Showing posts with label स्त्रीआरोग्य. Show all posts
Showing posts with label स्त्रीआरोग्य. Show all posts

Friday, 17 May 2019

सिम्स लेकाचा


सिम्स लेकाचा
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

‘तो सिम्स दे मला!’ दिवसातून दहा वेळा माझी मागणी असते. सिम्स व्हजायनल स्पेक्युलम हे एका हत्याराचे नाव. बोली भाषेत नुसतेच सिम्स. हत्यार हा सुद्धा शब्द चुकीचा आहे. ह्याला काही धारबीर नसते. उपकरण म्हटलेलंच बरं.  बायकांच्या तपासणीला हे अति उपयोगी. त्यामुळे सतत वापरात असलेले. अगदी सलामीलाच ह्याची ओळखदेख होते. सिम्स म्हणजे फार काही भारी चीज आहे असं समजू नका. अगदीच साधी गोष्ट आहे ही. आतून तपासायचे तर योनीमार्ग फाकवून धरायला हवा. मग डॉ. सिम्स यांनी, चक्क योग्य त्या आकाराचा डाव, हो हो आमटी वाढून घेतात तो डाव, त्याचे हँण्डल वाकवून वापरायला सुरवात केली. त्याचीच सुधारित आवृत्ती म्हणजे आजचा सिम्स. किती साधीशी गोष्ट. पण त्यानी केली आणि त्यांचे नाव चिकटलं त्याला. जर कोणा कुलकर्ण्यानी हा शोध लावला असता तर, ‘ए, हा नको.  तो मोठ्या साईजचा कुलकर्णी दे मला!’ असं काहीतरी म्हणालो असतोच की सगळे.
सिम्सशिवाय आम्हा गायनॅकॉलॉजीस्टचं पान हलत नाही. पंक्चरवाल्याचा जसा पाना, न्हाव्याची जशी कात्री, तसा आमचा सिम्स. तर ह्याचा कर्ता, जे मारीऑट सिम्स. स्मार्ट होता. उंचापुरा, गरुड नाक, अगदी देखणा. स्त्रीरोगशास्त्राचा पिता म्हणून गौरवलेला हा अमेरिकन डॉक्टर. तिथेच दक्षिणेत अलाबामात प्रॅक्टिस करायचा. अमेरिकेत आणि दक्षिणेत म्हणजे नेमकं काय हे लक्षात आलं का तुमच्या?   जगत्जेत्या अमेरिकेचा हा दक्षिण भाग यादवी युद्धापूर्वी कुख्यात होता तो तिथल्या वर्णभेदासाठी आणि गुलामीसाठी.
गायनॅकॉलॉजीच्या ह्या फादरने अनेक छोटे मोठे शोध लावले. बायांना पुरुष डॉक्टरांसमोर तंगड्या फाकवून झोपवले जायचे, अगदीच संकोचवाणं सगळं. सिम्सनी हे बदललं. कुशीवर वळलेल्या अवस्थेत पेशंट तपासायला सुरवात केली. ह्याला आता म्हणतातच मुळी ‘सिम्स पोझीशन’. पण तो विख्यात झाला तो त्याच्या नावे असणाऱ्या ऑपरेशनमुळे.
‘व्ह्सायको-व्हजायनल फिश्चुला’साठीचे ऑपरेशन त्यांनी पहिल्यांदा यशस्वीपणे केले. त्या काळी बऱ्याच बायकांची बाळंतपणे अडत. बाळाचे डोके आईच्या जननमार्गात इतके घट्ट आवळून बसे की बाहेर येणे महामुश्कील. तासंतास प्रयत्न करून शेवटी ते मूल बाहेर येई. तोपर्यंत ते बहुदा मेलेलेच असे. वेळेत न जन्मल्यास ती बाईही मरे. यातून जर जगलीवाचलीच तर एक भयंकर जिणे तिच्या वाट्याला येई. व्ह्सायको-व्हजायनल फिश्चुला नावाचा जीव न घेणारा, पण जिणे हराम करणारा आजार, तिच्या नशिबी येई. व्हायचे असे की, बऱ्याच वेळ बाळाचे डोके अडकून राहिल्यामुळे योनीमार्गाच्या  आणि मूत्रमार्गाच्या, चिमटलेल्या भागाचा रक्तपुरवठा बंद व्हायचा. मग हा भाग चक्क मरून, गळून जायचा. मग लघवीची पिशवी आणि योनीमार्ग असा बोगदा तयार व्हायचा. आता लघवीच्या जागेतून लघवी होण्याऐवजी, योनीमार्गातून लघवी सतत थेंब थेंब गळायला लागायची. सतत लघवी, सतत कपडे ओले, सतत घाण, उग्र दर्प, सतत ओल्या राहून राहून  मांड्या सोलपटलेल्या; सतत, सतत, सतत त्रास. जिवंतपणीचे मरणच की हे. ही स्त्री म्हणजे शब्दश: नरकाचे द्वार. हिला मग आयुष्यभर चार लोकापासून लांबच रहावं लागायचं. कारण जरा लोकांत गेली की लोकांचे हात नाकाला. कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक आयुष्यातून उठणार ती बाई. अशी बाई गुलाम म्हणून सुद्धा नकोशी. बरं, हा आजार असा विचित्र की एवढेच होणार. ह्याहून जास्त नाही आणि कमी नाही. यापेक्षा बळावत जाणारा आजार बरा. त्यातून मरणाने का होईना, पण लवकरच सुटका होते. मरणासन्न आजाऱ्याला सहानुभूती मिळते. इथे, ह्या आजारानी मरणबिरण काही येत नाही. त्यामुळे इतर कोणत्यातरी कारणांनी मरण येईपर्यंत हे देहीचे भोग भोगायचे. अशा बायकांसाठी सिम्सनी ऑपरेशन शोधलं. डॉक्टर प्रकार प्रकार करत होते पण ह्यानी त्या सगळ्याला एक सुसूत्र स्वरूप दिलं. ह्यानी प्रथमच चांदीची तार वापरून टाके घातले. ही युक्ती बरीच फलदायी ठरली. त्याचं नाव सुवर्णाक्षरांनी कोरून ठेवलं गेलं.
