Saturday 30 April 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ५) चंद्र खाली पडला तर?

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ५) 
चंद्र खाली पडला तर?
डॉ. शंतनू अभ्यंकर 

रोज रात्री नवी गोष्ट कुठून आणायची असा प्रश्न शास्त्रज्ञ आजीला कधी पडलाच नाही. रामायण, महाभारत, पंचतंत्र अशा कितीतरी कथा होत्याच, शिवाय ज्या दिवशी  काहीच सुचायचं नाही त्या दिवशी, झंप्या, भुपी आणि आजी एक मस्त खेळ खेळायचे. ह्या खेळाचं नाव, ‘जर का’!
खेळ अगदी सोपा होता. जर का असं झालं तर काय  होईल?, जर तसं झालं तर काय होईल? असे प्रश्न झंप्यानी किंवा भुपीनी विचारायचे आणि मग शास्त्रज्ञ आजीनी कल्पना लढवून त्यांची उत्तरे द्यायची. झंप्या आणि भुपीचा हा अत्यंत आवडीचा खेळ होता.  
त्या रात्री असंच झालं. मे महिन्याची सुट्टी होती. तिघेही झोपायला गच्चीवर  होते. क्रिकेट खेळून झंप्या दमून आला होता. आज त्यांच्या टीमची पहिली डे-नाईट मॅच झाली होती आणि झंप्यानी सिक्सर मारून ती जिंकली होती. त्याने मारलेला  बॉल सीमारेषेच्या पार तर गेलाच, पण तो नेमका कुठे गेला तो सापडलाच नाही! बॉल हरवण्याएवढा मोठ्ठा सिक्स मारल्याबद्दल ज्याने त्याने झंप्याचे कौतुक केले होते आणि तो कौतुकात न्हाऊन निघाला होता. 
आताही अंथरूणांत पडल्या पडल्या चंद्राचा वाटोळा गोळा बघून झंप्याला आपला बॉल आणि तो सिक्स आठवला आणि झंप्याने पहीला बंपर टाकला; ‘आजी, खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूप म्हणजे, खूपच जोरात सिक्स मारला तर काय होईल?’
‘अरे जोरात मारला तरी बॉल परत जमिनीवर येतोच; मग कितीही जोरात सिक्सर मारा.  पण जितक्या जोरात माराल तितका तो बॉल लांब जाईल. बॅटच्या दणक्याने बॉल लांब जायला लागतो त्याच वेळी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाने तो खालीही खेचला जात असतो. म्हणून तर बॉल कमानदार मार्गाने, वळणदार  प्रवास करून, जमीनीला टेकतो. पण भुपे तू सांग,  समजा झंप्यानी क्षितिजापलीकडे जाण्याइतका इतका जोरदार आणि उंच फटका मारला  तर?’
क्षितिजापलीकडे बॉल मारला तर नेमकं काय होईल हे काही भुपीला सांगता येईना. 
‘अगं, पृथ्वीला वळसा घालून तो बॉल  परत मागून घेऊन डोक्यावर आदळेल झंप्याच्या!!’ आजी हसत म्हणाली. 
पुढे मारलेला बॉल मागून येऊन डोक्यावर आपटणार हे ऐकून भुपीला मोठी गंमत वाटली. तो बॉल नेमका कसा  लागेल हे   झंप्याला नीट कळावं या उदात्त हेतूने तिनी त्याला एक टप्पल मारून दाखवली!! 
आजीनी तिला दटावलं आणि ती पुढे सांगू लागली, ‘अर्थात ही सगळी जर-तरची बात झाली.  प्रत्यक्षात वाटेतल्या अडथळ्यांमुळे, हवेमुळे, तो बॉल असा येऊ शकत नाही. पण याहीपेक्षा उंच आणि जोरात बॉल मारला तर तो पृथ्वीभोवती सतत गोल-गोल फिरत राहील!’
‘तो चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आहे तसा?’ भुपी. 
‘हो. मुळात पृथ्वी चंद्राला सतत आपल्या बाजूला ओढत असते.  पण चंद्र इतक्या वेगाने पुढे जातो आहे की, तो पृथ्वीकडे येतच नाही.  तो वेगानं पुढे पुढे जात रहातो. पृथ्वीकडे येणे आणि पुढे जाणे या खेचाखेचीत तो  पुढे दूर कुठेतरी अंतराळातही जात नाही आणि तो पृथ्वीवरही  पडत नाही. त्याच्या कक्षेमध्ये (ऑर्बिट) फिरत राहतो!’
‘पण आला कुठून चंद्र?’ भुपी. 
‘..आणि त्याला असा परफेक्ट स्ट्रोक कुणी मारला?’ झंप्या.
