Thursday 17 September 2020

गोल खुंटी; चौकोनी भोक.

 

गोल खुंटी; चौकोनी भोक.

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

निर्भया  प्रकरणाने अख्ख्या भारताला खडबडून जागं केलं आणि  कायद्यात बरेच बदल घडले. बालकांच्या लैंगिक शोषणाविरुद्ध पॉक्सो कायदा आला.  अत्याचारित बालकाची/बालीकेची  आदरपूर्वक तपासणी, विशेष तपास अधिकारी, संवेदनशील हाताळणी, विशेष सरकारी वकील, जलदगती न्यायालये आणि आवश्यक ती गुप्तता हे सगळं ह्या कायद्यानी दिलं. आज अत्यंत शिस्तबद्धरीत्या, मुद्देसूद पद्धतीने अशा पेशंटची तपसणी करण्याची पद्धत विकसित झाली आहे. बलात्काराच्या कायद्यानुसार (भा.दं.वि. ३७६) कोवळ्या मुलींवर बलात्कार होऊ शकतो याची कायद्याने दखल घेतली होती पण कोवळी मुलंही याची शिकार होऊ शकतात ही शक्यता मुळी  गृहितच धरण्यात आली नव्हती. पॉक्सो  कायद्याने ही त्रुटीही   दूर झाली. मुलामुलींचा पॉर्नोग्राफीसाठी वापरही ‘लैंगिक गुन्हा’ आहे. बेकायदा लैंगिक कृतींसाठी सहाय्यही गंभीर गुन्हा आहे.

बलात्काराच्या व्याख्येची व्याप्तीही बदलत असलेली दिसते. पूर्वी बलात्काराचा गुन्हा सिद्ध होण्यासाठी ‘लिंगाचा योनीत प्रवेश’ आवश्यक होता. मग त्यात गुदसंभोग आणि मुखमैथुनचा समावेश झाला आणि आता  ‘कोणताही मानवी अवयव अथवा कोणत्याही वस्तूचा,  शरीराच्या कोणत्याही द्वारमार्गात प्रवेश  (भोकात) प्रवेश’ अशी व्याख्या झालेली आहे. यात ओठानी/जिभेनी  केलेला स्पर्शही अंतर्भूत आहे. अर्थात कायदेमान्य वय आणि  संमती नसताना.

पण बालविवाह कायदा, पॉक्सो, बलात्कारादी कायद्याने आणि  अशा प्रकरणांच्या प्रचलित हाताळणीने काही  विसंगती आणि  प्रश्नही निर्माण केले आहेत.

लैंगिक गुन्ह्यातील बळीची तपासणी ही फक्त स्त्री डॉक्टरनेच करावी असं हा कायदा म्हणतो (Section 27(2)). पण भा.द.वि. १६६अ नुसार ‘वैद्यकीय अधिकाऱ्याने’, बलात्कारीत स्त्रीची तातडीने तपासणी केली पाहिजे असं म्हटलं आहे.  यात स्त्री पुरुष सर्व डॉक्टर  आले.  जेंव्हा स्त्री डॉक्टर नसेल तेंव्हा यातील कोणते कलम पाळायचे? असा प्रश्न आहे. यात स्पष्टता हवी.

‘बलात्कार’ हा फक्त पुरुषच करू शकतो असं कायदा सांगतो. बलात्कार आणि ‘लैंगिक हल्ला’ (Sexual assault) असा भेद आहे. बलात्कार हा  पुरुषशाहीचा परिपाक. त्यामुळे तो फक्त स्त्रीवरच होऊ शकतो. शिवाय स्त्री बलात्कार करू शकते हे मान्य केलं, तर प्रत्येकच पुरुष बलात्काराचा आरोप होताच, तिनेच माझ्यावर  बलात्कार केला असा बचाव करेल. तीच बदचलन आहे, तिची संमती होतीच, हे आरोपच  खोटे आहेत; इत्यादी  बचाव आहेतच त्यात ही आणखी एक भर. पण एखाद्या स्त्रीने एखाद्या कोवळ्या मुलाला शरीरसंग करायला भाग पाडणे हे अगदीच शक्य आहे. या बाबतीत निव्वळ ‘लैंगिक हल्ला’ (Sexual assault, Section 8) असा आरोप होऊ शकतो. ‘बलात्काराचा’ नाही. लिंगाला  ताठरता येणे आणि स्खलन होणे या दोन्ही गोष्टी त्या मुलाच्या मनाविरुद्ध घडू शकतात. पण कायदा ही बाब मानत नाही. एका पुरुषाकडून दुसरी स्त्री वा  दुसरा पुरुष बलात्कारीत होऊ शकतो पण स्त्रीकडून पुरुषावर ‘बलात्कार’ होऊ शकत  नाही. ह्याही तरतुदीचा पुनर्विचार करायला हवा.     

पीडित व्यक्तीचे नाव जाहीर करायला कायद्याने  बंदी आहे. हे योग्यच आहे.  पण आरोपीचे नाव माध्यमांतून सर्रास जाहीर केले जाते. हा काही किरकोळ गुन्ह्याचा आरोप नाही. अत्यंत गंभीर आरोप आहे. नुसत्या आरोपाचे भीषण वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक परिणाम होऊ शकतात. त्या माणसाची पतप्रतिष्ठा, विश्वासार्हता संपुष्टात येते. गुन्हा शाबीत होईपर्यंत प्रत्येक आरोपी निर्दोष आहे, हे तत्व बघता आरोपीलाही असाच गुप्ततेचा अधिकार हवा.

पॉक्सोखाली बलात्काराचा आरोप हा बरेचदा शस्त्र म्हणूनही वापरला जातो. विशेषतः कडक तरतुदी असलेला, लहान मुलांच्या बाबतीतला, हा कायदा असल्याने,  आरोपीला अजिबात सहानुभूती मिळत नाही. त्यामुळे अर्थातच गैरवापरास अत्यंत सुलभ असा हा कायदा आहे.  मालक-भाडेकरू, देणेकरी, वैवाहिक भांडण इत्यादी  कारणांसाठी, प्रतिपक्षाची जिरवण्यासाठी, या कायद्याचा वापर करण्यात आला आहे. येत आहे. हे सारे हितसंबंध लक्षात घेऊनच पोलिसांनी योग्य ती  कलमे लावली पाहिजेत, हेच यातून स्पष्ट होते. पुढ्यातल्या खटल्यात ह्या कायद्याचा वापर ढाल म्हणून न होता तलवार म्हणून होतो आहे का; हे प्रत्येक न्यायाधीशांनी तपासायला हवे. नव्हे तशी निसंदिग्ध तरतूदच हवी. अशी नसल्यामुळे खालची न्यायालये कायद्याचे बोट धरून चालण्याऐवजी कायद्यावर बोट ठेऊन चालतात. त्यांना तेवढेच अधिकार आहेत. कायद्याचा अर्थ लावण्याची मुभा त्यांना नाही. तेंव्हा अशी तरतूद हवीच हवी.

