेल असं एक गणित आहे. असा जनआरोग्य-अर्थशास्त्रीय अभ्यास झाला तर ही मागणी किती योग्य आहे याचे मूल्यमापन शक्य होईल. पण सकृतदर्शनी ही मागणी अनाठायी वाटत नाही. अर्थात तपासणी ही पहिली पायरी. तपासून, नुसतेच आजाराचे नैदानिक शिक्के मारून, काम संपणार नाही. उपचार, समुपदेशन, पुढील गरोदरपणी घेण्याची काळजी, पुढच्या वेळी गर्भावस्थेतच निदान, अशा सर्व बाबी हातात हात घालून व्हायला हव्यात. हे काम चालू आहे. भाटीया किंवा शिरोळ  हे एकांडे शिलेदार नाहीत. त्यांना अनेकांची साथ आहे, सरकारची साथ आहे आणि हे वाचून वाचकांचीही साथ मिळेल अशी मला खात्री आहे.

सारे काही सुरळीत असताना, अचानक झटके येऊन तान्हे मूल तडकाफडकी जाणं किंवा कायमचं परावलंबी होणं हे अघटितच. लोकं आजकाल कोणत्याही वैद्यकीय अघटितासाठी डॉक्टरांना जबाबदार धरतात. कधी कधी नुसतेच जबाबदार धरत नाहीत तर  धरून धोपटतात सुद्धा. एका दृष्टीनी हे चांगलंच आहे. आपल्या दु:खावरचा  उपाय ते इहलोकी शोधत आहेत असा याचा एक अर्थ. पण मूल तडकाफडकी गेलं किंवा कायमचं परावलंबी झालं, तर या आभाळभर  दुःखावरचा उपाय शोधण्याचा श्री. विकास  भाटीयांचा किंवा श्री. प्रसन्न शिरोळांचा मार्ग मला जास्त श्रेयस्कर वाटतो.

 

 

 


Friday 26 June 2020

गोळी बिळी; औषध बिवषध

गोळी बिळी; औषध बिवषध
डॉ. शंतनू अभ्यंकर

कोणतेही औषधी गुणधर्म नसलेली द्रव्ये, उदाः पिठाच्या गोळ्या किंवा पाण्याची इंजेक्शने, ‘औषध’ म्हणून दिली, तरी माणसांना बरं वाटतं! हे सत्य आहे. आपण औषध घेतोय ही भावनाच मनाला, शरीराला उभारी देते. अशा औषधी-गुण-मुक्त द्रव्याला प्लासिबो म्हणतात आणि प्लासिबोनी बरं वाटण्याला प्लासिबो परिणाम. तुम्ही ‘गोळी’ द्या नाहीतर ‘बिळी’ द्या काहींना काही प्रमाणात तरी बरं वाटतच. अर्रे व्वा!! बिळी! मस्त शब्द सापडला की प्लासिबोला. औषधाची ती गोळी आणि बिन औषधाची ती बिळी! याच चालीवर ‘औषध’ आणि ‘बिवषध’, ‘शस्त्रक्रिया’-‘बिस्त्रक्रिया’ असेही शब्द वापरता येतील. या लेखापुरते तरी मी आता हे शब्द ह्याच संदर्भात वापरीन हं.

जसा सकारात्मक परिणाम दिसतो, बरे वाटेल या अपेक्षेने बिळी घेतली तर बरं वाटतं, तसंच नकारात्मक परिणामही दिसतो. याला म्हणतात नोसिबो परिणाम. आता काहीतरी बिनसणार, असं मनानी घेतलं की काहीतरी बिनसतेच. साईड इफेक्ट पासून जपून हां, असं सूचित केलं की काय काय व्हायला लागतं. मळमळेल हां, असं म्हटलं की मळमळतं; चक्कर येईल हां, असं म्हटल की चक्कर सुद्धा येते.

