Showing posts with label शब्दचित्र. Show all posts
Showing posts with label शब्दचित्र. Show all posts

Sunday, 1 May 2016

कुलिओ आठवतो आजही

कुलिओ आठवतो आजही.

डॉ.शंतनू अभ्यंकर,वाई. जि. सातारा. पिन. क्र. ४१२ ८०३.


कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

वाई-मुंबई-पॅरीस-लिमा असा तीस तासांचा प्रवास करून आलो, तर आल्याआल्याच ह्या गचाळ माणसाशी गाठ पडली. उंचीला बुटका, रंगाला पिवळट विटका, बारीक  बारीक डोळे, बोकड दाढी आणि खडूसारखी पांढरी बत्तीशी. विमानतळाबाहेर पार्किंग लॉटमधे त्यानी आमचं स्वागत केलं. ढगळ जीन्स, भडक टी शर्ट, चित्र विचित्र चित्राचं जॅकेट, कमरेला पाउच, पाठीवर सॅक, आणि भलामोठा सप्तरंगी बिल्ला लावलेली वेताची हॅट. हॅट उचलून त्यानी आमचं स्वागत केलं, तर नजरेत भरला त्याच्या डोक्यावरचा, टाळूपासून मानेपर्यंतचा निव्वळ मधोमध उभा असलेला, केसांचा लाल भडक रंगवलेला पुंजका. हे ध्यान पुढे तीन आठवडे आमचं गाईड असणार होतं. खिशातून कसलीशी पानं काढत त्यानी ती आमच्या हातात दिली. म्हणाला “इत ठिस लीफ, इत ठिस लीफ. इस कोकेन. इन पेरू, कोकेन लीगल. इत.” मढ्याच्या तोंडात तुळशीपत्र असावं तशी आम्ही ती पानं त्याच्या आग्रहाखातर तोंडात धरली. पण पुढे काहीच केलं नाही. त्यानीच मग मुठभर पानं घेऊन, हातात चुरून, त्याचा तोबरा भरून, आम्हाला डेमो दाखवला. अर्ध्या पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्यावर आम्हाला चहाची तहान लागली होती. ती कोकेनवर भागणार नव्हती. आम्ही चहाची टपरी शोधू लागलो. शेवटी कॉफीची दिसली. “ओन्ली कॉफी, नो कोकेन” असं त्याला बजावत आम्ही तिकडे वळलो.

आम्ही कॉफी घेईपर्यंत, आम्हा पंधरा जणांचं सामान ट्रॉलीवरून बसमध्ये चढवता चढवता कडवटपणे तो पुटपुटला, ‘आमचं सोनं, चांदी नेताना ओझं नाही झालं तुम्हाला?’ मी अवाक झालो. मी किंवा माझे बापजादे याआधी कधी इकडे फिरकलो नव्हतो. सोनं चांदी लुटणं दूरच. ते लुटलं स्पॅनिशांनी, हा बोल लावत होता आम्हाला. सगळेच परदेशी लोक याला चोर लुटारू वाटत होते.

दस्तुरखुद्द पोप महाशयही नेमके ह्याच दिवशी, ह्याच वेळी, पेरूच्या दौऱ्यावर आलेले. त्यांच्या गाड्यांचा ताफा बाहेर पडत होता.  पोप-दर्शना आसुसलेल्या माणसांचा सागर तिथे उसळला होता. त्याच्या लाटा थांबवण्याचा पोलिसी प्रयत्न चालू होता. पोपसाहेबांची मिरवणूक आता पार्किंगलॉटच्या पलीकडच्या रस्त्यांनी जात होती. आम्ही भारतीय मात्र, पोप आणि माती आम्हा समान हे चित्ती, अशा भावनेनी शांतपणे कॉफी घुटकत उभे होतो. लांबवरच्या त्या जनसागराकडे, आणि पोपच्या पांढऱ्या तांबूस आकृतीकडे पहात कुलिओनी तोंडातला कोकेनचा तोबरा काढला, कचऱ्यात भिरकावला, बोटाचा आकडा करून लाळ पुसली आणि पोपच्या दिशेला एक जबरदस्त हिणकस शिवी हासडली. त्याचे बोली आम्हाला अपरिचित असली, तरी देहबोली परिचयाचीच होती. त्यामुळे तो जे काही बोलला, त्याला माफ करणं साक्षात पोपना सुद्धा जड जाईल एवढं आम्हाला समजलं.  पण एका कॅथॉलिक देशात हा जहरी पोपद्वेष का हे उमगलं नाही.

वर आमच्याकडे वळून प्रसन्नपणे हसून म्हणतो कसा, “क्मोन, वेलकम, गेट इन ड बस. यु ऑल लुक शाहरुख खान!! ऑल लेडीज करीना कपूर!!!” बॉलीवूडची ही पहुंच पाहून आमची कळी खुलली, मिजास वाढली.

