Wednesday 27 December 2017

रुपांतरकराचे दोन शब्द

विल्यम गोल्डिंग यांच्या ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ह्या कादंबरीचे मी देवाघरची फुले या नावाने नाट्यरुपांतर केले आहे. त्याचे प्रकाशन २६/१२/२०१७ रोजी झाले. त्या समारंभातील...

रुपांतरकाराचे दोन शब्द

विल्यम गोल्डिंग यांची ‘लॉर्ड ऑफ द फ्लाईज’ ही कादंबरी मी वाचली आणि भारावून गेलो.
एका निर्मनुष्य बेटावर काही शाळकरी मुलं अडकतात... आणि सुरु होतो जगण्याचा संघर्ष.
सुरवातीला सगळं कसं छान छान असतं पण मग हळू हळू त्यांच्यातली जनावरं जागी होऊ लागतात...
आदीम प्रेरणा, सुसंस्कृत वागणुकीचा कब्जा घेतात...
नव्या नव्या मिथक कथा जन्म घेतात...
गततट पडतात...
हाणामाऱ्या होतात...
विवेकाचा आवाज दाबला जातो...
निरागस कोवळी मुलं,
ही देवाघरची फुलं,
शेवटी एकमेकांविरुद्ध जीवघेणे सापळे रचतात...!!! चक्क खुनाचा कट रचतात... ह्या कटाचा भाग म्हणून वणवा लावला जातो... आणि हा धूर बघून लांबून जाणारी एक नेव्हीची नौका येते आणि यांची सुटका होते.
अशा कादंबरीवर नाटक न झालं तरच नवल...
माझ्या शाळेतल्या इंग्लिशच्या बाईंनी ही कादंबरी मला वाचायला सांगितली होती. त्यांच्या मते शालेय मुलांवरचं संस्कार छत्र काढून घेतलं तर काय होतं याचं दर्शन या कादंबरीतून घडतं. पण अर्थाचे अनेक पदर वाचता वाचता उलगडू लागतात. इथे जयच्या रुपात मानवी मनातील आदिम हिंसा आहे, राजच्या रुपात सर्वांना बरोबर घेऊन जाणारे नेतृत्व आहे, सायमनचा शोधक जिज्ञासू मानवही इथे आहे आणि बुक्कडच्या रुपात विचारी, विवेकी वर्तन आहे. इतकंच काय या विचारी, विवेकी बुक्कडचं एखाद्यावेळी कच खाणं आणि त्याचं लंगडं समर्थन करणंही आहे. कळपानी रहाण्याची वृत्ती, झुंडीत सामावून जाण्याची, सुरक्षितता शोधण्याची ओढ इतर पात्रांतून दिसते. या  साऱ्या मानवी मानसिकतेचा एक लुभावणारा पट इथे मांडला आहे. पशू अवस्थेतून मानव एक सामाजिक प्राणी म्हणून उत्क्रांत होत गेला. इथेही ही मुलं अचानक कसलाही आगापिछा नसलेल्या ठिकाणी येऊन पडतात आणि हळूहळू त्यांच्यातही काही सामाजिक संस्था उदयाला येतात. शंख वाजवला की सगळ्यांनी जमायचं, सभेत एकमेकांच्या विचारांनी निर्णय घ्यायचे असं काही काळ चालत. पण जयचं आक्रमक नेतृत्व शंख, सभा, शेकोटी, सुटका या संकल्पनाच बाद ठरवून टाकतं. शेवटी शंख आणि तो जपू पहाणाऱ्या बुक्कडवर अत्यंत थंडपणे वरून शिळा ढकलली जाते, दोघेही खोल दरीत समुद्रात पडतात. दोघांच्याही ठिकऱ्या ठिकऱ्या होतात. शंख आणि त्याची मालकी, सभा आणि सभेचे नियम आणि अखेरीस दोन्हीचा विलक्षण ऱ्हास यातून गोल्डिंग बरंच काही सुचवत राहतो. भूतमॅन ही तर भन्नाटच कल्पना आहे. दुरून दिसणारी मानवाकृती म्हणजे भूतमॅन आहे असं ही मुलं समजतात. मानवी मनातील अज्ञाताची, अदृष्टाची भीती इथे भूतमॅनच्या रुपात साकार झाली आहे. लवकरच या भूतमॅनचा भूतमॅनबाबा होतो. समाज मनात देवा-धर्माची उत्क्रांती कशी झाली याचं नेमकं दर्शन इथे घडतं. भीती, भीतीची गडद छाया, भूतमॅनची भीती, भूतमॅनबाबाची आळवणी, त्याच्यासाठी डुकराच्या मुंडकयाची बोली, तो दिसणं आणि त्याचा रहस्यभेद असा हा प्रवास आहे. सायमनसारखा जिज्ञासू या रहस्याचा छडा लावतो पण त्यात कोणालाच रस नसतो. उलट बेभान नाचात, कळत नकळत सायमनचाच खून होतो आणि ते रहस्य कायमचं शिल्लक रहातं. उरलेल्यांच्या मानगुटीवर कायमचं स्वार रहाण्यासाठी.
कादंबरीचं नाटक करावसं वाटलं ते त्यातील ही अर्थबहुलता पाहून.
पहिलाच प्रश्न होता यातलं वातावरण आहे तसच इंग्लिश ठेवायचं का त्याचं मराठीकरण करायचं हा. पण जगाच्या पाठीवर कुठल्याही संस्कृतीत घडू शकेल अशी ही कथा आहे त्यामुळे ती मराठी भाषेत आणि मराठी वातावरणात आणणं मला योग्य वाटलं. उगाच ‘माझी आजी मला डुकराच्या मासाची तळलेली भजी देते!’ असले भाषांतरीय अपघात आपोआप टाळले गेले.
मूळ कादंबरीत आणि या रूपांतरात काही भेद आहेत. मुळात जॅक मेरीड्यू, म्हणजे नाटकातला जय, आणि त्याची गँग हे शाळेतले कॉयर ग्रुपचे सदस्य आहेत. म्हणजे शालेय भजनी मंडळच म्हणा ना! शालेय समूह गायनाची खास टीम असा प्रकार आपल्याकडे नसल्यामुळे हा उल्लेख गाळला आहे.
सायमनला वारंवार अपस्माराचे झटके येत असतात, त्यात त्याला भास होत असतात आणि भूतमॅनच्या रहस्याचा भेद त्याच्या हातून होतो तो अपघाताने. नाटकात मात्र सायमन थोडा वेगळा दर्शवलेला आहे. जिज्ञासू, स्वप्नाळू असा हा मुलगा अगदी जाणीवपूर्वक भूतमॅनचा शोध घेतो असं मी नाटकात दाखवलेलं आहे. राजचं समन्वयी नेतृत्व, बुक्कडची विचारी बडबड आणि सायमन यांचे सूर जुळण्यासाठी सायमन हा असा शोधकवृत्तीचा, नव्याची आस असलेला, असावा असं मला वाटलं, म्हणून मी तो तसा रंगवला.
कादंबरीत कित्येक ठिकाणी वातावरणाची विस्तृत वर्णनं आहेत. अशी वर्णनं करणं नाटकात शक्य नाही. अतिशय काव्यमय आणि अर्थवाही अशी गोल्डिंगची भाषा आहे. सायमनच प्रेत लाटांबरोबर समुद्रात जातं याचं वर्णन करताना तो म्हणतो,
"The tide swelled in over the rain-pitted sand and smoothed everything with a layer of silver. Now it touched the first of the stains that seeped from the broken body and the creatures made a moving patch of light as they gathered at the edge.  The water rose further and dressed Simon’s coarse hair with brightness. The line of his cheek silvered and the turn of his shoulder became sculptured marble. The body lifted a fraction of an inch from the sand and a bubble of air escaped from the mouth with a wet plop. Then it turned gently in the water.
Somewhere over the darkened curve of the world the sun and moon were pulling; and the film of water on the earth planet was held, bulging slightly on one side while the solid core turned. The great wave of the tide moved further along the island and the water lifted. Softly, surrounded by a fringe of inquisitive bright creatures, itself a silver shape beneath the steadfast constellations, Simon’s dead body moved out towards the open sea."
हे नाटकात कसे आणावे बरे? मग सायमनच्या काव्यमय स्वगतातून हा प्रश्न सोडवला. सायमनचा मृत्यू होतो आणि सायमनच्याच आवाजातलं त्याचं पूर्वीचं एक स्वगत ऐकू येतं,
पृथ्वीभोवती चंद्र फिरे... किती नेटका, किती लयबद्ध...
सांभाळतो भरती ओहटीच्या लाटांचे कळसूत्र.
पुळणीवरती बिळेच बिळे
त्यात भरतीचे पाणी भरे.
ओहटीबरोबर समुद्रात जातात
काही जीव आणि काही कलेवरे.
 इथे प्रवेश संपतो.
हे समूहाचं नाटक आहे. समूह हेही त्यातील एक पात्र आहे. मुलांचं होत जाणारं रानटीकरण, लष्करीकरण हे नेटक्या समूहदर्शनाने अधोरेखित होत जाते. यातील समूह स्वर, कोरसने आळवलेली त्याच त्याच ओळींची लयबद्ध आवर्तनं, सामुहिक हालचाली ह्या प्रत्येक प्रसंगातील नाट्य जिवंत करतात. नाटक हे लेखकाचं माध्यम आहे असं म्हटलं जातं पण ह्या नाटकात दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीवर आणि प्रतिभेवर बरंच काही अवलंबून आहे. हे नाटक जितकं लेखकाचं  असेल तितकंच ते दिग्दर्शकाचंही असेल.
ह्यात बरीच लहान मुलं आहेत पण अगदी कॉलेजची मुलं घेऊनही हे नाटक छान वठवता येईल. मोठ्यानीच छोट्यांची काम करण्याचे ग्रिप्स थिएटर सारखे प्रयोगही करता येतील. शेवटी कागदावरचं नाटक हे काही नाटक नव्हे. या नाटकाला जीवंत करणारे रंगकर्मी आणि प्रेक्षक जसे ‘प्रतिक’च्या रूपांनी पूर्वी लाभले तसे पुढेही लाभतील तेंव्हाच हा प्रयत्न पूर्ण होईल असं मी मानतो. नाटक उभं करणाऱ्या भावी कलावंतांना खूप खूप शुभेच्छा.
वाईच्या प्रतिक थिएटर्स ह्या माझ्या घरच्याच संस्थेनी मोठ्या आस्थेनी आणि कष्टपूर्वक याचा प्रयोग बसवला. त्याचं उत्कृष्ट आणि उत्कट सादरीकरण केलं. यासाठी मी मंदार शेंडे, सतीश शेंडे, विनीत पोफळे आणि प्रतिक परिवाराचा ऋणी आहे.
आज अनेक वर्षानी या नाटकाची संहिता प्रकाशित करण्याचा योग येत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ह्यासाठी अनेकांचा हातभार लागलेला आहे. आभा प्रकाशनचे अनिरुद्ध भाटे यांच्याशी या निमित्ताने मैत्र जुळले. त्यांच्या सूचनांचा, मार्गदर्शनाचा यात मोलाचा वाटा आहे. त्यांचे विशेष आभार. माझे मित्र, ज्येष्ठ नाट्यकर्मी डॉ. गिरीश ओक यांनी माझ्या विनंतीला मान देवून प्रस्तावना लिहून दिली. त्यांच्या प्रस्तावनेमुळे या संहितेचं मूल्य कितीतरी वाढलं आहे. त्यांचेही मनःपूर्वक आभार. वैखरी कुलकर्णी आणि सुदर्शन साबडे यांनी अर्थवाही मुखपृष्ठ चितारले आहे. संतोष गायकवाड यांनी अक्षरजुळणी आणि मुद्रितशोधनाची किचकट जबाबदारी पार पाडली आहे. मौज प्रिंटींग ब्युरोने त्यांच्या लौकिकाला साजेशी सुबक छपाई केली आहे. या साऱ्यांचे आभार.

