Monday 30 October 2017

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर

हवी तेवढी मुलं झालेली असतात. ती मोठीही झालेली असतात. रांधा, वाढा, उष्टी काढा करून कातावलेला जीव जरा निवांत झालेला असतो. मग मनात येतं, एकदा मुलं झाली की गर्भपिशवीचं काही काम नाही. हा अवयव नुसतातच शरीराला भार. उलट दर महिन्याला पाळी येणार, त्याच्या आधी, नंतर, काही ना काही त्रास होणार, प्रवास आणि सणासुदीला पाळीचा प्रश्न सोडवावा लागणार. अशा असंख्य कटकटी तेवढया उरणार. त्यातून घरी-दारी, शेजारी-पाजारी कुणाला कँन्सर झाला असेल तर मग ह्या बाईपाठीमागे कॅन्सरच्या भीतीचा ब्रम्हराक्षस लागतो. शेजारणीचे डोळे आले की ‘वासाने’ आपले येतात पण शेजारणीचा कॅन्सर काही ‘वासानी’ पसरत नाही. पण अशा विचाराने मुले-बाळे झाल्यावर, पिशवीचे हे ‘जड झाले ओझे’ काही ना काही खुसपट काढून उतरवून टाकण्याकडे महिलांचा कल असतो. रांधा, वाढा झाल्यावर आता ‘पिशवी काढा’च्या दिशेनी प्रवास सुरु होतो. बेंबीच्या खाली आणि गुडघ्याच्यावर, कोणतीही तक्रार असेल तर त्यावर पिशवी काढणे हा अक्सीर इलाज म्हणून सुचवला जातो. चुटकीसरशी स्वीकारला जातो. हे चुकीचं आहे.
म्हणूनच खालील तीन वाक्य प्रत्येक स्त्रीनी आपल्या मनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवली पाहिजेत.
१.              प्रत्येक बारीक सारीक तक्रारीसाठी पिशवी काढणे हा उपाय असू शकत नाही.
२.              पिशवी काढली की पिशवीचा कँन्सर टळतो पण अनावश्यक ऑपरेशनचे तोटे अधिक आहेत.
३.              पिशवीचा कँन्सर टाळण्यासाठी पिशवी काढणे, हा उपाय अयोग्य आहे.
मग योग्य उपाय काय आहे? पॅपिनीकोलोव्ह स्मिअर तपासणी, यालाच म्हणतात पॅप स्मिअर.
 पण पॅप स्मिअरबद्दल  नंतर सांगतो, आधी थोडसं गर्भपिशवीच्या कॅन्सरविषयी. गर्भपिशवीचा कॅन्सर असा काही एकच एक आजार नाही. गर्भ पिशवीचे वेगवेगळे भाग आहेत आणि त्या सर्व भागांना विविध कॅन्सरची बाधा होऊ शकते. पण होणाऱ्या प्रत्येक कॅन्सरची चिंता करण्याची गरज नसते कारण यातले बरेचसे कॅन्सर हे अति दुर्मिळ आहेत.  सर्वात कॉमन आहे तो गर्भपिशवीच्या तोंडाचा, म्हणजे ग्रीवेचा कॅन्सर, यालाच म्हणतात सर्व्हायकल कॅन्सर. या कॅन्सरचं लवकरात लवकर, म्हणजे तो डोळ्याला दिसण्याअगोदर कैक वर्ष आधी, निदान हे या पॅप स्मिअर तपासणीने होते.

पॅप स्मिअर ही एक ‘स्क्रिनिंग टेस्ट’ आहे! ‘स्क्रिनिंग टेस्ट’ म्हणजे ‘चाचणी’ नव्हे तर ‘चाचपणी’ असते. अशा टेस्टमधून आपल्याला नेमकं निदान होत नाही. पण पेशंटला आजार असण्याची शक्यता आहे का, ते कळतं. अशी ‘अवाजवी शक्यता’ असलेल्या पेशंटची पुढे आणखी सखोल नेमके निदान होईल अशी चाचणी केली जाते. आधी सर्वांची ‘चाचपणी’ आणि मग गरजेनुसार ‘नैदानिक चाचणी’, अशी द्विस्तरीय रचना मुद्दाम वापरली जाते. सर्व्हायकल कॅन्सरचं  नेमकं निदान करणाऱ्या तपासण्या (Diagnostic tests) ह्या महाग असतात. त्यात एका छोटयाश्या ऑपरेशनने, सर्व्हिक्सचा तुकडा काढून तपासावा लागतो (सर्व्हायकल बायोप्सी). तो तपासायला पॅथॉलॉजीस्ट लागतो. हे अर्थात खूप खार्चिक आहे. म्हणून मग ‘आधी चाचपणी आणि मग  गरजेप्रमाणे नैदानिक चाचणी’ असं धोरण अवलंबिले जाते. ह्या धोरणामुळे वेळ, पैसा आणि त्रास वाचतो. मोजक्या अतिजोखीमवाल्यांकडे अधिक काटेकोर लक्ष पुरवता येते आणि  बिनजोखीमवाल्या निर्धास्त राहू शकतात. बिनजोखीमवाल्यांचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रास वाचतो.
पॅप स्मिअरमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (ग्रीवा, Cervix) पेशी तपासल्या जातात. इथे कॅन्सरच्या दिशेने चालू लागलेल्या पेशी सापडल्या तर पुढे कॅन्सर होऊ शकेल असं भाकित वर्तवता येतं. हे भाकित शंभर टक्के खरं ठरेल असं नाही. काही उपचार करून ह्या वाममार्गी लागलेल्या पेशींना पुन्हा मूळपदावर आणणं शक्य होतं. काही तर आपण होऊन बिकटवाट सोडून धोपटमार्ग धरतात आणि पुन्हा सुतासारख्या सरळ वागायला लागतात. पेशींप्रमाणेच इथे एच.पी.व्ही. (Human Papilomma Virus) हा विषाणू वास करून आहे का हेही तपासता येतं. ग्रीवेतल्या तरण्याताठ्या पेशींना फसवून कॅन्सरच्या वाटेला लावणारा हाच तो खलनायक. हा असेल तर कॅन्सरची भीती वाढते. लहान वयात लग्न झालेल्या, वारंवार आणि भारंभार मुलं झालेल्या, गुप्तरोग असलेल्या, बाहेरख्याली पतीशी रत झालेल्या, वेगवेगळ्या गुप्तरोगांनी ग्रासलेल्या किंवा अनेकांबरोबर शरीर संबंध आलेल्या; अशा बायकांत हा कॅन्सर जास्त आढळून येतो. पॅप स्मिअर म्हणजे जणू ‘पाप’ स्मिअर आहे. केलेली सारी पातके त्यात दिसतात! वर वर्णिलेल्या पापांमध्ये  एच.पी.व्ही. नामे करून विषाणूची लागण सहज होते. तेंव्हा खरा गुन्हेगार हा विषाणू आहे.

ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. पाळी, गर्भधारणा, वय, इन्फेक्शन्स, अशा कारणानी ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. सूक्ष्मदर्शकाखाली बघताना कधी यांचे पातळ थर, एकावर एक पोती रचल्यासारखे दिसतात, तर कधी या उंच खांबांसारख्या दिसायला लागतात. वारंवार होणाऱ्या या रूपांतरात कधी कधी गफलती होतात. काही काही पेशी एच.पी.व्ही.शी सलगी करतात आणि कॅन्सरनामे राक्षसिणीचे रूप घेतात. हे बदलते रूप आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो, अभ्यासू शकतो. हा राक्षसिणीचा मेकअप चढवायला त्यांना बरीच वर्ष लागतात. प्रथमावस्थेपासून कॅन्सरपर्यंतचा प्रवास दहा ते पंधरा वर्षांचा असतो. हाच ह्या आजाराचा वीकपॉईंट आहे. एवढया मोठया कालावधीत हे बदल पॅप स्मिअर सारख्या तपासणीत लक्षात येतात आणि योग्य ती पावले उचलून कॅन्सर टाळता येतो.
 अगदी सुरवातीच्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला योग्य उपचार केले तर या मायावी पेशी पुन्हा पहिले रूप धारण करतात. किरकोळ बदल असतील तर औषधे आणि भारी बदल असतील तर स्थानिक ऑपरेशन असं उपचाराचं स्वरूप असतं. मग त्या बाईला कॅन्सर होतच नाही. पण ह्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला जर आपण दुर्लक्ष केलं तर ह्या मायावी राक्षसीणी तिथे वाढत रहातात. हळूहळू खोलखोल शिरतात आणि पेशंट कॅन्सरच्या भक्ष्यस्थानी पडते.

टेस्ट कशी करतात?
एखाद्या ब्रश किंवा चमच्यासारख्या उपकरणानी ग्रीवेच्या पेशी घेऊन त्या तपासल्या जातात. पेशींच्या रूपाचा अभ्यास केला जातो. एच.पी.व्ही. आहे का याचीही परीक्षा केली जाते. यासाठी ना भूल दयावी लागते ना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. एरवी आतून तपासणी केली जाते तशीच काहीशी ही तपासणी आहे.

टेस्ट कधी करतात?
सर्वसाधारणपणे सुरवातीला वर्षातून एकदा आणि नंतर दर तीन वर्षानी. पण नेमका कालावधी डॉक्टरांच्या सल्ल्यानी ठरवता येईल.

पॅप तपासणीचा रिपोर्ट ‘शंकास्पद’ आला तर?
‘कॅन्सर’ असा रिपोर्ट आला तरच त्याचा अर्थ ‘कॅन्सर’ असा होतो. ‘शंकास्पद’  रिपोर्टचा अर्थ ‘शंकास्पद’ असाच होतो.  शंकास्पद बदल बरेचदा काही कालावधीनी आपोआप नॉर्मल होऊन जातात. क्वचित याची धाव  कॅन्सरपर्यंत जाते. पण ही धावही कूर्मगतीने असते. बरेचदा खात्री करण्यासाठी अशा शंकास्पद रिपोर्टवाल्या पेशंटच्या ग्रीवेचा तुकडा काढून तपासला जातो. यासाठी काही वेळा कॉल्पोस्कोप या यंत्राची मदत घेतली जाते. यातही कॅन्सर वा त्यासदृश रिपोर्ट आला तरी काही वेळा जागच्या जागी ऑपरेशन करून तो भाग काढून टाकता येतो. अगदी पुढे मुलंबाळंसुद्धा होऊ शकतात. पुढे पॅप तपासणी मात्र करतंच रहावं लागतं.

ही तपासणी कितपत बिनचूक असते?
हा प्रश्न अगदी योग्य आहे. सर्वच टेस्ट प्रमाणे ह्याही टेस्ट मधे डावं उजवं होऊ शकतं. कधी सारं काही ठीक असताना ‘घोटाळा’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स पॉझीटीव्ह) तर कधी सारं काही बिनसलेलं असताना ‘आल इज वेल’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स निगेटिव्ह). हे प्रकार टाळण्यासाठी पॅप तपासणी आधी दोन दिवस संबंध टाळायला हवेत. कोणतीही योनीमार्गात ठेवायची औषधे वा प्रसाधने टाळायला हवीत. पाळीच्या दरम्यान ही टेस्ट करू नये.
डॉ. शंतनू अभ्यंकर
प्रथम प्रसिद्धी दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, ३१/१०/१७
या आणि अशाच लेखनासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Thursday 26 October 2017