म्हटलं तर कुलिओ एक गाईड. आमच्या बरोवर अॅमॅझॉनच्या जंगलातून, कुस्कोच्या बाजारातून, लिमाच्या झगमगाटातून, अॅण्डीजच्या शिखरांवरून, माचू पिचुच्या अवशेषांवरून फिरलेला. ओलाय्ताम्बो, उरीबाम्बो असली गोलमटोल नावं, सहज घेणारा. इंकांच्या वस्तीत जंगलातच लहानाचा मोठा झालेला. पुढे आपल्या काकाचं बोट धरून ह्या व्यवसायात उतरलेला, इतिहास आणि जीवशास्त्रात डिग्री होती त्याची. पुढे प्रयत्नपूर्वक इंग्रजी शिकला, आमच्याकडून अजून इंग्रजी शिकण्यासाठी आसुसलेला होता तो. पण टूरीस्ट सर्कीटचे वेढे घालता घालता याचाही प्रवास चालू होता, वेगळ्याच दिशेनी. त्याला कट्टर इंका व्हायचं होतं.

त्याच्या  हॅटवरच्या त्या रंगीबेरंगी बिल्याबद्दल मला उत्सुकता फार. शेवटी काही इमारतींवरही तसलाच झेंडा पाहून मला राहवेना. मी त्याला छेडलंच. रंगीबेरंगी पट्ट्यापट्ट्यांचा झेंडा हा ‘गे प्राईड परेड’मध्ये बघितला होता मी. आम्ही समलिंगी, विरुद्धलिंगी, उभयलिंगी, स्त्रैण, हिजडे... आमचे लैंगिक आचारही नैसर्गिकच आहेत. मानव जमात म्हणजे या विविधांगी लैंगिक व्यवहारांनी साकारलेलं सप्तरंगी इंद्रधनुष्य आहे. ह्यासाठी हा सप्तरंगी झेंडा.  कुलिओकडे तसाच बिल्ला पाहून मला वेगळीच शंका आली. मी छेडताच कुलिओ खवळलाच. म्हणाला, ‘हा इंकांचा झेंडा आहे आणि याचा अपमान सहन केला जाणार नाही!’ मी सॉरी सॉरी म्हणत माझा प्रश्न निव्वळ उत्सुकतेपोटी होता हे त्याला पटवून दिलं. त्याची कळी खुलली. त्यानी पुढे खुलासा केला, ‘इंद्रधनुष्य ही इंकांची एक देवता आहे आणि त्याचेच रंग ह्या झेंड्यावर आहेत. हा झेंडा निवडल्यावर गे चळवळीचा झेंडा इंकांनी निवडला म्हणून भरपूर चेष्टा झाली, कुचेष्टा झाली. पण शेवटी श्रेष्ठतम अशा इंकानी असं दाखवून दिलं की, इंद्रधनुष्य अनादी कालापासून आहे आणि ‘गे’ चळवळ नवीन! तेव्हा ह्या रंगांवर ‘गें’पेक्षा इंकांचा जास्त हक्क आहे. त्या मुळे हाच झेंडा मुक्रर झाला.’ कुलिओ शुद्ध इंका वंशाचा होता (म्हणे) आणि त्याचा त्याला दुर्दम्य दुराभिमान होता. ही त्याची फक्त झलक होती.

पुढे त्याच्याशी घसट वाढली आणि त्याचे वेगवेगळे पैलू समोर येऊ लागले. त्याला सगळंच येत होतं. जंगलातच लहानाचा मोठा झाल्यामुळे झाडे, वेली, पशू, पाखरे यांच्याशी दोस्ती होतीच. शिकार साधत होती. एका झाडाचा काटा घ्यायचा, त्याला दुसऱ्या एका झाडाचा विषारी रस लावायचा आणि बांबूच्या नळीतून तो काटा जोरात फुंकून उडवायचा. समोरच्या प्राण्याला तो काटा लागला की काही वेळात तो प्राणी निश्चेष्ट पडलाच म्हणून समजा. हे सगळं त्यानी करून दाखवलं. पुढे टाळ्यांच्या आणि  काजोनच्या तालावर बेभान क्रिओल नृत्य करून झालं; चारांगोच्या तारांवर धीरगंभीर सूर छेडून झाले आणि उडत्या चालीची गाणीही तारसप्तकात म्हणून झाली. कुलीओचे हुन्नर किती म्हणून सांगावेत...फोटोग्राफी, पत्याच्या जादू, तट्ट्याच्या टोप्या, डायव्हिंग, ड्रायव्हिंग, स्वयपाक, हमाली....!