‘त्या चंद्र नावाच्या दगडमातीच्या गोळ्याला  नेमका  कोणत्या कारणाने, कसा आणि कधी असा फटका बसला, हे काही आपल्याला माहित नाही. पण अगदी नेमकी गती आणि दिशा मिळाली आहे त्याला. सध्या तो आपला  पृथ्वीभोवती फेऱ्या मारतो आहे.’  आजी.  
‘पण समजा, चंद्र खाली पडला तर?’ झंप्या.
‘तू नको काळजी करू, झंप्या. नाही पडणार तो. मी सांगितलंय त्याला!’ भुपीने पुन्हा खोडी काढली.
‘मी नाही काळजी करत. पण चंद्र खरंच पडला तर मी नील आर्मस्ट्रॉंगच्या पायच्या  ठशाजवळ उभा राहून सेल्फी घेईन आणि सगळ्यांना पाठवीन!!’ झंप्याने आपला प्लॅन सांगितला.   
‘मस्त कल्पना आहे; पण चंद्र जर खरंच खाली पडायला लागला ना, तर हाहाकार माजेल पृथ्वीवरती! सेल्फी बिल्फी विसरा झकासराव.  चंद्र पृथ्वीकडे आला तर काय काय होईल याची कल्पना लढवू या आपण. हीच आजची गोष्ट. पण ही गोष्ट सांगताना मी चंद्रासाठी दरवेळी नवीन शब्द वापरीन! चालेल?’
‘म्हणजे?’ झंप्या.
‘म्हणजे दरवेळी चंद्र असं नाही म्हणणार.  कधी ‘शशी’ म्हणीन कधी ‘सोम’.’
‘सोम म्हणजे चंद्र? म्हणजे सोमवार मधला सोम?’ झंप्या.
‘हो रे, चंद्राला खूप वेगवेगळी आणि  सुंदर नावे आहेत!!’  आजी.
 ‘हो चालेल. घे तू वेगळी वेगळी नावे’ दोघे म्हणाले. 
‘ ‘शशी’ पृथ्वीवर पडायचा तर त्याचा फिरण्याचा वेग कमी व्हायला हवा. वेग कमी झाला की ‘सोम’ पृथ्वीकडे यायला लागेल आणि पृथ्वीभोवती गिरक्या घेताs, घेताss, घेताsss, तो नागाच्या वेटोळ्यासारखा मार्ग घेत, अधिकाधिक जवळ येईल. ‘शशांक’ आणि आपल्यामध्ये बरंच अंतर आहे. तेंव्हा इथे पोहोचायला त्याला जवळजवळ वर्षभराचा कालावधी लागेल.’
‘बापरे! म्हणजे आज चंद्र मागवला, तर वर्षभराने येणार?’ झंप्या. 
‘मागवला काय रे झंप्या? मागवायला चंद्र म्हणजे काय पिझ्झा आहे का?’ भुपी. 
‘भुपे, मला सांग, ‘चांदोमामा’मुळे पृथ्वीवर अगदी रोज घडते अशी गोष्ट कोणती?’
‘चांदणे!’ भुपी. 
‘नाही.’ आजी. 
‘मुळीच नाही, अमावस्येला कुठे असते चांदणे?’ झंप्या ठामपणे म्हणाला. 
‘हां!!! आलं मला, भरती ओहोटी!!’
‘बरोब्बर. त्या ‘निशापती’च्या गुरुत्वाकर्षणामुळे समुद्राचे पाणी हेलकावे खाते. पाण्याची पातळी कमी-जास्त होते. ह्यालाच आपण ओहोटी आणि भरती म्हणतो. हा ‘इंदू’  जवळ यायला लागला की पहिल्या महिन्यामध्ये काही  विशेष फरक जाणवणार नाही आपल्याला. ‘चांदोबा’ जरा उजळ दिसायला लागेल आणि भरती-ओहोटीच्या लाटा मोठ्या होतील. पण साधारण महिन्याभरातच त्याने निम्मे अंतर काटले असेल आणि आता भरतीच्या लाटा उंचच उंच उठतील.  समुद्राकाठची सर्व घरेदारे,  दुकाने, उद्योगधंदे हे अक्षरशः वाहून जातील.’
‘पण आजी इतकं सगळं पाणी येणार कुठून?’ झंप्या. 
‘अॅ हे रे! भरती म्हणजे काही समुद्रात नवीन पाणी येत नाही काही. ज्या भागात ओहोटी होईल, तिथले हे पाणी असेल.’ भुपीने बरोबर सांगितले. 
‘हो, म्हणजे ओहोटीच्या ठिकाणी समुद्र आणखी आणखी मागे मागे सरकेल. त्या किनाऱ्याचा  समुद्रतळ उघडा पडेल.  तिथले जीवजंतू, मासे, प्रवाळ, वनस्पती यांचा कधी नव्हे ते हवेशी आणि सूर्यप्रकाशाची थेट संपर्क येईल. हे सहन न झाल्यामुळे  पाण्याखालच्या या जीवसृष्टीचा जीव जवळपास संपून जाईल!!’ आजी सांगत होती आणि  नातवंडांचे डोळे विस्फारले जात होते. 
‘दुसऱ्या महिन्यात तो ‘मयंक’,  दोन-तृतीयांश अंतर पार करून अधिक नजीक आला असेल.’ 
‘माझ्या वर्गात आहे एक मयंक! आता मी उद्या त्याला त्याच्याच नावाचा अर्थ सांगणार.’ झंप्या. 
‘गप्प बस की, सांग गं आजी, काय होईल पुढे?’ भुपी वैतागून म्हणाली.  