कोवळ्या वयातील मुलामुलींचे  परस्पर संमतीने  संबंध आले तर काय करायचे? हा ही थेट ‘लैंगिक गुन्हा’ म्हणावा;  असं कायदा सांगतो. बालकांचे लैंगिक शोषण हा गहन गंभीर प्रश्न आहेच पण अठरा वर्षाचा आतला/ली तो/ती ‘बालक’ असं एकदा कायद्यानी  ठरवलं  की बऱ्याच गोच्या होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते १० ते १९ हे कुमार वय मानलं  गेलं आहे. याच वयात शरीरातले हॉर्मोन्स मेंदूत धडका द्यायला लागतात. जसजसे आरोग्य आणि आहार सुधारतो आहे तसतसे वयात येण्याचे वय, अलीकडे सरकू लागले आहे. शारीरिक बदल होत असतात पण मानसिक, भावनिक मच्युरीटी  नसते. इंटरनेट आणि मोबाईलमुळे नको त्या स्रोताकडून, नको त्या वयात, नको ती माहिती पोहोचत असते. याचं मुख्य कारण योग्य माहिती पोहोचवण्यात आपण कमी पडतो. जिज्ञासा, धाडस करायची उर्मी, मुलामुलींनी मोकळेपणाने एकत्र येण्याच्या कितीतरी संधी, अशा अनेक घटकातून शारीरिक लगट होऊ शकते, मुलामुलींचा शरीरसंबंध उद्भवू शकतो. पण प्रत्येक वेळी याचा अर्थ ‘बलात्कार’, ‘बाल-लैंगिक-शोषण’, ‘लैंगिक हल्ला’ असा लावायचा का?

पूर्वीच्या कायद्यानुसार सोळा वर्षनंतर परस्परांच्या संमतीने शरीसंबंध मान्य होते. आता अठराच्या  आत, परस्पर संमतीने जरी  शरीरसंबंध झाले, तर तो थेट बलात्काराचा गुन्हा गणला जातो. शिवाय वर उल्लेखलेली बलात्काराची व्यापक व्याख्या जर लक्षात घेतली तर असा गुन्हा घडणं किती सोपं आहे हे लक्षात येईल. मुले/मुली वयात येताना ओढ, आकर्षण, शारीर छेडछाड हे घडत असते. यात शोषण, फसवणूक होणे शक्य आहे.  पण त्यापेक्षाही मोठे होण्यातली एक उत्स्फूर्त, नैसर्गिक आणि स्वाभाविक पायरी म्हणूनही या खेळाकडे पहाता येईल.  पहाण्याची सोय हवी.      

जो पर्यंत हे सारे प्रकार गुपचूप, गुपचूप चालतात तो पर्यंत ह्याची विशेष झळ कुणालाच बसत नाही. उलट संबंधितांना मज्जाच येत असते.  पण अशा संबंधांचा काही पुरावा निर्माण झाल्यास, म्हणजेच गर्भ राहिल्यास किंवा घरच्यांना हे नापसंत असताना रंगेहाथ पकडले गेल्यास,  मोठी आफत ओढवते. घरच्यांची पसंती नापसंती  अनेकदा जातीवरही  अवलंबून असते. मग तर गुन्हा ‘लैंगिक अत्याचार’  गुणिले ‘जातीय अत्याचार’ अशा चढत्या भाजणीचा ठरतो.

जर अठरा वर्षाच्या आतल्या मुलीला गर्भधारणा झालेली आढळली, तर ही बाब डॉक्टरने पोलिसांना कळवणे कायद्याने बंधनकारक आहे. नाही तर गुन्ह्यात  तेही सामील होते असा खटला भरला जाऊ शकतो. पूर्वी असं बंधन नव्हतं.  त्यामुळे सहमतीने संबंध आले असतील तर गर्भपात करवून घेणं सोपं होतं. त्या मुलामुलीची, आईबापांची आणि डॉक्टरांची खात्री पटली तर या साऱ्या प्रकाराकडे थोड्या सहानुभूतीने, क्षमाशीलपणे पहाणे आणि निस्तरणे शक्य होते. आता पोलीस तक्रारीला, पोलीसी खाक्याला, मुलाच्या तुरुंगवारीला, बदनामीला, मानसिक खच्चीकरणाला  पर्याय नाही. हे पोलीसी झेंगट टाळण्यासाठी मग गुपचुप, बेकायदेशीर आणि असुरक्षित गर्भपात करवून घेण्याला पर्याय उरत नाही. असुरक्षित गर्भपातामुळे कित्येक मुलींचा  बळी गेला आहे. याचा अर्थ बेबंद आणि बेजबाबदार लैंगिक संबंध यावेत असा नसून; अशा वागण्याला ‘हल्ला’, ‘गुन्हा’, ‘शोषण’ आणि ‘बलात्कार’ वगळून अन्यही आयाम आहेत एवढाच होतो.  पोलिसांना कळवण्याच्या बंधनाऐवजी बालकल्याण समिती अथवा अन्य सदय, समजूतदार यंत्रणेला कळवण्याचं बंधन असावं. उडदामाजी काळे गोरे करून ह्यांनी पुढील कारवाई करावी.     

मुळात लैंगिक संबंधांसाठी  अठरा हे संमती वय, म्हटलं तर, अतार्किक आहे. ह्या आकड्याला काहीही आगापिछा नाही.  जगात निरनिराळ्या देशात दहा पासून वीस पर्यंत संमतीवयाचे कायदे आहेत. आपल्याही देशात हे कायदेशीर वय दहा पासून मोठं होत होत, आता अठरावर पोहोचलं आहे.  माणूस आणि त्याच्या लैंगिक उर्मी जगभर जरी एक असल्या आणि कायदा काही सांगतो म्हणून बदलत नसल्या; तरी देशोदेशी संमती वयाचे  कायदे वेगवेगळे आहेत. कॅनडा, मलेशिया, इंग्लंड वगैरे देशात संमती वय आजही १६ वर्ष आहे.   अमेरिकी कायद्यात दोघांच्या  वयात तीन (किंवा काही परिस्थितीत पाच) वर्षापेक्षा, कमी अंतर असेल आणि परस्पर संमती असेल तर,  असे संबंध थेट  गुन्हा ठरत नाहीत. विविध देशात अशा विविध समजूतदार तरतुदी आहेत.  अशी काहीतरी काहीतरी तरतूद असणे आवश्यक आहे. बालपणानंतर थेट प्रौढत्व येत नाही. मधे कुमारवय, पौगंडावस्था असते याची दखल हवी.

शिवाय लग्नासाठी मुलीचे वय  अठरा आणि मुलाचे एकवीस हवे असंही कायदा सांगतो. शरीरसंबंधांना  समाजमान्यता फक्त लग्नसंस्थाच देऊ शकते अशी परिस्थिती  आहे.  मग लग्नाच्या वयापर्यंत लैंगिक भावनांचे व्यवस्थापन आणि निचरा कसं करायचे हे शिकवणार कोण?  ही समाजाची, शिक्षणव्यवस्थेची जबाबदारी आहे. लैंगिकता शिक्षणात  हेच अभिप्रेत आहे. मुळात अठरा आणि एकवीस ही विभागणी कृत्रिम आहे. मुलांना एकविसाव्या वर्षापर्यंत कशाला तंगवत ठेवलंय हे काही कळत नाही. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही. उलट नवरा सर्वार्थाने ‘मोठा’ हवा ह्या पुरुषी चालीचे हे द्योतक आहे.  लवकरच ही परिस्थिती  बदलेल असं पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलं आहे.  (पण कोणत्या दिशेने हे गुलदस्त्यात आहे.)

