Showing posts with label गरोदरपण. Show all posts
Showing posts with label गरोदरपण. Show all posts

Wednesday, 13 May 2020

ज्युलिअस आणि सीझर

ज्युलिअस आणि सीझर

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

ज्युलिअसही सीझर आणि ते जगप्रसिद्ध ऑपरेशनही सीझर; मग त्यांचा एकमेकांची संबंध असावा काय? दंतकथा फक्त उपलब्ध आहेत. या ज्युलिअस सीझरच्या कोण्या बापजाद्याचा जन्म ‘सीझर’ने झाला होता. म्हणून याला त्या आज्याचं नाव ठेवलं म्हणे. आणि म्हणूनच ऑपरेशनचे नावही सीझर.  काही असंही सांगतात की याचा स्वतःचाच जन्म मुळी यौनमार्गे न होता,  उदरमार्गे झाला होता. पण कोणीच यावर विश्वास ठेवत नाही. कारण असं की याची आई पुढे बरीच वर्ष हयात असल्याचा पुरावा आहे!! ज्या बाईचे पोट फाडून बाळ जन्माला आलंय, अशी जननी तात्काळ जन्मभूमीत  चिरनिद्रा घेत असे.  असा तो काळ होता. पोट फाडून बाळ काढलं तर आई मरायलाच हवी! ...आणि ज्युलिअस सीझरची आई तर पुढे बराच काळ होती, म्हणजे ज्युलिअसचा जन्म सीझरद्वारे झालेला नाही!!

इतक्या टोकाच्या परिस्थितीत हे ऑपरेशन केलं जायचं. अर्थात निर्जंतुकीकरण, भूल, प्रतिजैविके, रक्त वगैरे काही काही नसताना दुसरं काय होणार? सगळं काही राम भरोसे. किंवा जो कोणी तारणहार देव किंवा संत  असेल त्याच्या भरोसे. आपल्याकडे जशा धनाची, धान्याची, शक्तीची, युक्तीची अशा वेगवेगळ्या देवता आहेत तसे ख्रिश्चन धर्मात विविध संत आहेत. फक्त आकाशातल्या एकट्यादुकट्या  बापावर त्यांचेही भागत नाहीच.  संत सीझेरीअस  नामे निव्वळ सिझरवेळी आळवायचा खास संत आहे. याला नमोनमः केल्याने सीझर सुखरूप पार पडते म्हणतात. 

उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता जुन्यापुराण्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. पुढे आई मरायला टेकली आहे किंवा मेलीच आहे  आणि बाळ मात्र तग धरून आहे अशा वेळी हा प्रकार केला जायचा. एक अखेरचा प्रयत्न फक्त.  हे नेमकं कसं करावं याचं तंत्रही सर्वज्ञात नव्हते. कसे असेल? मेडिकल कॉलेज वगैरे काही नव्हते त्यावेळी. काही  धाडसी, उत्साही महाभाग काळजावर दगड ठेउनच हे काम उरकायचे. पोट फाडा, बाळ काढा आणि पोट शिवा अशा तीनच पायऱ्यांचे हे ऑपरेशन. पोट उघडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत; थराखाली थर उघडत जाणे, कमीतकमी रक्तवाहिन्या आडव्या येतील अशा मार्गाने आत शिरणे; वगैरे प्रकार नंतर आले. पोट शिवायचे तेही दाभणाने! भूलबील नव्हतीच. ती बाई इतकी अर्धमेली झालेली असायची की मुळात तीच अर्धवट बेशुद्धावस्थेत असायची. मग वेगळी भूल कशाला? टाके घालून फक्त पोटाची त्वचा शिवली जायची. याहून अधिक काही शिवायला वेळही नसायचा आणि काळ तर शेजारीच आ वासून उभा असायचा. टाकेही केवळ बाहेर घातले जात. कारण आत टाके घातले तर काढायचे कसे हा प्रश्न होता. आज आम्ही सीझर करताना आठ थर उघडतो आणि तितकेच पुन्हा शिवून टाकतो! आमच्या हाताशी पोटातल्या पोटात विरघळणारे धागेदोरे आहेत. आमचे पूर्वसुरी सुताचे किंवा तागाचे धागे वापरत. सगळे टाके कुजत. पण गर्भपिशवी टाके न घालता तशीच सोडून दिली तर आतल्या आत प्रचंड रक्तस्राव व्हायचा. हे  टाळण्यासाठी एद्युअर्दो पोरोनी  तर थेट पिशवीच छाटून टाकायचा प्रयोगही करून पहिला. पण व्यर्थ.  यातून ती निभावून गेलीच तर जखमांत पू व्हायचा.  आधीच अर्धमेली झालेली ती यात बहुतेकदा पूर्ण मरायची. पुढे केहरर आणि सँगर प्रभृतींनी पिशवीला टाके घालायचे तंत्र विकसित केले आणि जरा जास्त बायका जगायला लागल्या.

ही शस्त्रक्रिया काही फक्त युरोपमधले हुशार लोकंच करत होते असं नाही. पण युरोपमधल्या हुशार लोकांचा तसा गैरसमज मात्र होता. अगदी आफ्रिकेतील आदिम जमातींनीसुद्धा असे प्रयत्न केल्याचे पुरावे आहेत. अर्थात अपयशाची रड सगळीकडे सारखीच. सीझरविषयक भारतीय दंतकथाही आहे. ‘प्लॅस्टिक सर्जरी’चा शोध आपल्याला लागल्याचा पुरावा आहेच; त्यापुढे सीझरची काय कथा?  चंद्रगुप्ताचा मुलगा, बिंदुसाराचा जन्म म्हणे उदरभेद पद्धतीने झाला होता आणि हे कर्म उरकलं होतं, भेदनीतीचा जनक आर्य चाणक्याने; असं म्हणतात. बिंदुसाराच्या आईने, दुर्धरेने एकदा पतीच्या पानातील अन्न खाल्ले. चंद्रगुप्ताला कोणतीही विषबाधा होऊ नये म्हणून चाणक्य म्हणे त्याच्या अन्नात रोज थोडं थोडं विष कालवायचा. हळू हळू चंद्रगुप्त जास्त जास्त विष विनासायास पचवू लागला. दुर्धरेला याचा पत्ताच नव्हता. त्यामुळे तिला बिचारीला ते विष बाधलं आणि पार मरणपंथाला लागली ती. नेमकं चाणक्याने हे पाहिलं आणि काय होतंय ते त्या चाणाक्षाच्या लगेचच लक्षात आलं. तात्काळ त्याने पोट फाडून बिंदुसाराला आईवेगळे केले. दुर्धरा गेली पण बिंदुसार वाचला! अशीच काहीशी कथा इराणचा पुराणपुरुष रुस्तम याच्याही बद्दल आहे. आयर्लंडच्या उलस्टर पुराणात फारबीद फरबेंड बद्दलही आहे. ज्यूंच्या ‘ताल्मूद’ या प्राचीन ग्रंथातही आहे. इतकंच कशाला, ‘एलिअन व्हर्सेस प्रीडेटर’ या आधुनिक पुराणात तर ‘एलिअन’ बीज आईच्या तोंडातून पोटात जातं, काही क्षणात वाढतं आणि आणि पोट फाडून जन्म घेतं!! बघावा तो महापुरुष आपला आईचे पोट फाडूनच अवनीवर अवतार घेता झालेला दिसतो. पूर्वीपेक्षा आता सीझरचं प्रमाण कितीतरी वाढलं आहे पण महापुरुषांचे प्रमाण काही तितकेसे वाढलेले दिसत नाही.

