Tuesday 28 August 2018

पीसीओडी


पीसीओडी


पीसीओडी (PCOD) ही भानगड काय आहे? आजकाल हे पीसीओडी, पीसीओडी फार ऐकू येते. पीसीओडी म्हणजे पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डीसीज. शब्दशः अर्थ, स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजेच बीजे दिसणे. याशिवाय इतरही बरेच काही दिसते. म्हणूनच काही वेळा डिसीज, म्हणजे ‘आजार’ असे न म्हणता सिंड्रोम, म्हणजे ‘लक्षण सम्मुच्चय’ असा शब्द वापरतात. सहसा डिसीजची कारणमिमांसा माहित असते, आणि निराकरण मिमांसाही बरीचशी ठरलेली असते. सिंड्रोम हा जरा ऐसपैस प्रकार आहे. ते असो. नावात काय आहे?
संप्रेरकातील घोटाळ्यामुळे उदभवणारा हा एक आजार आहे. यात स्त्रियांच्या शरीरात पुरुषरसांचे (Androgens)  प्रमाण वाढते. परिणामी स्त्रीबीजनिर्मिती महिन्याच्या महिन्याला होण्याऐवजी,  अधून मधून व्हायला लागते. सोनोग्राफी केली, तर स्त्रीबीजग्रंथीत अर्धविकसित बीजांची रेलचेल दिसू लागते.
खूप बायकांना असतो हा विकार. दर विसात एखाददुसरीला. प्रत्येकीला त्रास होतोच, असेही नाही. बरेचदा काही सुद्धा होत नाही. पाळी नियमित येत रहाते, मुले होत रहातात आणि ओव्हरी पॉलीसिस्टिक दिसत रहातात. काहीत पाळी थोडी पुढे जात रहाते, वजन थोडे वाढते, थोडी मुरुमे येतात आणि अंगावर, चेहऱ्यावर लव थोडी जास्त रहाते; एवढेच. काहींना मात्र मूल रहात नाही आणि बहुतेकदा निदान होते ते मूल व्हायला उशीर होतोय म्हणून तपासण्या केल्या जातात तेंव्हा.