डॉ. शंतनू अभ्यंकर

Tuesday 26 December 2017

डोंबलाचे गर्भसंस्कार

डोंबलाचे गर्भसंस्‍‍कार!...
डॉ शंतनु अभ्यंकर, वाई.
मी आहे गायनॅकाॅलॉजिस्ट, प्रॅक्टिस करतो एका लहान गावात. गेली वीस वर्षं मी नियमितपणे माझ्या रुग्णांसाठी ‘पालक मार्गदर्शन मेळावा’ घेतो आहे. होणारे आईबाबा आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला आमंत्रण असतं. प्रत्येक वेळी प्रतिसाद अगदी छान असतो. इतकी वर्षं झाली, मी कटाक्षाने ‘गर्भसंस्कार’ हा शब्द टाळत आलोय. यामागे असणाऱ्या धार्मिक, अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय गोष्टींना माझा ठाम विरोध आहे. या नावाखाली खपवले जाणारे गंडे-दोरे, मंत्र-तंत्र हे छद्मशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. बाळाला ऐकू येतं हे शास्त्रीय तथ्य. पण याचा अर्थ त्याला त्या आवाजांचा ‘अर्थ समजतो’ हे त्याला जोडलेलं मिथ्य. बाहेरच्या आवाजांनी बाळ दचकतं हे शास्त्रीय तथ्य. पण याचा अर्थ ते बाहेरील उत्तेजनांना (Stimulus) समजून उमजून प्रतिसाद देतं हे सोयीस्कर मिथ्य.
नुकताच माझ्या एका मित्राने माझ्याकडून स्फूर्ती आणि स्लाइड्स घेऊन असाच कार्यक्रम सुरू केला आणि नाव दिलं, ‘गर्भसंस्कार’! मी पडलो चाट. तर म्हणतो कसा, ‘अरे, तू आणि मी जे करतो, ते ‘खरे गर्भसंस्कार’, तेव्हा हा शब्द खरं तर आपण वापरायला हवा.’
मी एकदम हे ऐकून कान टवकारले. अरे, खरंच की. ‘गर्भसंस्कार’ म्हणजे मंत्र-तंत्र नव्हे, पूजा-पाठ नव्हे, प्रार्थना नव्हे... ‘गर्भसंस्कार’ म्हणजे आईला, बाबांना, आज्जी-आजोबांना नव्या नात्याची जाण करून देणं, आईच्या अडचणी समजावून घ्यायला मदत करणं, सुखरूप आणि सुदृढ बाळ व्हावं म्हणून काय-काय करता येईल याची सविस्तर चर्चा करणं. भीती, गैरसमज अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांची जळमटं काढून टाकणं, आधुनिक चाचण्या, उपचार रुजवणं. मग हे सगळं तर मी माझ्या मांडणीतून गेली वीस वर्षं करतोच आहे. पण या सगळ्याला ‘गर्भसंस्कार’ म्हणायला कचरतो आहे. मित्राच्या सांगण्यानं मला एक नवी दृष्टी दिली. मी जे शास्त्रशुद्ध, पुराव्यानुसार बोलतो तेच तर ‘खरे गर्भसंस्कार’.
मी आपला ओशाळवाणा ‘पालक मार्गदर्शन मेळावा’ असं अत्यंत गद्य शीर्षक वापरत होतो. मॅडच होतो की मी. मित्र म्हणाला, ‘अरे ‘गर्भसंस्कार’ हा आपला गड आहे, आपली जहागीर आहे ती. ती पुन्हा काबीज करायला भीड कसली. उलट हा शब्द न वापरून तू अशास्त्रीयतेला आपण होऊन जागा करून देतो आहेस. योग्य गर्भसंस्कार कुठले हे जाणून घेण्यापासून तुझ्या रुग्णांना वंचित ठेवतो आहेस. धिक्कार असो तुझा!’
आता मीदेखील ‘गर्भसंस्कार’ हा शब्द वापरायचं ठरवलं आहे. अगदी उजळ माथ्यानं. एक तर त्यामुळे योग्य, शास्त्रीय, आधुनिक गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपोआप अधोरेखित होईल. पर्यायाने छाछूगिरी कुठली हेही समजेल. अर्थात आम्ही ज्या अपेक्षेने आलो होतो, ते ‘हे’ नाहीच, असं काहींना वाटू शकेल. आमची फसवणूक झाली असंही कोणी म्हणू शकेल. पण आमच्या दृष्टीने आम्ही जे करतोय तेच खरे गर्भसंस्कार असं म्हणता येईल.
मागे एकदा चेन्नईत चायनीज मागवल्यावर, चक्क सांबारात बुचकळून ठेवलेले नूडल्स पुढ्यात आले. हॉटेलवाल्याशी बऱ्याच वेळ हुज्जत घातल्यावर शांतपणे तो म्हणाला, ‘सर, धिस हॉटेल, धिस चायनीज!’
त्याच चालीवर म्हणता येईल, ‘धिस हॉस्पिटल, धिस गर्भसंस्कार!’
पण इतकं सगळं करूनही आजही हमखास प्रश्न येतो, ‘सर, आम्ही गर्भसंस्कार सुरू करू का?’ मग मी मनातल्या मनात डोक्याला हात लावून म्हणतो, ‘डोंबलाचे गर्भसंस्कार!’
गर्भसंस्कार. किती लक्षवेधी आणि लक्ष्यवेधी शब्द आहे हा. मुलांवर लहानपणी आपण संस्कार करतच असतो. कसं वागावं, बोलावं याबाबतीत यथाशक्ती सूचना आपण देतच असतो. शाळा देते, समाज देतो. ही एक न संपणारी क्रियाच. पण बहुतेक भर लहानपणावर. लहान मूल म्हणजे मातीचा गोळा, वगैरे. योग्यच आहे हे. शिक्षणतज्ज्ञ, बालमानसतज्ज्ञ नेमकं हेच सांगतात. मग याच न्यायाने गर्भावर संस्कार करायला काय हरकत आहे? जे लहानपणी करायचं ते गर्भावस्थेत सुरू केलं तर तेवढंच नंतरचं ओझं कमी. स्पर्धेच्या या युगात आपलं घोडं आणखी थोडं पुढे. संस्कार या शब्दाला एक वलय आहे. त्यात धार्मिक, अाध्यात्मिक आशय सामावलेला आहे. त्यामुळे गर्भसंस्कार म्हटलं की, कसं भारदस्त, पवित्र वगैरे वाटतं. गर्भसंस्कारवाल्यांनी अभिमन्यूची गोष्ट तर शोकेसमधे लावली आहे. ती गोष्ट म्हणून अतिशय काव्यमय आणि छानच आहे. पण पुरावा म्हणून निरुपयोगी. सुभद्रेला डोळा लागला पण अभिमन्यू झोपल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे त्याने सर्व युक्त्या ऐकायला हव्या होत्या. आई झोपल्याने बाळाचं श्रवण का बरं बंद होईल?
वास्तविक आवाज ऐकण्याची क्षमता (श्रवणशक्ती) जरी गर्भावस्थेत प्राप्त होत असली तरी, भाषा समजण्याची क्षमता ही गर्भावस्थेत प्राप्त होतच नाही. ती नंतर हळूहळू निर्माण होते. कित्येक वर्षं लागतात त्याला. मग यावरही तोडगा असतो. निव्वळ वाद्यसंगीत, आलापी, असं खास संगीत गर्भसंस्कार संगीत म्हणून विकलं जातं. पण जे शब्दांचं तेच सुरांचं. आपण बोललेलं वा वाद्यसंगीत, त्या गर्भाला जरी ऐकू आलं तरी त्याच्या दृष्टीनं ते निव्वळ ‘आवाज’, अर्थहीन आवाज. तुम्ही किंवा मी, आपल्याला अवगत नसलेली भाषा ऐकल्यासारखंच की हे. इतक्या डिलिव्हऱ्या केल्या पण अजून कोणी गर्भसंस्कारित बाळाने, ‘खोल श्वास घे’ ही माझी साधी सूचनाही पाळलेली नाही. त्याने नाही घेतला श्वास, तर आजही मला कृत्रिम श्वासोच्छवासच द्यावा लागतो. अमुकअमुक करा, तुमचे अपत्य दिव्य, तेजःपुंज होईल, अतिशय हुशार होईल, असे दावे केले जातात. आता ‘तेजःपुंज’ याची काही व्याख्या आहे का? हुशारी म्हणजे नेमकं काय हेदेखील नीट मोजायची परफेक्ट साधनं नाहीत. शिवाय झालेलं बाळ एखाद्या क्षेत्रात तेजःपुंज आणि दुसऱ्या ठिकाणी अगदी ढेपाळू शकतं. शालेय शिक्षणात यथातथा असलेला क्रिकेटचा देव, व्यसनी महागायक किंवा महानायक अशी माणसं आसपास असतात. यांना तेजःपुंज म्हणायचं की नाही?
थोडक्यात, असे भोंगळ दावे तपासता येत नाहीत. अमुकअमुक करा तुमचं मूल शी-शू कधी, कुठे करायची हे वर्षाच्या आतच शिकेल, असा दावा कसा कोणी करत नाही? कारण हा झटकन तपासता येतो. मूल तेजःपुंज होईल हे सगळ्यात बेस्ट, कारण हे तेज वयाच्या कितव्या वर्षी उजेड पाडेल याला काही गणित नाही. शाळेत मागे असणारी मुलं कॉलेजमध्ये चमकतात, व्यवसायात नाव काढतात. उतारवयात उत्तमोत्तम साहित्य-संगीत प्रसवलेले कितीतरी प्रतिभावंत आहेत. हे सारं गर्भसंस्काराचं तेज म्हणायचं का?
मुलांमध्ये बुद्ध्यांक, वर्तन समस्या, ऑटीझम ह्यांच मोजमाप करता येतं. ‘गर्भसंस्कारीत तेजःपुंज संततीमध्ये हे प्रकार क्वचित आढळतील’; असा जर दावा असेल तर तो तपासण्याची सामुग्री तयार आहे. मग असे संशोधन टीकाकारांच्या तोंडावर मारून त्यांची तोंडे बंद का केली जात नाहीत? गर्भसंस्कारामुळे उत्तम बीज निर्मिती होते म्हणे. फारच छान. उत्तम बीज कसं ओळखावं ह्यासाठी टेस्ट-ट्यूब बेबीवाले डॉक्टर आणि पेशंट संशोधनाकडे डोळे लावून बसले आहेत. इतकी प्रभावी आणि साधी युक्ती गुपीत का आहे? स्त्री आणि पुरुष बीज जर उत्तम क्वालिटीचं होत असेल तर गर्भपात अगदी कमी होतील. मग संस्कारित आणि असंस्कारित दाम्पत्यात गर्भपाताचं प्रमाण तपासणं कितीतरी सोप्प आहे. हे का कोणी अभ्यासत नाही? 
उत्तमोत्तम संगीत ऐकावं, उत्तमोत्तम साहित्याचा, काव्याचा, चित्रांचा, आस्वाद घ्यावा, (चित्रपटांचा आणि शिल्पांचा मात्र उल्लेख नसतो) असा सल्ला हे गर्भसंस्कारवाले देत असतात. हा सल्ला छानच आहे की. पण मग त्यासाठी बाळंतपणच कशाला पाहिजे? हे तर सारं एरवीही करायला हवं असं आहे. आणि आईनेच का? बाप अधिक रसिक किंवा बहुश्रुत झाला तर ते काय वाईट आहे? आणि आई-बापच का सारं कुटुंब डुंबू दे की या आनंदसागरात.
इतिहास आणि पुराणातील उत्तमोत्तम कथा वाचाव्यात असंही सांगण्यात येतं. इतिहासात, पुराणात जसे नायक असतात तसे खलनायकही असतातच. शिवाय पुराण आणि धार्मिक कथांतसुद्धा भरपूर हिंसा असते. ती फक्त व्हिडिओ गेम किंवा पिक्चरमध्येच असते, हा गैरसमज आहे. शूर्पणखेचं नाक कापण्यापासून, लंका दहन, रावणवध ही सारी हिंसाच आहे की. महाभारतातदेखील लाक्षागृहदहन, दुर्योधनाच्या रक्ताने माखलेल्या हाताने भीमाने द्रौपदीची वेणी घालणं, वगैरे वगैरे प्रकार आहेतच. ही महाकाव्यं मानवी व्यवहाराचा आरसा आहेत. त्यात सौंदर्य आहे, तसंच क्रौर्यही आहे. सुरूप आहे, कुरूप आहे, हेम आहे हीन आहे आणि हिणकसही आहे. कंस आणि कालियाशिवाय कृष्णाची गोष्ट अपूर्णच नाही का? मग हा गर्भ नेमकं काय स्वीकारायचं याचा नीरक्षीरविवेक कसा करतो? का नीती कल्पना त्या गर्भाच्या मेंदूत कोरलेल्याच असतात?
गर्भसंस्कार हे खरोखरच उपयुक्त असतील तर ते साऱ्या मानवजातीला एकसाथ लागू पडायला हवेत. पण हे तर अत्यंत संस्कृतिनिष्ठ, धर्म-वंश-देश-निगडित असलेले दिसतात. यावर मानभावीपणाने असं सांगितलं जातं की, आमचे मंत्र तर खर्रेखुर्रे पॉवरबाज आहेत. जो कोणी मनोभावे ते म्हणेल त्याला त्याचा लाभ होईल. म्हणजे लाभ नाही झाला तर ते मनोभावे नव्हते! विज्ञानात असं नसतं. निव्वळ मुसलमानांना लागू पडेल आणि अन्यांना नाही अशी कोणतीच लस नसते. निव्वळ कृष्णवर्णीयाचा ताप जाईल पण गोऱ्या माणसाचा नाही, असं तापाचं औषध नसतं. मग प्रश्न असा पडतो की, मानवी मनावर, व्यवहारावर इतके मूलभूत आणि दूरगामी परिमाण करणारे हे गर्भसंस्कार इतके कोते कसे? शास्त्रीय माहिती, व्यायाम, मानसिक, भावनिक आधार, सकारात्मक विचारसरणी, आनंदभाव जोपासणे, सर्व कुटुंबीयांचा सहभाग हेही या गर्भसंस्कारवर्गात सांगितलं जातं आणि हे स्वागतार्हच आहे. पण बाळाच्या भवितव्यासाठी सर्वस्वी आपणच (विशेषतः आईच) जबाबदार आहोत असा एककल्ली, टोकाचा विचार, हे खूळ आहे. ‘अभी नहीं तो कभी नहीं’, हे खूळ आहे. इच्छा धरताच दिव्यत्व आणि मंत्र म्हणताच त्याची इन्स्टंट प्रचिती, हे खूळ आहे. गरोदरपण आणि मातृत्व-पितृत्व हा अगदी आनंददायी अनुभव आहे. थेट गर्भावर अनाहूत अपेक्षांचं ओझं लादून आपण तो खुजा तर करत नाही ना याचा विचार सर्वांनी केला पाहिजे.
- डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
shantanusabhyankar@hotmail.com या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग अवश्य वाचा. shantanuabhyankar.blogspot.in