अडचणीच्या जागेतला हा आजार तपासायचा कसा इथून अडचणी होत्या. एकदा झालं असं की, एक गोरी बाई घोड्यावरून पडली आणि तिला अवघड जागी मार लागला. तिला इतकं दुखत  होतं की ती नीट झोपूच शकत नव्हती. रांगल्यासारख्या अवस्थेत तिला तपासता आलं फक्त. ह्या अवस्थेत वाकवलेला डाव त्यानी योनी मार्गात सरकवला. आत हवा गेल्यामुळे पूर्ण मार्ग आता स्पष्ट दिसू लागला.  फिश्चुलाला दुरुस्त करायला ही युक्ती उपयुक्त ठरेल हे त्याच्या लक्षात आलं. आता  फिश्चुलाला नीट दिसू लागला, त्याचा अभ्यास शक्य झाला, मोजमाप शक्य झाले.
मग त्यानी आसपासच्या गुलामांच्या मालकांना कल्पना दिली. ‘तुम्ही फिस्तच्युलावाल्या गुलाम बायकांना आणून सोडा, कपडे, पैसे, टॅक्सचं बघा (गुलामांवर रीतसर सरकारी कर होता); रहाणे खाणे आणि उपचार माझ्यातर्फे’, अशी ऑफर होती. अशा डझनभर बायका त्यानी भाड्याने घेतल्या, त्यांच्यावर डझनावारी ऑपरेशने केली (१८४९ ते १८४६) आणि शेवटी योग्य उपचार पद्धती सिद्ध केली. काळ्या, गुलाम बायकांवर असे प्रयोग करण्यात त्याला काही वावगं वाटलं नाही. चार शिकलीसवरली, कर्तीधर्ती माणसं हेच तर करत होती. त्या गुलाम बायकांना नावेही त्यांनीच दिली. आपण पाळीव प्राण्यांना नाही का नावे देत, तशी. चारचौघीसारखी नावं. ल्युसी, बेट्सी आणि अनार्का.
सिम्सला वाटत होतं की फार तर सहा महिन्याचा प्रश्न. एवढ्या वेळात आपल्याला नीट ऑपरेशन करायची पद्धत सापडेल पण प्रत्यक्षात यशापयशाचा खेळ तीन वर्ष चालू होता. त्याच्या मेहुण्याने, ‘भावजी आता पुरे जरा बायकामुलांकडेही बघा.’ असा सल्लाही दिला म्हणे. पण वेळोवेळी ऑपरेशन सुरूच राहिली. एक अपयशी झाले की दुसरे, त्यातून ती बाई उठते न उठते तोच त्यातल्या त्रुटी दूर करायला तिसरे. या, ओणव्या व्हा, पाय बांधून, मांड्या फाकवून, ऑपरेशन करून घ्या! भूलबील भानगड नाही. बेट्सी, ल्युसी, अनार्का आणि कित्येक अनामिका. अर्थात सगळ्या काळ्या, सगळ्या गुलाम. बेट्सी आणि ल्युसी बऱ्या झाल्याचा स्पष्ट उल्लेख त्याच्या लिखाणात आहे. त्याच्या यशाचा डंका आता अॅटलांटिक पार वाजू लागला. फ्रांन्सची सम्राज्ञी युजीनिया ही देखील याची पेशंट. तिलाही हाच प्रॉब्लेम. तिलाही रोगमुक्त केलं सिम्सनी. बघता बघता तो न्यूयॉर्क मधील बडा डॉक्टर ठरला.
पण तो तेंव्हा. इतिहास झाला आता त्याला. नव्या इतिहासानुसार आता सिम्स खलपुरूष ठरला आहे. गुलाम, हतबल स्त्रियांचा त्यानी गिनीपिग म्हणून  वापर केला. भूलीचं तंत्र हाताशी आलं होतं. पण ह्या सगळ्या बायकांवर त्यांनी भूल न देता अनेकवार शस्त्रक्रिया केल्या. त्यांची संमती वगैरे कशाचीही त्यांनी पर्वा केली नाही. सिम्सनी केलेल्या या भयंकर पापाचे माप त्याच्या पदरात टाकण्याचा काळ आता उगवला आहे. कोणे एके काळी गोऱ्यांचं वर्चस्व होतं. हे वर्णवर्चस्व सर्वव्यापी होतं. हे गोरेच तर इतिहास घडवणार आणि मग तो लिहिणार. यांनी ह्या सिम्सला लेकाच्याला फारच चढवून ठेवलाय. चला तर त्यांचा आणि सिम्सचा माज उतरवू या. ह्या शस्त्रक्रियेच्या शोधात  योगदान असेल, तर ते त्या मूकपणे सारं काही सहन करणाऱ्या, कृष्णवर्णीय, गुलाम, बायकांचं आहे. सिम्स लेकाचा नुसताच बांडगुळ!! 
सिम्सचे जे काही योगदान होते ते मातीमोल ठरवत, त्याला स्त्रीद्वेष्टा, वर्णभेदी वगैरे शिव्या घालत, वाजत गाजत एकेक निबंध, प्रबंध, प्रकाशित होऊ लागला आहे. न्यूयॉर्कला १८५५ साली त्यानी खास महिलांसाठी इस्पितळ उभारलं. न्यूयॉर्कला त्याचा पुतळा होता, सेन्ट्रल पार्कमधे, बरोब्बर न्यूयॅार्क अकॅडेमी ऑफ मेडिसीन समोर. आता तो तिथे नाही. तो  नुकताच अनमानपूर्वक हटवला गेला आहे!
 सिम्सनी जे केलं ते चूक की बरोबर? आजच्या मूल्यविवेकाचा गॉगल घालून इतिहास वाचणे योग्य की अयोग्य? सिम्स डॉक्टर होता, चार बायकांना बरं वाटावं म्हणून त्या काळी जे काही मान्य होतं ते त्यांनी केलं. ते चूक होतं, ही तर आजची समज. गुलामांचा असा वापर चूकच.  त्यांच्यावतीनी  मालकांनी संमती देणे, हेही चूक. पण त्याकाळी  गुलामांना  होकार-नकाराचा अधिकारच नव्हता. हा तर त्यांच्या मालकांचा अधिकार. मालकांनी संमती दिलीच होती. उलट मालकच अशा निरुपयोगी बायांना घेऊन येत. असले सतत आजारी गुलाम त्यांना परवडत नसत. गुलाम झाले तरी ते धडकेच हवेत की. तेंव्हा गुलाम स्त्रियांना अधिकाधिक त्रास व्हावा म्हणून काही त्यांचे मालक किंवा सिम्स निश्चितच प्रयत्न करत नव्हते. शिवाय गुलाम काळे, हे अधिक सहनशील असतात असाच समज होता. तसा तो सिम्सचाही होता.  पण मुळात गुलामगिरी हीही चूक. म्हणजे सिम्सनी लेकाच्यानी लढायचे तरी किती आणि कुठे कुठे?
