Monday 31 July 2017

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा

उगवला (मधु)चंद्र पुनवेचा!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२०१०३४९

पुनवेचा चंद्र उगवलेला असतो, हृदयी प्रीतीचा दर्या उसळलेला असतो, दाही दिशा खुललेल्या अन् वनीवनी कुमुदिनी फुललेल्या असतात, नववधू मनी अधीर झालेली असते आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असतो... आणि अशाच वेळी प्रश्न पडतो, आता गर्भ निरोधक कुठलं वापरावं बरं?
कसं धाडकन जमिनीवर आदळल्यासारखं वाटलं ना? पण ह्या प्रश्नाचं उत्तर जे वेळीच शोधत नाहीत तेही असेच आदळतात. 
लग्न ठरल्यावर बाकी सगळ्याचा विचार होतो. देणंघेणं, मानपान, हुंडाबिंडा, वऱ्हाडी-वाजंत्री, बिऱ्हाड-बाजलं, पोषाख-बिषाख, इव्हेंट मॅनेजर... काही विचारायची सोय नाही. फक्त एका गोष्टीबद्दल सारे चिडीचूप असतात. सुरवातीला गर्भ निरोधक कोणतं वापरावं? एखादी, एरवी आगाऊ किंवा ढॅण-ढॅण समजली गेलेली आत्या, विषय काढते पण कोणीच तिकडे लक्ष देत नाही. या बाबतीत सल्ला घ्यायला आधीच डॉक्टरकडे जाण्याची फारशी पद्धत नाही. बऱ्याच लोकांना असं वाटतं की डॉक्टर लाजतील वगैरे. तसं काही नसतं. डॉक्टरी सल्ला घेणं महत्वाचं आहे. तो जरूर घ्यावा.
नवविवाहित जोडप्यांसाठी सर्वात बेस्ट गर्भनिरोधक म्हणजे गोळ्या! लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्ह पिल्स.
इतर पद्धतींचे तोटे जास्त आणि फायदे कमी अशी परिस्थिती आहे.
लग्नात व्रात्य मित्रांकडून, सप्रेम भेट म्हणून, हमखास दिलं जाणारं ‘निरोध’, ऐनवेळी वापरावं लागतं. बऱ्याच जणांना असं ऐन मोक्याच्या वेळी टाईम प्लीज म्हणणं जमत नाही. मग घोटाळे होतात. (अपयशाचं प्रमाण १५%). हनिमूनचे दिवस म्हणजे नकळत सारे घडण्याचे दिवस. अशावेळी सदासर्वदा खिशापाकिटात निरोध बाळगून रहाणारा दक्ष पुरुष विरळाच. निरोधचा वापर हे ही एक कौशल्य आहे आणि हे आत्मसात करायला थोडा प्रयत्न लागतो. गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उताविळांना हे कसं साधणार? पहिल्याच प्रयत्नात सगळं जमेल असं नाही. पहिल्याच प्रयत्नात संभोग जमेल असंही नाही; पण त्याबद्दल पुन्हा केंव्हातरी.  शिवाय ह्याच्या वापरामध्ये स्पर्श, तापमान इ. संवेदना कमी होतात. नव्या नवलाईच्या क्षणी हे कसं बरं मान्य होणार? काही महाभागांनी तर निरोधसह समागम म्हणजे कागदसकट चॉकलेट खाण्यासारखं आहे, असा खट्याळ शेरा मारून ठेवला आहे. हे वापरताना  नैसर्गिक वंगण उपलब्ध होत नाही, त्यामुळे काहीतरी पदार्थ वंगण म्हणून वापरावा लागतो. अगदी निरोध ‘चीकनाईयुक्त’ असला तरीही. हा पदार्थ तैलयुक्त असून चालत नाही. त्यासाठी काही खास क्रीम्स उपलब्ध आहेत.  पण हे माहित नसतं. मग बेडरूम मध्ये हमखास उपलब्ध असलेला पदार्थ, म्हणजे कोल्ड क्रीम, वापरलं जातं. पण कोणताही तैलयुक्त पदार्थ हा निरोधला हानी पोहोचवतो. निरोधमधल्या लॅटेक्सला या तैलयुक्त पदार्थानी बारीक छिद्र पडतात. परिणामी काय होऊ शकत हे आपण जाणताच. आणखीही एक महत्वाचा मुद्दा म्हणजे निरोध हे पुरुषांच्या ताब्यात असलेलं गर्भ निरोधक आहे. एखाद्यानी हे असलं काही नको असं ठरवलं, की बायका त्याबद्दल विशेष काही करू शकत नाहीत. ही श्रींची इच्छा म्हटल्यावर सौ त्यात काही बोलू शकत नाहीत.
नवविवाहीतांमध्ये कॉपर टी (तांबी) हाही  पर्याय सुलभ नाही. ती सहजपणे बसवण्यासाठी योनीमार्ग रुंद असावा लागतो, गर्भ पिशवीचे तोंडही किंचित उघडे असावे लागते. सुरवातीला असं नसतं. लग्नाआधीच काही कॉपर टी बसवता येत नाही. त्यामुळे मधुचंद्राच्या रात्री आणि नंतरही बऱ्याच काळ ही पद्धत बाद आहे.
निव्वळ प्रोजेस्टेरॉन हा  घटक असलेल्या काही गोळ्या, इंजेक्शने, शरीरात त्वचेखाली बसवायच्या काड्या, योनीमार्गात ठेवायच्या रिंग असेही विविध प्रकार आहेत. परिणामकारक आहेत. (अपयशाचं प्रमाण ०.३%) पण या साऱ्यांनी पाळी अनियमित येते. अशी अनियमित पाळी ही त्या स्त्रीला आणि तिच्या सासर-माहेरला बहुधा अमान्य असते. ‘मुलीला नीट पाळी येतच नव्हती, हे लपवून ठेवण्यात आलं’, असाही अनाठायी आरोप होऊ शकतो. सबब याही पद्धती एकगठ्ठा नापास ठरतात.