पीसीओडीचे कारण नेमके कळलेले नाही त्यामुळे जनुकीय दोष, एनव्हायरनमेंट, स्थौल्य वगैरे सराईत गुन्हेगारांवर वहीम आहे. आपल्याला एवढे ठाऊक आहे की, अशा पेशंटमध्ये मुळात पुरुषरसाचे प्रमाण वाढते. पुरुषरस वाढल्यामुळे लव वाढते. स्त्री-पुरुष दोघांत, अंगावर प्रतीचौरस सें.मि. जागेत, केसांची मुळे सारख्याच प्रमाणात असतात. फक्त पुरुषरस अत्यल्प असल्यामुळे स्त्रियांच्या अंगावरचे केस विशेष वाढत नाहीत. जे वाढतात ते अतिशय पातळ, पारदर्शक आणि आखुड असतात. त्यामुळे ते दिसत नाहीत. पीसीओडी असलेल्या मुलींना मुरुमेही जास्त येतात, तीही पुरुषरस वाढल्यामुळे. पुरुषरसाचाच परिणाम म्हणून शरीरात असलेले इन्सुलिन निष्प्रभ ठरते,  पुढे जाऊन शुगर वाढते, आपण म्हणतो, तिला डायबेटीस झाला बरेका. असलेले इन्सुलिन निष्प्रभ ठरल्यामुळे शरीरात अधिकाधिक इन्सुलिन निर्माण केले जाते. पण अती झाले आणि हसू आले यातला प्रकार. या अतिरिक्त इन्सुलिनमुळेच स्त्री-पुरुष संप्रेरकांचा तोल ढळतो आणि पुढचे रामायण घडते. एक प्रकारचे दुष्टचक्रच हे. पहिल्यामुळे दुसऱ्याला जोर येतो आणि दुसऱ्यामुळे आता पहिल्याला चेव चढतो.
स्त्रीपुरुष संप्रेरकांचा तोल ढळला की पुनरुत्पादनाची क्रिया बिघडते. बीज निर्मिती अनियमित होऊ लागते. पाळी पुढे पुढे जाते. वजन जास्त असेल, तर दिवस राहिले तरी गर्भ नीट रुजत नाही. अर्थात पीसीओडी आहे म्हणजे फक्त त्यामुळेच मुले होत नाहीयेत असे नाही. अन्यही कारणे असू शकतात. खरुज झाली म्हणजे नायटा होत नाही असे थोडेच आहे? तेंव्हा इतर कारणे नाहीत ना, यासाठीही तपासण्या कराव्याच लागतात. पीसीओडीचे  नेमके निदान करण्यासाठी एकच एक टेस्ट नाहीये. तक्रारी, शारीरिक तपासणी, सोनोग्राफी इत्यादींचा साकल्याने विचार करून रक्त तपासण्या सुचवल्या जातात. या पाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कराव्यात हे उत्तम.
कारण नेमके माहित नाही तेंव्हा उपचारही नेमके ठरलेले नाहीत. त्या त्या डॉक्टरचा कस पहाणारा हा आजार आहे. वजन जास्त असेल तर ते उतरवणे महा महत्वाचे आहे. एखादे व्रत करावे तशा निष्ठेने हा वसा घ्यावा. उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. वजन कमी करण्याचे फायदे अनेक. पीसीओडी तर आटोक्यात येतोच, पण पाळी नियमित होऊन दिवसही राहू शकतात. एकूणच दीर्घकालीन आरोग्यासाठी वजन नियंत्रण उपकारक ठरते. काही वेळा कितीही आटापिटा केला तरीही वजन रहित अवस्था काही प्राप्त होत नाही.  अशा काही पेशंटमध्ये, पचन क्रियेदरम्यान, चरबीसाठी आत जाणारा मार्ग असतो पण बाहेर येणारा मार्गच नसतो. यांना वजन कमी करण्याच्या ऑपरेशनचा चांगला फायदा होतो. पण त्या क्षेत्रातील तज्ञांचा विचार घेऊनच हा निर्णय घ्यावा.  
शरीरात इन्सुलिन भरपूर असूनही पेशी त्याला दाद देत नाहीत हे आपण वर पहिले. पेशींच्या या कोडगेपणावर उतारा म्हणून काही औषधे आहेत, उदाः मेटफोर्मीन (Insulin Sensitising Agents). एकदा हे दुरुस्त झाले की, वाढलेल्या इन्सुलिनचे दुष्परिणामही कमी होतात. पाळी नियमित यायला मदत होते. दिवस रुजायला मदत होते.
दिवस रहाण्यातील मुख्य अडचण, ही अनियमित स्त्रीबीज निर्मिती ही असल्याने, स्त्री बीज निर्मिती नियमित होईल अशी औषधे दिली जातात. गोळ्या, इंजेक्शने वगैरे गरजेनुसार वापरली जातात. कधी कधी लॅपरोस्कोपी करून बीजग्रंथींवर काही शस्त्रक्रिया केली जाते, ज्याने बीज निर्मिती सुलभ होते. काहीच उपयोगी ठरले नाही तर टेस्ट ट्यूब बेबीचा पर्याय अवश्य आणि वेळेत वापरावा.
एरवी गर्भ निरोधक म्हणून वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे अनेकानेक उपयोग आहेत. पीसीओडीवरती ह्या गोळ्या हे एक स्वस्त आणि परिणामकारक औषध आहे. याने पाळी अतिशय नियमित येते, पिशवीचे अस्तर मर्यादेत वाढते. रक्तस्राव मर्यादेत होतो. पुरुषरस कमी होतात, लव आणि मुरुमेही आटोक्यात येतात. अविवाहित किंवा इतक्यात मूल नको असलेल्या  स्त्रियांसाठी ही उत्तम मात्रा आहे.
तरूण मुलींना बरेचदा पाळी अनियमित येत असते. निदान होते पीसीओडीचे. यांना आणि यांच्या आयांना पाळी अनियमित म्हटले की भयंकर भीती वाटते. भ्यायला आमची काही हरकत नाही. पण कितीही समजावून सांगितले तरी आजाराचे स्वरूप समजावून घेण्याची त्यांची मानसिकता नसते, हे अधिक भयावह आहे. त्यांचा एकच धोशा, पाळी नियमित यायला पाहिजे असे एकदाच काय ते औषध द्या. पीसीओडी या आजारात अशी एकदाच एक गोळी नसतेच. पण या बायका अशी गोळी शोधत रहातात, शॉपिंग करत फिरत रहातात, डॉक्टर आणि दवाखाने बदलत रहातात, देशोदेशीचे वैद्य हकीम करत रहातात. पण अशी गोळी मिळत नाही. कारण तसा शोधच लागलेला नाही. आयांनी  आणि मुलींनी हे समजावून घेतले पाहिजे की पीसीओडी ही  शरीराची उपजत सवय आहे, हा आयुष्यभराचा आजार आहे. तो ‘बरा’ होत नाही, फक्त आटोक्यात ठेवता येतो. लग्न होईपर्यंत आणि पुढेही मूल हवे असा निर्णय होईपर्यंत, औषध चालू ठेवायला हवे. पण बहुतेकदा गोळ्या परस्पर बंद केल्या जातात. कारण प्रत्येक बाईच्या शेजारी एक ‘बाई’ रहात असते. ही ‘शेजारची बाई’ नावाची चीज फार महत्वाची ठरते. ती एकच वाक्य म्हणते; अखंड वाक्यसुद्धा नाही दोनच शब्द, ‘अग्गोबाईsss!! गोळ्याsss?’ मग पेशंटच्या आणि पेशंटमातेच्या काळजात कालवाकालव होते. छातीत धस्स होते. मनात चर्रर्र होते. आतड्याला पीळ पडतो. हृदयाला घरे पडतात. जीवाला घोर लागतो. शेजारच्या बाईच्या ‘अग्गोबाईsss!! गोळ्याsss?’ ह्या दोनच शब्दांची शाब्दिक गोळी बरोब्बर लागते. त्यांना वाटते गोळ्याची आता ‘सवय लागेल’. त्या बंदच केलेल्या बऱ्या. खरेतर मुलीला अनियमित पाळीची ‘सवय’ असते म्हणून तर गोळ्या सुरु केलेल्या असतात. त्यामुळे त्या घेणे शहाणपणाचे.
गोळ्यांविना पण अनियमित पाळी चांगली? का गोळ्या घेऊन नियमित पाळी चांगली?; असा हा पेच आहे. आमचे उत्तर आहे गोळ्या घेऊन पण नियमित पाळी चांगली! कारण पाळी अनियमित आली की अनेक त्रास होतात. आतले अस्तर उगीचच अव्वाच्या सव्वा वाढते, ‘पीसीओडी’चे इतर त्रास वाढतात, ई. ई. पण एकदा औषध करताच पुढे वर्षानुवर्षे बिन गोळ्यांनी नियमित पाळी आली पाहिजे, ही अपेक्षा डोक्यात फिट्ट बसलेली असते. त्यामुळे ह्यांना हे पटत नाही.
पीसीओडी साठी आयुष्यभर गरजेप्रमाणे विविध उपचार घ्यावे लागू शकतात. सुरवातीला लहान वयात, पाळी नियमित येण्यासाठी, मग मूल नको असेल तर तशा गोळ्या, मूल हवे असेल तर वेगळ्या गोळ्या, भरपूर मुले झाल्यावर पुन्हा वेगळ्या गोळ्या... तुमच्या आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर तुम्ही आहात यावर औषध बदलत जाते.
ह्या आजाराचे स्वरूप नीट समजावून घ्यायला हवे. साधक बाधक विचार करून कोणते उपचार निवडायचे हे ठरवायला हवे. वास्तववादी अपेक्षा ठेवायला हव्यात. अन्यथा अपेक्षांच्या ओझ्याखाली डॉक्टर दबून जातो आणि फक्त उपेक्षाच वाट्याला आली असे पेशंटला वाटत रहाते. दोन ध्रुवांवर दोघे आपण अशी अवस्था होते, दुसरे काय?