Friday 24 November 2017

मास्तर

मास्तर
डॉ. शंतनू अभ्यंकर

प्रवेशद्वारावरच्या फळ्यावर ती बहुप्रतीक्षित नोटीस झळकली; नाट्योत्सुक मुलामुलींनी अमुक वाजता हॉलमधे जमावे वगैरे. आम्ही हजर. वेळेच्या आधी. एकेक करत सिनिअर मंडळी जमली. मास्तरबद्दल चर्चा सुरु झाली. मग दस्तूरखुद्द मास्तर अवतरले.  कॉलेजमधे बाकी सगळे ‘सर’ होते. हे मात्र मास्तर. आपल्याला मराठी उत्तम येतं याचा अजिबात गर्व नाही आणि इंग्रजी अजिबात येत नाही याचा अजिबात संकोच नाही; ही यांची खासियत. म्हणून हे ‘मास्तर’ आणि बाकीचे सर! कॉलेजच्या नाट्यमंडळाचे हे  सर्वेसर्वा.
मग नव्या भिडूंनी, प्रत्येकानी आपापली ओळख करून द्यावी असा फतवा निघाला. मग ते झालं. मग सिनिअरनी आपापली नावं आणि कर्तबगारी आळवली. मग मास्तर बोलायला लागले. नवागतांचं स्वागत वगैरे करून ते कॉलेजच्या अभिमानास्पद नाट्यपरंपरेबद्दल बोलले. मधूनच कोणालातरी त्यांनी टोमणा मारलेला असावा. कारण जोरदार हशा उसळला. अर्थात सिनिअर्स मध्ये. आम्हाला त्यांच्या बोलण्यातले संदर्भ लागत नव्हते.  मधूनच पांचट विनोद टाकत, मधूनच चमकदार श्लेष साधत त्यांची फटकेबाजी चालू होती. शेवटी ते म्हणाले, ‘...तर अशा या देदीप्यमान परंपरा असलेल्या कॉलेजच्या नाट्य-वळवळीत, सॉरी हं चळवळीत, तुमचं स्वागत असो.’
चांगला उमद्या उत्साहानी, नाट्य चळवळीत भाग घ्यायला आलेला, जागतिक रंगभूमीवर उलथापालथ करण्यास आसुसलेला मी, हे स्वागत ऐकून चाट पडलो. अर्थात आम्ही जे करत होतो त्याला वळवळ म्हणणं हासुद्धा सरांचा चांगुलपणाच होता, हे खूप खूप नंतर लक्षात आलं.
खरंतर कॉलेजचं नाटक; करणाऱ्यांचं शारीरिक आणि बौद्धिक वयही वर्षानुवर्ष तेच; त्यामुळे सरांनी यात वर्षानुवर्ष इंटरेस्ट घ्यावा म्हणजे जरा जास्तच होतंय असं आम्हाला नंतर वाटायला लागलं. दरवेळी मुले नवीन, चुका त्याच; तितपतच अभिनय त्यांना जमणार, नाटकाची समजही बेताचीच असणार; मग असं असताना त्यात सरांना काय आनंद मिळत असेल? त्यांची झेप आमच्यापेक्षा फार फार मोठी होती. राष्ट्रीय आणि जागतिक रंगभूमीचा अभ्यासही दांडगा होता. पण का कुणास ठाऊक त्यांना आमच्या वळवळीत रस वाटायचा. अगदी रंगून जायचा मास्तर. तो हाडाचा शिक्षक असल्यामुळेच हे शक्य होतं. ज्या शांतपणे आणि चिकाटीने तो वर्गात मुलांच्या त्याच त्या डिफिकल्टी सोडवायचा, तोच वसा त्यानी नाट्यक्षेत्रातही वसला होता. तो म्हणायचा, ‘कॉलेजमध्ये कोणी कुणाला शिकवत नसतो. आमचं काम म्हणजे शिकायचं कसं एवढं तुम्हाला शिकवायचं. पुढे सगळ्यांनी आपलं आपण शिकायचं असतं.’ असंच त्यानी नाटकाच्या बाबतीतही केलं. नाटक वाचायचं कसं, बसवायचं कसं, करायचं कसं, बघायचं कसं, ह्या सगळ्याची एक दृष्टी दिली त्यानी. पुढे कमीअधिक प्रगती आम्ही आमच्या बळावर केली. काहींनी प्रगती केली तशी काहींची अधोगतीही झाली, पण ते जाऊ दे.
मास्तर असा मी एकेरीत उल्लेख करतोय तो अनादरानी नाही हं. गेली कित्येक वर्ष आम्ही सगळे असाच उल्लेख करतो. समोर ‘अहो सर’ आणि त्यांच्या अपरोक्ष ए ‘मास्तर’. नात्यांनी जरी ते सर असले तरी मनातल्या मनात मित्र जास्त म्हणून हे अरे-तुरे. हे त्यांनाही माहित आहे आणि याला त्याचाही आक्षेप नाही.
मास्तरच्या काही वाईट खोडी होत्या. एकदा नाटक निवडून प्रॅक्टिस सुरु झाली की परोपरीने बोलावूनसुद्धा मास्तर थेट शेवटच्या दिवशी उगवणार. ‘तुम्ही बसवा रे सगळं मग मी रंगीत तालमीला येईन आणि काय काय चुकलं ते सांगीन!’ मास्तर खरंच करायचा असं. अस्सा राग यायचा. आदल्या दिवशी काही बदल सुचवून काय उपयोग. पण नाही, ती त्याची स्टाईल होती. आल्या आल्याच ‘तुम्ही चर्खमू आहात!’ अशी सुरवात. मग जल्लादाच्या उत्साहानी आमच्या नाट्यकलेच्या कलेवराची चिरफाड. सगळे अगदी डोळ्यात पाणी आणून हे ऐकून घ्यायचे. हे डिसेक्शन संपलं, आम्ही पुरते गारद झालोय अशी खात्री झाली, की मग म्हणणार, ‘नाही पण म्हणजे तसं बरं बसलंय बरं का. निदान प्रेक्षक उठून स्वतःहून तरी पडदा पाडणार नाहीत!’ मग सूचनांचा पाउस पडायचा. एकदोन प्रसंग घोटून घेतले जायचे. पहाटेचे चार वाजले  की हा प्रकार थांबायचा. पण आमच्या वेड्यावाकड्या चार चिंध्या जोडून केलेल्या नाट्य-गोधडीला सरांच्या सूचनांमुळे महिरपी चौकट लाभायची. आमचं नाटक आता कितीतरी नेटकं आणि उठावदार होऊन जायचं. मास्तरबद्दलचा राग कुठल्या कुठे पळून जायचा.
प्रयोगाच्या दिवशी तर मास्तर अत्र तत्र सर्वत्र भिरभिरत असायचा. मेकअप, सेट, बेल देणे, पडदा पाडणे, असं काय पडेल ते काम मास्तरचं. दुसरी घंटा झाली की, मास्तरनी फुलं वहायची, नारळ फोडायचा. सारे आता भावूकतेनी मास्तरला वाकून वाकून नमस्कार करायचे. पडद्यापलीकडील दिव्यांनी उजळलेला तो लाल मखमली पडदा दूर होताच प्रेक्षागारातून टाळ्या, टवाळ्या, शिट्ट्या आणि बाणांचा वर्षाव व्हायचा. ह्या साऱ्याला पुरून उरत नाट्यप्रयोग सुरु व्हायचा आणि पहाता पहाता सारे प्रेक्षागार आमच्या कह्यात यायचं. हक्काचे हशे, हक्काच्या टाळ्या वसूल केल्या जायच्या. पांचट विनोदाला पांचट दाद आणि समरप्रसंगी घनगंभीर शांतता असा खेळ सुरु व्हायचा. इंटरव्हलमधे मास्तर चहाचं बघायचा. नेपथ्य, मेकअपचे बदल तपासायचा... होता होता तिसऱ्या अंकाचा पडदा पडायचा. प्रेक्षागृहं रितं रितं होता होता, मनही रितं रितं होत जायचं. एक अनाकलनीय पोकळी भरून यायची. मिठ्या मारत एकमेकांचं अभिनंदन करताना सगळ्यांच्याच डोळ्यातून आनंदाश्रू वहायला लागायचे. मास्तर तर घळाघळा रडायचा. खमंग पिठलं-भाताबरोबर प्रयोगातल्या गोच्यांची उजळणी व्हायची. सकाळी पहिल्या लेक्चरला मुलं येऊ लागली की आमची पांगापांग सुरु. पुढे कितीतरी दिवस कॉलेजमधे ताठ कॉलरनी फिरण्याचं लायसन्स असायचं आम्हाला.
अर्थात दरवेळी सारं काही इतक्या सरळपणे व्हायचं नाही. मुळात किती किती दिवस नाटकच ठरायचं नाही. एकदा असंच नाटक कोणतं करायचं हे शेवटपर्यंत ठरेना. नाट्यकंडू बरेच होते. प्रत्येकालाच प्रमुख भूमिका हवी होती. पण एक कॉलेज-हिरो यासाठी विशेष उत्सुक होता. पण त्याचा वकूब काय आहे, हे तो सोडून सारेच जाणून होते. नाटक, पोरींवर इम्प्रेशन, मग पुढे... असा सगळा त्याच्या आयुष्याचा प्रश्न होता. त्यामुळे ज्यात स्वतःला वाव नाही अशा नाटकाला त्याचा विरोध. इथे दिवस भरत आले तरी नाटकाचं ठरेना. शेवटी मास्तरनी एका नाटकाची कथा सांगितली. नाटकाचं नाव होतं, ‘आणखी एक नारायण निकम’. कथेवरून आणि नावावरून नारायण निकम भोवतीच हे नाटक फिरतय हे स्पष्टच होतं. कॉलेज-हिरोनी मग नारायणची भूमिका मागितली. ती मास्तरनी तात्काळ दिली. पुढे स्क्रिप्ट हातात आल्यावर असं लक्षात आलं, की नारायण निकमचा नाटकाच्या सुरवातीलाच खून होतो. ‘आsss’ असं किंचाळण्यापलीकडे त्याला फारसं काम नव्हतं. बाकीचं नाटक हे ह्या खुनाभोवती गुंफलं होतं. पण कॉलेज हिरोनी आधीच ही भूमिका मागून घेतल्यामुळे इतर चांगले कलाकार आवश्यक तिथे फिट्ट बसले आणि नारायण निकमचा परस्पर काटा निघाला.
एकदा असच भांडण विकोपाला गेलं. भरवशाच्या मंडळींनी असहकार पुकारला. शेवटी मास्तरनी मांडवली करून वाटाघाटीच्या अनेक फेऱ्यानंतर नाटक होणारच हे ठरलं. गॅदरिंगला राहिले होते नऊ दिवस. पण दिवस रात्र एक करून नऊ दिवसात तीन अंकी नाटक बसवलं आम्ही. पाठांतर वगैरे भानगड नाही. तीन चार वेळा वाचन की एकदम स्टेजवर स्टँडींग प्रॅक्टिस. दिवस रात्र हॉल मधेच मुक्काम. वडापाव आणि काहींचे डबे हेच जेवण. अंघोळ वगैरे म्हणजे चैन. पण शेवटी हा नवरात्रोत्सव दहाव्या दिवशी सुफल संपूर्ण झाला आणि आमच्या आनंदला पारावार उरला नाही. आधी टेन्शननी झोप उडाली होती आता अत्यानंदानी उडाली. पण या साऱ्यामुळे आमची टीम खूप घट्ट बांधली गेली. पुन्हा कधी वादावादीचे प्रसंग आले तर हे नवरात्रीचं उदाहरण समोर ठेवलं जाऊ लागलं.
दरवेळी नाटक चांगलच व्हायचं असं नाही. पडेल नाटकं आमच्याही नशिबी होती. नुकताच व्हॉट्सअॅप ग्रुप सुरु केला साऱ्या माजी नाट्यकर्मिंचा. अर्थात मास्तरनीच. नाटकाच्या भारी भारी आठवणी तर खूप निघाल्या. मग मास्तरनी टूम काढली, पडलेल्या नाटकांच्या आठवणी टाका. मग काय विचारता. इतक्या फजीत्यांच्या आठवणी की विचारू नका. असंच एक नाटक सपशेल पडलं. तिसरा अंक सुरु असताना प्रेक्षकात चक्क भेंड्या चालू झाल्या. रडून सुजलेले डोळे घेऊन सारी कलाकार मंडळी बाहेर पडतात तो काय, बाहेरच्या फळ्यावर कोणी तरी खरडून ठेवलं होत, ‘तिसरा अंक पहा मिळेल फुकट चहा!’
