Friday 12 April 2024

हवामान अवधान लेखांक २

लेखांक २ रा

 

आस्मानी आणि सुलतानी

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे आणि यामुळे धरा ज्वरामुळे निर्माण होणारे प्रश्न अधिकच बिकट  होत आहेत.

 

आता यातून मार्ग काढायचा, भविष्यकाळाचा वेध घ्यायचा, तर भूतकाळाचा नेटका अभ्यास असायला हवा. नव्या तंत्रज्ञानाने इतिहासाची  आणि प्रागैतिहासाची नवी दालने खुली  केली आहेत. पृथ्वीने कधी आणि किती उन्हाळे, हिवाळे पाहिले आणि तत्कालीन सजीव सृष्टीने या अरिष्टाचा कसा सामना केला, हे आता समजावून घेता येतं. एकच उदाहरण पाहू. माणसाच्या प्रतिकारशक्तीच्या अभ्यासातून, कोणती शस्त्रास्त्र तिला कधी प्राप्त झाली हे शोधता येतं. याचा अर्थ उत्क्रांतीच्या ओघात त्या  त्या काळात ती जीवनोपकारक  ठरली. म्हणजे त्या काळी, त्या शस्त्रांनी घायाळ होणारे शत्रू असतील.  मग हे शत्रू कोणत्या वातावरणात वाढतात बरे? अशा बदलाला तोंड देत जगले कोण? तगले कोण? शेष कोण आणि नामशेष कोण?; असा उलटा विचार  करता येतो. भूतकाळाचा वेध घेता येतो. जे शेष राहिले, ह्या संकटाला पुरून उरले, त्यांचे आपण वंशज.

 

अशा संशोधनातून प्रश्न जरी नीट समजला तरी या  मंथनातून जी उत्तरे येतील ती अमृतमय असतील असं नाही. असे उपाय अमलांत आणणे म्हणजे हलाहल पचवण्यासारखंच. कारण हा निव्वळ शास्त्रीय प्रश्न नाही. त्याला अनेक अर्थ-राजकीय कंगोरे आहेत. आशिया आणि आफ्रिकेतील प्रचंड मोठी  जनता, भरपूर ऊर्जा वापरून वेगाने प्रगती करण्यास आतूर आहे.  ‘पृथ्वीच्या संपत्तीची लूट तुम्ही केली,  आमच्यावर राज्य गाजवून आम्हालाही लुटलंत आणि आता पोट भरल्यावर, ढेकर देऊन, आम्हाला धरा-ज्वराचा धाक घालून, सबूरी शिकवणे हा अप्पलपोटेपणा आहे’, असं त्यांचं पहिल्या जगाला सांगणं आहे.

 

हा प्रश्न कुठल्याही जागतिक युद्धापेक्षाही भीषण त्यापेक्षाही गंभीर आणि सार्वत्रिक परिणाम असणारा आहे. कसं ते इतिहासातील उदाहरणाने  पाहू.

 

सुमारे १८६० साली, सागर आणि धरेवरील तापमान  थार्मोमिटरने नीट नोंदवायला सुरवात झाली. ते वाढते आहे आणि त्याला मानवी कारणे आहेत हे आता स्पष्ट झाले. कॉलराच्या साथीचा मागोवा घेता घेता एल् निनोचा प्रताप स्पष्ट होत गेला. भारतात एल्  निनोच्या (आणि काही घटकांच्या) परिणामी, १८७६ ते १८७८ असे  महादुष्काळ पडले. एल् निनोमुळे आशियाकडेचे बाष्प पूर्व पॅसिफिक प्रदेशात वाहून नेले गेले. पेरू वगैरे देशात अतिवृष्टी तर आशियात अवर्षण अशी परिस्थिती निर्माण झाली.