स्विझरलँण्डमधील जेकब न्युफरची बायको यातून बचावल्याची नोंद आहे. जगलेली आणि आपल्याला ज्ञात असलेली ही पहिली. हिच्या पतीनीच ऐनवेळी सीझर करून हिला सोडवली. तो होता डुक्कर-कसाई. त्यामुळे त्याला शरीररचनेचं थोडंबहुत ज्ञान होतं, म्हणून त्याच्या हातून जरा सबुरीनी, निटसपणे  आणि नेकीनी  ते ऑपरेशन झालं असावं आणि म्हणून सौ. न्युफर वाचली; असा आपला एक तर्क. नाहीतर जेकबवर ‘विधुरव्या’ची कुऱ्हाड कोसळलीच असती. वराह विच्छेदनात तरबेज असल्यामुळे त्याला बाईचे अंतरंग कळले असं मी सुचवलंय खरं, पण कुणी राग मानू नये. सर्व सस्तन प्राण्यांची शरीररचना साधारण एकसारखीच असते, एवढंच सुचवायचंय मला. नाहीतर ती बाई वाचलीच कशी हा प्रश्न निरुत्तर करणारा! पण ही बाई नुसती वाचलीच नाही तर पुढे पाच पोरांना जन्म दिला तिनी. धन्य ती बाई आणि धन्य तिची ती कूस!!

पुढे शरीररचनेच्या अभ्यासासाठी  शवविच्छेदन युरोपमान्य झालं आणि स्वतःच्या शरीराची ओळख झाली माणसाला. भुलीच्या शोधानी तर क्रांतीच केली. त्यामुळे उदरभेद, गर्भाशय छेद, प्रसूती आणि सर्व थरांना टाके घालत घालत ऑपरेशनची सांगता हे सारं शक्य झालं. हातपाय झाडत किंचाळणाऱ्या बाईचे सीझर करणे किती  कठीण असेल याची कल्पनाच केलेली बरी.

पण कल्पना कशाला, त्या काळच्या सर्जरीची  दारूण परिस्थिती अनेकांनी लिहून ठेवली आहे. पायाला गॅस-गँग्रीन झालं म्हणून एका माणसाचा पाय तोडायचा होता. नाहीतर तो शंभर टक्के मरणार. चौकात हीsss गर्दी जमली. चिक्क्क्कार दारू पाजून त्या माणसाला ‘आउट’ करण्यात आलं. आपली कुऱ्हाड परजत मग सर्जन आले. सिंहाच्या काळजाच्या  चार माणसांनी त्या माणसाला, आपल्या पोलादी पंजांनी जखडून ठेवलं आणि पहाणाऱ्या गर्दीच्या डोळ्याचे पाते लवते न लवते, तोच एका घावात त्याच्या पायाचे दोन तुकडे केले गेले. पण त्या माणसाला धोधो रक्तस्राव झाला आणि तो तिथल्यातिथे गेला! हे पाहून गर्दीतला एकजण भोवळ येऊन पडला आणि तत्काळ गतप्राण झाला आणि ह्या कुऱ्हाडीचे पाते कुणा असिस्टंटास चाटून गेल्याने पुढे गॅस-गँग्रीन होऊन तोही मेला!! एकाच ऑपरेशनचा ३००% मृत्यूदर झाला की हा!!!  थोडक्यात रम्य भूतकाळाच्या नावाने, ‘गेले ते दिन गेले’ असे उसासे टाकणाऱ्यांनी स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करावा. असो.

अगदी १८७० पर्यंत ही शस्त्रक्रिया अंदाजानी केली जायची, तंत्रशुद्ध अशी तत्वे अजून ठरायची होती. बेंबीपासून खाली पोट उभे उघडून, गर्भपिशवीही उभीच छेदली जायची. आता दोन्ही छेद आडवे असतात. हे जरा करायला किचकट आहे पण उभे चिरण्यापेक्षा य पटींनी सुरक्षित आहे. जोसेफ लिस्टरनी ऑपरेशन निर्जंतुकपणे करण्याचा तंत्र आणि मंत्र दिला (१८८०). सीझरनंतर, एकूणच ऑपरेशननंतर, जगण्यावाचण्याची शक्यता एकदम वाढली. पुढे ऑक्सिटोसीन उपलब्ध झाले (१९५१) आणि रक्तस्रावाचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागला. ऑक्सिटोसीन हे एक संप्रेरक (होर्मोन) आहे. याच्या उपस्थितीत गर्भपिशवी आकुंचन पावते. पिशवी घट्ट आवळली जाणे रक्तस्राव थांबण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. नुसते टाके घालून रक्तस्राव थांबत नाही. हे इंजेक्शन आता सीझरवेळी आणि नॉर्मल डिलिव्हरीवेळी सुद्धा सर्रास वापरले जाते. हे इंजेक्शन नसते तर तिन्ही जगाचे कित्येक स्वामी आईविना भिकारीच निपजले असते. रक्तस्राव कमी करण्यात भुलीच्या तंत्राचा मोठा वाटा आहे.  सुरवातीला भूलीसाठी क्लोरोफोर्म वापरत. ही काही आदर्श भूलौषधी नाही. पण तेंव्हा तेवढीच उपलब्ध होती. अगदी महाराणी व्हिक्टोरियानेसुद्धा, राजपुत्र लिओपोल्डच्या जन्मावेळी (१८५३), वेदनाशामक म्हणून मोठ्या धीरोदात्तपणे  क्लोरोफोर्म हुंगून आपल्या प्रजाजनांसमोर आदर्श घालून दिला. तिच्या ह्या कृत्यानंतर इंग्लंडात भुलीचा वापर झटक्यात वाढला.  पण क्लोरोफोर्मने गर्भपिशवी नीट आकुंचन पावत नाही. उलट प्रसरण पावते. आता स्पायनल किंवा एपीड्युरल पद्धतीनी भूल दिली जाते. यात पेशंट जागी असते पण कमरेखालचा भाग बधीर होतो. संपूर्ण भूल देण्यापेक्षा आईसाठी आणि बाळासाठी ही पद्धत खूप खूप सुरक्षित आहे. अँन्टीबायोटिक्सच्या शोधानंतर, रक्त संक्रमण उपलब्ध झाल्यानंतर आणि काही तांत्रिक बदल झाल्याने; आता हे ऑपरेशन इतके सुरक्षित झाले आहे की नॉर्मल डिलिव्हरी शक्य असतानाही ठरवून सीझर करवून घेणारी कुटुंबे आहेत.