नवीन औषधांची चाचणी करताना, प्लासिबो परिणाम ही गोष्ट अत्यंत महत्वाची ठरते. औषध दिलंय, बरंही वाटतंय, पण ते औषधामुळे की निव्वळ औषध दिल्याच्या कृतीमुळे? एखाद्याला औषध दिल्यानंतर बरं वाटलं याचा अर्थ ते त्या औषधामुळे वाटलं असा होत नाही. कावळा बसायला आणि फांदी मोडायला एक गाठ पडू शकते. अन्य कोणत्यातरी घटकांनी बरे वाटलेले असू शकते आणि त्याचे आयते श्रेय औषधाला जातंय असंही होऊ शकते. हे आणि असे सर्व प्रभाव दूर केल्यावरच औषधाचा प्रताप काय ते लख्खपणे दिसू शकते. म्हणूनच उत्तम चाचण्यात एका गटाला औषध आणि दुसऱ्या गटाला रस-रंग-रूप-गंध अगदी औषधासम असलेले बिवषध (प्लासिबो औषध) दिलं जातं. औषधवाल्यांना बिवषधवाल्यांपेक्षा ‘बर्रर्रच बरं’ वाटलं, संख्याशास्त्रीयदृष्ट्या लक्षणीय फरक पडला, तर ते औषध खरं.

पण हे बिन-औषधी औषध काम तरी कसे करते? विचारांचा प्रभाव मेंदूतील विविध स्रावावर पडतो; (उदाः मॉर्फिनसारखी द्रव्य (ओपिऑइड्स) झरू लागतात;) सहनशक्तीत, प्रतिकारशक्तीत काही बदल होतात आणि आजार उतरणीला लागतो; असा ढोबळ कार्यकारणभाव सांगता येईल. पण याचा अर्थ बिवषधामुळे कँन्सर बरा होतो किंवा कोलेस्टेरॉल कमी होते किंवा चमत्कार घडतात असे मात्र नाही. प्लासिबो परिणाम म्हणजे चमत्कार नाही फार तर ह्याला चमत्कारिक परिणाम म्हणता येईल. तुम्हाला बरं ‘वाटतं’ पण तुम्ही बरे ‘होता’ असं नाही. वेदना सुसह्य होते, झोप लागते, थकवा, मळमळ वगैरे कमी भासते; इतकंच. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचे आणि बरेचसे रुग्ण यांच्या दर्शनमात्रेमान, प्रसन्नवदने, उल्हसित होत्साते घरी परतायचे. हा सुद्धा प्लसिबो परिणाम. आणि बिळीच कशाला, नुसतं दवाखान्यात जाणे, गर्दीत नंबर येणे, एका पांढऱ्या कोटातल्या पोक्त माणसाने साग्रसंगीत तपासणे, लायनीत उभे राहून त्या रंगीबेरंगी गोळ्या पदरात पाडून घेणे आणि मग त्या उपाशी, तुपाशी, अशा सांगितल्याबरहुकूम खाणे, हे कर्मकांडही प्लासिबो परिणामाचेच रूप. वेदनाशामक इंजेक्शन, ‘आता मी कळ थांबायचं इंजेक्शन देतेय हं’, असं सांगून सवरून शुभ्रवस्त्रावृता ‘नर्स’नी दिले तर कमी डोस लागतो आणि आपोआप मशीनने सोडले तर जास्त! डोळ्यादेखत जर कुणाला कशानी बरं वाटलं, उदाः शेजारच्याचं इंजेक्शनने दुखायचं थांबलं, तर रुग्णालाही त्याच कृतीने बरं वाटतं. दिलेल्या गोळ्या प्लासिबो आहेत असं स्पष्ट सांगूनही गोळ्या लागू पडल्याचे पेशंट सांगतात याचा अर्थ काय? गोळीत औषध नाहीये पण गोळी घेण्याच्या कृतीत ते आहे.