गर्भ निरोधनाच्या ‘नैसर्गिक’ पद्धती या रकान्यात काही पद्धती आहेत. ‘गर्भ निरोधनाची नैसर्गिक पद्धत’ हा वदतोव्याघात आहे. मुळात गर्भधारणा ‘नैसर्गिक’ आहे आणि गर्भनिरोधन अनैसर्गिक! ते असो. पण मुलं ही देवाघरची फुलं असून जेवढी आपल्या पदरी पडतील तेवढी स्वीकारायची असं प्रेषितांनी सांगितल्याचं काहींचं म्हणणं असतं. अशी धर्मभोळी मंडळी मग कोणतंही, मानवनिर्मित गर्भनिरोधक वापरणं धर्मद्रोह समजतात. मानवकल्पित गर्भ निरोधन, म्हणजे ‘नैसर्गिक पद्धती’ मात्र चालतात म्हणे!
भारताच्या राष्ट्रपित्याला प्रिय अशी ब्रम्हचर्य ही यातील अग्रणी आणि अर्थात आत्ताच्या संदर्भात अप्रस्तुत.
योनीबाहेर स्खलन होईल अशी काळजी घेणे, हा यातला एक प्रकार. यात दिवस रहाण्याची शक्यता तब्बल २०% असते. कामतृप्ती न झाल्याने यात पुरेपूर कामानंद मिळत नाही हा ही  तोटा आहे.
स्त्रीबीज महिन्यात एकदाच तयार होते आणि त्यासुमारास संबंध आल्यास दिवस रहातात, अन्यथा नाही. ही बाब लक्षात घेऊन महिन्यातले ‘ते’ दिवस वगळून अन्य दिवशी समागम करणे अशीही एक चाल प्रचलित आहे. पाळी अतिशय नियमित असेल तर निव्वळ तारखेवरून अंदाज बांधता येतो. योनीस्त्राव तपासणे, शरीराचे तापमान पहाणे, अशाही पद्धती आहेत. यात अनेक खाचाखोचा आहेत.  यातही कामक्रीडेतील उत्स्फूर्तता निघून जाते आणि वेळापत्रकानुसार ‘कामगिरी’ उरकावी लागते. यातही अपयशाचं प्रमाण २०% आहे. एकूणच नैसर्गिक गर्भनिरोधन हे बेभरवशाचं, अवसानघातकी आणि ‘अनैसर्गिक’ आहे. यासाठी उभयपक्षी उच्च कोटीचा संयम आणि पराकोटीचा निश्चय लागतो. थोडक्यात जनसामन्यांसाठी या पद्धती कुचकामी आहेत.
रहाता राहिल्या गोळ्या. या आधीच घेता येतात, नव्हे आधीच घ्यायच्या असतात. संभोगाच्या वेळी मधेच टाईम प्लीज अशी भानगड नाही. अत्यंत खात्रीशीर आहेत. अपयशाचं प्रमाण निव्वळ ०.१%! अत्यंत सुरक्षित आहेत. एकदा गोळ्या घेतल्या, की या पापाची शिक्षा म्हणून, आपल्याला नंतर मूल होणार नाही अशी अनेकांची समजूत असते. घरातल्या मोठ्यांचा गोळ्यांना विरोध हा मुख्यत्वे या कारणानी असतो. गोळ्यांनी असं दूरगामी वंध्यत्व वगैरे काही येत नाही. गोळ्यांचा परिणाम तात्कालीक असतो. म्हणून तर त्या रोज आणि महिनोंमहीने घ्याव्या लागतात. उलट पी.सी.ओ.डी. सारख्या आजारात गोळ्या घेतल्यानी नंतर संतती संभव वाढतो!
‘आधी दोन वर्ष गोळ्या घेतल्या आणि आता रहात नाहीये!’... अशा छापाच्या कमेंट्स अज्ञानातून उगम पावतात. दिवस रहाणारच आहेत या गृहितकाआधारे गोळ्या सुरु केलेल्या असतात. दिवस रहाण्याची क्षमता त्या जोडप्यानी मुळी सिद्धच केलेली नसते. दिवस न रहाण्यामागे गोळ्या हे कारण कधीच नसतं. दुसऱ्या काही कारणानी दिवस रहात नसतात, त्याचं खापर मात्र गोळ्यांवर फोडलं जातं.
गोळ्यांचा आणखी एक गुणधर्म खूप खूप महत्वाचा आहे. गोळ्यांचा परिणाम हा ताबडतोब सुरु होत नाही. गोळ्या महिनाभर नियमित घेतल्याचा एकत्रित परिणाम म्हणून दिवस जात नाहीत. आजची गोळी आजच्या दिवसापुरती असं नाहीये. तेंव्हा पहिल्या महिन्यात गोळ्या आणि शिवाय आणखी काही गर्भनिरोधक वापरावे लागते किंवा पहिल्या महिन्यात संभोग टाळावा लागतो. नव्यानीच लग्न झालेल्या जोडप्याला संभोग टाळणं तर शक्य नाही. त्यामुळे केवळ गोळ्यांवर विसंबून रहायचं तर लग्नाआधी/मधुचंद्राआधी किमान महिनाभर या गोळ्या घेणं आवश्यक आहे. तेंव्हा कुठे इष्ट वेळी त्यांचा इष्ट परिणाम होईल. पण यासाठी आधी नियोजन हवं. मूल नको हा निर्णय त्या जोडप्यांनी घेतलेला हवा. त्यासाठी गोळ्या वापरायच्या हाही निर्णय झालेला हवा. यासाठी भावी पती-पत्नीमधे संवाद आणि चर्चा हवी. ह्या प्रश्नाची चर्चा करण्याइतका मोकळेपणा हवा. ‘डार्लिंग, आपल्याला बेबी कधी हवं?’ असं विचारल्यावर नुसतंच लाजायची सवय आता मुलींनी सोडून द्यायला हवी. होणाऱ्या नवऱ्यानी हा प्रश्न केला नाही तर स्वतः हा प्रश्न विचारायला हवा... आणि मुलींकडून  असा बोल्ड प्रश्न आला तर मुलांनीही डायरेक्ट बेशुद्ध पडायची सवय सोडून द्यायला हवी.
थोडक्यात नववधू मनी अधीर झालेली असताना आणि स्वर्गीय प्रणयरस चहूकडे वितळलेला असताना, ‘आता गर्भ निरोधक कुठलं वापरावं बरं?’ हा  प्रश्न पडताच कामा नये. ह्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच बोहल्यावर चढायचंय.





