Monday 21 August 2017

सीझर माझं कराल तर...!!!

सिझर माझं कराल तर...!!!!
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई
मो.क्र. ९८२२०१०३४९

बाकी सोशल मिडीयात लोक सीझरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काहीही बोलू देत, लिहू देत, पण डॉक्टर नको म्हणत असतानाही, ‘डॉक्टर, माझं सीझरच करा’ अश्याही मिनत्या वाढत चालल्या आहेत हे खरं.
शिक्षण संपता संपता, उद्योग-नोकरीत स्थिरावता स्थिरावता, लग्नालाच उशीर झालेला असतो. पुढे हनीमून आणि नव्याची नवलाई एन्जॉय करायला म्हणून काही दिवस प्लॅनिंग झालेलं असतं. झालंच मूल, तर सांभाळणार कोण? दोघंही नोकरी करणारे. दोन्ही सासवाही रिकाम्या नाहीत. सासरे रिकामे असले तरी अशा कामाचे नाहीत. अशी सगळी परिस्थिती असते. त्यात दिवस राहायला उशीर झालेला असतो, कधी कधी तर मोठ्या मुश्कीलीनी प्रेग्नन्सी साध्य होते. मग हे नवसाचं बाळंतपण सुरळीत होणं हे अगदी गरजेचं. सगळ्यांच्या रजा, सुट्ट्या, वेळा, सोयी हे बघून बाळानी जन्म घेणं अवघड. एवढं ते थोडंच समजूतदार असतं? तेंव्हा आपणच वेळ निवडलेली बरी. लोकांना आता अनिश्चिता सोसत नाही. तहान लागण्याआधी विहीरच काय, पण नळ जोडून वॉटर फिल्टरही तयार असतो आता. मग अशा मिनत्या सुरु होतात.
डिलिव्हरीच्या वेदना ही एक मोठी भीती असते. दुखतं खरच खूप. प्रचंड दुखतं. आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी अनुभव. याची तुलना असह्य दातदुखी किंवा शरीरभर पसरलेल्या कॅन्सरची वेदना अशाशीच होऊ शकते. हे दुखणं कुणालाही नको असतं आता. सीझरचं प्रमाण वाढण्यामागे समाजाची ही कमी झालेली सहनशक्ती हे ही एक कारण आहे. कित्येक बायका तर नवऱ्याला आधीच पटवून ठेवतात, ‘मला दुखायला लागलं, की तू लगेचच सीझरचा आग्रह धर. कारण आई, सासूबाई कुण्णी कुण्णी माझं ऐकणार नाहीत.’ मग अशा मिनत्या सुरु होतात.
खरंतर वेदनारहित प्रसूती शक्य आहे. पण कोणी सहसा या भानगडीत पडत नाही. हे तंत्र जाणणारे डॉक्टर मुळात कमी आहेत. याचा खर्चही बराच आहे. शिवाय इतकं करूनही ऐन वेळी सीझर लागू शकतं ते शकतंच. त्याबद्दल कुणी काही सांगू शकत नाही. वेदना शमन तंत्रात त्या स्त्रीची बाळ बाहेर ढकलण्याची क्षमता मार खाते. त्यामुळे प्रसूती चिमटा लावून अथवा वाटी लावून करावी लागते. याचेही काही प्रॉब्लेम्स असतात.  थोडक्यात, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी या तंत्राची अवस्था आहे. शिवाय समाजाची मानसिकता अशी आहे की; ‘काहीही बिन कष्टानी मिळालं की त्याची किंमत रहात नाही. तेंव्हा बाळसुद्धा जरा दुखून-खुपून झालं की आईला त्याची किंमत कळते. मगच ती नीट काळजी घेते!’, असा प्रवाद आहे.
कुठल्याही प्रकारची जोखीम कुणालाही नको असते. दिवस वर गेलेले असताना, पाणी जेमतेम असताना, आधीचं सीझर असताना, जुळी असताना, बाळाचं वजन किंवा वय किंवा दोन्हीही भरत नसताना, नैसर्गिक प्रसूती होऊ देणे हे जोखमीचं असतंच असतं. कित्येकदा डॉक्टरांसाठी हे असलं बाळंतपण, सीझरपेक्षा जास्त कौशल्याचं असतं. असा प्रयत्न करणं म्हणजे दोरीवरून चालण्यासारखं आहे. कधी तोल जाईल ते सांगता येत नाही. सीझर करा म्हणावं तर अनावश्यक सीझरचा आरोप होतो. काही प्रॉब्लेम झाल्यावर, ऐन वेळी करा म्हणावं तर, ‘आधीच का नाही केलं?’ असा शहाजोग प्रश्न येतो. वास्तविक डॉक्टरचं काम केवळ सल्ला देण्याचं आहे. निर्णय घेण्याची जबाबदारी त्या त्या पेशंटची आहे. हे वैद्यकीचं एक महत्वाचं तत्व आहे. व्यवहारात असं होत नाही. ‘आता तुमच्याकडे आणून टाकलंय डॉक्टर, आता तुम्हीच काय ते बघा’, असा सोयीचा आग्रह असतो. निर्णय घेण्याची आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतः स्वीकारण्याची मानसिकता अजिबात असत नाही. बरेचदा  यातल्या जोखमीची कल्पना नातेवाईक करू शकत  नाहीत. तो त्यांचा प्रांत नसतो. अशा अति-जोखमीच्या बाळंतपणात इतका वेळ आणि इतक्या काळजीपूर्वक आईकडे आणि बाळाकडे लक्ष द्यावं लागतं, की ते छोटया दवाखान्याच्या ताकदी बाहेरचं असतं. डिलिव्हरीला कधी चार तास लागतील तर कधी चोवीस. इतका वेळ पेशंटच्या उशा पायथ्याशी थांबायला तिथे कुणाला शक्य नसतं आणि तेवढं मनुष्यबळही नसतं. इतकं करूनही शेवटी आउटकम् महत्वाचा. आई किंवा बाळाला कोणत्याही कारणानी काहीही त्रास झाला तर कोणी समजावून घेण्याच्या मनःस्थितीत नसतं. प्रामाणिक प्रयत्नांचं कौतुक विसराच, थेट खळ्ळख्टॅक!! जोखीम स्वीकारण्यात निव्वळ मोठ्या बक्षिसाची आशा धरून कसं चालेल? नुकसानीचीही शक्यता असते. हे मान्यच नसतं कुणाला. प्रत्येकाला १००% ग्यारंटीशीर रिझल्ट हवा असतो. टिकल्या, पिना, क्लिपा विकणाऱ्या दुकानात पाटी असते, ‘फैशनकी इस दुनिया में ग्यारंटीकी अपेक्षा न करें’. इथे तर कितीतरी अज्ञात घटक. तेंव्हा अपेशाची थोडीफार शक्यता गृहित धरायला हवी. नॉर्मलचा प्रयत्न करताना त्यातले धोकेच फक्त वजा करा, असं नाही करता येत. इथे समाज वाल्याच्या बायकोच्या भूमिकेत असतो. वाल्याच्या उद्योगातला सुखाचा वाटा सर्वांना हवा असतो त्यातली जोखीम आणि वाईटाचा धनी तो एकटा. मग अशा वेळी तारेवरून चालण्यापेक्षा थेट सीझरचा सल्ला दिला जातो.
सीझरमधेही धोके असतात की. भूल देण्यात, ऑपरेशन करण्यात, ती जखम... नंतरची विश्रांती... पण आज वैद्यकीच्या प्रचंड प्रगतीमुळे हे धोके खूप खूप कमी झाले आहेत. पूर्वी अगदी आईचे प्राण कंठाशी आले की मगच सीझरचा निर्णय घेतला जायचा. कारण सीझर करण्यामुळेही प्राण कंठाशीच यायचे. आता तसं नाही. भुलीची पद्धत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. ऑपरेशनचं तंत्रही बदललं आहे.
आणखी एक घटक आहे. कमी वजनाच्या, कमी दिवसाच्या बाळाची काळजी घेण्याचं शास्त्र आता आरपार बदललं आहे. अगदी ६००-७०० ग्रॅम वजनाची बाळंही जगवता येतात. जगवली जातात. अशी कामगिरी ही आता वैद्यकविश्वात तरी ‘बातमी’ राहिलेली नाही. पूर्वी असं नव्हतं. १५००-१८०० ग्रॅमचं बाळही जगणं मुश्कील अशी स्थिती होती. मग असल्या बाळांच्या, आयांची सीझरही होत नव्हती. त्यांची बाळंतपणं ‘नॉर्मल’च व्हायची. बाळ जगलं तर आपलं, नाही तर देवाचं. बाळं नॉर्मल होत होती, गुदमरत होती, तडफडत होती, मरत होती किंवा अर्धमेली जगत होती. तक्रारीचा प्रश्नच नव्हता. ‘जाउ दे, नव्हतं आपल्या नशिबी’, असं म्हणून लोकं पुढच्या बाळंतपणाच्या तयारीला लागत होती. आता असं कोणी करत नाही.
बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजा करायची प्रथा निर्माण झाली. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणि बाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते. ही प्रथा आपल्या समाजात कशी बरं रुजली असेल? जर सटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिले पाच दिवस बाळाला  मुळी भविष्यच नसतं! थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचं भविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजात अर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं, तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.

