Sunday 17 January 2021

विज्ञान म्हणजे काय? लेखांक १

' किशोर ' मासिकात या वर्षी
माझी मुलांसाठी खास लेखमाला. 

विज्ञान म्हणजे काय?
 
डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई. 

लेखांक १ 
विज्ञान म्हणजे काय? ह्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांना माहीतच आहे की. 

मी समजा तुमच्या वर्गात येऊन हा प्रश्न विचारला तर एकसाथ सारे ओरडून सांगाल, ‘विज्ञान म्हणजे शाळेत आपल्याला शिकवतात ते.’ रसायन, भौतिक, जीव अशी त्यांची नावंही सांगाल.

 पुढे मेडिकल म्हणजेही विज्ञानवाला आणि इंजिनियर म्हणजेही विज्ञानवालाच. ह्या विज्ञानाबरोबर गणित म्हणूनही एक विषय असतो. विज्ञान आणि गणित; बापरे! हुश्शार, चस्मिस, सिन्सीयर, स्कॉलर मुलांची कामं ही; असंही वाटत असेल तुम्हाला.  

 शिवाय शाळेच्या पुस्तकात, प्रयोगशाळेत, महान वैज्ञानिकांची चित्रे असतात. वयस्कर, दाढीवाले आणि बहुतेक सगळे परदेशी. तेंव्हा महान शास्त्र आणि महान शास्त्रज्ञ ही गोष्ट इंग्लंड-अमेरिकेत पिकते असंही वाटत असेल तुम्हाला. शिवाय या ओळीनी लावलेल्या चित्रांत बाई नसतेच. असलीच तर एकच. ती प्रसिद्ध मारी क्युरी. रेडियमचा शोध लावणारी. तेंव्हा तुमच्या वर्गातल्या काही मुली स्कॉलर जरी असल्या, तरी विज्ञानातलं मुलींना विशेष कळत नसेल असंही तुम्हाला वाटू शकतं.  

   काही मुलंमुली असंही सांगतील की मोबाईल म्हणजे विज्ञान, इंटरनेट म्हणजे विज्ञान, कोव्हिडवर लस् शोधणे म्हणजे विज्ञान.. अशी मोठीच्या मोठी यादी करता येईल. 

तुम्ही दिलेली सगळी उत्तरं बरोबर आहेत आणि सगळीच्या सगळी चूक आहेत!! ‘रसायन’ पासून लसीपर्यंत सगळं काही विज्ञान आहे खास पण ह्या सगळ्याला मिळून विज्ञान असं एकच बिरुद का बरं लावलं आहे? 
साऱ्याला एकच बिरुद लावलं आहे, ह्याचं कारण ही शास्त्रे काय सांगतात, कशी उपयोगी पडतात, ह्यात नाहीये. ही शास्त्रे जे ज्ञान सांगतात, ह्या ज्ञानाचे जे उपयोग करुन दाखवतात ते ज्ञान आणि त्याचा उपयोग करण्यामागे विचार करण्याची विशिष्ठ पद्धत आहे. ह्या विचार करण्याच्या खाशा युक्तीला विज्ञान असं म्हणतात. 

जेमतेम चारशे वर्षापूर्वी ह्या युक्तीचा शोध लागला. माणसाला आपल्या आसपासच्या जगाबद्दलचे कुतूहल उपजतच आहे. पाऊस का पडतो?, दिवस रात्र का होतात?, माणूस मरतो म्हणजे काय?, त्यानंतर काय होतं?, हे विश्व कसं निर्माण झालं? असे प्रश्न तुम्हालाही पडले असतील. 

आपल्या पूर्वजांनाही असेच प्रश्न पडले होते. त्यांनी त्यांची उत्तरेही तयार केली. पण त्यांच्याकडे विज्ञान नावाची युक्ति नव्हती. मग त्यांनी निरनिराळ्या कल्पना लढवल्या, निरनिराळ्या कथा रचल्या आणि आसपास जे जे घडत होतं त्याची कारणं द्यायला सुरवात केली. 