नाटक सपशेल पडल्यावर गप्पांचा बार भरला. बारच तो, त्यात मतभेदांचे बार उडायला लागले. कोणी काही, कोणी काही बोलत राहिले. अखंड. एकमेकाची उणीदुणीही निघाली, काही घाव वर्मी लागले. वातावरण तंग होतंय असं बघून मास्तर म्हणाला, ‘तू त्याच्या वर्मा वर बोट ठेवलंस हे ठीक पण त्याच्या शर्मावर किंवा गुप्तावर ठेवलं नाहीस हे अधिक ठीक.’ ह्या पीजे वर सगळे फिदीफिदी हसायला लागले आणि वातावरण निवळलं.
हे असलं काही तरी बोलण्यात मास्तर अगदी पटाईत. अभिरूप संसदेत सभापती म्हणून, तावातावाने सगळेच उभे राहून बोलायला लागले. शेवटी ‘प्रत्येकानी आपापल्या बसण्याच्या जागेचा उपयोग बसण्यासाठी करावा’ अशी मजेदार टिपण्णी करून मास्तरनी गोंधळ शमवला.
कॉलेज कौन्सिलच्या भर सभेत, रागारागानी एकदा डीनलाच ‘महाविद्यालयाच्या सात बाराच्या उताऱ्यावर आपल्या तीर्थरूपांचे नाव आहे काय?’ असा सवाल मास्तरच्या नावे जमा होता.
वर त्याची एक आवडती थिअरी होती. अत्यंत अश्लील, अत्यंत फालतू जोक करायला सुद्धा एक वेगळ्या प्रकारची प्रतिभा लागते! मास्तर म्हणायचा, ‘पीजे वर मी एक तासाचं लेक्चर घेऊ शकतो, अत्यंत टुकार विनोद करायला आणि अत्यंत उत्तम विनोद साधायला एकाच मापाची प्रतिभा लागते.’ आणि एके दिवशी खरोखरच मास्तरनी असं लेक्चर घेतलं. गप्पांमध्ये हा विषय निघाला आणि सुरूच झाला मास्तर. विनोद, त्याची मेंदूतली फिजीऑलॉजी, त्याचे आपल्या शरीर-मनावर होणारे परिणाम, त्याचं भाषाशास्त्र, श्लील-अश्लील अशा कल्पना, नाट्य, गद्य, पद्य, देशी, विदेशी  असे विनोद... बाप रे बाप! टवाळा आवडणाऱ्या हास्यरसावर इतकं गंभीर, वैचारिक आणि तरीही रसाळ प्रवचन मी कधीच ऐकलं नव्हतं आणि आजवर ऐकलेलं नाही. पण हे असलं विवेचन हा अपवाद मास्तरचा नेहमीचा पिंड म्हणजे, जरा बरा दादा कोंडके!
ही सगळी प्रतिभा स्टाफ डिबेट मध्ये उतू जायची. गणेशोत्सवात पार पडणारी स्टाफ डिबेट म्हणजे अधिकृत शिमगाच असायचा. एरवी अत्यंत संयत आणि समंजस वागणारी स्टाफ नावाची जमात चौखूर उधळायची. कमरेच्या वर विनोद केला तर तो वक्ता त्याच वक्ताला बाद. मुळात ते मेडिकल कॉलेज, त्यामुळे जननेंद्रियांबद्दल बोलताना पाचपोच आधीच कमी, त्यात असा भाद्रपद मास. बाई म्हणू नका, बुवा म्हणू नका, सिनिअर म्हणू नका, ज्युनिअर  म्हणू नका; सगळे यात एकदिलाने, हिरीरीने सामील. अशाच एका डिबेटमधे कोणीतरी सवाल केला, ‘वेश्यांना मुलं का होत नाहीत?’ याला मास्तरचा जवाब होता, ‘पायवाटेवर कधी गवत उगवतं का?’ मास्तरचे असे सवाल जवाब गगनभेदी दाद मिळवून जात.
नाटकाच्या प्रॅक्टिस वेळीही ही मिश्किली चालू राही. एकदा काय झालं, रंगीत तालीम अगदी रंगात आली होती. स्टेजवरचं जोडपं तर आणखी रंगात होतं. एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करायला त्यांना अभिनय करावाच लागत नव्हता. त्यामुळे स्टेजवरच्या नाटकातला लव्ह सीन अगदी जिवंत वठत होता. दिवस कॉलेजचे होते. वय फुलपाखरी होतं. नव्या नव्हाळीचं प्रेम मुसमुसत होतं. स्पॉट पडला.  त्या दोघांनी एकमेकाला मिठीत घेतलं, अगदी सहजपणे, निर्व्याजपणे हसत ती दोघं एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहिली, रोमँटिक पार्श्वसंगीताचा तुकडा वातावरण भारून टाकत होता. एक गुलाबी शिरशिरी प्रॅक्टिस हॉल मधे भरून राहिली आणि सारी शांतता भेदत सरांचा खर्जातला आवाज घुमला, ‘नाट्यवृक्षाला नवीन फूल  आलेलं दिसतंय, पण इतक्यात फळ येणार नाही याची काळजी घ्या!!!’
स्पर्धा होती विविध गुणदर्शन. मग काय एकेकाला चेवच चढलेला. अफलातून कल्पनांचा पाउस पडला. त्यात एक पावसाचं गाणं होत मधेच. पावसात दोघ बेधुंद होऊन नाचताहेत वगैरे... पण पाऊस कसा पाडणार? मास्तरनी भन्नाट कल्पना सुचवली... लांबलचक कापडाच्या घडीत चुरमुरे भरण्यात आले. हे कापड ड्रॉप पडद्याच्याही वर दोघांनी धरलेलं. बरोब्बर वेळ साधून हे कापड उपडं केलं गेलं. मग काय विचारता. चुरमुऱ्यांचा क्षणिक पडदा झीरझीरत खाली पडला. अंधार आणि फक्त अल्ट्राव्हायोलेट प्रकाश, त्यामुळे ते चुरमुरे अगदी पाण्याच्या थेंबासारखे चमकत होते. नेमका कॅमेऱ्याचा फ्लॅश उडवून विजेचा आभासही साधला गेला... टाळ्यांच्या आणि त्याहीपेक्षा खणखणीत आश्चर्योद्गाराच्या गजरात आम्ही बाजी मारली होती. असा पाउस न कधी पडला होता आणि पुन्हा कोणी पाडलाच तर त्यावर आमचं पेटंट असणार होतं.
एकदा एकानी चक्क नवेकोरे, झकास, धमाल विनोदी, स्क्रिप्ट लिहून आणले. सारे खूष. कॉलेजसाठी हवी तशी ती एकांकिका होती. सर्व पात्र तरुण होती. मुली कमी होत्या. थिल्लरपणा भरपूर होता. प्रोफेसरांवर विनोद करायला भरपूर वाव होता. पण वाचन झालं आणि लेखकाला सरांनी खोपच्यात घेतला. दुसऱ्याच दिवशी ते स्क्रिप्ट लेखकाच्या रूम वरून गायब झालं, संध्याकाळी तर लेखकही गायब झाला... बऱ्याच प्रयत्नानी तो सापडला, तर तो लेखकू सांगू लागला की हे स्क्रिप्ट करायला माझी परवानगी नाही. सगळा धुरळा जरा खाली बसल्यावर मास्तरनी सांगितलं, ते स्क्रिप्ट चक्क चोरलेलं होतं. हे वाग्ड़मयचौर्य मास्तरला मुळीच मान्य नव्हतं. स्क्रिप्ट आणि नाटककार दोन्ही गायब झाले ते मास्तरच्या सूचनेवरून.
बटूमूर्ती, खर्जातला दमदार आवाज, खुरटी दाढी, पोट किंचित जास्त सुटलेले, ते पोट आत राखायचा प्रयत्न करणारा शर्ट आणि गळ्यात शबनम असा मास्तरचा  अवतार. सर डीन झाले पण मूळचा पीळ काही सुटला नाही. मूळचा पोशाखही सुटला नाही. मुळातच पोशाखीपणाला मास्तरच्या वागण्यात मज्जावच होता. त्यामुळे डीन झाल्यावर निव्वळ खोली आणि खुर्ची बदलली, मास्तर तोच. डीनच्या चेम्बरचं दार सताड उघडं राहू लागलं. सर गाडी कधीच वापरायचे नाहीत. क्वाटर्स जवळच होत्या. सर आपले सायकलवरून ये जा करायचे. पार्किंगमधे डीनच्या गाडीसाठी खास चौकोन आखलेला होता. आता सरांची सायकल तिथे लागायची. डीननी राउंड घ्यावा असा प्रघात होता. रोज उठून सगळीकडे चक्कर मारण्याचा सरांना भारी कंटाळा. मग ते विचारणार, ‘खरंच काही प्रेक्षणीय आहे का? का तमाशाच्या बोर्डवरच्यासारखं नुसतंच मला गोल चक्कर मारून, जाऊन आलो म्हणणार मथुरेच्या बाजाराला?’
अर्थात इतक्या बहारदार मास्तरांचं शिकवणंही तेवढच बहारदार असणार की. वर्गात हास्याचे फवारे उडत असायचे. फ्लुकानोझोल, आयट्राकोनाझॉल, आयमीडॅझॉल, आयसोकोनाझॉल, बायफ्लूकानोझॉल ही औषधांची नावं लक्षात कशी ठेवायची असा प्रश्न विचारताच सरांचं थंड उत्तर, ‘अरेsss बाळा sss मराठीतल्या शिव्या नाही का रे येत तुला?’
सरांच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द वहीत टिपून घेणारी एक ललना होती. मग एखादा विनोद झाला की सर तिला सांगणार, ‘डोन्ट नोट धिस डाउन, इट वॉज अ जोक हां.’
ज्ञानाच्या आणि ज्ञानदानाच्या जोरावर मास्तर प्रोफेसर इमेरीटस झाला. जणू गुरूंचे गुरु अशी ही उपाधी. हा मोठाच सन्मान. आधी प्राचार्य होता तो आता आचार्य झाला. पण आचार्य झाला तरी ढुढ्ढाचार्य कधीच नाही झाला. एकदा एका नवतरुण डॉक्टरनी ऑपरेशनची एक वेगळीच पद्धत दाखवली. ऑपरेशन तेच पण करण्याची पद्धत अधिक साधी, सुलभ. सगळे ज्येष्ठ प्रोफेश्वर इम्प्रेस्ड पण गप्प. पण विद्यार्थ्यांनी आता हीच पद्धत वापरावी असा आदेश आला तो थेट मास्तरकडूनच. ‘उद्यापासून माझ्या युनिटमध्ये माझे विद्यार्थी ही पद्धत वापरतील!’ बस् एवढ्या एका साध्या वाक्यात त्यानी त्याच्या पेक्षा वयानी, ज्ञानानी, अनुभवानी अगदी लहान असणाऱ्या एका नवख्या डॉक्टरची चमकदार कल्पना विनासंकोच स्वीकारली होती. त्याच्या प्रतिभेला दिलेली ही दाद होती, अगदी दिलखुलास, स्वतःचा मोठेपणा आड येऊ न देता. नव्याचा स्वीकार कसा करावा याचा हा मोठाच धडा होता आमच्यासाठी. म्हणुनच म्हटलं, मास्तर  आचार्य झाला तरी ढुढ्ढाचार्य कधीच नाही झाला.
म्हणून तर अशा सदाहरित मास्तरचा सहवास आजही हवाहवासा वाटतो. आजही व्हॉट्सअॅप वरून हुकुम सुटतो. अमुक नाटकाला अमुक ठिकाणी या रे सगळे; आणि येतात सगळे. स्वतः रिटायर झाला असला तरी कॉलेजमधल्या सध्याच्या  नाटकाच्या ग्रुपशी मास्तरचा संपर्क जैसे थे आहे. त्यामुळे नव्यानंच मिसरूड फुटलेल्यांपासून ‘कृतांतकटकामलध्वजजरा दिसो लागली’ पर्यंत सारे गोळा होतात. मास्तर हा सगळ्यांना जोडणारा दुवा. नाटक चांगलंच रंगतं. मग त्यानंतर गप्पांचा फड उशीरा पर्यंत रंगतो. हा चौथा अंक कित्येकदा नाटकापेक्षाही रंगतदार होतो.