एके ठिकाणी बोटीत सामान चढवायचं होतं. चार दिवसापूर्वी आम्ही आलो तेव्हा नदी दुथडी भरून वहात होती. तुफान पाऊस होता. पण आता पाऊस थांबला होता आणि नदी पार रोडावली होती. त्यामुळे बोटीपर्यंत समान वाहून नेणं हे एक दिव्यच होतं. कुलिओनी शर्ट काढला, कमरेला बांधला. एक जाडजूड चादर खांद्याभोवती घेऊन त्याच्या झोळीत त्यानी दोन महाकाय बॅगा घातल्या. विमान प्रवासाच्या त्या बॅगा, चांगल्या मोठ्या होत्या. त्या बॅगांपुढे कुलिओ आता इवलासा दिसू लागला. पण बोटीकडे कूच करण्याआधी त्यानी बोटानी मला खुणावलं आणि आणखी एक बॅग डोक्यावर द्यायला लावली. हे ओझं घेऊन काट्याकुट्यातून नदी किनारी, आणि तिथून पुढे चिखल आणि दगडगोटे तुडवत अर्धा एक किलोमीटरची चाल होती. झपझप पावलं टाकत त्यानी ते अंतर तोडलं. बॅगा बोटीत ठेऊन तो परतही आला. पुन्हा एकदा आमच्या बॅगांचा द्रोणागिरी उचलत तो तितक्याच तडफेनी निघून गेला. एव्हाना जमेल तेवढं सामान हातात घेऊन आम्हीही वाळवंट तुडवत होतो. विषुववृत्ताजवळचं रणरणतं उन आणि जंगलातला कुबटपणा ह्यांनी घामाघुम होऊन, धापा टाकत आम्ही बोटीशी पोचलो. कुलिओ आता नव्यानी सामान आणायला परत फिरला. स्वयपाकाचं सामान घ्यायचं होतं. उरलेले बटाटे , पीठ-मीठ, भांडी-कुंडी गोळा करून, पोत्यात भरून तो फिरून बोटीशी आला. बोट आता निघाली. अॅमॅझॉनचं पाणी मधेच संथ तर मधेच खळाळून वहात होतं. पार दमल्या मुळे आम्ही बोटीत अवघडत आडवे होऊन पेंगत होतो. इतक्यात झाम्फोनच्या (बासरी) अलौकिक सुरांनी वातावरण भरून गेलं, भारून गेलं. चमकून पाहिलं तर  बोटीच्या टोकाशी कुलिओ रापलेल्या अंगानी बसला होता. पाय पाण्यात सोडून तो मजेत वाजवत होता. पायपीट, वैताग, गैरसोय, दमणूक, उष्मा, घाम अशा अनेक कटकटींवर त्याच्या सुरांचं मोरपीस गारूड करत होतं. आमच्यापेक्षा कितीतरीपट अधिक थकलेल्या, अधिक श्रमलेल्या कुलीओने  चक्क झाम्फोन ओठी लावला होता. त्यात जणू तो स्वतःचे प्राण फुंकत होता. हातांच्या नाजूक हालचालींनी त्याच्या थकलेल्या श्वासांचे तो निरागस सूर विणत होता.

आजचा दिवस खास होता. कुलीओसाठी. त्याच्या बायकोशी तो आज आमची ओळख करून देणार होता. पण बायको बद्दल त्याच्या आणि आमच्या कल्पना वेगवेगळ्या होत्या. स्त्री, सखी, सचिव आणि भार्या अशा वेगवेगळ्या पोस्ट वर त्याच्याकडे वेगवेगळ्या बायका होत्या. आज भेटली ती जंगल खात्यातच नोकरीला होती. खूप खोलवर जंगलात एक ऑक्स बो लेक होता. तिथे हिची नेमणूक होती. मग बरच अंतर जंगल तुडवल्यावर ते ठिकाण आलं. मग बायको भेटली. मग आमच्याशी ओळख वगैरे झाली. मग कुलिओ तिला रीतसर भेटला. (नेमकी रीत काय ते विचारू नका!) हिला स्पॅनिश आणि केचुआ एवढ्याच भाषा येत होत्या. एका बॅचला बोटीत घालून कुलिओ पक्षी निरीक्षणासाठी घेऊन गेला आणि तळ्याकाठी, तरूतळी तिचा आणि आमचा शब्देविण संवादू सुरु झाला. एकमेकांची भाषा अजिबात येत नसताना आम्ही एकमेकांबद्दल इतक्या गोष्टी जाणून घेतल्या की माझं मलाच आश्चर्य वाटलं. वास्को द गामा आला, पण लेकाचा त्या मल्याळी माणसांशी बोलला काय आणि कसा? हा प्रश्न मला पाचवी पासून सतावतो आहे. पण खाणाखुणा आणि हावभाव हे इतके माहितीबंबाळ होऊ शकतात याचं डेमोच झालं माझ्यासाठी.

ती जंगलातच आत कुठेतरी रहाते...सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तिची ड्युटी असते...तिला तीन मुलं आणी कुलिओ धरून दोन नवरे वजा जोडीदार आहेत...दोघंही दारू पितात पण कुलिओ जरा कमी पितो, ही सगळ्यात कमी पिते...तिच्या धाकटीला सतत सर्दीचा त्रास असून मी औषध दिलं तर तिला ते आवडेल...दिवसभरात ६०- ७० लोकं येतात पण भारतातून आलेले आम्ही पहिलेच पर्यटक...या आधी भारतीय माणसं तिनी फक्त बॉलीवूडपटातच बघितली आहेत...ती घरनं डबा आणते...शिवाय वाटेत फळं, कंदमूळं मिळतातच...शेजारच्या खोपट्यात तीनी काही गिनी डुक्करही पाळले होते...कुलीओच्या आगमनाप्रीत्यर्थ आज भाजलेल्या गिनीडुकराचा चमचमीत बेत होता!!