 

मात्र या आस्मानीने घडलेली उपासमार आणि रोगराई सुलतानीने शतगुणीत झाली. वसाहतवादी, नफेखोर, शोषक ब्रिटिश शासनकर्त्यांची भूमिका माल्थस विचारांनी भारलेली होती. दुष्काळ ही तर भूईला भार झालेली प्रजा कमी करून संतुलन साधणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे, असा त्यांचा दृष्टीकोन होता. ‘धान्य निर्मितीच्या वेगापेक्षा भारतीयांची प्रजा वेगानी वाढत्येय’, (तेंव्हा दोष जनतेचा आहे), हे व्हाईसरॉय लॉर्ड लिटन यांचे उद्गार. त्यामुळे  इथल्या जनतेची अन्नान्न दशा झालेली असताना इथले धान्य ब्रिटनला निर्यात होत राहिले. चार शितं तरी मिळतात म्हणून सरकारी कामांवर जणू भुतंच, अशी खंगलेली, कंगाल माणसं राबू लागली. पुरुषांस, दिवसांस एक पौंड धान्य आणि एक आणा असा दर होता. बायका पोरांना म्हाताऱ्यांना  आणखी कमी होता.  एल् निनोचा फेरा उलटून, पुन्हा पाऊस पडून, प्रजेच्या तोंडी काही पडेपर्यंत, उपासमारीनं आणि प्लेग, कॉलरा वगैरे रोगराईनी कोट्यवधी बळी घेतले.

 

ही सुलतानी निव्वळ वसाहतींतच नाही तर खुद्द इंग्लंडच्या घटक राज्यांतही थैमान घालत होती.   आयर्लंडवर इंग्लंडची सुलतानी होती तेंव्हा बटाटा युरोपात आला (१५९०) आणि  गरीबाघरचा घास झाला. ‘द पोटॅटो इटर्स’ हे व्हॅन गॉंचे चित्र प्रसिद्धच आहे.  पुढे बटाट्यावर बुरशी पडून पीकं गेली (१८४६-४९)  आणि कोट्यवधी  आयरीश माणसे दुष्काळाचा घास झाली. गोरगरीब उपाशी तर मेलेच पण अस्वच्छतेने उवांची बजबजपुरी माजली आणि कित्येक टायफसने मेले; उरलेसुरले कॉलराला बळी पडले. त्यात धनी इंग्लंडने आयर्लंडमधील  धान्याच्या निर्यातीला मोकळीक देऊन, मक्याच्या आयातीवर बंदी घातल्याने (कॉर्न लॉ) परिस्थिती आणखी चिघळली.

 

दुष्काळ अनेकांचा पोषणकर्ताही ठरतो. या महादुष्काळानंतर मलूल प्रांतांवर अधिराज्य गाजवण्यासाठी वसाहतखोरांनी पुन्हा हुंकार भरला.  चहा, कॉफी, उस आणि रबराच्या मळ्यांवर राबायला मजूर सस्यात मिळाले म्हणून  जगभरचे मळेवाले खुश झाले.     पाद्रीही खुश झाले. येशूच्या कळपात वळवायला त्यांना अनाथ मुलं, नाडलेली प्रजा आयतीच  मिळाली. त्यांनी नेटीवांसाठी इस्पितळे उभारली. अनेक ठिकाणी आधुनिक वैद्यकीशी स्थानिकांची ही पहिली ओळख ठरली.   पुढे त्यातूनच  माहिती संकलन आणि संशोधनाची सुरवात झाली. सेवाभावी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे महत्व वाढत गेले. लहान मोठे सावकार खुश झाले. त्यांचे  पाश  जनांच्या गळा पडले आणि बलाढ्य देशांचे पाश गुलाम देशांच्या गळा पडले. धनको आणि ऋणको देशांतील तफावत वाढली. थोडक्यात एल् निनोच्या एका फटक्यानी चक्क  ‘तिसऱ्या जगाची’ निर्मिती झाली.

 

म्हणूनच आस्मानी बरोबरच सुलतानीचा अभ्यासही हवा.

 

 दै. सकाळ 

१२.४.२४

Saturday 6 April 2024

हवामान अवधान:- लेखांक १

धरा-ज्वर आणि मानव रोगजर्जर 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई 

सर्व ऋतुंची नावे ‘ळा’ ने संपतात आणि म्हणून, वर्षातून निदान तीनदा, ‘आला उन्हाळा/पावसाळा/हिवाळा; आरोग्य सांभाळा’  असा यमक जुळवत मथळा देता येतो. आरोग्याचा आणि हवामानाचा संबंध एवढाच नाहीये!  तो अधिक सखोल आणि जटील आहे. धरा-ज्वर आणि परिणामी हवामान बदलाची हवा असताना तो समजावून घेणे आवश्यक आहे. 