बाळ पोटात जर उपाशी, अशक्त, आजारी, गुदमरलेले, अॅनिमिक वगैरे असेल तर हा शोध आता सोनोग्राफी आणि अन्य तंत्रांनी खूप लवकर लागतो आणि वेळीच सीझर करून बाळावर पुढील उपचार सुरु करता येतात. तीस एक  वर्षांपूर्वी हे असलं काही नव्हतं. बाईच्या पोटावरून हाताने चाचपून काय शोध लागेल तेवढाच. पोटात गर्भपिशवी, पिशवीत पाणी आणि पाण्यात तरंगणारे  बाळ; तेंव्हा ढेरी   कुरवाळण्याने काय आणि किती माहिती मिळत  असेल,  तुम्हीच कल्पना करा.   म्हणूनच सुरवात जरी आईचा जीव वाचवण्यासाठी म्हणून झाली असली तरी हल्ली हे ऑपरेशन बाळाच्या काळजीपोटी अधिक वेळा केलं जातं. वेळेत निदान आणि सुरक्षित जन्म झाल्याने अनेक बाळांचं मोठेपणही आरोग्यानंदात जातं. इहलोकीची यात्रा ही, प्रस्थान नीट ठेवले, की निदान सुरवात तरी छान होते.

एकाच कृतीमागील हेतू किती बदलतात बघा. उदरी बाळ तसेच असताना दोघांना एकदम माती देऊ नये असा संकेत होता, जुन्या काळात. त्यातून पोट फाडून बाळ काढायला सुरवात झाली. म्हणजे परलोकीचे व्यवहार सुरळीत व्हावेत म्हणून हा आटापिटा. पण आता मात्र याच आट्यापिट्याने इहलोकीचे आयुष्य सुकर होते आहे.

 

 

 

 

 