त्यानी केवळ एवढीच चूक केली असं नाही. कालानुरूप उपचार करता करता सिम्सनी लाख चुका केल्या असतील. आज आपण ज्यांना चुका म्हणतो ते सिम्सकाळी बरोबरच समजलं जायचं. कित्येक हिस्टेरियाच्या बायकांच्या त्यानी स्त्रीबीजग्रंथी काढल्या होत्या. हा उपाय निरुपयोगी  तर आहेच पण उपद्रवीही आहे. हे त्या वेळी कोणालाच माहित नव्हते. सगळे हाच उपाय योजायचे. त्यानेही योजला. कित्येक गोऱ्या बायकांसाठीही योजला. आपण जे करतोय ते योग्यच आहे असं त्याला प्रमाणिकपणे वाटत होतं. त्यामुळे देवही नाही आणि दानवही नाही, त्याच्याकडे मानव म्हणून पहाता येईल का आपल्याला?
आज सिम्सचं वर्तन जोखणे जसं  अवघड तसे त्या आजारांनी माजवलेले तांडव मोजणेही अवघड. फिश्चुलालावाल्या बायकांचे हाल ज्यांना बघून तर सोडाच, ऐकूनही माहित नाहीत त्यांना सिम्सच्या ऑपरेशनचं महत्व ते काय कळणार? त्याचे त्या बायकांवर कसे अनंत उपकार आहेत हे काय आकळणार? आजही जगाच्या काही भागात फिश्चुला आहे. त्यावर ऑपरेशन हाच उपाय आहे. ती केलीही जातात आणि अशा स्त्रियांना फिश्चुलामुक्तीही मिळते. अशा बायकांच्या डोळ्यात काळा-गोरा डॉक्टर असा भेदाभेद नसतो. त्यांच्या डोळ्यात त्या डॉक्टरप्रति असते फक्त कृतज्ञता. प्रश्न निव्वळ एक अनाहूत भोक बुजवण्याचा नसतो, प्रश्न त्या स्त्रीला पुन्हा समाजात सन्मान मिळवून देण्याचा असतो. समाजातच  का? प्रश्न तर आत्मसन्मान बहाल करण्याचा असतो.
आजच्या तुलनेत त्या काळची सर्जरी म्हणजे कसाईकामच होतं. सर्जनला सिंहाची छाती हवी असं म्हटलं जायचं, म्हणजे सर्जरी किती हिंसक असेल कल्पना करा. अशा काळातला सिम्स हा उत्तम शल्यविशारद होता. धाडसी पण संयत. पण फिश्चुलाचे काय करायचे हे त्याला तरी कुठे माहित होते? मुळात ह्या आजारावर उपचारच नव्हता. त्यामुळे गोऱ्यांनी काळ्यांवर, गोऱ्यांवर, कुणीही कुणावरही केला तरी तो प्रयोगच होता. काही टोकाचे टीकाकार हेही मान्य करायला तयार नाहीत. त्यांच्या मते त्याच्या कौशल्याइतकेच श्रेय गुलामीच्या प्रथेलाही जाते. नसतीच जर गुलामी, तर असे प्रच्छन्न प्रयोग तो करूच शकला नसता. मग कसले ऑपरेशन, कसली फिश्चुलामुक्ती आणि कसली प्रसिद्धी? मग ह्याच न्यायानी अब्राहम लिंकनचे महात्म्यही गुलामगिरीमुळेच की. नसती जर गुलामगिरी, तर कसली वर्ण समानता, कसली यादवी आणि कसला लिंकन?
लोक म्हणतात अनार्कावर सोळा वेळा ऑपरेशन केलं त्यानी, सोळा वेळा! काय हे!! किती क्रूर!!! पण जे ऑपरेशन कसे करावे, कधी करावे, काहीच जर ज्ञात नव्हते, तर ऑपरेशन करणारा तरी दुसरे काय करणार?  पेशंटच्या जीवावर बेतणार नाही अशी काळजी घेत घेत, चाचपडत चाचपडत, तो ऑपरेशन करून बघत  होता. सोळा वेळा एखादी बाई ह्याला सामोरी जाते ते ती निव्वळ गुलाम होती म्हणून असे कसे समजावे बरे? तिचे रोजचे आयुष्य ऑपरेशनपेक्षाही कष्टप्रद होते, भयप्रद होते, अशा  संशयाला जागाच नाही का? अनार्कासकट  कित्येक पेशंट बायकाच त्याला अॅसिस्ट करायच्या. ‘पुढचे ऑपरेशन आता माझे करा हं सर’, म्हणून मागे लागायच्या. अॅसिस्ट केल्यामुळे कुठे काय बिनसतंय हे त्यांना नेमकं कळायचं. चक्क सूचनाही करत होत्या त्या. त्यामुळेच की काय त्या पुनःपुन्हा ऑपरेशन करायला तयार होत होत्या. ज्याअर्थी अनार्का सिम्स सोबत राहिली, त्याअर्थी तिला आगीतून फुफाट्यात तर लोटलं नव्हतं त्यानी. ज्याअर्थी ती मदतनीस म्हणून काम करत होती त्याअर्थी निदान इतरांना दर्प येऊ नये इतपत सुधारणा तर तिच्यात झाली होती. संशयाचा इतपत फायदा तरी सिम्सला द्यायला काय हरकत आहे?
व्हेल्प्यू ह्या फ्रेंच सर्जनने वारंवार फेल जाणारी ऑपरेशने, त्यामुळे वारंवार परतणाऱ्या त्रासलेल्या स्त्रिया आणि वैतागलेले हतबुद्ध डॉक्टर यांचे सुरेख वर्णन करून ठेवले आहे. यातना फक्त पेशंटच भोगत होत्या असं नाहीये. अपयशाचा वैताग डॉक्टरही भोगत होतेच की. त्रास बरा करणे तर सोडाच पण तो कमी करणेही डॉक्टरच्या आवाक्याबाहेरचे होते. प्रयोग, भूल आणि वर्णद्वेष लक्षात घेऊनही, सिम्सनी पहिल्यांदाच हा आजार बरा करून दाखवला, हे निखालस सत्य आहे.