थोड्याच वेळात कुलिओ आला. त्यानीही भराभरा रांधायवाढायला मदत केली. आमचं जेवण पुढ्यात आलं. उकडलेली बटाट्याची पावडर, उकडलेला बटाट्यांचा कीस आणि उकडलेला बटाटा असा सज्जड मेनू होता. तो अतिशय बेचव होता. बटाटा, साबुदाणा आणि मिरची ही मूळ इथलीच. पोर्तुगीजांनी हे पदार्थ भारतात आणले. हे शोध लावणाऱ्या ह्या महान संस्कृतीला बटाटेवड्याचा आणि साबुदाणावडयाचा मात्र शोध लावता आला नाही याच मला खूप खूप वाईट वाटलं. नाईलाजान समोरच्या बेचव बटाट्यात बरोबर आणलेलं बचाकभर लोणचं घालून आम्ही तो मेनू तिखट मानून घेतला.

एवढ्यात कुलीओचं ताट आलं. एका लाकडी ताटात ते गिनी पीगचं कलेवर उपडं पडलं होतं. हात पाय आळस दिल्यासारखे ताणलेले होते. शेपूट, नख्या आणी दात दाखवत ते निपचित पसरलं होत. त्याची छाती आणि पोट फाडून ठेवलं होत. आणि त्यातून आतल्या अवयवांचा चिखल बाहेर डोकावत होता.

मांस अशा पद्धतीनी खाणारा तो आम्हाला जंगली वाटत होता आणि इतकं जहाल तिखट खाणारे आम्ही त्याला रानटी वाटत होतो. पूर्वीही असंच काहीसं झालं होतं. गोरे उन्नत बाकी अवनत असं स्पॅनिशांना वाटत होतं. आज कुलीओला ह्याच्या बरोब्बर उलट वाटतंय.

शिरा ताणून ताणून तो बोलत होता. एका प्रचंड पाषाणशिल्पापुढे उभा राहून तो युगायुगाची कैफियत मांडत होता जणू. स्पॅनिश लोकांनी कसं कसं आक्रमण केलं, स्थानिकांना कसं कसं नेस्तनाबूत केलं याचं इथ्यंभूत वर्णन केलं त्यानी. पुढे प्रत्येक ठिकाणी ही लढाई चालू झाली. माहितीपत्रकात, भित्तीफलकावर वेगळीच माहिती लिहिलेली आणि हा सांगायचा वेगळंच काही.

आम्ही वाचलं होत, स्पॅनिशांकडे या साउथ अमेरिकनांनी कधीही न पाहिलेलं एक वाहन होतं, घोडा! स्थानिकांना वाटायचं, घोडा आणि त्यावर बसलेला माणूस हा एकच प्राणी आहे. ते त्याला घाबरायचे. असा प्राणी त्यांनी कधी बघीतला नव्हता.

‘ह्या सगळ्या भाकड कथा आहेत’, म्हणाला तो. ‘इंकाना बदनाम करण्यासाठी रचलेल्या. घोडा आणि माणूस हे वायले वायले प्राणी आहेत हे समजायला सामान्य बुद्धिमत्ता पुरेशी आहे की. तेवढीही इंकांकडे नव्हती काय?’ क्षणात सात्विक संतापानी थरथरू लागला तो.

नरबळी देण्यासाठीची वेदी होती एके ठिकाणी, याच्या मते इंका नरभक्षक नव्हतेच. परक्या स्पॅनिशांनी उगीचंच त्यांच्या सोयीचे गैरसमज पसरवलेत.

स्पॅनीशांच्याकडे लोखंड वापरायचं तंत्रज्ञान होतं. इंकांना लोखंडाचा शोधच लागला नव्हता. ते आपले सोन्या चांदीत भागवत होते. लहानपणापासून शब्दशः चांदीच्या पाटावर, सोन्याच्या ताटामध्ये, मक्याचा घास एकमेकाला भरवत होते. खरोखरच एकमेकाला भरवत होते. कारण जे होतं ते सगळ्या टोळीचं होतं.

कुलिओच्या म्हणे, ‘एका संपन्न संस्कृतीचाच घास घेतला त्यांनी. मालकीची कल्पना स्पॅनिशांची. खाजगी मालमत्तेची कल्पनाच नसल्यामुळे आहे ते सगळं सगळ्यांचं होतं. मग ही भावना चांगली, का माझं, माझं, माझं करत हावरटपणा चांगला? अन्न टोळीतल्या सगळ्यांचं होतं. त्यामुळे शिकार करू न शकणाऱ्यांचंही भागत होतं. जो माणूस खुडूक झाला तो आयुष्यातून कायमचा उठला ही भानगड नाही. किती उदात्त रचना ही. सोशल सिक्युरिटी म्हणतात ते ह्यालाच.’ पण ही पद्धत सध्याच्या काळी नीरुपयोगी आहे याचा त्याला पत्ता नव्हता.

