Tuesday 2 June 2020

हम साथ साथ है

हम साथ साथ है. 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

वेगवेगळे विषाणू, जिवाणू; दर काही वर्षांनी एक नवीन साथ, एक नवीन नाव आणि एक नवीन हाहाकार ऐकायला मिळतो.  नवीन नवीन रोगजंतु येतात तरी कुठून? तुम्हाला वाटेल आपला माल खपवण्यासाठी औषध कंपन्याच हे करत असतील. ही  जैविक युद्धातली अस्त्रेच आहेत असंही तुम्हाला वाटू शकेल. कॉलेजमध्ये शिकताना  तर परीक्षेत प्रश्न विचारायला सोयीचं जावं म्हणूनच हे नवे भुंगे निर्माण होतात असं मला वाटायचं!   
पण खरंतर माणूस आणि जंतू असं द्वैत कधी नव्हतंच.  आपण आणि जंतू एकमेकांच्या साथीने उत्क्रांत झालेले आहोत. 
इतिहासपूर्व काळामध्ये माणूस झाडावरून जमिनीवर उतरला. सवानाच्या गवताळ प्रदेशात शिकार करून, भटकत, कंदमुळं  खात जगत राहिला. ह्या वनवासी, भटक्या माणसाच्या वाट्याला काही आजार येतच होते. इतरही प्राण्यांच्या वाट्याला येत होते. तेंव्हा माणसाचा इतर प्राणिमात्रांशी संबंध निव्वळ भक्ष्य किंवा भक्षक एवढाच होता.  पण मग माणूस नावाच्या पशुने एक अ-पाशवी कृत्य केलं.  त्यानी शेतीचा शोध लावला, प्राणी पाळायला सुरुवात केली आणि घोटाळा झाला. कुत्री, गुरं, डुकरं,  गाढवं, घोडे, शेळ्या, मेंढया, कोंबड्यांपासूनचे आजार त्याला जडायला सुरुवात झाली.  पुढे माणसं गाव-खेड्यातून एकत्र  राहायला लागली आणि मग तर ब्रम्हघोटाळाच  झाला. आजारांचा पोतच बदलला.  साथीचे आजार नावाचा नवाच प्रकार सुरु झाला. बहुतेक साथीचे आजार हे मूलतः पाळीव प्राण्यांची देन आहेत.    
सुमारे तीन  हजार वर्षापूर्वी माणूस पंचक्रोशीतून बाहेर पडला.  व्यापार वाढला, लढाया वाढल्या.  माणूस इकडून तिकडे जायला लागला.  कोसो मैल दूर. आता इकडच्या माणसांना झालेले आजार तिकडच्या माणसांना होऊ लागले.  आजार आता खंडभर पसरू लागले. 
मग आला युरोपीय लोकांनी जग धुंडाळण्याचा कालखंड. नवी क्षितिजे माणसाला खुणावत राहिली. साहसी प्रवासी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागले.  या लोकांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका असे (त्यांना) अज्ञात खंड शोधून काढले आणि त्यांच्याबरोबर आजारही एका खंडातून दुसऱ्या खंडात पसरू लागले. नवे जग जिंकायला युरोपीय लोकांना ह्या आजारांची नकळत पण  भलतीच मदत झाली. अमेरिकेतील लोकांनी ह्या  युरोपीय जंतूंचा सामना कधी केला नव्हता. अशा जंतूंविरूद्ध त्यांच्यात प्रतिकारशक्ती कुठून येणार?   त्यामुळे पहिल्या युरोपियन वसाहती स्थापन होताच प्लेग, देवी, गोवर अशा साथींनी अमेरिकी मूळनिवासींची पार वाताहात केली. अमेरिकेत वसाहती शक्य झाल्या त्या पोलाद, बंदुका, घोडे आणि युरोपीय तंत्रज्ञानामुळे. पण ह्याबरोबरच नव्या आजारांनी तिथे नरमेध मांडला होता हेही खरं. साथीच्या डकिणीनी तिथली मूळ जनताच फस्त करायला सुरवात केली, तिथली   व्यवस्था जणू बरखास्त करून टाकली आणि युरोपीय प्रवेश सहज झाला. 