सिम्सनी काही एवढेच केलं असं नाही. सिम्सनी घडवलेली इंस्ट्रुमेंट आज वैद्यकीय संग्रहालयात दिसतील; मात्र त्यांचे आधुनिक अवतार आजही वापरात आहेत. कृत्रिम रेतन, कँन्सर संसर्गजन्य नाही ही समज, पोटाला मार लागल्यावर करायचे पद्धतशीर ऑपरेशन, पित्ताशयाचे ऑपरेशन, अशा अनेक गोष्टी केल्या त्यांनी. अर्थात सगळ्यात उपयोगी आणि म्हणून सगळ्यात गाजलेले ऑपरेशन फिश्चुलाचे.  ह्या इतर प्रकारातही त्याने काही ना काही प्रयोग केलेच की. ती माणसेही गिनीपिगच होती. ती काळी होती, तशी गोरीही होती. पेशंटची संमती, मानवतावाद, मानवी हक्क वगैरे कल्पनाच त्या युगात नव्हत्या  तर त्या सिम्सच्या लेकाच्याच्या डोक्यात कुठून येणार?
भुलीचा पहिला जाहीर प्रयोग झाला, न्यूयॉर्कमध्ये, १६ ऑक्टोबर १८४६ रोजी. त्याआधीच वर्षभर सिम्सचे प्रयोग सुरु होते. मग तो भूल कुठून वापरणार? आज भूल म्हटल्यावर जी सुरक्षितता, जी सुलभता आणि जी सहजता आपल्या डोळ्यासमोर येते ती अर्थातच त्या काळी नव्हती. ऑपरेशनसारखाच भूल हा प्रकारही भयावह होता. भुलीचा भुलैय्या अजून उलगडायचा होता. त्यामुळे डॉक्टर बिचकत होते. भुलीचे तंत्र जरी अवतरले होते तरी ते सार्वत्रिक नव्हते. भुलीशिवाय ऑपरेशन उरकण्याकडे कल होता. अॅनेस्थेशियाचा शोध लावणाऱ्या सर जेम्स यंग सिम्सन यांनीच फिस्तच्युलासाठी अॅनेस्थेशियाची (क्लोरोफोर्म) गरज वाटत नाही, या ऑपरेशनमध्ये अॅनेस्थेशिया देण्याइतक्या वेदना होत नाहीत, असं नमूद करून ठेवले आहे. हे ही सिम्सनी आपले प्रयोग केले, त्यानंतर दहा वर्षांनी. म्हणजे इतक्या वर्षांच्या वापरानंतरही सर्रास वापर हा रिवाज नव्हताच. त्यामुळे जरी सिम्सनी लेकाच्यानी अॅनेस्थेशिया वापरला असता, तरी तोही एक प्रयोगच ठरला असता की. शिवाय न्यूयॉर्क ते अलाबामा हे अंतर १८४६ साली आजच्यापेक्षा कितीतरी जास्त होते! मग त्या बिच्चाऱ्या सिम्सला धरून धोपटण्यात काय हंशील?
पण हे झालं सिम्सच्या समर्थकांचे आणि विरोधकांचे मत. त्या बायकांना नेमकं काय वाटत होतं याचा मागमूसच नाहीये. गुलामांना मत असण्याचा प्रश्नच नव्हता. निरक्षर, गुलाम, काळ्या बाया त्या, त्यांनी काही लिहिलेले नाही. कोणाला काही सांगितलं असलं तर ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. कदाचित त्यांनी जात्यावरच्या ओव्यांतून, भोंडल्याच्या गाण्यांतून आपल्या व्यथावेदना किंवा कृतज्ञभावना मांडल्याही असतील. पण इतिहासाच्या गर्तेत खोल खोल कुठेतरी त्यांच्या दुःखाचे उसासे आणि सुटकेचे निश्वास कायमचे गाडले गेले आहेत. आता आपण इतिहासकारांचे आवाज तेवढे ऐकतोय. गुलामांच्या मूक कहाण्या इतिहासकारांची वाणी बोलत आहेत. काही सिम्सच्या बाजूनी तर काही सिम्सच्या विरोधी.
बऱ्याच गदारोळानंतर न्यूयॉर्क अडेमी ऑफ मेडिसीन समोरचा सिम्सचा पुतळा आता हटवण्यात आला आहे. यानेही सर्वांचे समाधान झालेले नाही. तो पुतळा आता सिम्सच्या थडग्यात गाडून टाका अशी नवी मागणी आहे.  काळ्यांचा कर्दनकाळ सिम्स, हा आमचा हिरो नाही. त्याच्या जागी डॉ. रिबेका ली क्रम्पलर (पहिली कृष्णवर्णीय महिला डॉक्टर) किंवा डॉ. हेलेन रोद्रीग्स त्रिअस (स्त्रीचळवळतील कार्यकर्ती, लॅटिन अमेरिकन डॉक्टर) यांचे पुतळे उभारावेत अशीही मागणी आहे. म्हणजे प्रश्न निव्वळ कृष्णवर्णीयांच्या सन्मानाचा नाहीये. सिम्सला हटवून, त्याच जागी नवे स्मारक उभारण्याचा आहे. अमुक एक गोष्टवहीं बनायेंगेम्हटलं की सगळी सुसंगती कशी हादरते बघा.
शोषित, वंचित, पिडीत जनता जेंव्हा आपला हक्क मागते, तेंव्हा उत्साहाच्या भरात; शोषक, वंचक आणि पीडकाना धडा शिकवण्याच्या नादात; स्वतःच तर तसे वागत नाहीत ना? निव्वळ बदल एवढ्यावर मागण्या थांबत नाहीत त्यात ‘बदला’ ही भावनाही असते का? ‘मानव सारा एक’, ही आजची शिकवण सिम्सच्या वागणुकीत नव्हती,  हा त्याचा दोष, की हा काळाचा महिमा? ज्या त्या इतिहास पुरुषाने आजच्या लढाया, आपापल्या काळी लढायलाच हव्या होत्या का? जित्ता असताना सोयीचा ठरलेला त्याचा गोरा रंग आता मेल्यावर इतक्या वर्षांनी गैरसोयीचा ठरतोय का? नव्या, ‘उलट्या वर्णद्वेषात’ सिम्स भरडला जातोय का? मानवी हक्क, लिंगसमानता, वर्णसमानता ह्याच्या कल्पनासुद्धा प्रवाही असतात. तेंव्हा सिम्सला पापाची शिक्षा देणारे आजचे, हे कदाचित उद्याचे पापी ठरतीलही...! त्याच्या काळी गुलामी, लिंगभेद आणि वर्णभेद हेच जर शिष्टसंमत होते तर सिम्सचं नेमकं पाप किती? आणि त्याची शिक्षा त्याच्या पुतळ्यानी किती आणि कशी भोगायची? पुतळे काय जगभर उभे केले जातात आणि पाडले जातात. त्या निर्जीव पुतळ्यांना काहीच फरक पडत नाही. पण ‘हटाव’ आणि ‘बचाव’ वाल्यांना पडतो.