 बालविवाह कायद्याला अमान्य आहे पण असे लग्न एकदा लागल्यावर आपोआप संपुष्टात येत नाही. कल्पना करा, कुठेतरी लमाणांच्या तांड्यावर सोळाव्या वर्षीच तिचं  लग्न झालं आहे. वर्षाच्या आत पाळणाही हलणार आहे. सगळीकडे आनंदीआनंद  आहे. इतक्यात सोनोग्राफीवाले डॉक्टर, कायद्याला अनुसरून, अठराच्या आतील गर्भधारणेची खबर ‘मा.पो.नि.’ यांना देतात. बाललैंगिक गुन्ह्यात सामील असल्याचं लचांड त्यांना नको आहे. पोलीस खटला भरतात. ते  तरी दुसरं काय करणार? बाललैंगिक गुन्ह्यात सामील असल्याचं लचांड त्यांनाही  नको आहे. यथावकाश खटला उभा रहातो. लग्नाच्या बायकोपासून, मात्र कायद्याच्या दृष्टीने लैंगिक गुन्ह्यातून, झालेले मूल कडेवर घेऊन, आता नवरा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे. पीडिता मंगळसूत्र दाखवते आहे! आरोपी हनीमूनचे फोटो दाखवतो आहे!! दोघेही पोटच्या पोराची शप्पथ घेत निर्दोष असल्याचं कळवळून सांगत आहेत; तिला पुन्हा दिवस गेल्याचं मेहेरबान  जज्जीणबाईंच्या लक्षात आणून देत आहेत आणि न्यायदेवतेला  डोळ्यावरची  पट्टी काढायचा मोह अनावर होतो आहे!!! एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रसंग आहे. इतकंच कशाला उद्या सासर माहेरचं फाटलं तरी ‘वधू’वर बलात्कार केल्याचा गुन्हा ‘वरा’वर दाखल होऊ शकतो!!!  इतकंच कशाला; निरक्षीरविवेक वापरला नाही तर  शाळाशाळातून लैंगिकता शिक्षण देणारे, शालेय पुस्तकांत गर्भनिरोधक साधनांवर लिहिणारे, आपात्कालीन गर्भनिरोधनाची माहिती/प्रिस्क्रिप्शन  देणारे; असे सगळेच बाल लैंगिक गुन्हेगारीला   ‘प्रोत्साहन’ दिल्याबद्दल गजाआड जावू शकतात!! (Chapter IV 16) कायद्याची ही तलवार, एकाच बाजूने,  किती लखलखती आहे पहा. 

मानवी लैंगिकतेविषयक कायदेकानून करायचे म्हणजे जीवशास्त्राची गोल खुंटी कायद्याच्या चौकोनी भोकात बसवण्यासारखे आहे. जीवशास्त्राची खुंटी तर नुसतीच गोल नसून काटेरी कड असलेली आहे. ती काही गुळगुळीत होणे शक्य नाही. पण ह्या प्रयत्नात कमीतकमी पडझड व्हावी ह्या हेतूने सुचल्या त्या सूचना इथे केल्या आहेत. एवढेच.

 

 

 

 

