Showing posts with label बाप. Show all posts
Showing posts with label बाप. Show all posts

Tuesday, 9 June 2020

हा बाप कोणाचा?

हा बाप कोणाचा?  

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

पंचवीस एक वर्ष  झाली या घटनेला. अमेरिकेच्या वॉशिंग्टन राज्यातल्या केनेविक प्रांतात,  कोलंबिया नदीत, २८ जुलै १९९६ला एक कवटी सापडली. ज्याला सापडली त्याला वाटलं हा खुनाचा प्रकार असणार त्यामुळे पोलीस आले. पोलीस विभागाच्या डॉक्टरांनी ती  कवटी तपासली तर त्यांना त्यात काही काळबेरं आढळलं नाही. त्यांना आढळलं की ही कवटी आजची नसून अगदी पुरातन आहे. मग  त्यानी पुरातत्ववाल्यांना  बोलावलं. ते हरखूनच गेले.  त्यानी ती कवटी जिथे सापडली होती तिथे आणखी शोध घेतला आणि जवळपास अख्खा सांगाडा हाती आला त्यांच्या. मग त्या सांगड्याचं  वय, लिंग वगैरे  शोधून काढलं त्यानी. त्यात आढळलं की तब्बल ९००० वर्षापूर्वी निवर्तलेला हा कुणी तरी बाप्या  माणूस होता. हा बाप्या होता, पण तो होता कुणाचा बाप?

अमेरिकेत गोरे युरोपीय आले, त्यांनी काळे गुलाम आणले, हे तर सारे ज्ञात इतिहासात घडलेले. त्याही पूर्वी तिथे माणूस होताच. आजही तिथे मूळ अमेरिकन माणसे आणि समाज आहेत. त्या मूळनिवासींना हटवून तर युरोपीयनांनी तिथे जम बसवला. या अन्यायचं परिमार्जन म्हणून की काय,  कायद्याने या मानव समूहांना काही खास  हक्कही आहेत.

नऊ हजारच काय अगदी तेरा चौदा हजार वर्षापूर्वीपासून अमेरिकेत मनुष्यवस्ती असल्याचे पुरावे आहेत, पण त्रोटक. माणूस जर आफ्रिकेत जन्माला आला, तर अमेरिकेत पोहोचला कुठून आणि कधी आणि कसा? एका  बाजूला अटलांटिक आणि दुसऱ्या बाजूला प्रशांत महासागर असताना, माणूस अमेरिका खंडात पोहोचलाच कुठून?  हे तर एक गूढ आहे अजून.

अमेरिकेत माणूस आला कुठून, या  प्रश्नाला अनेक संभाव्य उत्तरे आहेत. जेंव्हा हिमयुग होतं तेंव्हा समुद्राच्या बऱ्याच पाण्याचं बर्फ झालं होतं.  ते साठलं होतं दोन्ही ध्रुवांवर. समुद्र खूप खूप आटला होता, खूप खूप मागे सरकला होता. सायबेरियाच्या टोकावरून अलास्कापर्यंत अखंड जमिनीचा सेतु उघडा पडला होता.  (ह्याला म्हणतात बेरींग लँड ब्रिज. आजही नकाशात बेरिंगच्या समुद्रधुनीत असा सेतु असावा अशी बेटांची माळ  दिसते.) त्यावरून  चालत चालत आला असेल का पहिला  माणूस? पण चालत आला तो सायबेरियातून अलास्कात.  सायबेरिया म्हणजे बर्फच बर्फ आणि अलास्का म्हणजेही  बर्फच बर्फ.  म्हणजे आगीतून  फुफाट्यातच  की; किंवा बर्फातून हिमात म्हणूया आपण. अलास्काचे हिमांगण  ओलांडून पुढे (सध्याच्या) अमेरिकेत पोहोचायचं म्हणजे अवघड नाही तर अशक्यच.  

आणखीही एक थिअरी आहे. केल्प मार्गाने तो आला म्हणे. केल्प ही एक समुद्र-वनस्पती आहे. दाट आणि  भक्कम अशी ही  पाणवनस्पती सायबेरिया पासून ते कॅनडा आणि उत्तर अमेरिकेच्या काठाकाठाने प्रचंड प्रमाणात वाढणारी. ह्या वनस्पतीच्या जंगलात हजारो जीव जंतू सुखेनैव विहरत असतात. मासे वगैरे अन्न भरपूर मिळते. जमिनीवरून बर्फाळ प्रदेशातून प्रवास घडला असणं कठीण आहे, तेंव्हा पहिला प्रवास हा होडक्यातून, ह्या जमिनीच्या काठाकाठाने, केल्पच्या आश्रयाने झाला असावा असा एक अंदाज.