Thursday 23 November 2017

मूत्र सूत्र

मूत्र सूत्र
डॉ. शंतनू अभ्यंकर
वारंवार युरीनरी इन्फेक्शन होणं ही आपल्याकडची कॉमन समस्या आहे. उन्हाळे लागलेत, उष्णता झाली आहे, असे काही शब्द या साठी प्रचलीत आहेत. महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.
लघवीला जळजळ, घाईची आणि वारंवार लागणे आणि ताप थंडी अशी लक्षणे दिसतात. लघवीला जळजळ होत असल्यामुळे, थंड सरबत वगैरे घेतलं जातं. सोडा, कोकम असे घरगुती उपचार चालतात. काहींना तर, डॉक्टरकडे जाऊन जाऊन, ते कोणत्या गोळ्या देणार हे पाठ झालेलं असतं. मग परस्पर दुकानातून गोळ्या आणल्या जातात. त्यांनी बरं वाटतं, पण पुन्हा काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या. याला रिकरंट युरिनरी इन्फेक्शन म्हणतात. यातूनच काही वेळा इन्फेक्शन किडनी पर्यंत जातं, त्यामुळे या कडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
सहसा यावर अंदाजपंचे औषध दिलं जातं. कारण जंतू कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कोणत्या औषधांनी मरतील याची तपासणी (culture & sensitivity) करून रिपोर्ट यायला चार दिवस लागतात. पण जेव्हा वारंवार इन्फेक्शन होत  असेल तेव्हा  कोणते जंतू आहेत, ते कोणत्या औषधांनी मरतात वगैरे तपासण्या करून मगच त्या जंतूंचा समूळ नायनाट होईल अशी औषधयोजना केली जाते. डायबेटीस वगैरे अन्य बॉयफ्रेंड्स शरीरात मुक्कामी  नाहीत ना हेही बघितलं जातं. सोनोग्राफी, IVP (intra venous pyelography, यात मूत्रमार्गातील अडथळे दिसतात.) वगैरे करून मूत्रमार्गात बाकी काही दोष नाही ना, ते ही बघीतलं जातं.
इन्फेक्शन झालं तर डॉक्टरी सल्याप्रमाणे पूर्ण काळ औषधपाणी घ्यावं. बरेचदा एखाद्या गोळीनी आराम पडतो आणि मग पुढच्या गोळ्या घ्यायची टाळाटाळ केली जाते. किंवा त्या विसरून जातात. एखाद्या गोळीनी चांगला फरक पडणं हे तोट्याचं ठरतं अशावेळी. औषधं अर्धवट सोडली की जंतू पुन्हा त्याच औषधाला जुमानत नाहीत. त्यामुळे पूर्ण कोर्स करणं महत्वाचं आहे. शिवाय ह्या औषधांचा  उपयोग झालाय का? जंतूंचं समूळ उच्चाटन झालंय का हे ही पुन्हा culture & sensitivity करून पहायला हवं. कधी कधी ही तपासणी वारंवार करावी लागते.
काही वेळा वारंवार जास्त डोस देण्यापेक्षा एकाच औषधाचा डोस अगदी कमी प्रमाणात पण तीन महिने वगैरे दिला जातो. ही युक्ती बरेचदा लागू पडते.
 पण वारंवार इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही पथ्य पाळणं, जुन्या सवयी बदलणं आणि नव्या लावून घेणं जरुरीचं आहे.
या सगळ्या सल्यामागचं मुख्य सूत्र असं की लघवी शरीरात कमीतकमी वेळ साठून राहिली पाहिजे. भरपूर पाणी प्यायलं की आपोआपच लघवीला जास्त वेळा जावं लागतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं महत्वाचं. उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि परिणामी लघवी कमी होते. यासाठी उन्हाळ्यात तहान भागल्यावर वर थोडं जास्त पाणी प्यायला हवं.  थंडीतही विशेष तहान लागत नाही. कमीच पाणी प्यायलं जातं. त्यामुळे थंडीतही उन्हाळे लागू शकतात. अगदी लक्षात ठेऊन थंडीतही जास्त पाणी प्यायला हवं. जरी लघवीला लागली नाही तरी दर दोन तासांनी साठली असेल तेवढी लघवी करून टाकणं महत्वाचं. कामाच्या ठिकाणी, प्रवासात, बरेचदा लघवी करणं टाळलं जातं. लघवी होणं हा ब्लॅडरमधल्या जंतुंसाठी नैसर्गिक फ्लश आहे. तो जास्तीजास्त वापरला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी उशीरात उशीरा आणि सकाळीही उठल्यावर लवकरात लवकर लघवी करण्यानी इन्फेक्शनचं प्रमाण बरंच कमी होतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरसंबंध येण्यापूर्वी आणि आल्यावर शक्यतो लगेच बाथरूमला जाणं चांगलं. स्त्रियांचा मूत्र मार्ग (urethra) हा आखूड असतो. शरीर संबंधाच्या वेळी सहज पणे जंतू आत शिरू शकतात, त्यामुळे ही काळजी महत्वाची.
या आणि अशात अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Tuesday 14 November 2017

कठीण समय येता कोण कामास येतो?

                 
कठीण समय येता कोण कामास येतो?
डॉ. शंतनू अभ्यंकर


ऐनवेळी कुणाचे फाटले वा निसटले
नवेळी कुणाचे सरले वा विसरले
नकळत-कळत जेंव्हा भोग-संभोग होतो, 
कठीण समय येता को कामास येतो?