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

आजकाल डॉक्टरना शिव्या घालणे, मारहाण करणे, राजरोस चालू असते. कट प्रॅक्टिस, अति नफा, औषधकंपन्यांशी असलेले साटेलोटे, रुग्णाची हेळसांड झाल्याचे आरोप हे तर नेहमीचेच. ह्या साऱ्यात अजिबात तथ्य नाही असं नाही. हे आरोप सर्व पॅथीच्या डॉक्टरना झेलावे लागतात. पण या पेक्षा थोडया वेगळ्या प्रश्नाकडे मी वळणार आहे.
आजकाल  अॅलोपॅथीला शिव्या घालायची फॅशन बोकाळली आहे. कोणतंही वृत्तपत्र, आरोग्य पुरवणी, टीव्ही चॅनेल, मासिकं, पुस्तकं बघा, सर्वत्र हा एककलमी कार्यक्रम जोमात चाललेला दिसतो. अॅलोपॅथी किती कमअस्सल, किती घातक, किती बेभरवशाची असा सगळा आव असतो. अशा आरोपांचा समाचार घेण्याचा माझा विचार आहे. तरी बरं आज अॅलोपॅथीच्याच वापराने १९४७साली निव्वळ ३७ वर्ष असलेलं आपलं आयुर्मान आता तब्बल ६७ वर्ष झालं आहे.
सुरवातीलाच हे स्पष्ट केलं पाहिजे की, अॅलोपॅथी ही संज्ञाच मुळात साफ चुकीची आणि गैरलागू आहे. अॅलोपॅथी म्हणजे ‘विरुद्ध’ किंवा ‘विपरीत’ उपचार. पेशंटला जे होतंय ते होऊ नये एवढंच औषध देणारे शास्त्र म्हणजे अॅलोपॅथी. डोकेदुखीला वेदनाशामक आणि तापला ज्वरशामक देणे एवढीच याची धाव. त्या काळची उपचार पद्धती होतीच तशी जहाल. रुग्णांना मारझोड करणे. तीव्र मात्रेत रेचके (जुलाब होतील अशी औषधे) किंवा वमनके (उलटया होतील अशी औषधे) देणे, जळवा लावणे, रक्तस्राव घडवणे वगैरे प्रकार सर्रास चालत. आजच्या अॅलोपॅथीमध्ये यातलं काहीसुद्धा शिल्लक नाही. नित्यनूतन विज्ञानाच्या पावलावर पाउल ठेवत, आज अॅलोपॅथी इतकी बदलली आहे की आज अॅलोपॅथी अस्तित्वात नसून ‘अधुनिक वैद्यकी’ला अॅलोपॅथी म्हटलं जातं. इथेही अॅलोपॅथी हा शब्द निव्वळ प्रचलित आहे म्हणून वापरला आहे. तो आधुनिक वैद्यक याच अर्थाने घ्यावा.
आज कोणी असह्य डोकं दुखतंय अशी तक्रार केली तर निव्वळ क्रोसिनची गोळी देऊन कोणी थांबत नाही. त्या मागचं  कारण शोधायला अनेकानेक तपासण्या केल्या जातात. डोकेदुखीची अनेक कारणे संभवतात; घट्ट टोपी घालण्यापासून ते ब्रेन ट्युमरपर्यंत. काही तरी संभाव्य निदान हाती आल्यावर उपाय योजले जातात. चष्म्याचा नंबर देणे, दाढ काढणे, ब्लडप्रेशरसाठीचे औषध, नैराश्यनिवारक गोळी,  इथपासून ते रोबोटिक ब्रेन सर्जरी पर्यंत असं या उपचारांचं काहीही स्वरूप असू शकतं. ‘विरुद्धउपचार’वाली अॅलोपॅथी ही नक्कीच नाही. हे आहे आधुनिक वैद्यक.
अॅलोपॅथीवर आरोप करताना सगळ्यात बाऊ केला जातो तो औषधांच्या साईड इफेक्टचा. अॅलोपॅथीच्या औषधांना साईड इफेक्ट असतात हे सत्यच आहे पण त्याचा अर्थ ‘इतर’ औषधांना ते नसतात असं म्हणणं हा सत्यापलाप आहे. ‘आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीत’ हे विधान म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. कोणतेही औषध हे शेवटी एक अथवा अनेक रसायनाचं मिश्रण असते. मग त्याच्या ललाटी ते अॅलोपॅथीचे आहे का अन्य पॅथीचं हे छापल्याने त्याच्या रासायनिक घटकात, गुणधर्मात आणि त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामात काही फरक पडत नाही. रसायनशास्त्राच्या भाषेत नावडतीचं मीठही खारटच असतं. ह्या रसायनांचे काही परिणाम हवेहवेसे असतात, औषधी असतात. बरेचसे नको असले तरी चालतील अशा स्वरूपाचे असतात. तर काही अगदी त्रासदायक असतात (हेच ते साईड इफेक्ट). आम्ही दिलेल्या अमुक अमुक ‘रसायनाचे’ म्हणजेच औषधाचे, सुपरिणाम तेवढेच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुष्परिणाम सुप्त राहतील, असा दावा कसा काय शक्य आहे? उलट ज्या औषधाचे काहीच दुष्परिणाम नाहीत त्याचे मुळात परिणाम तरी आहेत का नाही अशी शंका घ्यायला हवी!
प्रत्येक औषधाच्या चांगल्या वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत, अभ्यास आहेत. उलट अशा सखोल अभ्यासामुळे हे दुष्परिणाम कमीतकमी कसे होतील, टाळता कसे येतील, अशा दिशेनी संशोधन व्ह्यायला मदतच होते. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपाया आहे हे तुम्ही पाहू शकता. साईड इफेक्ट आहेत हे मान्य करण्यात कमीपणा कसला? असलाच तर प्रामाणिकपणा आहे. अॅलोपॅथीच्या प्रत्येक औषधाच्या लेबलवर ही यादी दिलेली असते. कायद्यानी तर तसं बंधन आहेच पण पुस्तकांतून अशी माहिती द्यावी असं काही कायद्यानी बंधन नाही. पुस्तकात तर इथ्यंभूत माहिती असते. अशी यादी अन्य कुठल्या पॅथीच्या औषधावर दिसते का हो? त्या बाटल्यात नेमकं काय आणि किती प्रमाणात आहे, हे तरी स्पष्टपणे लिहिलेले असते का? बिनअॅलोपॅथीवाल्या बाटल्यातील रसायने सर्वगुणसंपन्न आणि अॅलोपॅथीच्या बाटल्यातली तेवढी सर्व-अवगुणसंपन्न असं कसं शक्य आहे? आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीतच म्हणणं ही खरंतर आत्मवंचना आहे. स्वतःच स्वतःला फसवणं आहे आणि असे जाहीर दावे करणे म्हणजे रुग्णांनाही फसवणं आहे.
शिवाय होणारे सगळेच साईड इफेक्ट वाईटच असतात असंही नाही; काही वेळा चांगलेही असतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रीबीजग्रंथीचा कॅन्सर टळतो, गर्भपिशवीच्या अस्तराचा कॅन्सर टळतो, पाळीच्या वेळी अत्यंत कमी अंगावरून जातं. हे सगळे या गोळ्यांचे सु-साईड इफेक्टच आहेत. तेंव्हा साईड इफेक्टच्या बागुलबुवाला डरायचं काम नाही. उलट साईड इफेक्ट नाहीतच असला अचाट आणि  अशास्त्रीय दावा करणारे डरावने आहेत हे निश्चित.
जी गोष्ट साईड इफेक्टची तीच गोष्ट ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’ या नावाने खपवल्या जाणाऱ्या औषधांची. जे जे ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’, ते ते सेफ आणि उपयुक्त, इतकी बाळबोध कल्पना सोडून द्यायला हवी. नॅचरल असलेल्या सगळ्याच गोष्टी काही चांगल्या नसतात. स्वाईन फ्ल्यूची लागण, सर्पदंश, काही कंदमुळे खाल्याने होणारी विषबाधासुद्धा नॅचरलच आहे पण सुरक्षित नाही.