‘भरती-ओहोटीच्या या प्रचंड हेलकाव्यांमुळे  समुद्री वाहतूक, बंदरे सगळी बंद. ती पूर्ण निरूपयोगी ठरतील. आंतरराष्ट्रीय संपर्क यंत्रणा ही समुद्रतळाच्या केबल्सच्या जाळ्यातून काम करत असते.  उंच लाटांमुळे या केबलला काही झाले नाही तरी काठावरच्या यंत्रणा ठप्प झाल्या असतील. तिथली सगळी व्यवस्था कोलमडून पडलेली असेल. समुद्रमार्गे होणारी अन्नधान्याची आयात थंडावेल.  समुद्रकिनारी असलेल्या अणुवीज केंद्रे, ऑइल रिफायनरी बंद पडतील. बहुतेक भागात लाईट जातील.  अन्न आणि इंधनाचा तुटवडा जाणवायला लागेल.’ 
‘बाप रे! चंद्र नाही जवळ आला तरी चालेल!!’ झंप्या म्हणाला.
पोर्णिमेची रात्र होती. चंद्र नुकताच उगवला होता. गच्चीत झकास चांदणे पडले होते. त्या चंद्रावरच्या सशाकडे पहाताना झंप्याचे  काळीज मात्र सशासारखे लकलकत होते.
‘अरे हे तर काहीच नाही, समुद्रापासून लांब राहणाऱ्या मंडळींचीही यातून सुटका नाही.’ आजी आणखी रसभरीत वर्णन करू लागली. ‘नद्यांच्या मुखातून भरतीचे पाणी आत आत शिरायला लागणार. जितकी मोठी भरती तितके  खोलवर पाणी शिरणार. नद्या जाऊन समुद्राला मिळतात, इथे समुद्रच  येऊन जणू नदीला मिळेल; आणि नद्यांना उलटे पूर येतील.  हे खारं पाणी आसपासची शेतीवाडी, विहरी यांत घुसेल. हे खारं पाणी जमिनीत मुरल्यामुळे पिके तगणार नाहीत. जमीन कायमची नापीक होऊन जाईल. तिसऱ्या महिन्यात तो ‘रजनीनाथ’ इतका जवळ येईल की आपल्या सॅटेलाइटसवर  त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम होईल. सगळे सॅटेलाइट त्यांचे त्यांचे ऑर्बिट सोडून इकडेतिकडे फेकले जातील. पृथ्वीवर हाहाकार माजेल. अजून पडलं नसलं तर् आता इंटरनेट बंद पडेल.  ’
‘बापरे, म्हणजे ऑनलाइन गेम्सपण बंद!!’ झंप्या हसत म्हणाला. 
‘भरतीच्या लाटा आता शंभर शंभर  मीटर उंच होतील आणि ओहोटीच्या वेळी पाणी तितकंच खाली उतरेल. तो ‘सुधांशू’ आणखी जवळ येताच, इतकावेळ फक्त समुद्रावर दिसणारा त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा परिणाम, आता पृथ्वीच्या कवचावरही जाणवायला लागेल.’
‘म्हणजे? जमीनीला भरती ओहोटी येणार?’ भुपीने विचारले. 
‘अगदी तसेच नाही, पण थोडेफार तसेच. जमीन काही पाण्याइतकी लवचिक नसते. पण पृथ्वीचे  कवच चंद्राच्या दिशेला थोडं थोडं खेचले जाईल.  अर्थातच ‘हादरली ही धरती’ असा परिणाम होईल.  प्रचंड प्रमाणात भूकंप होतील. पृथ्वीच्या  कवचाला भेगा पडल्या की त्याखालील तप्त लाव्हा वेगाने बाहेर पडेल. पृथ्वीवर ठिकठिकाणी ज्वालामुखी आग ओकू लागतील. त्यातील धूळ, धूर, राख वगैरेमुळे वातावरण काळवंडून जाईल.  चंद्राचा गोल गरगरीत वाटोळा गोळा, सगळ्या सजीवसृष्टीचा वाट्टोळं करून टाकेल!! शिवाय समुद्रातलं कोट्यवधी टन पाणी सतत हिंदकळल्यामुळे काय होईल?’
‘बापरे, अजून काय व्हायचे बाकी आहे आता?’ झंप्या जरा रडवेला झाला. ह्या सर्वनाशाची कल्पनाही त्याला कशीशीच वाटत होती. 
 ‘पृथ्वीवर भरतीच्या बाजूला या पाण्याचे वजन पडेल. ओहोटीच्या आली की पुन्हा एकदा हा भार हलका होईल.  हे ओझं आता  पृथ्वीच्या दुसऱ्या भागातील कवचाला सोसावे लागेल. पाण्याचा प्रचंड हातोडा, पृथ्वीच्या कवचाला, जणू सगळीकडून सतत ठोकतोय, असा हा परिणाम असेल. पृथ्वीचे कवच लवकरच तडकेल! आणखी प्रचंड भूकंप होतील.’ 
चंद्र आता आणखी वर चढला होता. त्याच्या शीतल, अमृतमय चांदण्यात, झाडे रुपेरी झाली होती.  झंप्या आणि भुपी मात्र चंद्राइतकेच  मोठ्ठे डोळे करून त्याच्याकडे पहात होते. आपल्याबरोबर खेळताना भागणारा, लिंबोणीच्या झाडामागे लपणारा हा चांदोबा मामाच्या चिरेबंदी वाड्यावर तूप रोटी खायला न आलेलाच बरा; असं भुपीला वाटून गेलं. 