जास्तीजास्त इतके आणि कमीतकमी इतके अशा हवामानाच्या एका अरुंद पट्ट्यामध्येच आपण, आपली पिकं, आपले पाळीव प्राणी, आपले रोगजंतू, आपले मित्रजंतू, गुरंढोरं जगात असतो; नव्हे जगू शकतो. सुसह्य हवामानाच्या ह्या दोन काठांमध्येच मानवी जीवनाचा आणि  संस्कृतीचा प्रवाह वाहू शकतो.  याला म्हणतात गोल्डीलॉक्स झोन. गोल्डीलॉक्सची लोककथा प्रसिद्ध आहे. अस्वलांच्या गुहेत शिरलेली ही गोड मुलगी; पाहते तो काय एक बेड खूप मोठं, एक खूप छोटं आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. एका बाउल मधलं पॉरिज खूप गरम, एकातील खूप गार आणि एक मात्र ‘जस्ट राइट’. वातावरणाचे तापमान (आणि इतरही अनेक घटक) हे असे  ‘जस्ट राईट’ असावे लागतात. जेंव्हा गोष्टी ‘जस्ट राईट’ असतात तेंव्हाच आपण सर्वाधिक  सुखासमाधानाने नांदू शकतो.

ही मर्यादा ओलांडली गेली की साऱ्या रचनेवर ताण येतो. दुष्काळ पडतात, पूर येतात, पिकं जातात, कुपोषण, उपासमार होते; अशी भुकी कंगाल प्रजा रोगराईला बळी पडते. ही रोगराई सुद्धा विलक्षण असते. नव्या वातावरणाला साजेसे नवे जंतु पसरतात. आपला त्यांचा आधी सामना झालेला नाही, तेंव्हा असे अपरिचित आजार झपाट्याने पसरतात. डास, माशा, पिसवा, उंदीर अशांची प्रजा वाढते आणि मलेरीया, कॉलरा, प्लेग सारखे चिरपरिचित आजारही पसरू लागतात. नैसर्गिक उत्पातांच्या पाठोपाठ बेघरांचे, बेकारांचे, अनाथांचे, निराधारांचे तांडे शहरांच्या दिशेने निघतात. मनोरुग्णांची संख्या वाढते. 
  
‘हेल्थ इज वेल्थ’; तेंव्हा रोगिष्ट प्रजा समृद्धी निर्माण करू शकत नाही. मग दैन्य आणि दारिद्र्य पसरतं. दरिद्री देश उत्तम आरोग्य व्यवस्था उभारू शकत नाही; कारण ‘हेल्थ इज वेल्थ’ इतकेच, ‘वेल्थ इज हेल्थ’ हे ही खरेच आहे.  जे विकल असतात त्यांचा आधी बळी जातो आणि इतरांचे कालांतराने प्राण जरी नाही तरी त्राण तरी जातातच. हा सारा उत्पात केवळ माणसापुरता सीमित नाही. ऋतुचक्राचा आस उडाल्यावर सारी सृष्टीच डळमळली तर त्यात आश्चर्य नाही. सृष्टीत आपण कस्पटासमान, तेंव्हा जग पुनरपि सावरण्याची आपली क्षमता तशी मर्यादित. 

हे भविष्याचे कल्पना चित्र नाही. हे आपल्या आसपास, संथपणे पण निश्चितपणे घडते आहे. पृथ्वीचा पारा चढतोय हे आता अटळ सत्य आहे.