आता तर काय जागतिकीकरण, शहरीकरण हे  मनुष्यप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण झालंय.  त्यामुळे एके ठिकाणी आजाराची ठिणगी पडली की  त्याचा वणवा व्हायला,  जगभर पसरायला, फारसा वेळ लागत नाही.  
युरोपीय लोकांनी आपल्या बरोबर अमेरिकेत आजार नेले असं आपण म्हणतो पण मूलत: अमेरिकेतील लोकांचे आजार युरोपीय लोकांना का बरं  झाले नाहीत? (क्षय आणि उपदंश Syphilis, हे आजार अमेरिकेतले, असं म्हणतात) युरोपीयनांमुळे अमेरिकी उद्ध्वस्त झाले पण मग नव्या प्रदेशात जाऊनही युरोपीय स्वस्थ कसे राहिले? 
ह्याचं उत्तर साथ रोगांच्या वैशिष्ठयपूर्ण जंतू विज्ञानात आहे. आपण पहिले की बरेचसे  साथीचे आजार हे  पाळीव प्राण्यांपासून उद्भवलेले आहेत आणि आख्या होल अमेरिका खंडात पाळीव म्हणावा असा प्राणीच नव्हता!! इन्का, अझ्टेक अशा संस्कृति तिथे नांदत होत्या पण तिथे असणारे प्राणी माणसाळवण्यासारखे नव्हते. ही  एक मोठीच भौगोलिक आणि जीवशास्त्रीय उणीव होती. ही मर्यादाच त्यांना भोवली. अॅण्डीज पर्वतरांगातील  इन्का लोकांनी लामा, अल्पाका वगैरे प्राणी पाळले होते. पण त्यांचा फारसा उपयोग नव्हता. ना  त्यांचा गाडीला जुंपायला उपयोग, ना ओझी वाहायला, ना  शेतीसाठी,  ना  दूधासाठी. लोकर, मांस एवढाच त्याचा उपयोग. त्यामुळे हा प्राणी पाळला तरी, अंगणात गोठा, त्यात कपिला नावाची लामीण, तिला ओवाळणे असला मामला नव्हता. युरोप, आफ्रिका आणि आशियात पाळीव प्राणी हे घरादाराची, संस्कृतीची शान. कोंबड्या, डुकरं, करडं आणि कार्टी अंगणा-परसात एकत्रच चरत असायची. इतक्या घनिष्ठ संबंधामुळेच इकडे साथीचे आजार फोफावले आणि तिकडे ते निर्माणच होऊ शकले नाहीत. 
आजारांच्या या भूगोलात आणखीही बारकावे आहेत. समशीतोष्ण प्रदेशात पाळीव प्राणी जास्त.  घोडे , गाईगुरं, मेंढया, डुकरं   यांची अगदी रेलचेल.  त्यामुळे तिथे पाळीव  प्राण्यांपासूनचे आजार अधिक. ह्या प्रदेशातील महत्वाच्या पंधरा संसर्गजन्य आजारांपैकी आठ (घटसर्प, इनफ्ल्यूएन्जझा ए, गोवर, गालगुंड, डांग्याखोकला, देवी, क्षय आणि रोटाव्हायरस) पाळीव प्राण्यांतून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 
 उष्ण कटिबंधात कीटक बक्कळ. त्यामुळे किटकांपासून पसरणारे आजारी बक्कळ. इथे वानर प्रजातीही  भरपूर त्यामुळे वानर-नर संपर्कातून पसरणारे आजार भरपूर. त्यातही आफ्रिकी आणि आशियाई माकडांशी  आपली जनुकीय जवळीक जास्त. अमेरिकन माकडे याहून दुप्पट जनुकीय अंतरावर. त्यामुळे आशिया-आफ्रिकेत  असा संसर्ग जास्त आणि अमेरिकेत कमी.    
 आज माणसाला आजारी पाडणारे  जवळपास १४०० रोगजंतू आपल्याला माहीत आहेत. यातील  ६०% जंतू हे मूलतः प्राण्यात वास करून होते आणि त्यांच्या सहवासाने ते माणसात उतरले आहेत. काही रोगजंतू तर इतके माणसाळले आहेत की आता ते त्या त्या मूळ  प्राण्यात आढळतच  नाहीत, फक्त मनुष्यप्राण्यात आढळतात.