जसा  हा माणूस नावाचा प्राणी सायबेरियातून अमेरिकेत पोहोचला असण्याची शक्यता आहे तद्वतच तो युरोपातून  आईसलँडमार्गेही तिथे पोहोचल्याची शक्यता आहे. समुद्र हटल्याने हाही मार्ग शक्य पण बर्फाळ. उत्तर युरोपातील नोर्स टोळ्या ह्या मार्गानी प्रथम इथे धडकल्या असाही एक प्रवाद आहे.

जसे सायबेरिया आणि अलास्का हे हिमयुगात ढांगेच्या अंतरावर आले तसेच जपान आणि अमेरिकेदरम्यानही प्रशांत महासागरात अनेक बेटं पाण्यातून वर आली होती.   दक्षिणेकडे सुमात्रा, ऑस्ट्रेलिया, न्यू गिनी वगैरे   बेटे तर आशिया खंडाशी  एकसंघ झाली होती. आशिया खंडाचा  हा पूर्व किनारा आणि  दक्षिण अमेरिकेचा निमुळता खंडही शक्य कोटीत जवळजवळ आले होते. चालत जरी नाही तरी बोटीनी, बेटाबेटांच्या माळेला धरून धरून    इथूनही सर्व ठिकाणहून  माणसे आली असावीत. ती उतरली अमेरिकेच्या किनारी. इथून ती सर्वदूर पसरली.

अशा अनेक कल्पना आहेत.  शिवाय ह्यातली एकच का,  सर्वच कल्पना बरोबर आहेत अशीही  कल्पना आहेच.

माणूस अमेरिकेत आला. आला तो राहिला, वाढला, चांगला जम बसवला त्यानी. त्यातलाच हा एक पुराणपुरुष. पण ह्याच वंश कोणता? आशियाई? जपानी? पॉलिनेशियन? युरोपीय? न्यूझीलंडकर?  ह्या आदिपुरुषाच्या डीएनए तपासणीत कदाचित ह्या प्रश्नांची उत्तरे मिळणार होती. त्यामुळे ह्याला भलतंच महत्व प्राप्त झालं. शास्त्रज्ञ मंडळीतही मोठी हलचल माजली. हा सांगाडा जपानी आईनू लोकांशी  अथवा पॅसिफिक मधील पॉलीनेशियन वर्णाशी साम्य दर्शवतो असा प्राथमिक अंदाज होता. त्यामुळे त्याचा डीएनए तपासता आला तर साऱ्याचा  खुलासा होणार होता. अमेरिकेच्या मुळनिवासींचे कूळ गवसणार होते. त्यामुळे सांगाड्याच्या तपासणीसाठी परवानगी मिळावी म्हणून त्यांचे अर्ज विनंत्या चालू होते.

पण ह्या शोधाची कथा कळताच मूळनिवासी  मंडळी तर हबकून गेली. त्यांनी या तपासणीच्या कल्पनेला कडाडून विरोध सुरू केला. त्यात आणखी एक गोची झाली. असतरू म्हणून नोर्स वंश सांगणारी एक जमात तिथे आहे. हे उतर युरोपीय लोक. ओडिन, थोर वगैरे यांच्या देवता. (वेडनेसडे, थर्सडे नावे या देवतांच्यावरून पडली आहेत)  हा माणूस आमचाच असा त्यांचाही  दावा. युरोपीय, नोर्स,  माणसे इथे आईसलँडमार्गे आल्याचा, हाच तो पुरावा असा त्यांचा आग्रह.   या मंडळींनी त्या अस्थिंवर काही पूजाअर्चा केली. यामुळे ‘याकामा’ मंडळी (आणखी एक मूळ निवासी जमात) दुखावली गेली. आता ह्या पूजेमुळे त्या माणसाच्या आत्म्याला त्याचे शरीर सापडणार नाही तो भटकत राहील. इतकंच काय, जो कोणी या अस्थींमधील अंशही घेईल त्याच्या तो खनपटीला बसेल.  त्या अस्थींत जो कोणी  अनाहूत रस घेईल  त्याला तर तो झपाटून टाकेल. रीतसर दफन न झाल्यास या साऱ्यांचा तो निर्वंश केल्याशिवाय रहाणार नाही, वगैरे वगैरे  त्यांनी सुरू केलं.  प्रकरण चांगलंच रंगू लागलं.   