कसा घडतो हा परिणाम? ह्या बिवषधानी बऱ्याच जणांना कोड्यात टाकलं आहे. बिवषध दिलं की बरं वाटतं, अगदी नाडीचा वेग कमी होणे वगैरे परिणामही दिसतात. पण काही मर्यादेतच. याला अनेक कारणे आहेत. काही साधीशी आणि बरीचशी गुंतागुंतीची.

मुळात पुरेसा त्रास झाला की माणूस औषध घ्यायच्या भानगडीत पडतो. तेंव्हा कित्येक किरकोळ आजार हे काही कालावधीनंतर, औषध घ्या अथवा नका घेऊ, आपोआप बरे होणारच असतात. पण श्रेय औषध बिवषध किंवा उपचार बिपचार पळवतात.

आता आपल्याला औषध दिलंय, सबब आता बरे वाटणार बरंका, असं मनाला बजावलं की आपोआपच, बऱ्याची चिन्ह सापडायला लागतात. (‘आर्थिक फटका बसेल’ असं भविष्य वाचून दिवसभर फटक्याची वाट पहावी तद्वतच हे)

गोळीनी बरं वाटतं ह्या पूर्वानुभवातून मेंदू ‘शिकतो’. पाव्हलोव्हचा एक प्रसिद्ध प्रयोग आहे. कुत्र्याला अन्न देताना दर वेळी घंटा वाजवली तर काही दिवसांनी निव्वळ घंटेच्या आवाजानी कुत्र्याला लाळ सुटते; अन्न समोर नसलं तरीही. अशा रीतीने प्रतिक्षिप्त क्रियाही पढवता येतात हे पाव्हलोव्हने दाखवून दिले. म्हणूनच गोळी घेऊन बरं वाटतं हे एकदा मनात बसलं की गोळी ऐवजी बिळी देऊनही काम भागतं!! अर्थात गोळी ती गोळी आणि बिळी ती बिळी. बिळीचा परिणाम सातत्यपूर्ण आणि समतुल्य नसतो. तो लगेचच उणावतो. बरेचदा पेशंटला फक्त आराम ‘वाटतो’ प्रत्यक्षात फरक पडलेला नसतो. एका अभ्यासात दम्याच्या गोळीवाल्या आणि बिळीवाल्या पेशंटला सारखंच बरं वाटलं पण प्रत्यक्षात नेमके मोजमाप करता गोळीवाल्यांचे श्वसन कितीतरी सुलभ होत होतं.

थोडक्यात प्लासिबो इफेक्ट हा गूढरम्य का काय म्हणतात तसा आहे. काया आणि मन यांच्या सीमारेषेवरचा प्रकार आहे हा. अशी सारी बिवषधे तात्कालिक आणि मर्यादित का असेना, पण सुपरिणाम घडवतात ते यामुळेच. बिवषधाबरोबरच मंत्रतंत्र, गंडेदोरे, अंगारेधुपारे, कर्मकांड असा समसमा संयोग असणाऱ्या अनेकानेक उपचारपद्धती आब राखून आहेत, पेशंटच्या मनात घर करून आहेत, ‘मला तर बुवा चांगला गुण आला’ असे फॅन फॉलॉइंग बाळगून आहेत, ते यामुळेच. अंधविश्वास, अंधश्रद्धा, छद्मउपचार वगैरेला (अन्य) माणसं कशी काय बुवा बळी पडतात?, ह्या प्रश्नाचे थोडेसे उत्तर इथे आहे.