फक्त प्राण्यांत ते फक्त माणसांत, अशा संक्रमणाच्या काही  अवस्था असतात. म्हणजे रेबीजसारखा आजार प्राण्यांना होतो. माणसाला अगदी क्वचित होतो. त्यामुळे हा आपला कधीमधी येणारा  पाहुणा.  इबोलाची वेगळीच तऱ्हा. चिंपांझी  आणि गोरीलातला आजार हा. शिकारी मंडळींमार्फत इतरांना लागण होते. काही काळ साथ टिकते आणि मग आपोआप ओसरते. डेंग्यू माकडातून डासात आणि डासातून  माणसात येतो.  मग डासातून माणसांमाणसांत पसरतो. साथीच्या लाटा लाटा येत रहातात. आपल्या कपी बांधवांकडून आलेला एड्ससारखा आजार आपल्या कच्छपी लागला आहे.  तो काही आपली साथ सोडायला तयार नाही.  नरनारींमध्ये एड्स पसरायला आता वानरांची गरज उरली नाही. नरनारीच ते काम परस्पर उरकून टाकतात. 
प्राण्यांतून मनुष्यप्राण्यांत उडी मारणे सूक्ष्मजंतूनादेखील सोपं नाही. अनेक अडथळे पार करून हे जंतू मनुष्यात प्रविष्ट होतात. बरेचसे जंतू हे त्या त्या विशिष्ठ जातीतच (Species) टिकू शकतात. त्यातही जवळच्या जातीतले (Species) जंतू जरा सहज इकडून तिकडे जाऊ शकतात. लांबलांबच्या जातीतले जरा मुश्किलीने. म्हणजे माकडे आपली सख्खी चुलत भावंड.  त्यामुळे मर्कट आणि माणूस असे संसर्ग  खूप. पक्ष्यांत आणि आपल्यात जीवशास्त्रीय अंतर जास्त. त्यामुळे द्विजगणांकडून गणांकडे, अशी लागण क्वचित.  एका जातीतून दुसऱ्या जातीत संसर्ग व्हायचा तर काही खास गुणधर्म असावे लागतात. उदा: प्रथिनांची काही विशिष्ठ रचना.  जंतूंना असे गुणधर्म काही विचारपूर्वक निर्माण करता येत नाहीत. ते आपोआप उत्क्रांत व्हावे लागतात. एकूणच हा सगळा कर्मधर्मसंयोगाचा  मामला आहे. शिवाय माणसांना प्रतिकारशक्ती असते. तिचा मर्मभेद करतात  तेच तगतात. 
संसर्गाचा   आणि आजाराचा   काही विशिष्ठ व्यूह निर्माण झाला असेल, काही अटीशर्ती पाळल्या जात असतील, तरच साथ येते. म्हणजे असं की, जंतूची लागण  होताच तो माणूस जर तात्काळ गतप्राण झाला, तर जंतुंचा  प्रसारही थांबणार. मग साथ कशी पसरणार?  त्यामुळे प्रसाराला अवधी  मिळत असेल, प्रसार सहजसाध्य असेल, रोग्यात  प्रतिकारशक्ती उशिरा, जेमतेम   आणि तात्पुरती तयार होत असेल तर असे जंतू साथीला उत्तम. त्यामुळे पटापट माणसांचा घास घेणाऱ्या आजारांपेक्षा सर्दीचा विषाणू अधिक ‘यशस्वी’ म्हणायचा. बाकी करोना-बिरोना या निकषावर फुटकळ!  सर्दी सगळ्यांना होते पण सर्दीपडशाला कोणी ‘बळी’ पडत नाही. ह्या विरुद्धची प्रतिकारशक्तीही जेमतेम आणि तात्कालिक असते. शिवाय हा विषाणूही आपलं रूप बदलत रहातो. त्यामुळे एकच माणूस अनेकदा ‘सर्दावतो’. कोणत्याही वेळी जगभर सर्दीनी त्रस्त माणसे असतातच असतात. सर्दी झाली तरी माणसं हिंडती फिरती असतात आणि इतरांना लागण होत रहाते. विषाणूही  सतत हिंडता फिरता  रहातो. हा खरा परिवाज्रक!   