Thursday, 25 April 2019

गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया


गरोदर बाईतला कम्युनिस्ट रशिया
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
रशियात कट्टर कम्युनिस्ट राजवट होती. पोलादी पडदा होता. त्यामुळे काहीही कळणे मुश्कील. अशा रशियाचे  वर्णन चर्चिल सायबाने आपल्या तिरकस ब्रिटीश शैलीत करून ठेवले आहे. रशिया म्हणजे एका रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे! (It is a riddle, wrapped in a mystery, inside an enigma.) थोडक्यात रशियाबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही नाही.
गरोदरपणी होणारा असाच एक आजार आहे. ज्याबद्दल आम्हाला काहीही माहित नाही आणि काही माहित होण्याची शक्यताही सध्या धूसर आहे. हा आजार म्हणजे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, एक कोडे आहे!  एरवी माझ्यासकट तमाम डॉक्टर, ही नाहीतर ती, अशी काहीतरी माहिती सांगायला, हिरीरीने  लिहित असतात. पण आज मी काहीही माहित नाही हे सांगायला लिहितो आहे. उद्या जर, ‘कोणता शोध लागला तर हमखास नोबेल मिळेल?’ असे विचारले,  तर ह्या रोगाच्या कारणांचा शोध लावेल त्याला/तिला तो नक्की मिळेल यावर साऱ्या डॉक्टरांचे एक मत होईल. हा आजार दहातल्या एका तरी गरोदर स्त्रीला होतो. 
याला म्हणतात पीआयएच (Pregnancy Induced Hypertension). इतरही नावे आहेत. पण आपल्या पुरते हे एकच पुरे. जगातल्या एकूण बाळंतपणांपैकी बरीच बाळंतपण भारतात होतात. पण तरीही एकाही भारतीय भाषेत अथवा पारंपारिक शास्त्रात, आयुर्वेदात, याला विशिष्ठ नावच नाही! म्हणजे आजार म्हणून याची ओळख करून घेण्यात आपण कमी पडलो. म्हणजे कसला कसलेला बहुरूपी आहे हा आजार, ते बघा. त्यामुळे माझ्यापुरता मी या आजाराला ‘बाळंतवात’ असा शब्द शोधला आहे आणि आता इथून पुढे योजला आहे.
यात पाचव्याच्या पुढे ब्लडप्रेशर वाढते आणि लघवीतून प्रथिने वाहू लागतात. (पाचव्याच्या आतच हे सगळे घडले तर त्याची कारणे भिन्न असू शकतात.) ब्लडप्रेशरला किती महत्व द्यायचे आणि प्रथिनपाताला किती, हे निकष जरा जरा बदलत असतात. बहुतेकदा हातापायावर सूजही येते. सुजेला पूर्वी महत्व होतं. आता ते तेवढं राहिले नाही. याच्याच टोकाच्या अवस्थेत त्या बाईला झटके येतात. याला म्हणतात ईक्लाम्पशिया. शब्दशः अर्थ वीज पडणे. तडीताघातासारखेच केंव्हाही,  अचानक झटके येऊ लागतात, तेंव्हा ‘बाळंतवात’ हे नाव सार्थच म्हणायचे.
बऱ्याच पेशंटला विशेष काही होत नाही. ब्लडप्रेशर वाढते, सूज येते, प्रथिनपात होत रहातो; पण हे सारं सौम्य प्रमाणात होत रहाते. पुढे डिलिव्हरी होते आणि सारे  बिघाड आपोआप विरून जातात. झाले तर पुन्हा पुढच्या बाळंतपणात होतात.
काही वेळा मात्र बराच बिघाड घडतो पण बराच बिघाड घडूनही पेशंटला काही होत नाही आणि हेच फार त्रासाचे ठरते. काहीही होत नसलेल्या पेशंटला जेंव्हा, ‘तुमचे ब्लडप्रेशर फार जास्त आहे, तुम्ही गंभीररित्या आजारी आहात, ताबडतोब अॅडमिट व्हा’, असे कोणी डॉक्टर सांगतो तेंव्हा अर्थातच पेशंटचा त्यावर विश्वास बसत नाही. पेशंट म्हणतात, ‘असं कसं वाढलं? आम्ही तर तुमच्याकडे पहिल्यापासून तपासतोय!’ मग मी सांगतो, ‘मी तपासतोय आणि व्यवस्थित तपासतोय, म्हणूनच तर ही गोष्ट लक्षात आली. नीट तपासलंच नाही तर ही गोष्ट कळणारच नाही. प्रॉब्लेम वेळीच लक्षात आल्याबद्दल अभिनंदन; माझं!!’  प्रत्येकवेळी बारकाईने तपासत राहणे एवढेच डॉक्टर करू शकतात आणि करतात. आत्ता सगळे काही ठीक आहे, असे म्हणता म्हणता गंभीर दुष्परिणाम घडवणारा असा हा बिलंदर बाळंतवात आहे.
प्रत्यक्षात ज्यावेळी पेशंटला काही व्हायला लागते तेंव्हा गोष्टी फार पुढच्या थराला गेलेल्या असतात. पायावर, शरीरावर, प्रचंड सूज, असह्य डोकेदुखी, उलट्या, दृष्टी मंदावणे, नजरेसमोर लाईट दिसणे, पोटात दुखणे,  अंगावरून रक्तस्राव, झटके येणे... असे काही होणे म्हणजे परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याच्या खुणा. परिस्थिती बिकट होण्याआधी काही पूर्वसंकेत मिळेलच असे नाही.
मुळात बाळंतवाताची लक्षणे आणि दुष्परिणाम जरी पाचव्याच्या पुढे दिसत असले तरी त्याची सुरवात होते अगदी दुसऱ्या तिसऱ्या महिन्यात. बाळाकडे भरपूर रक्त जावे म्हणून वारेकडे जाणाऱ्या आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायू गरोदरपणात लोप पावतात. मग ह्या रक्तवाहिन्या मुळी आकुंचनच पावत नाहीत. त्या  अगदी लेवाळ्या होतात. त्यांचा व्यास वाढतो. रक्तप्रवाह कित्येकपट वाढतो. (वाचकांतील इंजिनीअर लोकांना माहितच असेल की नलिकेतील प्रवाह हा थेट व्या  नुसार बदलतो. Flow is directly proportional to r4) आईच्या रक्तवाहिन्यातील स्नायुलोप ही बाळाच्या वारेची किमया. वारेच्या पेशी आईच्या रक्तवाहिन्यात घुसून त्यातील स्नायू नष्ट करतात. पण आपल्यात घुसून आईच्या रक्तवाहिन्यांनी स्नायू नष्ट करू दिले तर! म्हणजे इथे जरा समजुतीनी घ्यायचा प्रश्न येतो. अशी समज आपल्या प्रतिकारशक्तीमध्ये असते. केंव्हा प्रतिकार करायचा आणि केंव्हा भिडू आत सोडायचा याचे पक्के आराखडे, ठोकताळे असतात. बहुतेक आयांची प्रतिकारशक्ती,  बहुतेक वेळी हे बिनबोभाट होऊ देते. काही वेळा मात्र हे गणित चुकते. मग स्नायू लोप पावण्याची क्रिया होतच नाही.
यामुळे अनेक घोटाळे होतात. स्नायू लोप न झाल्यामुळे या रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, मग बाळाला रक्त पुरं कसं पडणार? मग ते रोडावते. जसजसा बाळाचा रक्त पुरवठा कमीकमी होतो तसतसे आपोआपच बाळ मिळतंय ते रक्त, नीट जपून वापरायला लागते. मग आहे तो प्रवाह मेंदूकडे वळवला जातो. मग बाळाच्या किडनीकडे रक्त कमी जाते. मग बाळाला शू कमी होते. शू कमी झाल्यामुळे बाळाभोवतीचे पाणी आटते. येस!! बाळाभोवतीचे पाणी म्हणजे बव्हंशी बाळाची शू असते!! हे पाणी आटले की अनेक गोच्या होतात. हातापाय नीट न हलवता आल्यामुळे सांधे आखडतात. हेच पाणी श्वसनाच्या हालचाली बरोबर फुफ्फुसात आतबाहेर होत असते. यामुळे फुफ्फुसाची वाढ होत असते. पाणी कमी असेल तर फुफ्फुसाची वाढ नीट होत नाही. पूर्वी ह्या कशाचाही पत्ता लागायचा नाही. नुसते पोट तपासून काय कळणार? आता सोनोग्राफीच्या तंत्रांनी सगळच बदलले आहे. रक्तप्रवाहाची मोजमापे घेऊन खूप काही समजते. बाळाचे नेमके वय किती? ते सुपोषित आहे का कुपोषित? निव्वळ अन्नाला मोताद आहे, का आता ऑक्सिजन कमी पडल्याने गुदमरले आहे? कलर डॉपलरमध्ये हे सगळे कळते आणि त्यानुसार निर्णय घेता येतो.