मुळात गर्भ निरोधक साधने वापरायचीच नाहीत. वापरली तर नीट सर्व समजून घेऊन वापरायची नाहीत असा आपला खाक्या.
 गोळ्यांनी म्हणे वजन वाढते, खायला विसरतात, म्हणून नको! कॉपर टी ची भीती वाटते म्हणून नको!! इंजेक्शननी पाळी अनियमित येते म्हणून नको!!! असा हा नन्नाचा पाढा. कितीही समजावून सांगितलं तरी गैरसमजाची जळमटं काही हटत नाहीत.
‘आता’ मुले नकोतचवाली जोडपी सरळ ऑपरेशन करून घेतात. पण ‘आत्ता’ नको (नंतर हवं)वाली मंडळी नन्नाचा पाढा म्हणत बरेचदा निरोध वा काल-निर्णय पद्धत अवलंबतात किंवा काहीच गर्भनिरोधक वापरत नाहीत. मग घोटाळे होत राहतात.
कधी ‘निरोध’ नसतो, कधी असतो पण वापरला जात नाही, कधी निसटतो, फाटतो... मग नको असताना दिवस राहण्याची भीती वाटू लागते! कधी अचानक इकडून येणं होतं, मागणी होते. कधी ‘काल-निर्णय’चा निर्णय चुकतो. कधी ‘नकळत सारे घडले’ या शिवाय अन्य काहीही सबब नसते. नको असताना दिवस रहाण्याची भीती वाटू लागते!! कधी कुण्या अभागीनिवर जोर जबरदस्ती होते; तिला यातून दिवस तर गेले नसतील ना ही कुशंका डोकावते!! मोठा कठीण समय येऊन ठेपतो.
अशा परिस्थितीत गर्भधारणा टाळता येईल अशा पद्धती आता उपलब्ध आहेत. कठीण समय येता आपात्कालीन गर्भ निरोधक साधने उपयोगी पडतात.
गोळी किंवा तांबी अशा स्वरुपात ही साधने उपलब्ध आहेत.
जर गर्भ संभवाची भीती असेल तर अशा संबधानंतर शक्यतो बारा तासाच्या आत ही गोळी (LEVONORGESTREL 1.5mg) घ्यायची असते. याला ना डॉक्टरी सल्ल्याची गरज ना कोणत्याही वैद्यकीय तपासणीची! जेवढ्या लवकर गोळी घेतली जाईल तेवढं उत्तम. अन्य कोणतीही औषधे चालू असतील वा अन्य आजार असेल तरीही ही गोळी घ्यायला हरकत नाही. अतिशय सुरक्षित अशी ही गोळी आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळू शकते.
जर गोळी घेतल्यानंतर २ तासात उलटी वगैरे झाली तर मात्र उलटी होऊ नये, असं औषध घेऊन मग पुन्हा ही गोळी घ्यावी.
दिवस राहणार नाहीत, अशी ऐंशी टक्के खात्री आपण बाळगू शकतो. मात्र ८०%च्या भरोश्यावर रहाण्यात अर्थ नाही. अपेशी २०%त आपण आहोत का, हे जाणून घेणं महत्वाचे आहे. कारण गोळीमुळेही पाळी थोडी पुढे जाते आणि दिवस राहिले तर जातेच जाते. तेव्हा पुढच्या पाळीला आठवड्याभरापेक्षा जास्त ‘उशीर’ झाला तर दिवस गेले आहेत का ते तपासून घेणे इष्ट.
आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. संबधानंतर १२ तासात गोळी घेतली गेली तर उत्तमच. मात्र उशिरात उशीरा ही गोळी ७२ तासापर्यंत घेता येते. मात्र जेवढ्या लवकर घ्याल तितकी परिणामकारकता अधिक.
शिवाय गोळी घेतल्यानंतर पुढे नेहमीची गर्भ निरोधक साधने वापरायलाच हवीत. गर्भसंभव थांबवण्याची गोळीची क्षमता ही गोळी घेण्याआधीच्या ७२ तासातल्या संबधाला लागू पडते. गोळी घेतल्यानंतर जर संबंध व्हायचा झाला तर त्यापासून होणारी गर्भधारणा ही गोळी रोखू शकत नाही. एकाच महिन्यात वारंवार ही गोळी वापरणे चुकीचे आहे. त्यामुळे पाळी पुढे जाते आणि गर्भसंभव होण्याचीही शक्यता रहाते.
गोळीचेही प्रकार उपलब्ध आहेत. १ गोळी घेण्यापासून ५० गोळ्या घेण्यापर्यंतचे डोस आहेत. नेहमीच्या गर्भ निरोधक गोळ्याही या कमी वापरता येतात. पण माहिती सुटसुटीत असावी म्हणून केवळ एकाच पद्धतीची गोळी सांगितली आहे. सर्व माहिती LEVONORGESTREL 1.5mg या गोळीसाठी दिलेली आहे.
गोळी ऐवजी संबधानंतरच्या ५ दिवसांत तांबी बसवली तरीही गर्भ धारणा टाळता येते.
त्यातूनही जर दिवस गेलेच तर गर्भपाताच्याही गोळ्या मिळतात, त्या डॉक्टरी सल्ल्याने घ्याव्यात.
वरील सर्व प्रकार आपात्कालीन स्थितीत वापरायचे आहेत. एरवी नाही. या पद्धती ‘फेल जाण्याची’ शक्यता बरीच आहे (२०%). नियमित वापरायच्या पद्धतीत (गोळ्या/तांबी/इंजेक्शन) मध्ये हे प्रमाण १% पेक्षा कमी आहे. तेव्हा या आपत्कालीन गोळ्या नियमित वापरणे चुकीचे आहे. 
एस.टी.च्या मागच्या खिडकीतून एरवीही ये जा करता येते. पण आपण दारानेच ये जा करतो. मागची खिडकी ‘अपघाताचे वेळीच’ वापरायची असते. तसंच काहीसं हे आहे!

-डॉ.शंतनू अभ्यंकर

Monday 30 October 2017

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!

रांधा, वाढा, पिशवी काढा!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर

हवी तेवढी मुलं झालेली असतात. ती मोठीही झालेली असतात. रांधा, वाढा, उष्टी काढा करून कातावलेला जीव जरा निवांत झालेला असतो. मग मनात येतं, एकदा मुलं झाली की गर्भपिशवीचं काही काम नाही. हा अवयव नुसतातच शरीराला भार. उलट दर महिन्याला पाळी येणार, त्याच्या आधी, नंतर, काही ना काही त्रास होणार, प्रवास आणि सणासुदीला पाळीचा प्रश्न सोडवावा लागणार. अशा असंख्य कटकटी तेवढया उरणार. त्यातून घरी-दारी, शेजारी-पाजारी कुणाला कँन्सर झाला असेल तर मग ह्या बाईपाठीमागे कॅन्सरच्या भीतीचा ब्रम्हराक्षस लागतो. शेजारणीचे डोळे आले की ‘वासाने’ आपले येतात पण शेजारणीचा कॅन्सर काही ‘वासानी’ पसरत नाही. पण अशा विचाराने मुले-बाळे झाल्यावर, पिशवीचे हे ‘जड झाले ओझे’ काही ना काही खुसपट काढून उतरवून टाकण्याकडे महिलांचा कल असतो. रांधा, वाढा झाल्यावर आता ‘पिशवी काढा’च्या दिशेनी प्रवास सुरु होतो. बेंबीच्या खाली आणि गुडघ्याच्यावर, कोणतीही तक्रार असेल तर त्यावर पिशवी काढणे हा अक्सीर इलाज म्हणून सुचवला जातो. चुटकीसरशी स्वीकारला जातो. हे चुकीचं आहे.
म्हणूनच खालील तीन वाक्य प्रत्येक स्त्रीनी आपल्या मनात सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवली पाहिजेत.
१.              प्रत्येक बारीक सारीक तक्रारीसाठी पिशवी काढणे हा उपाय असू शकत नाही.
२.              पिशवी काढली की पिशवीचा कँन्सर टळतो पण अनावश्यक ऑपरेशनचे तोटे अधिक आहेत.
३.              पिशवीचा कँन्सर टाळण्यासाठी पिशवी काढणे, हा उपाय अयोग्य आहे.
मग योग्य उपाय काय आहे? पॅपिनीकोलोव्ह स्मिअर तपासणी, यालाच म्हणतात पॅप स्मिअर.
 पण पॅप स्मिअरबद्दल  नंतर सांगतो, आधी थोडसं गर्भपिशवीच्या कॅन्सरविषयी. गर्भपिशवीचा कॅन्सर असा काही एकच एक आजार नाही. गर्भ पिशवीचे वेगवेगळे भाग आहेत आणि त्या सर्व भागांना विविध कॅन्सरची बाधा होऊ शकते. पण होणाऱ्या प्रत्येक कॅन्सरची चिंता करण्याची गरज नसते कारण यातले बरेचसे कॅन्सर हे अति दुर्मिळ आहेत.  सर्वात कॉमन आहे तो गर्भपिशवीच्या तोंडाचा, म्हणजे ग्रीवेचा कॅन्सर, यालाच म्हणतात सर्व्हायकल कॅन्सर. या कॅन्सरचं लवकरात लवकर, म्हणजे तो डोळ्याला दिसण्याअगोदर कैक वर्ष आधी, निदान हे या पॅप स्मिअर तपासणीने होते.

पॅप स्मिअर ही एक ‘स्क्रिनिंग टेस्ट’ आहे! ‘स्क्रिनिंग टेस्ट’ म्हणजे ‘चाचणी’ नव्हे तर ‘चाचपणी’ असते. अशा टेस्टमधून आपल्याला नेमकं निदान होत नाही. पण पेशंटला आजार असण्याची शक्यता आहे का, ते कळतं. अशी ‘अवाजवी शक्यता’ असलेल्या पेशंटची पुढे आणखी सखोल नेमके निदान होईल अशी चाचणी केली जाते. आधी सर्वांची ‘चाचपणी’ आणि मग गरजेनुसार ‘नैदानिक चाचणी’, अशी द्विस्तरीय रचना मुद्दाम वापरली जाते. सर्व्हायकल कॅन्सरचं  नेमकं निदान करणाऱ्या तपासण्या (Diagnostic tests) ह्या महाग असतात. त्यात एका छोटयाश्या ऑपरेशनने, सर्व्हिक्सचा तुकडा काढून तपासावा लागतो (सर्व्हायकल बायोप्सी). तो तपासायला पॅथॉलॉजीस्ट लागतो. हे अर्थात खूप खार्चिक आहे. म्हणून मग ‘आधी चाचपणी आणि मग  गरजेप्रमाणे नैदानिक चाचणी’ असं धोरण अवलंबिले जाते. ह्या धोरणामुळे वेळ, पैसा आणि त्रास वाचतो. मोजक्या अतिजोखीमवाल्यांकडे अधिक काटेकोर लक्ष पुरवता येते आणि  बिनजोखीमवाल्या निर्धास्त राहू शकतात. बिनजोखीमवाल्यांचा खर्च, शारीरिक व मानसिक त्रास वाचतो.
पॅप स्मिअरमध्ये गर्भाशयाच्या मुखाच्या (ग्रीवा, Cervix) पेशी तपासल्या जातात. इथे कॅन्सरच्या दिशेने चालू लागलेल्या पेशी सापडल्या तर पुढे कॅन्सर होऊ शकेल असं भाकित वर्तवता येतं. हे भाकित शंभर टक्के खरं ठरेल असं नाही. काही उपचार करून ह्या वाममार्गी लागलेल्या पेशींना पुन्हा मूळपदावर आणणं शक्य होतं. काही तर आपण होऊन बिकटवाट सोडून धोपटमार्ग धरतात आणि पुन्हा सुतासारख्या सरळ वागायला लागतात. पेशींप्रमाणेच इथे एच.पी.व्ही. (Human Papilomma Virus) हा विषाणू वास करून आहे का हेही तपासता येतं. ग्रीवेतल्या तरण्याताठ्या पेशींना फसवून कॅन्सरच्या वाटेला लावणारा हाच तो खलनायक. हा असेल तर कॅन्सरची भीती वाढते. लहान वयात लग्न झालेल्या, वारंवार आणि भारंभार मुलं झालेल्या, गुप्तरोग असलेल्या, बाहेरख्याली पतीशी रत झालेल्या, वेगवेगळ्या गुप्तरोगांनी ग्रासलेल्या किंवा अनेकांबरोबर शरीर संबंध आलेल्या; अशा बायकांत हा कॅन्सर जास्त आढळून येतो. पॅप स्मिअर म्हणजे जणू ‘पाप’ स्मिअर आहे. केलेली सारी पातके त्यात दिसतात! वर वर्णिलेल्या पापांमध्ये  एच.पी.व्ही. नामे करून विषाणूची लागण सहज होते. तेंव्हा खरा गुन्हेगार हा विषाणू आहे.

ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. पाळी, गर्भधारणा, वय, इन्फेक्शन्स, अशा कारणानी ह्या पेशी सतत आपलं रूप बदलत असतात. सूक्ष्मदर्शकाखाली बघताना कधी यांचे पातळ थर, एकावर एक पोती रचल्यासारखे दिसतात, तर कधी या उंच खांबांसारख्या दिसायला लागतात. वारंवार होणाऱ्या या रूपांतरात कधी कधी गफलती होतात. काही काही पेशी एच.पी.व्ही.शी सलगी करतात आणि कॅन्सरनामे राक्षसिणीचे रूप घेतात. हे बदलते रूप आपण सूक्ष्मदर्शकाखाली पाहू शकतो, अभ्यासू शकतो. हा राक्षसिणीचा मेकअप चढवायला त्यांना बरीच वर्ष लागतात. प्रथमावस्थेपासून कॅन्सरपर्यंतचा प्रवास दहा ते पंधरा वर्षांचा असतो. हाच ह्या आजाराचा वीकपॉईंट आहे. एवढया मोठया कालावधीत हे बदल पॅप स्मिअर सारख्या तपासणीत लक्षात येतात आणि योग्य ती पावले उचलून कॅन्सर टाळता येतो.
 अगदी सुरवातीच्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला योग्य उपचार केले तर या मायावी पेशी पुन्हा पहिले रूप धारण करतात. किरकोळ बदल असतील तर औषधे आणि भारी बदल असतील तर स्थानिक ऑपरेशन असं उपचाराचं स्वरूप असतं. मग त्या बाईला कॅन्सर होतच नाही. पण ह्या (कॅन्सरपूर्व) स्टेजला जर आपण दुर्लक्ष केलं तर ह्या मायावी राक्षसीणी तिथे वाढत रहातात. हळूहळू खोलखोल शिरतात आणि पेशंट कॅन्सरच्या भक्ष्यस्थानी पडते.