 आजीचे वर्णन सुरूच होतं आणि त्यात अजूनही चंद्राची  नवी नवी नावे ती वापरत होती. 
‘साधारण सात महिन्यांनी तो ‘सुधाकर’ पृथ्वीला 24 तासात एक फेरी घालू लागेल.  आता भरतीओहोटी होण्याऐवजी त्या ‘कलाधरा’च्या दिशेला कायमची भरती आणि अन्यत्र कायमची ओहोटी असा प्रकार होईल.’
‘आजी, चंद्र इतका जवळ आल्यामुळे त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे तो आपल्याला ओढून त्याच्याकडे घेईल का?’ झंप्याने एक तिरकस शंका काढली. 
‘नाही रे, तसं काही होणार नाही. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा चंद्राचे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे.  त्यामुळे आपण सगळे पृथ्वीवरच  राहू.’
‘आजी, पकडलं तुला!’ झंप्या. 
‘काय झालं?’
‘चंद्र म्हणालीस; चंद्राचे नवीन नाव नाही घेतलंस!’ झंप्या. 
‘खरंच की! तर मी काय सांगत होते, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापेक्षा त्या ‘हिमांशू’चे गुरुत्वाकर्षण खूप कमी आहे. आपण सगळे पृथ्वीवरच  राहू. पण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आता तो ‘चांदवा’देखील पृथ्वीच्या दिशेने खेचला जाऊन लंबगोल होईल! तिथे आता प्रचंड  चंद्रकंप होतील.’
‘चंद्रकंप? हां, हां; भू-कंप सारखा चंद्र-कंप!! आलं लक्षात.’ भुपी म्हणाली.  
‘वर्ष अखेरीस पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण इतके असेल की त्या ‘मृगांका’ला एकसंध ठेवणारे त्याचे स्वतःचे गुरुत्वाकर्षण आता निरुपयोगी ठरेल. त्याच्या पार ठिकऱ्या ठिकऱ्या होतील. त्याचे तुकडे आणि त्यातील दगड, माती, खडक, शिळा असा चंद्राचा कुस्करा पृथ्वीभोवती एक मोठे  रिंगण धरील. शनीच्या भोवती असतात तशी त्या भुग्याची कडी, पृथ्वीभोवती काही काळ  फेर धरतील. पण कालांतराने हा सगळा माल पृथ्वीकडे झेपावेल. बराचसा वातावरणातून प्रवास करताना जळून खाक होईल. कोणी जगले वाचले असतील तर म्हणतील, उल्कापात होतोय बरं! भंगलेल्या चंद्राचे मोठे मोठे तुकडे मात्र पृथ्वीवर बरसत रहातील आणि ठिकठिकाणी आणखी उत्पात घडवतील.’ आजी क्षणभर थांबली. गच्चीवर आता एक विचित्र शांतता पसरली. झंप्या आणि भुपी जरा कावरेबावरे झाल्याचे आजीला जाणवले. एक दीर्घ उसासा सोडत ती म्हणाली, ‘आकाशात  आता ‘अमृतरश्मी’, म्हणजे चंद्र नावाची काही चीजच  अस्तित्वात  नसेल!’ आजीचा आवाज जरा कापरा झाला. 
नकळतपणे दोघांचे डोळे पाणावले. आजीलाही जरा भरून आलं. झंप्याला तर हुंदकाच फुटला. त्याच्या डोळ्यातून खळ्ळकन पाणी आलं. त्याचे डोळे पुसत, त्याला जवळ घेत आजी म्हणाली, ‘अरे, खरं नाही काही असं होणार. तुम्हाला गोष्टी आवडतात ना, म्हणून कल्पनेनेच  काय होईल याचे मी फक्त चित्र रंगवले.  जाऊ दे; पुढे काय होईल हे सांगणे अवघड आहे; पण लवकरच वातावरण जरा स्थिरावेल.  समुद्राचे डचमळणे कायमचे थांबेल. आता भरती ओहोटी असणार नाही. खोल गुहांमध्ये, डोंगरकपाऱ्यात दडून राहिलेली  माणसं कदाचित वाचतील. ती पुन्हा एकदा माणसाचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न करायला लागतील!! अशीच एखादी  आजी गोष्ट सांगायला लागेल. तिची नातवंडे तिला विचारतील, 
आजी चंद्र म्हणजे काय गं? मग ती सांगेल, 
आमच्या लहानपणी आम्हां सगळ्यांचा एक जीवाभावाचा सखा होता. तो आभाळात राहायचा....’