त्यांच्या मते अमेरिकेत ‘आम्ही’, पक्षी मूळनिवासी, आहोत ते काळाच्या सुरवातीपासून. इकडून तिकडून वगैरे आम्ही आलेलो नाही. हीच आमची पितृभू, हीच आमची मातृभू. हीच  आमची पवित्र भूमी.  आम्ही वगळता इतर सारे उपटसुंभ. आम्ही कुठून आलो वगैरे शोध घ्यायची तुमची इच्छाच मुळी  गैर आहे. आम्ही इथेच जमिनीतून  निपजलो. पुरावा? पुरावा कसला मागता? आमचा इतिहास काही कोणी कुठे लिहून ठेवलेला नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही तो एकमेकाला कथन करत आलो आहोत. ह्या कथा हाच की पुरावा. हा जो कोणी आहे तो आमचाच पूर्वज आहे. त्या अस्थींची रीतसर विल्हेवाट  लावली नाही तर तो प्रेतात्मा तुम्हाआम्हाला  बाधेल. उलट आता त्याच्या सांगाड्यांचा अभ्यास का काय ते करून, तुम्ही त्या पार्थिवाच्या आत्म्याला, अस्थिंच्या  सन्मानाला  आणि आमच्या आत्मसन्मानाला धक्का पोहोचवता आहात. असं म्हणत ह्या मंडळींनी आणि त्यांच्या अत्यंत कंठाळी मंडळांनी तपासणीला विरोध सुरू केला. त्यांनी  शब्दाला शब्द वाढवत नेला. प्रकरण तापत गेलं.  आमचे ‘अधिकार’ला आता  मूळनिवासींच्या  ‘विशेषाधिकारां’ची धग आली. पिढ्यानपिढ्या वंचित, शोषित ठरलेल्यांच्या  ‘हक्कां’च्या ठिणगीवर आता  ‘मानवी हक्कां’चे  अंगार फुलले.  असं करत करत शेवटी ‘नाजुक धार्मिक भावना दुखावल्या’ची  तप्तमुद्रा उमटली.

खरंतर डीएनए टेस्ट करणे हा ह्या साऱ्यावर उपाय. हाच तर शास्त्रज्ञांचा आग्रह.  पण धार्मिक भावनांच्या नावाखाली  हीच मुळी  करू नका असा यांचा दुराग्रह. कारण आम्ही काही इथून तिथून आलेलो नाही. आम्ही या मातीची पैदाईश असा युक्तिवाद.

 

एकदा धार्मिक भावना  दुखावल्या म्हटलं की प्रश्नच मिटला. यावर एक रामबाण उपाय होता. पुरातत्ववेत्त्यांनीसुद्धा जुनी मढी हा आमचा देव आहे असं सांगायला हवं होतं.  मिळतील तिथून, मिळतील तितकी मढी  उकरून काढणे हा आमचा धर्म आहे असं सांगायला हवं होतं. ह्या मढयांचे डीएनए तपासणे ही तर आमची धर्माज्ञा आहे असंही सांगायला हवं होतं. म्हणजे मग  ही चाचणी न करण्याने  हळव्या  धार्मिक भावना दुखावतात हे लगेच सगळ्यांना पटलं असतं. म्हणजे त्यांच्याही बाजूने काही साधू आणि काही संधीसाधू उभे राहिले असते.  पण त्यांनी असं काही केलं नाही. त्यांच्याही नाजुक शास्त्रीय भावना दुखावल्या गेल्या होत्याच. पण नाजुक धार्मिक भावनांच्या पुढे नाजुक शास्त्रीय भावनांची पत्रास कुणाला?  

शेवटी शास्त्रज्ञ विरुद्ध मूळनिवासी असं हे प्रकरण कोर्टात गेलं. कायद्यानुसार ह्या सांगाड्याची मालकी कुणाची असा वाद निर्माण झाला. मूळनिवासींचं म्हणणं  असं की आमच्या भागात सापडलेला हा सांगाडा  आमच्याच कुणा पूर्वजाचा असणार. त्यावर आमचाच हक्क आहे.