आईचे ब्लडप्रेशर का वाढते हे नेमके माहित नाही. असं म्हणतात की बाळाकडून आईकडे काही द्रव्ये जातात आणि परिणामी आईला हा त्रास जडतो. ब्लडप्रेशर वाढल्याचा परिणाम आईच्या प्रत्येक अवयवावर होतो. किडनीवर परिणाम झाला की प्रथिनपात होऊ लागतो. याने आईला अशक्तपणा, सूज वगैर मालिका सुरु होते. कधी किडनी बंद पडते. मग डायलिसीसला पर्याय उरत नाही. मेंदूच्या रक्तपुरवठ्यात गोच्या होतात. परिणामी झटके येतात किंवा दृष्टी जाते किंवा दोन्ही होते. कधी लिव्हर नीट काम करत नाही. मग तिथली विषारी रसायने साठून रहातात. कावीळ होते. रक्त साकळणे हे लिव्हरवरही अवलंबून असते. मग ती क्रिया मंदावते. कल्पना करा, जर रक्तच साकळले नाही तर प्रसूतीनंतर किती रक्तस्राव होईल? जाईल न ती बाई! नव्हे आजार तीव्र असेल तर जातेच! उत्तम काळजी घेऊनही जाते!!
नेमका कोणाला, केंव्हा, कितव्या महिन्यात त्रास सुरु होईल, हे सांगता येत नाही. ब्लडप्रेशर कोणत्याही महिन्यात वाढू शकते. झटके कोणत्याही महिन्यात येऊ शकतात. अगदी प्रसूतीवेळी किंवा प्रसूतीनंतरसुद्धा, अचानक ब्लडप्रेशर वाढून झटक्यापर्यंत गोष्टी जाऊ शकतात. ब्लडप्रेशर कधी वाढेल हे सांगता येत नाही, कुणाचे वाढेल हे सांगता येत नाही, किती वाढेल हे सांगता येत नाही. सांगता फक्त एकच गोष्ट येते...जर ब्लडप्रेशर वाढलं तर प्रसूती हाच उपाय आहे. महिना कुठलाही असो, प्रसूती होताच ब्लडप्रेशर कंट्रोल होते. विश्रांती, अळणी अन्न, प्रथिनयुक्त आहार वगैरेंचा उपयोग एकच, आपण काहीतरी करतोय हे कृतक समाधान. प्रत्यक्षात परिणाम शून्य!  तेंव्हा ‘विश्रांती घ्या’, ह्या सल्याचे पालन तारतम्याने करावे. उगाच गोठ्यात म्हैस बांधल्यासारखे पेशंटला कॉटला बांधून ठेऊ नये!
गोळ्या-औषधांचासुद्धा फारसा उपयोग होत नाही. मग डॉक्टर एवढ्या भारंभार गोळ्या का देतात? डिलिव्हरी होईपर्यंत ब्लडप्रेशर तात्पुरते, पण तात्काळ कमी करण्यासाठी देतात. दिवस भरले नसतील तर प्रसूती थोडी पुढे ढकलता यावी म्हणून देतात. अशावेळी बाळाच्या फुफ्फुसांची वाढ लवकर व्हावी म्हणून काही इंजेक्शने दिली जातात, ह्यांचा परिणाम होईपर्यंत ब्लडप्रेशर ताळ्यावर रहावे म्हणून देतात.  गोळ्यांचा उपयोग मर्यादित आहे हे जाणूनच देतात. झटके येऊ नयेत म्हणूनही इंजेक्शने असतात. या दरम्यान डॉक्टर; पेशंट आणि बाळावर सक्त नजर ठेऊन असतात. प्रत्येक वेळी डॉक्टर स्वतःलाच दोन प्रश्न विचारतात. सध्या बाळ पोटात सुरक्षित आहे, का पेटीत? (पेटीत म्हणजे इन्क्युबेटरमध्ये) आणि बाळ पोटात बाळगणे आईसाठी सुरक्षित आहे का? ‘पोटात का पेटीत?’ या प्रश्नाचे उत्तर ‘पेटीत’ असं येईल त्यादिवशी सरळ प्रसूती करण्याच्या मागे लागतात. तो दिवस कधी उगवेल हे सांगता येत नाही. कधीकधी तर परिस्थिती इतकी अस्थिर असते की हा प्रश्न रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ विचारला जातो आणि त्यानुसार उपचार ठरवले जातात. एकदा प्रसूती करायची असे ठरले की कळांची औषधे देऊन प्रयत्न करायचा का थेट सीझर हे ही ठरवले जाते.
शिवाय पोटात का पेटीत ह्या प्रश्नाचे उत्तर निव्वळ वैद्यकीय नाहीये. दिवस कमी म्हणजे किती कमी? बाळ अशक्त म्हणजे किती अशक्त? गुदमरलेले म्हणजे किती? अपुऱ्या दिवसाच्या, अशक्त, गुदमरलेल्या बाळाची काळजी घेणारी खास एनआयसीयु जवळ आहेत का? असल्यास अशा ठिकाणी बाळाला ठेवायची तयारी आहे का? बाळ अगदीच लहान असेल तर त्याच्या पुढील वाढीबद्दलची अनिश्चितता कुटुंबियांना माहित आहे ना? आणि मान्य आहे ना? कुटुंबियांची हा सगळा खर्च करायची क्षमता आणि तयारी आहे का? थोडक्यात प्रश्न वित्तीय तर आहेच पण प्रश्न वृत्तीचाही आहे. ह्या दोन्ही गोष्टी कुटुंबांगणिक भिन्न असतात. ह्या सगळ्या उत्तरांची गोळाबेरीज करून हा निर्णय कुटुंबीयांनी घ्यायचा आहे. डॉक्टरांनी नाही!! 
आता रंगीत सोनोग्राफीच्या मदतीने बाळाकडे जाणारा रक्तप्रवाह मोजता येतो. पुढे तो कमी होणार आहे हे भाकीतही आता वर्तवता येते. शिवाय आईचे रक्त तपासून काही ठोकताळे बांधता येतात. परंतु मॉन्सूनच्या अंदाजाइतकाच हा ही अंदाज  बेभरवशाचा आहे. बाळंतवात उद्भवणे भगवान भरोसे असल्यामुळे, प्रतिबंधक उपायही फारसे नाहीत. पण तुका म्हणे त्यातल्या त्यात, ह्या उक्तीला जागून आम्ही डॉक्टर असे अंदाज बांधत असतो आणि प्रसंगोपात तोंडघशी पडत असतो. तोंडघशी पडत असतो असे म्हटले कारण अंदाज आणि तो चुकणे, ह्याला पेशंटच्या भाषेत थेट निष्काळजीपणा एवढाच शब्द आहे. पण पुढे बीपी वाढणार असा काही सुगावा लागला तर अॅस्पिरीनची अल्प मात्रेतली गोळी देतात. हिपॅरीनची इंजेक्शन देतात. आधीच्या खेपेला बीपी वाढलेल्या बाया, मुळातच आधी बीपी जास्त असणाऱ्या बाया, काही ऑटोइम्यून आजार असलेल्या बाया (SLE), वयस्कर, जाड्या, जुळी/तिळी वगैरे असणाऱ्या बाया, अशा सगळ्या अतिजोखीमवाल्या! ह्यांच्यात बाळंतवाताची बाधा अधिक. औषधांमुळे बीपी वाढणे पूर्णतः टळत नाही पण निदान त्याची तीव्रता कमी रहाते. वाढायचेच झाले तर थोडे उशिरा बीपी वाढते. दरम्यान बाळ आणखी थोडे मोठे झालेले असते.
प्रसुतीनंतर आधी सांगितल्याप्रमाणे ब्लडप्रेशर आटोक्यात येते. अर्थात ते आटोक्यात आहे ना हे तपासावे लागतेच. सहा आठवड्याच्या वर जर ते वाढलेलेच राहिले, तर पुढील तपासण्या कराव्या लागतात. तीव्र बाळंतवात झाला असेल तर सुमारे ४०% बायकांना पुढच्या खेपेला पुन्हा हा त्रास जडू शकतो.
तर असा हा बाळंतवात. सगळ्यानाच वात आणणारा आजार आहे. ज्या दिवशी हे रहस्याच्या पोटात दडलेले, गूढात लपेटलेले, कोडे उलगडेल तो दिवस आरोग्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल हे निश्चित.