 सगळं सगळ्यांचं असल्यामुळे कशाचीच फारशी नोंदबींद ठेवायची भानगड नव्हती आणि या भानगडीतून उद्भवणाऱ्या इतर भानगडीही नव्हत्या. लिपीचा शोधच मुळी या इंकांनी लावला नव्हता; किंवा त्यांना लागला नव्हता. दोरीला ठिकठीकाणी गाठी मारून काही सांकेतिक माहिती ठेवली जायची म्हणे, पण सद्यस्थितीत त्या गाठी खरोखरच संकेतच आहेत. त्या गाठींचे अर्थ आज उकलणारा कुणीच नाही.

चाकाचाही शोध इंकांना गरजेचा नव्हता. कुंभाराचं चाक होतं, पण चाकाची गाडी नव्हती. गाडी ओढायला घोडंच नव्हतं तर गाडी बनवून उपयोग काय? त्यातल्या त्यात मोठा प्राणी म्हणजे लामा. हा जेमतेम पन्नास किलो ओझं वाहू शकतो, म्हणजे एखादा  मोठा माणूसही याला पाठीवर बसून जाणं शक्य नाही.

स्पॅनिश आले, त्यांनी पाहिलं आणि ते जिंकले. स्पॅनिश तंत्रप्रगत होते, म्हणुनच जिंकले. गलबतं आणि बंदुका, चाकं आणि प्रगत तंत्र या साऱ्याच्या जोरावर दक्षिण अमेरीका काबीज करते झाले. तिथल्या रानटी जमातींना त्यानी माणसात आणलं. आपली भाषा दिली, एक भाषा. आपली लिपी दिली. एक लिपी. मूळ भाषा संपल्या. इंकांची, कुलिओची, केचुआ ही भाषा जेमतेम धुगधुगी धरून आहे.

स्पॅनिशांनी आपला धर्म दिला, एक धर्म.  पण कुलिओ सांगतो, ‘कॅथोलिक श्रेष्ठ म्हणताना इतर सारे कनिष्ठ हे ओघानीच आलं. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाशाची पूजा करणारे रानटी ठरले आणि त्याच आकाशातल्या तथाकथित बापाची लेकरं प्रगत! साम, दाम, दंड, भेद वापरून धर्मांतरं झाली. जगातल्या सगळ्याच्या सगळ्या काळ्या, पिवळ्या माणसांना सुधारायचं अवघड आणि किचकट काम  देवानीच गोऱ्यांच्या बलदंड खांद्यावर दिलंय, असा तोरा होता स्पॅनिशांचा.’ कुलीओला हा तोरा टोचत होता. हा माज जाचत होता. कुलीओच्या बोलण्यात तथ्य होतंच होतं. पोपच्या दिशेनी तो थुंकला ते काही उगीच नाही. पण पोपचा ख्रिस्त आणि पेरूचा ख्रिस्तही वेगळे वेगळे आहेत. लिमाच्या चर्चमधील ‘लास्ट सपर’च्या चित्रात, पेरूच्या ख्रिस्तापुढे गिनिपिगच्या मासाचा प्रसाद आहे; पार्श्वभूमीवर मेंढयांचा नाही, तर लामांचा कळप आहे.

स्पॅनिशांनी व्यापार वाढवला, दवाखाने काढले, शाळा काढल्या, संस्कृती रुजवली, राष्ट्र ही संकल्पना दिली. वर्णसंकर तर झालाच झाला. शतकं लोटली. आता मुळचा कोण आणि बाटगा कोण हे ओळखणंही कठीण झालं. मूळ संस्कृतीची थडगी झाली. त्या थडग्यांवर नवे प्रासाद, नवी मंदिरं, नवे राजवाडे दिमाखात उभे राहिले. तेच आम्ही फिरून पाहिले. तेच आम्हाला कुलिओनी फिरून दाखवले. कुलिओच्या काळजातल्या कट्यारीच ह्या साऱ्या.

मूळ संस्कृतीचं समूळ उच्चाटन झालं. इंका काय होते हे सांगायला इंकाच फारसे उरले नाहीत. लिपी वगैरे तर नव्हतीच. अर्थात स्पॅनिशांनी केलेल्या नोंदी आहेत. जेत्यांनी केलेल्या, जीतांच्या बाबतीतल्या नोंदी त्या. त्या एकजात पूर्वग्रह बाळगून लिहिलेल्या. कारण फक्त जेत्यांचाच असतो इतिहास, फक्त जेत्यांचीच असते संस्कृती, हौतात्म्यावरही असते फक्त जेत्यांचीच मालकी. आज आता भांडी-कुंडी, पुतळे, ममी, थडगी, आणि ती उकरून निघालेल्या सोन्याचांदीच्या वस्तू, ह्यातूनच काय ओळख पटेल ती. शिवाय शोधायला येणारे सगळेच थोडे साव होते? खरतर थोडेच साव होते. कल्पनेतल्या सोन्याच्या लंकेचा, एल डोराडोचा, शोध घेत  हौसे आणि गवसेच जास्त. सोन्याचा सोस तर सगळ्यानाच. मढ्याच्या टाळूवरचं सोनं वर्ज्य नव्हतच. सोनंच ते, ते वर्ज्य कशाला असेल?