२००२साली कोर्टाचा हुकूम आला, सांगाड्याची तपासणी करायला परवानगी मिळाली. मूळनिवासींच्या हक्कांवर गदा आल्याची वावटळ उठली पण लगेचच शमली. कोर्टानी  मुळी बजावलंच  होतं, ‘सांगाडा ९००० वर्षापूर्वीचा  आहे. आज ह्याला आपला पूर्वज म्हणवणारे त्याचे थेट जनुकीय अथवा सांस्कृतिक   वंशज आहेत वा  नाहीत हे सांगताच येत नाही. आपल्याला ९००० वर्षापूर्वीच्या या कालखंडाबद्दल पुरेशी माहिती नाही.  तेंव्हा तपासणी करणे योग्यच राहील.’

प्रथम तपासणीत डीएनए  मिळवणं शक्यच झालं नाही पण  आणखी बरीच नवी माहिती पुढे आली. तो कुलपुरुष काही तिथे नुसता मरून पडला नव्हता.  त्याचा रीतसर दफनविधी झाल्याची चिन्हे होती. तो मुख्यत्वे मासेखाऊ होता. भटक्या होता.  अलास्काला येणंजाणं होतं त्याचं.   त्याचे गुडघे  दुखत असावेत,  कारण ते झिजले होते. डोक्यालाही दोन ठिकाणी खोक पडलेली असावी. एकूणच लढवैय्या होता  तो.  नुसताच नर नाही तर नरवीर  होता.

अखेर २०१५ साली काही शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्या माणसाची डीएनए तपासणी करता  आली. हा माणूस सध्याच्याच मूळनिवासींचा कोणी पूर्वज होता हे निसांदिग्धपणे सिद्ध झालं. तो सांगाडा रीतसर स्थानिक निवासींच्या ताब्यात देण्यात आला. त्यावर त्यांच्या चालीरितीनुसार अंत्यसंस्कार करून त्यांनी त्याला कायमचा  गाडून टाकला. दुखावलेल्या धार्मिक भावना आता सुखावल्या.

पण डीएनए तपासणीसाठी जो तुकडा वापरला गेला तो गेलाच. तो तेवढा भाग नसल्याने, तो आत्मा आता अतृप्त राहील, त्या तुकड्यात रस घेतलेल्या साऱ्यांच्या राशीला लागेल, हे ओघानेच आले. ह्यात त्या तुकड्यावर संशोधन करणारे शास्त्रज्ञ जसे आहेत तसे त्या तुकड्याबद्दल उत्सुकता असणारे, ही कथा वाचत इथवर पोहोचलेले, वाचकही त्या आत्म्याच्या टप्यात आहेत, हे  लक्षात असो द्यावे!!!

 

 

 

 

 