टेस्ट कशी करतात?
एखाद्या ब्रश किंवा चमच्यासारख्या उपकरणानी ग्रीवेच्या पेशी घेऊन त्या तपासल्या जातात. पेशींच्या रूपाचा अभ्यास केला जातो. एच.पी.व्ही. आहे का याचीही परीक्षा केली जाते. यासाठी ना भूल दयावी लागते ना दवाखान्यात दाखल व्हावं लागतं. एरवी आतून तपासणी केली जाते तशीच काहीशी ही तपासणी आहे.

टेस्ट कधी करतात?
सर्वसाधारणपणे सुरवातीला वर्षातून एकदा आणि नंतर दर तीन वर्षानी. पण नेमका कालावधी डॉक्टरांच्या सल्ल्यानी ठरवता येईल.

पॅप तपासणीचा रिपोर्ट ‘शंकास्पद’ आला तर?
‘कॅन्सर’ असा रिपोर्ट आला तरच त्याचा अर्थ ‘कॅन्सर’ असा होतो. ‘शंकास्पद’  रिपोर्टचा अर्थ ‘शंकास्पद’ असाच होतो.  शंकास्पद बदल बरेचदा काही कालावधीनी आपोआप नॉर्मल होऊन जातात. क्वचित याची धाव  कॅन्सरपर्यंत जाते. पण ही धावही कूर्मगतीने असते. बरेचदा खात्री करण्यासाठी अशा शंकास्पद रिपोर्टवाल्या पेशंटच्या ग्रीवेचा तुकडा काढून तपासला जातो. यासाठी काही वेळा कॉल्पोस्कोप या यंत्राची मदत घेतली जाते. यातही कॅन्सर वा त्यासदृश रिपोर्ट आला तरी काही वेळा जागच्या जागी ऑपरेशन करून तो भाग काढून टाकता येतो. अगदी पुढे मुलंबाळंसुद्धा होऊ शकतात. पुढे पॅप तपासणी मात्र करतंच रहावं लागतं.

ही तपासणी कितपत बिनचूक असते?
हा प्रश्न अगदी योग्य आहे. सर्वच टेस्ट प्रमाणे ह्याही टेस्ट मधे डावं उजवं होऊ शकतं. कधी सारं काही ठीक असताना ‘घोटाळा’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स पॉझीटीव्ह) तर कधी सारं काही बिनसलेलं असताना ‘आल इज वेल’ असा रिपोर्ट येतो (फॉल्स निगेटिव्ह). हे प्रकार टाळण्यासाठी पॅप तपासणी आधी दोन दिवस संबंध टाळायला हवेत. कोणतीही योनीमार्गात ठेवायची औषधे वा प्रसाधने टाळायला हवीत. पाळीच्या दरम्यान ही टेस्ट करू नये.
डॉ. शंतनू अभ्यंकर
प्रथम प्रसिद्धी दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, ३१/१०/१७
या आणि अशाच लेखनासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


Thursday 26 October 2017

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...

माझिया अॅलोपॅथीचिये बोलू कवतुके...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