हे विश्व कसं निर्माण झालं?; ह्या प्रश्नाचं उत्तर देणारी एक चिनी कथा आहे. पान-गु नावाचा प्राणी होता. माणसाचं केसाळ धड आणि कुत्र्याचं डोकं असणारा. पृथ्वी आणि स्वर्गाचं एकजीव, दाट मिश्रण होतं त्याकाळी. एका काळ्या अंड्या भोवती हे सगळं लपेटलेलं होतं. त्या अंड्यात होता पान-गु. १८,००० वर्ष तो त्या अंड्यात निद्रिस्त होता. त्याला जाग आली आणि कुऱ्हाडीनी अंडं फोडून तो बाहेर आला. अंडं फुटताच त्यातलं जड ते सर्व तळाशी पडलं. त्यालाच आपण म्हणतो पृथ्वी. त्यातलं हलकं ते सर्व गेलं ऊंच. त्यालाच आपण म्हणतो आकाश. पण ह्या कामानी पान-गू पार दमला आणि मेला. त्याचे अंश म्हणजे सृष्टी सारी. त्याचा श्वास झाला वारा, त्याचा आवाज झाला गडगडाट आणि डोळे झाले सूर्य-चंद्राच्या ज्योती. त्याच्या स्नायूंची झाली शेतं आणि रक्तवाहिन्यांचे झाले रस्ते त्याच्या घामाचा झाला पाऊस आणि केसांचे झाले तारे. त्याच्या अंगावरच्या उवा आणि पिसवांची आजची पिल्लावळ म्हणजेच...तुम्ही, आम्ही; मानवी प्रजा!!!

आहे की नाही मजा? मजा आहेच पण ह्या गोष्टीवर तुमचा विश्वास बसतोय? नाही ना? पण ही गोष्ट खर्रीखुर्री मानणारे चिनी आहेतच की. कदाचित ही कथा ऐकून तुम्ही त्या चिन्यांना फिदीफिदी हसत असाल. पण विश्वनिर्मितीच्या अशा इतरही अनेक कथा आहेत. प्रत्येक देशाची आणि संस्कृतीची आपापली कथा. अशा इतर कथांना आणि त्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना, ती चिनी मुलं फिदीफिदी हसत असतील!!

तेंव्हा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधायचं तर काल्पनिक कथा हा काही फारसा उपयुक्त मार्ग नाही. कथा छानच असतात. रंजक असतात. विनोदीही असतात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर नीट कळत नाही त्यातून.   

नीट आणि नीटस उत्तरे शोधायची युक्ति म्हणजे विज्ञान. त्या युक्तीबद्दल आपण शिकणार आहोत.

Thursday 14 January 2021

हा जय नावाचा इतिहास नाही!

 

हा जय नावाचा इतिहास नाही!

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

९८२२०१०३४९

 

प्रत्येकाचा वैयक्तिक स्तरावर विज्ञानाशी थेट संपर्क येतो तो आरोग्य विज्ञानामार्फत. एकवेळ एकाही रसायनतज्ञाच्या सल्याशिवाय किंवा अवकाश शास्त्रज्ञाच्या मदतीशिवाय तुम्ही सुखाने जगू शकता, पण एकाही डॉक्टरच्या मदतीशिवाय तुम्ही मरणं; जरा अवघडच आहे. सॉरी हं. वरच्या वाक्यात  जरा गफलत झाली बहुतेक. पण भावना पोहोचल्या असतील. असो.

कोव्हिडनी अनेक गुह्य सर्वसामान्यांसमोर  प्रकट केली. यातून आरोग्यविज्ञानातील अनिश्चितता, संशोधनातील वेळखाऊ, किचकट प्रक्रिया;  या साऱ्याची जाण नाही तरी जाणीव नक्कीच उत्पन्न झाली.  