या इंकांच्या खालसा राज्यात खूप फिरलो आम्ही. कुलीओचे तळतळाटही खूप ऐकले. काळाबरोबर जुळवून घेता आलं नाही म्हणून एका नांदत्या गाजत्या संस्कृतीचा ऱ्हास घडला होता. काळाच्या उदरात त्या संस्कृतीचे निव्वळ फॉसिल उरले होते.

पुढ्यात प्रचंड शिळांची प्रचंड भिंत उभी असायची. निव्वळ दगडावर दगड रचून उभी केलेली प्रचंड भिंत. कशासाठी? माहित नाही! कुणी? माहित नाही. कशी? माहित नाही.

माचुपिचुच्या शिखरावरती घरांची जोतीच जोती. थोड्याशा दगडी त्रिकोणी चौकोनी भिंती. ओसाडगावचं हे राज्य होतं तरी कोणाचं? माहित नाही. ते ओस तरी का पडलं? माहित नाही.

नाझ्काच्या पठारावर प्रचंड चित्र कोरलेली. माणूस, माकड, गिधाड, पक्षी, आकारच आकार. काही नुसतेच उकार. मैलोंमैल सरळसोट  रेघोट्या आखलेल्या. कशासाठी? माहित नाही. कोणी म्हणतात परग्रहावरच्या यानांसाठीच्या धावपट्ट्या या. कुणी म्हणतात हे तर पंचांग त्याचं. कुणी म्हणतात पाणवठ्याच्या वाटा या. कुणी म्हणतात स्वर्गारोह्णाच्या दिशा या. कुणी काही तर कुणी काही.

या साऱ्याचा अर्थ लावायचा जो तो आपापल्या परींनी प्रयत्न करतोय. कोणी आयुष्य खर्ची घालतोय. पण ह्या विश्वाचा आकार केवढा? ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. तसंच हे. सगळ्या ठिकाणी सतत हा नन्नाचा पाढा. कुतूहल चाळवणारे सगळं काही. कुतूहल शमवणारं काहीच नाही.

अशा बिन लोहाच्या आणि बिन लिपीच्या; बिन घोड्याच्या आणि बिन चाकाच्या, इंका  संस्कृतीचं काळाच्या उदरात रुतलेलं रथचक्र, कुलिओ प्राणपणानी बाहेर ओढू पहात होता. जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते स्पॅनिशच; अशी धारणा झालेल्या समाजात, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते इंकांच; अशी खुणगाठ बांधून तो वागत होता. त्याच्या वंशाच्या अधःपतनासाठी त्याला एक रेडीमेड शत्रू मिळाला होता. स्पॅनिश वसाहतीचा काळाकुट्ट इतिहास! त्यांची भाषा, संस्कृती, धर्म...सगळंच. हे सगळं त्याला उखडून टाकायचं होतं. मूळ संस्कृती पुन्हा आणायची होती. इकडे पोर्तुगीजांनी गोवा घेतला त्याच सुमारास तिकडे पेरूत स्पॅनिशांनी पाय रोवले. इकडे मराठेशाही बुडाली त्या सुमारास तिकडे स्पॅनिशांनी पेरू सोडला देखील. आज पेरू एक स्वतंत्र लोकशाही देश आहे. पण  ८०% नागरिक कॅथोलिक आहेत, ८०% स्पॅनिश बोलतात, ८०% मिश्र वंशाचे आहेत. तरी देखील कुलिओ ठाम आहे. शेवटच्या इंका राजानी, शेवटच्या पराभवाआधी उच्चारलेले, शेवटचे शब्द होते, ‘तुम्ही वाट पहा. मी परत येईन.’ ते कुलिओला खरे करायचे होते. पण कसं ते त्याला उमगत नव्हत. सध्यातरी स्पॅनिश वारशाचा तिरस्कार हा त्याचा एकमेव कार्यक्रम होता. भेटतील त्या पर्यटकांना तो आपली ही कैफियत ऐकवतो.   इंकांचा उदोउदो करता करता तो इतरांबद्दल जे बोलत होता ते भयावह होतं. तो अन्यायग्रस्त होता, पीडित होता, भाषाही न्यायाची बोलत होता. पण वृत्ती मात्र एकांगी, द्वेषभारित, कुत्सित, मत्सरानी ग्रासलेली होती. पिढ्यानपिढ्याच्या अन्यायाचा त्याला आत्ता, इथे, या क्षणी बदला घ्यायचा होता. स्पॅनिश वारशाच्या सर्व खाणाखुणा पुसून टाकाव्यात असा त्याचा अर्वाच्य सूर आहे. पेरू मूळ पेरू निवासियांचाच असा बोचरा नूर आहे. कसं शक्य आहे हे? आजची पेरूची भाषा, धर्म, संस्कृती, सगळं काही हजारो वर्षांची साठलेली ‘समृद्ध अडगळ’ आहे. स्पॅनिशांमुळे जगाला इंका माहीत झाले पण इंकांनाही जगाची ओळख स्पॅनिशांमुळेच झालं की. आज कुलिओचं क्रिओल नृत्यही शुद्ध पेरुचं नाही, ना की त्याचा लाडका झाम्फोन. त्याचं स्वतःचं नाव सुद्धा ज्युलिअस...ज्युलिओ...कुलिओ...असं अपभ्रष्ट आहे. असं गाळून गाळून फक्त इंकांचं तेवढंच ठेवायचं म्हटलं तर...काहीच उरणार नाही!  