या प्लासिबो परिणामातही तऱ्हा आहेत. खोटेखोटे ऑपरेशन करणे बेस्ट आहे म्हणे! हो, असे प्रयोग केले आहेत काहींनी! त्या खालोखाल सुई टोचण्याचा नंबर. ग्रामीण भागात ‘सुई’ने बरे वाटते ही अंधश्रद्धा दिसते पण ती अंधही नव्हे आणि श्रद्धाही नव्हे. हा तो बिनजेक्शन परिणाम. मग गोळ्यांचा नंबर, पण त्याही कॅपश्युलच्या हं. त्यातून त्या रंगीबेरंगी असतील, मोठ्या असतील, महाग असतील आणि दिवसातून बरेचदा घ्यायच्या असतील तर आणखी छान. औषध देता देता, ‘आता छान बरं वाटेल हं’, असा आशीर्वाद पुटपुटला तर लई भारीच.

जसं बिवषध, तशा बिस्त्रक्रिया सुद्धा केल्या आहेत लोकांनी. म्हणजे झालं असं की, इंटर्नल मॅमेरी आर्टरी नावची एक रक्तवाहिनी फासळ्यांमधून छेद घेऊन सहज बांधता येते. असं केल्यानी हृदयाचा रक्तपुरवठा वाढेल अशी अटकळ. मग केलं असं लोकांनी, आणि ९०% लोकांना फरक पडला! पण ह्या सगळ्या डॉक्टर मंडळीत काही शंकासूर निघाले. त्यांनी काय केलं; छातीवर छेद घेतले पण रक्तवाहिनी वगैरे बांधलीबिंधली नाही. छेद घेतले आणि शिवले! गंमत म्हणजे यांच्याही ९०% पेशंटना बरं वाटलं!! थोडक्यात ती शत्रक्रिया म्हणजे निव्वळ कर्मकांड ठरली. नुसती बिस्त्रक्रिया! हे लक्षात येताच तो प्रकार बंदच झाला. पण अर्थात असे प्रयोग करायचे तर त्यात बरेच नैतिक प्रश्न गुंतलेले असतात आणि आदर्श असा मार्ग नसतोच. तोंड झाकलं तर पाय उघडे पडतात आणि पाय झाकले तर तोंड.

होमिओपॅथी म्हणजे शुद्ध प्लासिबो परिणाम असा निष्कर्ष भल्याभल्यांनी काढला आहे. मी ही! पण होमिओवाल्यांचे म्हणणे असे की प्राण्यांवर सुद्धा होमिओ औषधांचा परिणाम होतो. सबब प्लासिबो परिणाम हा आरोप झूठ आहे. पण प्राण्यांतसुद्धा प्लासिबो परिणाम दिसतो असं विज्ञान सागतं. पाव्हलोव्हच्या प्रयोगाचा उल्लेख वर आलाच आहे. मालकांच्या मूडनुसार पाळीव प्राण्यांचे मूड बदलतात हा तर नेहमीचाच अनुभव. प्रेम, माया, ममता याची प्राण्यांना जाणीव असते. तेंव्हा मायेनी बिवषध दिलं तरी त्यांना बरं वाटतं. त्यांच्या मालकांना तरी तसं वाटतं किंवा निदान मालकांना तरी बरं वाटतं!!

जर बिवषध घेऊन बरं वाटत असेल तर द्या ना बिवषध, त्यासाठी एवढा थयथयाट कशासाठी असाही प्रश्न कोणी विचारेल. पण मुळात याचा परिणाम जेमतेम असतो, पीडाहारक असला तरी रोग संहारक नसतो. डॉक्टर आणि पेशंटचे नातं प्रामाणिक आणि पारदर्शी असणंच उत्तम. तेंव्हा निव्वळ कर्मकांड आणि बिवषध यांच्या मर्यादा जाणून असलेलें बरे. कारण या बिवषधाच्या नावाखाली भोंदुगिरी फोफावायला वेळ लागणार नाही. कर्मकांडाचा परिणाम होतो म्हटल्यावर बिवषध आणि त्याबरोबर कर्मकांड हे कॉम्बिनेशन बेस्ट ठरते. विंचवाचं विष मंत्रांनी उतरवण्याचे कर्मकांड तुम्ही कधी पाहिले नसेल. (पहायचं असेल आणि करमणूकही हवी असेल, तर मधुमती पिक्चर मधील ‘ओsss बिछुवा’ हे गाणं युट्यूबवर बघा.) मांत्रिकाचे डोळे, हावभाव, धुनी आणि इतर सर्व प्रकारांमुळे विंचू चक्क उतरतो! पण अर्थात जर जहाल विष असेल तर असल्या छाछुगिरीने, अयोग्य उपचारापायी प्राणही जातात. म्हणूनच तर जादूटोणा कायद्याखाली सर्पविष उतरवण्याचा दावा हा गुन्हा आहे. नुसतेच बिवषधाने भागत असते तर औषधाची गरजच पडली नसती की.