Tuesday, 31 July 2018

बाप माणूस

बाप माणूस
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

लग्नाला काही कालावधी लोटला आणि ‘गुड न्यूज’ आली नाही की मंडळी अस्वस्थ होतात. मूल होणे ही खूपच गुंतागुंतीची प्रक्रिया. इतकी, की मुले होत नाहीत त्यांना होत नाहीत ह्यात आश्चर्य नसून, ज्यांना होतात त्यांना होतात कशी हे अचंब्याचे आहे. दिवस रहाण्यात स्त्रीपुरुषांचा समान वाटा आहे. त्यामुळे बिघाडातही जवळपास समसमान वाटा आहे.
मूल रहात नाही म्हटले की दवाखान्यात तपासायला जाणे होते. मूल होणार असते दोघांना, हवे असते दोघांना. काउंटरवरची सिस्टर विचारते,
‘पेशंटचे नाव?’
मग पत्नीचे नाव हमखास सांगितले जाते. खरेतर निम्यावेळी पुरुषात दोष असतो. पण पेपरवर नाव असते बायकोचे. दाखवलेही जाते स्त्रीरोगतज्ञांना, श्री-रोग तज्ञांना नाही. सहसा तपासणीसाठी, औषधासाठी,  पहिला नंबर बायकोचा. मग बरेच आढेवेढे घेऊन, डॉक्टरनी चार चार वेळा समजावून, घरच्यांनी दबाव टाकून आला तर नवरा तपासणीला येणार. पुढे ह्याच तिकीटावर हाच खेळ पुन्हा एकदा पार पडल्यावर वीर्य तपासणीला तयार होणार.
पुरुषबीज आणि ह्या बीज निर्मितीमागचा सगळ्यात महत्वाचा प्रेरक, खरेतर संप्रेरक, म्हणजे टेस्टोस्टेरॉन, दोन्हीही तयार होतात वृषणात. (स्पष्ट शब्दात सांगायचे तर ‘गोट्यात’) हे अहर्निश चालणारे काम. सॅटरडे हाफ डे, हनुमान जयंतीला सुट्टी, असला प्रकार नाही. वय वाढले तरीही ही क्रिया चालू रहाते. त्यामुळेच इतर ‘क्रिया’ जमत असतील तर वयस्कर पुरुषही बाप बनू शकतो. स्त्रीचे तसे नाही. जन्मतः मिळालेला स्त्रीबिजांचा साठा हा वय वाढत जाते, तसा वाळत वाळत जातो आणि अंतिमतः संपतो; पाळी जाते आणि मग मातृत्व अशक्य ठरते.  पुरुषांत दिवसाला सुमारे शंभर कोटी पुंबीजे तयार होतात. एक थेंब वीर्य तयार व्हायला रक्ताचे शंभर थेंब लागतात अशी एक वदंता महाराष्ट्रातल्या शाळाशाळातून पसरलेली आहे. असे काही नसते. पुरूषबीज हा वीर्यातील एक भाग आहे फक्त. वीर्यात इतरही अनेक स्त्राव असतात. हे निर्माण होण्यासाठी कोणत्याही ‘विशेष’/‘दिव्य’ शक्तीची गरज नसते. शरीरातील लाळ, अश्रू, पित्त असे इतर पदार्थ तयार व्हायला जशी काही उर्जा लागते तशीच ती वीर्य तयार व्हायलाही लागते. शरीरातील उर्जेचे एटीपी हे चलन आहे. तेच चलन वापरून वीर्य निर्मिती होत असते.  बलदंड पुरुषात अधिक ‘पॉवरफुल’ वीर्य तयार होते असे काही नाही. वीर्यातील पुरुष बीजाच्या फलनक्षमतेचा आणि दंडातील बेटकुळीचा अर्थाअर्थी संबंध नाही.  वृषणात तयार झाल्यावर हे पुरुषबीज नलीकांच्या अत्यंत गुंतागुंतीच्या वेटोळ्यातून मार्गक्रमण करता, करता,  वीर्यात मिसळून जायला ‘तैय्यार’ होते. तैय्यार हा शब्द मुद्दामच अवतरण चिन्हांत टाकला आहे. या वेटोळ्यातील प्रवास निव्वळ प्रवास नसतो. या प्रवासात बीजाचे भरण पोषण होत असते. बालक मंदिरात जाणारा पोरगा आणि युनिव्हर्सिटीतून बाहेर पडणारा पोरगा ह्यांच्या क्षमतांत जसा फरक असतो तसाच फरक बीजातही पडतो.  हे सगळे व्हायला सुमारे तीन महिन्याचा कालावधी लागतो. म्हणजेच आज काही आजार झाला (उदाः खूप ताप आला आणि बीजांची संख्या रोडावली)  तरी त्याचा दुष्परिणाम ओसरायला तीन महिने लागणार. म्हणजेच आज काही औषध दिले (उदाः पुंबीज वाढीचे म्हणून औषध) तर त्याचा परिणाम दिसायलाही तीन महिने लागणार.
स्त्रीबीजाचे फलन व्हायचे असेल तर पुरुषबीजाला स्त्रीबीजापर्यंत पोहोचता यायला हवे. पुरूषबीज सोडले जाते योनीमार्गात. स्त्रीबीज असते स्त्रीबीजवाहक नलीकांत, फेलोपिअन ट्यूबमध्ये. इथून तिथे जाण्यासाठी पुरुषबीजाला अंगची हालचाल असते. त्याला एक वळवळती शेपूट असते. हिच्या मदतीने योनीमार्गात पडलेले पुरूषबीज पोहत पोहत स्त्रीबीजापर्यंत पोहोचते. शीर्षस्थ रसायनांच्या किल्लीने स्त्रीबीजाचे दार उघडते आणि स्त्री-पुरुष जनुकांचा संयोग होतो. फलन घडते.
दिवस रहात नाहीयेत म्हटले की वीर्य तपासले जाते. हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना द्यायला फर्मावले जाते. काही मोजके अपवाद वगळता दवाखान्यातल्या सावर्जनिक संडासात त्या पुरुषाने ही क्रिया उरकावी अशी अपेक्षा असते! ते वातावरण, तिथले वास... बापरे कित्येक ठिकाणी तर वीर्य गोळा करायला म्हणून दिलेली बाटली ठेवायलाही जागा नसते. अशा बिकट परिस्थितीतही जो नरपुंगव हस्तमैथुन करून वीर्याचा नमुना आणून देतो, त्याला अनुकंपा तत्वावर ‘नॉर्मल’ रिपोर्ट द्यावा असे मला कधी कधी वाटते. खरे तर खाजगी आणि आरामदायी अशी खोली हवी, पंखा, उजेड, आरसा, पोर्नोग्राफिक साहित्य, पलंग, खास कंडोम, बाथरूम, साबण, पाणी, टिश्यूपेपर ई सामुग्री हवी. प्रसंग पडल्यास तिथे पत्नीलाही प्रवेश हवा.  त्या पुरुषाचा आब राखून आधी नीट माहिती द्यायला हवी, शंकासमाधान करायला हवे. यासाठी युट्युब वगैरेचा वापर सहज शक्य आहे. पण आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतही पुरुषाचा आब राखला जात नाही असे दिसते, मग बायकांचे तर काय होत असेल?