Monday 7 September 2020

कोविडच्या साथीने दिलेले धडे

कोव्हिडच्या साथीने दिलेले धडे 
डॉ. शंतनु अभ्यंकर 



संसर्गजन्य आजार आपल्या सोबत होते, आहेत आणि रहाणार. या आजारांसाठी प्रतिबंधक उपाय हे निश्चितच स्वस्त पडतात. पण या उपायांचे  फायदे सहज दृष्टोत्पत्तीस येत नाहीत.  काल गाड्यावरचे  चायनीज खाल्ले, जुलाब झाले, त्याच्या सलाईनचे तीन हजार खर्च झाले; असा हिशोब आपण सहज काढतो.  पण लहानपणापासून शुद्ध पाणी प्यायल्याने न झालेल्या जुलाबाचे तीस हजार वाचले, असा विचार आपण करत नाही.   त्यामुळे प्रतिबंधक उपयांचं कौतुक नसतं कुणाला.
 दरवेळी प्रतिबंध शक्य नसला तरी साथीचा  वेळीच मुकाबला करायला शिकणं आवश्यक आहे. कोव्हिडची साथ आली.  या साथीनी भल्याभल्यांची, अगदी  महासत्तांचीही  जिरवली. सगळ्यांना चांगलाच धडा शिकायला मिळाला. सगळ्यात मोठा धडा मिळाला तो आरोग्यव्यवस्थेला. आता पुढे  काय? पुन्हा  असं होऊ नये म्हणून काय करायचं? कुठे चुकलं? याहून बरं आणि भलं काही शक्य होतं का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत. 
लोकलज्जेपायी आपल्याला टिबी किंवा महारोग झाल्याचं लोक लपवून ठेवायचे आणि त्यातून अधिकच नुकसान व्हायचं.  तसंच आता काही देश साथ पसरल्याचं लपवून ठेवतात. तात्कालिक आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हे केलं जातं पण यातून भलतीच आपत्ति उभी राहते. त्यामुळे सत्यकथन ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे. जग आता जवळ आलं आहे. त्यामुळे साथीही सहज जगद्व्यापी होत आहेत. त्यामुळे उपायही सर्व पृथ्वी व्यापून उरणारे हवेत. 
मुळात कित्येक देशांकडून मुकाबला सुरू  करायला उशीर झाला. व्हायरस चांगला फैलावल्यावर मगच त्याला फैलावर घ्यायचं सुचलं. झटपट आणि  मोठ्या प्रमाणावर तपासण्या, संपर्क-मागोवा (Contact Tracing),  आरोग्यसेवा, अतिदक्षता सेवा, आरोग्य शिक्षण, वगैरे  उभारण्यासाठी बरीच झटापट करावी लागली. बरीच मनुष्य आणि वित्तहानी पदरी आली. तेंव्हा तात्काळ प्रतिसाद देणाऱ्या यंत्रणा उभारणे आता गरजेचे आहे. 
अशा आजारात संपर्कातील व्यक्तींचा माग काढणे आवश्यक ठरते. एचआयव्ही, टिबी, रेझिस्टंट  इन्फेक्शन,  वगैरे बाबतीतही हे आवश्यक असते. हे कसे करायचे ह्याची जाण त्यामुळे आहेच. पण कोव्हिडसारख्या आजारात हीच गोष्ट विद्युतगतीनी  करावी, तरच आपली धडगत आहे. मग अशी ऐनवेळी  गती घेण्यापेक्षा, सततच गतीनी  काम केलं तर बिघडलं कुठे? संपर्क-माग काढण्यासाठी मोबाइल लोकेशनद्वारे,  क्रेडिट कार्डच्या वापराद्वारे, आरोग्यसेतु अॅपद्वारे माहिती जमवली गेली. अशा पद्धतीने माहिती गोळा  करत गेलं तर इतकी प्रचंड महिती गोळा होते की तिचे अर्थवाही  विश्लेषण हे एक वेगळेच तंत्र कौशल्य आहे. बिग डेटा आणि त्याचा अर्थबोध हे नव्या युगात कळीचे आहेत. 
पण जुन्या युगापासूनच साथरोगशास्त्र असं एक वेगळं शास्त्र आहे. पण  त्याला वलय  नाही. आवडीने ह्या क्षेत्राकडे कोणी वळत नाही. हयात करियर करण्यासारखं  काही नाही अशी डॉक्टरी भावना  आहे. ही किती चुकीची आहे ते आता लक्षात घेतले जाईल आणि एक आव्हानात्मक क्षेत्र म्हणून इकडे अधिकाधिक विद्यार्थी आकर्षित होतील असं दिसतं. सार्वजनिक आरोग्यक्षेत्राचा गाडा हा अशा तज्ञांनी हाकणे हेच उत्तम ठरणार.
सध्या आरोग्यव्यवस्था आयएएस अधिकाऱ्यांकडे आहे. ह्याही साथीत प्रत्येक ‘बाबू’नी आपापल्या समजुतीनुसार निर्णय घेतले. पण जे डॉक्टर होते आणि ‘बाबू’ होते ते उजवे ठरले. बाकीच्यांच्या बऱ्याच चुका, साथ रोग नियंत्रण कायद्याच्या पडद्याआड झाकून राहिल्या. आरोग्यव्यवस्था सांभाळण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र प्रशासकीय यंत्रणा हवी अशी जुनीच मागणी आहे. ह्या निमित्ताने त्याकडे गांभीर्याने पाहीले जावे. 
नवे नवे साथीचे आजार हे बहुतेकदा प्राण्यांतून माणसात प्रविष्ट होतात. इबोला, सार्स, मर्स, करोना  हे सारे असेच; प्राणिज आजार. तेंव्हा ह्या मार्गावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवायला हवी.   मानव आणि निसर्गाचा झगडा आदिम आहे. शेती, शिकार, वस्ती, व्यापार, वहातूक वगैरेच्या निमित्तानी, मनुष्य कळत नकळत निसर्गावर आक्रमण करतो आणि मग आक्रसलेल्या अधिवासातील प्राणीसृष्टीचा आणि माणसाचा सामना होतो. आर्थिक धोरणे बदलून,  कायदेशीर तरतुदी वापरुन आणि लोकशिक्षणातून हे प्रकार कमी करता  येतील. प्राण्यांत वस्तीला असणाऱ्या संभाव्य साथ-जंतूंचीही शिरगणती आणि आणि नोंद व्हायला हवी. ही माहिती सतत अद्ययावत ठेवायला हवी. यातून नवे नवे शत्रू लवकर लक्षात येतील. 
नव्या नव्या साथींचे आणखी एक कारण म्हणजे रेझिस्टंट जंतू. अॅंटीबायोटिक्सच्या प्रच्छन्न आणि बेजबाबदार वापरानेही जंतू ‘हुशार’ आणि ‘हुश्शार’ होतात. नेहमीच्या वापरातल्या औषधांना  ते दाद देईनासे होतात.  त्यांच्यात रेझिस्टन्स निर्माण होतो. मग हे शहाणे झालेले जंतू जोमाने पसरत जातात. साथी येण्यामागे हेही कारण आहे. टिबीचे असे बहुविध औषधांना पुरून उरणारे जंतू सध्या हैदोस घालत आहेत.  तेंव्हा अॅंटीबायोटिक्सबद्दल सर्वांकडूनच सबूरी आणि शास्त्रवचनबद्धता  अपेक्षित आहे. 
कठीण समय येता  सरकारी दवाखानाच कामास येतो, हे ही जनतेने पुरेपूर अनुभवले. पण  या जनपदध्वंसाने  आपली लेचीपेची आरोग्य व्यवस्था उघडी पाडली. दवाखाने कमी, डॉक्टर कमी, परिचारिका वगैरेंचा तर डॉक्टरांपेक्षा अधिक तुटवडा.  औषधे  आणि सामुग्री कमी आणि कमअस्सल. इंजेक्शन आहेत तर गोळ्या नाहीत, गोळ्या आहेत तर इंजेक्शन नाहीत.  धर्म नावाची अफूची गोळी  मात्र गल्लोगल्ली उपलब्ध.   ग्रामीण भाग बरा म्हणावं अशी शहरांची अवस्था. ही यंत्रणा सुदृढ करायला हवी. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.५% खर्च आरोग्यावर  करण्याचा,  राष्ट्रीय आरोग्य धोरणातला, संकल्प जल्दीने तडीस नेला पाहिजे. ही व्यवस्था सुधारणे सोपं नाही. भ्रष्टाचाराचा ऑक्टोपस साऱ्या यंत्रणेला विळखा घालून बसला आहे. करोनाचा आजार आता रीतसर करोनाचा बाजार होऊ पहातो आहे. 
करोनावर आरोग्यव्यवस्था ओवाळून टाकताना बाकीचे आजार काही सुट्टी घेत नाहीत. करोनाचे हजार मृत्यू वाचवताना, इतरत्र दुर्लक्षाने,  तेवढेच जर  मरणार असतील तर ही लढाई व्यर्थच म्हणायची. या साथीतही इतर आजारांकडे लक्ष पुरवायला माणसे कमी पडायला लागली. नेमकी आकडेवारी यथावकाश समजेल पण या काळात घरगुती बाळंतपणे वाढली, तेंव्हा मातामृत्यूही वाढले असणार. बाळांची  लसीकरणाची वेळ हुकली, तेंव्हा त्यांचीही दुखणी वाढणार. माणसं दवाखान्याला घाबरायला लागली.  करोनाभयाने आजार अंगावरच काढला, त्यातून तो वाढला आणि माणूस दगावला; अशाही कथा आणि व्यथा आहेत. 
मानसिक आरोग्याच्या सेवा कीती तोकड्या आहेत,  हेही या साथीनी लक्षात आणून दिलं आहे. महाराष्ट्रातला सर्वात मोठा मानसोपचार तज्ञ, जो पंढरीचा विठोबा, त्याचाच दरवाजा बंद! माणसे घरात कोंडलेली. कामधंदा बंद.  चोवीस तास तीच तीच  माणसे आसपास.  विरंगुळा विसराच, फक्त विवंचना म्हटल्यावर मनःस्वास्थ्य बिघडणार नाही तर  काय होणार?  
शिवाय जे करोनाने बाधित झाले, जे मृत्यू पावले त्यांच्या आणि नातेवाईकांच्या मनावर तर कायमचे ओरखाडे उठलेले आहेत. प्रेम, आशा, करुणा, आधार, सांत्वन अशा भावनांची जागा, त्रस्त डॉक्टरांशी झालेल्या   कोरड्या व्हिडिओ कॉलने कशी बरे घ्यावी? आप्तांच्या   प्लॅस्टिक बंद मृतदेहांना,  कोणत्याही इतमामाशिवाय मिळणाऱ्या सरकारी भडाग्निने कित्येक मनं होरपळून गेली आहेत.  जिवाभावाच्या माणसाला, शेवटच्या आजारात  धडपणे मदत करू शकलो नाही हा धक्का पचवणे खूप जड आहे. या आणि अशा अनेकांना मानसोपचार तज्ञांची गरज लागेल. मानसोपचाराभोवतीचे तुच्छतेचे वलय लोकशिक्षणातून भेदावे लागेल. प्राथमिक आरोग्यकेंद्रांद्वारेही मानसोपचार सेवा देता येतील. याकडे लक्ष पुरवले पाहिजे.   
पण वाईटात काही चांगलंही आहे.  लसीकरणात भारताने भलतीच झेप घेतलेली आहे. लस आली की ती सर्वांपर्यंत पोहोचवणारी यंत्रणा आपल्याकडे जणू सज्ज आहे. अमेरिकेतल्यासारखा आंधळा लस-विरोध आपल्याकडे अभावानेच आढळतो. (गेल्या तीस वर्षात बाळाला लस द्यायला नकार देणार एकच बाप मला आढळला. तो स्वतः होमिओपॅथी डॉक्टर होता!)  हा एक मोठाच फायदा ठरेल अर्थात लस येईल तेंव्हा.  
या साथीत होमिओ वगैरे उपचारही चर्चेत आले.   रोगावर रामबाण इलाजाचा दावा करणारे, पुरावा विचारताच निरुत्तर झाले. पण यानिमित्ताने रामबाण कशाला म्हणावं?, इम्युनिटी कशाशी खातात?, प्रतिकारशक्ती दुधारी असते म्हणजे काय?,   औषधे लसी वगैरेंच्या चाचण्या कशा केल्या जातात?, त्या कीती किचकट असतात वगैरे विषय सामन्यांच्या चर्चेत आले. वैज्ञानिक कसोट्यांवर औषधे, लसी,  ज्ञान आणि कौशल्ये वारंवार पारखत रहावी लागतात आणि हाच मार्ग खरा हे जनमानसावर बिंबवले गेले.   
या अशुभ काळात काही चांगल्या सवयीही अंगीकारल्या गेल्या. साथ ओसरल्यावरही  त्या सोडून देता कामा  नयेत. सार्वजनिक ठिकाणी मुखपट्ट्या वापरत रहाणेच योग्य. वारंवार हात धुवत  रहाणेच  उत्तम.    शिंकण्या-थुंकण्या-खोकण्याच्या स्वच्छ सवयी सांभाळणेच बरे. शक्यतो टेलीमेडीसिनने उपचार घेता  आले तर चांगलेच....आणि हो, ‘या  बिमारीपासून बचने के लीये आपली जी ढाल आहे, याने की डॉक्टर, स्वास्थ्य कर्मचारी, इत्यादींना सन्मान आणि पूरा सहयोग देण्याची, ह्या योद्ध्यांची देखभाल करण्याची, (आणि इतक्या दिवसात हा संदेश मराठीत असावा अशी मागणीही न करण्याची) सवय लागली असेल तर तो ही एक फायदाच म्हणायचा.  फारच अंधारलेल्या रुग्ण-डॉक्टर/कंपाउंडर  संबंधात तेवढीच विश्वासाची, मायेची मिणमिणती पणती. ही पणती  जपून ठेवली पहिजे.