वैद्यकशास्त्र आणि विज्ञान जितकं नित्यनूतन असतं तितकंच ते अनित्यही  असतं. विज्ञानाकडे ठाम उत्तरे असतातच असं नाही. आता हेच पहा ना, हा व्हायरस नैसर्गिक का मानव निर्मित?, ह्याही कोड्याचं उत्तर अजून मिळालेलं नाही. साथीचे आजार कसे आणि कितपत पसरतील याची भाकिते म्हणजे हवामानाच्या किंवा शेअर मार्केटच्या  अंदाजाइतकेच बेभरवशाची, हे लोकांना स्पष्ट दिसलं. विज्ञानातल्या लांड्यालबाड्या चव्हाट्यावर आल्या. लॅन्सेट आणि न्यू इंग्लंड जर्नलने मे  महिन्यात छापलेल्या शोध निबंधातील, सर्जिस्फियर कंपनीने पुरवलेली  विदा धादांत खोटी  असल्याचं समोर आलं. अनेक शोधनिबंधात आपल्याला सोयीचा तेवढा युक्तिवाद पुढे करुन मांडल्याचं पुढे आलं. म्हणजे मंडळी शास्त्रज्ञ आहेत का विधीज्ञ, असा प्रश्न निर्माण झाला. शास्त्रज्ञाने सतत निष्पक्ष न्यायाधीशच असलं पाहिजे त्याने वकील होऊन चालणार नाही. असं होऊ नये म्हणून प्रकाशनपूर्व छाननी (peer review) पद्धत अंमलात आहे. पण ही देखील पद्धत निर्दोष नाही. इथेही अनेक पळवाट, ढिसाळपणा आहे.

यातल्या काही चुका, ज्या गतीने संशोधन झालं, किंवा करावं लागलं; त्या वेगाच्या परिणामी होत्या. पण ही गती आवश्यकच होती. ह्या गतीनेच आपण जगलो आहोत,  वाचलो आहोत आणि आत्ता हे  वाचतो  आहोत.  

डिसेंबरात आजाराची कुणकुण लागताच जानेवारीत व्हायरस माहिती झाला. काही आठवड्यातच त्याची जनुकीय कुंडली मांडली गेली.  सार्स १ पेक्षा ह्या सार्स २ चं आपल्या एसीइ२  रिसेप्टरवर दसपट प्रेम. हे त्याच्या मनुष्य-स्नेहाचं कोडं फेब्रुवारीतच  उलगडलं. मार्चमध्ये प्रसाराची रीती डिटेलवार  समजली. एप्रिलपर्यंत सुमारे अडीचशे संभाव्य औषधांपैकी वीसच ध्यानाकर्षक ठरली. पेशंटची संख्या प्रचंड वाढली. पण यामुळे आता मायावी  कोव्हिडचे विविध बहुरूपी खेळ परिचित झाले. याच दरम्यान, एकीकडे  अफवांशी,   वदंतांशी आणि कारस्थानांच्या आरोपांशी लढता  लढता   रॅट आणि पिसीआर तपासण्या प्रचंड प्रमाणात उपलब्ध केल्या गेल्या. लस तर    विद्युतवेगाने आली असंच म्हटलं पाहिजे. नव्या तंत्राचा, आंतरराष्ट्रीय सहकार्याचा, चपल संपर्कगतीचा हा सुपरिणाम.

 मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यावर लसीची सामर्थ्य आणि मर्यादाही  पुढे येतील. तशीच वेळ आली तर लस माघारीही बोलवावी लागेल. आधुनिक वैद्यकीने उपयोगात आणलेली अनेक औषधे कालांतराने  बाजारातून मागे घेतली जातात. वापर होत असताना दुष्परिणामांवर नजर ठेवणारी यंत्रणा आधुनिक वैद्यकीने उभारलेली आहे. ही यंत्रणा सक्षम आहे याचं हे द्योतक. म्हणजे एखाद्या उपचार पद्धतीसाठी अशी यंत्रणा नसेल तर काय होईल याचा विचार करा.

शेवटी विज्ञान म्हणजे  कोणत्याही कार्यकारणभावाचा आधी काही अंदाज बांधायचा आणि मग तो अंदाज बरोबर आहे का हे तपासत बसायचं; असा सगळा अंदाजपंचे  मामला आहे. अंदाज चुकला  तर ते कारण बाद करुन  पुन्हा  नव्यानं अंदाज बांधायचा.