याचा व्यत्यांस म्हणजे गुणकारी गुटिका पण नो कर्मकांड. बड्या दवाखान्यातून हे असं चालतं. अत्यंत परिणामकारक उपचार पण भावनाशून्य वातावरण. पेशंटचा कोंडमारा होतो अशाने. डॉक्टर आमच्याशी बोलतच नाहीत, काय चाललंय ते काही कळतंच नाही, ह्या नेहमीच्या तक्रारी. असे पेशंट मग बड्या दवाखान्यात औषधोपचार घेतात आणि ‘पर्यायी, पारंपरिक व पूरक उपचार पद्धती’ नामे मशहूर असणाऱ्यांकडे बिवषधोपचार घेतात. प्रसंगी औषधोपचार आणि बिवषधोपचार. अशा दोन्ही टोकांमध्ये ते हेलकावे खात रहातात. आराम पडला तर त्याचं श्रेय बिवषधोपचाराला देतात आणि अपश्रेय औषधाच्या माथी मारतात. 'औषधानी भीक नको पण कुत्रा आवर, अशी गत झाली हो आणि काय सांगू बिवषधाच्या एकाच गुटीकेने पुन्हा तारुण्य प्राप्त झाले!!!'.. अशी बिवषधाची भलावण करत राहतात.

थोडक्यात काय औषधही जाणणं महत्वाचं आणि बिवषधही. तुकारामाच्या चालीवर सांगायचं तर डॉक्टरांच्या लेखी प्लासिबो म्हणजे; ‘आहे औषध अशी वदवावी वाणी, नाही ऐसे मनी अनुभवावे.’

डॉ. शंतनू अभ्यंकर
9822010349

Wednesday 24 June 2020

माझे म्हणा 'करोनाकरा'

माझे म्हणा ‘करोनाकरा’

डॉ. शंतनु अभ्यंकर

९८२२०१०३४९  

 

करोनाच्या साथीने आम्हाला बरंच काही शिकवले आहे.  घरात ‘निष्काम’ बसायला लावून अंतर्मुख केले आहे. त्याचबरोबर सारे वैद्यक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; सारी वैद्यकसृष्टीच जणू  पणाला लागली आहे. एकूणच एका अतीसूक्ष्म शत्रूशी दोन हात करता करता त्या शत्रूच्या काही खोडी आता माहिती झाल्या आहेत आणि त्यानुसार शस्त्रास्त्र परजणे चालू आहे. या ज्ञानसंचिताचा हा मागोवा.

 

म्हटलं तर १२५ नॅनोमीटर इतका सूक्ष्म आणि जेमतेम ३० गुणसुत्रांची लड बाळगून असलेला हा सार्स कोव्ह २ नामक  इवलासा जीव. ह्याला  जीव म्हणावं का हा सुद्धा प्रश्नच आहे जीवशास्त्रापुढे. पण  ह्या विषाणूला जणू दहा हात आहेत आणि एकाच वेळी वेगवेगळ्या हाताने तो माणसाच्या वेगवेगळ्या अवयवांवर घाव घालत असतो. ह्याच्या चित्रात जी शिंगं  शिंगं  दिसतात ना  तुम्हाला त्याच्याच मदतीनी हा आपल्या पेशींना चिकटतो. त्यातही एसीई नावाचं द्रव्य असलेल्या पेशी याच्या विशेष लाडक्या. मधुमेहींत तर एसीई जरा जास्तच असतं. म्हणून मधुमेहींवर हा मोहित. हे एसीई असतं फुफ्फुसात, आतडयात आणि रक्त वाहिन्यांत. म्हणूनच  फुफ्फुसे, श्वसन, पचन,  रक्त साकळण्याची क्रिया वगैरेंवर हा मर्मभेदी  हल्ला करतो.  