जंतू वैशिष्ठ्यांसारखी काही जन वैशिष्ठ्येही आहेत. कुठल्याही जंतूजन्य  आजाराची साथ यायची असेल तर मुळात लोकसंख्या भरपूर हवी आणि ती एकमेकांजवळ राहणारी हवी.  तर ते जंतू इकडून तिकडे पसरतील. काही लाख लोक एकत्र नांदत असतील तरच साथ  पसरते असे गणित आहे. इतके सारे लोक एकत्र नांदू लागले ते शेतीचा शोध लागल्यानंतर. सुमारे दहा ते अकरा हजार वर्षापूर्वी. 
या पूर्वीचे, भटक्यांचे आजार जरा वेगळे होते. एखाद्याला जखम झाली, जखमेत स्ट्रेप्टोकोकस सारख्या जंतुंमुळे  पू झाला, पुढे गळू झाला, तरीही लागण त्या त्या व्यक्तिपुरती मर्यादित रहाते. गळवांची काही साथ  येत नाही.    टोळीपुरत्या  साथीही यायच्या पण त्या महामारी म्हणाव्यात अशा नसायच्या. कशा असणार? कारण मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला आसपास मोठ्या प्रमाणावर माणसेच नसायची.  
शिवाय उपलब्ध माणसेही ‘जंतू-नवखी’ हवीत. म्हणजे असं समजा की रंगपंचमीचा सण आहे. रंग म्हणजे जणू  आजाराची लागण आहे. एकदा कपडे रंगलेल्याला रंग लावायचा नाही असा नियम आहे. कारण एकदा लागण झाली की तात्पुरती प्रतिकारशक्ती तरी येते किंवा तो माणूस तरी  मरतो. अशा खेळात गावात सकाळी जल्लोषात सुरू झालेला सण संध्याकाळपर्यंत संपूनच जाईल. सकाळी गावात सगळेच परीटघडीच्या  स्वच्छ कपड्यात, म्हणजे ‘जंतू-नवखे’ असतील. पण जसजसा दिवस चढत जाईल  तसतसे स्वच्छ कपडेवाले संपत जातील. साथीच्या आजारांचं असंच काहीसं होतं. ठराविक प्रमाणात लोकं जंतू बाधित झाली की उरलेल्या जंतू-नवख्यांना आपोआपच अभय मिळतं. हीच ती बहुचर्चित ‘हर्ड इम्युनिटी’ (संघशक्ती). आता साथ ओसरते. 
ह्याला इतरही करणे असू शकतात. कधीकधी रंग संपतो  म्हणून साथ ओसरते. उदाहरणार्थ दूषित पाण्याचा नळ वापरणेच बंद झाले की जुलाबाच्या  साथीचा  मूळ झराच आटतो. ते असो.  
ही संघशक्ती (हर्ड इम्युनिटी) बऱ्याच काळ टिकते. हळूहळू लोकांचे कपडे स्वच्छ होतात, म्हणजेच त्यांची प्रतिकारशक्ती कमीकमी  होते.  गावात नवे जन्म होतात, नवे लोक येतात; पुनः एकदा जंतू नवख्यांची रेलचेल होते. पुनः एकदा स्वच्छ कपड्यांची  गर्दी वाढते.  पुनः एकदा साथीला पोषक वातावरण निर्माण होते आणि पुनः एकदा पंचमीचा सण येतो. मग पूर्वी लोकं म्हणायची, ‘आला बरं का, मरीआईचा फेरा आला. गावातून गाडा फिरवायला हवा, कोंबडं बकरं कापायला हवं.’  

हाताशी भारीभारी अँटिबायोटिक आली  लशी आल्या आणि मरीआईचा गाडा अडगळीत गेला.  देवी निर्मूलनातले आश्वस्त करणारे अनुभव लक्षात घेत काही काळ  असं वाटून गेलं की आता रोगजंतूंमुळे होणारे आजार हे इतिहासजमा होणार. निदान साथीचे आजार तरी आटोक्यात आणता येतील. पण अर्थातच असं काही झालं नाही. उलट हे आजार माणसाच्या पाचवीलाच पूजले आहेत, हे कायमचे आपल्या साथीला आहेत, ही जाणीव पक्की झाली.  