पृथ्वीचे तापमान जर सतत गार, गरम होतच  असतं तर आत्ताचा तापही या निसर्गचक्राचा भाग असेल,  हा तापही चढेल आणि उतरेल,  मागील तापातून माणूस जगला वाचला त्याअर्थी याही तापातून निभावून जाईल अशी भाबडी आशा काहींना असते. पण हा धरा-ज्वर वेगळा आहे. पूर्वीच्या तापाशी तुलना करता, एकविसाव्या शतकाच्या अखेरीस चांगला तीन चार डिग्री सेल्सियसने पारा चढेल, असा अंदाज आहे. पृथ्वी चांगली जख्ख म्हातारी आहे. वीस तीस मिलियन वर्षांचा इतिहास आहे तिला पण ती अशी तापाने फणफणल्याची नोंद तिच्या जुन्या केसपेपरवर आढळत नाही. पूर्वीही हिमयुगांची आवर्तने झाली आहेत आणि दरम्यानच्या काळात वसुंधरा तापली होतीच; पण इतकी नाही.  इतकंच नाही तर हा पारा झपाट्याने चढेल ही देखील गंभीर गोष्ट आहे. पूर्वीही पृथ्वीला ताप आला होता पण इतक्या झपाट्याने तो वाढला नव्हता. पारा वेगेवेगे  वाढल्यामुळे वाढत्या तापमानाशी जुळवून घेणं कित्येक जीवमात्रांना अशक्य होईल. 

ह्याला जबाबदार आहोत आपण, मनुष्य जात. माणसाला अग्नीचा शोध लागला, पुढे शेती, औद्योगिक क्रांती अशी माणसाची ऊर्जेची भूक वाढतच गेली आणि कळत नकळत वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड सोडला जाऊ लागला. तापमान वाढीत याचा मोठा वाटा आहे.  मनुष्यहस्ते घडलेल्या या पापाचं माप म्हणजे वातावरणातील कर्बवायू प्रमाणात पूर्वीपेक्षा सुमारे 40%नी  वाढ. आपण जणू पृथ्वीला कर्बवायूची आणि कसली कसली गोधडी लपेटून, सूर्याची उष्णता इथेच राहील अशी व्यवस्था केली आहे.

माणसाच्या वावराचा, नैसर्गिक संसाधनांच्या वापराचा ठसा अधिकाधिक खोल, रुंद आणि गडद होतो आहे. पृथ्वीच्या जीवनातलं  सद्य युग म्हणजे होलोसीन युग. ११,७०० वर्षापूर्वी सुरू झालेले हे नूतनतम युग. होलोसीन  युगाकडून, जेमतेम 200 वर्षांमध्ये, आपली वाटचाल ‘अँथ्रोपोसीन’ युगाकडे व्हायला लागली आहे. अँथ्रोपोसीन म्हणजे मनुष्यमात्रांचे युग, छे, छे, हे तर ‘मात्र मनुष्य’ युग. इथे केवळ एकाच प्राण्याचे  अधिराज्य आहे. आज भूतलावरील  पृष्ठवंशीय प्राण्यांत 98% वाटा माणूस आणि त्याच्या  पाळीव प्राण्यांचा आहे, म्हणजे बघा.   ‘विपुलाच पृथ्वी’च्या देण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आपण पहिल्यांदा ओरबाडून घेतलं ते 1980 च्या सुमारास.  तेव्हापासून हे रोज सुरू आहे. व्याजावर जगण्याऐवजी माणसाने निसर्गाच्या मुद्दलालाच हात घातला आहे. 
पुढील काही लेखांकात ह्याचे आरोग्यविषयक परिणाम आपण पाहणार आहोत. 

दै.सकाळ
५एप्रिल २०२४

Wednesday 20 March 2024

फार्मा कंपन्यांचे मार्केटिंग आणि डॉक्टरांचा मोह

 

फार्मा कंपन्यांचे मार्केटिंग आणि डॉक्टरांचा मोह

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

नुकतीच भारत सरकारने औषधांच्या मार्केटिंगबद्दल संहिता (UCPMP2024) जारी केली आहे. २०१५च्या अशाच संहितेची ही ताजी आवृत्ती. आधीची संहिता ‘ऐच्छिक’ होती, म्हणजे दातपडक्या वाघोबासारखी. आता ‘ऐच्छिक’ हा शब्द काढण्यात आला आहे. मात्र ‘बंधनकारक’ हा शब्द घालण्यात आलेला नाही! सध्या ही संहिता पाळण्याची ‘विनंती’ आहे. फक्त औषध निर्मात्यांनाच नाही तर आता  वैद्यकीय उपकरण निर्मात्यांनाही ही लागू आहे. देखरेखीसाठी प्रत्येक कंपनी वा संघटनेने अधिकारी नेमून त्यांच्यामार्फत तक्रारींची दखल घ्यायची आहे.