पुढे कुलिओ बरोबरची गालाप्गोसच्या बेटांची सफर अविस्मरणीय झाली. चार्ल्स डार्विन बीगल जहाजावरून इथे आला होता. ह्या द्वीपसमूहावरचं चित्तचक्षुचमत्कारीक जैववैविद्ध्य बघून त्याच्या मनात उत्क्रांतीचा सिद्धांत सिद्ध झाला. डार्विन आणि त्याच्या सिद्धांताप्रमाणेच ही बेटंही आता प्रसिद्ध आहेत. जगभरच्या वैज्ञानिकांना तीर्थस्थानी आहेत.

कुलिओनी अगदी मोजक्याच शब्दात अख्खा उत्क्रांतीचा सिद्धांत समजावून सांगितला. ‘संपूर्ण जीवसृष्टी ही प्राथमिक अवस्थेतल्या सजीवांपासून सावकाशपणे उत्क्रांत  होत आली आहे. या उत्क्रांतीसाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. आजची सजीवांची विविधता हा उत्क्रांतीचाच एक भाग आहे आणि माणूस हा देखील एक प्राणीच असून या उत्क्रांतीचंच फलित आहे. पृथ्वीचं काही कोटी वर्षं असलेलं वय, त्या काळातले भूकवचातले आणि वातावरणातले बदल, आज प्रयोगशाळेत निर्माण करता आलेली अमिनोआम्ल, ठिकठिकाणी सापडलेले जीवाश्म आणि अव्याहतपणे तयार होणाऱ्या आणि बदलाशी जुळवून न घेता आल्यामुळे नष्ट होणाऱ्या प्रजाती हा सारा उत्क्रांतीच्या बाजुने सज्जड पुरावा आहे.’ पण पुढे जाऊन त्यानी हे ही स्पष्ट केलं की माणूस, किंवा अमुकच एक वंश, या उत्क्रांतीच्या शीर्षस्थानी आहे अशा भ्रमात कोणी राहू नये. गांडूळाच्या ठिकाणी रहाण्यासाठी गांडूळ हा सर्वात उत्क्रांत प्राणी आहे आणि खोल पाण्यात रहाण्यासाठी देवमासा. त्यांची जागा माणूस घेऊ शकत नाही आणि माणसाची जागा ते.’

कुलीओची जीवशाशास्त्राची समज थक्क करणारी होती,

‘डार्विनच्या या सिद्धांतांनी देवाला सिंहासनभ्रष्ट केलं...’

‘मानवाचे अंती गोत्र एक, असं दाखवून दिलं...’

‘मानवाचेच नाही तर जीवितांचे अंती गोत्र एक हे दाखवून दिलं...’

‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट ही समज खुजी आहे...’

‘स्पर्धेइतकंच सहकार हे ही तत्व जगण्यासाठी, तगण्यासाठी उपयोगी आहे....’

‘उत्कांतीच्या वाटेला निश्चित असा हेतू नाही...’

‘उत्क्रांतीच्या वाटेवर तीच वाट पुन्हा उलटी चालता येत नाही....’

‘पुन्हा मूळ ठिकाणीच ती पोहोचेल याचा काहीच भरवसा नाही...’

‘माकडाचा माणूस झाला पण म्हणून माणसाचे माकड करता येत नाही...’

हे सगळं सगळं कुलीओला कळतं, पण हेच सगळं इतिहासालाही लागू पडतं, हे मात्र त्याला वळत नाही. इतिहास उत्क्रांत होत असतो. इतिहासाचं चाकही उलटं फिरवता येत नाही. इतिहासात संभाव्य असल्या तरी, वर्तमानात शुद्ध गोत्र, वंश, रक्त वगैरे कल्पना हास्यास्पद आहेत. इतिहासातल्या पूर्वजांच्या पापांना, वर्तमान वंशजांना जबाबदार धरून भविष्य कसं घडणार? इंकांसाठी एल्गार पुकारताना प्राप्त परिस्थितीशी सहकार करणं कुलीओला जमत नव्हतं. इंकांचा वारसा हृदयी धरायचा का गालाप्गोसचा हे त्याला समजत नव्हतं!

म्हणूनच आजूबाजूला अशी वर्तमान आणि भविष्यकाळ सोडून इतिहास बदलायला निघालेली माणसं दिसली, की कुलिओ आठवतो आजही. काही अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं त्यानी पुन्हा अवघड केली माझ्यासाठी. म्हणून कायमच लक्षात राहील तो.