Thursday 23 August 2018

मेनोपॉॉज


मेनोपॉज
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

मेनोपॉज, ऋतूसमाप्ती, रजोनिवृत्ती म्हणजे पाळी बंद होणे. हे आज काल फार महत्वाचे झाले आहे. कोणे एके काळी मदर इंडियांची रेलचेल  असलेला भारत आज मिस इंडिया म्हणून मिरवतो आहे. आपल्या लोकसंख्येचे सरासरी वय सध्या  तरूण झाले आहे. पण आता आयुर्मानही वाढते आहे. लोकं अधिक काळ जगत आहेत, तेंव्हा आजच्या मिस इंडिया ह्या उद्याच्या ‘मदर इंडिया’च नाही तर ग्रँडमदर इंडिया ठरणार आहेत. त्यामुळे म्हाताऱ्या बायका आणि त्यांचे आरोग्य विषयक विशेष प्रश्न ह्यांचे प्रमाण वाढणार आहे. या बाबतीत आपण सजग असायला हवे.
वय वाढले की स्त्रीच्या शरीरातला स्त्रीबीजाचा साठा संपतो आणि पाळी जाते. स्त्रीबीज नव्याने निर्माण होत नसते. जन्मतः सोबत एक ठराविक साठा आलेला असतो. त्यातील साडेतीनशे, चारशे  बीजे प्रत्यक्षात पाळीच्या चक्रात विकसित होतात आणि बाहेर सोडली जातात. बाकीची बीजे सतत वाळत जात असतात. सगळी संपली की पाळी जाते. कधी कधी पिशवी आणि बीजग्रंथी काढल्या, कँन्सरसाठी शेक दिले (Radiotherapy) म्हणूनही पाळी जाते. परिणाम साधारण सारखाच होतो.
सुमारे ४५ ते ५५ च्या दरम्यान पाळी जाते. रक्तातल्या नात्यातल्या स्त्रियांची (आई, मावशी, बहीण) पाळी साधारण सारख्याच वयात जाते. क्वचित चाळीशीच्या आतही पाळी निसर्गतः बंद होते, ही अकाली ऋतूनिवृत्ती म्हणायला हवी.
पाळी जाण्याची प्रक्रिया वर्ष दोन वर्ष जारी असते. ‘...अजून तुझ्या डोळ्यातील मोठेपण कवळे गं!’ अशी ही अवस्था. साधारणपणे दोन पाळ्यातील अंतर वाढत जाते, स्त्राव कमीकमी होत जातो आणि अंतिमतः पाळी बंद होते. मेनोपॉज झालाय हे ठरवायला कुठली विशेष टेस्ट लागत नाही. वय ४५ च्या पुढे आहे आणि पाळी वर्षभर बंद आहे एवढी माहिती पुरेशी आहे.
निम्या बायकांना तरी ह्या कालावधीत काही ना काही तरी त्रास होतो. तक्रारींचा पाढा मोठा आहे. गरम वाफा अंगावरून गेल्यासारखे वाटणे ही प्रमुख तक्रार. घटकेत घाम तर घटकेत थंडी वाजते. रात्रीही या तक्रारींनी जाग येते. झोप मोडते. निद्रानाश जडतो. योनीमार्ग कोरडा होतो. संभोग, सुखाचा रहात नाही. तिथली अंतःत्वचा पातळ होते त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होतात. लघवीची अंतःत्वचाही पातळ होते. तिथेही वारंवार इन्फेक्शन होतात. लघवीवरचे नियंत्रण कमी होते. अंगदुखी, चिंता, नैराश्य, काम-निरसता, ई. तक्रारी बऱ्याचदा आढळतात.
पाळी बंद झाल्यावर हाडे ठिसूळ होतात. पाळी जाताच सुरवातीच्या पाच सहा वर्षात वेगाने अस्थी-विसर्जन घडते! मग हाडे सहजपणे  मोडतात. खुबा, मनगट, कंबर इथे वीकपॉइंट निर्माण होतात. आज्या आपल्या नातवंडांना, ‘हात, पाय मोडून घेशील, सांभाळून!’ असे सतत झापत असतात. खरे तर नातवंडांनी आज्जीला असे म्हणायला हवे.

मानसिक दृष्ट्याही हे वय मोठे त्रासाचे. आता मुले मोठी झालेली असतात. अचानक त्यांची आईची गरज संपते. नवऱ्याने काय जे कर्तृत्व गाजवायचे असते तेही गाजवून झालेले असते. यापुढे त्या आघाडीवरही फारसे उत्साहवर्धक काही घडण्याची शक्यता संपते. याच सुमारास घरातल्या ज्येष्ठांच्या आरोग्य विषयक तक्रारी उचल खातात. त्यांना सेवेची निकड भासू लागते. तीही जबाबदारी बहुधा या स्त्रीवरच येते. माहेरची जिवाभावाची माणसे, आई, वडील, काका, मामा यांनाही जरा आणि मरण येत जाते. एकूणच एक रितेपणा मनात भरून रहातो. रिकाम्या घरट्यातल्या या चिऊताईच्या मनात, आपण राब राब राबायचे पण आपली कुणालाच किंमत नाही असा भाव दाटून येतो. 
अर्थात प्रत्येकीची तऱ्हा वेगळी. सगळ्यांनाच सगळे व्हायला पाहिजे असे नाही. कमी अधिक तीव्रतेच्या वेगवेगळ्या तक्रारी असू शकतात. प्रत्येकीला त्रास व्हायलाच पाहिजे असेही नाही आणि प्रत्येकीने औषध घ्यायलाच हवे असेही नाही. कित्येकींना काही न करता हा त्रास हळूहळू ओसरतो आणि असा काही त्रास होत होता हे आठवतसुद्धा नाही. औषधे द्यायची की नाही आणि कुठली द्यायची हे लक्षणांवरच ठरते.
त्रास होतो तो मुख्यत्वे इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे. तऱ्हेतऱ्हेचा त्रास होतो कारण   इस्ट्रोजेनची अनेक कार्ये आहेत. निव्वळ पुनरुत्पादन एवढेच नाही. पुनरुत्पादन हे प्रमुख कार्य. पण हाडे, हृदय, मूत्राशय इतकेच काय मेंदूतही या स्त्रीरसाचे कार्य चालते. स्त्रियांना हृदयविकार, रक्तदाब, अशासारख्या व्याधी पाळी जाण्यापूर्वी सहसा होत नाहीत. निसर्गानी इस्ट्रोजेनरुपात त्यांना संरक्षण बहाल केले आहे. ही संरक्षक ढाल मेनोपॉजनंतर जाते.  त्यामुळे इस्ट्रोजेन नसला की सगळीकडे अस्वस्थता पसरते, कार्य बिघडते