किशोर मे  २०२२

Saturday 2 April 2022

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ४) न थांबणारे खेळणे.

 

शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी (गोष्ट ४)

न थांबणारे खेळणे.

डॉ. शंतनू अभ्यंकर

 

भुपीच्या  हातात फिजेट स्पिनर गरागरा फिरत होता आणि तीचं कधी खेळून होतंय आणि ते खेळणं आपल्याला कधी मिळेल, याची वाट पहात झंप्या फिजेट स्पिनरकडे  आशाळभूतपणे पहात होता. चिमटीत धरलेल्या त्या स्पिनरच्या पंखांना एकदा झटका दिला, की ते स्पिनर कितीतरी वेळ गरागरा  फिरत होते. नुकतेच आजीकडून, भुपीनी ते गिफ्ट म्हणून जिंकून घेतले होते. झालं असं की  संध्याकाळी बागेत फिरायला म्हणून तिघं गाडीतून बाहेर पडले आणि बागेच्या पार्किंगमध्ये समोरच त्यांना दिसला ‘वैज्ञानिक खेळण्यांचा’ स्टॉल.

दुकान दिसलं, की तिथून काही घेण्याची झंप्याला तीव्र इच्छा होते. याला त्याचा इलाज नाही. त्याच्या मेंदूची रचनाच तशी आहे. गॉगल-टोप्यांचे दुकान दिसले की त्याला ऊन जाणवायला लागते  आणि आइसक्रीमचे दुकान दिसले की त्याला ‘आतून’ उकडायला लागते.    पण काहीही मागितलं, तर ती वस्तु कशी आवश्यक आहे, वगैरे आजीला पटवून  द्यावं लागतं.

‘मला तू रेसिंग कार दिलीस तर  दुकानदाराला पैसे मिळतील आणि त्यातून तो त्याच्या नातवाला चॉकलेट घेईल. म्हणजे एका रेसिंग कारच्या पैशात दोन मुलं खुश होतील!’, असं एक कारण एकदा झंप्यानी दिलं होतं! पण आजीला ते पटले नव्हतं!! पण आज मामला वेगळा होता. आजी सायंटिस्ट होती.  त्यामुळे ‘वैज्ञानिक खेळण्याला’ ती नाही म्हणणार नाही अशी झंप्याची खात्री होती. पण आजी म्हणाली, ‘मी कोडं घालते. जो उत्तर देईल त्याला खेळणं.’

‘चालेल!’, दोघं म्हणाली.

‘मला पटकन सांगा, शास्त्रीय नाही असं खेळणं कोणतं?’

क्षणभर विचार करून भुपी म्हणाली, ‘एकही नाही!!’ भुपी जिंकली आणि मग तिच्यासाठी फिजेट स्पिनरची खरेदी झाली. 

झंप्या विचारात गढून गेला. भोवरा, बॅटबॉल, कॅरम, पतंग, सायकल, रुबिक क्यूब असं काहीही घेतलं तरी त्यात काहीतरी शास्त्र आहेच. मग हे उत्तर आपल्याला का नाही सुचलं?; असं त्याला वाटायला लागलं. इतक्यात भुपीने फिजेट स्पिनर त्याला दिला. त्याने त्याला एक जोरदार फटका दिला आणि गरागरा फिरणारे ते खेळणे पहात त्याच्या मनात प्रश्नांचे चक्र फिरू लागले. तो आजीला सवाल करता झाला, ‘असं गरगर फिरणारे पण न थांबणारे खेळणे नाही का बनवता येणार?’

आजी गालातल्या गालात हसली, ‘हं, अविरत कार्यरत रहाणारे मशीन!’

‘क्काय?’ झंप्या.

