Showing posts with label आरोग्य. Show all posts
Showing posts with label आरोग्य. Show all posts

Tuesday, 2 June 2020

हम साथ साथ है

हम साथ साथ है. 
डॉ. शंतनू अभ्यंकर 

वेगवेगळे विषाणू, जिवाणू; दर काही वर्षांनी एक नवीन साथ, एक नवीन नाव आणि एक नवीन हाहाकार ऐकायला मिळतो.  नवीन नवीन रोगजंतु येतात तरी कुठून? तुम्हाला वाटेल आपला माल खपवण्यासाठी औषध कंपन्याच हे करत असतील. ही  जैविक युद्धातली अस्त्रेच आहेत असंही तुम्हाला वाटू शकेल. कॉलेजमध्ये शिकताना  तर परीक्षेत प्रश्न विचारायला सोयीचं जावं म्हणूनच हे नवे भुंगे निर्माण होतात असं मला वाटायचं!   
पण खरंतर माणूस आणि जंतू असं द्वैत कधी नव्हतंच.  आपण आणि जंतू एकमेकांच्या साथीने उत्क्रांत झालेले आहोत. 
इतिहासपूर्व काळामध्ये माणूस झाडावरून जमिनीवर उतरला. सवानाच्या गवताळ प्रदेशात शिकार करून, भटकत, कंदमुळं  खात जगत राहिला. ह्या वनवासी, भटक्या माणसाच्या वाट्याला काही आजार येतच होते. इतरही प्राण्यांच्या वाट्याला येत होते. तेंव्हा माणसाचा इतर प्राणिमात्रांशी संबंध निव्वळ भक्ष्य किंवा भक्षक एवढाच होता.  पण मग माणूस नावाच्या पशुने एक अ-पाशवी कृत्य केलं.  त्यानी शेतीचा शोध लावला, प्राणी पाळायला सुरुवात केली आणि घोटाळा झाला. कुत्री, गुरं, डुकरं,  गाढवं, घोडे, शेळ्या, मेंढया, कोंबड्यांपासूनचे आजार त्याला जडायला सुरुवात झाली.  पुढे माणसं गाव-खेड्यातून एकत्र  राहायला लागली आणि मग तर ब्रम्हघोटाळाच  झाला. आजारांचा पोतच बदलला.  साथीचे आजार नावाचा नवाच प्रकार सुरु झाला. बहुतेक साथीचे आजार हे मूलतः पाळीव प्राण्यांची देन आहेत.    
सुमारे तीन  हजार वर्षापूर्वी माणूस पंचक्रोशीतून बाहेर पडला.  व्यापार वाढला, लढाया वाढल्या.  माणूस इकडून तिकडे जायला लागला.  कोसो मैल दूर. आता इकडच्या माणसांना झालेले आजार तिकडच्या माणसांना होऊ लागले.  आजार आता खंडभर पसरू लागले. 
मग आला युरोपीय लोकांनी जग धुंडाळण्याचा कालखंड. नवी क्षितिजे माणसाला खुणावत राहिली. साहसी प्रवासी पृथ्वीला प्रदक्षिणा घालायला लागले.  या लोकांनी ऑस्ट्रेलिया, अमेरिका असे (त्यांना) अज्ञात खंड शोधून काढले आणि त्यांच्याबरोबर आजारही एका खंडातून दुसऱ्या खंडात पसरू लागले. नवे जग जिंकायला युरोपीय लोकांना ह्या आजारांची नकळत पण  भलतीच मदत झाली. अमेरिकेतील लोकांनी ह्या  युरोपीय जंतूंचा सामना कधी केला नव्हता. अशा जंतूंविरूद्ध त्यांच्यात प्रतिकारशक्ती कुठून येणार?   त्यामुळे पहिल्या युरोपियन वसाहती स्थापन होताच प्लेग, देवी, गोवर अशा साथींनी अमेरिकी मूळनिवासींची पार वाताहात केली. अमेरिकेत वसाहती शक्य झाल्या त्या पोलाद, बंदुका, घोडे आणि युरोपीय तंत्रज्ञानामुळे. पण ह्याबरोबरच नव्या आजारांनी तिथे नरमेध मांडला होता हेही खरं. साथीच्या डकिणीनी तिथली मूळ जनताच फस्त करायला सुरवात केली, तिथली   व्यवस्था जणू बरखास्त करून टाकली आणि युरोपीय प्रवेश सहज झाला. 
आता तर काय जागतिकीकरण, शहरीकरण हे  मनुष्यप्राण्याचे व्यवच्छेदक लक्षण झालंय.  त्यामुळे एके ठिकाणी आजाराची ठिणगी पडली की  त्याचा वणवा व्हायला,  जगभर पसरायला, फारसा वेळ लागत नाही.  
युरोपीय लोकांनी आपल्या बरोबर अमेरिकेत आजार नेले असं आपण म्हणतो पण मूलत: अमेरिकेतील लोकांचे आजार युरोपीय लोकांना का बरं  झाले नाहीत? (क्षय आणि उपदंश Syphilis, हे आजार अमेरिकेतले, असं म्हणतात) युरोपीयनांमुळे अमेरिकी उद्ध्वस्त झाले पण मग नव्या प्रदेशात जाऊनही युरोपीय स्वस्थ कसे राहिले? 
ह्याचं उत्तर साथ रोगांच्या वैशिष्ठयपूर्ण जंतू विज्ञानात आहे. आपण पहिले की बरेचसे  साथीचे आजार हे  पाळीव प्राण्यांपासून उद्भवलेले आहेत आणि आख्या होल अमेरिका खंडात पाळीव म्हणावा असा प्राणीच नव्हता!! इन्का, अझ्टेक अशा संस्कृति तिथे नांदत होत्या पण तिथे असणारे प्राणी माणसाळवण्यासारखे नव्हते. ही  एक मोठीच भौगोलिक आणि जीवशास्त्रीय उणीव होती. ही मर्यादाच त्यांना भोवली. अॅण्डीज पर्वतरांगातील  इन्का लोकांनी लामा, अल्पाका वगैरे प्राणी पाळले होते. पण त्यांचा फारसा उपयोग नव्हता. ना  त्यांचा गाडीला जुंपायला उपयोग, ना ओझी वाहायला, ना  शेतीसाठी,  ना  दूधासाठी. लोकर, मांस एवढाच त्याचा उपयोग. त्यामुळे हा प्राणी पाळला तरी, अंगणात गोठा, त्यात कपिला नावाची लामीण, तिला ओवाळणे असला मामला नव्हता. युरोप, आफ्रिका आणि आशियात पाळीव प्राणी हे घरादाराची, संस्कृतीची शान. कोंबड्या, डुकरं, करडं आणि कार्टी अंगणा-परसात एकत्रच चरत असायची. इतक्या घनिष्ठ संबंधामुळेच इकडे साथीचे आजार फोफावले आणि तिकडे ते निर्माणच होऊ शकले नाहीत. 
आजारांच्या या भूगोलात आणखीही बारकावे आहेत. समशीतोष्ण प्रदेशात पाळीव प्राणी जास्त.  घोडे , गाईगुरं, मेंढया, डुकरं   यांची अगदी रेलचेल.  त्यामुळे तिथे पाळीव  प्राण्यांपासूनचे आजार अधिक. ह्या प्रदेशातील महत्वाच्या पंधरा संसर्गजन्य आजारांपैकी आठ (घटसर्प, इनफ्ल्यूएन्जझा ए, गोवर, गालगुंड, डांग्याखोकला, देवी, क्षय आणि रोटाव्हायरस) पाळीव प्राण्यांतून आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. 
 उष्ण कटिबंधात कीटक बक्कळ. त्यामुळे किटकांपासून पसरणारे आजारी बक्कळ. इथे वानर प्रजातीही  भरपूर त्यामुळे वानर-नर संपर्कातून पसरणारे आजार भरपूर. त्यातही आफ्रिकी आणि आशियाई माकडांशी  आपली जनुकीय जवळीक जास्त. अमेरिकन माकडे याहून दुप्पट जनुकीय अंतरावर. त्यामुळे आशिया-आफ्रिकेत  असा संसर्ग जास्त आणि अमेरिकेत कमी.    