दैनिक सकाळ 8 सप्टेंबर 2020

Saturday 5 September 2020

पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्

 

पुनरपि  जननं, पुनरपि  मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई

 

(सदरहू लेखात खालील पारिभाषिक संज्ञा वापरल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी मूळ इंग्रजी शब्द कंसात दिले आहेत. 

·        नरवानर Humans and Nonhuman Primates

·        नर Human male

·        नारी Human female

·        वानर Nonhuman Primates

·        माकड Monkeys

·        कपी Apes)

 

 

 

पुनरपि  जननं, पुनरपि  मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम्; असं करत करत, चौऱ्यांशी लक्ष योनीतून प्रवास केल्यावर मनुष्यजन्म प्राप्त होतो म्हणतात. पण जन्ममृत्यूचं हे  चक्र नसून ही  साखळी आहे; जननी आणि जठर काळाच्या ओघात जैसे थे राहिलेलं नाही; बदलत, बदलत गेलंय असं उत्क्रांतीशास्त्र सांगतं. मानवी शरीर, त्याची अचंबित करणारी  रचना आणि आश्चर्यमुग्ध करणारे  कार्य  म्हणजे ह्या साखळीचा कित्येक पिढ्यांचा वारसा आहे. मनुष्यमात्रांच्या पृथ्वीवरील आगमनापूर्वी, काही लक्ष नव्हे, तर काही कोटी जीव इथे नांदून  गेले आहेत. मागे, मागे, मागे जात राहिलो तर आपला वंश पहिल्यावाहिल्या सजीवापाशी पोहोचेल. पण इतकं मागे जाण्याऐवजी, इह संसारे आगमनाचा मानवी जन्मसोहळा इतका दुस्तर का?, माणसाच्या माद्या का आणि कशा वितात?; हे समजण्यासाठी थोडेसेच मागे गेलो तरी चालेल.

वरच्या वाक्यातले  ‘माणसाच्या माद्या’ आणि ‘वितात’ हे शब्दप्रयोग तुम्हाला धक्कादायक किंवा असभ्य वाटतील पण वस्तुनिष्ठपणे विचार केला तर दोन्ही अगदी बरोबर आणि रास्त आहेत.

मनुष्य हा प्राणीच आहे आणि आपले खाणे, जुगणे, रतणे,  प्रसवणे इतकेच काय वागणेही उत्क्रांतीचीच देन आहे. मनुष्याला  पुनरुत्पादनासाठी फुटवे फुटत नाहीत (Asexual Reproduction) ते लैंगिक फलनातूनच (Sexual Reproduction) साधले जाते. माणसाला  अंडी घालताच (Oviparity) येणार नाहीत. थेट पिल्लांना जन्म देणं (Viviparity) हेच मानवी  औत्क्रांतिक भागधेय आणि हो माणूस हा  स-स्तन प्राणी. त्यामुळे पिल्लांना अंगावर पाजणे आणि तेही फक्त माद्यांनी, हे तर मस्टच. याबरोबर संप्रेरके (Hormones),  सरपटणाऱ्या  (सरीसृप, Reptiles) पूर्वजांकडून; वार (Placenta), पिल्लावणाऱ्या (Viviparous) पूर्वजांकडून आणि जननमार्ग नर-वानर पितरांकडून आपल्याला वारसाहक्कानी प्राप्त आहे. या उत्क्रांती मंथनातूनच  द्वीपाद चाल, मोजकी संतती, पिल्लांचा निगुतीने सांभाळ, ‘रक्त-मूल’ अशा   प्रकारची वार  आणि   मोठाच्या मोठा मेंदू ही वैशिष्ठ्ये  तयार झाली आहेत. (Hemochorial म्हणजे रक्त-मूल प्रकारच्या वारेत, आईच्या रक्तात बाळाच्या वारेची मुळे तरंगत असतात. आई आणि बाळाच्या रक्ता दरम्यान फक्त  तीनच  पदरांचा पापुद्रा असतो)

हां, तर मी काय सांगत होतो, माणसाच्या माद्या वितात त्या काही विशिष्ठ पद्धतीने. माणसाचं  (Humans) आणि माकडांचं (Monkeys) नातं डार्वींननी  स्पष्ट केलेलंच आहे. आपण चुलत भावंड आहोत. म्हणजे माकडापासून माणूस उत्क्रांत झाला असं नाही.  तर जसे आपले आणि आपल्या चुलत भावंडांचे  आजोबा एकच होते तसे माणसाचे आणि माकडाचे पूर्वज एकच होते. पण माकडांपासून फारकत घेतल्यावर माणसाच्या फांदीला गोरीला,  चिम्पॅंजी अशा कपिकुळाच्या फांद्या फुटल्या. (चित्र क्र  १)  माणसाच्या होमो या प्रजातीत (Genus) इतरही काही भाईबंध होते. होमो हॅबिलीस, होमो निअंडरथॅलेसीस इत्यादि. पण हे ‘इतर सगळे’ काळाच्या उदरात लुप्त झाले. वंशखंड झाला त्यांचा. माणूस, होमो सेपीएन, तेवढा  टिकला. नुसता टिकलाच नाही तर निसर्गाच्या नाकावर  टिच्चून त्याचा वंश फुलला, फळला, फळफळला. सारी पृथ्वी त्यानी पादाक्रांत केली आणि कमाल म्हणजे ह्या साऱ्याची तीव्र जाणीव, जिज्ञासा त्यात  उत्क्रांत झाली. आसपासच्या  सृष्टीसोबतच    स्वतःकडे इतक्या कुतुहलाने  आणि कौतुकाने पहाणारा  मनुष्य एवढा एकच  प्राणी. 

हां, तर मी काय सांगत होतो, मानवी माद्या वितात त्यांची काही खासियत आहे. एक तर माणसांत बाळंतपण खूपच अवघड आहे, वेळ खाऊ आहे, शक्तिपात करणारे आहे. इतके की कुणाच्या मदतीविना, कोणी ‘सोडवल्या’विना माणसाच्या मादया सुखरूप वितील अशी शक्यता कमी. नारींच्या मानानी माकडी, वानरी आणि कपी माद्या सहज वितात.  हे असं आहे आणि हे असंच आहे ह्याला काही जीवशास्त्रीय, औत्क्रांतिक  कारणे आहेत.