पद्धत
अपयशाचं प्रमाण
(पद्धत वापरूनही पहिल्याच वर्षात किती जोडप्यांना दिवस रहातात?)
निरोध
१५%
नैसर्गिक पद्धती
२०%
निव्वळ प्रोजेस्टेरॉन युक्त औषधे
०.३%
कॉपर टी
०.८%
लो डोस कंम्बाइन्ड ओरल कॉंट्रासेप्टीव्ह पिल्स (गोळ्या)
०.१%
(अनियमित वापरल्यास ५%)
कोणतीही पद्धत न वापरल्यास
८५%

प्रथम प्रसिद्धी, दिव्य मराठी, मधुरिमा पुरवणी, १/८/१७
या आणि अशाच लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

Tuesday 25 July 2017

व्यंगोबानाथाची कहाणी

व्यंगोबानाथाची कहाणी.
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई


ऐका व्यंगोबानाथा तुमची कहाणी.
आटपाट नगर होतं. तिथे दोन शेजारणी रहात होत्या. एकीचं नाव सुलाबाई तर दुसरीचं भुलाबाई. दोघीही सख्ख्या मैतरिणी. एके वर्षी काय झालं, दोघी गरत्या राहिल्या. नवमासानी दोघीही प्रसवल्या. दोघींच्याही घरी आनंदी आनंद झाला. साऱ्यांनी पेढे वाटले. पण हाय रे दैवा! काय हे दुर्दैव!! थोड्याच वेळात साऱ्या आनंदावर विरजण पडले. दोघींच्याही मुलांना पाठीवर आवाळू होते. आवळ्याएवढे लिबलिबीत आवाळू. मणके मुळी जुळलेलेच नव्हते. बाळाचे पाय अशक्तसे हलत होते. लघवीची धार जेमतेम उडत होती. ही सारी मणके उघडे असण्याची किमया होती. दोघीही हताश झाल्या.
सुलाबाई कर्माला दोष देऊन गप्प बसली. घरची होती तालेवार. पण सासूचं त्वांड कोण धरणार. सासू म्हणाली, ‘तुझंच पाप भोवले पोराला. व्यंगोबाचा कोप झाला. गिराण आलं गिराण गेलं. तू काहीच नाही पाळलं. उलट तेंव्हा उलटून बोललीस. आता भोग आपल्या कर्माची फळं.’
काही दिवस असे गेले. सुलाबाईने मनाचा हिय्या केला. नवऱ्याला पटवले. शेजारच्या गावात कोणी बैरागी आला होता. त्याची पूजा झाली. काही गुण नाही. पलीकडच्या गावात पीर होता. त्याचा नवस झाला पण फेडायची वेळ आली नाही. करता, करता लांब लांब प्रवास घडू लागला. वैद्य झाले हकीम झाले. साधू, संत, फकीर झाले. आशा-निराशेचे झोके झाले. गंडे, दोरे, ताईत झाले. अंगारे, धुपारे, उतारे झाले. उतार काही पडेना आजार काही हटेना. मूल मुळी चालेना, मुळी बाळसं धरेना. त्याच्या पायात ताकद नव्हती. रांगतंय कसलं? फरफट तेवढी होती. पुढे ते वारंवार आजारी पडू लागलं. बाकी घर त्याचा दुस्वास करू लागलं. माय तेवढी माया धरून होती. कोण म्हणे मुळावर आलंय, कोण म्हणे घराला खायला आलंय. सुलाबाई नुसती रडत राही, खंगत राही, मनाने भंगत राही. पुढे ते मूल गेले. डोक्याला हात लावून, नशिबाला बोल लावून, सारे काही उरकले.
यातच पुन्हा दिवस गेले. आता डोळेच पांढरे झाले. पुन्हा असे झाले तर? हीच चिंता दिवसभर. पुन्हा सारे सारे केले. तंत्र, मंत्र, उपासतापास, जपतप, व्रतवैकल्ये सगळे सगळे झाले. गिराण आले गिराण गेले. सुलाबाईनी सगळे केले. रात्रभर टक्क जागी. नाही अन्न नाही पाणी. पण पुन्हा तसेच घडले. तसलंच मूल देवानी धाडले. बाळापाठी आवाळू वाढले. गिराण पाळूनही व्यंगोबा नडला. व्यंगोबाचा फेरा पडला.
भुलाबाईची कथाच न्यारी. तिची सारीच तऱ्हा न्यारी. भुलाबाईनी काय केलं? दळणाच्या डब्यामागे चार पैसे साठले होते. कनवटीला लावून तिनी इस्पितळ गाठले होते. बाळाचा एक्सरे झाला. डॉक्टर म्हणे सीटीस्कॅन करा. बाळाचा सीटीस्कॅन झाला. डॉक्टर म्हणे एम.आर.आय. करा. बाळाचा एम.आर.आय. झाला. बाळांचं ऑपरेशन झालं. बाळ बरंच सुधारलं. वर्षाच्या अखेरीस धरू धरू चालू लागलं. डॉक्टर म्हणे, भुलाबाय, पुढच्या वेळी सावध ऱ्हाय. नवऱ्याचं रक्त तपासू. तुमचंही रक्त तपासू. भुलाबाय समजे, डॉक्टर हाय रक्तपिपासू. पै-पैसा वहात होता. नवा तपास सामने होता. शेवटी सारे रिपोर्ट आले. तेंव्हा कळले, भुलाबाईला मधुमेह होता. बाळातील व्यंग हा त्याचाच प्रताप होता. गोड दुखण्याचा दुखरा खेळ. असा सगळा लागला मेळ. पुढच्यावेळी ती शहाणी झाली. आधीच डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाले साखर सांभाळा. तो पर्यंत दिवस टाळा. इंन्शुलीनची सुई दिली. साखर आटोक्यात आली. फोलिक अॅसिडची मात्रा दिली. मगच भुलाबाय गरती राहिली. यथाकाल प्रसूत झाली. नक्षत्रावाणी लेक झाली. दुनिया आनंदानी भरली.
इतक्यामधे काय झाले? शेजारीण दारी आली. ही होती पिचलेली. व्यंगोबाच्या फेऱ्यानी खचलेली. शेजीबाई म्हणे, ‘अगं अगं भुले, काय वसा घेतलास ते सांग तरी मले. माझी कूसही आहे रिती. दोन झाली पण दोन्ही गेली. मागच्यासाली सुलाबायला भेटले. तिच्या सांगण्यासारके केले सारे. पण फळ काही नाही हाती. मी रिती, ती आहे रिती.’
भुलाबाईनी धीर दिला. दवाखान्याचा पत्ता दिला. व्यंगोबाचा वसा तिनी शेजीबाईला सांगितला. ‘डॉक्टर गाठ, तपास कर. शेवटपर्यंत धीर धर. उतू नको मातु नको घेतला वसा टाकू नको.’
‘उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही.’
शेजीबाई लगबग बाहेर पडली. दवाखान्याची पायरी चढली. डॉक्टर म्हणे, ‘सांगू काय? आधीच्याचा रिपोर्ट कुठाय?’
‘कसला रिपोर्ट आणि कसलं काय. तपास मुळी केलाच न्हाय. व्यंगोबानाथाचा प्रताप सारा. नाही उपाय तर तपास कशाला? जायचं ते नशीबानी गेलं. जे व्हायचं तेच झालं. हाती काहीच नाही आलं. पहिलं झालं ते गेलं. दुसरं झालं तेही गेलं. नेमकं व्यंग ठाऊक नाही, फोटो नाही. एक्सरे नाही. सोनोग्राफी, सिटी, एमआरआय काही नाही. बाळाचं रक्त तपासलं नाही. गेलं, नेलं, नदी काठी पुरलं. त्याचं काहीच नाही उरलं.’
डॉक्टर म्हणे, ‘असं कसं? शवविच्छेदनही हवं होतं.’ शेजीबाई शहारली. कल्पनेनीच घाबरली.
डॉक्टर म्हणे, ‘तसं नव्हे. निसर्गाचे हे उखाणे. सुटतील तेवढे सोडवायला हवे. तपास केला तर कारण सापडेल कदाचित. सापडले कारण, तर उपाय असेल कदाचित.’
शेजीबाई बुचकळ्यात पडली. डॉक्टरला विचारती झाली, ‘शोधूनही काही सापडलं नाही, तर कायरे सांगणार तु ही?’
डॉक्टर म्हणे, ‘सापडलं नाही तर सांगीन तसं. पण खोटंनाटं सांगणार नाही. नसलेलं कारण जोडणार नाही. माहित नाही तर माहित नाही म्हणू. अज्ञान आधी मान्य करू. दोघं मिळून पुन्हा शोधू. अज्ञान मान्य करण्यामध्ये विज्ञानाचा उगम आहे.’
शेजीबाईला थोडंच कळलं. बरचसं नाहीच वळलं. तपासण्यांची फैर झडली. दोष काही आढळला नाही. आशीर्वाद आणि शुभेच्छांशिवाय डॉक्टरकडे शब्द नाही. शेजीबाई हिरमुसली. पदरात तोंड खुपसून मुसमुसली.
 डॉक्टर म्हणे, ‘उगी रहाणे जे जे होईल ते ते पहाणे. मोठा काही दोष नाही, हा दिलासा कमी नाही. पेला अर्धा सरला आहे असंही म्हणता येतं पेला अर्धा  भरला आहे असंही म्हणता येतं.  पुढे सारं होईल छान, ही शक्यता मनी जाण. आता तू एवढं कर. खा, पी, पुष्ट हो. मिश्री, दारू शिवू नको. कुठलंही औषध सावधपणे घे. रुबेलाची लस घे. आयोडीनवालं मीठ माग. फोलिक अॅसिड घेऊ लाग. तीन महिने नवरा लांब. व्यंगोबानाथाचा हाच वसा सगळ्यांना सांग.’
शेजीबाई गोंधळली. ‘डॉक्टर, डॉक्टर सांगा आता, सुलाबायचा इस्कोट झाला. भुलाबायचं झालं भलं. पण भुलाबायच्या मार्गानी माला अजून नाही फळं! कोणाची चूक आणि कोण बरोबर? कोण आहे लबाड आणि कोण आहे खरं?’
डॉक्टर म्हणे, ‘कान देवून ऐक. सुलाबायचा वसा साधासा. वड्याचं तेल वांग्याला लावती. काहीही बिनसलं तरी दैवाले बोलती. गिराण, नजर असली कारणं जोडती. भुलाबायचा वसा न्यारा. तोच व्हावा सर्वाना प्यारा.’
 ‘डॉक्टर तुम्ही सांगताय खरं, पण मनात माझ्या भलतंच येतं. मी केला की तपास सारा. कारण नाहीच की सापडलं तुम्हा.’
डॉक्टर म्हणे, ‘तरीबी त्येच. कळलं नाही हे मान्य करणं केंव्हाही ब्येस! चुकीचं कारण जोडलं की थांबतो शोध. मग चुकीच्याच कारणातून चुकीचा बोध. शेजीबाई तुला राहील पुन्हा. तपासून तपासून लावता येईल छडा. कहाणीचा ह्या, हाच आहे धडा. निसर्गानं व्यंगाचा घातला जर उखाणा, तर सोडून देऊ नका, सोडवून बघा.’
पुढे शेजीबाईनं काय केलं? भुलाबाईचा वसा घेतला. दिवस राहिले, तपास योजला. व्यंगोबाचा छडा लागला. त्याच्यावरती उपाय योजला. शेजीबाई प्रसवली. नाकी डोळी नीटस बाळ. दाट जावळ, रुंद कपाळ. अवघा आनंद झाला. व्यंगोबाचा फेरा टळला.
तर अशी ही व्यंगोबानाथाची कहाणी. वसा वसला मनोभावे. भाग्य धावत घरा आले. भुलाबाई आणि शेजीप्रमाणे तुमच्याही घरी भाग्य येओ. अशा रीतीने ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण.