पूर्वी एचआरटी (Hormone Replacement Therapy) नामेकरून होर्मोन्सचे डोस सर्रास दिले जात. त्यांचा फायदा होतो; पण  तोटाच जास्त होतो की काय, अशी आता शंका आहे. त्यामुळे सध्या अगदी आवश्यकता असेल तरच हा उपाय वापरला जातो आणि तोही मर्यादित काळासाठी. बराचसा त्रास होतो तो इस्ट्रोजेन कमी झालेला असतो म्हणून. त्यामुळे इस्ट्रोजेन दिला की बरेच बरे वाटते. एचआरटी मध्ये इस्ट्रोजेन असतोच असतो. इस्ट्रोजेन जसा कमी होतो तसा प्रोजेस्टेरॉनही कमी होतो, टेस्टोस्टेरॉनही कमी होतो. क्वचित हेही हार्मोन द्यावे लागतात.
ह्याला पर्यायी किंवा पूरक म्हणून, तऱ्हेतऱ्हेची देशीविदेशी  ‘हर्बल’ औषधे मिळतात. यातली कोणती किती सुरक्षित आहेत ते त्या त्या तज्ञांना विचारून घ्यावे. आधीच चालू असलेल्या दमा, अपस्मार, हृदयविकार इत्यादींच्या औषधांशी ह्यांचे भांडण असू शकते. तेंव्हा सांभाळून. बऱ्याच पानां, फुलां, फळांत इस्ट्रोजेन गटाची द्रव्ये कमी अधिक प्रमाणात असतात. ती कमी अधिक प्रमाणात आपल्या शरीरात शोषली जातात, कमी अधिक प्रमाणात इस्ट्रोजेन म्हणून आपली भूमिका वठवतात आणि त्यामुळे काही पेशंटना कमी अधिक प्रमाणात फायदा होतो. देशोदेशी अशा इस्ट्रोजेनयुक्त वनस्पती आहेत आणि त्या त्या देशी त्यांच्या ह्या गुणधर्मासाठी त्या ‘देशी’ औषध म्हणून वापरल्या जातात. पण त्यांच्यातील इस्ट्रोजेनचा प्रकार आणि त्याचे प्रमाण अनिश्चित असते त्यामुळे परिणामही अनिश्चित असतो. अर्थात दुष्परिणामही अनिश्चित आणि कित्येकदा (अभ्यासच न झाल्यामुळे) अज्ञात असतो. अशा अज्ञानात सुख असेलच असे नाही.
एचआरटी देताना अनेक घटक लक्षात घ्यावे लागतात. किती वर्ष देणार? पिशवी काढली आहे/नाही. असेल तर इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन दोन्ही दिले जाते अन्यथा फक्त इस्ट्रोजेन पुरते. इस्ट्रोजेन-प्रोजेस्टेरॉन असे जोडीने देताना नियमित अंगावरचे जाईल अथवा जाणार नाही असेही साधता येते. एचआरटी उपचार गोळ्या, इंजेक्शने, पॅच, जेल, स्प्रे, योनीमार्गात ठेवायच्या रिंग्स ई. प्रकारात उपलब्ध आहे. अंगावरून गरम वाफा जाणे, मूड जाणे, योनीमार्ग कोरडा होणे, ह्यावर एचआरटीचा चांगला उपयोग होतो. एचआरटीमुळे हाडेही तंदुरुस्त रहातात. मोठ्या आतड्याचा कँन्सरची शक्यता घटते. पण गर्भपिशवीचेचे अस्तर वाढते आणि रक्तस्राव होऊ शकतो, तिथे कँन्सरची शक्यता बळावते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. यामुळे ब्रेस्ट कँन्सरची शक्यता वाढते की काय यावर प्रचंड संशोधन होऊनही अजून निश्चित आणि संपूर्ण चित्र स्पष्ट झालेले नाही. अर्थात कुठल्याही कँन्सरची शक्यता अनेक कारणांनी कमी जास्त होत असते त्यामुळे नेमके एचआरटीला झोडपणे अवघड झाले आहे. त्यामुळे ही एचआरटी भानगड फुंकूनच प्यावी असा ज्येष्ठांचा सल्ला आहे.
हे सगळे बघता यापेक्षा दुसरे काही उपाय आहेत का असा प्रश्न मनात येणे सहाजिक आहे. काही नैराश्यनाशक औषधे, काही फिटसाठीची औषधे (गाबापेन्टीन), क्लोनिडीन सारखी एरवी ब्लडप्रेशरसाठी वापरली जाणारी औषधे, गरम वाफा आणि निद्रानाशासाठी कामी येतात. आता इस्ट्रोजेन नाही, पण त्याच्याच खुर्चीत बसून त्याच्यासारखे काम करणारी काही औषधे आहेत. (SERM) गरम वाफा आणि संभोगशूलासाठी ही उत्तम समजली जातात.
काही बायकांच्यात पाळी अकाली जाते. कधी तरी कारण  सापडते. उदाहरणार्थ सुप्त टर्नर सिंड्रोम  किंवा स्वतःच्याच शरीरात निर्माण झालेली,  स्त्रीबीजग्रंथी नष्ट करणारी, काही रासायनिक अस्त्रे. जे मेनोपॉजमुळे होते तेच सगळे पाळी लवकर गेली तरीही होते. शिवाय संततीप्राप्तीची इच्छा अधुरी राहू शकते. औषध योजनाही मेनोपॉजला जी असते साधारण तीच इथेही असते. इथे पाळी नियमित येण्यासाठी गोळ्या दिल्या जातात. पाळी जाण्याच्या वयापर्यंत या घ्यायच्या असतात.
पाळी येते तशी जाते. काही त्रास जरूर होतो. आवश्यक वाटली तर औषधे जरूर घ्यावीत. योग्य आहार, व्यायाम आणि नियमित तपासणी ही त्रिसूत्री महत्वाची आहे. काही कालावधीत बराचसा त्रास आपोआपच कमी होतो. बाकी ‘वार्धक्य ही मनाची अवस्था आहे...’ वगैरे ज्ञान मी काय पाजळणार, व्हाट्सअॅपच्या रोजच्या रतीबात ते मिळतच असेल की, तेंव्हा हॅपी मेनोपॉज.

Tuesday 14 August 2018

पाळी मिळी गुपचिळी ह्या माझ्या पुस्तकातील माझे मनोगत.