माणसाच्या मादया वितात तेंव्हा  पिल्लाचा प्रवास मादीच्या जननमार्गातून,  एका  अरुंद बोगद्यातून होतो.  आपल्यापैकी सीझरने जन्मा घातलेले वगळता, सर्वांना हा प्रवास करावा लागला आहे. हा प्रवास अगदी अद्वितीय आहे. जननमार्ग म्हणजे योनिमार्ग. योनि म्हणजे जणू भरपूर ताणता येईल अशी इलॅस्टिकची नळी आहे. (चित्र क्र २) हिच्या आतल्या टोकाला गर्भाशय आहे आणि बाहेरच्या टोकाशी बाह्यांग. कमरेच्या हाडांच्या कडीतून योनीमार्गाची ही नळी    आरपार जात असल्याने,  ताणले जाण्याला अर्थात कमरेच्या हाडांची मर्यादा आहे. योनीमार्ग ताणला जात असल्याने हाडांच्या कडीच्या आतील माप हेच जननमार्गाचे माप.  हीच्या मागच्या बाजूला माकड हाड आहे. हे सुमारे सहा इंच लांब आणि पुढच्या बाजूचे हाड जेमतेम दीड इंचाचे. (चित्र क्र ३) पण हा प्रवास पिल्लाचं  अंग पिळवटून टाकणारा आहे. पिळवटून म्हणजे शब्दश: पिळवटून टाकणारा. ह्याचे कारण म्हणजे हा बोगदा सरळसोट नाही. त्याला थोडा पीळ आहे. उभ्या आणि आडव्या अश्या दोन्ही अक्षांवर पीळ आहे.  ह्या वळणानुसार बाळाचा प्रवास व्हावा लागतो. मूलत: ह्या बोगद्यात शिरायची जागा लांबटगोल  असते. हा लंबगोल पुढूनमागे चपटा असतो आणि बाजूबाजूला ताणलेला. बाहेर यायची जागाही (बाह्यांग) लंबगोल असते; पण ही बाजूबाजूने चेपलेली असते आणि पुढून मागे चांगली ताणलेली असते. म्हणजेच ह्या बोगद्याचा लांबट व्यास काटकोनात (९०) वळलेला असतो. शिवाय या बोगद्याच्या प्रवेशाचे तोंड आणि एक्झिटचे तोंड समोरासमोर नसतात. आत शिरताना पार्श्वदिशेला, माकडहाडाच्या दिशेला,  जाणारा मार्ग आतल्याआत  ५५त वळून,  बाहेर पडताना पुढच्या दिशेला तोंड करुन  असतो.  म्हणजे  बाळाचे मुटकुळे ह्या अरुंद घाटमार्गातून (उभ्या अक्षात) नव्वद अंशातून पिळून आणि (आडव्या अक्षात)  पंचावन्न अंशातून वळून यायला पाहीजे. (चित्र क्र ४) बाळ कळेगणिक खाली, खाली, आणि शेवटी बाहयांगातून बाहेर ढकलले जाते. पण वाटेत इतके आळोखेपिळोखे  द्यायचे म्हणजे मामला अवघड होणारच.

आणखी एक भानगड असते. बाळाचे डोके चेंडू सारखे गोल गरगरीत नसते. ते अंडाकार, निमुळते असते. हे डोक्याचे अंडे निमुळत्या दिशेने बाहेर येणे सुकर. अंडे आडवे आले तर दुष्कर.  जर बाळ नतमस्तक (Flexed) असेल तर  हनुवटी छातीशी आणि  नाकाचा शेंडा त्याच्या पायाच्या दिशेला राहील.  अंडाकृती डोक्याचे मागच्या टाळूचे निमुळते टोक  जननमार्गत शिरेल. जर बाळानी मान वर केली तर परिस्थिति बिनसेल. जन्मापासूनच  मान वर करून न पहाणे किती महत्वाचे आहे पहा!!

वानरींचा (Nonhuman Primates) जननमार्ग हा नारींच्या मानानी सरळसोट असतो. (थोडासा एका दिशेने चेपलेला) वानरीसूतांचे डोकेही त्यात  सहज बसेल असे (जर्रा चेपलेले) असते.  बाकी एकूणच ऐसपैस जागा असल्याने चिंपांझीणी वगैरे झटक्यात बाळंत होतात. बाळ सुळकन् बाहेर येते. वेळही बराच कमी लागतो. वेदनाही कमी होत असाव्यात. तोंडातून सहसा ब्र सुद्धा निघत नाही. फार किंचाळलं वगैरे तर ती मादी आणि पिले कोणाच्या तरी भक्ष्यस्थानी पडायची शक्यता जास्त. त्यामुळे उत्क्रांती दरम्यान सहनशक्ती  आणि सुकर प्रसूती असं दोन्ही घडत गेलं.  

नारींत  आणि वानरींत मूल जन्मताना डोक्याकडून बाहेर येते. पायाळू होणे, म्हणजे डोक्याऐवजी आधी पाय किंवा ढुंगण पुढे येणे.    दोघींतही, बाळाला  आणि बाळंतीणीला, हे  त्रासदायक ठरते. कुठेही, कधीही,  प्रवेश करताना आधी ढुंगण पुढे करणे असभ्यच की!! शिवाय मानवी पिल्लू जन्मतः आईच्या गुदद्वाराकडे तोंड करुन  जन्माला येतं. बाकी ओरांगउटांग, मार्मोसेट, बबून अशा बहुतेक  वानरींत उलटं  असतं. पिल्लू आईच्या मूत्रमार्गाकडे तोंड करुन  बाहेर येतं. थोडक्यात वानरी, प्रसूत होताना, खाली वाकून  आपल्या पिल्लाचं तोंड पाहू शकतात. नारींना हे ‘मुहं दिखाई’चं सुख नाही. पण याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे वानरी आपल्या आपण बाळाच्या डोक्याला आधार देऊन प्रसंगी  ते धरून  बाहेर ओढून घेऊ शकतात. ह्या अवस्थेत आधार दिल्यास बाळाचे डोके अधिकाधिक नतमस्तक होते. त्याचा निमुळता भाग योनीमुखाशी येतो.  नारी असं करू शकत नाहीत. (चित्र क्र ५) तसा प्रयत्न केलाच तर अंडाकार डोक्याचा निमुळता भाग पुढे येण्याऐवजी रुंद भाग पुढे येईल. बाळाने  ‘मान वर केली’ (Extended Neck) असा अर्थ होईल. बाह्यांगाला मोठीच इजा  होईल.

त्यामुळे मनुष्याच्या मादीला बाळंतपणात कोणीतरी दिमतीला  असावं लागतं. डॉक्टर किंवा दाई तरी हवी; किमान आई तरी हवी. त्यामुळे आज माणसाच्या मुली  डिलिव्हरीसाठी माहेरी येतात.  गोरीलाच्या मुली येत नाहीत. सुईण ही अगदी आदीम गरज आहे. वेश्या किंवा वकिली हा  आद्य  व्यवसाय नसून सुईण हा आद्य व्यवसाय आहे.  आदि-मातांची ही गरज आदि-सुईणी पुरवत आल्या आहेत.  त्यांच्या लुडबुडीने काही थोडे भले होत होते. ही लुडबूड उत्क्रांतीधारेत उपकारक ठरत होती. सुईणपण, दाईपण  माणसाच्या वागणुकीत कोरली जात होती.  ‘ज्ञानी राखीजे  अलिप्तता; अवधान दिजे, धरी अपेक्षा; करी कदापी न उपेक्षा, जन्मवेळी’।    (अध्याय १८, ओवी २७)*;  (Masterly inactivity  with watchful expectancy) हे आधुनिक प्रसूतीशास्त्राचे ब्रीद आहे.  पण आदि सुईणींना हे शिकवणार कोण? त्या आपल्या त्यांच्या अंतःप्रेरणेने बायका सोडवत होत्या.

(* ही ओळ माझ्याच, अद्याप एकच ओवी लिहून झालेल्या, आगामी ग्रंथातील आहे. गैरसमज नसावा.)  