Sunday 16 July 2017

बागुलबुवा

बागुलबुवा
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र. ९८२२० १०३४९

स्त्री-पुरुष समानतेचा नारा देत, प्रचंड गाजावाजा करत भरलेली एक आंतरराष्ट्रीय परिषद होती तिथे. ‘डॉक्टरांच्या नजरेतून समाजातील लिंगभेद’ असा काहीतरी विषय होता माझा. पंचतारांकित थंडीत मी माझं बोलणं उरकलं, हुकमी टाळ्या घेतल्या आणि उपस्थितांचे अभिवादन स्विकारत, क्षणभराचा सेलिब्रिटी स्टेट्स सांभाळत मी कॉफीच्या स्टॉलकडे गेलो. पुढचा कार्यक्रम एल.जी.बी.टी. (समलैंगिक इ.) आणि त्यांचे प्रश्न असा काही तरी होता. माझ्या इंटरेस्टचा अजिबातच नव्हता. आता मी बनचुका वक्ता झालो आहे. जायचं, बोलायचं आणि सटकायचं असा माझा खाक्या. इतरांचं ऐकणं अगदी क्वचित, तसाच काही महत्वाचा विषय असेल तर. त्यामुळे सटकण्यापूर्वी कॉफी घुटकत निवांतपणे चकाट्या पिटायला कोणी भेटतंय का हे मी शोधू लागलो. इतक्यात ऊंच, धिप्पाड, अशी एक नटवी बाई दमदार पावले टाकत थेट माझ्याकडे आली.
‘आत्ता माझंच प्रेझेन्टेशन आहे. ऐकायला ये रे. छान आणि महत्वाचं असणार आहे. ये तू नक्की.’ असा दमच दिला तिनी. ना ओळख ना पाळख, अशी अचानक एकेरीत शिरणारी ही कोण बाई, असा विचार करत मी स्तब्ध उभा.
‘ओळखलं नाहीस? मी सुद्धा नसतंच ओळखलं म्हणा, पण स्पीकर्सच्या लिस्टमधे तुझं नाव वाचलं आणि शंका आली, तूच तो म्हणून. मघाशी तुला बोलताना पाहिलं आणि लगेच ओळखलं.’ माझ्या चेहऱ्यावर भलंमोठ्ठ प्रश्नचिन्ह. इतक्यात तिनी एक डोळा मोठा केला, एक बारीक केला आणि  म्हणाली, ‘बागुलबुवाsss’. मी पुरता चाट पडलोय हे हेरून ती वाऱ्यासारखी निघून गेली.
गेली ती मला पार शाळेच्या दिवसात घेऊन गेली. शाळेत असताना आम्ही सारीजणं बाजारातल्या एका फेरीवाल्याला बागुलबुवाsss, म्हणून चिडवत असू. त्यामुळे ही कोणीतरी शाळेतली होती एवढं निश्चित. पण कोण? सुकन्या? वृंदा? जानकी? मेहेर? छे! अजिबात आठवत नाही. मी, ती कोण ह्याचा विचार करायचा नाद सोडून दिला. कॉफी पीत समोरच्या भिंतभर काचेतून बाहेरचं हिरवकंच दृश्य बघत राहिलो. अचानक त्याठिकाणी गावचा आठवड्याचा बाजार भरला, ऊन तापलं, माणसांचा गजबजाट सुरु झाला. मी आणि माझा मित्र गुंड्या माना उंचावून बागुलबुवाला शोधतोय.
बागुलबुवाचं खरं नाव काय होतं कुणास ठाऊक. बाजारात सगळे त्याला बुवा अशी हाक मारायचे आणि आम्ही, बागुलबुवा. बागुलबुवा हा सगळ्या पोरांच्या आवडीचा आणि कुतूहलाचा विषय होता. त्याच्या डोळ्यांकडे बघताच तंतरायची आमची. तो दिसायला काही वाईट नव्हता. उलट बराच होता. धट्टाकट्टा. उंचापुरा आणि तितकाच आडवाही, मोठा पण नीटस चेहरा, लांबच लांब हात... पण त्याच्या बाबतीत काहीतरी वेगळं होतं खास. काय ते आम्हाला शेवटपर्यंत कळलं नाही. तो म्हणे मुलं पळवतो, पोत्यातून. तो म्हणे अमावस्येला रात्रभर नदीत उभा रहातो. तो म्हणे आधी पोतराज होता. मंगळवार, शुक्रवार त्याच्या अंगात देवी येते. त्यामुळे  तो म्हणे कुडत्याच्या आत खणाची चोळी घालतो. त्याचे केस लांब वाढलेले, अस्ताव्यस्त, अगदी मानेच्याही खाली. कधी केसांचा बुचडा. गळ्यात मोठया मोठया रुद्राक्षमाळा, स्फटीकमाळा, कवड्याच्यामाळा, गंडे-दोरे. मनगटात, दंडात कडं. एकाच पायात वाळा. कधीतरी सापडला तो कसल्यातरी भानगडीत आणि पोलिसांनी त्याचा एक वाळा घेतला म्हणे; अशी गावभरची चर्चा होती. कपाळी मोठा टिळा, दाट काळ्या भुवया; आणि ते डोळे. ते भयंकर होते. एक मोठ्ठा, भेदक नजरेनी आपल्याकडे पहाणारा. दुसराही मोठ्ठाच पण काही तरी विचित्र होतं त्या डोळ्यात. आम्ही डोळे फाडफाडून त्याच्या त्या डोळ्याकडे पहायचो. कोणी तरी सांगितलं होतं, त्याचा एक डोळा बकरीचा आहे. पतौडीचाही एक डोळा बकरीचा आहे आणि याचाही. पण कोणता ते सांगणं आम्हाला कठीण होतं. आम्हाला म्हणजे त्या वेळी चौथी-पाचवीत असण्याऱ्या गावातल्या सगळ्याच मुलांना. तो भेटला की आमची शोधक नजर आणि त्याची भेदक नजर यांची गाठभेट ठरलेली. त्याचे ते डोळे हीच त्याची ओळख झाली. त्याच्याबद्दल बोलताना आम्ही एक डोळा लहान एक मोठा करायचो आणि म्हणायचो, ‘बाग्गुलबुवाsss!’ बस्स, फिदीफिदी हसायला एवढं कारण पुरेसं होतं की.