Saturday, 14 October 2017

प्रेग्नन्सी आणि सेक्स

प्रेग्नन्सी आणि सेक्स
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२० १०३४९

दिवस राहिले की नेहेमीच विचारायला हवा आणि क्वचितच विचारला  जाणारा प्रश्न म्हणजे; ‘आता शरीर संबंध आले तर चालतील का?’ हा प्रश्न मनात असतो, ओठापर्यंत येतो पण बाहेर मात्र क्वचितच पडतो; मात्र खचितच पडायला हवा.
पण एखादयाने विचारला जरी प्रश्न, तरी त्याच ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढं त्रोटक उत्तर देता येत नाही. ह्याचं उत्तर चांगलं लांबलचक आहे. संभोग, सेक्स वगैरेबाबतीत मूलभूत दृष्टीकोन समजावून सांगणे आहे. शिवाय शरीर संबंध हे जोडप्यात घडत असल्याने उत्तर दोघांच्या कानी पडणे आवश्यक आहे. बरेचदा नवरोजी सोबत नसतात, तेंव्हा निव्वळ बायकोला काही सांगणं फारसं परिणामकारक ठरत नाही. किंवा बायकोला बाहेर बसायला सांगून नवरोजी हा प्रश्न डॉक्टरांच्या कानात कुजबुजतात. डॉक्टर जे सांगतात ते ‘जसंच्या तसं’ जोडीदाराच्या कानावर घालणं अवघडच.  मग डॉक्टर आपलं काही तरी उत्तर देऊन वेळ मारून नेतात.
तेंव्हा सादर आहे दोघांनाही माहिती हवं असं संपूर्ण उत्तर.
सुरवातीच्या काही महिन्यात तर सेक्स म्हणजे त्या स्त्रीच्या दृष्टीनी संकटच असतं. प्रचंड मळमळत असतं. पोटात नुसतं ढवळून येत असतं. साध्या प्रवासानी काही काळ मळमळलं तरी आपण कोण वैतागतो. काही म्हणजे काही करावसं वाटत नाही. मग दिवस-दिवस हा त्रास काढणाऱ्या बाईला तर काय होत असेल? अशा वेळी तिनी रतिसुखाला होकार देणं अपेक्षित तरी आहे का? पण ही गोष्ट पुरुष समजावून घेत नाहीत. बायका सहसा इतक्या मोकळेपणाने बोलत नाहीत. मग बेबनाव सुरु होतो.
सुरवातीला खूप थकवाही जाणवतो. एरवीची सवयीची कामही आता जाचक वाटायला लागतात. खूप झोप येते. रात्र झाली की झोपायचं, रात्री झोपून झोपून कंटाळा आला म्हणून दिवसा झोपायचं, पुन्हा रात्र झाली, की रात्र झाली म्हणून झोपायचं; अशी स्थिती होते. त्यातून उलटीसाठी गोळ्या दिल्या असतात, त्यानीही झोप येते. या झोपेचा निराळा अर्थ काढला जातो. आता त्या स्त्रीला कामेच्छाच उरली नाही अशी समजूत करून घेतली जाते.
गरोदरपणात स्त्रीचं रूप खूप खूप बदलतं. इतकं की तिचाच तिच्या बदललेल्या रूपावर विश्वास बसत नाही.
लावण्य जातेस उतू। वायाच चालला ऋतू
अशाच वेळी गेलीस कां तू। करून जिवाची दैना
समुद्र बिलोरी ऐना। सृष्टीला पाचवा महिना।।’
अशी कवींनी सृष्टीसौंदर्याची तारीफ केली असली तरीही या कालावधीतले अनेक बदल मुळीच सुसह्य नसतात.
बरेचदा गालावर, नाकावर एक मोठा काळा डाग येतो (Malesma), दिसायला भारी वाईट दिसतो. पोटावर बेंबीपासून खाली जणू कोळश्यानी ओढावी अशी एक काळी रेघ उमटते (Linea Nigra). ही देखील विद्रूप दिसते. एकूणच त्वचा काळवंडते. निपलभोवती, मायांगाभोवती काळेपणा वाढतो. शरीरातल्या वाढत्या मेलानिन ह्या द्रव्याच्या ह्या खुणा. प्रसूतीनंतर  या मावळतात. पण किंचित मागमूस राहु शकतो, राहतोच. पुढे पुढे पोटावर, मांड्यांवर, स्तनावर, पांढऱ्या रेघा उमटतात (Strie Gravisarum). हे चट्टेपट्टे अगदी विचित्र दिसतात. ह्या रेघा उठतात त्या पोटाची त्वचा अति ताणल्यामुळे. त्वचेचा आतला पापुद्रा चक्क विरतो. कधी खाज सुटते, कधी लाली येते. किरकोळ औषधांनी हा त्रास थांबतो. पण खुणा येऊ नयेत किंवा आलेल्या पूर्ण जाव्यात असं औषध नाहीये. असूच शकत नाही. कारण पोट तर वाढणारच आणि त्यामुळे त्वचा तर विरणारच. म्हणूनच अशा हेतूने विकल्या जाणाऱ्या औषधांची कामगिरी यथातथाच  आहे. त्वचेच्या बदलत्या रंगरूपाबरोबरच पायावर, हातावर, चेहऱ्यावर सूज येते, केसही गळायला लागतात. या पाठोपाठ शरीराची ढब बदलते. सरळ ताठ उभं रहाताच येत नाही. पुढे पोक काढून उभं रहावं लागतं. स्तनांचा आकार वाढतो, ते खाली ओघळतात आणि अगदी काखेपर्यंत या गाठी वाढतात. यामुळे बेडौलपणा येतो. स्तनांना हुळहुळेपणा येतो. एरवी हवेहवेसे स्वर्गीय वाटणारे स्पर्श, आता नकोसेच नाही तर तापदायक वाटायला लागतात. स्तनातून अगदी सुरुवातीपासून चीक बाहेर पडतो. हे लक्षात येताच काहींना उगीचच ओशाळल्यासारखं होतं. योनी स्त्रावातही बरेच बदल होतात. त्या स्त्रावाचं प्रमाण आणि गंध बदलतो. योनी मार्गाला आणि एकुणच स्त्रीअवयवांना वाढलेला रक्तपुरवठा  हे ह्याचं प्रमुख कारण. रक्त पुरवठा इतका वाढतो की कधी कधी अलगद स्पर्शानेही रक्तस्त्राव सुरु होतो. मग कोण धावपळ, हा रक्तस्त्राव गर्भाशी थेट संबंधित नाही अशी खात्री होईपर्यंत कोण काळजी.