कदाचित सिम्सला गायनॅकॉलॉजीचा पिता म्हणण्याऐवजी त्या तिघी आणि इतर अनेक  अनाम बायकांना गायनॅकॉलॉजीच्या माता म्हणायला हवं. ह्याचा पुतळा हटवला खरं, पण कदाचित तो न हटवता, त्याच्याशेजारी त्या तिघींचे आणि इतर अनामिकांचे उभे केले असते तर त्यांनी एकमेकांकडे बघून घेतलं असतं, नाही का?



Thursday, 25 April 2019

गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया


गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
रशियात कट्टर कम्युनिस्ट राजवट होती. पोलादी पडदा होता. त्यामुळे काहीही कळणे मुश्कील. अशा रशियाचे  वर्णन चर्चिल सायबाने आपल्या तिरकस ब्रिटीश शैलीत करून ठेवले आहे. रशिया म्हणजे एका रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! (It is a riddle, wrapped in a mystery, inside an enigma.) थोडक्यात रशियाबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही नाही.
गरोदरपणी होणारा असाच एक आजार आहे. ज्याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही सध्या धूसर आहे. हा आजार म्हणजे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे!  एरवी माझ्यासकट तमाम डॉक्टर, ही नाहीतर ती, अशी काहीतरी माहिती सांगायला, हिरीरीने  लिहित असतात. पण आज मी काहीही माहित नाही हे सांगायला लिहितो आहे. उद्या जर, ‘कोणता शोध लागला तर हमखास नोबेल मिळेल?’ असे विचारले,  तर ह्या रोगाच्या कारणांचा शोध लावेल त्याला/तिला तो नक्की मिळेल यावर साऱ्या डॉक्टरांचे एक मत होईल. हा आजार दहातल्या एका तरी गरोदर स्त्रीला होतो. 
याला म्हणतात पीआयएच (Pregnancy Induced Hypertension). इतरही नावे आहेत. पण आपल्या पुरते हे एकच पुरे. जगातल्या एकूण बाळंतपणांपैकी बरीच बाळंतपण भारतात होतात. पण तरीही एकाही भारतीय भाषेत अथवा पारंपारिक शास्त्रात, आयुर्वेदात, याला विशिष्ठ नावच नाही! म्हणजे आजार म्हणून याची ओळख करून घेण्यात आपण कमी पडलो. म्हणजे कसला कसलेला बहुरूपी आहे हा आजार, ते बघा. त्यामुळे माझ्यापुरता मी या आजाराला ‘बाळंतवात’ असा शब्द शोधला आहे आणि आता इथून पुढे योजला आहे.
यात पाचव्याच्या पुढे ब्लडप्रेशर वाढते आणि लघवीतून प्रथिने वाहू लागतात. (पाचव्याच्या आतच हे सगळे घडले तर त्याची कारणे भिन्न असू शकतात.) ब्लडप्रेशरला किती महत्व द्यायचे आणि प्रथिनपाताला किती, हे निकष जरा जरा बदलत असतात. बहुतेकदा हातापायावर सूजही येते. सुजेला पूर्वी महत्व होतं. आता ते तेवढं राहिले नाही. याच्याच टोकाच्या अवस्थेत त्या बाईला झटके येतात. याला म्हणतात ईक्लाम्पशिया. शब्दशः अर्थ वीज पडणे. तडीताघातासारखेच केंव्हाही,  अचानक झटके येऊ लागतात, तेंव्हा ‘बाळंतवात’ हे नाव सार्थच म्हणायचे.
बऱ्याच पेशंटला विशेष काही होत नाही. ब्लडप्रेशर वाढते, सूज येते, प्रथिनपात होत रहातो; पण हे सारं सौम्य प्रमाणात होत रहाते. पुढे डिलिव्हरी होते आणि सारे  बिघाड आपोआप विरून जातात. झाले तर पुन्हा पुढच्या बाळंतपणात होतात.
काही वेळा मात्र बराच बिघाड घडतो पण बराच बिघाड घडूनही पेशंटला काही होत नाही आणि हेच फार त्रासाचे ठरते. काहीही होत नसलेल्या पेशंटला जेंव्हा, ‘तुमचे ब्लडप्रेशर फार जास्त आहे, तुम्ही गंभीररित्या आजारी आहात, ताबडतोब अॅडमिट व्हा’, असे कोणी डॉक्टर सांगतो तेंव्हा अर्थातच पेशंटचा त्यावर विश्वास बसत नाही. पेशंट म्हणतात, ‘असं कसं वाढलं? आम्ही तर तुमच्याकडे पहिल्यापासून तपासतोय!’ मग मी सांगतो, ‘मी तपासतोय आणि व्यवस्थित तपासतोय, म्हणूनच तर ही गोष्ट लक्षात आली. नीट तपासलंच नाही तर ही गोष्ट कळणारच नाही. प्रॉब्लेम वेळीच लक्षात आल्याबद्दल अभिनंदन; माझं!!’  प्रत्येकवेळी बारकाईने तपासत राहणे एवढेच डॉक्टर करू शकतात आणि करतात. आत्ता सगळे काही ठीक आहे, असे म्हणता म्हणता गंभीर दुष्परिणाम घडवणारा असा हा बिलंदर बाळंतवात आहे.
प्रत्यक्षात ज्यावेळी पेशंटला काही व्हायला लागते तेंव्हा गोष्टी फार पुढच्या थराला गेलेल्या असतात. पायावर, शरीरावर, प्रचंड सूज, असह्य डोकेदुखी, उलट्या, दृष्टी मंदावणे, नजरेसमोर लाईट दिसणे, पोटात दुखणे,  अंगावरून रक्तस्राव, झटके येणे... असे काही होणे म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या खुणा. परिस्थिती बिकट होण्याआधी काही पूर्वसंकेत मिळेलच असे नाही.