‘न थांबणारे खेळणे रे! म्हणजेच अविरत कार्यरत रहाणारे मशीन. त्याला पर्पेच्युअल मशीन म्हणतात. पण असं, न थांबणारे खेळणं किंवा यंत्र असूच शकत  नाही.’

‘पण यंत्र काय म्हणतेस? मी खेळण्याबद्दल विचारतो आहे.’

‘अरे तेच ते, सध्या दोन्ही एकच असं समज. यंत्र म्हणजे मोठ्या माणसांचे खेळणेच असते!’

झंप्याला जरा हसू आलं.

तो म्हणाला, ‘पण का नाही असू शकत असं खेळणं?’

‘एका हातानी टाळी वाजेल का?’ आजी.

‘नाही.’

‘एका हाताने टाळी वाजत नाही, कारण हाताची रचनाच तशी आहे. तसंच खेळण्यांचं किंवा यंत्रांचं आहे. ती केंव्हा ना केंव्हा तरी थांबणारच. अविरत कार्यरत असं खेळणं असूच शकत नाही.’

‘आजी, एका हातानी टाळी नाही पण चुटकी वाजते की!’ भुपी खोडसाळपणे म्हणाली.  पण आजी मुळीच डगमगली नाही.  आजी आहेच तशी. असल्या तिरपागड्या प्रश्नांची मजा वाटते तिला. ती म्हणाली, ‘त्याचंही कारण तेच. बोटांची रचनाच तशी आहे! आणि काय गं, चुटकी तरी एका बोटाने वाजते का?’

इतक्यात तिथल्या फुगेवाल्याकडून आजीने भिरभिरे, किल्लीची मोटार, सेलवर चालणारा रोबोट,  भिंगरी, भोवरा अशी जोरदार खरेदी केली. मग सगळी संध्याकाळ  ह्या खेळण्यांच्या संगतीत अविरत कार्यरत खेळणं का असू शकत नाही, हे समजावून घेण्यात अगदी मजेत गेली.

आजीने सांगितले, ‘कोणतेही खेळणं किंवा यंत्र म्हटलं की त्यात काहीतरी हालचाल असते.  ती हालचाल होण्यासाठी त्या खेळण्याला कोणीतरी ऊर्जा पुरवावी लागते.’

‘ऊर्जा? म्हणजे?’ झंप्या.

‘म्हणजे शक्ती रे’, भुपीने सांगितले.

‘हं, फिजेट स्पिनर आपण हाताने फिरवतो. म्हणजे आपल्या हाताच्या शक्तीने तो फिरतो. पण कितीही जोरात झटका दिला तरी काही काळाने स्पिनर  थांबतोच. ती बघ, त्या  बाळाला त्याची ताई झोके  देते आहे. पण तिने झोका द्यायचं थांबवलं की थोडावेळ हेलकावे खाऊन तो झोका स्थिर होईल. किल्ली संपली की ही मोटार चालणार नाही. म्हणजे मोटारीला शक्ती, किल्लीने स्प्रिंगला पीळ दिला  त्यातून मिळते आहे.  ह्या रोबोटचे सेल संपले की तो बंद पडेल; म्हणजे ह्याला ऊर्जा सेल मधून मिळते आहे.  आपल्या बागेतल्या  सोलरच्या  दिव्यांची बॅटरी उन्हामुळे रिचार्ज होते; म्हणजे त्यांना सूर्याकडून ऊर्जा मिळते.’

‘आणि भिरभिरे? त्याला किल्ली नाही आणि बॅटरीही नाही!’ झंप्याने विचारले.

‘अरे, त्याला वाऱ्याकडून शक्ती मिळते. वारा थांबला की भिरभिरे थांबते!’ भुपी.

‘बरोबर, न थांबणारे खेळणे म्हणजे कायम चालू. जगाच्या अंतापर्यंत चालू!!’ आजी.

‘जगाच्या अंतापर्यंत? जग संपणार आहे का आजी? कधी?’ झंप्याने ‘चिंता करितो विश्वाची’, अशा काळजीच्या सुरात विचारले.

‘संपेल ना!  असं म्हणतात की हे विश्व प्रसरण पावते आहे. शेवटी प्रसरण पावून पावून त्यातील ऊर्जा संपून जाईल आणि मग  सर्व काही थिजून जाईल.’

‘बापरे!’, झंप्या.

‘काळजी नको करू, झंप्या.’ भुपी म्हणाली, ‘हे असलं काही इतक्यात होणार नाही.  शंभर एक ट्रिलियन वर्षांनी होईल!!’

  ‘म्हणजे अविरत कार्यरत खेळणं इतकी वर्ष तरी चाललं पाहिजे, तरच त्याला अविरत कार्यरत म्हणत येईल!’ आजी.

‘बापरे!’ झंप्या.