ह्या साऱ्याचा स्त्रीच्या मानसिकतेवर होणारा परिणाम अधिक गहिरा असतो. अनेकींना स्वतःबद्दल विलक्षण न्यूनगंड वाटायला लागतो. ‘आता आपण पूर्वीसारख्या आकर्षक, सुंदर दिसत नाही; निस्तेज, काळवंडलेली कांती, बांधाही बेढब, आता हे सारं पूर्वीसारखं होणं जाम अवघड. आता आपण आपल्या नवऱ्याला पूर्वी इतक्याच आवडू का?’, अशी चिंता भेडसावायला लागते. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. अशा वेळी नवऱ्यानी दिलेला विश्वास हा लाखमोलाचा ठरतो. पुरुषांनी हा मुद्दा लक्षात ठेवायला हवा, आचरणात आणायला हवा.
ह्या बरोबर इतरही अनेक प्रकारच्या ‘भीत्या’ अशा जोडप्याला छळत असतात. गर्भपात होईल, कमी दिवसाची प्रसूती होईल, अशी भीती वाटत असते. इतर काही बाधा नसेल तर संबंधामुळे ना गर्भपात होतो ना कमी दिवसाची प्रसूती.  बाळाला इजा होईल अशीही भीती सतावत असते. शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इजा होऊ शकत नाही. बाळाला इन्फेक्शन होईल अशीही भीती वाटत असते. पण शरीरसंबंधामुळे बाळाला थेट इन्फेक्शनही होत नाही. नवऱ्याच्या शरीरातील जंतू थेट बाळाला टोचले जात नाहीत. समजा नवऱ्याला काही इन्फेक्शन असेल, उदाः एचआयव्ही, तर ते आधी आईला होते आणि आईच्या रक्तातून ते बाळापर्यंत पोहोचते. पण बहुतेकदा नाहीच पोहोचत. ‘नउ मास नउ दिवस रक्तामासाचा घास करून मी तुला लहानाचा मोठा केला’; असं सिनेमातल्या आया जरी म्हणत असल्या, तरी प्रत्यक्षात आईचं रक्त आणि बाळाचं रक्त हे दोन वेगवेगळ्या पाईपलाईन मधून फिरत  असतं. आईचं रक्त, बाळाच्या  शरीरात खेळतबिळत नसतं. आई आणि बाळाच्या रक्ताचा थेट संपर्क येत नाही. अतिपातळ, अतिसूक्ष्म पडद्याद्वारे आवश्यक व अनावश्यक पदार्थांची देवाणघेवाण तेवढी होत रहाते. आईच्या शरीरातील जंतुंना बाळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडथळे पार करावे लागतात. हा पडदाही भेदावा लागतो. काहीच जंतुंना, काहीच वेळी हे साधतं. बहुतेकदा नाहीच साधत.
काही जणांना तर होणाऱ्या बाळाचं भवितव्य काय असेल अशी विचित्र चिंता लागून रहाते. मोठेपणी आपले बाळ कोण होईल? ते जगात आपलं नाव काढेल ना? असे विचार मनात घोंगावू लागतात. अर्थातच इतक्या दूरची चिंता वहाणाऱ्यांच्या कामरंगाचा बेरंग व्हायला वेळ लागत नाही. आपला हा जो काही उद्योग चालला आहे तो बाळ आतून बघतंय असं चित्र काही जणांना सतावतं. असा काही विचार आला की मंडळी ऐक वक्ताला अगदी वरमून आणि शरमून जातात. अश्या लाजऱ्या लोकांसाठी हे नमूद केलंच पाहिजे की बाळाला आतून काहीही दिसत नाही, तेंव्हा, ‘चालू दे तुमचं!’
पोकळ शंकांच्या बरोबरीने स्त्रीचे मूडही गरोदरपणात एरवीपेक्षा(ही) पटापट बदलतात. घटकेत रडू तर घटकेत हसू असा खेळ सुरु होतो. नवऱ्याची खूपच गोची होते. स्त्रीची कामेच्छा गरोदरपणात जरा कमी होते. होर्मोनमधील होणारे बदल मेंदूतही आपली करामत दाखवतात. मातृभावना उफाळून येतात. पिल्लांना इजा करू धजल्यास प्राणीही किती चवताळून अंगावर येतात. अशाच भावना निसर्गाने मानवी मेंदूतही पेरल्या आहेत. अर्थातच कामेच्छा कमी झाली तरी संपतबींपत नाही. ही बाब पुरुषांनी समजावून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. अशा अवस्थतेत त्या स्त्रीला मानसिक आधाराची, विश्वासाची गरज असते. ह्या कालावधीत एकमेकांबरोबर वेळ घालवणं, बाळासाठी तयारी करणं, यात बाबांचाही सहभाग असेल तर पतीपत्नीचं नातं अधिक गहिरं होत जाईल. नात्यात एक नवा भरजरी धागा गुंफायची संधी म्हणून याकडे पहायला हवे.
निव्वळ दिवस रहाण्याने, एक मुद्दा निर्विवादपणे सिद्ध झालेला असतो. ‘आपल्याला दिवस राहू शकतात!’. लग्नानंतर पहिल्या वर्षात दिवस राहिले नाहीत तर लोक त्या बाईकडे विचित्र नजरेने बघतात, दोन वर्षात राहीले नाहीत तर त्या पुरुषालाही, ‘नको ग बाई हा मेला पुरुषाचा जन्म!’ असं होऊन जातं आणि तीन वर्षात राहिले नाहीत तर त्यांच्या डॉक्टरलासुद्धा अशा नजरांचा सामना करावा लागतो. बायकोला दिवस ‘रहाववू’ शकणे हे पुरुषाच्या दृष्टीनं खूपच महत्वाचं असतं. वांझोट्या स्त्रीची वेदना कथा कादंबऱ्यातून आणि नाटका सिनेमातून सतत कुरवाळली जाते, पण अशा पुरुषांनाही काळजात प्रचंड ओझं घेऊन जगावं लागतं. मोकळेपणी रडणं पुरुषांना  नॉट अलाउड; तेंव्हा फक्त कुढणं चालू असतं. दिवस राहिल्यामुळे, ज्या एका आउटकमवर अख्खी लग्नसंस्था उभी आहे, ज्या बातमीची दोन्ही घरचे आतुरतेने वाट पहात असतात, ती शक्यता आता नजरेच्या टप्यात येते. त्या जोडप्यावरचा ताण हलका होतो. हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळे वंशवृद्धी हा तात्कालिक हेतू साध्य झाल्यामुळे सेक्सकडे आता निर्हेतुकपणे बघणं शक्य होतं. हा अनुभव खूप वेगळा आणि सुंदर असतो. निव्वळ आनंदासाठी संभोग, काहीही मिळवण्यासाठी नाही. हा तर निष्काम शृंगारयोग.
बदलत्या भूमीकेचंही दोघांना अप्रूप असतं. मित्र-मैत्रीण, पती-पत्नी हे नातं आता आई-बाबा, बालक-पालक  असं बदलणार असतं. पण कित्येक पुरुषांना बायकोबद्दल आता सुप्त असूया वाटते. आपल्या पुरुषप्रधान व्यवस्थेत घरातील कर्ता पुरुष हाच घराचा केंद्रबिंदू असतो. रोजची भाजी कोणची करायची हे ही त्याच्याच कलानी ठरवलं जातं. पण दिवस राहीले की पुरुषाच्या पुढारकीत वाटेकरी निर्माण होतो. ‘चहाच्या वासानीसुद्धा मळमळत तिला, तेंव्हा आजपासून सकाळी सगळ्यांसाठी कॉफी!’ अशा घोषणा नित्याच्याच होतात. नवेपणाचे किती सोहळे!  ते डोहाळजेवण... झोपाळ्यापासून ते थेट चंद्रापर्यंतचं. ते फोटो. ते कौतुक. घराचा सगळा फोकस त्या बाईवर रहातो आता. असूया म्हणून असो वा सोय म्हणून असो, या साऱ्यातून  बाजूला रहाण्यापेक्षा या साऱ्यात सहभागी होणं हे चांगला बाप होण्यासाठी उपयोगी आहे. भावी पालकांसाठी आजकाल मार्गदर्शन वर्ग असतात. यातही बाबांची हजेरी बाबांना खूप काही शिकवून जाते. पती-पत्नीचं नातं निवळ शरीरभोगावर आधारलेलं नाही, नसावं. हे सिद्ध करण्यासाठी एक संधी म्हणून ह्या साऱ्याकडे पहावं.
शेवटी मूळ प्रश्न आणि त्याच्या स्पष्ट, नेमक्या उत्तराकडे. ‘गरोदरपणी संबंध कधी टाळावेत?’
  • पहिले तीन महिने आणि शेवटचे दोनएक महिने संबंध टाळावेत असा सल्ला बहुसंख्य प्रसूतीतज्ञ देतात पण यालाही फारसा शास्त्रीय आधार नाही.
  • काही निवडक आजारातच संभोगावर बंदी आहे. रक्तस्त्राव होत असेल/ झाला असेल, वार खाली असेल, बीपी वाढल्याने वा अन्य कारणानी संपूर्ण विश्रांतीची गरज असेल, पाणमोट फुटली असेल, पिशवीचे तोंड उघडले असेल, तर संभोग वर्ज्य आहे; एरवी नाही.
  • पोटावरती दाब येणार नाही असे संभोगाचे आसन असावे. सेक्स म्हणजे निव्वळ लिंगाचा योनी मार्गात प्रवेश ही फारच मर्यादित, खुजी, संकुचित व्याख्या झाली. प्रेमंभरानी दिलेले आलिंगन, चुंबन, मर्दन, परस्परांचे हसतमैथुन, मुखमैथुन वगैरेही सेक्सचेच प्रकार आहेत. प्रयोगशील जोडपी या कालावधीत हे प्रयोग करू शकतात. पत्नीला आनंद वाटेल, सुसह्य होईल इतपतच धाव घ्यावी.
  • प्रसूतीनंतर सर्व शरीर पूर्वपदावर यायला किमान दीड महिना लागतो. तेंव्हा प्रसूतीनंतर दिड महिना शरीरसंबंध टाळावेत. त्यातून पोटावर सीझरचे किंवा मायांगावर नॉर्मलवेळी सुद्धा कधी कधी घातलेले टाके दुखत असतील तर संबंध टाळणं योग्य. त्यानंतर एकमेकांच्या संमतीने आणि गर्भ निरोधक साधनांबद्दल सल्ला घेऊन कामक्रीडा सुरु करायला हरकत नाही. बाळाला अंगावर पाजायच्या काळात योनीमार्गाला कोरडेपणा येतो. यामुळे संभोगाच्या वेळी घर्षणाचा त्रास होतो, दोघांनाही होतो. यासाठी डॉक्टरी सल्ल्यांनी वंगणयुक्त मलमे वापरायला हवीत.
  • कधी कधी शरीर आणि मेंदू यांचा ताळमेळ चुकतो; बाळाला पाजतापाजताच कामतृप्तीचा आनंद प्राप्त होतो. हे आईसाठी अनपेक्षित असतं. पण यात अॅबनॉर्मल काही नाही.