संहिता तशी ऐसपैस आहे. औषध कंपनीच्या प्रतिनिधींनी कसे वागावे; उदा: अन्य कंपन्यांची नालस्ती करू नये; हेही ती सांगते.  नमुन्याला म्हणून द्यायच्या औषधांवरही बरीच बंधने आहेत. एकावेळी तीन पेशंटपुरती, अशी वर्षभरात, जास्तीजास्त १२ फ्री सॅम्पल्स देता येतील. ‘फ्री सॅम्पल्सवर बंदी आहे पण राजकीय देणग्यांवर नाही!’, अशीही उपरोधिक पोस्टही फिरत आहे. औषधांची भलामण करताना पाळावयाची पथ्ये सविस्तर दिलेली आहेत. परिणामकारकता आणि सुरक्षितता याबाबतची माहिती नेमकी आणि पुरावाधिष्ठित असावी ही अपेक्षा आहे. सहपरिणामांचा उल्लेख आवश्यक आहे. ‘सेफ’, ‘न्यू’, ‘खात्रीशीर’, वगैरे विशेषणांचा वापर कधी करावा हेही सांगितले आहे.  दुर्दैवाने पर्यायी, पारंपारिक वा पूरक औषधोपचारवाले अशा बंधनातून मुक्त आहेत. ते वाट्टेल ते दावे करू शकतात, नव्हे करतात. सर्वोच्च न्यायालयाच्या,  रामदेवबाबांच्या जाहिरातीबाबतीतल्या, ताज्या निकालाने हे पुरेसे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच ताजी संहिता आयुष प्रणालींना लागू असावी अशी अपेक्षा आहे पण त्याबाबत अद्याप  स्पष्टता नाही.

अशी बंधने उपकारक आहेत.    अशा बंधनांमुळे  आधुनिक वैद्यकीच्या वारूला लगाम घातला जातो.  अन्यथा औषध कंपन्या आणि त्यांचे प्रतिनिधी फार्मकॉलॉजीचे प्रोफेसर असल्याचा आव आणतात, पण चुकीचेच  काही डॉक्टरांच्या माथी मारू पाहतात.  हा अनुभव अनेक डॉक्टरांना येतो. सजग डॉक्टर अशा भुलथापांना बधत नाही. पण असे, न बधणारे, इंडस्ट्रीच्या भाषेत ‘टफ नट्स’, फोडण्यासाठी अनेक तऱ्हेचे अडकित्ते वापरले जातात. म्हणजे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूपात काही पोहोचवलं जातं.

संहितेनुसार डॉक्टरांना कोणत्याही स्वरूपात (वस्तु, निवास, प्रवास खर्च, वगैरे) ‘भेटी’ देणे अमान्य आहे. सल्ला फी, संशोधन फी, कॉन्फरन्ससाठी अनुदान हे सारं अपेक्षित चौकटीत असणं, नोंदणं आणि दाखवणं आवश्यक आहे. संशोधनावर बंदी नाही मात्र तेही नोंदणीकृत असावं. त्या नावाखाली लाचखोरी नसावी.

पण इतकंही काही देण्याची गरज नसते.   