कळा वाढाव्यात म्हणून  ह्या पोट चोळतात.  पोटावर दाबून, प्रसंगी पोटावर  स्वार होऊन,  बाळ बाहेर येण्यास मदत करतात.  मूल पायाळू असेल तर ते फिरवण्याचे प्रयोग सुइणींनी केले  आहेत. विविध प्रकारे बाह्यांगमर्दन करून,  तेले लावून जननमार्ग सैल  आणि बुळबुळीत करण्याचे प्रयत्न ज्ञात आहेत. पाणमोट फोडणे, पिशवीचे तोंड  ताणणे, विटप-छेद (बाह्यांग छेदणे, Episiotomy)केलेले आहेत.  प्रसवेशी संग केला असता वीर्यामुळे प्रसूती जलद होते असेही एक प्राचीन निरीक्षण आहे. सुईणींनी ह्यालाही उत्तेजन दिलेले आहे. इतकंच काय,   सर्व आदिम संस्कृतीत उदर-जननाच्या (Caesarean birth) कथा आहेत. बाईला सोडवण्यासाठी केलेत तसे बाळाला ‘रडवण्यासाठी’ ह्या सुईणींनी अनेक उपाय  केले आहेत. बाळाला उलटे धरणे, फटके मारणे, गार/गरम पाण्याचे हबके मारणे,  चोळणे असे अनेक. काही गैर, काही दुरुस्त.

 हे प्रकार शतकानुशतके नव्हे, सहस्त्रानुसहस्त्रके चालू आहेत. अशा प्रकारे  सहजीवाला सहकार्य करायला लावणारं हे अवघड बाळंतपण उत्क्रांतीच्या ओघात निपजलंच कसं?  

उत्क्रांती शास्त्रानुसार इथे सक्षम ते टिकतात. ‘सक्षम’ म्हणजे मोठे होऊन पुढच्या पिढीला जन्म देऊ शकणारे. उत्क्रांतीच्या भाषेत बहुतेकदा ते तेवढेच   सक्षम.  म्हणजे बाळ-बाळंतीण सुखरूप राहतील अशी रचना, अशी क्रिया, अशी वागणूक उत्क्रांती दरम्यान पिढ्यानपिढ्या संक्रमित होत जाणार. ह्याच्या विपरीत रचना, क्रिया, वागणूक असणारे नर-वानर उत्क्रांतीच्या स्पर्धेत बाद ठरणार. त्यांचा वंशखंड होणार. थोडक्यात जी रचना आज दिसत्येय, जी क्रिया आज होत्येय, जी वागणूक आज प्रत्ययास येत्येय; ती तर औत्क्रांतिक पुण्यसंचिताचे नवनीत  म्हणून आहे.  वानरींत एवढी सुलभ असणारी प्रसूतीक्रिया नारींत इतकी अवघड का? तर ही सगळी स्वतःच्या पायावर उभे रहाण्याची आणि भलामोठा  मेंदू बाळगण्याची फळं भोगतोय आपण.

स्वतःच्या पायावर उभं रहायचं तर खुबे लांबलांब असलेले बरे. मग ते तसे उत्क्रांत झाले. पण मग जननमार्ग मागून पुढे असा अरुंद झाला आणि प्रसूती अवघड झाली. उभ्या देहाच्या  वजनाची मदार आता  माकडहाडाला  पेलावी  लागली.  मग माणसांत माकडहाड जाड, जड आणि ठळक झाले. त्या भानगडीत ते जरा जननमार्गात सरकले आणि प्रसूती अवघड झाली.

त्याच वेळी माणसाचा मेंदूही मोठा मोठा होत होता. शेवटी तो अशा अवस्थेला पोहोचला की आता ह्याहून मोठा झाला तर बाळाचे  डोके जननमार्गतून बाहेर येणेच अशक्य होईल. मग अशी बाळे जन्मालाच येणार नाहीत. ती मरतील. त्यांच्या आयाही अशा अडलेल्या बाळंतपणात मरतील.

मग उत्क्रांतीच्या ओघात यावर अनेक नामी तोडगे निघाले. रिलॅक्सिन ह्या संप्रेरकांच्या प्रेरणेने, माद्यांच्या कमरेचे सांधे किंचित सैल होऊ लागले. कमरेचे कडे किंचित विस्तारू लागले. माणसाच्या  माद्या एकमेकींना, बाळंतपणात कंबर ढिली झाल्याचं सांगतात, ते काही खोटं नाही.    माणसाच्या बाळाचे डोके जन्मसमयी लिबलिबीत राहू लागले. त्यामुळे डोक्याचा आकार अधिकाधिक निमुळता होऊन डोके जननमार्गाबाहेर येते. जन्मतः माणसाच्या पिल्लांची डोकी लांबोळकी, जिरेटोप घातल्यासारखी दिसतात ती  यामुळेच. पुढेही चांगली दीड दोन वर्षाची होईपर्यंत कवटीची हाडे जुळून येत नाहीत. त्यात लिबलिबीत फटी रहातात. हाताला सुद्धा जाणवतात त्या. त्याला टाळू म्हणतात. झपाझप  वाढणाऱ्या मेंदूला  सामावून घ्यायला लवचिक कवटी बेस्ट. जन्मवेळी आईच्या कटीत मोठी कवटी मावूच शकणार नाही. त्यामुळे जन्मानंतर मेंदूची झपाट्याने वाढ (Encephalisation) हा औत्क्रांतिक बदल माणसांत घडून आला, मानववंशात सामावला गेला.

जन्मानंतरही मेंदूची झपाट्याने वाढ झाल्याचे फायदे तोटे दोन्ही झाले. वानरीच्या पिल्लांचा ५० ते ६०% मेंदू जन्मतः तयार असतो. नारीच्या पिल्लांचा जेमतेम २५%. म्हणजे मेंदू दृष्ट्या  माणसाची पिल्लं, पूर्ण दिवसाची पण  ‘अपुऱ्या  वाढीची’ निपजतात (Secondary Altriciality). माकडीच्या किंवा वानरीच्या पिल्लांसारखी ती आपलीआपण आईला बिलगून धरू शकत नाहीत. मुठीत धरायला नारींच्या अंगावर वानरींसारखे केसही नसतात आणि नन्ह्यामुन्न्यांच्या बाळमुठीत तेवढं बळही नसतं. त्यांना सतत अंगाखांद्यावर वागवावं लागतं. पुढेही बराच काळ त्यांना वाढवावं लागतं, पढवावं लागतं, तेंव्हा कुठे ती हाताशी येतात.

मेंदू जसा जन्मानंतर वाढतो तशाच माणसातील अनेक गुंतागुंतीच्या जैवरासायनिक क्रिया, प्रतिकारशक्ती, वगैरेही ‘अपुऱ्या वाढीच्या’ असतात, कच्च्या असतात. जन्मानंतर त्या सावकाश आणि यथावकाश पिकतात. विविध अवयव सक्षम असण्याच्या दृष्टीने विचार केला  तर माणसाच्या बाळाला अजून तीन ते सहा महीने गर्भवास हवा, असा निष्कर्ष निघतो. आपल्या  निएनडर्थल भगिनींत एक वर्षाची गर्भावस्था असायची. पण मेंदू मोठा मोठा होत गेल्याने माणसांत  नवव्या महिन्यातच प्रसूती आणि पुढे परावलंबी पण झपाट्याने वाढ असा सुवर्णमध्य उत्क्रांत झाला आहे.  कसा ते पाहू या.