 आज माणसाला आजारी पाडणारे  जवळपास १४०० रोगजंतू आपल्याला माहीत आहेत. यातील  ६०% जंतू हे मूलतः प्राण्यात वास करून होते आणि त्यांच्या सहवासाने ते माणसात उतरले आहेत. काही रोगजंतू तर इतके माणसाळले आहेत की आता ते त्या त्या मूळ  प्राण्यात आढळतच  नाहीत, फक्त मनुष्यप्राण्यात आढळतात.
फक्त प्राण्यांत ते फक्त माणसांत, अशा संक्रमणाच्या काही  अवस्था असतात. म्हणजे रेबीजसारखा आजार प्राण्यांना होतो. माणसाला अगदी क्वचित होतो. त्यामुळे हा आपला कधीमधी येणारा  पाहुणा.  इबोलाची वेगळीच तऱ्हा. चिंपांझी  आणि गोरीलातला आजार हा. शिकारी मंडळींमार्फत इतरांना लागण होते. काही काळ साथ टिकते आणि मग आपोआप ओसरते. डेंग्यू माकडातून डासात आणि डासातून  माणसात येतो.  मग डासातून माणसांमाणसांत पसरतो. साथीच्या लाटा लाटा येत रहातात. आपल्या कपी बांधवांकडून आलेला एड्ससारखा आजार आपल्या कच्छपी लागला आहे.  तो काही आपली साथ सोडायला तयार नाही.  नरनारींमध्ये एड्स पसरायला आता वानरांची गरज उरली नाही. नरनारीच ते काम परस्पर उरकून टाकतात. 
प्राण्यांतून मनुष्यप्राण्यांत उडी मारणे सूक्ष्मजंतूनादेखील सोपं नाही. अनेक अडथळे पार करून हे जंतू मनुष्यात प्रविष्ट होतात. बरेचसे जंतू हे त्या त्या विशिष्ठ जातीतच (Species) टिकू शकतात. त्यातही जवळच्या जातीतले (Species) जंतू जरा सहज इकडून तिकडे जाऊ शकतात. लांबलांबच्या जातीतले जरा मुश्किलीने. म्हणजे माकडे आपली सख्खी चुलत भावंड.  त्यामुळे मर्कट आणि माणूस असे संसर्ग  खूप. पक्ष्यांत आणि आपल्यात जीवशास्त्रीय अंतर जास्त. त्यामुळे द्विजगणांकडून गणांकडे, अशी लागण क्वचित.  एका जातीतून दुसऱ्या जातीत संसर्ग व्हायचा तर काही खास गुणधर्म असावे लागतात. उदा: प्रथिनांची काही विशिष्ठ रचना.  जंतूंना असे गुणधर्म काही विचारपूर्वक निर्माण करता येत नाहीत. ते आपोआप उत्क्रांत व्हावे लागतात. एकूणच हा सगळा कर्मधर्मसंयोगाचा  मामला आहे. शिवाय माणसांना प्रतिकारशक्ती असते. तिचा मर्मभेद करतात  तेच तगतात. 
संसर्गाचा   आणि आजाराचा   काही विशिष्ठ व्यूह निर्माण झाला असेल, काही अटीशर्ती पाळल्या जात असतील, तरच साथ येते. म्हणजे असं की, जंतूची लागण  होताच तो माणूस जर तात्काळ गतप्राण झाला, तर जंतुंचा  प्रसारही थांबणार. मग साथ कशी पसरणार?  त्यामुळे प्रसाराला अवधी  मिळत असेल, प्रसार सहजसाध्य असेल, रोग्यात  प्रतिकारशक्ती उशिरा, जेमतेम   आणि तात्पुरती तयार होत असेल तर असे जंतू साथीला उत्तम. त्यामुळे पटापट माणसांचा घास घेणाऱ्या आजारांपेक्षा सर्दीचा विषाणू अधिक ‘यशस्वी’ म्हणायचा. बाकी करोना-बिरोना या निकषावर फुटकळ!  सर्दी सगळ्यांना होते पण सर्दीपडशाला कोणी ‘बळी’ पडत नाही. ह्या विरुद्धची प्रतिकारशक्तीही जेमतेम आणि तात्कालिक असते. शिवाय हा विषाणूही आपलं रूप बदलत रहातो. त्यामुळे एकच माणूस अनेकदा ‘सर्दावतो’. कोणत्याही वेळी जगभर सर्दीनी त्रस्त माणसे असतातच असतात. सर्दी झाली तरी माणसं हिंडती फिरती असतात आणि इतरांना लागण होत रहाते. विषाणूही  सतत हिंडता फिरता  रहातो. हा खरा परिवाज्रक!   
जंतू वैशिष्ठ्यांसारखी काही जन वैशिष्ठ्येही आहेत. कुठल्याही जंतूजन्य  आजाराची साथ यायची असेल तर मुळात लोकसंख्या भरपूर हवी आणि ती एकमेकांजवळ राहणारी हवी.  तर ते जंतू इकडून तिकडे पसरतील. काही लाख लोक एकत्र नांदत असतील तरच साथ  पसरते असे गणित आहे. इतके सारे लोक एकत्र नांदू लागले ते शेतीचा शोध लागल्यानंतर. सुमारे दहा ते अकरा हजार वर्षापूर्वी. 
या पूर्वीचे, भटक्यांचे आजार जरा वेगळे होते. एखाद्याला जखम झाली, जखमेत स्ट्रेप्टोकोकस सारख्या जंतुंमुळे  पू झाला, पुढे गळू झाला, तरीही लागण त्या त्या व्यक्तिपुरती मर्यादित रहाते. गळवांची काही साथ  येत नाही.    टोळीपुरत्या  साथीही यायच्या पण त्या महामारी म्हणाव्यात अशा नसायच्या. कशा असणार? कारण मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला आसपास मोठ्या प्रमाणावर माणसेच नसायची.  
शिवाय उपलब्ध माणसेही ‘जंतू-नवखी’ हवीत. म्हणजे असं समजा की रंगपंचमीचा सण आहे. रंग म्हणजे जणू  आजाराची लागण आहे. एकदा कपडे रंगलेल्याला रंग लावायचा नाही असा नियम आहे. कारण एकदा लागण झाली की तात्पुरती प्रतिकारशक्ती तरी येते किंवा तो माणूस तरी  मरतो. अशा खेळात गावात सकाळी जल्लोषात सुरू झालेला सण संध्याकाळपर्यंत संपूनच जाईल. सकाळी गावात सगळेच परीटघडीच्या  स्वच्छ कपड्यात, म्हणजे ‘जंतू-नवखे’ असतील. पण जसजसा दिवस चढत जाईल  तसतसे स्वच्छ कपडेवाले संपत जातील. साथीच्या आजारांचं असंच काहीसं होतं. ठराविक प्रमाणात लोकं जंतू बाधित झाली की उरलेल्या जंतू-नवख्यांना आपोआपच अभय मिळतं. हीच ती बहुचर्चित ‘हर्ड इम्युनिटी’ (संघशक्ती). आता साथ ओसरते. 
ह्याला इतरही करणे असू शकतात. कधीकधी रंग संपतो  म्हणून साथ ओसरते. उदाहरणार्थ दूषित पाण्याचा नळ वापरणेच बंद झाले की जुलाबाच्या  साथीचा  मूळ झराच आटतो. ते असो.  
ही संघशक्ती (हर्ड इम्युनिटी) बऱ्याच काळ टिकते. हळूहळू लोकांचे कपडे स्वच्छ होतात, म्हणजेच त्यांची प्रतिकारशक्ती कमीकमी  होते.  गावात नवे जन्म होतात, नवे लोक येतात; पुनः एकदा जंतू नवख्यांची रेलचेल होते. पुनः एकदा स्वच्छ कपड्यांची  गर्दी वाढते.  पुनः एकदा साथीला पोषक वातावरण निर्माण होते आणि पुनः एकदा पंचमीचा सण येतो. मग पूर्वी लोकं म्हणायची, ‘आला बरं का, मरीआईचा फेरा आला. गावातून गाडा फिरवायला हवा, कोंबडं बकरं कापायला हवं.’  