स्वच्छ पायजमा आणि लांब ढगळ कुडता घालून तो बाजारात चौकात उभा असायचा. त्याच्याकडे जायचं कारण म्हणजे त्याच्याकडे असायचा मोठाच्या मोठा तक्ता. त्याला एक लांब काठी लावलेली. ह्या काठीच्या मदतीनी तो तक्ता उंचच ऊंच धरायचा. त्यावर आडव्या आडव्या लावलेल्या दोऱ्या आणि त्या दोऱ्यांवर नवलाईची सारी दुनिया लटकलेली असायची. उंचावर हवेत डोलणारे फुगे, फुग्यांचे पोपट, बदकं, माकडं, रिंगा आणि काय काय. मग वाऱ्यावर गरागरा फिरणारी रंगीबेरंगी भिरभिरी. काही सिंगल काही चक्क डबल. मग प्लॅस्टिकचे पोपट, बाहुल्या, मांजरं, कुत्री, अस्वलं. खालच्या ओळीत गाड्या, बस, डबल डेक्कर, रिक्षा, ट्रक, टमटम. मग खुळखुळे, शिट्या, भोवरे, गलोल, कॅमेरा, दुर्बीण, बासऱ्या, टिकटिक, रंगीत कागद, झीगाचे दोरे, काठीवर चढणारं माकड, हातपाय हलवणारा जोकर, पळणारा नाग, पिळदार पट्टीवरून ढकलल्यावर ऊंच उडणारा पंखा, पिसाच्या टोप्या, पिपाण्या, पिंगण्या, गंडे, दोरे, ताईत, चष्मे, रंगीत गॉगल, घड्याळ, डमरू, छोटे ढोल, बॉल, पिना, रिबिनी, भातुकलीचा सेट, डॉक्टर-डॉक्टर खेळायचा सेट, सापशिडी, बुद्धीबळ, चिंचोके, चींचा, आवळे, बोरकूट, तऱ्हेतऱ्हेच्या जादू... स्वप्नातली खेळण्यांची दुनिया हा हातावर तोलत बाजारभर हिंडत असायचा. लांबून आधी वाऱ्यावर डोलणारे फुगे दिसायचे. मग गर्दीतून माना वर करत करत आम्ही त्याचा माग काढत जाणार. घरी हट्ट करून मोठया मुश्कीलीनी मिळवलेले रुपया दोन रुपये, आमच्या बालमुठीत घट्ट धरून, अखेर त्याच्या अजब दुनियेसमोर उभे ठाकणार. इतक्या सगळ्या रंगीत संगीत दुनियेतलं काय घ्यावं आणि काय नको असं होऊन जाणार मनात. त्याच डोळा चुकवून, त्याचा डोळा बघण्याचा उद्योगही सुरूच असणार. आजुबाजुला ऊन मी म्हणत असणार, बाजाराची अखंड कलकल चालू असणार, माणसांचे आणि कांदे, मसाले, मासे, मिठाई असे कसले कसले वास दरवळत असणार. ग्राहकांशी हुज्जत घालत सगळे दुकानदार जेरीस आलेले असणार. कुणाच्या पिशवीचा बंद तुटणार, तर कोणी घसरून पडणार. कुणाचं किरकोळ कारणावरून वाजणार, तर कुणाच्या पाटीतली कोथिंबीर शेळी पळवून नेणार. असा सगळा जगरहाटाचा गजर चौफेर चालू असणार. पण बागुलबुवाच्या झगमगत्या रंगरसिल्या दुनियेनी आमची नजरबंदी केलेली.
नुसत्या नजरेनीच आमच्या चिमुरड्या हृदयाचा थरकाप उडवणारा हा इसम बोलायला लागला की एकदम मधाळ होऊन जाणार. काय ‘हवं बाळ तुला?’ किनऱ्या आवाजात त्याचा प्रश्न. त्याच्या अवताराच्या मानानी त्याचा आवाज अगदीच गोड होता. वनराजानी डरकाळी फोडण्यासाठी छाती भरून वारा पिऊन घ्यावा आणि मान उंचावून जंगल दणाणून सोडणारी डरकाळी फोडावी आणि प्रत्यक्षात त्यातून निव्वळ म्यांsssव आवाज यावा, तर कसं वाटेल? तसा त्याचा आवाज होता.
मधूनच तो चक्क पुरुषी आवाज काढायचा. मग काय विचारता, वरातीत बँडपेक्षाही कर्कश्श सुरात द्वंद्वगीत म्हणायला याला जाम मागणी. लग्नसराईत हा बिझी. एका हातगाडीवर इलेक्ट्रिक ऑर्गन, बॅटरी, अॅम्प्लीफायर अशी सगळी यंत्रणा. ती गाडी सर्व बाजूनी नटवलेली. मोर, हती, असं काही तरी डिझाईन. त्याप्रमाणे मयूर ब्रास बँड किंवा गजराज ब्रास बँड असं काही तरी नाव. तिथून निघालेली वायर मोठया लाऊड स्पीकरपर्यंत लोंबकळत जाणार. हा लाउड स्पीकर एखाद्या किरकोळ पोरांनी बांबूच्या टोकावर उंचावलेला. वरात सुरु होताच बागुलबुवा ‘हॅलो’ म्हणणार... आणि काय आश्चर्य, त्या कर्ण्यातून आवाज निघणार, हॅलोs, हॅलोss, हॅलोsss!!! ही सारी आम्हाला बागुलबुवाचीच करामत वाटणार. वराती मागून, ही मजा बघायला, आमचीही घोडी निघणार. बाज्यावरची कर्कश्श लयकारी समेवर येताच बागुलबुवा लताच्या आवाजात सुरु करणार; ‘कोयल बोली’, लगेच कोकिळेचा आवाज ‘कुssहूss’; पुन्हा लता ‘दुनिया डोली’, पुन्हा कोकिळा ‘कुssहूss’... आणि रफीची ओळ येताच तसाही आवाज काढणार. लता, कोकिळा आणि रफी अशी एकमुखी जुगलबंदी चालू होणार. बघे खूष. कुणी खुषीनं काही हातावर टेकवणार. बागुलबुवा खूष. आम्हाला खिशातून आवळे, चींचा असं काढून देणार आणि म्हणणार, ‘पळा रे पोरांनो, घरी वाट बघत असत्याल’ आणि गुंड्याला म्हणणार, ‘भूक लागली का रे तुला? चल हाटेलात जाऊ.’
गुंड्यावर त्याची खास माया. त्याला तो खारखंडेच्या हॉटेलात नेणार, भजी, जिलबी असं काय काय खायला देणार. एकूणच बागुलबुवा भेटला की गुंड्याची चैन असायची. गुंड्या त्याला घाबरायचाच नाही मुळी. मग आमचीही हळूहळू भीड चेपली. बाजार भरायच्या आधी तो मारुतीच्या पारावर बसून तयारी करायचा, तक्ता भरायचा. कधीकधी आम्हीही जायचो मग. त्याला फुगे फुगवून द्यायचे, सायकलच्या पंपानी हवा भरायची आणि मग तो त्याची चित्र बनवणार. एक फुगा पिरगळला, की त्याचे दोन टंबू तयार. एक छोटा, एक मोठा. एक तोंड, एक पोट. त्याला लांब काकडी फुग्याची शेपूट जोडणार. गळयाभोवती आणखी एक काकडी फुगा गोल बांधणार, झालं माकड तयार. कधी कधी पिपाणीच्या पुंगळ्या, शिट्या, रंगीत कागद, पीसं असा सगळा माल पारावर पसरून आम्ही त्याच्या देखण्या पिपाण्या बनवत असू. काठ्यांच्या तीकाटण्याला सायकलच्या टायरची रबरं जोडून गलोल बनवत असू. रबरी खेळण्याच्या बुडाशी शिट्टी बसवत असू. पोपटात, शेठशेठाणीत, आणि माकडात एकच शिट्टी असते हा शोध मला तिथेच लागला. हळूहळू बागुलबुवाशी चांगलीच गट्टी जमली. शिडाची बोट मला येत होती पण नांगर होडी, डबल बोट, तिळगुळाचा डबा, फोटो फ्रेम, हे सगळं बागुलबुवानी शिकवलं. हातात कला होती त्याच्या. होळीत सोंगाच्या जत्रेसाठी मुखवटे बनवावेत तर बागुलबुवानीच.