 एखादं औषध निसर्गात तयार सापडलं म्हणून ते आपोआप गुणकारी आणि सुरक्षित ठरत नाही आणि कारखान्यात बनवल्यामुळे तेच थेट खलनायकही ठरत नाही. कोणतेही रसायन हे निसर्गात सापडो वा कारखान्यात बनो, त्याचे गुणधर्म तेच असतात. हा तर शालेय रसायनशास्त्रात शिकवला जाणारा प्राथमिक सिद्धांत आहे. भल्याभल्यांना याचा विसर पडतो आणि ते अशा जाहिरातींना भुलतात. पूर्वी इन्सुलिन गुरांपासून, डुकरांपासून बनत असे. अगदी ‘नॅचरल’ इन्सुलिन. पण ह्याचे दुष्परिणाम फार. त्यामुळे आजचे ‘मानवी’ इन्सुलिन आले हे कारखान्यात बनतं.  पण हे पूर्वीच्या इन्सुलिनपेक्षा कित्येक पट सुरक्षित आहे. केवळ ‘नॅचरल’ आहे ह्या मिषाने गुरा/डुकराचे इन्सुलिन सध्या कोणी विकत नाही. कारण नॅचरलपेक्षा भारी असं मानवी इन्सुलिन आता आपण बनवलं आहे. ही जेनेटिक इंजिनिअरीगची किमया. कारखान्यात हे ‘मानवी’ इन्सुलिन बनवतात तिथे पाळलेले बॅक्टेरीया. मग आता हे ‘नॅचरल’ म्हणावं काय? का बॅक्टेरीया हे एका वर्गीकरणानुसार वनस्पतींमध्ये मोडतात, तेंव्हा याला ‘हर्बल’ म्हणू या का?
 ‘हर्बल’ हे ही असंच एक फसवं लेबल. ‘जे जे हर्बल ते ते उत्तम’ अशी काही तरी या जाहिरातदारांनी ग्राहकांची पक्की समजूत करून दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर आजची अॅलोपॅथीची कित्येक औषधे हर्बलच आहेत. अॅट्रोपीन हे अत्यंत उपयुक्त औषध, अट्रोपा बेलाडोना या वनस्पतीपासून मिळालं आहे. हृदयविकारावरील डिजीटॅलीस, मलेरियावरील क्विनीन, प्रसूतीवेळी वापरलं जाणारं मिथार्जीन ही देखील मूलतः हर्बल औषधेच आहेत. इतकंच कशाला हीच व्याख्या लावायची म्हटली तर पेनिसिलिन हे ही हर्बलच आहे की! ‘पेनिसिलियम नोटाटम’ या बुरशीपासून पेनिसिलीन बनतं. पण ‘घ्या हो घ्या, पेनिसिलीन घ्या, आमचं हर्बल पेनिसिलीन घ्या’ अशी जाहिरात तुम्ही कधी बघितली आहे का? ‘पेनिसिलीन वापरा कारण ते अमुक अमुक अभ्यासानुसार सुरक्षित आणि गुणकारी असून या या मर्यादांच्या आधीन राहून त्याचा योग्य तो उपयोग करा’, अशीच अॅलोपॅथीची नम्र आणि नेमकी मांडणी असते. अशा मांडणीचा आदर करायचा सोडून हर्बलचा झेंडा नाचवणाऱ्यांना काय म्हणावं?
होलिस्टिक हाही असाच एक शब्दविभ्रम नेहमी वापरला जातो. आमची पॅथी म्हणजे होलिस्टिक उपचार; पर्यायानी अॅलोपॅथी होलिस्टिक नाही असं सतत सुचवलं जात. ही होलिस्टिक ही काय भानगड आहे ते जरा नीट समजावून घेऊ या. होलिस्टिक म्हणजे काया आणि मन यांचा एकत्रित विचार करुन केलेले उपचार. काहीजण यात सर्व पॅथ्यांनी मिळून केलेले उपचार किंवा अध्यात्मिक किंवा दैवी आशयही शोधतात. पण आपण आपले ‘माइंड अँण्ड बॉडी’ याबद्दलच बोलू. आम्ही होलिस्टिक आहोत सबब तुम्ही, म्हणजे अॅलोपॅथीवाले, होलिस्टिक नाही असा सूर असतो. तुम्ही भले होलिस्टिक आणि काय काय असा पण त्याचा अर्थ अॅलोपॅथी बिन-होलिस्टिक असा कसा होतो? अॅलोपॅथीला होलिस्टिक म्हणायला काय हरकत आहे?
समजा एखाद्याला वारंवार फंगल (बुरशी) इन्फेक्शन झालं तर तो स्किन स्पेशॅलीस्ट काय फक्त  तेवढयापुरतच औषध देवून गप्प बसतो? मध्यमवयीन, जाडगुल्या माणसाला, वारंवार फंगल इन्फेक्शन होतंय, म्हटल्यावर त्या स्कीनवाल्याला लगेचच डायबेटीसची शंका येते. त्या तपासणीत डायबेटीस निघाला की ती औषध सुरु करावी लागतात. डायबेटीस तज्ञही निव्वळ शुगर लेव्हल नॉर्मल यावी अशी औषधे देऊन थांबत नाही. डायबेटीसचे डोळ्यावर होणारे परिणाम हे पेशंटला काही व्हायच्या आधीच ओळखता येतात, ह्याची कल्पना असल्यामुळे तो त्या माणसाला डोळे तपासायला पाठवतो. कदाचित तिन्ही डॉक्टर हे लक्षात घेतात, की हा जाडगुला माणूस नैराश्यानी घेरलेला आहे आणि त्यातच हे डायबेटीसचं निदान झाल्यामुळे आणखी खचलाय; सबब त्याला मानसोपचाराची गरज असू शकते. आता हे काय होलिस्टिक उपचार म्हणायचे नाहीत तर काय म्हणायचे? निव्वळ चार वेगवेगळे डॉक्टर त्याच्यावर उपचार करताहेत याचा अर्थ, त्यांनी त्याच्या शरीराचे चार तुकडे करून आपापसात वाटून घेतलेत, असा होत नाही. एका डॉक्टरनी अख्खा पेशंट तपासला तर ते होलिस्टिक आणि चार डॉक्टरनी मिळून आपापल्या ज्ञान आणि कौशल्यानुसार त्याच्या विविध विकारांवर विविधांगी उपचार सुचवले, तर ते म्हणे ह्या पेशंटकडे ‘पेशंट अॅज अ होल’ बघतच नाहीयेत. तुकड्यातुकड्यांनी बघताहेत. असं कसं? स्किन, डायबेटीस, डोळे आणि मनतज्ञ असे चार डॉक्टर त्याला तपासतात ते काही त्यांना पेशंटच्या शरीराचे तुकडे करून, एकेक तुकडा  तपासायची सैतानी वखवख सुटल्येय म्हणून नाही. या प्रत्येक क्षेत्रात काम करायचं तर एवढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य लागतं की कोणा एकाच माणसाला हे सगळं समजावून घेणं आणि प्रभावीपणे वापरणं शक्य नाही. अॅलोपॅथीत वेगवेगळे तज्ञ आहेत या मागचं कारण हे आहे. अॅलोपॅथी वगळता अन्य पॅथीत ते जवळपास नाहीत ह्या मागचंही कारण हेच आहे. आज निव्वळ डोळ्याची सोनोग्राफी करणारे, निव्वळ प्रसूतीवेळी भूल देणारे, निव्वळ हाताची ऑपरेशन करणारे वेगवेगळे डॉक्टर आहेत. वैद्यकीच्या तेवढयातेवढया क्षेत्रातही तज्ञ होण्यासाठी  आयुष्य वेचावं लागतं आणि तरीही बरंच काही अस्पर्श रहातं, एवढाच याचा अर्थ.
आम्ही शरीरातील सर्व घटकांचे ‘संतुलन’ साधतो असंही म्हटलं जातं. अॅलोपॅथी काय असंतुलन साधते काय? कोणत्याही आय.सी.यु. मधे किंवा ऑपरेशन थिएटर मधे जाऊन बघा. ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साइ; सोडीयम, पोटॅशियम आणि क्लोराईड; इनपुट आणि आउटपुट; अॅसीटीलकोलीन आणि कोलीनईस्टरेज; या आणि अशा कित्येक घटकांचा एकाच वेळी काय सुरेख तोल साधलेला असतो ते.