असं बघा; खरंतर आई आणि बाळ यांच्यात निम्मीच  गुणसूत्र समान असतात. म्हणजेच आई आणि बाळ ही जनुकीय दृष्ट्या भिन्न भिन्न जीव असतात. त्यांचे रक्तगटही बरेचदा भिन्न असतात.  भिन्न व्यक्तीचे रक्त, त्वचा, अवयव असं काही आपलं शरीर सहजासहजी स्वीकारत नाही. सहसा अशा परकीय पेशींचा नायनाट करण्याची यंत्रणा अगदी चोखपणे आपलं काम बजावत असते. यालाच प्रतिकारशक्ती म्हणतात. मग हा परका जीव  आईच्या उदरात रुजतोच कसा? वाढतोच कसा? मूळ  धरायच्या आत समूळ उच्चाटन व्हायचं, तिथे  भरण, पोषण, पालन, संवर्धन कसं होतं? या प्रश्नाला अनेक उत्तरे आहेत.

कल्पना करा  की आईची  प्रतिकारशक्ती बाळाचे ‘वेगळे’, आईला   ‘परके’ असे रेणु, म्हणजे मुख्यत्वे प्रथिने, पाहू शकते. अशी रेणु/प्रथिने  नजरेस पडली  की ती त्यांचा नायनाट करणार. म्हणजे गर्भपात होणार. आईच्या  प्रतिकारशक्तीची दृष्ट लागू नये म्हणून बाळाला अनेक पातळ्यांवर  संरक्षण असते. त्यातील एक महत्वाचा अवयव  म्हणजे वार. ह्या वारेतून बाळाला हवे ते पोहोचवले जाते आणि नको ते परत घेतले जाते. वारेत आई आणि बाळाचे रक्त आमनेसामने येतं; पण एकमेकांत मिसळत नाही.  रक्त वेगवेगळं  ठेवणारा  पापुद्रा अनेक पदरी  असतो.  अश्वकुळातील (Genus Equus)  प्राण्यांत  हा सहा  पदरी असतो (Epitheliochorial Placenta). त्यामुळे मातेच्या प्रतिकारशक्तीच्या अपरोक्ष बाळ सुखेनैव  वाढत असतं. त्या  तट्टाला मोठेपणी लागणारी बरीचशी प्रथिन-सामुग्रीही गर्भावस्थेतच प्राप्त होते.

माणसांत असं नसतं. माणसांत वारेचा  हा पापुद्रा अगदी पातळ, म्हणजे  तीनच पदरी (Hemochorial) असतो. त्यामुळे आईच्या प्रतिकारशक्तीच्या डोळ्यावर येणार नाहीत एवढीच आणि अशीच  प्रथिने  माणसाच्या  बाळात असतात. पचन, चलनवलन, संरक्षण इत्यादीसाठी लागणारी संपूर्ण सामुग्री जन्मानंतर  यथावकाश निर्माण होते. कारण ह्या निर्मिती दरम्यान बाळाचे अनन्य असे रेणु निर्माण होतात. ते जर आईच्या प्रतिकारशक्तीच्या नजरेस पडले तर आफतच.    त्यामुळे माणसाचे बाळ जन्मतः  खूपच हतबल असतं. घोड्याचं बाळ जवळपास घोडा म्हणूनच जन्माला येतं पण माणसाच्या बाळाचा ‘एवढा मोठा घोडा’ व्हायला बराच  वेळ  लागतो.

पण ह्या निव्वळ तीनपदरी वारेचा एक मोठाच फायदा असतो. गर्भावस्थेत मेंदूच्या जलद वाढीसाठी त्याला सतत  ग्लुकोजचा खुराक लागतो. ही ग्लुकोजची रसद पुरवायची तर त्याला अशी पातळ वारच हवी. सहा पदरी वारेतून मिळणाऱ्या ग्लुकोजवर, माणसाच्या मेंदूएवढा मेंदू, पोसलाच जाणार नाही.  म्हणजे बलिष्ठ मेंदू आणि  हतबल, परावलंबी, प्रदीर्घ, शैशव हे माणसाच्या बाळाचे औत्क्रांतिक प्रारब्ध आहे.  

अर्थात जन्मानंतरही मेंदूला ग्लुकोजचा खुराक लागतोच. तो आता स्तन्य देऊन पुरवावा लागतो. ह्या स्तन्यातील घटकही प्राण्यागणिक बदलत जातात. सील, डॉल्फिन वगैरेंच्या  पिल्लांत मेंदूची बरीचशी वाढ गर्भावस्थेतच पूर्ण झालेली असते. त्यांच्या दुधात साखर (दुग्धशर्करा Lactose)   जवळपास  नसतेच. माणसाचा मेंदू जन्मोत्तरही उत्तरोत्तर  वाढणारा.  त्याला भूक फार. त्यामुळे माणसाच्या मादयांच्या दुधात दुग्धशर्करा (Lactose) भरपूर.  शर्करा हे इन्स्टंट फूड आहे तर चरबी हे  साठवून वापरता येईल असे अन्न आहे. पिल्ले सतत आसपास असणाऱ्या माणसाच्या माद्या शर्करायुक्त दूध स्त्रवतात. जरा भुकेजली की यांची पिल्ले लगेच लुचतात.   पिल्लांना सोडून लांब लांब जाणाऱ्या, सिंहिणी, हरिणी वगैरे  चरबीयुक्त दूध स्रवतात. आई पुन्हा परत येईपर्यंत त्यांची भूक भागली पाहिजे ना.  व्हेलच्या पिल्लांना ऊब राखायला भरपूर चरबीची गरज असते. व्हेलीणीच्या दुधात निम्मी चरबी असते. म्हणजे साय किती निघेल ते बघा!!

जन्मानंतर माणसाचा ‘माते-बाहेरचा-गर्भवास’ (Exterogestation) सुरू  होतो. आईला ह्याची मोठीच किंमत चुकवावी लागते. वारेतून पोसण्यापेक्षा स्तन्यावर बाळ पोसणे तसे ‘अवघड’ आणि ‘महाग’ असते. पण हा वरवर आतबट्याचा वाटणारा   सौदा अंतिमतः फायद्यात पडतो. कारण     गर्भाशयात जे शक्य नसते ते इथे सुरू होते. गर्भस्थ जीव आता समाजस्थ होतो. मेंदू  इथे दुधावर पोसला  जातो तसा  आसपासच्या पर्यावरणावरही  पोसला  जातो.  वास, स्पर्श, दृष्टी आणि श्रवण अशा माध्यमातून; आई, बाबा, समाज यांच्या सान्निध्यातून,  शिकत शिकत शेवटी माणसाचे पिल्लू भाषावधानी बनतं. उत्क्रांतीचं संचित ते बरोबर घेऊन आलेलं असतं; त्याला आता संस्कृतीचं संचित प्राप्त होणार असतं.

वानरी म्हणजे सुलभ प्रसूती आणि सबल पिल्लू.  नारी म्हणजे अवघड बाळंतपण आणि अनघड पिल्लू. पण नारीचे पिल्लू आपल्या मेंदूच्या बळावर आज पृथ्वी व्यापून, सृष्टी समजावून घेत आहे. वानरीचे पिल्लू पिढ्यानपिढ्या जैसे थे  आहे.   

जीव सृष्टीतील सारेच जीव तसे एकमेवाद्वितीय. पण आपली मादी विते, म्हणजे त्यामागे इतके सगळे घडते, ही जाणीव, हे कौतुक, फक्त मनुष्यालाच प्राप्त होऊ शकते. सृष्टीतील काही अणुरेणू एकत्र  आले आणि तुम्हांआम्हां  हा मनुष्यदेह प्राप्त झाला. मग दुर्मिळ असा हा मनुष्यजन्म, पुनर्जन्माच्या पारलौकिक विवंचनेत वाया घालवायचा, का हे  सृष्टीचे कौतुक जाणण्यासाठी सार्थकी लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.