मनोगत
चार पाच वर्षापूर्वी असाच क्लिनिकमध्ये बसल्या बसल्या समोरचा कॉम्प्यूटर चाळत होतो. अचानक एक अर्धवट लिहिलेला लेख पुढे आला. नाव होते ‘पाळी मिळी गुपचिळी!’ वेळ होता, काय लिहायचे ते पक्के होते म्हणून सहजच  बसल्याबसल्या मी तो लेख पूर्ण करून टाकला. पूर्ण केला आणि फेसबुकवर टाकला. तो वाचला डॉ. अमोल जाधव या  माझ्या विद्यार्थ्याने. त्याने तत्परतेने तो व्हाट्सअॅपमुखी घातला. मग काय विचारता, हा लेख वणव्यासारखा पसरला.  हा हा सुद्धा न म्हणता तो सर्वत्र वाजू लागला, गाजू लागला आणि बघता बघता गर्जू सुद्धा लागला. स्त्रिया स्वतःला आणि इतर कुटुंबीय स्त्रियांना, पाळीच्या काळात अशुद्ध, अपवित्र वगैरे समजतात हे किती अर्थहीन आणि मूर्खपणाचे आहे हे त्या लेखात लिहिले होते. हा मुद्दा अगदी वर्मी लागला सगळ्यांच्या. महाराष्ट्रातल्या प्रतिथयश वर्तमानपत्रांनी या लेखाची दखल घेतली, कित्येक जिल्हापत्रांनी तर तो संपूर्ण छापला. चॅनेलवरती या विषयावर चर्चा झडल्या आणि एकूणच वातावरण ढवळून निघाले.
लेखासोबत माझा नंबरही होता. त्यामुळे महीन्याभरात चार-पाचशे फोन आले मला. लेख वाचून माणसे इतकी प्रभावित होत की वाचन संपल्या संपल्या मला फोन केल्याशिवाय त्यांना रहावत नसे. यातले ९०% फोन स्त्रियांचे होते. पण या बरोबर एक गोष्ट नंमूद केलीच पाहिजे, वेळीअवेळी एकही फोन आला नाही. सगळ्यांनी, ‘डॉक्टर, मी अमुक अमुक, आत्ता तुमच्याशी बोलू का? वेळ आहे ना?’ अशीच सुरुवात केली. हा धक्का सुखद होताच पण या पेक्षाही धक्कादायक होता तो बोलणाऱ्या महिलांचा मोकळेपणा. अर्थात बोलणे फोनवर, एका अदृश्य ‘आवाजाशी’ होत होते हे खरेच. पण एका अनोळखी पुरुषाची आपण बोलतोय याचे कोणतेही दडपण न घेता त्या बोलत होत्या; पाळी संदर्भातले आपले अनुभव, व्यथा, वेदना सांगत होत्या; पाळी दरम्यान देवाधर्माचे काही करण्यासाठी माझी परवानगी मागत होत्या; मी, ‘बेलाशक!’ असे उत्तर देताच, उत्फुल्ल होत होत्या आणि ‘तुमच्या सल्ल्याप्रमाणेच आम्ही वागलो, आता खूप मोकळे मोकळे वाटते आहे’, असेही पुन्हा पुन्हा फोन करून सांगत होत्या. एकीनी, ‘पाळी अपवित्र नसते असे सांगून तुम्ही आमची हक्काची सबब घालवली’, अशी गमतीशीर तक्रार केली. एक बाई म्हणाल्या, ‘मी शिक्षिका आहे’, म्हटले, ‘व्वा, तुमच्या विद्यार्थिनीपर्यंत हा विचार नक्की पोहोचवा’. मी असे म्हणताच, त्यांनी त्या बालक मंदिरात शिक्षिका असल्याचा खुलासा केला. कित्येक डॉक्टरांना हा लेख इतका  भावला  की त्यांनी त्याचे फ्लेक्स करून दवाखान्यात लावले. एकूणच ह्या पहिल्याच लिखाणानी मजा आली, योग्य तो परिणामही झाला. एरवी निव्वळ नकारात्मक गोष्टींसाठी सतत चर्चेत असलेल्या या समाजमाध्यमांची सकारात्मक ताकद माझ्याही प्रथमच लक्षात आली.
असाच रमत गमत लिहित होतो. पुढे वेळोवेळीच्या लिखाणामुळेच मृण्मयी रानडेंशी परिचय झाला. ‘दिव्य मराठीच्या’ महिला पुरवणीत, ‘मधुरीमा’त, त्यांच्याच आग्रहाने मी नियमितपणे ‘अर्थ स्त्री आरोग्याचा’ हे पाक्षिक सदर लिहायला लागलो. मग काय, लिखाणासाठी विषय हेरणे; खमंग, खुसखुशीत, चटकदार लिहिणे;  ‘मधुरिमा’पाठोपाठ ते फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर टाकणे आणि कौतुकाचे फोन घेत बसणे असा सिलसिलाच चालू झाला. हळूहळू प्रत्येक पोस्टपोटी पाच-सहाशे लाईक्स आणि दीडदोनशे शेअर, कमेंट्सचा गल्ला मी सहज गोळा करू लागलो.
मी लिहित गेलो, लोकं आवडीने वाचत गेली आणि ‘पुढे काय?’ असे विचारू लागली. त्यामुळे  सर्वात महत्वाचे आभार माझ्या वाचकांचे. परिचितांनी आणि अपरिचितांनीही वेळोवेळी दाद दिली, शाबासकी दिली, फेसबुक अन् व्हॉट्सअॅपवर भरभरून प्रतिसाद दिला आणि अधिकाधिक लिहायला प्रोत्साहित केले. डॉक्टरांनी तर सक्रीय दाद दिली. कित्येकांनी यातल्या कित्येक लेखांच्या झेरॉक्स प्रती काढून रुग्णांना वाटल्या, काहींनी सूचना केल्या, सुधारणा सुचवल्या, नवे नवे विषय सुचवले आणि मला सतत लिहिते ठेवले. वाचकांचा सततचा, प्रेमळ आग्रह  हीच माझ्या लेखनाची प्रेरणा.
पण या साऱ्यातील मनावर ओरखडा उमटवणारी प्रतिक्रिया म्हणजे, ‘मराठी खूप छान लिहिता हो तुम्ही!’, हे कौतुक. असे कुणी म्हटले की मला खूप वाईट वाटते. एखादा माणूस आपली मातृभाषा उत्तम लिहू शकतो यात कौतुक करण्याजोगे काय आहे. पण याचे कौतुकच काय पण आभिमान आणि आश्चर्य वाटावे इतक्या वेगाने आपल्या भाषेची अवस्था खालावत चालली आहे. असली स्तुतिसुमने म्हणजे उत्तम भाषा दुर्मिळ होत असल्याचे लक्षण. माझ्या साध्याशा कारागिरीला जर हे लोक उत्तम म्हणत असतील तर त्याचा अर्थ मराठीत उत्तमोत्तम लिहिणारे फारच कमी होताहेत. फार भयावह गोष्ट आहे ही. असो.