हाताशी भारीभारी अँटिबायोटिक आली  लशी आल्या आणि मरीआईचा गाडा अडगळीत गेला.  देवी निर्मूलनातले आश्वस्त करणारे अनुभव लक्षात घेत काही काळ  असं वाटून गेलं की आता रोगजंतूंमुळे होणारे आजार हे इतिहासजमा होणार. निदान साथीचे आजार तरी आटोक्यात आणता येतील. पण अर्थातच असं काही झालं नाही. उलट हे आजार माणसाच्या पाचवीलाच पूजले आहेत, हे कायमचे आपल्या साथीला आहेत, ही जाणीव पक्की झाली.  
शिवाय मनुष्य जातीत हाहाकार माजवण्यासाठी दरवेळी काही प्राण्यातून मनुष्यप्राण्यात संक्रमण  होण्याची गरज नाही.  आपले नेहमीचे रोगजंतू नेहमीच्या प्रतिजैविकांना दाद देईनासे झाले की आपल्याला तापदायक ठरतात. जंतू कितीतरी वेगाने बदलत राहतात. अशा बदललेल्या  जंतूंच्याही साथी येतात.   उदा: टी.बी.सारखा आजार आता नेहमीच्या औषधांना दाद देत नाही. अशा निर्ढावलेल्या टीबीची साथ आहे सध्या.  त्यामुळे त्यांच्याशी दोन हात करायला आपल्याला देखील सातत्याने नवनवीन शस्त्रास्त्र निर्माण करावी लागतात. अशा रेझीस्टंट जंतूंना मारतील अशी प्रतिजैविके सतत  तयार करावी लागतात. हे काम इतकं खार्चिक,  इतकं बेभरवशाचं आणि इतकं किचकट आहे की नवी नवी प्रतिजैविके शोधण्यात औषध कंपन्यासुद्धा फारसा रस घेत नाहीत. गुंतवणूक आणि नफा याचं  गणित किफायतशीर नाही असं त्यांचं म्हणंणं. 
इवले इवले जीव हे. माणसाचं जिणं   हराम करून टाकतात. ल्युएनहोएक ह्या वलंदेजाने (डच माणुस) पहिल्यांदा हे जीव सूक्ष्म दर्शकाखाली बघितले.  रॉयल सोसायटीला १६७७ साली त्यानी ह्या प्राणुल्यांचं  वर्णन कळवलं. हो, त्यानी प्राणुले असाच शब्द वापरला होता. त्यानी लिहिले होते, अॅनिमिक्युलस् (Animicules). पण सुरवातीला त्याच्यावर कुण्णाचा म्हणजे कुण्णाचाच विश्वास बसला नाही. सूक्ष्मदर्शकाखालील हे अधोविश्व अविश्वसनीयच होतं. पाण्यात जीव, सांडपाण्यात जीव, विष्ठेत जीव आणि वीर्यातही  जीव.   त्याच्या  थोडाच काळ आधी (१६०९) गॅलिलिओने आपली दुर्बिण ऊर्ध्व दिशेला रोखली होती. ग्रहमालेचं केंद्र पृथ्वी नसून सूर्य आहे हे स्पष्ट झालं होतं. सारं आकाश जणू माणसाच्या कवेत आलं होतं. सूक्ष्म पिंडांपासून ब्रम्हांडापर्यंतचा हा अनुभव युरोपातल्या  धीमंतांना अस्वस्थ करत होता. 
आजही कितीही सूक्ष्मत शिरलो तरी हे सूक्ष्मजीव आपल्याला अचंबित केल्याशिवाय रहात  नाहीत. एकेक प्राणी म्हणजे खरंतर एकेक प्राणीसृष्टी  असते! ज्या त्या प्राण्याच्या अंगाखांद्यावर असंख्य ‘मैत्र जिवांचे’ वस्तीला असतात.  गाय काय किंवा गोरीला काय, घोडा काय अथवा अथवा माणूस काय; या साऱ्यांच्या त्वचेवर, नाकातोंडात, श्वासात, मलमूत्रात असंख्य जिवाणू/विषाणू/परोपजीवी सुखेनैव रहात असतात. एकेका प्रजातीशी तादात्म्य पावलेलं हे सहजीवन असतं. इतकंच कशाला पण प्रत्येक प्राण्याने, प्रत्येक माणसानेसुद्धा, एकमेवाद्वितीय  अशी सूक्ष्मसृष्टी अंतर्बाह्य पांघरलेली असते. त्यामुळे एखाद्या जंतुमुळे आली साथ तरी त्यांचा दुस्वास करायचं कारण नाही. हे आपले साथीच आहेत. 