पुठ्ठा, सुतळी, दोरा, कात्री, ब्लेड, सुरी, रिकामी रीळं, डिंक, सरस, झीग, कलाबूत, झिरमिळ्या, चकमक, पतंगाचे कागद, गोटी कागद, पताका कागद, हात कागद, असल्या जीवनावश्यक गोष्टी त्याच्या तक्त्यामागच्या पिशवीत असायच्या. आम्हाला त्या पिशवीला हात लावायची सक्त बंदी होती. गुंड्याला मात्र मुक्तद्वार. त्याला तर तो जादूही शिकवायचा. फुकट.
आम्हाला मात्र जर जादू विकत घेतली तरच तो ती शिकवायचा. फक्त एकालाच. अर्थात विकत घेणाऱ्या मुलाला. पिंपळाखाली पारावर, मारुतीच्या देवळामागे गुडघ्यावर बसून आमच्या लेव्हलला येऊन तो ती शिकवायचा. त्याच्या मांजरीसारख्या ऊंच आवाजात मंत्र पुटपुटून दाखवायचा. आमच्याकडून म्हणून घ्यायचा. जादू करवून घ्यायचा. अगदी नीट जमेपर्यंत घोटून घ्यायचा. ‘जा आता तिच्या मारी, चकित करून सोड साऱ्या मित्रांना’, असा आशीर्वाद देत गालगुच्चा घ्यायचा.
त्यातली विमानाची घोडागाडी करायची जादू खासच होती. एक काच. एका कागदात मधोमध खिडकी करून तिथे बसवलेली. त्या कागदावर, उलटया सुलट्या दोन्ही बाजूला  वेगवेगळ्या वाहनांची चित्रं. आधी विमान काचेवर येईल अशी घडी घालायची मग विरुद्ध बाजूनी काचेतून विमान दाखवायचं. मग विचारायचं, आता कोणतं चित्र काचेत आणू? समजा घोडागाडी हवीय, तर आता घडी घालताना घोडागाडी काचेवर येईल अशी सुरुवात करून घडी घालायची. उलगडताना मंत्रबिंत्र म्हणून विरुद्ध बाजूनी उघडायचं. झाली जादू.
जादू नीट शिकली की म्हणायचा, ‘जा, जा मारतीच्या तोंडाचं गुळखोबरं खा जा.’ कोणीतरी मारुतीच्या ओठाला गुळखोबरं चिकटवून गेलेलं असायचं. आम्ही बिचकायचो. साक्षात भीमरूपी महारुद्राच्या तोंडचा घास पळवायचा म्हणजे काय. पण बुवा धीर द्यायचा, म्हणायचा, ‘अरे खा तू, मी आत्ताच मंत्र टाकलाय. मारुतराया काsssही नाही करणार तुला.’ एवढा दिलासा पुरेसा असायचा.
कधी  रंगात आला तर, ‘ओ दुनिया के रखवाले, सुन दर्दभरी मेरी आहें’, हे त्याचं ठरलेलं गाणं. शेवटी टिपेच्या आवाजात ‘भगवाsssन भगवाsssन’ करायला लागला, की आम्ही खो खो हसायला सुरु. मग तो चिडणार. चांगल्या दहा बारा ठेवणीतल्या शिव्या हासडणार. वातावरण गंभीर.
‘काय रे, खुटाएवडा न्हाईस आनी मोठया माण्साला ह्स्तूस व्हय? भाड्या, गाता येतंय का सोत्ताला? मला ह्स्तूस?’ आम्ही धूम.
असा हा बागुलबुवा. घरचं कोणच नव्हतं म्हणे त्याला. कोण म्हणायचं बीडकडचा आहे. इथे जगायला आलाय. कोण म्हणायचं मुंबईला बिऱ्हाड आहे त्याचं. एकदा जीवाचा धडा करून आम्ही विचारलं त्याला,
‘बुवा, बायको कुठाय तुमची?’
‘अजून केली न्हाई. करणार बी न्हाई. तिच्यामारी तिच्या, आमाला कोन पोरगी देनार? बारा***चं आमी, योक वेळ नवरा मिळंल!’ ह्या त्याच्या जोकवर आम्ही सगळे खिदळत सुटणार. मग तोही आमच्याकडे चौकश्या करणार.
‘आई कुठे झोपते रे?’
‘बाबांजवळ.’
‘... आन् बाबा?’
‘आईजवळ.’
‘आन् तू?’
‘दोघांच्या मधे.’
मग बुवा खिं खिं खिं करून खिदळणार.
त्याच्या असल्या विचित्र प्रश्नांमुळे, त्याच्या बद्दलच्या गावगप्पांमुळे तो गूढ आणि भयप्रद वाटायचा आणि त्याच्या त्या हस्तकलेमुळे, खेळण्यांमुळे तो हवाहवासाही वाटायचा. मुलांना रमवण्याची हातोटी होती त्याच्याकडे. त्याच्या पोतडीतून कागद कात्री असं भराभरा बाहेर काढून, मिनटा दोन मिनिटात तो कागदाचा टुमदार बंगला बनवत असे. वर उतरतं छप्पर, पुढे गॅलरी आणि उघडणाऱ्या दारं खिडक्या. दिवाळीतल्या माझ्या किल्यावरची सारी घरं श्री बागुलबुवा प्रसन्न असल्यामुळेच शक्य होत.
एकदा ऐन दिवाळीचे दिवस होते. शाळेला सुट्टी त्यामुळे आम्ही किल्ला करण्यात मग्न. किल्यावर माती थापता थापता अचानक कोणीतरी मागे आहे असं वाटलं. बघतो तर काय? बागुलबुवा. रुंद हसत त्यानी किल्याचं कौतुक केलं आणि पिशवीतून एक सुबक शिवाजी काढला. बरोब्बर किल्यावर ठेऊन दुरून न्याहळत राहिला. तो शिवाजी किल्याच्या मापाला अगदी फिट्ट बसत होता. अगदी ऐटबाज आणि देखणा होता तो. आमची बाकीची चित्रं त्याच्यापुढे आता अगदी मातीचे ठोकळे वाटायला लागली. बागुलबुवानी स्वतःच घडवला होता तो, गुंड्यासाठी.  पण गुंड्या अचानक परगावी गेल्यामुळे तो आमच्या वाट्याला आला होता. आम्हाला शिवाजी आवडलाय म्हटल्यावर बुवाही खुशीत आला. भराभर त्यानी किल्याभोवती रस्ते आखून दिले. आमच्या ओबडधोबड तट-बुरुजांवर ब्रशचा जादुई हात फिरवून अगदी खऱ्यासारखे करून दिले. वाघाची गुहा करून दिली. एका बशीत पाणी ठेऊन त्याचं तळं बनवून दिलन आणि गुंड्या गावाहून कधी येणार? शाळा कधी सुरु? अशी चौकशी करून तो निघूनही गेला.