आजकाल डॉक्टरना शिव्या घालणे, मारहाण करणे, राजरोस चालू असते. कट प्रॅक्टिस, अति नफा, औषधकंपन्यांशी असलेले साटेलोटे, रुग्णाची हेळसांड झाल्याचे आरोप हे तर नेहमीचेच. ह्या साऱ्यात अजिबात तथ्य नाही असं नाही. हे आरोप सर्व पॅथीच्या डॉक्टरना झेलावे लागतात. पण या पेक्षा थोडया वेगळ्या प्रश्नाकडे मी वळणार आहे.
आजकाल  अॅलोपॅथीला शिव्या घालायची फॅशन बोकाळली आहे. कोणतंही वृत्तपत्र, आरोग्य पुरवणी, टीव्ही चॅनेल, मासिकं, पुस्तकं बघा, सर्वत्र हा एककलमी कार्यक्रम जोमात चाललेला दिसतो. अॅलोपॅथी किती कमअस्सल, किती घातक, किती बेभरवशाची असा सगळा आव असतो. अशा आरोपांचा समाचार घेण्याचा माझा विचार आहे. तरी बरं आज अॅलोपॅथीच्याच वापराने १९४७साली निव्वळ ३७ वर्ष असलेलं आपलं आयुर्मान आता तब्बल ६७ वर्ष झालं आहे.
सुरवातीलाच हे स्पष्ट केलं पाहिजे की, अॅलोपॅथी ही संज्ञाच मुळात साफ चुकीची आणि गैरलागू आहे. अॅलोपॅथी म्हणजे ‘विरुद्ध’ किंवा ‘विपरीत’ उपचार. पेशंटला जे होतंय ते होऊ नये एवढंच औषध देणारे शास्त्र म्हणजे अॅलोपॅथी. डोकेदुखीला वेदनाशामक आणि तापला ज्वरशामक देणे एवढीच याची धाव. त्या काळची उपचार पद्धती होतीच तशी जहाल. रुग्णांना मारझोड करणे. तीव्र मात्रेत रेचके (जुलाब होतील अशी औषधे) किंवा वमनके (उलटया होतील अशी औषधे) देणे, जळवा लावणे, रक्तस्राव घडवणे वगैरे प्रकार सर्रास चालत. आजच्या अॅलोपॅथीमध्ये यातलं काहीसुद्धा शिल्लक नाही. नित्यनूतन विज्ञानाच्या पावलावर पाउल ठेवत, आज अॅलोपॅथी इतकी बदलली आहे की आज अॅलोपॅथी अस्तित्वात नसून ‘अधुनिक वैद्यकी’ला अॅलोपॅथी म्हटलं जातं. इथेही अॅलोपॅथी हा शब्द निव्वळ प्रचलित आहे म्हणून वापरला आहे. तो आधुनिक वैद्यक याच अर्थाने घ्यावा.
आज कोणी असह्य डोकं दुखतंय अशी तक्रार केली तर निव्वळ क्रोसिनची गोळी देऊन कोणी थांबत नाही. त्या मागचं  कारण शोधायला अनेकानेक तपासण्या केल्या जातात. डोकेदुखीची अनेक कारणे संभवतात; घट्ट टोपी घालण्यापासून ते ब्रेन ट्युमरपर्यंत. काही तरी संभाव्य निदान हाती आल्यावर उपाय योजले जातात. चष्म्याचा नंबर देणे, दाढ काढणे, ब्लडप्रेशरसाठीचे औषध, नैराश्यनिवारक गोळी,  इथपासून ते रोबोटिक ब्रेन सर्जरी पर्यंत असं या उपचारांचं काहीही स्वरूप असू शकतं. ‘विरुद्धउपचार’वाली अॅलोपॅथी ही नक्कीच नाही. हे आहे आधुनिक वैद्यक.
अॅलोपॅथीवर आरोप करताना सगळ्यात बाऊ केला जातो तो औषधांच्या साईड इफेक्टचा. अॅलोपॅथीच्या औषधांना साईड इफेक्ट असतात हे सत्यच आहे पण त्याचा अर्थ ‘इतर’ औषधांना ते नसतात असं म्हणणं हा सत्यापलाप आहे. ‘आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीत’ हे विधान म्हणजे शुद्ध गाढवपणा आहे. कोणतेही औषध हे शेवटी एक अथवा अनेक रसायनाचं मिश्रण असते. मग त्याच्या ललाटी ते अॅलोपॅथीचे आहे का अन्य पॅथीचं हे छापल्याने त्याच्या रासायनिक घटकात, गुणधर्मात आणि त्याच्या शरीरावर होणाऱ्या परिणामात काही फरक पडत नाही. रसायनशास्त्राच्या भाषेत नावडतीचं मीठही खारटच असतं. ह्या रसायनांचे काही परिणाम हवेहवेसे असतात, औषधी असतात. बरेचसे नको असले तरी चालतील अशा स्वरूपाचे असतात. तर काही अगदी त्रासदायक असतात (हेच ते साईड इफेक्ट). आम्ही दिलेल्या अमुक अमुक ‘रसायनाचे’ म्हणजेच औषधाचे, सुपरिणाम तेवढेच तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि दुष्परिणाम सुप्त राहतील, असा दावा कसा काय शक्य आहे? उलट ज्या औषधाचे काहीच दुष्परिणाम नाहीत त्याचे मुळात परिणाम तरी आहेत का नाही अशी शंका घ्यायला हवी!
प्रत्येक औषधाच्या चांगल्या वाईट सगळ्याच परिणामांचा अभ्यास करायचा चंग अॅलोपॅथीने बांधलेला आहे. अशा परिणामांच्या आंतरराष्ट्रीय रजिस्ट्री (अभिलेखागार, नोंदवह्या) आहेत, अभ्यास आहेत. उलट अशा सखोल अभ्यासामुळे हे दुष्परिणाम कमीतकमी कसे होतील, टाळता कसे येतील, अशा दिशेनी संशोधन व्ह्यायला मदतच होते. अॅलोपॅथीची मूठ झाकलेली नाही. त्यामुळे तीत सव्वा लाख रुपये आहेत की सव्वा रुपाया आहे हे तुम्ही पाहू शकता. साईड इफेक्ट आहेत हे मान्य करण्यात कमीपणा कसला? असलाच तर प्रामाणिकपणा आहे. अॅलोपॅथीच्या प्रत्येक औषधाच्या लेबलवर ही यादी दिलेली असते. कायद्यानी तर तसं बंधन आहेच पण पुस्तकांतून अशी माहिती द्यावी असं काही कायद्यानी बंधन नाही. पुस्तकात तर इथ्यंभूत माहिती असते. अशी यादी अन्य कुठल्या पॅथीच्या औषधावर दिसते का हो? त्या बाटल्यात नेमकं काय आणि किती प्रमाणात आहे, हे तरी स्पष्टपणे लिहिलेले असते का? बिनअॅलोपॅथीवाल्या बाटल्यातील रसायने सर्वगुणसंपन्न आणि अॅलोपॅथीच्या बाटल्यातली तेवढी सर्व-अवगुणसंपन्न असं कसं शक्य आहे? आमच्या औषधाला साईड इफेक्ट नाहीतच म्हणणं ही खरंतर आत्मवंचना आहे. स्वतःच स्वतःला फसवणं आहे आणि असे जाहीर दावे करणे म्हणजे रुग्णांनाही फसवणं आहे.
शिवाय होणारे सगळेच साईड इफेक्ट वाईटच असतात असंही नाही; काही वेळा चांगलेही असतात. गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रीबीजग्रंथीचा कॅन्सर टळतो, गर्भपिशवीच्या अस्तराचा कॅन्सर टळतो, पाळीच्या वेळी अत्यंत कमी अंगावरून जातं. हे सगळे या गोळ्यांचे सु-साईड इफेक्टच आहेत. तेंव्हा साईड इफेक्टच्या बागुलबुवाला डरायचं काम नाही. उलट साईड इफेक्ट नाहीतच असला अचाट आणि  अशास्त्रीय दावा करणारे डरावने आहेत हे निश्चित.
जी गोष्ट साईड इफेक्टची तीच गोष्ट ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’ या नावाने खपवल्या जाणाऱ्या औषधांची. जे जे ‘नॅचरल’ आणि ‘हर्बल’, ते ते सेफ आणि उपयुक्त, इतकी बाळबोध कल्पना सोडून द्यायला हवी. नॅचरल असलेल्या सगळ्याच गोष्टी काही चांगल्या नसतात. स्वाईन फ्ल्यूची लागण, सर्पदंश, काही कंदमुळे खाल्याने होणारी विषबाधासुद्धा नॅचरलच आहे पण सुरक्षित नाही.
 एखादं औषध निसर्गात तयार सापडलं म्हणून ते आपोआप गुणकारी आणि सुरक्षित ठरत नाही आणि कारखान्यात बनवल्यामुळे तेच थेट खलनायकही ठरत नाही. कोणतेही रसायन हे निसर्गात सापडो वा कारखान्यात बनो, त्याचे गुणधर्म तेच असतात. हा तर शालेय रसायनशास्त्रात शिकवला जाणारा प्राथमिक सिद्धांत आहे. भल्याभल्यांना याचा विसर पडतो आणि ते अशा जाहिरातींना भुलतात. पूर्वी इन्सुलिन गुरांपासून, डुकरांपासून बनत असे. अगदी ‘नॅचरल’ इन्सुलिन. पण ह्याचे दुष्परिणाम फार. त्यामुळे आजचे ‘मानवी’ इन्सुलिन आले हे कारखान्यात बनतं.  पण हे पूर्वीच्या इन्सुलिनपेक्षा कित्येक पट सुरक्षित आहे. केवळ ‘नॅचरल’ आहे ह्या मिषाने गुरा/डुकराचे इन्सुलिन सध्या कोणी विकत नाही. कारण नॅचरलपेक्षा भारी असं मानवी इन्सुलिन आता आपण बनवलं आहे. ही जेनेटिक इंजिनिअरीगची किमया. कारखान्यात हे ‘मानवी’ इन्सुलिन बनवतात तिथे पाळलेले बॅक्टेरीया. मग आता हे ‘नॅचरल’ म्हणावं काय? का बॅक्टेरीया हे एका वर्गीकरणानुसार वनस्पतींमध्ये मोडतात, तेंव्हा याला ‘हर्बल’ म्हणू या का?
 ‘हर्बल’ हे ही असंच एक फसवं लेबल. ‘जे जे हर्बल ते ते उत्तम’ अशी काही तरी या जाहिरातदारांनी ग्राहकांची पक्की समजूत करून दिलेली आहे. तसं बघायला गेलं तर आजची अॅलोपॅथीची कित्येक औषधे हर्बलच आहेत. अॅट्रोपीन हे अत्यंत उपयुक्त औषध, अट्रोपा बेलाडोना या वनस्पतीपासून मिळालं आहे. हृदयविकारावरील डिजीटॅलीस, मलेरियावरील क्विनीन, प्रसूतीवेळी वापरलं जाणारं मिथार्जीन ही देखील मूलतः हर्बल औषधेच आहेत. इतकंच कशाला हीच व्याख्या लावायची म्हटली तर पेनिसिलिन हे ही हर्बलच आहे की! ‘पेनिसिलियम नोटाटम’ या बुरशीपासून पेनिसिलीन बनतं. पण ‘घ्या हो घ्या, पेनिसिलीन घ्या, आमचं हर्बल पेनिसिलीन घ्या’ अशी जाहिरात तुम्ही कधी बघितली आहे का? ‘पेनिसिलीन वापरा कारण ते अमुक अमुक अभ्यासानुसार सुरक्षित आणि गुणकारी असून या या मर्यादांच्या आधीन राहून त्याचा योग्य तो उपयोग करा’, अशीच अॅलोपॅथीची नम्र आणि नेमकी मांडणी असते. अशा मांडणीचा आदर करायचा सोडून हर्बलचा झेंडा नाचवणाऱ्यांना काय म्हणावं?
होलिस्टिक हाही असाच एक शब्दविभ्रम नेहमी वापरला जातो. आमची पॅथी म्हणजे होलिस्टिक उपचार; पर्यायानी अॅलोपॅथी होलिस्टिक नाही असं सतत सुचवलं जात. ही होलिस्टिक ही काय भानगड आहे ते जरा नीट समजावून घेऊ या. होलिस्टिक म्हणजे काया आणि मन यांचा एकत्रित विचार करुन केलेले उपचार. काहीजण यात सर्व पॅथ्यांनी मिळून केलेले उपचार किंवा अध्यात्मिक किंवा दैवी आशयही शोधतात. पण आपण आपले ‘माइंड अँण्ड बॉडी’ याबद्दलच बोलू. आम्ही होलिस्टिक आहोत सबब तुम्ही, म्हणजे अॅलोपॅथीवाले, होलिस्टिक नाही असा सूर असतो. तुम्ही भले होलिस्टिक आणि काय काय असा पण त्याचा अर्थ अॅलोपॅथी बिन-होलिस्टिक असा कसा होतो? अॅलोपॅथीला होलिस्टिक म्हणायला काय हरकत आहे?
समजा एखाद्याला वारंवार फंगल (बुरशी) इन्फेक्शन झालं तर तो स्किन स्पेशॅलीस्ट काय फक्त  तेवढयापुरतच औषध देवून गप्प बसतो? मध्यमवयीन, जाडगुल्या माणसाला, वारंवार फंगल इन्फेक्शन होतंय, म्हटल्यावर त्या स्कीनवाल्याला लगेचच डायबेटीसची शंका येते. त्या तपासणीत डायबेटीस निघाला की ती औषध सुरु करावी लागतात. डायबेटीस तज्ञही निव्वळ शुगर लेव्हल नॉर्मल यावी अशी औषधे देऊन थांबत नाही. डायबेटीसचे डोळ्यावर होणारे परिणाम हे पेशंटला काही व्हायच्या आधीच ओळखता येतात, ह्याची कल्पना असल्यामुळे तो त्या माणसाला डोळे तपासायला पाठवतो. कदाचित तिन्ही डॉक्टर हे लक्षात घेतात, की हा जाडगुला माणूस नैराश्यानी घेरलेला आहे आणि त्यातच हे डायबेटीसचं निदान झाल्यामुळे आणखी खचलाय; सबब त्याला मानसोपचाराची गरज असू शकते. आता हे काय होलिस्टिक उपचार म्हणायचे नाहीत तर काय म्हणायचे? निव्वळ चार वेगवेगळे डॉक्टर त्याच्यावर उपचार करताहेत याचा अर्थ, त्यांनी त्याच्या शरीराचे चार तुकडे करून आपापसात वाटून घेतलेत, असा होत नाही. एका डॉक्टरनी अख्खा पेशंट तपासला तर ते होलिस्टिक आणि चार डॉक्टरनी मिळून आपापल्या ज्ञान आणि कौशल्यानुसार त्याच्या विविध विकारांवर विविधांगी उपचार सुचवले, तर ते म्हणे ह्या पेशंटकडे ‘पेशंट अॅज अ होल’ बघतच नाहीयेत. तुकड्यातुकड्यांनी बघताहेत. असं कसं? स्किन, डायबेटीस, डोळे आणि मनतज्ञ असे चार डॉक्टर त्याला तपासतात ते काही त्यांना पेशंटच्या शरीराचे तुकडे करून, एकेक तुकडा  तपासायची सैतानी वखवख सुटल्येय म्हणून नाही. या प्रत्येक क्षेत्रात काम करायचं तर एवढी माहिती, ज्ञान आणि कौशल्य लागतं की कोणा एकाच माणसाला हे सगळं समजावून घेणं आणि प्रभावीपणे वापरणं शक्य नाही. अॅलोपॅथीत वेगवेगळे तज्ञ आहेत या मागचं कारण हे आहे. अॅलोपॅथी वगळता अन्य पॅथीत ते जवळपास नाहीत ह्या मागचंही कारण हेच आहे. आज निव्वळ डोळ्याची सोनोग्राफी करणारे, निव्वळ प्रसूतीवेळी भूल देणारे, निव्वळ हाताची ऑपरेशन करणारे वेगवेगळे डॉक्टर आहेत. वैद्यकीच्या तेवढयातेवढया क्षेत्रातही तज्ञ होण्यासाठी  आयुष्य वेचावं लागतं आणि तरीही बरंच काही अस्पर्श रहातं, एवढाच याचा अर्थ.
आम्ही शरीरातील सर्व घटकांचे ‘संतुलन’ साधतो असंही म्हटलं जातं. अॅलोपॅथी काय असंतुलन साधते काय? कोणत्याही आय.सी.यु. मधे किंवा ऑपरेशन थिएटर मधे जाऊन बघा. ऑक्सिजन आणि कार्बन डायॉक्साइ; सोडीयम, पोटॅशियम आणि क्लोराईड; इनपुट आणि आउटपुट; अॅसीटीलकोलीन आणि कोलीनईस्टरेज; या आणि अशा कित्येक घटकांचा एकाच वेळी काय सुरेख तोल साधलेला असतो ते.

अॅलोपॅथी असं मानतं की कोणत्याही आजाराचा विचार आपल्याला
1.    रोगकारक घटक (Agent),
2.    रोगी (Host) आणि
3.    त्याचे पर्यावरण (Environment)
या तीन मुद्यांच्या आधारे करता येतो. कोणत्याही आजाराचे उपचार हे;
1.    आरोग्यवर्धन (Health Promotion),
2.    रोग प्रतिबंध (Specific Protection),
3.    लवकर निदान-लवकर उपचार (Early Diagnosis & Treatment),
4.    पंगुत्व रोखणे (Disability Limitation) आणि
5.    पुनर्वसन (Rehabilitation)
या पाच स्तंभांवर उभारता येतात.
याच तत्वांवर देवीचं निर्मूलन झालं, आता पोलिओचं होऊ घातलंय. मधुमेह, रक्तदाब, इतकंच काय पण ‘रस्ते अपघात’ या आधुनिक रिपूंविरुद्ध दमनयुद्ध छेडलं जातंय तेही याच तत्वांच्या आधाराने. अॅलोपॅथी ही खऱ्या अर्थाने मानववंशाची पॅथी आहे. तिची तत्वे सर्व मानवांना समप्रमाणात लागू होतात. ती ‘चिनी’, ‘अरबी’ किंवा ‘निग्रो’ नाहीये. ती ‘होमो सेपिअन्स’साठी आहे. जसा जर्मन भौतिकशास्त्र आणि भारतीय भौतिकशास्त्र असा भेद संभवत नाही तसंच वैद्यकविज्ञानाचंही आहे; निदान असायला हवं. पण असं दिसत नाही. अनेक उपचार पद्धती ह्या त्या त्या संस्कृतीत उगवलेल्या आहेत. त्या त्या संस्कृतीनुरूप त्यांची तत्व आणि त्यावर बेतलेले आडाखे आहेत. (उदाः आपल्याकडे कोडासाठी पूर्वजन्मीचे सुकृत हेही एक कारण सांगितले आहे, हे सर्व मानवजातीस कसे लागू व्हावे बरे?) अशी सर्व मानवजातीच्या सर्व आजारांचा विचार कवेत घेईल अशी कोणतीही कल्पना वा संकल्पना या अन्य विचारांत आढळत नाही. ही एक मोठीच त्रुटी आहे.
अॅलोपॅथीला टीकेचं वावडं नाही. विरोधातूनच विज्ञानाचा विकास होत आलाय. वैज्ञानिक पुराव्यानिशी केली जाणारी कोणतीही टीका ही हितकारकच असते. पण निव्वळ शेरेबाजी, मोघम आरोप, तीरकस टोमणे ह्यांनी काहीच साध्य होत नाही.
याचा अर्थ अॅलोपॅथीमध्ये सारं काही ‘आल इज वेल’  आहे असं नाही, पण जे काही ‘वेल’ आहे त्याचं श्रेय तरी आपण अॅलोपॅथीच्या पदरात टाकायला हवं एवढंच माझं म्हणणं.

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो. क्र. ९८२२०१०३४९