‘किल्ली, सेल, ऊन अशी बाहेरून ऊर्जा न घेता, सतत चालू राहील असे यंत्र बनवलं, तर बहार येईल असं लोकांना वाटत होतं.  असं मशीन बनवलं की त्याला कुठल्याच प्रकारचे इंधन लागणार नाही आणि आपली सगळी कामं फुकटात होतील. असंही वाटत होतं. पण असं मशीन बनवणे शक्य नाही.  हा मुळी विज्ञानाचा नियमच आहे.  पण विज्ञानाला त्यावेळेला हा नियम माहित नव्हता.  त्यामुळे तऱ्हेतऱ्हेच्या युक्त्या योजून अनेक तऱ्हेवाईक मंडळींनी, अशी यंत्र बनवायचे  अनेक प्रयत्न केले.  या फसलेल्या अनेक प्रयत्नातून माणसांची समज वाढत गेली. असं खेळणं शक्य नाही आणि ते का शक्य नाही, हे अशा प्रयत्नातून हळूहळू समजत गेले.’

आजीनी आता मोबाइल काढला त्यात ‘पर्पेचुअल मशीन ईमेजेस’ असं सर्च केलं आणि फसलेल्या यंत्रांची सचित्र माहिती समोर आली.

Tumblr media

‘एका पठ्ठ्याने  वरील चित्रातल्या प्रमाणे कल्पना लढवली होती.’ आजी चित्र दाखवत म्हणाली. ‘पवनचक्कीच्या फिरण्याने भाता हलेल आणि भात्याच्या वाऱ्याने पवनचक्की फिरेल!!’

 






Tumblr media
‘किंवा हे दुसरे चित्र पहा. ‘इथे एकाने दिव्याच्या उजेडाने चार्ज होणाऱ्या बॅटरीवर तोच दिवा सतत सुरू राहील अशी कल्पना लढवली आहे.’ आजी. 


 

हे ऐकताच भुपी एकदम पेटलीच. ‘आजी, आम्ही कोयनानगरला ट्रीपला गेलो होतो. तिथे  धरणाचे पाणी जोरात सोडून त्यावर वीज बनते. मग ते पाणी वाहून जाते. मी त्यांना युक्ति सांगितली होती. त्याच विजेवर पंप लावून ते पाणी पुन्हा धरणात सोडायचे! बस्स!  पाणी पुन्हा वाहून येईल, पुन्हा जनित्र फिरेल, पुन्हा वीज निर्माण होईल. ‘असं का नाही करत?’, असं तिथे मी त्या गाईडना विचारले होते. पण आत्ता थोडं थोडं कळलं मला. असे झाले तर ते एक पर्पेच्युअल मशीनच होईल. पण ते तर अशक्य आहे. बरोबर ना?’

आजी खुश झाली. भुपीला विषय झटकन कळला होता. आजी मोबाइलमधले पुढचे चित्र दाखवत म्हणाली, ‘ही दोन चित्र पहा. जड बॉलच्या वजनाने त्या चाकाचा सतत तोल जात राहील आणि ते सतत घुमत राहील अशा आशेनी असली  यंत्र बनवली  गेली  होती.’


 

‘पण इतर चाकांसारखीच काही गिरक्या घेऊन ही यंत्रही थांबून जायची. ही मशीन सतत फिरायची नाहीत याचं एक कारण आहे, ‘फ्रिक्शन’.   म्हणजे घर्षण. म्हणजे खेळण्याचे हलणारे भाग घासल्यामुळे वाया जाणारी शक्ती. जितके हलते डुलते भाग जास्त, तितके सांधे अधिक, तितके घर्षण अधिक.’  

‘भिंगरी किंवा बेब्लेड किंवा भोवरा अगदी टोकावर उभे असतात. त्यामुळे जमिनीवर कमीत कमी जागी यांचा स्पर्श होतो.  त्यामुळे ते बराच वेळ गरगरत फिरतात.  पण कमीत कमी जागी स्पर्श जरी झाला, तरी त्या ठिकाणी जमीन आणि भोवऱ्याचे टोक  यामध्ये स्पर्श आहेच.  त्यामुळे थोडे तरी घर्षण आहेच.  आणि त्यामुळे भोवरा केव्हा ना केव्हा थांबणारच आहे.  हे टोक कितीही अणकुचीदार केले तरी भोवरा थांबणार हे नक्की.  जमिनीच्या बरोबरीने भोवऱ्याला थांबवणारा आणखी एक घटक आहे.  तो म्हणजे हवा.  हवेबरोबर सुद्धा घर्षण होतच असते.’  