बाळ अशक्त (SGA), आजारी (Sick), उपाशी (Hypoglycemic), कुपोषित (IUGR), सव्यंग (Anomalous), गुदमरलेलं (Hypoxic-Acidotic) असं असेल तर आता बऱ्याच वेळा आधीच समजतं. ही सारी रंगीत सोनोग्राफीची किमया. पूर्वी ह्या साऱ्यांच निदान बाळ जन्मल्यानंतर व्हायचं. ह्या भानगडीत बरीचशी तान्ही योग्य निदान-उपचारपूर्वी मरायची.
मुळातच तोळा मासा प्रकृती असलेल्या अशा बाळाला बाळंतपण सोसत नाही, सबब सीझर करावं लागतं. तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल पण आईला जशा बाळंतपणाच्या वेणा सहन कराव्या लागतात तशा त्या बाळालाही सहन कराव्या लागतात. प्रत्येक कळेवेळी, गर्भपिशवीचा रक्तपुरवठा काही काळ कमी होतो. जे मिळेल तेवढ्यात बाळाला भागवावं लागतं. धडधाकट बाळांना हे जमतं. आजारी बाळांना हे खूप धोक्याचं ठरतं. याचाही विचार करावा लागतो. यामुळेही सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
उत्तम भूल, उत्तम शल्यतंत्र आणि उत्तम नवजात आरोग्य सेवा यांच्या परिणामी सीझरचं प्रमाण वाढलं आहे.
याचा अर्थ प्रत्येक पेशंटचं सिझरच करावं लागेल असा नाही किंवा केलेलं प्रत्येक सीझर हे आवश्यकच होतं असाही नाही. एखाद्या तातडीनं केल्या जाणाऱ्या जीवरक्षक ऑपरेशनची निकड होती का नाही, हे आपण लांबून काय सांगणार? हे तज्ञांचंच काम. कोणत्याही मोठया दवाखान्यात सीझरचं ‘ऑडीट’ होत असतं. म्हणजे वेळोवेळी झालेले निर्णय हे योग्य निकष वापरून, पूर्वनिश्चित प्रॉटोकॉल वापरून झालेत की नाहीत हे तपासलं जातं. यानुसार निर्णय असेल तर तो योग्य मानला जातो. अशी व्यवस्था अधिक व्यापक प्रमाणात अंमलात आणली तर यावर काही तरी अंकुश राहील. अन्यथा पेशंट आणि डॉक्टर एकमेकाला दोष तेवढे देत बसतील. केलं, तर ‘का केलं?’ आणि नाही केलं तर, ‘का नाही केलं?’ अशी सरबत्ती चालू राहील;  आणि वातावरण बिघडण्याशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही.
शेवटी सीझरच्या एका जगावेगळ्या फायद्याबद्दल सांगतो आणि थांबतो. मानवी मेंदू हा मानवाच्या उत्क्रांतीचा वाहक ठरला आहे. अंगी शक्ती नसताना जगण्याच्या स्पर्धेत इतर प्राण्यांच्या मागे टाकत मनुष्यप्राण्याने जग पादाक्रांत केलं ते युक्तीच्या बळावर, मेंदूच्या बळावर. मेंदूचा आकार हा डोक्याच्या आकारावर अवलंबून आहे... आणि डोक्याचा आकार हा आईच्या कटीच्या आकारावर अवलंबून आहे. आपोआप, निसर्गतः प्रसूत व्हायचं तर बाळाचं डोकं मोठं असून भागणार नाही. प्रसूती होणार नाही. ती बाई अडेल आणि मरेल आणि तिचा वंशच्छेद होईल. हा निसर्ग नियम. त्यामुळे ठराविक मापापेक्षा जास्त मोठ्या डोक्याची संतती निपजू शकत नाही. मानवी डोक्याच्या (आणि मेंदूच्याही) आकाराला ही नैसर्गिक मर्यादा आहे. आईचा कटीभागही फार विस्तारू शकत नाही. शेवटी दोन पायावर तोल सांभाळायचा तर कंबर अति रुंद असून चालणार नाही.
आता सीझरचा शोध लागला आहे. आता सीझरच सीझर होताहेत. मोठया मोठया डोक्याची बाळं आणि त्यांच्या आया जगताहेत. निसर्गनियमा विरुद्ध जगताहेत. अशांची संततीही अधिकाधिक मोठया डोक्याची असणार आहे. परिणामी मेंदूला कवटीत अधिकाधिक जागा मिळणार आहे, परिणामी माणूस अधिकाधिक बुद्धिमान होणार आहे...!!!??? सीझरची भलावण करणारा किंवा त्याचे दूरगामी परिणाम असेही असतील असं सांगणारा हा ही एक युक्तीवाद आहे.
डॉ. शंतनू अभ्यंकर
मो.क्र. 9822010349
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

No comments:

Post a Comment