Tuesday 24 March 2020

गेली कुठे फुले ही?

गेली कुठे फुले ही? 
डॉ. शंतनू अभ्यंकर  

त्या व्हिएतनामच्या ‘मदर’ने आणि एकूणच त्या संग्रहालयाने  भारावून जावून मी तिथल्या संचालकांना भेटायला गेलो. माझ्या मनातला पहिला  प्रश्न मी विचारला, ‘हे इतकं  भयानक संग्रहालय तुम्ही मुलांसाठी का खुलं ठेवलंय?’ 
‘मुलं वहावत जाऊ नयेत, युद्धविरोधी मतं त्यांनी लक्षात घ्यावीत म्हणून.’ ते उत्तरले. वर म्हणाले अहो भारतातले ना तुम्ही?  मग महाभारत हे तर  जगातलं एक आदी युद्धविरोधी महाकाव्य आहे. 

किती खरं होतं त्यांचं म्हणणं; कुरुक्षेत्रावरच्या नरसंहारानंतर, कौरवांचा  वंशविच्छेद होतो, पांडवांच्या पदरी पडतं ते युद्धजर्जर राज्य. पांडवांचेही बहुतेक आप्तस्वकीय मारले जातात. जिंकून घेतलेलं राज्य उपभोगायची उमेद त्यांना रहातच नाही. लवकरच सन्यास घेतात ते.  उत्तर महाभारताच हा शोकात्म शेवट कितीतरी साहित्यकृतींचा विषय आहे. भासाचे ‘ऊरुभंगम्’, विद्याधर पुंडलिकांची ‘चक्र’ (एकांकिका) आणि मतकरींचे ‘आरण्यक’ ही सहज आठवलेली उदाहरणे.     

युद्धबळी डायरेक्ट स्वर्गात जातात असं सर्व संस्कृती  मानतात. ते सहाजीकच आहे. लढायला जावून प्राणांची बाजी लावायला आमिषही तसंच पाहिजे. पण सर्वसंहारक युद्धाचा थेट दाहक अनुभव, महाराष्ट्रभूमीला अलीकडे तरी नाहीच. त्यामुळे की काय  इथे पोवाड्यांचे आणि समरगीतांचे  पीक अमाप. युद्धविरोधी लिखाण शोधूनही सापडणार नाही. 

पण इंग्लंड-अमेरिकेनी जगभर युद्धे केली, त्यातली कित्येक त्यांनी जिंकली आणि कित्येक पार हरली सुद्धा. त्यामुळे युद्धाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टीकोन आपल्यापेक्षा वेगळा आहे. निदान काही  लोकांचा तरी. युद्धविरोध म्हणजे थेट  देशद्रोहच ठरावा  असं राज्यकर्त्यांनाही  बरेचदा वाटतं.  पण जनतेला मात्र नाही. निष्फळ व्हिएतनाम युद्धाविरोधात तर अमेरिकेत  मोठी चळवळ उभी राहिली.  

त्यातूनच युद्धविरोधी साहित्य असा वेगळा प्रकार आणखी फोफावला. यात कथा, कविता यांची रेलचेल आहे. युद्धाची रोमॅंटिक कल्पना उद्ध्वस्त करणारं, हौताम्याभोवतीचं नाहक वलय विझवून टाकणारं, युद्धाचं रखरखीत वास्तव रोखठोकपणे मांडणारं हे साहित्य. अर्थात काही लेखकांना राजकीय पोळी भाजायची होती पण बरेचसे स्वतः पोळले होते, युद्धातील  वैयर्थ त्यांच्या लक्षात आले होते  आणि एकूणच शांततावादी असे त्यांचे विचार त्यांनी जोरकसपणे मांडले. पण युद्धाला पर्याय कुणालाच सुचवता  आलेला नाही. 

मग मला  पीट सीगरचं गाणं आठवलं. (Where have all the flowers gone?) मग तिथेच बसून स्वैर भाषांतर केलं. मनाचा ठाव घेणारं गाणं. एखाद्या लोकगीतांची चाल आणि हृदयस्पर्शी शब्द. संपत संपत गाणं पुन्हा मूळ पदावर येतं आणि जणू एक विचारवर्तुळ पूर्ण होतं. कापुसकोंड्याच्या गोष्टीसारखी युद्ध ही सुद्धा एक न संपणारी गोष्ट आहे, असं तऱ् सुचवत नाही ना  हे गाणं...? 
 
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?
तोडली मुलींनी सारी; 
शिकणार कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 

गेल्या कुठे मुली  ह्या? केंव्हाच्या दिसल्या नाही?
गेल्या कुठे मुली  ह्या? 
पोरांनी जवान साऱ्या; साऱ्या करून नेल्या 
शिकतील कधी मुली या?  कधी या होणार मोठ्या? 
शिकतील कधी मुली या?  

दिसेनात कुठेही पोरे? केंव्हाची  गेली  असती...! 
दिसेनात कुठेही पोरे?
तळहाती घेऊन प्राण, गेली सीमेवरी लढाया, नेली सीमेवरी लढाया!
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 
शिकतील कधी मुले ही? 

गेले कुठे जवान? केंव्हाचे नाही आले? 
गेले कुठे जवान? 
गेले! दफनही झाले. 
शिकतील कधी मुले ही, होतील कधी ही मोठी? 

दफनभूही दिसेना, केंव्हाचा चालू शोध... 
दफनभूही दिसेना. 
आच्छादली फुलांनी, ही पुढ्यात दफनभूमी 
शिकणार कधी आम्ही? मोठे होणार कधी आम्ही?  
गेली कुठे फुले ही? केंव्हाचा बहरच नाही 
गेली कुठे फुले ही?

No comments:

Post a Comment