 

सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट ही की जवळपास ८०% लोकांना ह्या  विषाणूची लागण झाली तरी बाधा होत नाही. हे  लोक आपोआप बरे होतात. उरलेल्या विसातील  जवळपास १७ लोक वाचतात. शंभरी तीन जणं मृत्युमुखी पडतात. थोडक्यात करोना बरा करणारं औषध जरी नसलं तरी ३ वगळता बाकीचे १७   वाचतील असे उपचार मात्र आहेत.   

 

आजाराची सुरुवात तशी आस्ते कदम होते. पांढऱ्या पेशी कमी होतात.  बऱ्याच विषाणूजन्य आजारांचे हे एक लक्षण. मग सीआरपी, फेरिटीन, डी डायमर या दूतांद्वारे शरीरात सूज पसरत असल्याचा सांगावा येतो. सुमारे चौदा दिवसानंतर हा विषाणू शरीरात सापडत देखील नाही. पण त्याच्यामुळे आलेली सूज ही चालूच रहाते. ही सूजच घातक ठरते.  

 

शरीरात कोणताही परका  पदार्थ शिरला,  मग तो एखादा व्हायरस असो, बॅक्टेरिया असो, अथवा मलेरियाचा परोपजीवी असो, त्याचा शरीरात जिथे वास तिथे  आजूबाजूला सूज येते.  सूज म्हणजे आपल्या प्रतिकारशक्तीने त्या शत्रूविरुद्ध रचलेला चक्रव्यूह.  यामुळे शत्रूचा नायनाट केला जातो पण काही वेळा, करोनासारख्या विषाणूमध्ये, हे गणित चुकतं.  लाभ होण्याऐवजी शरीराची हानी होते. अती  प्रमाणात सूज येते, सर्वदूर सूज येते आणि विषाणू नष्ट होऊनही सूजेवर आपलेच नियंत्रण राहत नाही. आपल्याच प्रतिकारशक्तीचा उलटा  फटका आपल्यालाच बसतो. सेल्फ गोल किंवा सेल्फ व्हीकेट सारखी अवस्था ही. अति–प्रतिकारशक्तीचा प्रताप हा. म्हणजेच प्रतिकारशक्ती ही सुद्धा संतुलित असावी लागते. अति इम्यूनीटीमुळे होणारे शेकडो आजार आहेत. आर्सेनीक अल्बम वगैरे   तथाकथित ‘इम्यून बूस्टर’ तथाकथित आहेत हेच ठीक आहे. नाहीतर आफतच ओढवली असती!!!!   

अशी सूज येऊ नये आणि आलीच तर आटोक्यात राहावी  म्हणून हायड्रॉक्सी क्लोरोक्वीन,  इंडोमेथॅसिन, डेक्झामेथाझोन, टॉकयूलिझीमॅब   अशी औषधे वापरली जात आहेत.  

 

या विषाणूचे काही गुणधर्म जिवाणू सदृश आहेत, बॅक्टेरियासारखे आहेत, त्यामुळे अझिथ्रोमायसीन सारखे (अँटिबायोटिक) प्रतिजैविक वापरले जाते.