यातील लेख हे शास्त्रीय विषयावरचे आहेत. थेट बुद्धीला विचारांना, विवेकबुद्धीला आणि तर्काला आवाहन करणारे आहेत. काही आव्हान देणारेही आहेत त्यामुळे आशय महत्वाचा आहे. त्याला मुळीच धक्का लागता कामा नये. पण लिखाण चटपटीत आणि वाचकांना सहज आवडावं म्हणून काही हटके प्रयोगही मी केले. सव्यंग मूल जन्माला आलं तर ती कुटुंबाच्या दृष्टीने मोठी आपत्तीच असते. पण अशाच आणीबाणीच्या प्रसंगी सदसद्विवेकबुद्धी गहाण पडते. चुकीचे निर्णय घेतले जातात किंवा हिताचे निर्णय घेतले जात नाहीत. अशा परिस्थितीत काय करावं, विचार कोणत्या दिशेनं करावा, हे ठसवण्यासाठी मी कहाणी लिहीली, ‘व्यंगोबानाथाची कहाणी’. ह्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. ती कहाणी लिहिताना मलाही मजा आली. कहाणीच्या शब्दातील पारंपारिक लय, पद्यमय गद्य असं त्याचं स्वरूप; त्यातील यमक, अनुप्रास, उपमा, दृष्टांत; पात्रांचे अचानक होणारे वाट्टोळे आणि वसा वसल्यानंतर होणारे भाग्योदय; आटपाट नगरातून होणारी सुरवात आणि साठा उत्तरीच्या कहाणीचा पाचा उत्तरी होणारा सुफळ संपूर्ण प्रवास; हे सगळं सगळं सव्यंग मूल जन्माला आलेल्या हतबल कुटुंबाची मानसिकता दाखवण्यासाठी झक्कपैकी वापरता आलं. एखाद्यावेळी ह्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर डॉक्टरांची, वैद्यकीची मर्यादा दाखवायलाही कहाणी हा फार सोयीचा आकृतिबंध वाटला मला.
जी गोष्ट कहाणीची तीच कीर्तनाची. इथे एक कीर्तनही आहे. खरतर कीर्तन ही वाचायची गोष्ट नव्हे, करायची किंवा ऐकायची गोष्ट. मात्र संपादकांना हा आकृतिबंध वाचायला म्हणूनही सुयोग्य वाटला आणि ह्या कीर्तनाचाही पुस्तकात समावेश झाला. इथे कीर्तनकारानी आख्यान लावलेलं आहे ते बिनटाक्याच्या पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेचं. कहाणीत जशी काही खास गमत आहे तसच कीर्तनाचीही खास गमत आहे, एक लहेजा आहे. इथे मग पारंपारिक ओव्या, अभंगांची नवीन विषयाशी सुसंगत अशी मोडतोड केली आहे.
‘सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो;
कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो.’चं
मग ‘आवडो’ झालं. बुवा सुरवातच मुळी ही आर्या गाऊन करतात. वेगवेगळ्या संततिनियमन साधनांच वर्णन बुवा असं करतात...
संत म्हणाले संयम पाळा,
महंत म्हणाले मोजके दिवस टाळा,
सज्जन म्हणाले बाहेरच गाळा,
धर्ममार्तंड म्हणाले, चूप, अहो बोलता काय, तुमच्या जिभेला काही हाड?
जाउ दे, हा विषयच टाळा
सामान्यजन सगळ्यात हुशार, ते म्हणाले,
तुमचं ठरलं की सांगा तोवर, आमचा चालूदे कामुक चाळा!!
         मुक्ताबाईचा अभंग इथे वेगळ्याच रुपात दिसतो.
विश्व रागे झाले वन्ही, पुरुष सुखे व्हावे पाणी
शब्द शस्त्र झाले क्लेश, पुरुषी मानावा उपदेश
अस्सल मऱ्हाठी तऱ्हेचे हे भाषिक वळण वापरता आलं ते मी मराठीत लिहित होतो म्हणून.
मराठीत शब्दाचं दुर्भिक्ष्य आहे असं सततच सांगितलं जातं. हे खरंही आहे. पण ह्या लिखाणात तरी मला ती अडचण फारशी आली नाही . हे शास्त्रीय विषयावरचं लिखाण असलं तरी जनसामन्यांसाठी आहे. त्यामुळे तितपत शब्दसंपदा उपलब्ध आहे किंवा थोडेसे कष्ट घेऊन चपखल शब्द शोधता येतो. Test आणि Screening test असे दोन शब्द आहेत Test साठी प्रतिशब्द सहाजिकच चाचणी. परीक्षा असे अनेक आहेत. पण Screening test? हा तर पारिभाषिक शब्द आहे. त्याला विशिष्ठ अर्थ आहे. screening टेस्ट म्हणजे अशी टेस्ट की ज्यात नेमके निदान होत नाही पण शंका, शक्यता, आणि अधिक तपासणीची आवश्यकता सुचवली जाते. अचानक मला शब्द सापडला, ‘चाचपणी’. चाचणी म्हणजे खात्रीची टेस्ट आणि चाचपणी म्हणजे अंदाज व्यक्त करणारी टेस्ट.
काही नवीन शब्द घडवावे लागले. उदाहरणार्थ Evolution ला उत्क्रांती हा शब्द सर्वमान्य आहे पण Evolutionaryला काय म्हणावे बरे. दरवेळी उत्क्रांती विषयक, उत्क्रांतीबद्दल असे किती वेळा म्हणणार? मग शब्द बनवला ‘औत्क्रांतिक’. उदास, उद्योग किंवा उपचारचे रूप जसे अनुक्रमे औदासिन्य, औद्योगिक किंवा औपचारिक असे होते, तसे हे औत्क्रांतिक. Arbitrary या शब्दाला मी असाच अडखळलो पण विचार करता करता, लिखाणाच्या ओघात, मला कितीतरी शब्द सुचले. असंबद्ध, वाट्टेल ते, काहीच्याकाही, आगापीछा नसलेला, शेंडाबुडखा नसलेला...असे पाच निरनिराळे शब्द मला त्या त्या संदर्भात योजता आले आणि ते तिथे फिट्ट बसले. Strategy हाही असाच चकवा देणारा शब्द. ह्यालाही व्यूह, धोरण, डाव, कावा, पावित्रा, तऱ्हा असे अनेक पर्यायी शब्द मला सापडत गेले. त्या त्या ठिकाणी ते चपखल बसले.