मुळात बाळंतवाताची लक्षणे आणि दुष्परिणाम जरी पाचव्याच्या पुढे दिसत असले तरी त्याची सुरवात होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात. बाळाकडे भरपूर रक्त जावे म्हणून वारेकडे जाणाऱ्या आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायू गरोदरपणात लोप पावतात. मग ह्या रक्तवाहिन्या मुळी आकुंचनच पावत नाहीत. त्या  अगदी लेवाळ्या होतात. त्यांचा व्यास वाढतो. रक्तप्रवाह कित्येकपट वाढतो. (वाचकांतील इंजिनीअर लोकांना माहितच असेल की नलिकेतील प्रवाह हा थेट व्या  नुसार बदलतो. Flow is directly proportional to r4) आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायुलोप ही बाळाच्या वारेची किमया. वारेच्या पेशी आईच्या रक्तवाहिन्यात घुसून त्यातील स्नायू नष्ट करतात. पण आपल्यात घुसून आईच्या रक्तवाहिन्यांनी स्नायू नष्ट करू दिले तर! म्हणजे इथे जरा समजुतीनी घ्यायचा प्रश्न येतो. अशी समज आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये असते. केंव्हा प्रतिकार करायचा आणि केंव्हा भिडू आत सोडायचा याचे पक्के आराखडे, ठोकताळे असतात. बहुतेक आयांची प्रतिकारशक्ती,  बहुतेक वेळी हे बिनबोभाट होऊ देते. काही वेळा मात्र हे गणित चुकते. मग स्नायू लोप पावण्याची क्रिया होतच नाही.
यामुळे अनेक घोटाळे होतात. स्नायू लोप न झाल्यामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, मग बाळाला रक्त पुरं कसं पडणार? मग ते रोडावते. जसजसा बाळाचा रक्त पुरवठा कमीकमी होतो तसतसे आपोआपच बाळ मिळतंय ते रक्त, नीट जपून वापरायला लागते. मग आहे तो प्रवाह मेंदूकडे वळवला जातो. मग बाळाच्या किडनीकडे रक्त कमी जाते. मग बाळाला शू कमी होते. शू कमी झाल्यामुळे बाळाभोवतीचे पाणी आटते. येस!! बाळाभोवतीचे पाणी म्हणजे बव्हंशी बाळाची शू असते!! हे पाणी आटले की अनेक गोच्या होतात. हातापाय नीट न हलवता आल्यामुळे सांधे आखडतात. हेच पाणी श्वसनाच्या हालचाली बरोबर फुफ्फुसात आतबाहेर होत असते. यामुळे फुफ्फुसाची वाढ होत असते. पाणी कमी असेल तर फुफ्फुसाची वाढ नीट होत नाही. पूर्वी ह्या कशाचाही पत्ता लागायचा नाही. नुसते पोट तपासून काय कळणार? आता सोनोग्राफीच्या तंत्रांनी सगळच बदलले आहे. रक्तप्रवाहाची मोजमापे घेऊन खूप काही समजते. बाळाचे नेमके वय किती? ते सुपोषित आहे का कुपोषित? निव्वळ अन्नाला मोताद आहे, का आता ऑक्सिजन कमी पडल्याने गुदमरले आहे? कलर डॉपलरमध्ये हे सगळे कळते आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.
आईचे ब्लडप्रेशर का वाढते हे नेमके माहित नाही. असं म्हणतात की बाळाकडून आईकडे काही द्रव्ये जातात आणि परिणामी आईला हा त्रास जडतो. ब्लडप्रेशर वाढल्याचा परिणाम आईच्या प्रत्येक अवयवावर होतो. किडनीवर परिणाम झाला की प्रथिनपात होऊ लागतो. याने आईला अशक्तपणा, सूज वगैर मालिका सुरु होते. कधी किडनी बंद पडते. मग डायलिसीसला पर्याय उरत नाही. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात गोच्या होतात. परिणामी झटके येतात किंवा दृष्टी जाते किंवा दोन्ही होते. कधी लिव्हर नीट काम करत नाही. मग तिथली विषारी रसायने साठून रहातात. कावीळ होते. रक्त साकळणे हे लिव्हरवरही अवलंबून असते. मग ती क्रिया मंदावते. कल्पना करा, जर रक्तच साकळले नाही तर प्रसूतीनंतर किती रक्तस्राव होईल? जाईल न ती बाई! नव्हे आजार तीव्र असेल तर जातेच! उत्तम काळजी घेऊनही जाते!!
नेमका कोणाला, केंव्हा, कितव्या महिन्यात त्रास सुरु होईल, हे सांगता येत नाही. ब्लडप्रेशर कोणत्याही महिन्यात वाढू शकते. झटके कोणत्याही महिन्यात येऊ शकतात. अगदी प्रसूतीवेळी किंवा प्रसूतीनंतरसुद्धा, अचानक ब्लडप्रेशर वाढून झटक्यापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. ब्लडप्रेशर कधी वाढेल हे सांगता येत नाही, कुणाचे वाढेल हे सांगता येत नाही, किती वाढेल हे सांगता येत नाही. सांगता फक्त एकच गोष्ट येते...जर ब्लडप्रेशर वाढलं तर प्रसूती हाच उपाय आहे. महिना कुठलाही असो, प्रसूती होताच ब्लडप्रेशर कंट्रोल होते. विश्रांती, अळणी अन्न, प्रथिनयुक्त आहार वगैरेंचा उपयोग एकच, आपण काहीतरी करतोय हे कृतक समाधान. प्रत्यक्षात परिणाम शून्य!  तेंव्हा ‘विश्रांती घ्या’, ह्या सल्याचे पालन तारतम्याने करावे. उगाच गोठ्यात म्हैस बांधल्यासारखे पेशंटला कॉटला बांधून ठेऊ नये!
गोळ्या-औषधांचासुद्धा फारसा उपयोग होत नाही. मग डॉक्टर एवढ्या भारंभार गोळ्या का देतात? डिलिव्हरी होईपर्यंत ब्लडप्रेशर तात्पुरते, पण तात्काळ कमी करण्यासाठी देतात. दिवस भरले नसतील तर प्रसूती थोडी पुढे ढकलता यावी म्हणून देतात. अशावेळी बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर व्हावी म्हणून काही इंजेक्शने दिली जातात, ह्यांचा परिणाम होईपर्यंत ब्लडप्रेशर ताळ्यावर रहावे म्हणून देतात.  गोळ्यांचा उपयोग मर्यादित आहे हे जाणूनच देतात. झटके येऊ नयेत म्हणूनही इंजेक्शने असतात. या दरम्यान डॉक्टर; पेशंट आणि बाळावर सक्त नजर ठेऊन असतात. प्रत्येक वेळी डॉक्टर स्वतःलाच दोन प्रश्न विचारतात. सध्या बाळ पोटात सुरक्षित आहे, का पेटीत? (पेटीत म्हणजे इन्क्युबेटरमध्ये) आणि बाळ पोटात बाळगणे आईसाठी सुरक्षित आहे का? ‘पोटात का पेटीत?’ या प्रश्नाचे उत्तर ‘पेटीत’ असं येईल त्यादिवशी सरळ प्रसूती करण्याच्या मागे लागतात. तो दिवस कधी उगवेल हे सांगता येत नाही. कधीकधी तर परिस्थिती इतकी अस्थिर असते की हा प्रश्न रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारला जातो आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात. एकदा प्रसूती करायची असे ठरले की कळांची औषधे देऊन प्रयत्न करायचा का थेट सीझर हे ही ठरवले जाते.