शाळेबद्दल त्याला अपार उत्सुकता.
‘काय शिकीवत्यात रं तिथं?’
‘इतिहास, भूगोल, गणित, भाषा...’ मी.
‘श्या द्यायला शिकीवत्यात का? त्ये महत्वाचं हाये.’
‘नाय बुवा.’
‘न्हायी? हात तुच्या **ला.’
‘तर्री शिव्या येतात की मला.’ माझी फुशारकी.
‘ आंग आश्शी!, चल, पाठोपाठ पाच शिव्या हाण बगू सणसणीत, तुला पाच पैशे देतो.’
मग काय, पाचच्या जागी दहा शिव्या पाठोपाठ हासडल्या की मी. स्वकमाईचे पाच पैसे म्हणजे केवढा आनंद तो. शाळेत बाईंना दाखवायला म्हणून ते नाणं मी जपलं होतं पण ही कमाई काय केल्यामुळे झाली हे सांगावं लागेल म्हणून तो नाद मी सोडून दिला. बुवाकडूनच त्या पाच पैशाचं मी बोरकूट घेऊन खाल्लं.
यत्तामागून यत्ता गेल्या. बागुलबुवाच्या खेळण्यांपेक्षा आता आम्ही मोठे झालो. आता बागुलबुवाचं ना भय उरलं ना कौतुक. अशीच एकदा शाळेला सुट्टी होती. पण ती सुट्टी वेगळीच होती. त्या सुट्टीत गुंड्या दहावीत जाणार म्हणून त्याच्या बापानं त्याला ‘फुलप्यांट’ घेतली होती. त्या सुट्टीत वर्गातल्याच शकिलाची बारात आमच्या घरावरून गेली होती. त्या सुट्टीत नदीत पोहताना मी पहिल्यांदा चड्डी घातली होती आणि त्याच सुट्टीत बुडाला पहिल्यांदा सायकल फुटली होती.  त्या सुट्टीत आम्हाला गाव हुंदडायचा नाद लागला होता. त्या सुट्टीत कुठले कुठले गल्ली बोळ, कधीही न ढुंढाळलेल्या वाटा, न पाहिलेल्या वड्या वस्त्या आम्ही पालथ्या घातल्या होत्या. त्या सुट्टीत आमचं विश्व अचानक विस्तारलं होतं.
एकदा तर पार ओढ्या काठावरून गावाबाहेर पडलो आणि शेताच्या वाटेनी वेडावाकडा वळसा घालून एका फुफाट्याच्या रस्त्याला सायकल घातली, तर एक प्रचंड पडकी दगडी भिंत आणि मोडकी वेसच समोर उभी ठाकलेली. रणरणती दुपार होती. सर्वत्र स्तब्ध शांतता होती. पान सुद्धा हलत नव्हतं. वेशीकडेच्या पिंपळावर निळ्या हिरव्या माशा जोरात गुंगुं करत पिंगा घालत होत्या आणि पिंपळाच्या ढोलीत एक पिंगळा थेट आमच्याकडेच बघत होता. हा कोणता वेगळा गाव म्हणून चौकशी करायला आम्ही वेशीलगतच्या पडक्या वाड्याच्या तोंडाशी थांबलो. पहातो तर काय आत गुंड्या! तिथल्या मोडक्या बाजेवर एका बाईशेजारी तो अगदी खेटून बसला होता. ती बाई जरा जास्तच नटली होती. आम्ही बघतच राहिलो. हा इथे काय करतोय? गुंड्याचं घर तर पेठेत आहे. गुंड्याला आम्ही हाक मारणार इतक्यात त्या बाईनी आमच्याकडे वळून बघितलं. ती नजर! तो डोळा!! आम्ही शहारलो. ती बाई नव्हतीच. बाईच्या वेशातला बागुलबुवाच होता तो. आम्हाला पहाताच दोघं आतल्या खोलीत पळाले. दार लावून घेता घेता  दाराआडचा तो खेळण्यांचा तक्ता दारातच धाडकन कोसळला. ते दार लागलंच नाही. खेळण्यांची दुनिया मात्र तक्त्यावरून निखळून अस्ताव्यस्त विखरून पडली. क्षणमात्र भीतीची शिरशिरी अंगभर पसरली, आम्ही सायकलवर टांग टाकली आणि जीव खाऊन पँडल मारत बाणासारखे जात राहिलो, जात राहिलो.
त्यानंतर गावात ना कधी बागुलबुवा दिसला ना गुंड्या. चार दिवस चर्चा झाली आणि गावात पुन्हा एकदा सगळं यथासांग सुरु राहीलं. इतक्या वर्षात बागुलबुवाही मला कधी भेटला नाही आणि गुंड्याही नाही.
‘मी गुंड्या!!!’ खणखणीत आवाजानी मी भानावर आलो. दचकून आसपास बघितलं.
‘आला नाहीस आत? दणदणीत स्पीच दिलं मी. एव्हरीवन माईटी इम्प्रेस्ड!!’ तीच ती मघाचची बाई. मी काही बोलणार इतक्यात ती स्वतःहूनच म्हणाली,
‘मी, मीच गुंड्या!’
‘तू??? गुंड्या???’
आश्चर्य आणि अविश्वासाचा पहिला भर ओसरल्यावर सारे खुलासे झाले. गावातून परांगदा झाल्यावर दोघं मुंबईला आले. इथे समानधर्मा, समानशील लोक भेटले. आहे त्या स्वरूपात स्वतःचा संपूर्ण स्विकार हळूहळू शक्य झाला. बागुलबुवाला बॉलीवूडमधे मेकअपचं काम मिळालं. हातातलं कसब उपयोगी आलं. अनेक खस्ता खात गुंड्या त्याच्या हाताखालीच शिकला. आता तोही कामं घेतो. गुंड्याला आता खूप मान आहे म्हणे तिथे. तो गुडियारानी म्हणून प्रसिद्ध आहे. नुसतीच गुडियारानी नाही, गुडियारानी‘जी’ आहे तो आता. उरलेल्या  वेळात बागुलबुवा आणि गुडीयारानी समलैगीकांच्या संघटनेचं काम करतात. आजही ह्या पंचतारांकित आंतरराष्ट्रीय परिषदेपुढे आपली व्यथा मांडायला ती आली होती.
बागुलबुवाही मजेत आहे म्हणे. मालाडला रूम घेतली आहे. गाणंही शिकला आहे. रोज रात्री बारमधे गायलाही जातो. कांजीवरम् साडीतला त्याचा फोटो गुंड्यानी मोबाईलमधे दाखवला. काय देखणा दिसत होता तो... लावण्यवती! चेहऱ्यावर तर वयाचा मागमूस नव्हता. मेकअपची किमया. ह्या मेकअपनी आणखी एक किमया साधली होती. बागुलबुवाचा तो भीतीदायक डोळा आता अगदी नीट झाला होता.
स्वतःच्याच कौशल्यानी बागुलबुवानी स्वतःचा डोळा तर सुधारला होता, आता तो आणि गुडियारानी जगाचा दृष्टीकोन बदलू पहात होते.