प्रथम प्रसिद्धी
महा अनुभव मासिक
लॉक डाऊन विशेषांक
जून 2020

Monday, 11 March 2019

पण लक्षात कोण घेतो?


पण लक्षात कोण घेतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

बाळाची काळजी घेण्याच्या, जितकी घरे तितक्या तऱ्हा असतील. बाळ म्हणजे सृजनाची खूण, भविष्याची ठेव, पूर्वजांच्या ऋणाची परतफेड...पण ह्या काव्यात्म, रेशमी अनुभवाला गैरसमजुतींची कसर अगदी सहज लागते. पण लक्षात कोण घेतो?
आता हेच पहा ना, जन्मतः बाळाला अंघोळ घाललायची कित्ती कित्ती घाई. नुकतेच जन्मलेले बाळ अतिशय बेंगरूळ दिसते. ते टयांह्यां टयांह्यां रडत असते, ओले असते. केस चिकटलेले, चेहरा, डोकं जरा चेपलेलं, सर्वांगावर चिकटा चिकटलेला, रक्त लागलेलं, डोळे घट्ट मिटलेले; असं ते बाळ पहाताच आईच्या काळजात चर्रर्र होतं. हेची फळ काय मम तपाला, असं म्हणत ती मनातल्या मनात डोक्यावर हात मारून घेते. पाहिजे होतं मिल्कपावडरच्या डब्यावरचं गुटगुटीत बाळ आणि पदरात पडलं हे ध्यान!! पण चिंता नसावी. बाळ आपलं रूप झपाट्यानी पालटतं आणि काही दिवसात अगदी राजस दिसायला लागतं. त्याला सजवायची, घाई करू नये. जन्मतः बाळाला तेल माखून, न्हाऊ घालून, त्याच्या अंगावरचा चिकटा काढून, पॉलिश करून घेण्याची काही गरज नसते. उलट पहिले एकदोन दिवस बाळाला मुळी अंघोळ घालूच नये. त्याच्या अंगावरचा पांढरा चिकटा त्याच्या संरक्षणासाठी असतो. त्यांनी उबही रहायला मदत होते. तो काढून उलट तोटाच होतो. तेंव्हा तो आपोआप सुकून, पडू द्यावा.
जी गोष्ट अंघोळीची तीच तेलाची. जिथे भोक दिसेल तिथे तेल घालायची आपल्या समाजाला वाईट्ट खोड आहे. त्यामुळे बाळाच्या नाकात, कानात, बेंबीत, शीच्या जागी, शूच्या जागी, तेलाचे थेंब सोडले की ‘अंगाला लावणाऱ्या बायांना’ कृतकृत्य वाटतं. खरंतर बाळाच्या कुठल्याही भोकात काहीही घालायची गरज नसते. दिसेल त्या भोकात तेल घालायला बाळ म्हणजे काय शिवणयंत्र  आहे?
पण तेल आणि त्याचे गुणधर्म याचं वेडच आहे. अगदी जगभरातल्या लोकांना. कुठल्याही सफरीला गेलात की लगेच स्थानिक तेल विकणारे  भेटतात. इजिप्तच्या कमल-तेलापासून ते लंकेतल्या दालचिनी-तेलापर्यंत अनेक विक्रेते मला भेटले आहेत. कोणत्याही तेलात केस गळायचे थांबतात, सांधेदुखी पळून जाते आणि संडासला साफ होते! हे तीन गुण किमान असतातच.  बाकी मग तसला ‘स्टॅमिना’ वाढवण्यापासून ते चिरतारुण्यापर्यंत काहीही असू शकतं!! असो.
बाळाच्या कानात तेल ओतले तर कानाचा पडदा तेवढ्या वजनानेही फाटू शकतो. अगदी कांद्याच्या सालीइतका पातळ असतो कानाचा पडदा. तेलाचं वजन तो फाटायला पुरेसं असतं. मग हे तेल मध्यकर्णात जातं. या तेलाच्या थरावर बुरशी इत्यादी जंतू वाढतात. नाजूक अंतर्कर्णाची चांगलीच नासधूस करतात. बाळाची श्रवणशक्ती कमी होते, ते समाजात, शाळेत, मागे पडते आणि पुढे दुर्दैवाची मालिकाच सुरु होते. मुलाच्या आणि कुटुंबियांच्या अंतःकरणाची नासधूस होते. पण सांगूनही हौसेहौसेनी तेल घालणाऱ्या आज्ज्या, रोज भेटतात मला. वर सांगतात तेल घालत्यामुळे कानात मळ साठत नाही. मुळात मळ हा तिथले नैसर्गिक स्त्राव आणि धूळ याचं मिश्रण असतं. चावणे, चोखणे अशा जबड्याच्या हालचालींमुळे जो काही मळ असतो तो आपोआप बाहेर येतो. तो काढण्याची गरज नसते. त्यातून तान्ह्याबाळाचा आणि धुळीचा संपर्क तो किती? पण लक्षात कोण घेतो?
नाकातही तेल घालायची आवश्यकता नसते. उलट तेलाचा अंश श्वसनमार्गात जाऊन न्युमोनिया झाल्याची उदाहरणे आहेत. केमिकल न्युमोनायटीस म्हणतात त्याला.
बेंबीवर तेलही असेच अनावश्यक. तिथेही तेल घातलं की नाळेचं ओलं बोंडूक वाळण्याची क्रिया मंदावते. ओली, लुसलुशीत, निर्जीव, नाळ म्हणजे जंतुना मोकळे रानच की. नाळेला ड्रेसिंग करणे, पट्टी बांधणे, गोमय (म्हणजे गाईचे शेण) लावणे, सारं काही निषिद्ध आहे. गाय कितीही पवित्र असली तरीही. नाळ पडल्यावर कधी कधी बेंबी ओलसर रहाते. खडेमिठाचा खडा त्यावर धरला की ही ओल शोषली जाते. विशेष काही करावं लागत नाही.
तेल लावण्या पाठोपाठ अंघोळ येते. बाळराजांची अंघोळ म्हणजे तर काय शाही स्नान! एरवी चांगल्या कर्त्याधर्त्या बायका बाळाला अंघोळ घालायला बाई का लावतात हे एक न सुटलेलं कोडं आहे. एरवी ह्या बायका अगदी कर्तृत्ववान वगैरे असतात. विमाने उडवतात, बंदूक चालवतात, लाखोंचे व्यवहार ह्यांच्या सहीने होतात; पण बाळाला अंघोळ घालायला ह्यांना खास बाई लागते. ती सुद्धा कोणतीही कामवाली चालते. चार घरी धुणीभांडी करणे, चार घरी अंगाला लावायला जाणे, आणि स्वतःची चार मुले असणे, एवढेच ह्यांचे क्वालिफिकेशन. बाळाला अगदी चोळून मोळून अंघोळ घातली जाते. तत्पूर्वी त्याला तेलानी रगडून रगडून पैलवानासारखे  मालिश केलं जाते. इतकं रगडण्याची गरज नसते. अशाने क्वचित हाड मोडल्याची, स्नायू ओढल्याची उदाहरणे आहेत. एक बाई बाळाचे हात पाय एकत्र धरून त्याला झोके देते आहे, असाही एक भयंकर व्हिडीओ एका पेशंटनी मला दाखवला होता. काय करू नये, ह्याचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवायला, मी तो सेव्ह करून ठेवला आहे.
अंघोळीच्या आधी ह्या तेल लावण्याचा कितपत फायदा होतो कुणास ठाऊक. तेलाचा काही अंश हा बाळाच्या त्वचेतून शोषला जातो, त्वचा तुकतुकीत रहाते हे फायदे म्हणायचे. पण त्याच बरोबर ते बुळबुळीत होतं, हातातून निसटून अपघात होऊ शकतो हे तोटे म्हणायचे. शिवाय तेल कोणते हा तर आजकाल प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. तालेवार घरात बदामाचे तेल, नाहीतर तिळाचे तेल, मग खोबरेल तेल, मग गोडं तेल अशी उतरती भाजणी आहे. खरंतर कोणतेही तेल चालतं. कृपया अर्थाचा अनर्थ करून अगदीच इंजिन ऑईल चोळू नये!
मग कढत पाण्यानी अंघोळ. त्यात बाळाला पायावर घेणे, बसवणे, डोक्यावरून पाणी घालणे, उलथे ठेऊन घालणे, पालथे ठेवून घालणे, अशा क्रिया हौसेहौसेनी केल्या जातात. हे सगळं अनावश्यक आहे आणि क्वचित धोकादायक सुद्धा. हे होईपर्यंत बाळ ठोठो बोंबलत असते, क्यांक्यां केकाटत असते. पण ह्या सगळ्यानंतर बाळ गाढ झोपते याचेच बायकांना कौतुक! झोपेल नाही तर काय? इतके रडव रडव रडवल्यावर ग्लानी येणारच की. पण रडण्यानी बाळाला व्यायाम होतो असं एका माउलीच्या, माउलीच्या, माउलीनी मला छातीठोकपणे सांगितलं होतं. कितीही समजावून सांगितलं तरी त्याचं ते छाती ठोकणे काही संपेना. शिवाय स्वतःची आठ बाळंतपणे झाल्याचा त्यांना लोकोत्तर अभिमान होता आणि माझे एकही बाळंतपण झाले नसल्याचा कांगावा अखंड चालू होता. शेवटी मी म्हटले, ‘अरे व्वा! मग रोज तासभर पाट मांडून, मांडी  घालून बसा आणि मोठ्यांदी गळा काढून तुम्हीही तोच व्यायाम करा!!’