फुकट दिलेल्या  इवल्याशा भेटवस्तूने प्रिस्क्रिप्शनची गंगा आपल्या दिशेने वळवता येते, हे सारेच ओळखून आहेत. ‘मासा पाणी कधी पितो हे ओळखण्याइतकंच सरकारी अधिकारी पैसे कधी खातो हे ओळखणं अवघड आहे’; अशा अर्थाचं  कौटिल्याचं एक वचन आहे. परस्पर संमतीने होणारा आणि परस्पर हिताचा  हा दोघांतील व्यवहार असल्याने, हा ओळखणं अत्यंत अवघड आहे. त्यामुळे हे रोखणं तर त्याहून अवघड आहे. अगदी वर्ल्ड हेल्थ असेंब्लीने (१९८८) याची दखल घेऊन काही नीतीतत्वे मांडली आहेत. म्हणजे यंत्रणांना अगतिक करणारा हा प्रश्न जागतिक आहे.

साहित्य संमेलनात जशा  काही गहन गंभीर चर्चा असतात आणि बाहेर थोडी जत्राही असते, तशीच वैद्यकीय संमेलनंही असतात. मुख्य हॉलमधे गंभीर चर्चा तर बाहेर भलंथोरलं ट्रेड प्रदर्शन, नवी औषधं, नवी उपकरणं, आणि माहितीपर स्टॉल्स. इथे प्रतिथयश डॉक्टरांचे घोळकेच्या घोळके, स्टॉल मागून स्टॉल मागे टाकत,  तिथे वाटत असलेली कचकड्याची कीचेन, कागदी, कापडी, प्लॅस्टिक किंवा  रेक्सीन  पिशव्या विजयी मुद्रेनं गोळा करत असतात.

  हे वर्णन कुठल्या भारतीय संमेलनाचं आहे असं समजू नका. डॉ. अतुल गवांदे यांच्या ‘कॉम्प्लीकेशन्स’ या पुस्तकांतील  हे वर्णन, चक्क अमेरिकेतल्या सर्जन्स कॉन्फरन्सचं आहे. अर्थात ते इथेही लागू आहे. यांना वैद्यकीय क्षेत्रातील  ‘आउटस्टँडिंग’ आणि ‘स्टॉलवर्टस्’ मंडळी असंही म्हंटलं जातं. हॉलबाहेरील म्हणून  ‘आउटस्टँडिंग’ आणि स्टॉलवरील म्हणून ‘स्टॉलवर्टस्’!

प्लास्टिकच्या पेनापासून ते परदेशी सफरीपर्यंत, ज्याच्या त्याच्या वकबानुसार, कर्तृत्वानुसार ‘आहेर’ केले जातात. काही, ही ऑफर नाकारतात तर काही, ‘नाही तरी कुठलं तरी औषध द्यायचंच  तर या कंपनीचं देऊ, तेवढाच आपलाही फायदा’, असं स्वतःच्या विवेकबुद्धीला समजावून सांगतात. ‘माझा आर्किटेक्ट प्लायवूडवाल्याकडून आणि ट्रॅव्हलएजंट हॉटेलवाल्याकडून पैसे घेतोच की मग मीच काय..’, असाही युक्तिवाद करणारे आहेत.

प्रिस्क्रिप्शन खरडणाऱ्या पेनाचे  विज्ञान, विवेक, आणि अनुभवाचे अधिष्ठान ढळले की वाईट औषधे, अनावश्यक औषधे, अकारण महाग औषधे, निरुपयोगी टॉनिक्स वगैरे लिहून जातात, पेशंटकडून खरेदी केली जातात आणि अर्थातच मलिदा योग्य त्या स्थळी पोहोचतो.

प्रिस्क्रिप्शनची धार आणि शास्त्रीय आधार बोथट होण्याने  पेशंटचा तोटा होतोच पण डॉक्टरांचा सुद्धा फायदाच होतो असं नाही. त्यांच्या विश्वासार्हतेला धक्का पोहोचतो, त्यांच्या  हेतूबद्दल पेशंटच्या मनात किंतु निर्माण झाला की इतर अनेक प्रश्न गहिरे होतात. म्हणूनच फार्मा-श्रय नाकारून, स्वखर्चाने  संमेलन भरवण्याचे काही यशस्वी प्रयत्न झाले आहेत, होत असतात. काही नियामक संस्था आणि डॉक्टरांच्या संघटनांनी मार्गदर्शक तत्वे,  आचारसंहिता वगैरे जारी केल्या आहेत. पण ही तत्वे  स्वयंस्फूर्तीने आचरणात आणायची आहेत.  कारण  ती अंमलात आणायची तर देखरेख यंत्रणा अगदीच अशक्त आहे. नव्या संहितेत या दिशेने काही पावले टाकलेली आहेत.

