Thursday 23 November 2017

मूत्र सूत्र

मूत्र सूत्र
डॉ. शंतनू अभ्यंकर
वारंवार युरीनरी इन्फेक्शन होणं ही आपल्याकडची कॉमन समस्या आहे. उन्हाळे लागलेत, उष्णता झाली आहे, असे काही शब्द या साठी प्रचलीत आहेत. महिलांमध्ये हा त्रास जास्त प्रमाणात आढळतो.
लघवीला जळजळ, घाईची आणि वारंवार लागणे आणि ताप थंडी अशी लक्षणे दिसतात. लघवीला जळजळ होत असल्यामुळे, थंड सरबत वगैरे घेतलं जातं. सोडा, कोकम असे घरगुती उपचार चालतात. काहींना तर, डॉक्टरकडे जाऊन जाऊन, ते कोणत्या गोळ्या देणार हे पाठ झालेलं असतं. मग परस्पर दुकानातून गोळ्या आणल्या जातात. त्यांनी बरं वाटतं, पण पुन्हा काही दिवसांनी येरे माझ्या मागल्या. याला रिकरंट युरिनरी इन्फेक्शन म्हणतात. यातूनच काही वेळा इन्फेक्शन किडनी पर्यंत जातं, त्यामुळे या कडे अजिबात दुर्लक्ष करू नये.
सहसा यावर अंदाजपंचे औषध दिलं जातं. कारण जंतू कोणत्या प्रकारचे आहेत आणि ते कोणत्या औषधांनी मरतील याची तपासणी (culture & sensitivity) करून रिपोर्ट यायला चार दिवस लागतात. पण जेव्हा वारंवार इन्फेक्शन होत  असेल तेव्हा  कोणते जंतू आहेत, ते कोणत्या औषधांनी मरतात वगैरे तपासण्या करून मगच त्या जंतूंचा समूळ नायनाट होईल अशी औषधयोजना केली जाते. डायबेटीस वगैरे अन्य बॉयफ्रेंड्स शरीरात मुक्कामी  नाहीत ना हेही बघितलं जातं. सोनोग्राफी, IVP (intra venous pyelography, यात मूत्रमार्गातील अडथळे दिसतात.) वगैरे करून मूत्रमार्गात बाकी काही दोष नाही ना, ते ही बघीतलं जातं.
इन्फेक्शन झालं तर डॉक्टरी सल्याप्रमाणे पूर्ण काळ औषधपाणी घ्यावं. बरेचदा एखाद्या गोळीनी आराम पडतो आणि मग पुढच्या गोळ्या घ्यायची टाळाटाळ केली जाते. किंवा त्या विसरून जातात. एखाद्या गोळीनी चांगला फरक पडणं हे तोट्याचं ठरतं अशावेळी. औषधं अर्धवट सोडली की जंतू पुन्हा त्याच औषधाला जुमानत नाहीत. त्यामुळे पूर्ण कोर्स करणं महत्वाचं आहे. शिवाय ह्या औषधांचा  उपयोग झालाय का? जंतूंचं समूळ उच्चाटन झालंय का हे ही पुन्हा culture & sensitivity करून पहायला हवं. कधी कधी ही तपासणी वारंवार करावी लागते.
काही वेळा वारंवार जास्त डोस देण्यापेक्षा एकाच औषधाचा डोस अगदी कमी प्रमाणात पण तीन महिने वगैरे दिला जातो. ही युक्ती बरेचदा लागू पडते.
 पण वारंवार इन्फेक्शन होऊ नये म्हणून काही पथ्य पाळणं, जुन्या सवयी बदलणं आणि नव्या लावून घेणं जरुरीचं आहे.
या सगळ्या सल्यामागचं मुख्य सूत्र असं की लघवी शरीरात कमीतकमी वेळ साठून राहिली पाहिजे. भरपूर पाणी प्यायलं की आपोआपच लघवीला जास्त वेळा जावं लागतं. त्यामुळे भरपूर पाणी पिणं महत्वाचं. उन्हाळ्यात घाम जास्त येतो आणि परिणामी लघवी कमी होते. यासाठी उन्हाळ्यात तहान भागल्यावर वर थोडं जास्त पाणी प्यायला हवं.  थंडीतही विशेष तहान लागत नाही. कमीच पाणी प्यायलं जातं. त्यामुळे थंडीतही उन्हाळे लागू शकतात. अगदी लक्षात ठेऊन थंडीतही जास्त पाणी प्यायला हवं. जरी लघवीला लागली नाही तरी दर दोन तासांनी साठली असेल तेवढी लघवी करून टाकणं महत्वाचं. कामाच्या ठिकाणी, प्रवासात, बरेचदा लघवी करणं टाळलं जातं. लघवी होणं हा ब्लॅडरमधल्या जंतुंसाठी नैसर्गिक फ्लश आहे. तो जास्तीजास्त वापरला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी उशीरात उशीरा आणि सकाळीही उठल्यावर लवकरात लवकर लघवी करण्यानी इन्फेक्शनचं प्रमाण बरंच कमी होतं.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरसंबंध येण्यापूर्वी आणि आल्यावर शक्यतो लगेच बाथरूमला जाणं चांगलं. स्त्रियांचा मूत्र मार्ग (urethra) हा आखूड असतो. शरीर संबंधाच्या वेळी सहज पणे जंतू आत शिरू शकतात, त्यामुळे ही काळजी महत्वाची.
या आणि अशात अन्य लेखांसाठी माझा ब्लॉग जरूर वाचा
shantanuabhyankar.blogspot.in


No comments:

Post a Comment