 

या सूजेच्या परिणामी आपल्या शरीरात त्या त्या परकीयाविरुद्ध प्रतीपिंडे (Antibodies) तयार होतात. आजारातून नुकतेच उठलेल्या व्यक्तीत अशी तयार प्रतीपिंडे असतातच असतात. ही अशी रेडिमेड प्रतीपिंडे नव्या आजाऱ्यांना टोचायची आणि आजार रोखायचे ही देखील जुनीच युक्ति आहे. रेबिज, धनुर्वात अशा आजारात अगदी रामबाण ठरलेली ही युक्ति.  करोंनाविरुद्ध हिचे सामर्थ्य अजमावून पहाणे चालू आहे.  

 

या सर्वदूर सुजेबरोबरच प्लेटलेट्स कमी होतात. प्लेटलेट्स म्हणजे खरं तर रक्तातील काही खास पेशींचे कपटे. यांचा मुख्य उपयोग रक्तवाहिन्यांची सातत्याने दुरुस्ती करण्यासाठी होतो. केशवाहिन्या (Capillaries) अतिशय नाजुक असतात. रोजच्या रोज त्यांना बारीक छिद्रे पडत असतात. ही  सूक्ष्म छिद्रे तातडीने बुजवली नाहीत तर त्या ठिकाणी  आतल्याआत रक्तस्त्राव होत राहतो. इतकेच काय रक्तवाहिन्यांची अंत:त्वचाही  अतिशय हळवी असते.  काही कारणाने, उदा: सूज येऊन, ती  खडबडीत झाली तर ती ताबडतोब गुळगुळीत करावी लागते. हे प्लेटलेट्सच्या गिलाव्याने साधले जाते. जर हे साधले नाही तर  तिथे रक्त साकळून बसते. प्रवाह थांबतो. अशाप्रकारे रक्तप्रवाह कुंठीत होणे कोणत्याही प्रकारे परवडण्यासारखे नसते.  त्यामुळे  प्लेटलेट्स कमी झाल्या की एका बाजूला रक्तस्रावाचा धोका वाढतो आणि त्याच वेळी रक्त ठिकठिकाणी साकळून बसते.

 

रक्त प्रवाहित राखण्याची नैसर्गिक  क्रिया ही अतिशय गुंतागुंतीचे संतुलन साधून असते. तलवारीच्या पात्यावर चालल्यासारखेच आहे हे.  मात्र करोनासारख्या आजारांमध्ये दोन्हीकडचा तोल सांभाळता सांभाळता, आपला जणू दोन्हीकडे तोल जातो आणि पेशंट तलवारीच्या पात्यावरच पडतो.

 

काही पेशंटमध्ये हाडातील मगजावर हा व्हायरस हल्ला चढवतो.  इथे आपल्या रक्तातील विविध पेशी बनत असतात. पेशींच्या कारखान्यावर हल्ला झाल्यामुळे अशा रुग्णात पांढऱ्या पेशी कमी होतात.  प्रतिकारशक्ती डळमळीत होते. अशा पेशंटला इतर इन्फेक्शन्स सहज होतात. हे तर चक्क  एचआयव्हीसारखं  वागणं झालं.  त्यामुळेच एचआयव्ही विरोधी औषधे (उदा: रेमडेसीव्हीर)   वापरून पाहिली जात आहेत. 

 

आपली फुफ्फुसे हे या विषाणूचे लाडके मैदान.  ताप, खोकला, धाप आणि अंतिमतः प्राणवायूचे चलनवलन बंद होऊन प्राणोत्क्रमण हे सारे या फुफ्फुसातल्या सुजेमुळे घडते. पण करोनाचे वैशिष्ठ्य हे की  यात शरीरातील प्राणवायू कमी कमी होत जातो  मात्र त्या मानाने रक्तातील कार्बन डाय ऑक्साईड फारसा वाढत नाही.  यामुळेच की  काय, पेशंट अगदी सावध आणि दिसायला बरा दिसत असतो पण ऑक्सिजन मात्र चिंताजनकरित्या कमी झालेला  असतो.   अशा अवस्थेला हॅपी हायपॉक्शिया (सुखद घुसमट!!) असं नाव आहे.