Monday 3 July 2017

चुकवू नये असं काही...

चुकवू नये असं काही...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
मो. क्र. ९८२२०१०३४९

आजकाल दिवस राहीले रे राहीले, की हातभर तपासण्या ह्या ठरलेल्याच. ही यादी बघूनच सासूबाई इत्यादी माणसं सवयीनं हतबुद्ध होतात, त्याचे पैसे ऐकून माना टाकतात आणि ‘आमच्या काळी एवढ्या पैशात आख्खं बाळंतपण’ झाल्याच्या कथा सांगतात. सासुबाईंच्या या तक्रारीला अनेक छटा असतात. कधी अत्याधुनिक तपासण्यांविषयी कौतुक, आदर आणि आश्चर्य असतं तर कधी ही लुटारूगिरी नाही कशावरून असा अभिनिवेश. कधी कधी तर  आपल्यावेळी आपल्याला ह्यातलं काही वाट्याला आलं नाही म्हणून सुप्त असूयासुध्दा असते. या खर्चाला मग आडून आडून विरोध केला जातो. जे आणि जेवढं आपल्याला मिळालं ते आणि तेवढंच सुनेला मिळावं असा सूर असतो. जास्त तर नकोच नको. पण त्याच वेळी स्वतःचं औषधपाणी मात्र यथायोग्य चालू असतं.  ‘माज्या सासूला बिलड प्रेशर आणि डायबीटीजचं औषध मिळालं न्हाय तवा म्या बी  घेनार न्हाय!’ अशी भूमिका मात्र सासूबाई घेत नाहीत.
इतक्या सगळ्या तपासण्यांची गरज असते का?, हा वेगळा प्रश्न आहे. पण इतकं करूनही, काही वेळा काही महत्वाच्या तपासण्या बड्या-बड्या ठिकाणीही केल्या जात नाहीत. काही वेळा (पेशंटचे) पैसे वाचवण्यासाठी डॉक्टर सांगत नाहीत. काही वेळा त्या त्या भागात ती तपासणी करण्याचा रिवाज नसतो. फार तपासण्या सांगितल्या की पेशंट तपासण्या तर करणार नाहीतच पण परस्पर डॉक्टर बदलतील; ही साधार भीतीही असते. हा कट प्रॅक्टिसचा भाग असावा अशी शंकाही लगेच पेशंटच्या मनात येणार. ह्या सगळ्या संशयकल्लोळात काही तपासण्या केल्याच जात नाहीत.
कारण काहीही असो सर्वसाधारणपणे टाळली जाणारी पण चुकवू नये अशी तपासणी मी सुचवू इच्छितो. पेशंटनीच ह्या टेस्टचा आग्रह धरायला हवा. हिमोग्लोबिनची तपासणी सर्वांचीच केली जाते. पण ही अपुरी आहे. या बरोबर ‘पीबीएस’ही व्हायलाच हवी आणि ‘एच.बी. इलेक्ट्रोफोरेसीस’ ही  तपासणीही व्हायला हवी. ‘एच.बी. इलेक्ट्रोफोरेसीस’ ही खूप खूप महत्वाची आहे. थॅलेसेमिया आणि असे इतर काही विकार या चाचणीत कळतात.
भारतात ‘थॅलेसेमिया मायनर’ हा साधारण ३ ते ४% जनतेत आढळतो. बोहरी, सिंधी, पंजाबी जनात तो अधिक प्रमाणात आहे. थॅलेसेमिया मायनर या आजारात आईच्या अंगात रक्त (हिमोग्लोबिन) कमी असतं आणि काही केल्या ते वाढत नाही. नॉर्मली, शरीरात रक्त तयार होत असतं आणि नष्टही होत असतं. याचा समतोल साधला जातो आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण १२ ग्रॅम पर्यंत राखलं जातं. थॅलेसेमियासारख्या आजारात हा तोल ढळतो. काही अनुवंशिक दोषामुळे रक्त नष्ट होण्याचं प्रमाण वाढतं आणि अंगात (कायमच) हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी रहातं. याला ‘थॅलेसेमिया मायनर’ असं म्हणतात. हा सौम्य आजार आहे. गर्भारशीला काही थेट त्रास होत नाही. लहानपणापासूनच कमी रक्तात भागवायची तिच्या शरीराला सवय होऊन जाते. लागलंच तर रक्त भरावं लागतं.
मात्र असा सौम्य, अर्धामुर्धा, (थॅलेसेमिया मायनर) आजार आई आणि बाबा दोघांना असेल, तर मात्र होणाऱ्या बाळाला ‘पूर्ण आजार’ (थॅलेसेमिया मेजर) होण्याची शक्यता असते. ‘पूर्ण आजारात’ रक्त नष्ट होण्याचं प्रमाण एवढं असतं, की सतत रक्त भरल्याशिवाय बाळ जगू शकत नाही. जन्मानंतर काही दिवस बरे जातात. मग बाळांचं रक्त कमी-कमी होऊ लागतं. रक्त निर्माण करण्याची प्रक्रिया शरीराकडून आपोआप वेगवान केली जाते. पण हा प्रयत्न अपुरा पडतो. रक्त भरलं की ते मूल तेवढ्यापुरतं ताजंतवानं होतं. पण हे उधारीचं रक्त शरीरात फार काळ टिकत नाही. तेही नष्ट होतंच. पुन्हा रक्ताचा दुष्काळ सुरु. अशक्त, किरकिरं, पोट फुगलेलं, पांढरं फटक पडलेलं, मरणपंथाला लागलेलं हे मूल बघवत नाही. मुलाबरोबर आख्ख कुटुंबच जणू आजारी पडतं. असह्य शारीरिक, आर्थिक, भावनिक ताणातून पिळवटून निघतं.  रक्ताच्या बाटलीला टांगलेला हा जीव लवकरच जगाचा निरोप घेतो. आता आधुनिक उपचारांमुळे कांही मुलं जगतात, तगतात. पण हे क्वचित, खूप खूप खर्चिक आणि बेभरवशाचं. हे सगळं सोसण्यापेक्षा तपासणी केलेली लाखपटीनी चांगली.
टेस्ट असतात दोन प्रकारच्या, एचबी इलेक्ट्रोफोरेसीस आणि क्रोमॅटोग्राफी. पहिली स्वस्त (सुमारे रू ५००/-), पण जरा कमी माहिती देणारी. दुसरी महाग (सुमारे रू १०००/-), पण बिनचूक, खात्रीशीर. बिनचूक टेस्ट करून घेतली तर उत्तमच. पण निदान स्वस्त टेस्ट करणं अत्यावश्यक आहे. हीही परवडत नसेल, तर निव्वळ ‘पीबीएस’ नीट अभ्यासून पुढील तपासणीची आवश्यकता आहे का नाही याचा अंदाज डॉक्टर सांगू शकतात. किमान एवढं तरी करणं गरजेचं आहे. स्वस्त, महाग हे सापेक्ष शब्द आहेत. ज्यांना मरणासन्न मूल जन्माला घालणं टाळता येतं, त्यांच्या दृष्टीनी ह्या तपासणीची किंमत अमूल्य असते. आयुष्यात ही तपासणी फक्त एकदाच करावी लागते. तोच रिपोर्ट जन्मभर चालतो. तो काही बदलत नाही.
अशा आजारी मुलाचा जन्म टाळणं हे फक्त आणि फक्त अशी टेस्ट करूनच शक्य आहे. आई आणि बाबांना, दोघांनाही अर्धा आजार असेल तर मुलाला पूर्ण आजार (थॅलेसेमिया मेजर) असण्याची शक्यता असते २५%.
या जोडप्याची ५०% मुलं ही ‘थॅलेसेमिया मायनर’  प्रकारचा म्हणजे सौम्य आजार घेऊन जन्मतात. ही मुलं त्यांच्या आई-बाबांसारखी असतात. ह्यांना काहीही विशेष त्रास होत नाही. पण ही मंडळी हा आजार पुढील पिढीत संक्रमित करू शकतात. ह्यांनी जोडीदार निवडताना मात्र ‘मायनर’ जोडीदार टाळला पाहिजे.
२५% संतती ही ‘नॉर्मल’ असते. अनुवंशिकतेच्या द्यूतामधले हे थॅलेसेमियामुक्त, व्याधीमुक्त  विजेते.
मायनर दांपत्याला तिसऱ्या महिन्यात बाळाच्या वारेचा तुकडा तपासून वा नंतर गर्भजल परीक्षा करून, बाळ थॅलेसेमिया मेजरग्रस्त आहे का थॅलेसेमिया मायनर आहे का नॉर्मल; ह्याची खात्री करून घेता येते. मुलाला हा जीवघेणा आजार आहे असं कळलं, तर गर्भपात करून घेता येतो. मायनर वा नॉर्मल असेल तर मूल होऊ देता येतं. मात्र दर गरोदरपणात वार/गर्भजल चाचणी करावी लागते. दरवेळी मुलात जीवघेणा आजार असण्याची शक्यता २५% असते. हा आजार टाळण्याचा सध्या उपलब्ध असलेला हा एकमात्र मार्ग आहे. म्हणून म्हणतो, चुकवू नये अशी ही तपासणी आहे. तुम्हाला डॉक्टरांनी सांगितली नाही तर तुम्ही डॉक्टरना सुचवा पण तपासणी चुकवू नका.
वरील विवेचन हे थॅलेसेमियाबद्दल असलं तरी ते सिकल सेल अॅनिमिया व तत्सम आजारांनाही लागू पडतं. आपल्याकडे विदर्भात सिकल सेल अॅनिमिया फार.

आणखीही एक सूचना. ही तपासणी लग्नाआधी केली तर मायनरग्रस्तांना आलेली मायनरग्रस्त स्थळं नाकारता येतील. मायनर-मायनर विवाह टाळले म्हणजे पुढचं सगळं रामायण टळेल. आधुनिक पत्रिकेतला हा ‘नॉट अलाउड’ विवाह ठरतो. त्यांनी इतर धट्याकट्यांशी लग्न करायला हरकत नाही. ह्यामुळे मेजर आजार टळतो. पण अशातही  संततीला ‘मायनर’  आजार संक्रमित होऊ शकतो. यांनी विशेष बिघडत नाही. वर उल्लेखल्याप्रमाणे मायनरवाल्यांनी जोडीदार निवडताना काळजी घेतली की झालं. लग्नापूर्वी पत्रिका पहाण्याचा सार्वजनिक मूर्खपणा जाता जात नाही आणि आधुनिक पत्रिकेच्या नावाखाली गुरुजी मंडळीच ब्लड ग्रुप वगैरे तपासण्या करायला सांगतात. ब्लड ग्रुपचा संबंध ना वैवाहिक सौख्याशी आहे ना संतती सौख्याशी. या तपासणीचा संबंध थेट संतती-स्वास्थ्याशी आहे. तेंव्हा ब्लड ग्रुप तपासला नाही तरी चालेल, गर्भसंस्कारी पुजेअर्चेला फाटा दिला तरी चालेल, पण ही तपासणी करावीच करावी.