शिवाय पोटात का पेटीत ह्या प्रश्नाचे उत्तर निव्वळ वैद्यकीय नाहीये. दिवस कमी म्हणजे किती कमी? बाळ अशक्त म्हणजे किती अशक्त? गुदमरलेले म्हणजे किती? अपुऱ्या दिवसाच्या, अशक्त, गुदमरलेल्या बाळाची काळजी घेणारी खास एनआयसीयु जवळ आहेत का? असल्यास अशा ठिकाणी बाळाला ठेवायची तयारी आहे का? बाळ अगदीच लहान असेल तर त्याच्या पुढील वाढीबद्दलची अनिश्चितता कुटुंबियांना माहित आहे ना? आणि मान्य आहे ना? कुटुंबियांची हा सगळा खर्च करायची क्षमता आणि तयारी आहे का? थोडक्यात प्रश्न वित्तीय तर आहेच पण प्रश्न वृत्तीचाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबांगणिक भिन्न असतात. ह्या सगळ्या उत्तरांची गोळाबेरीज करून हा निर्णय कुटुंबीयांनी घ्यायचा आहे. डॉक्टरांनी नाही!! 
आता रंगीत सोनोग्राफीच्या मदतीने बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह मोजता येतो. पुढे तो कमी होणार आहे हे भाकीतही आता वर्तवता येते. शिवाय आईचे रक्त तपासून काही ठोकताळे बांधता येतात. परंतु मॉन्सूनच्या अंदाजाइतकाच हा ही अंदाज  बेभरवशाचा आहे. बाळंतवात उद्भवणे भगवान भरोसे असल्यामुळे, प्रतिबंधक उपायही फारसे नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात, ह्या उक्तीला जागून आम्ही डॉक्टर असे अंदाज बांधत असतो आणि प्रसंगोपात तोंडघशी पडत असतो. तोंडघशी पडत असतो असे म्हटले कारण अंदाज आणि तो चुकणे, ह्याला पेशंटच्या भाषेत थेट निष्काळजीपणा एवढाच शब्द आहे. पण पुढे बीपी वाढणार असा काही सुगावा लागला तर अॅस्पिरीनची अल्प मात्रेतली गोळी देतात. हिपॅरीनची इंजेक्शन देतात. आधीच्या खेपेला बीपी वाढलेल्या बाया, मुळातच आधी बीपी जास्त असणाऱ्या बाया, काही ऑटोइम्यून आजार असलेल्या बाया (SLE), वयस्कर, जाड्या, जुळी/तिळी वगैरे असणाऱ्या बाया, अशा सगळ्या अतिजोखीमवाल्या! ह्यांच्यात बाळंतवाताची बाधा अधिक. औषधांमुळे बीपी वाढणे पूर्णतः टळत नाही पण निदान त्याची तीव्रता कमी रहाते. वाढायचेच झाले तर थोडे उशिरा बीपी वाढते. दरम्यान बाळ आणखी थोडे मोठे झालेले असते.
प्रसुतीनंतर आधी सांगितल्याप्रमाणे ब्लडप्रेशर आटोक्यात येते. अर्थात ते आटोक्यात आहे ना हे तपासावे लागतेच. सहा आठवड्याच्या वर जर ते वाढलेलेच राहिले, तर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तीव्र बाळंतवात झाला असेल तर सुमारे ४०% बायकांना पुढच्या खेपेला पुन्हा हा त्रास जडू शकतो.
तर असा हा बाळंतवात. सगळ्यानाच वात आणणारा आजार आहे. ज्या दिवशी हे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, कोडे उलगडेल तो दिवस आरोग्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल हे निश्चित.


Tuesday, 2 April 2019

आहे मनोहर तरी....


आहे मनोहर तरी गमते उदास...                        
डॉ. शंतनू अभ्यंकर

‘आहे मनोहर तरी गमते उदास’ असे धृवपद असणारी, सारे काही मनोहर असूनही छोटेसे न्यूनहि मनाला उदास करते असे सांगणारी, कवी सरस्वतीकंठाभरण, यांची एक सुंदर कविता आहे. प्रसूतीपश्चात औदासिन्य दाटून आलेली आई बघीतली की मला हमखास ती कविता आठवते, आणि त्याच चालीवर म्हणावेसे वाटते,
माता ममतामूर्त स्वरूप आनंदकंद
विचलित चित्ती किती ये दाटून खंत
तान्हा कान्हा कुशीत परंतु घेरी नैराश्य रास
आहे मनोहर तरी गमते उदास

नुकतीच डिलीव्हरी झाली आहे. सगळीकडून कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. सगळे काही छान चालू आहे, सगळे जिथल्या तिथे आहे. पण ही मात्र अशी उदास आहे. इतकी काळजी करते, कशाची ते कळत नाही, पण करते. काही बोलत नाही. आता बोललेच नाही तर आपल्याला तरी कसे कळणार? तिला अगदी थकून जायला होते, काही करायचा उत्साहच वाटत नाही. स्वतःच तर सोडाच पण  बाळाचंही काहीच करावेसे वाटत नाही. उलट तिला सारखा राग येतो, स्वतःचा, बाळाचा, नवऱ्याचा, सगळ्या जगाचा.
ह्याला म्हणतात ‘पोस्टपार्टम ब्लूज’ (बेबी ब्लूज.) प्रसूतीनंतर उद्भवणारा नैराश्याचा एक प्रकार.
चानक पडलेली नवीन जबाबदारी, बाळाचे करायची अजिबातच सवय नसणे वगैरेमुळे ‘नवजात आई’ जरा वैतागलेली, निराश असते, काळजीत असते, कुढत असते, थकलेली असते. पण माहेरची माया, बाळाचे रुटीन मार्गी लागणे, असे झाले की आठवड्या दोन आठवड्यात हे सारे मळभ भुर्रर्र उडून जाते. ८०% आया ह्या अनुभवातून जातात. बहुतेक सहज निभावून जातात. काहींही उपचार लागत नाहीत. काहींना मात्र नैराश्य ग्रासते. ह्याचेच तीव्र स्वरूप म्हणजे पोस्टपार्टम डिप्रेशन. हे नैराश्य ब्लूजपेक्षा कितीतरी कडक. ती स्त्री मानसिकदृष्ट्या अगदी पंगु बनून जाते.