अॅलोपॅथी असं मानतं की कोणत्याही आजाराचा विचार आपल्याला
1.    रोगकारक घटक (Agent),
2.    रोगी (Host) आणि
3.    त्याचे पर्यावरण (Environment)
या तीन मुद्यांच्या आधारे करता येतो. कोणत्याही आजाराचे उपचार हे;
1.    आरोग्यवर्धन (Health Promotion),
2.    रोग प्रतिबंध (Specific Protection),
3.    लवकर निदान-लवकर उपचार (Early Diagnosis & Treatment),
4.    पंगुत्व रोखणे (Disability Limitation) आणि
5.    पुनर्वसन (Rehabilitation)
या पाच स्तंभांवर उभारता येतात.
याच तत्वांवर देवीचं निर्मूलन झालं, आता पोलिओचं होऊ घातलंय. मधुमेह, रक्तदाब, इतकंच काय पण ‘रस्ते अपघात’ या आधुनिक रिपूंविरुद्ध दमनयुद्ध छेडलं जातंय तेही याच तत्वांच्या आधाराने. अॅलोपॅथी ही खऱ्या अर्थाने मानववंशाची पॅथी आहे. तिची तत्वे सर्व मानवांना समप्रमाणात लागू होतात. ती ‘चिनी’, ‘अरबी’ किंवा ‘निग्रो’ नाहीये. ती ‘होमो सेपिअन्स’साठी आहे. जसा जर्मन भौतिकशास्त्र आणि भारतीय भौतिकशास्त्र असा भेद संभवत नाही तसंच वैद्यकविज्ञानाचंही आहे; निदान असायला हवं. पण असं दिसत नाही. अनेक उपचार पद्धती ह्या त्या त्या संस्कृतीत उगवलेल्या आहेत. त्या त्या संस्कृतीनुरूप त्यांची तत्व आणि त्यावर बेतलेले आडाखे आहेत. (उदाः आपल्याकडे कोडासाठी पूर्वजन्मीचे सुकृत हेही एक कारण सांगितले आहे, हे सर्व मानवजातीस कसे लागू व्हावे बरे?) अशी सर्व मानवजातीच्या सर्व आजारांचा विचार कवेत घेईल अशी कोणतीही कल्पना वा संकल्पना या अन्य विचारांत आढळत नाही. ही एक मोठीच त्रुटी आहे.
अॅलोपॅथीला टीकेचं वावडं नाही. विरोधातूनच विज्ञानाचा विकास होत आलाय. वैज्ञानिक पुराव्यानिशी केली जाणारी कोणतीही टीका ही हितकारकच असते. पण निव्वळ शेरेबाजी, मोघम आरोप, तीरकस टोमणे ह्यांनी काहीच साध्य होत नाही.
याचा अर्थ अॅलोपॅथीमध्ये सारं काही ‘आल इज वेल’  आहे असं नाही, पण जे काही ‘वेल’ आहे त्याचं श्रेय तरी आपण अॅलोपॅथीच्या पदरात टाकायला हवं एवढंच माझं म्हणणं.