बाळाला बिचाऱ्याला बोलता येत नाही म्हणून; नाही तर त्यांनी सांगितलं असतं, की ‘मी काही तुमच्यासारखा बाहेर जात नाही. त्यामुळे मळतबिळत नाही. मला नुसतं विसळून घेतल तरी चालेल’. बाळ विसळून घेणे ही बाळाला अंघोळ घालण्याची आदर्श पद्धत. करायचं असं की टेबलावर योग्य त्या तापमानाचे पाणी एखाद्या टबमध्ये घ्यायचं आणि बाळाला त्यात हलकेच विसळून घ्यायचं. गार हवा, मग गरम पाणी, पुन्हा गार हवा अशा तापमानाच्या झोक्यांचा बाळाला त्रास होतो. तेंव्हा हे लक्षात ठेऊन सारं काही उरकायचं. अंघोळीनंतर तेल लावायचं. अशानी अंगात उब रहायला या तेलाचा उपयोग होतो.
या साऱ्या प्रकारात सर्वात अघोरी प्रकार कोणता असेल तर बाळाला धुरी देणे. रसरसत्या निखाऱ्यावर काय काय जाळून त्याचा धूर बाळाला दिला जातो. त्या धुरात काय दिव्य वायू असतील ते असोत, पण त्यात कर्बद्वीप्राणवायू आणि कर्बप्राणवायू  असतातच असतात. यांनाच मराठीत कार्बन डायऑक्साइड आणि कार्बन मोनॉक्साईड म्हणतात. यातला दुसरा तर एकदा लालपेशीत शिरला की पुन्हा निघत नाही. म्हणजे ती पेशी कायमची बाद. हा प्रकार तर पूर्णतः टाळावा.
बरेचदा बाळाची छाती फुगलेली दिसते आणि ती पिळली तर किंचितसे दूधही येते. याला डाकीणीचे दूध म्हणतात आणि हे पिळून काढणे चांगले असेही समजतात. पण अशा तऱ्हेने दूध पिळणे हानीकारक ठरते. यामुळे दुधाच्या पेशींना इजा होते आणि जर मुलगी असेल, तर तिला पुढे स्तनपानाला अडचण येते. असे दूध आईच्या संप्रेरकामुळे तयार झालेले असते. ते आपोआप, आतल्याआत जिरून जाते. पिळून काढण्याने कधी कधी तिथे इन्फेक्शन होऊन गळू देखील उद्भवू शकते तेंव्हा असे करू नये.
तान्ह्या मुलीच्या बाह्यांगातून थोडा रक्तस्राव झाल्याचही दिसू शकतं. हा ही आईच्या संप्रेरकांचा प्रताप. ह्यालाही काहीही करायची गरज नसते. हा ही स्त्राव आपोआप थांबतो. जुजबी स्वच्छतेपलीकडे काही करावे लागत नाही. उगाच आश्चर्याचे चित्कार काढू नयेत. पदर तोंडावर धरून ‘पदर आल्याची’ अस्फुट चर्चा करू नये. ती फिजूल आहे.
बाळाच्या डोळ्यात काजळ घालणेही असेच चुकीचे आहे. शिवाय ते डायरेक्ट बचाकभर घातलेले असते. त्या काजळातून डोळे शोधावे लागतात. घरी केलेले, चांदीच्या वाटीवर धरलेलं असलं तरीही काजळाची गरज नाहीच. काजळामुळे डोळे मोठे होत असते तर चिन्यांनी आणि जपान्यांनी आपल्याकडून कित्तीतरी काजळ आयात केलं असतं! काजळ घालणारी बोटे अस्वच्छ असली तर डोळ्याला इन्फेक्शन होते, कधी बोट डोळ्याला लागते, काजळीचे कण डोळा ते नाक अशा सूक्ष्म अश्रूनलिकेत अडकून ती वाट बंद होते; असे अनेक प्रकार संभवतात. दृष्ट लागू नये म्हणून हा प्रकार आवश्यक आहे म्हणे. काय काजळ तीट लावायचं ते इतरत्र लावा. पार अंगभर ठिपके ठिपके काढून बाळाचा बिबट्या करा. पण प्लीज डोळ्यात काही घालू नका.
असाच बाळाची टाळू भरणे नावाचा एक प्रकार आहे. हा करू दिला नाही तर आलेल्या बाईचा डायरेक्ट अपमान होतो म्हणे. लगेच तिचा पापड मोडतो. यात आलेली बाई बाळाच्या डोक्यावर तेल थापटते. तेल राहून, केस चिकटून, खवडे झाले तरी चालतील पण टाळू भरणार म्हणजे भरणार! मुळात तेलानी असं काही होत नाही. टाळू न भरणाऱ्या इतर संस्कृती या पृथ्वीतलावर नांदत आहेत. त्यांच्या अपत्यांची टाळकी टाळू न भरताही शाबूत आहेत. बाळाची टाळू म्हणजे त्याच्या कवटीच्या हाडातील मऊ मोकळे अंतर असते. बाळाचा वाढता मेंदू मावावा म्हणून अशी सोय असते. शिवाय प्रसुतीच्या वेळी अशा लिबलिबीत लवचिक कवटीमुळे बाळाचे डोके थोडे निमुळते होते आणि सुलभतेने बाहेर येते. पुढे १८ महिन्यापर्यंत ही जागा हाडांनी भरून जाते, चांगली टणक होते. तेल थापटून टाळू भरून येत नाही. शिवाय जर भरून येत असेल तर मग एकच का? अशी किमान अजून एक  जागा असते बाळाच्या डोईस. कमी दिवसाच्या बाळाला तर अधिक असतात. त्याही भराव्यात. पण बायकांना या जागांचा पत्ता नसल्यामुळे सारा भर माथ्यावर तेल थापटण्याकडे. बिच्चाऱ्या बाकीच्या टाळू! मुकाट्यानी आपोआप भरून येतात.
बाळाला भेटायला येणारेही असेच उच्छाद आणतात. मुळात भेटायची, बाळ पहायची उत्सुकता असणे यात गैर काही नाही. माकडातही अशी वागणूक शास्त्रज्ञांनी नोंदवली आहे! पण जावं ते थोड्या दिवसांनी, जरा आई आणि बाळ स्थिरस्थावर झाल्यावर. तात्काळ भेटायला गेलं नाही तर आपलं महत्व कमी होईल असं काहींना वाटतं. मग दवाखान्यातच भेटायला जायचं, हात साबणाने स्वच्छ न धुताच बाळाला मांडीवर घ्यायचं, त्याला मांडीवर घेऊन डोलवायचं, त्याच्या हातात मळकी नोट ठेवायची, मग ते ती नोट तात्काळ तोंडात घालणार...!!! अशी सगळी गंमत चालू रहाते.
येणारे जाणारे तरी किती, त्याला काही सुमारच नाही. त्या आईला ना पुरेशी विश्रांती मिळते, ना बाळाला घ्यायला वगैरे पुरेसा निवांतपणा, ना प्रायव्हसी. काही समाजात तान्ह्या बाळाला अजिबात बघायला जात नाहीत, गेले तरी हात लावत नाहीत. हे बेस्ट आहे. काही लोकांत मात्र येईल ती बाई बाळ हाताळणार, त्याला तेल लावून त्याची टाळू भरणार. वर असं काही टाळावं म्हणलं तर तिचा अपमान होणार.  मेलीनं मूल माझ्या मांडीवर दिलं नाही म्हणणार.
अशा किती गोष्टी सांगाव्यात? एक ना अनेक. शेवटी मी तर माझ्या दवाखान्यात प्रत्येक खोलीबाहेर पाटी लावून टाकली आहे...
मी तर इवले इवले मूल; अगदी नाजूक नाजूक फूल.
भेटण्यासाठी तुम्ही आतुर; पण डॉक्टर मात्र चिंतातूर.
बाहेरून येता कुठून कुठून; कपडे, अंग, हात मळवून.
आत्ता भेट फक्त लांबून, नंतर बोलावीन हाक मारून.
ह्यानी मात्र भलताच फरक पडला आहे. एरवी येणारे यायचे, काय करायचे ते करायचे आणि जायचे. आता येणारे येतात, काय करायचे ते करतात आणि जाताना मला सांगून जातात, ‘डॉक्टर, तुम्ही कविता छान करता हं!’