या मागचे नेमके कारण अज्ञात आहे. एकच एक कारण आहे असेही नाही. शारीरिक आणि भावनिक अशी दोन्ही कारणे आपला प्रभाव दाखवतात. आईनी अमुक एक गोष्ट केली अथवा तमुक एक गोष्ट केली नाही म्हणून हे दुखणे उद्भवते असे नाही. ‘ती उगाचच टेन्शन घेते’, हे लाडके कारणही गैरलागू आहे. तेंव्हा, ‘तू फार टेन्शन घेऊ नकोस!’ अशा छापाच्या सल्याचा काही उपयोग होत नाही. उलट घरच्यांची समंजस साथ इथे मोलाची ठरते. तिची वेगळी वागणूक सगळ्यात आधी त्यांच्याच तर लक्षात येते. तिच्याशी बोलणे, करणे, प्रसंग पडल्यास बाळाची काळजी घेणे, हे तेच तर करू शकतात.
प्रसूतीपश्चात इस्ट्रॉजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी झपकन खाली येते आणि परिणामी मेंदूत हा केमिकल लोच्या होतो असे म्हणतात. शिवाय तान्हे मूल सांभाळता सांभाळता झोपेचे पार खोबरे होऊन जाते. तीन-तीन, चार-चार दिवस झोप तर सोडाच, पण थोडी विश्रांतीही मिळत नाही. यानेही त्रास होतो. हा त्रास तऱ्हेतऱ्हेचा असतो. निराश, दु:खीकष्टी, रितेरिते वाटणे, बारीकसारीक कारणावरून किंवा अगदी विनाकारण रडू येणे, सतत चिंता, किरकिरेपणा, अस्वस्थता, निद्रानाश किंवा अती झोप. विस्मरण, अनिर्णय, लक्ष न लागणे, आवडीचे छंदही नकोसे वाटणे, खाखा सुटणे अथवा भूक मरणे, एकलकोंडेपणा, बाळही नकोसे वाटणे, आणि बाळाला किंवा स्वतःलाच इजा करावीशी वाटणे! अगदी आत्महत्येचे किंवा भ्रूणहत्येचे विचारही मनात डोकावून जातात!! अगदी क्वचित तशी कृतीही घडू शकते!!!
आधीच्या बाळंतपणात असलाच त्रास झालेल्या,  मुळात नैराश्य अथवा काही ना काही मानसिक आजार असलेल्या, घरात कुणाला असा त्रास असलेल्यांना याची बाधा होण्याची शक्यता अधिक. अशांनी ही बाब मुळीच लपवू नये. आधीच कल्पना असेल तर यांना प्रसूती नंतर लगेचच औषधे सुरु करता येतात. नेमका याच काळात, नोकरी जाणे, कोणी जवळचे माणूस दगावणे असा काही आर्थिक किंवा वैयक्तिक फटका बसला किंवा कमी दिवसाची होणे, सव्यंग मूल होणे, असे काही धक्कादायक घडले तर आधीच दोलायमान असलेली मनःस्थिती पूर्ण ढासळते. बरेचदा गरोदरपण नकोसे असते. असल्या लादलेल्या मातृत्वात मन रमत नाही. अशा परिस्थितीत सौभाग्यवतींना नवऱ्याची भक्कम साथ असणे खूप भाग्याचे.
बाहेरची बाधा, दृष्ट लागणे, करणी अशी कारणे आपोआपच चिकटवली जातात. सगळे काही सुरळीत असताना हे अचानक असे झाले की मन धास्तावलेले असते. मग इथेच बाबा-बुवांचे फावते. अर्थात गरजेच्या मानानी मानसोपचार तज्ञ कमी आहेत हे ही ह्या हतबलतेमागचे कारण आहे. पण दीर्घकालीन नुकसान टाळायचे असेल तर  योग्य उपचार घेणे केंव्हाही चांगले.
सुदैवाने या आजारावर प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मानसतज्ञ काही मार्गदर्शन करतात, बोलतात, समजावून सांगतात, मनातले नकारात्मक विचार ओळखायला आणि बदलायला शिकवतात (Cognitive Behavioral Therapy). नातेसंबंध सुधारायला शिकवतात. हे सगळं करता येतं. पेशंटला खूप आराम वाटतो.
स्वभावाला औषध असतं! नैराश्य निवारक औषधे असतात. काही आठवडेतरी घ्यावी लागतात. अंगावरच्या दुधातून यातील काही अंश बाळापर्यंत पोहोचू शकतो तेंव्हा हा सगळा विचार करूनच औषधे दिली जातात. त्यामुळे जी दिली जातील ती घेतलीही जातील हे बघणे आवश्यक आहे. बरे वाटल्यावर पुढे सहा महिने तरी औषधे घ्यावी लागतात. आता बरं वाटतय, आता कशाला औषध, असा विचार करू नये कारण औषधे नीट घेतली नाहीत तर नैराश्य राशीला बसते. काही महिने किंवा काही वर्षसुद्धा ते टिकते. ती स्त्री आपल्या मुलाची नीट काळजी घेऊ शकत नाही. मग बाळाचीही सगळी आबाळ होते. मोठे होता होता त्याच्या वर्तनात अनेक दोष उत्पन्न होतात.
ज्यांना ज्यांना मानसतज्ञांची मदत लागते ते सगळे ठार वेडे असतात, अशा भ्रमात राहू नये. सर्दी झाली की आपण डॉक्टरकडे जातो आणि लवकर बरे होतो. तसेच मन कधीकधी  ‘दर्दी’ होते. डॉक्टरी मदतीने आपण लवकर बरे होऊ शकतो. खुले आम मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी. उलट तसे जाहीरपणे सांगावे. मोकळेपणी सांगाल तर या भोवतीचा नसता संकोच आणि फाजील आडपडदा दूर व्हायला मदत होईल. इतर कुणाला अशा मदतीची गरज असेल तर त्यांची भीड चेपेल. समाज मनमोकळा होईल. अशा प्रश्नात(ही), ‘इसे दुवा की नही दवाकी जरुरत है’ हेच खरे.