शिवाय मनुष्य जातीत हाहाकार माजवण्यासाठी दरवेळी काही प्राण्यातून मनुष्यप्राण्यात संक्रमण  होण्याची गरज नाही.  आपले नेहमीचे रोगजंतू नेहमीच्या प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले की आपल्याला तापदायक ठरतात. जंतू कितीतरी वेगाने बदलत राहतात. अशा बदललेल्या  जंतूंच्याही साथी येतात.   उदा: टी.बी.सारखा आजार आता नेहमीच्या औषधांना दाद देत नाही. अशा निर्ढावलेल्या टीबीची साथ आहे सध्या.  त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करायला आपल्याला देखील सातत्याने नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण करावी लागतात. अशा रेझीस्टंट जंतूंना मारतील अशी प्रतिजैविके सतत  तयार करावी लागतात. हे काम इतकं खार्चिक,  इतकं बेभरवशाचं आणि इतकं किचकट आहे की नवी नवी प्रतिजैविके शोधण्यात औषध कंपन्यासुद्धा फारसा रस घेत नाहीत. गुंतवणूक आणि नफा याचं  गणित किफायतशीर नाही असं त्यांचं म्हणंणं. 
इवले इवले जीव हे. माणसाचं जिणं   हराम करून टाकतात. ल्युएनहोएक ह्या वलंदेजाने (डच माणुस) पहिल्यांदा हे जीव सूक्ष्म दर्शकाखाली बघितले.  रॉयल सोसायटीला १६७७ साली त्यानी ह्या प्राणुल्यांचं  वर्णन कळवलं. हो, त्यानी प्राणुले असाच शब्द वापरला होता. त्यानी लिहिले होते, अॅनिमिक्युलस् (Animicules). पण सुरवातीला त्याच्यावर कुण्णाचा म्हणजे कुण्णाचाच विश्वास बसला नाही. सूक्ष्मदर्शकाखालील हे अधोविश्व अविश्वसनीयच होतं. पाण्यात जीव, सांडपाण्यात जीव, विष्ठेत जीव आणि वीर्यातही  जीव.   त्याच्या  थोडाच काळ आधी (१६०९) गॅलिलिओने आपली दुर्बिण ऊर्ध्व दिशेला रोखली होती. ग्रहमालेचं केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे स्पष्ट झालं होतं. सारं आकाश जणू माणसाच्या कवेत आलं होतं. सूक्ष्म पिंडांपासून ब्रम्हांडापर्यंतचा हा अनुभव युरोपातल्या  धीमंतांना अस्वस्थ करत होता. 
आजही कितीही सूक्ष्मत शिरलो तरी हे सूक्ष्मजीव आपल्याला अचंबित केल्याशिवाय रहात  नाहीत. एकेक प्राणी म्हणजे खरंतर एकेक प्राणीसृष्टी  असते! ज्या त्या प्राण्याच्या अंगाखांद्यावर असंख्य ‘मैत्र जिवांचे’ वस्तीला असतात.  गाय काय किंवा गोरीला काय, घोडा काय अथवा अथवा माणूस काय; या साऱ्यांच्या त्वचेवर, नाकातोंडात, श्वासात, मलमूत्रात असंख्य जिवाणू/विषाणू/परोपजीवी सुखेनैव रहात असतात. एकेका प्रजातीशी तादात्म्य पावलेलं हे सहजीवन असतं. इतकंच कशाला पण प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक माणसानेसुद्धा, एकमेवाद्वितीय  अशी सूक्ष्मसृष्टी अंतर्बाह्य पांघरलेली असते. त्यामुळे एखाद्या जंतुमुळे आली साथ तरी त्यांचा दुस्वास करायचं कारण नाही. हे आपले साथीच आहेत. 

प्रथम प्रसिद्धी
महा अनुभव मासिक
लॉक डाऊन विशेषांक
जून 2020

No comments:

Post a Comment