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो. क्र. ९८२२०१०३४९


Saturday 14 October 2017

प्रेग्नन्सी आणि सेक्स

प्रेग्नन्सी आणि सेक्स
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९

दिवस राहिले की नेहेमीच विचारायला हवा आणि क्वचितच विचारला  जाणारा प्रश्न म्हणजे; ‘आता शरीर संबंध आले तर चालतील का?’ हा प्रश्न मनात असतो, ओठापर्यंत येतो पण बाहेर मात्र क्वचितच पडतो; मात्र खचितच पडायला हवा.
पण एखादयाने विचारला जरी प्रश्न, तरी त्याच ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढं त्रोटक उत्तर देता येत नाही. ह्याचं उत्तर चांगलं लांबलचक आहे. संभोग, सेक्स वगैरेबाबतीत मूलभूत दृष्टीकोन समजावून सांगणे आहे. शिवाय शरीर संबंध हे जोडप्यात घडत असल्याने उत्तर दोघांच्या कानी पडणे आवश्यक आहे. बरेचदा नवरोजी सोबत नसतात, तेंव्हा निव्वळ बायकोला काही सांगणं फारसं परिणामकारक ठरत नाही. किंवा बायकोला बाहेर बसायला सांगून नवरोजी हा प्रश्न डॉक्टरांच्या कानात कुजबुजतात. डॉक्टर जे सांगतात ते ‘जसंच्या तसं’ जोडीदाराच्या कानावर घालणं अवघडच.  मग डॉक्टर आपलं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
तेंव्हा सादर आहे दोघांनाही माहिती हवं असं संपूर्ण उत्तर.
सुरवातीच्या काही महिन्यात तर सेक्स म्हणजे त्या स्त्रीच्या दृष्टीनी संकटच असतं. प्रचंड मळमळत असतं. पोटात नुसतं ढवळून येत असतं. साध्या प्रवासानी काही काळ मळमळलं तरी आपण कोण वैतागतो. काही म्हणजे काही करावसं वाटत नाही. मग दिवस-दिवस हा त्रास काढणाऱ्या बाईला तर काय होत असेल? अशा वेळी तिनी रतिसुखाला होकार देणं अपेक्षित तरी आहे का? पण ही गोष्ट पुरुष समजावून घेत नाहीत. बायका सहसा इतक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मग बेबनाव सुरु होतो.
सुरवातीला खूप थकवाही जाणवतो. एरवीची सवयीची कामही आता जाचक वाटायला लागतात. खूप झोप येते. रात्र झाली की झोपायचं, रात्री झोपून झोपून कंटाळा आला म्हणून दिवसा झोपायचं, पुन्हा रात्र झाली, की रात्र झाली म्हणून झोपायचं; अशी स्थिती होते. त्यातून उलटीसाठी गोळ्या दिल्या असतात, त्यानीही झोप येते. या झोपेचा निराळा अर्थ काढला जातो. आता त्या स्त्रीला कामेच्छाच उरली नाही अशी समजूत करून घेतली जाते.
गरोदरपणात स्त्रीचं रूप खूप खूप बदलतं. इतकं की तिचाच तिच्या बदललेल्या रूपावर विश्वास बसत नाही.
लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।।’
अशी कवींनी सृष्टीसौंदर्याची तारीफ केली असली तरीही या कालावधीतले अनेक बदल मुळीच सुसह्य नसतात.
बरेचदा गालावर, नाकावर एक मोठा काळा डाग येतो (Malesma), दिसायला भारी वाईट दिसतो. पोटावर बेंबीपासून खाली जणू कोळश्यानी ओढावी अशी एक काळी रेघ उमटते (Linea Nigra). ही देखील विद्रूप दिसते. एकूणच त्वचा काळवंडते. निपलभोवती, मायांगाभोवती काळेपणा वाढतो. शरीरातल्या वाढत्या मेलानिन ह्या द्रव्याच्या ह्या खुणा. प्रसूतीनंतर  या मावळतात. पण किंचित मागमूस राहु शकतो, राहतोच. पुढे पुढे पोटावर, मांड्यांवर, स्तनावर, पांढऱ्या रेघा उमटतात (Strie Gravisarum). हे चट्टेपट्टे अगदी विचित्र दिसतात. ह्या रेघा उठतात त्या पोटाची त्वचा अति ताणल्यामुळे. त्वचेचा आतला पापुद्रा चक्क विरतो. कधी खाज सुटते, कधी लाली येते. किरकोळ औषधांनी हा त्रास थांबतो. पण खुणा येऊ नयेत किंवा आलेल्या पूर्ण जाव्यात असं औषध नाहीये. असूच शकत नाही. कारण पोट तर वाढणारच आणि त्यामुळे त्वचा तर विरणारच. म्हणूनच अशा हेतूने विकल्या जाणाऱ्या औषधांची कामगिरी यथातथाच  आहे. त्वचेच्या बदलत्या रंगरूपाबरोबरच पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येते, केसही गळायला लागतात. या पाठोपाठ शरीराची ढब बदलते. सरळ ताठ उभं रहाताच येत नाही. पुढे पोक काढून उभं रहावं लागतं. स्तनांचा आकार वाढतो, ते खाली ओघळतात आणि अगदी काखेपर्यंत या गाठी वाढतात. यामुळे बेडौलपणा येतो. स्तनांना हुळहुळेपणा येतो. एरवी हवेहवेसे स्वर्गीय वाटणारे स्पर्श, आता नकोसेच नाही तर तापदायक वाटायला लागतात. स्तनातून अगदी सुरुवातीपासून चीक बाहेर पडतो. हे लक्षात येताच काहींना उगीचच ओशाळल्यासारखं होतं. योनी स्त्रावातही बरेच बदल होतात. त्या स्त्रावाचं प्रमाण आणि गंध बदलतो. योनी मार्गाला आणि एकुणच स्त्रीअवयवांना वाढलेला रक्तपुरवठा  हे ह्याचं प्रमुख कारण. रक्त पुरवठा इतका वाढतो की कधी कधी अलगद स्पर्शानेही रक्तस्त्राव सुरु होतो. मग कोण धावपळ, हा रक्तस्त्राव गर्भाशी थेट संबंधित नाही अशी खात्री होईपर्यंत कोण काळजी.