एक मात्र सुरवातीलाच ठरवले होते, उगाच अमका आजार आणि तमके उपचार असे साचेबद्धपणे काहीही लिहायचे नाही. अभ्यासाची पुस्तके भाषांतरायची नव्हती मला. प्रत्येक आजाराला एक सामाजिक, कौटुंबिक, भावनिक, आर्थिक बाजू असते. ही देखील महत्वाची असते. चुकीचे निदान किंवा चुकीच्या औषधयोजनेइतकाच चुकीचा दृष्टीकोनही हानीकारक. तेंव्हा ह्यावर जोर हवा असे माझे मत. विज्ञान आणि समाजाच्या सीमारेषेवरील विषय हाताळताना,  विज्ञानवादी, मानवतावादी, समानतावादी सूर उमटायला हवा हीच माझी धारणा. म्हणूनच माझ्या  सीझरबद्दलच्या लेखात सद्य व्यवस्थेच्या मर्यादांवर भाष्य येते किंवा सोनोग्राफीवरच्या लेखात सद्य विज्ञानाच्या मर्यादा अधोरेखित केल्या जातात. म्हणूनच ग्रहणाबद्दलच्या लेखाला  ‘संपेल का कधीही हा खेळ बावळ्यांचा?’ किंवा गर्भसंस्काराचा पर्दाफाश करणाऱ्या लेखाला  ‘डोंबलाचे गर्भसंस्कार’ अशी जहाल शीर्षके येतात. ‘प्रेग्नन्सी आणि सेक्स’सारख्या लेखात पुरुषांनाच जास्त सूचना येतात,  ‘उरोज कुंभापरी’त अमेरिकेतील कंचुकीदहनाच्या कार्यक्रमाचा उल्लेख येतो आणि  ‘अग्गोबाई! अरेच्च्या!!’ सारख्या लेखात स्त्रीवादी (स्त्री)शरीररचनेचा  उल्लेख येतो. कॉलेजमध्ये असताना लोकविज्ञान संघटनेत आणि पुढे अंधश्रद्धा निर्मूलन समितीत काम केल्याचा हा संस्कार. तोच माझ्या लिखाणात उतरत गेला आणि लोकांना लिखाण  आवडत गेले. 
माझ्या ब्लॉगवर सगळे लिखाण मी टाकत होतोच, पण तरीही पुस्तकरूपात ते उपलब्ध व्हावे असा सगळ्यांचाच आग्रह होता. ब्लॉगची पहूंच तशी मर्यादित. शिवाय भेट द्यायला, घ्यायला, वाचायला, संग्रही ठेवायला, चर्चा करायला, (प्रसंगी जाळायला) पुस्तक सोयीचे. पुस्तक कसे घट्टमुट्ट, प्रत्यक्ष अस्तित्वात असलेले, हाताळता येईल असे, उघडताच अंगीचा दरवळ उधळणारे; ब्लॉग बापुडे केवळ प्रतिमा.  भासमान जगातल्या माझ्या अ-क्षर कामगिरीचा, पुस्तकरूपाने प्रत्यक्ष जगात प्रवेश व्हायलाच हवा अशी मागणी वाढत गेली आणि मी प्रकाशकाच्या शोधाला लागलो. पहिल्याच प्रयत्नात विश्वकर्मा प्रकाशनचे सी.ई.ओ. श्री. विशाल सोनींनी पसंती कळवली आणि पुस्तक सुस्थळी पडल्याने मी निश्चिंत झालो.
‘विश्वकर्मा’चे संपादक श्री. मनोहर सोनावणे सहायक  संपादक संदीप तापकीर, तसेच मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह श्री. संतोष पाटील यांच्या प्रोत्साहनाचा आणि मौलिक सूचनांचा विशेष उल्लेख करायला हवा. अतिशय थोडक्या वेळेत त्यानी हे पुस्तक निटसपणे जन्माला घातले. श्री. गिरीश सहस्रबुद्धे यांची चित्रे मी दै.सकाळ मध्ये पहात असे आणि मुखपृष्ठासाठी  असाच चित्रकार लाभावा अशी इच्छाही मनात येई. एके दिवशी श्री. सोनावणे यांनी श्री. गिरीश सहस्रबुद्धे हेच मुखपृष्ठाचे काम करत असल्याचे सांगितले आणि सुखद धक्का दिला. माझे आणि विश्वकर्माचे सूर जुळले आहेत ते असे आणि इतके. विश्वकर्माच्या टीममधील मुद्रितशोधनाचे किचकट काम करणाऱ्या  प्रीता कानिटकर, अक्षरजुळणी करणाऱ्या कविता पासलकर व पुस्तकाची मांडणी व सजावट करणाऱ्या चैताली नाचणेकर यांचे आभार.
पुण्याच्या ज्या बी.जे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलच्या प्रांगणात मी डॉक्टर झालो, तिथल्या शिक्षकांना, पेशंटना आणि मित्रमैत्रिणींना विसरून चालणार नाही. आजचे हे माझे लिखाण म्हणजे माझ्या पाठीशी असलेली त्यांचीच पुण्याई आहे. तेंव्हा हे लिखाण त्यांनाच सादर अर्पण.
आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांचा माझा मुळीच परिचय नाही. त्यांचे सार्वजनिक काम हीच त्यांची ओळख. विश्वकर्माच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्या भरगच्च दिनक्रमातून वेळ काढून प्रस्तावना लिहीली हा मी माझा सन्मान समजतो. सेवाव्रती डॉ. राणी बंग; ‘देऊळ’, ‘प्रकाश बाबा आमटे’, ‘सिंघम’ फेम स्टार अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि महाराष्ट्र स्त्रीआरोग्य व प्रसूतीतज्ञ संघटनेच्या  अध्यक्षा डॉ. रोहिणी देशपांडे यांनी मोठ्या आत्मीयतेने, शुभेच्छापर लिहिलेल्या चार ओळींनी, पुस्तकाला वेगळेच वलय लाभले आहे.
सरते शेवटी माझी मुले, डॉ अनन्या आणि चि. मोहित, पत्नी डॉ. रुपाली आणि आई-बाबांचे आभार मानतो आणि थांबतो.