‘म्हणजे अविरत कार्यरत खेळणं बनवायचं असेल तर कुठेही घर्षण बिंदू नसावा.  म्हणजे ज्याचा कुठलाही भाग इतर कुठल्याही भागांना स्पर्श करणार नाही असं खेळणं बनवलं पाहिजे!  कारण जर दोन भाग एकमेकांना स्पर्श करत असतील, तर त्यांच्यामध्ये कितीही ऑइल घातलं, तरी घर्षण हे काही प्रमाणात तरी होणारच. हवेशी घर्षण होऊ नये म्हणून असं खेळणं व्हॅक्युममध्ये, म्हणजे निर्वात पोकळीमध्ये, चालवले  पाहिजे.  म्हणजे हवेशी घर्षणाचा प्रश्न येणार नाही. नुसतं एवढेच नाही पण दोन भाग एकमेकावर घासले, की तिथे उष्णता निर्माण होते.  नुसती दोन बोटे एकमेकांवर घासून पहा बरं, गरम होतात की नाही?’ आजी.

‘हो की.’ बोटे घासत झंप्या म्हणाला.

‘खेळण्याचे दोन भाग एकमेकांवर घासले तरी देखील थोड्यावेळाने गरम होतात.  म्हणजे त्या खेळण्यामधली, काही ऊर्जा उष्णता निर्माण करण्यात खर्च झाली.  आता ती काही खेळण्याकडे परत येणार नाही. अशा पद्धतीने ऊर्जेचा खर्च व्हायला लागला की कधीतरी ते मशीन थांबणार हे उघड आहे. इतकंच काय, त्या खेळण्याचा काही आवाज देखिल होता कामा नये! कारण आवाज ही सुद्धा एक प्रकारची ऊर्जा आहे. त्या खेळण्याचा आवाज येणार, म्हणजे काही ऊर्जाही आवाज निर्माण करण्यात खर्च होणार.  पुन्हा एकदा खेळण्याच्या शक्तीला गळती लागली आहे.  हे असले खेळणे हे कधीतरी थांबणारच.’ आजी.  

‘न थांबणारे खेळणे म्हणजे एकदाच झटका देताच अनंत काळ चालणारे खेळणे. घर्षण, उष्णता किंवा आवाज न करता चालणारे खेळणे. पण एकदाच झटका देऊन कधीच न थांबणारा स्पिनर असूच शकत  नाही. अशक्य आहे ते!’

‘पण तूच तर नेहमी सांगतेस की आजी, विज्ञानाला अशक्य असं काहीच नाही म्हणून.  काही वर्षापूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज सत्यात उतरलेल्या आहेत.’ भुपी

‘बरोबर आहे. पण इथे अशक्य मी वेगळ्या अर्थाने म्हणते आहे.  म्हणजे जर का अविरत कार्यरत खेळणं बनवलं; तर आपले भौतिकशास्त्राचे, गणिताचे, असे सगळेच नियम खोटे ठरतील. ते पूर्णपणे बदलावे लागतील.  हे सारे नियम तर इतकी शतके तपासून तपासून घेतलेले आहेत.  त्यामुळे हे नियम पक्के आहेत याची आपल्याला पक्की खात्री आहे.  म्हणून मी अशक्य असं म्हणते. दोन अधिक दोन चारच, पाच होणे अशक्य आहे; तसंच हे.’ आजी समजावून सांगत म्हणाली. ‘म्हणूनच कोयनेचे पाणी पुन्हा धरणात पंपायला..’

‘पंपायला!! असा शब्द आहे?’ झंप्या.

‘नाही रे, पण मी आपला बनवला आत्ता!’ आजी हंसत हंसत म्हणाली. ‘तर मी काय सांगत होते, कोयनेचे पाणी पुन्हा धरणात पंपायला, तयार होणारी सगळी वीज लागेल आणि इतकं करूनही  सगळेच्या सगळे पाणी वर जाणारच नाही.  कारण ह्या पंपाचा आवाज होणार, त्यात थोडी वीज वापरली जाईल. त्यातील हलणाऱ्या भागांत घर्षण होणार.  त्यावर मात करून पंप चालायला हवा. म्हणजे त्यात थोडी वीज वापरली जाईल. पंप थोडा गरमही होणार. यातही थोडी वीज वापरली जाणार. ही सगळी गळती लक्षात घ्यायला हवी. तुझ्या लक्षात येईल की, धरणातून सोडलेल्या पाण्याने निर्माण केलेल्या विजेपेक्षा ते सगळे पाणी पुन्हा धरणात चढवायला थोडी जास्तच वीज लागेल. थोडक्यात अशी युक्ती उपयोगाची नाही.’    

‘ट्रीपच्या वेळी त्या गाईडनी काहीतरी उत्तर दिलं होतं; पण ते मला समजले नव्हते. आज मला सगळं कसं मस्त समजलं. उगीच नाही आम्ही तुला गुगल आजी म्हणत.’ असं म्हणत झंप्या आणि भुपी आजीला बिलगले. 

 

प्रथम प्रसिद्धी

किशोर

एप्रिल २०२२