ह्या साऱ्याचा स्त्रीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अधिक गहिरा असतो. अनेकींना स्वतःबद्दल विलक्षण न्यूनगंड वाटायला लागतो. ‘आता आपण पूर्वीसारख्या आकर्षक, सुंदर दिसत नाही; निस्तेज, काळवंडलेली कांती, बांधाही बेढब, आता हे सारं पूर्वीसारखं होणं जाम अवघड. आता आपण आपल्या नवऱ्याला पूर्वी इतक्याच आवडू का?’, अशी चिंता भेडसावायला लागते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. अशा वेळी नवऱ्यानी दिलेला विश्वास हा लाखमोलाचा ठरतो. पुरुषांनी हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा, आचरणात आणायला हवा.
ह्या बरोबर इतरही अनेक प्रकारच्या ‘भीत्या’ अशा जोडप्याला छळत असतात. गर्भपात होईल, कमी दिवसाची प्रसूती होईल, अशी भीती वाटत असते. इतर काही बाधा नसेल तर संबंधामुळे ना गर्भपात होतो ना कमी दिवसाची प्रसूती.  बाळाला इजा होईल अशीही भीती सतावत असते. शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इजा होऊ शकत नाही. बाळाला इन्फेक्शन होईल अशीही भीती वाटत असते. पण शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इन्फेक्शनही होत नाही. नवऱ्याच्या शरीरातील जंतू थेट बाळाला टोचले जात नाहीत. समजा नवऱ्याला काही इन्फेक्शन असेल, उदाः एचआयव्ही, तर ते आधी आईला होते आणि आईच्या रक्तातून ते बाळापर्यंत पोहोचते. पण बहुतेकदा नाहीच पोहोचत. ‘नउ मास नउ दिवस रक्तामासाचा घास करून मी तुला लहानाचा मोठा केला’; असं सिनेमातल्या आया जरी म्हणत असल्या, तरी प्रत्यक्षात आईचं रक्त आणि बाळाचं रक्त हे दोन वेगवेगळ्या पाईपलाईन मधून फिरत  असतं. आईचं रक्त, बाळाच्या  शरीरात खेळतबिळत नसतं. आई आणि बाळाच्या रक्ताचा थेट संपर्क येत नाही. अतिपातळ, अतिसूक्ष्म पडद्याद्वारे आवश्यक व अनावश्यक पदार्थांची देवाणघेवाण तेवढी होत रहाते. आईच्या शरीरातील जंतुंना बाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. हा पडदाही भेदावा लागतो. काहीच जंतुंना, काहीच वेळी हे साधतं. बहुतेकदा नाहीच साधत.
काही जणांना तर होणाऱ्या बाळाचं भवितव्य काय असेल अशी विचित्र चिंता लागून रहाते. मोठेपणी आपले बाळ कोण होईल? ते जगात आपलं नाव काढेल ना? असे विचार मनात घोंगावू लागतात. अर्थातच इतक्या दूरची चिंता वहाणाऱ्यांच्या कामरंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. आपला हा जो काही उद्योग चालला आहे तो बाळ आतून बघतंय असं चित्र काही जणांना सतावतं. असा काही विचार आला की मंडळी ऐक वक्ताला अगदी वरमून आणि शरमून जातात. अश्या लाजऱ्या लोकांसाठी हे नमूद केलंच पाहिजे की बाळाला आतून काहीही दिसत नाही, तेंव्हा, ‘चालू दे तुमचं!’
पोकळ शंकांच्या बरोबरीने स्त्रीचे मूडही गरोदरपणात एरवीपेक्षा(ही) पटापट बदलतात. घटकेत रडू तर घटकेत हसू असा खेळ सुरु होतो. नवऱ्याची खूपच गोची होते. स्त्रीची कामेच्छा गरोदरपणात जरा कमी होते. होर्मोनमधील होणारे बदल मेंदूतही आपली करामत दाखवतात. मातृभावना उफाळून येतात. पिल्लांना इजा करू धजल्यास प्राणीही किती चवताळून अंगावर येतात. अशाच भावना निसर्गाने मानवी मेंदूतही पेरल्या आहेत. अर्थातच कामेच्छा कमी झाली तरी संपतबींपत नाही. ही बाब पुरुषांनी समजावून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अशा अवस्थतेत त्या स्त्रीला मानसिक आधाराची, विश्वासाची गरज असते. ह्या कालावधीत एकमेकांबरोबर वेळ घालवणं, बाळासाठी तयारी करणं, यात बाबांचाही सहभाग असेल तर पतीपत्नीचं नातं अधिक गहिरं होत जाईल. नात्यात एक नवा भरजरी धागा गुंफायची संधी म्हणून याकडे पहायला हवे.