Tuesday, 31 July 2018

बाप माणूस

बाप माणूस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

लग्नाला काही कालावधी लोटला आणि ‘गुड न्यूज’ आली नाही की मंडळी अस्वस्थ होतात. मूल होणे ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया. इतकी, की मुले होत नाहीत त्यांना होत नाहीत ह्यात आश्चर्य नसून, ज्यांना होतात त्यांना होतात कशी हे अचंब्याचे आहे. दिवस रहाण्यात स्त्रीपुरुषांचा समान वाटा आहे. त्यामुळे बिघाडातही जवळपास समसमान वाटा आहे.
मूल रहात नाही म्हटले की दवाखान्यात तपासायला जाणे होते. मूल होणार असते दोघांना, हवे असते दोघांना. काउंटरवरची सिस्टर विचारते,
‘पेशंटचे नाव?’
मग पत्नीचे नाव हमखास सांगितले जाते. खरेतर निम्यावेळी पुरुषात दोष असतो. पण पेपरवर नाव असते बायकोचे. दाखवलेही जाते स्त्रीरोगतज्ञांना, श्री-रोग तज्ञांना नाही. सहसा तपासणीसाठी, औषधासाठी,  पहिला नंबर बायकोचा. मग बरेच आढेवेढे घेऊन, डॉक्टरनी चार चार वेळा समजावून, घरच्यांनी दबाव टाकून आला तर नवरा तपासणीला येणार. पुढे ह्याच तिकीटावर हाच खेळ पुन्हा एकदा पार पडल्यावर वीर्य तपासणीला तयार होणार.
पुरुषबीज आणि ह्या बीज निर्मितीमागचा सगळ्यात महत्वाचा प्रेरक, खरेतर संप्रेरक, म्हणजे टेस्टोस्टेरॉन, दोन्हीही तयार होतात वृषणात. (स्पष्ट शब्दात सांगायचे तर ‘गोट्यात’) हे अहर्निश चालणारे काम. सॅटरडे हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी, असला प्रकार नाही. वय वाढले तरीही ही क्रिया चालू रहाते. त्यामुळेच इतर ‘क्रिया’ जमत असतील तर वयस्कर पुरुषही बाप बनू शकतो. स्त्रीचे तसे नाही. जन्मतः मिळालेला स्त्रीबिजांचा साठा हा वय वाढत जाते, तसा वाळत वाळत जातो आणि अंतिमतः संपतो; पाळी जाते आणि मग मातृत्व अशक्य ठरते.  पुरुषांत दिवसाला सुमारे शंभर कोटी पुंबीजे तयार होतात. एक थेंब वीर्य तयार व्हायला रक्ताचे शंभर थेंब लागतात अशी एक वदंता महाराष्ट्रातल्या शाळाशाळातून पसरलेली आहे. असे काही नसते. पुरूषबीज हा वीर्यातील एक भाग आहे फक्त. वीर्यात इतरही अनेक स्त्राव असतात. हे निर्माण होण्यासाठी कोणत्याही ‘विशेष’/‘दिव्य’ शक्तीची गरज नसते. शरीरातील लाळ, अश्रू, पित्त असे इतर पदार्थ तयार व्हायला जशी काही उर्जा लागते तशीच ती वीर्य तयार व्हायलाही लागते. शरीरातील उर्जेचे एटीपी हे चलन आहे. तेच चलन वापरून वीर्य निर्मिती होत असते.  बलदंड पुरुषात अधिक ‘पॉवरफुल’ वीर्य तयार होते असे काही नाही. वीर्यातील पुरुष बीजाच्या फलनक्षमतेचा आणि दंडातील बेटकुळीचा अर्थाअर्थी संबंध नाही.  वृषणात तयार झाल्यावर हे पुरुषबीज नलीकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या वेटोळ्यातून मार्गक्रमण करता, करता,  वीर्यात मिसळून जायला ‘तैय्यार’ होते. तैय्यार हा शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकला आहे. या वेटोळ्यातील प्रवास निव्वळ प्रवास नसतो. या प्रवासात बीजाचे भरण पोषण होत असते. बालक मंदिरात जाणारा पोरगा आणि युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणारा पोरगा ह्यांच्या क्षमतांत जसा फरक असतो तसाच फरक बीजातही पडतो.  हे सगळे व्हायला सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच आज काही आजार झाला (उदाः खूप ताप आला आणि बीजांची संख्या रोडावली)  तरी त्याचा दुष्परिणाम ओसरायला तीन महिने लागणार. म्हणजेच आज काही औषध दिले (उदाः पुंबीज वाढीचे म्हणून औषध) तर त्याचा परिणाम दिसायलाही तीन महिने लागणार.
स्त्रीबीजाचे फलन व्हायचे असेल तर पुरुषबीजाला स्त्रीबीजापर्यंत पोहोचता यायला हवे. पुरूषबीज सोडले जाते योनीमार्गात. स्त्रीबीज असते स्त्रीबीजवाहक नलीकांत, फेलोपिअन ट्यूबमध्ये. इथून तिथे जाण्यासाठी पुरुषबीजाला अंगची हालचाल असते. त्याला एक वळवळती शेपूट असते. हिच्या मदतीने योनीमार्गात पडलेले पुरूषबीज पोहत पोहत स्त्रीबीजापर्यंत पोहोचते. शीर्षस्थ रसायनांच्या किल्लीने स्त्रीबीजाचे दार उघडते आणि स्त्री-पुरुष जनुकांचा संयोग होतो. फलन घडते.
दिवस रहात नाहीयेत म्हटले की वीर्य तपासले जाते. हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना द्यायला फर्मावले जाते. काही मोजके अपवाद वगळता दवाखान्यातल्या सावर्जनिक संडासात त्या पुरुषाने ही क्रिया उरकावी अशी अपेक्षा असते! ते वातावरण, तिथले वास... बापरे कित्येक ठिकाणी तर वीर्य गोळा करायला म्हणून दिलेली बाटली ठेवायलाही जागा नसते. अशा बिकट परिस्थितीतही जो नरपुंगव हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना आणून देतो, त्याला अनुकंपा तत्वावर ‘नॉर्मल’ रिपोर्ट द्यावा असे मला कधी कधी वाटते. खरे तर खाजगी आणि आरामदायी अशी खोली हवी, पंखा, उजेड, आरसा, पोर्नोग्राफिक साहित्य, पलंग, खास कंडोम, बाथरूम, साबण, पाणी, टिश्यूपेपर ई सामुग्री हवी. प्रसंग पडल्यास तिथे पत्नीलाही प्रवेश हवा.  त्या पुरुषाचा आब राखून आधी नीट माहिती द्यायला हवी, शंकासमाधान करायला हवे. यासाठी युट्युब वगैरेचा वापर सहज शक्य आहे. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषाचा आब राखला जात नाही असे दिसते, मग बायकांचे तर काय होत असेल?