‘समागम’ हा खूप सुंदर आणि अर्थपूर्ण शब्द आहे. समागम ह्या शब्दाचा एक अर्थ असा सांगतात की, समान पातळीवर येऊन एकमेकांच्या शरीराचा आनंद घेणं आणि देणं. हा किती सुंदर अर्थ आहे. हे साधायला हवं. ह्यासाठी उभयपक्षी सहकार आणि पुढाकार हवा.

प्रथम प्रसिद्धी पुरुष उवाच दिवाळी २०१७
या आणि अशा लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyakar.blogspot.in>

Monday, 22 February 2016

गर्भसंस्कार का पालक मार्गदर्शन मेळावा?

गर्भसंस्कार का पालक मार्गदर्शन मेळावा?
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि.सातारा. ४१२ ८०३.
मी आहे गायनॅकोलॉजिस्ट, प्रॅक्टिस करतो एका लहान गावात.
गेली वीस वर्ष मी नियमितपणे माझ्या पेशंट साठी 'पालक मार्गदर्शन मेळावा' घेतो आहे. होणारे आई - बाबा आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला आमंत्रण असतं.
प्रत्येकवेळी प्रतिसाद अगदी छान असतो. इतकी वर्ष झाली, मी कटाक्षानी ‘गर्भसंस्कार’ हा शब्द टाळत आलोय. या मागे असणाऱ्या धार्मिक, अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय गोष्टींना माझा ठाम विरोध आहे.
नुकताच माझ्या एका मित्रानी माझ्याकडून स्फूर्ती आणि स्लाइड्स घेऊन असाच कार्यक्रम सुरु केला आणि नाव दिलं, 'गर्भसंस्कार'! मी पडलो चाट. तर म्हणतो कसा, 'अरे, तू आणि मी जे करतो, ते खरे गर्भसंस्कार, तेव्हा हा शब्द खरतर आपण वापरायला हवा.'
मी एकदम हे ऐकून कान टवकारले. अरे खरंच की. ‘गर्भसंस्कार’ म्हणजे मंत्र-तंत्र नव्हे, पूजा-पाठ नव्हे, प्रार्थना नव्हे... ‘गर्भसंस्कार’ म्हणजे आईला, बाबांना, आज्जी-आजोबांना नव्या नात्याची जाण करून देणं, आईच्या अडचणी समजावून घ्यायला मदत करणं, सुखरूप आणि सुदृढ बाळ व्हावं म्हणून काय-काय करता येईल याची सविस्तर चर्चा करणं, भीती, गैरसमज अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा-परंपरांची जळमटं काढून टाकणं, आधुनिक चाचण्या, उपचार रुजवणं...... मग हे सगळं तर मी माझ्या मांडणीतून गेली वीस वर्ष करतोच आहे. पण ह्या सगळ्याला ‘गर्भसंस्कार’ म्हणायला कचरतो आहे. मित्राच्या सांगण्यानं मला एक नवी दृष्टी दिली. मी जे शास्त्रशुद्ध, पुराव्यानुसार बोलतो तेच तर ‘खरे गर्भसंस्कार’.
मी आपला वेडा, ओशाळवाणेपणानी ‘पालक मार्गदर्शन मेळावा’ असं अत्यंत गद्य शीर्षक वापरत होतो. मॅडच होतो की मी. मित्र म्हणाला, ‘अरे ‘गर्भसंस्कार’ हा आपला गड आहे, आपली जहागीर आहे ती. ती पुन्हा काबीज करायला भीड कसली. उलट हा शब्द न वापरून तू अशास्त्रीयतेला आपण होऊन जागा करून देतो आहेस. योग्य गर्भसंस्कार कुठले हे जाणून घेण्यापासून तुझ्या पेशंटना वंचित ठेवतो आहेस. धिक्कार असो तुझा!’
च्यामारी, मी गेली वीस वर्ष हे इतकं सगळं करतोय, आणि मलाच माहित नाही. ते काही नाही आता मी देखील ‘गर्भसंस्कार’ हा शब्द वापरायचं ठरवलं आहे. अगदी उजळ माथ्यानं. एक तर त्यामुळे योग्य, शास्त्रीय, आधुनिक गर्भसंस्कार म्हणजे काय हे आपोआप अघोरेखीत होईल. पर्यायानी छाछूगिरी कुठली हेही समजेल.
अर्थात आम्ही ज्या अपेक्षेने आलो होतो, ते ‘हे’ नाहीच, असं काहींना वाटू शकेल. आमची फसवणूक झाली असंही कोणी म्हणू शकेल.
पण आमच्या दृष्टीनी आम्ही जे करतोय तेच खरे गर्भसंस्कार असं म्हणता येईल.
मागे एकदा चेन्नईत चायनीज मागवल्यावर, चक्क सांबारात बुचकळून ठेवलेले नूडल्स पुढ्यात आले. हॉटेलवाल्याशी बऱ्याच वेळ हुज्जत घातल्यावर शांतपणे तो म्हणाला, ‘सर. धिस हॉटेल, धिस चायनीज!’
त्याच चाली वर म्हणता येईल, ‘धिस हॉस्पिटल, धिस गर्भसंस्कार!!’
“कोण आहे रे तिकडे? ती पाटी ताबडतोब बदला. माता मार्गदर्शन खोडा आणि लिहा गर्भसंस्कार!... नको नको लिहा शास्त्रीय गर्भसंस्कार!!...नको नको,  आधुनिक गर्भसंस्कार लिहा!!!!”
काय लिहू? तुम्हीच सुचवा.