निव्वळ दिवस रहाण्याने, एक मुद्दा निर्विवादपणे सिद्ध झालेला असतो. ‘आपल्याला दिवस राहू शकतात!’. लग्नानंतर पहिल्या वर्षात दिवस राहिले नाहीत तर लोक त्या बाईकडे विचित्र नजरेने बघतात, दोन वर्षात राहीले नाहीत तर त्या पुरुषालाही, ‘नको ग बाई हा मेला पुरुषाचा जन्म!’ असं होऊन जातं आणि तीन वर्षात राहिले नाहीत तर त्यांच्या डॉक्टरलासुद्धा अशा नजरांचा सामना करावा लागतो. बायकोला दिवस ‘रहाववू’ शकणे हे पुरुषाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचं असतं. वांझोट्या स्त्रीची वेदना कथा कादंबऱ्यातून आणि नाटका सिनेमातून सतत कुरवाळली जाते, पण अशा पुरुषांनाही काळजात प्रचंड ओझं घेऊन जगावं लागतं. मोकळेपणी रडणं पुरुषांना  नॉट अलाउड; तेंव्हा फक्त कुढणं चालू असतं. दिवस राहिल्यामुळे, ज्या एका आउटकमवर अख्खी लग्नसंस्था उभी आहे, ज्या बातमीची दोन्ही घरचे आतुरतेने वाट पहात असतात, ती शक्यता आता नजरेच्या टप्यात येते. त्या जोडप्यावरचा ताण हलका होतो. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वंशवृद्धी हा तात्कालिक हेतू साध्य झाल्यामुळे सेक्सकडे आता निर्हेतुकपणे बघणं शक्य होतं. हा अनुभव खूप वेगळा आणि सुंदर असतो. निव्वळ आनंदासाठी संभोग, काहीही मिळवण्यासाठी नाही. हा तर निष्काम शृंगारयोग.
बदलत्या भूमीकेचंही दोघांना अप्रूप असतं. मित्र-मैत्रीण, पती-पत्नी हे नातं आता आई-बाबा, बालक-पालक  असं बदलणार असतं. पण कित्येक पुरुषांना बायकोबद्दल आता सुप्त असूया वाटते. आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत घरातील कर्ता पुरुष हाच घराचा केंद्रबिंदू असतो. रोजची भाजी कोणची करायची हे ही त्याच्याच कलानी ठरवलं जातं. पण दिवस राहीले की पुरुषाच्या पुढारकीत वाटेकरी निर्माण होतो. ‘चहाच्या वासानीसुद्धा मळमळत तिला, तेंव्हा आजपासून सकाळी सगळ्यांसाठी कॉफी!’ अशा घोषणा नित्याच्याच होतात. नवेपणाचे किती सोहळे!  ते डोहाळजेवण... झोपाळ्यापासून ते थेट चंद्रापर्यंतचं. ते फोटो. ते कौतुक. घराचा सगळा फोकस त्या बाईवर रहातो आता. असूया म्हणून असो वा सोय म्हणून असो, या साऱ्यातून  बाजूला रहाण्यापेक्षा या साऱ्यात सहभागी होणं हे चांगला बाप होण्यासाठी उपयोगी आहे. भावी पालकांसाठी आजकाल मार्गदर्शन वर्ग असतात. यातही बाबांची हजेरी बाबांना खूप काही शिकवून जाते. पती-पत्नीचं नातं निवळ शरीरभोगावर आधारलेलं नाही, नसावं. हे सिद्ध करण्यासाठी एक संधी म्हणून ह्या साऱ्याकडे पहावं.
शेवटी मूळ प्रश्न आणि त्याच्या स्पष्ट, नेमक्या उत्तराकडे. ‘गरोदरपणी संबंध कधी टाळावेत?’
  • पहिले तीन महिने आणि शेवटचे दोनएक महिने संबंध टाळावेत असा सल्ला बहुसंख्य प्रसूतीतज्ञ देतात पण यालाही फारसा शास्त्रीय आधार नाही.
  • काही निवडक आजारातच संभोगावर बंदी आहे. रक्तस्त्राव होत असेल/ झाला असेल, वार खाली असेल, बीपी वाढल्याने वा अन्य कारणानी संपूर्ण विश्रांतीची गरज असेल, पाणमोट फुटली असेल, पिशवीचे तोंड उघडले असेल, तर संभोग वर्ज्य आहे; एरवी नाही.
  • पोटावरती दाब येणार नाही असे संभोगाचे आसन असावे. सेक्स म्हणजे निव्वळ लिंगाचा योनी मार्गात प्रवेश ही फारच मर्यादित, खुजी, संकुचित व्याख्या झाली. प्रेमंभरानी दिलेले आलिंगन, चुंबन, मर्दन, परस्परांचे हसतमैथुन, मुखमैथुन वगैरेही सेक्सचेच प्रकार आहेत. प्रयोगशील जोडपी या कालावधीत हे प्रयोग करू शकतात. पत्नीला आनंद वाटेल, सुसह्य होईल इतपतच धाव घ्यावी.
  • प्रसूतीनंतर सर्व शरीर पूर्वपदावर यायला किमान दीड महिना लागतो. तेंव्हा प्रसूतीनंतर दिड महिना शरीरसंबंध टाळावेत. त्यातून पोटावर सीझरचे किंवा मायांगावर नॉर्मलवेळी सुद्धा कधी कधी घातलेले टाके दुखत असतील तर संबंध टाळणं योग्य. त्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि गर्भ निरोधक साधनांबद्दल सल्ला घेऊन कामक्रीडा सुरु करायला हरकत नाही. बाळाला अंगावर पाजायच्या काळात योनीमार्गाला कोरडेपणा येतो. यामुळे संभोगाच्या वेळी घर्षणाचा त्रास होतो, दोघांनाही होतो. यासाठी डॉक्टरी सल्ल्यांनी वंगणयुक्त मलमे वापरायला हवीत.
  • कधी कधी शरीर आणि मेंदू यांचा ताळमेळ चुकतो; बाळाला पाजतापाजताच कामतृप्तीचा आनंद प्राप्त होतो. हे आईसाठी अनपेक्षित असतं. पण यात अॅबनॉर्मल काही नाही.

‘समागम’ हा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे. समागम ह्या शब्दाचा एक अर्थ असा सांगतात की, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद घेणं आणि देणं. हा किती सुंदर अर्थ आहे. हे साधायला हवं. ह्यासाठी उभयपक्षी सहकार आणि पुढाकार हवा.

प्रथम प्रसिद्धी पुरुष उवाच दिवाळी २०१७
या आणि अशा लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyakar.blogspot.in>