वीर्य तपासणीत बऱ्याच गोष्टी कळतात आणि बऱ्याच कळतही नाहीत. या तपासणीची प्रमुख मर्यादा म्हणजे पुरुष बीजाचे कार्य, जे की स्त्रीबीजाचे फलन करणे, हेच मुळी तपासले जात नाही; तपासता येत नाही. पुरुष बीजाची संख्या हालचाल इत्यादीवरून अप्रत्यक्ष निष्कर्ष काढला जातो. पण जे काही तपासले जाते त्यातूनही बरीच माहिती मिळते.
वीर्यात पुरुषबीज संख्येने अत्यल्प असू शकतात (Oligospermia), गायब असू शकतात (Azoospermia), अॅबनॉर्मल असू शकतात (विचित्रवीर्य??), आळशी किंवा मंदगती, म्हणजे जेमतेम हालचाल करणारे (Asthenospermia) असू शकतात. काही जनुकीय आजारांत पुरुषांना वंध्यत्व येते (उदाः सिस्टीक फायब्रोसिस). खूप ताप आल्याने वा अती उष्णतेत सतत काम केल्यानेही पुरुष बीजांवर परिणाम होतो (उदाः बॉईलर समोर ई.). धूम्रपान, दारू, अती वजन हे नेहेमीचे व्हिलन आहेतच. कधी कधी या बिजांविरुद्ध काही द्रव्ये पुरुषाच्याच शरीरात तयार होतात आणि मग ह्यांच्या साऱ्याच क्षमता मंदावतात. स्त्रीच्या शरीरातही अशी द्रव्ये तयार होऊ शकतात. तेंव्हा पूर्वी एकदा कधीतरी  दिवस राहिले होते याचा अर्थ आत्ता पुरुषबीज तपासायची गरज नाही असा होत नाही. बीजतील सूक्ष्मरचनेपासून ते बायकोपर्यंत काहीही बदललेले असू शकते. बदललेल्या बायकोत, पूर्वीच्या बायकोत नसलेली, पुरुष-बीज-रोधक द्रव्ये असू शकतात. अत्यल्प पुंबीज असलेल्या अथवा अजिबात पुंबीज नसलेल्या पुरुषांत वाय क्रोमोझोम मध्ये घोटाळा असू शकतो. त्यातले काही अंश गायब असू शकतात. (Y Microdeletion). अशांना मग टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय उत्तम ठरतो.
प्रामणिकपणे सांगायचे तर पुरुषबीजांची संख्या वाढेल किंवा हालचाल खात्रीने वाढेल  असे पुराव्याने शाबित झालेले एकही औषध उपलब्ध नाही. काही अँटीऑक्सिडेंट्स आणि काही गोनॅडोट्रोपिन्स काही वेळा उपयोगी ठरू शकतात. पण अजून बरीच मजल मारायची आहे, बराच पल्ला गाठायचा आहे. पण असा दावा करणारी मात्र सुमारे दीडशे दोनशे औषधे आहेत. इतकी सारी औषधे आहेत याचाच अर्थ असा की एकही रामबाण औषध नाही. मलेरिया किंवा टीबीवर मोजकीच औषधे आहेत. कारण आहेत ती सारी परिणामकारक आहेत. इथे तसे नाही. एक ना धड भराभर चिंध्या. बिच्चारे पुरुष गतानुगतिक होऊन असली औषधे घेत असतात. अगदी वर्षानुवर्ष घेत रहातात. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रासाठी येणारा एकरकमी  खर्च खिशाला परवडत नसतो. त्यातली अनिश्चितता मनाला पटत नसते. पण औषधापायी रोज थोडे थोडे करत कित्येकांनी तिप्पट पैसा घालवलेला असतो.  ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, अशा छापाची ही औषधे... दुसरे काय. नेमक्या ज्ञानाच्या आणि उपचारांच्या अभावामुळे पुरुषबीज विकार म्हणजे सर्व पॅथिच्या भंपकांना आणि भोंदुंना मोकळे रान आहे.
संख्या आणि प्रतवारी यथातथा असलेल्या पुरुषबीज दोषांवर चांगला उपाय म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीतील इक्सी तंत्र. Intracytoplasmic Sperm Injection चे ICSI हे लघुरूप. यात एकच पुरूषबीज घेऊन एका सूक्ष्म सुईतून ते स्त्रीबीजात टोचले जाते. अगदी नाजूक पण तितकीच रोमांचकारी कृती आहे ही. यूट्यूबवर तुम्ही व्हिडीओ नक्की बघा. वीर्यात अजिबात पुरुषबीज दिसत नसेल आणि वृषणात ते असेल तर तिथून ते घेऊन इक्सी उपचार करता येतात.
असले महागडे उपचार योग्य वयात सुरु करणे महत्वाचे. स्त्रीच्या वयाचा आणि उपचारांच्या यशापयशाचा थेट संबंध आहे. पण बरेचदा हा निर्णय घ्यायला उशीर झालेला असतो. आधी डॉक्टर डॉक्टर करण्यात आणि मग देव देव करण्यात नाहक वेळ घालवलेला असतो.
रक्तदान करता येते आणि गरजूंची रक्ताची नड भागते तसेच वीर्यदानही करता येते. याच विषयवरचा ‘विकी डोनर’ नावाचा पिक्चर तुम्ही कदाचित पहिला असेल. यात पुरुष जोडीदाराचे वीर्य काही कारणाने निरुपयोगी असेल तर दात्याचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. आधुनिक नियोगच हा. यातून निपजणारे अपत्य जीवशास्त्रीयदृष्ट्या त्या स्त्रीचे  आणि दात्याचे असणार पण समाजाच्या दृष्टीने, कायद्याने ते त्या पती-पत्नीचे समजले जाणार.