कळत नकळत


कळत नकळत
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

मूल होणे ही कितीतरी आनंदाची बाब आणि त्यासाठी प्रसूतीवेदना सहन करणे हे मात्र वैतागाचे, चिंतेचे, भीतीचे आणि सीझरची दुराग्रही मागणी करण्याचे कारण. ह्या कळा मोठ्या विलक्षण. भल्याभल्यांची खोड जिरवणाऱ्या. अशा कळांनी बेजार झालेल्या नवयौवनेला पहाताच, करुणा वगळता कोणताच भाव मनात उमटत नाही.
जीवनावश्यक आणि नैसर्गिक अशा इतर सगळ्या क्रिया न दुखता, सुरळीत, पार पडत असताना मूल होतानाच का दुखावे, हे एक कोडेच आहे. श्वास घेताना, हृदयाचे ठोके पडताना, शी-शू होताना, अन्न पचताना, अजिबात दुखत नाही. पण जन्मवेणा मात्र  प्राणांतिक. स्त्रीला ही वेदना सुसह्य व्हावी म्हणूनच की काय, समाजानी मातृत्वाचे, वेदनेचे, उदात्तीकरण केले आहे. जनमानसात हे उदात्तीकरण इतक्या टोकाला पोहोचले आहे की वेदनारहित प्रसूती शक्य असतानाही तो पर्याय क्वचितच विचारात घेतला जातो. वापरणे तर दूर की बात.
कधी कधी वेदनेबरोबरच प्रचंड भीती असते. अशी बाई कुण्णाकुण्णाचं ऐकत नाही. अजिबात सहकार्य करत नाही. डॉक्टरांच्या भाषेत ह्याला म्हणतात Maternal distress. लवकरच नातेवाईक वैतागतात. आईवडील वैतागतात. कळवळणारी पोटची पोर त्यांना बघवत नाही. काही तरी करा असा तगादा लावतात. याला म्हणतात Relative’s distress. मग लवकरच डॉक्टर वैतागतात. हा सगळा त्रास आणि त्रागा, कधी एकदा आणि कधी एकदाचा संपेल असे सगळ्यानाच होऊन जाते. यावर सहसा सीझरचा तोडगा काढला जातो.  इथे वेदनारहित प्रसूती हा खरे तर नुसताच पर्याय नव्हे तर, उत्तम पर्याय ठरू शकतो. पण हे तंत्र जाणणारे आणि अंमलात आणणारे डॉक्टर कमी आहेत. या बद्दलची समजही कमी आहे. पर्यायानी गैरसमज भरपूर.
लोक म्हणतात, ‘फुकट किंवा सहज काही मिळाले की त्याची किंमत रहात नाही. जरा पोटात दुखूनबिखून मूल झाले की त्याची किंमत कळते!’ शिवाय ‘आपल्याला’ जे दुखूनखुपून झाले ते ‘हिला’ सहजप्राप्य होतेय ह्याची किंचितशी असूयाही मनात असते.
प्रसूतीवेदना कमी करण्याचे बरेच उपाय आहेत. श्वासोच्छवासाच्या तंत्रांपासून ते औषधांपर्यंत. ह्याची चर्चा आधीच डॉक्टरबरोबर, भूलतज्ञांबरोबर करणे उत्तम. प्रत्येक बाईची वेदना आणि सहनशक्ती भिन्न भिन्न असते, त्यामुळे कुणाला किती, कधी आणि कोणती भूल द्यायची, हे त्या त्या वेळी ठरवावे लागते. आधी भीती वाटून सुद्धा ऐनवेळी आपण ह्या वेदना सहन करू शकतो हे लक्षात घेऊन वेदनाहरण नाकारण्याचा अधिकार आणि पुढे वाटले तर पुन्हा मागण्याचा अधिकार  पेशंटला असतो.
वेदनारहित प्रसूतीसाठी सर्वोत्तम आणि खात्रीचा पर्याय म्हणजे एपिड्यूरल अॅनाल्जेसिया. अॅनाल्जेसिया आणि अॅनॅस्थेशिया मध्ये फरक आहे. अॅनाल्जेसिया म्हणजे ‘वेदना’हरण तर अॅनॅस्थेशिया म्हणजे ‘संवेदना’हरण.
एपिड्यूरल अनाल्जेसिया ही एक भूल देण्याची पद्धत आहे. वेदनारहित प्रसूतीसाठी ही उत्तम समजली जाते. पाठीच्या दोन मणक्यांच्या मधून सुई सरकवली तर आतआत  अगदी मज्जारज्जूपर्यंत जाते. अशीच सुई सरकवली जाते, पण अगदी वरवर. मज्जारज्जूपर्यंत ती नेलीच जात नाही. ह्या मज्जारज्जूला गवसणीसारखे एक कव्हर असते. ह्याला म्हणतात ‘ड्युरा’. ह्यालाही धक्का लागणार नाही अशा बेताबेताने ही सुई आत सरकवली जाते. ड्युराच्या जरा बाहेर सुईचे टोक पोहोचले की त्यातून एक प्लॅस्टिकची नळी (कॅथेटर) आत सरकवून सुई काढून घेतात.  हे कौशल्याचे काम.  आता ही नळी शेपटासारखी बाहेर लोंबत रहाते. नळीतून गरजेप्रमाणे केंव्हाही हवे ते औषध देता येते. हे त्या ड्युराच्या बाहेर-बाहेर पसरते. ड्युरातून बाहेर पडणाऱ्या नसा सुन्न करते. म्हणून हा ‘एपीड्युरल’ अॅनाल्जेसिया. कमीतकमी दुष्परिणाम आणि अधिकाधिक फलप्राप्ती असा हा समसमा संयोग.
 ही भूल असली तरी ही संपूर्ण भूल नाही. ह्याने कळा थांबत नाहीत. कळा येतात, पण त्यांची जाणीव होत नाही. म्हणूनच ही ‘कळत-नकळत’ प्रसूती. बाई खात-पीत, हिंडत-फिरत, टीव्ही पहात, गप्पा मारत, स्वेटर विणत, मधुरिमा वाचत  ई. ई. असू शकते. चालताना पायात थोडा अशक्तपणा जाणवू शकतो एवढेच. जेंव्हा बाळाचे डोके अगदी खाली उतरते आणि आईनेच बाळ बाहेर ढकलायची वेळ येते तेंव्हा जोर जरा कमी पडतो. मग कधीकधी चिमटा लावून (Forceps) किंवा वाटी लावून ( थ्री इडीयट्स फेम Ventouse Method) डिलिव्हरी करावी लागते.
एपिड्यूरल प्रमाणेच स्पायनल प्रकारच्या अनेस्थेशियातही वेदनारहित प्रसूती होऊ शकते. पण तो दीर्घकाळ देता येत नाही आणि एपिड्यूरल इतका विश्वासू साथीदार नाही. याशिवाय खुब्यावर किंवा दंडात देता येतील अशी वेदनाशामक इंजेक्शने, ‘टेन्स’ वगैरे पद्धती आहेत. पण ह्या साऱ्या यथातथा. वेदना खरोखर थांबतात त्या एपीड्यूरलमुळेच. पंधरा वीस मिनिटात दुखणे जवळ जवळ ८०%ने कमी होते. प्रसूती दरम्यान पेशंटच्या इच्छेनुसार औषधाचे प्रमाण कमी जास्त करता येते. सीझर लागले तरी त्याच नळीतून आणखी औषध देऊन ऑपरेशन करता येते. वेगळी भूल द्यावी लागत नाही.
एपीड्युरल ही पद्धत अतिशय सुरक्षित आहे पण, यातले अल्पस्वल्प धोकेही आपण समजावून घेऊया.
एपिड्यूरलमुळे बीपी कमी होते. बाळाकडेही मग कमी रक्त जाते. यासाठी सलाईनचा अभिषेक चालू ठेवावा लागतो. शक्यतर डाव्या कुशीवर झोपले की बाळाकडे जाणारा रक्त प्रवाह वाढतो. एपिड्यूरलमुळे बाळावर कोणताही थेट दुष्परिणाम होत नाही. वापरली जाणारी सुई जरा जाड असते त्यामुळे ती जागा थोडी दुखते. पण हे दुखणेही तेवढ्यापुरतेच. यामुळे नंतर कंबरदुखीचा आजार जडत नाही. जर ड्युराला छिद्र पडले तर पुढे काही काळ डोकेदुखीचा त्रास होतो. झोपून राहिले आणि भरपूर पाणी प्यायले  की हा त्रास थांबतो. या प्रकाराने कळा थांबतील, प्रसूतीला वेळ लागेल आणि डॉक्टरनी सीझर करायला आयतीच सबब सापडेल असाही एक गैरसमज प्रसृत आहे. एपिड्यूरल दिल्याने असे काहीही होत नाही. जगभरच्या अनेक अभ्यासात हा मुद्दा स्पष्ट झाला आहे. तेंव्हा दिलाच एपिड्यूरल आणि लागलेच जर सीझर, तर कृपया दवाखान्याच्या काचा फोडू नयेत.
आणि हो, एपिड्यूरलचा आणखी एक तोटा आहे, एपिड्यूरल दिल्याने, ‘बाळंतपणाच्या आभाळवेणा सोसून मी तुला जन्म दिला आणि आता हेच का पांग फेडतो/फेडते आहेस?’ असले फिल्मी डायलॉग तुम्हाला मारता येत नाहीत.



.