हे अंदाज बरेचदा कैच्च्याकै असतात. निदान ते बरोबर आहेत, हे सिद्ध होईपर्यंत,  सुरवातीला तरी ते  तसे वाटतात. त्यामुळे विज्ञानामध्ये विक्रमादित्यांइतकाच चक्रमादित्यांचा सुळसुळाट फार. या चक्रमादित्यातलेच काही उद्याचे विज्ञान-आदित्य म्हणून तळपतात हेही खरंच. त्यामुळे नव्यानव्या, (बहुधा चक्रम)  कल्पना मांडणाऱ्यांना कितपत गांभीर्याने घ्यायचं हा एक प्रश्नच आहे. विलियम हार्वेची रक्ताभिसरणाची कल्पना,   सेमेलवाईसचे पेशंट तपासण्यापूर्वी  हात धुवा हे  सांगणे  वगैरे सुरवातीला चक्रमच ठरवलं  गेलं होतं.  पण म्हणून प्रत्येक चक्रम  काही उद्याचा  हार्वे ठरत नाही!! थोडक्यात उद्याचे(ही) चक्रम  आणि उद्याचे हार्वे यांच्यातला भेद आज ओळखणे अवघड असते. म्हणूनच कोणत्याही नव्या-जुन्या  औषध-कल्पनांचे स्वागत करताना त्यामागील शास्त्र-तथ्य नीट तपासून घ्यावं लागतं.   

तपासण्याची ही क्रिया दमवणारी असते.  कल्पना करा, एखादा परग्रहवासी तुमच्या स्वयंपाकघरात आला आहे. तेथील अनेक पदार्थांमधून सर्वात खारट चव कशानी निर्माण होते, हा त्याच्या संशोधनाचा विषय आहे. तिथल्या सतराशे साठ डबे-बाटल्यांमधून, नेमका सर्वात खारट पदार्थ शोधण्यासाठी, त्याला आधी ते सगळे तपासावे लागतील. मग  सतराशे एकोणसाठ अंदाजांवर काट  मारावी लागेल, सतराशे एकोणसाठ पराभव पचवावे लागतील,  तेंव्हा कुठे त्याला मिठाचा शोध लागेल. औषध संशोधन म्हणजे असंच काहीसं आहे. अनेक पराभव झेलल्याशिवाय यश  म्हणावं असं काही हाती लागत नाही. त्यामुळे अंदाज, मग तो  तपासणं आणि मग बहुतेकदा तो चुकणं, हे विज्ञानाला चुकत नाही. बरेचसे अंदाज चुकणं आणि काहीच बरोबर येणं, हे स्वाभाविक आहे.

क्लोरोक्वीन, रेमडेसिव्हीर वगैरे बद्दलच्या वैज्ञानिक कोलांट्याउड्या पाहून सामान्य माणसानी दाहीच्या दाही बोटं तोंडात घातली. काही असामान्यांना आधुनिक वैद्यकीला हिणवायला आयतंच कोलीत मिळालं. विज्ञानाधिष्ठित वैद्यकीच्या  विश्वासार्हतेबद्दल  शंका उत्पन्न करण्याची नामी संधी  मिळाली.

पण खरं सांगायचं तर हीच विज्ञानाची कार्यपद्धती आहे. अडखळत, ठेचकाळत, विज्ञानाचा प्रवास सुरू असतो. एरवी त्याची जाहीर चर्चा होत नाही, आता झाली, इतकाच काय तो फरक. उपचाराबाबतच्या शिफारसी सतत  बदलत आहेत म्हणजे डॉक्टर गोंधळलेले  आहेत असे नसून; माहितीच्या पूरातून; भोवरे, धार आणि  खडक   टाळत ते नवा मार्ग निर्माण करत आहेत, असा होतो.

 विज्ञानाबद्दलची सामान्य  समज, ‘हा जय नावाचा  इतिहास आहे’, अशा छापाची असते. एकापाठोपाठ एक  शोध लागत गेले.  अवैज्ञानिक कल्पनांचा पराभव झाला. अज्ञानी, मूढ, प्रतिभाशून्य पक्ष हरला. ज्ञानवंत, प्रज्ञावंत, प्रतिभावंत पक्षाचा विजय झाला.  एकएक गड सर होत गेला. विज्ञानाचा जरीपटका बुरुजावर डौलाने फडकू लागला! इत्यादी..   इत्यादी.. प्रत्यक्षात हा जय नावाचा इतिहास नाही!

 

प्रथम प्रसिद्धी सकाळ पुणे १५/१/२०२१