कँन्सरसारख्या आजारात कधी कधी उपचारच पुरूषबीज निर्मितीला मारक ठरतात. अशा वेळी उपचारापूर्वीच वीर्य साठवून ठेऊन ते योग्य वेळी पत्नीच्या शरीरात सोडून गर्भ धारणा होऊ शकते. सीमेवरील सैनिक अथवा बराच काळ परमुलखात गेलेले पुरुषही ही पद्धत वापरून आपल्या अनुपस्थितीत गर्भस्थापनेची संधी मिळवू शकतात.

पितृत्वाची आस असतेच असते. पण जेंव्हा सर्व उपाय थकतात तेंव्हा मूल दत्तक घेणे हा ही एक सुंदर पर्याय आहे. त्या मुलाचा जैविक जनक बनता आले नसले तरी पितृवात्सल्याचा वर्षाव करता येतोच. माणसाचा बाप माणूस बनणे हे हरखून जाण्यासारखे खरेच. कालिदासाच्या शाकुंतलातील दुष्यंत म्हणतो, ‘ज्यांचे कपडे लहान मुलांच्या पावलांनी मळतात ते पुरुष धन्य होत!’; आणि छोट्या भरताला जवळ घेताच त्याला  वात्सल्याचा रोमहर्षक अनुभव येतो. भरताच्या पावलांच्या धूळीने त्याचे कपडे मळतात तेंव्हा हा आपलाच मुलगा आहे हे त्याला तरी कुठे माहित असते?