 

जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा जणू कडेलोट होतो.  झपाट्याने पेशंट रसातळाला जातो.  त्यामुळे ऑक्सिजन, कार्बन डाय-ऑक्साइड, प्लेटलेट,  डीडायमर हे सातत्याने तपासत राहावे लागते. फुफ्फुसातल्या सुजेमुळे सायटोकाईन नावाची द्रव्ये तयार होतात.  सायटोकाईन  वाढल्यामुळे रक्त साकळण्याची क्रिया जलद होते आणि शरीरात बारीक-बारीक रक्तवाहीन्यात सर्वदूर रक्त साकळून राहते.  ज्या  त्या अवयवाला ऑक्सिजनची कमतरता भासू लागते. ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यामुळे देखील रक्त साकळते. सारे अवयव  जवळ एकाच वेळी गळाठून जातात. आणि पाठोपाठ  येते  ‘सायटोकाईन स्टॉर्म’! सायटोकाईनची   जणू ढगफुटी होते.  एखाद्या वादळात सारे होत्याचे नव्हते व्हावे, तसे फुफुसाचे कार्य थोड्याच कालावधीत पूर्णतः बाधित होऊन जाते.  बहुतेकदा यातच पेशंटचा मृत्यू होतो.

 

पण करोनाच्या कारनाम्यावरच्या लेखाचा हा करुण अंत लवकरच बदलावा लागेल. ही साथ ओसरेल का आणि कधी हे प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. प्रभावी प्रतिबंधक उपाय आणि प्रभावी औषधांचा शोध नेमका कधी लागेल हे अर्थात सांगता येणे शक्य नाही.  पण अनेक साथी  आल्या आणि गेल्या असं  इतिहास सांगतो. त्यातील अनेकांवर प्रभावी लस अथवा औषधं  नव्हती, काहींवर अजूनही नाहीयेत. आजाराच्या साथी बरोबरच भीतीचीही साथ आहे. आधी ही ओसरेल. जगातील बहुतेक प्रजा करोनाचा सामना करून रोगमुक्त होईल. मग हल्ला करायला ताजे भक्ष्य मिळणेच दुरापास्त ठरेल. साथ आटोक्यात येईल. अधून मधून, कुठे कुठे हा जंतू आपले प्रताप दाखवेल.  हे असं इतका वेळ चालू राहील की शेवटी माणसं करोनाकडे एक करूणार्द्र नजर टाकतील, हम साथ साथ है म्हणतील  आणि आपापल्या कामाला  लागतील.

 

नव्या युगाच्या नव्या  तंत्रज्ञानाच्या साथीने माणसाने लढवलेली ही पहिलीच साथ. बिग डेटा,  महाप्रचंड माहिती, आणि त्याचे वेगवान विश्लेषण शक्य झाल्यावर उद्भवलेली, ही पहिलीच साथ. आज हे विश्लेषण आणि विश्लेषणांचे विश्लेषण, क्षणात सर्वांना उपलब्ध होते आहे.  ह्या संगणकाच्या युगात, प्रसिद्धीपूर्वीच शोधनिबंधातली  माहिती आता साऱ्यांना उपलब्ध आहे. कॉपीराईट वगैरे जाऊन आता ‘कॉपी लेफ्ट’, असा प्रकार सुरू झाला आहे.  म्हणजे  इथे कॉपी आहे ज्याला हवी त्याने ती वापरावी. जेनॉमिक्स, ग्लायकॉमिक्स, प्रॉटीओमिक्स अशा अनवट क्षेत्रात धामधूम चालू आहे. नाना देशातले भले बुद्धीचे सागर, ज्ञान मंथनात गुंतले आहेत. या साऱ्या मंथनातून उपचार आणि लसीचे अमृत लवकरच प्राप्त होईल अशी आशा  वाटते ती यामुळेच.