वीर्य तपासणीत बऱ्याच गोष्टी कळतात आणि बऱ्याच कळतही नाहीत. या तपासणीची प्रमुख मर्यादा म्हणजे पुरुष बीजाचे कार्य, जे की स्त्रीबीजाचे फलन करणे, हेच मुळी तपासले जात नाही; तपासता येत नाही. पुरुष बीजाची संख्या हालचाल इत्यादीवरून अप्रत्यक्ष निष्कर्ष काढला जातो. पण जे काही तपासले जाते त्यातूनही बरीच माहिती मिळते.
वीर्यात पुरुषबीज संख्येने अत्यल्प असू शकतात (Oligospermia), गायब असू शकतात (Azoospermia), अॅबनॉर्मल असू शकतात (विचित्रवीर्य??), आळशी किंवा मंदगती, म्हणजे जेमतेम हालचाल करणारे (Asthenospermia) असू शकतात. काही जनुकीय आजारांत पुरुषांना वंध्यत्व येते (उदाः सिस्टीक फायब्रोसिस). खूप ताप आल्याने वा अती उष्णतेत सतत काम केल्यानेही पुरुष बीजांवर परिणाम होतो (उदाः बॉईलर समोर ई.). धूम्रपान, दारू, अती वजन हे नेहेमीचे व्हिलन आहेतच. कधी कधी या बिजांविरुद्ध काही द्रव्ये पुरुषाच्याच शरीरात तयार होतात आणि मग ह्यांच्या साऱ्याच क्षमता मंदावतात. स्त्रीच्या शरीरातही अशी द्रव्ये तयार होऊ शकतात. तेंव्हा पूर्वी एकदा कधीतरी  दिवस राहिले होते याचा अर्थ आत्ता पुरुषबीज तपासायची गरज नाही असा होत नाही. बीजतील सूक्ष्मरचनेपासून ते बायकोपर्यंत काहीही बदललेले असू शकते. बदललेल्या बायकोत, पूर्वीच्या बायकोत नसलेली, पुरुष-बीज-रोधक द्रव्ये असू शकतात. अत्यल्प पुंबीज असलेल्या अथवा अजिबात पुंबीज नसलेल्या पुरुषांत वाय क्रोमोझोम मध्ये घोटाळा असू शकतो. त्यातले काही अंश गायब असू शकतात. (Y Microdeletion). अशांना मग टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय उत्तम ठरतो.
प्रामणिकपणे सांगायचे तर पुरुषबीजांची संख्या वाढेल किंवा हालचाल खात्रीने वाढेल  असे पुराव्याने शाबित झालेले एकही औषध उपलब्ध नाही. काही अँटीऑक्सिडेंट्स आणि काही गोनॅडोट्रोपिन्स काही वेळा उपयोगी ठरू शकतात. पण अजून बरीच मजल मारायची आहे, बराच पल्ला गाठायचा आहे. पण असा दावा करणारी मात्र सुमारे दीडशे दोनशे औषधे आहेत. इतकी सारी औषधे आहेत याचाच अर्थ असा की एकही रामबाण औषध नाही. मलेरिया किंवा टीबीवर मोजकीच औषधे आहेत. कारण आहेत ती सारी परिणामकारक आहेत. इथे तसे नाही. एक ना धड भराभर चिंध्या. बिच्चारे पुरुष गतानुगतिक होऊन असली औषधे घेत असतात. अगदी वर्षानुवर्ष घेत रहातात. टेस्ट ट्यूब बेबी तंत्रासाठी येणारा एकरकमी  खर्च खिशाला परवडत नसतो. त्यातली अनिश्चितता मनाला पटत नसते. पण औषधापायी रोज थोडे थोडे करत कित्येकांनी तिप्पट पैसा घालवलेला असतो.  ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’, अशा छापाची ही औषधे... दुसरे काय. नेमक्या ज्ञानाच्या आणि उपचारांच्या अभावामुळे पुरुषबीज विकार म्हणजे सर्व पॅथिच्या भंपकांना आणि भोंदुंना मोकळे रान आहे.
संख्या आणि प्रतवारी यथातथा असलेल्या पुरुषबीज दोषांवर चांगला उपाय म्हणजे टेस्ट ट्यूब बेबीतील इक्सी तंत्र. Intracytoplasmic Sperm Injection चे ICSI हे लघुरूप. यात एकच पुरूषबीज घेऊन एका सूक्ष्म सुईतून ते स्त्रीबीजात टोचले जाते. अगदी नाजूक पण तितकीच रोमांचकारी कृती आहे ही. यूट्यूबवर तुम्ही व्हिडीओ नक्की बघा. वीर्यात अजिबात पुरुषबीज दिसत नसेल आणि वृषणात ते असेल तर तिथून ते घेऊन इक्सी उपचार करता येतात.
असले महागडे उपचार योग्य वयात सुरु करणे महत्वाचे. स्त्रीच्या वयाचा आणि उपचारांच्या यशापयशाचा थेट संबंध आहे. पण बरेचदा हा निर्णय घ्यायला उशीर झालेला असतो. आधी डॉक्टर डॉक्टर करण्यात आणि मग देव देव करण्यात नाहक वेळ घालवलेला असतो.
रक्तदान करता येते आणि गरजूंची रक्ताची नड भागते तसेच वीर्यदानही करता येते. याच विषयवरचा ‘विकी डोनर’ नावाचा पिक्चर तुम्ही कदाचित पहिला असेल. यात पुरुष जोडीदाराचे वीर्य काही कारणाने निरुपयोगी असेल तर दात्याचे वीर्य स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जाते. आधुनिक नियोगच हा. यातून निपजणारे अपत्य जीवशास्त्रीयदृष्ट्या त्या स्त्रीचे  आणि दात्याचे असणार पण समाजाच्या दृष्टीने, कायद्याने ते त्या पती-पत्नीचे समजले जाणार.