कितीही संहिता आणल्या तरी प्रामाणिकपणा, पुरावाधिष्ठित वैद्यकीचा अवलंब आणि देखरेखीच्या सशक्त यंत्रणेशिवाय हा प्रश्न सुटणार नाही.

 

प्रथम प्रसिद्धी

दै. लोकमत

संपादकीय पान

२०.०३.२०२४

Monday 18 March 2024

नश्वर ईश्वर

काही दिसांची 
हिरवी सळसळ
पिवळी पिवळी
पुन्हा पानगळ

अन हर्षाची 
कारंजीशी 
फिरून फुटते 
नवी पालवी

दाराशी हा
नित्य सोहळा
मीही यातला
मी न मोकळा

या तालाशी 
श्वास गुंफला
या चक्राशी 
जीव जुंपला

पर्थिवतेचा 
अर्थच नश्वर
नश्वर मानव
नश्वर ईश्वर

Sunday 17 March 2024

इरुताई आणि खारुताई

नात इरा हिचं नाव गुंफून रचलेली काविता 

एक होती इरुताई
एक होती खारुताई

म्हणाली इरूताई 
'अगं अगं खारुताई 
कसली तुला इतकी घाई?'

म्हणाली खारुताई, 
' बाई, बाई, बाई, बाई,
सकाळपासून वेळ नाही
काय सांगू इरुताई,
वर खाली, खाली वर,
सगळं आवरून झालं घर.
चार वाजता आज दुपारी
नक्की ये हं माझ्याघरी.'
 
इरु गेली खारूकडे 
खाल्ले गरम भजी वडे 

निघताना मग इरु म्हणे,
'बरं का, खारुताई गडे,
घर आमचं पुण्याकडे...

या एकदा आमच्याकडे'

सुरवंट, फुलपाखरू, मी आणि इरा

माझी चिमुकली नात इराला उद्देशून...

आज सकाळी, बागेमध्ये,
 सुरवंटाचे दर्शन झाले,
 कभीन्न काळा संथ चालीने,
 जाडोबा तो मला विचारे, 

'इरा होती ना, कुठे गेली ती?
 परवा सुद्धा नाही दिसली? 
असती पाहून, जरा बिचकली 
मला; चिमुकली जशी चमकती. 

असती आणखी कुशीत शिरली, 
घाबरलेली, बावरलेली,
थय थय असती आणि नाचली,
तान रड्याची, तार स्वराची.'

गाठ पडली हे सांगीन तिजला
काभिंन्न काळ्या हे सुरवंटा,
मंत्र मनाचा सांगिन तिजला 
हे जाडोबा, हे केसाळा 

 भयभीतीचे क्षणैक सावट,
 जरा मनाला धीट सावरू
 सुरवंटाची भीती कशाला?
 तोच उद्याचे फुलपाखरू

Saturday 2 March 2024

एक होती इरूमाऊ

 

एक होती इरूमाऊ

तिला झाला शिंखोढेऊ

 

शिंखोढेऊ म्हणजे काय?

खाली डोकं वर पाय

 

आधी येते शिंक फटॅक

मग येतो खोकला खटॅक

 

ढेकर येते ढुरर्र ढुचुक

उचकी  येते उचुक उचुक

 

घरी इरूच्या सगळेच डॉक्टर

मम्मी पप्पा दोघे डॉक्टर

दादा दादी दोघे डॉक्टर

नाना नानी दोघे डॉक्टर

 

पण शिंखोढेऊला औषध

ऊ. ढे.  खो.  शिं.

 

ऊढेखोशिं म्हणजे काय?

ते इरूला ठाऊक नाय

ते डॉक्टर मामाला माहीत

मोहित मामा रहातो वाईत

 

वाईला जाईन

मामाला विचारीन

ग्वाल्हेरला येईन

मग तुम्हाला सांगीन