कँन्सरसारख्या आजारात कधी कधी उपचारच पुरूषबीज निर्मितीला मारक ठरतात. अशा वेळी उपचारापूर्वीच वीर्य साठवून ठेऊन ते योग्य वेळी पत्नीच्या शरीरात सोडून गर्भ धारणा होऊ शकते. सीमेवरील सैनिक अथवा बराच काळ परमुलखात गेलेले पुरुषही ही पद्धत वापरून आपल्या अनुपस्थितीत गर्भस्थापनेची संधी मिळवू शकतात.

पितृत्वाची आस असतेच असते. पण जेंव्हा सर्व उपाय थकतात तेंव्हा मूल दत्तक घेणे हा ही एक सुंदर पर्याय आहे. त्या मुलाचा जैविक जनक बनता आले नसले तरी पितृवात्सल्याचा वर्षाव करता येतोच. माणसाचा बाप माणूस बनणे हे हरखून जाण्यासारखे खरेच. कालिदासाच्या शाकुंतलातील दुष्यंत म्हणतो, ‘ज्यांचे कपडे लहान मुलांच्या पावलांनी मळतात ते पुरुष धन्य होत!’; आणि छोट्या भरताला जवळ घेताच त्याला  वात्सल्याचा रोमहर्षक अनुभव येतो. भरताच्या पावलांच्या धूळीने त्याचे कपडे मळतात तेंव्हा हा आपलाच मुलगा आहे हे त्याला तरी कुठे माहित असते?