----------------------------------------------------------------------------------------------------------
या आणि अशाच अन्य लिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

shantanuabhyankar.blogspot.in

Thursday, 15 October 2015

कटिंग



हजाम
डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई (जि. सातारा), पिन ४१२८०३.   मो.क्र. ९८२२० १०३४९

हजाम हा काही लक्षात रहाण्यासारखा किंवा ठेवावा असा प्राणी नाही. खरं तर हे आम्हां डॉक्टरांचे पूर्वसुरी. ‘रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स’सुद्धा पूर्वी ‘रॉयल कॉलेज ऑफ बार्बर सर्जन्स’ होतं. पण आमच्या ‘फॅमिली डॉक्टरनी सांगितलंय’ची सर,  ‘आमच्या फॅमिली न्हाव्यानी सांगितलंय’ला नाही. तुंबड्या लावणे, जळवा लावणे, गळू कापणे वगैरे कामं ह्यांची. यातूनच आधुनिक शल्यशास्त्राचा उदय झाला म्हणे. शिवाय रिकामपणी भिंतीला तुंबड्या लावणे, राजाचे कान गाढवाचे असल्याचे झाडाच्या खड्ड्यात सांगणे आणि मधून मधून एखाद्याची बिनपाण्याने करणे हीही अनुषंगिक कामे आहेत.
मलाही बरेच न्हावी घडले. अगदी खुंटावरच्या बलभीमपासून ते पंचतारांकित हबीब पर्यंत. बहुतेक अगदीच अनइंटरेस्टींग होते. त्यांनी डोई  उरकताच माझ्या गळयाभोवतीचं कापड झटकलं, तेंव्हाच त्यातल्या केसाबरोबर हे ही विस्मृतीत गेले.  पण तरी काही माणसं लक्षात रहातात; ती त्यांच्या स्वभावामुळे. ती मला भेटली, ती न्हावी रुपात एवढंच. ती पेट्रोलपंपावर असती तरी लक्षात राहिली असती आणि आगबंबावर असती तरी लक्षात राहिली असती.
पण ह्या सगळ्या न्हाव्यात प्रथम स्मरणाचा मान, माझ्या आयुष्यातल्या  पहिल्या न्हाव्याला, खंडू न्हाव्याला.
दर पंधरा दिवसांनी हा घरी यायचा आणि सगळ्यांची भादरून मोठया दिमाखात निघून जायचा. तो अगदी काळा कुळकुळीत होता. इतरांचं कटिंग करता करता त्याला स्वतःच्या कटिंग-दाढीला वेळच मिळत नसावा. डोई आणि चेहराच नव्हे तर त्याच्या सर्वांगावर पोमेरीअन कुत्र्यासारखे  चांगले केसच केस उगवले होते; आणि हे सगळे केस एकजात पांढरे होते.   पण स्वताःच्या केसालाही धक्का न लावणारा हा इसम माझ्या चिमुकल्या काळजाचा मात्र थरकाप उडवायचा.
खंडूकडून माझी डोई करून घेणं हा एक मोठा कार्यक्रमच असायचा.  तो आला की मी धुमचकाट पळायचो. थोडावेळ पकडापकडीचा खेळ चालायचा. ह्याचंच रुपांतर कधी कधी लपाछपीत व्हायचं. शेवटी एकदाचा मी घरच्यांच्या तावडीत सापडायचोच. मग मी  भोकाड-अस्त्राचा वापर करायचो. हे अस्त्र घरच्यांपुढे अगदीच निष्प्रभ होतं. त्यांच्यावर काही परिणाम व्हायचा नाही.  सगळे मिळून धरून बांधून  मला त्याच्या पुढे बसवायचे.  मी आणखी जोरात रडायचो. पण खंडू जणूकाही बासरी वाजते आहे अशा तन्मयतेने हात चालवायचा. डाव्या हाताच्या खरखरीत पंज्यात माझं डोकं गच्चंम धरून उजव्या हातानं तो त्याचं ‘मिशिन’, मानेवर, कानामागे, भोवऱ्यात, कपाळावर असं संधी मिळेल तसं चालवायचा. या असल्या कटिंग नंतर माझ्यापेक्षा बुजगावणंसुद्धा देखणं दिसत असणार.
अर्थात माझ्याइतकं हिंस्र गिऱ्हाईक खंडूला अजिबात आवडायचं नाही. त्याचं आवडतं गिऱ्हाईक म्हणजे शेजारचे भाऊराव. ह्यांची सहनशक्ती दांडगी होती. डोई खंडूच्या हाती देऊन हे अगदी स्वस्थ बसत. केस, कल्ले, दाढी, मिशा, काखेतले केस, कानातले केस, नाकातले केस, हाताची नखं, पायाची नखं, मान मोडणे, पाठ मोडणे, कान मोडणे, डोळ्यात फुंकर घालणे आणि मूळव्याधीला औषध लावणे; इतकी सगळी कामं ते बसल्या बैठकीला करून घेत. तिकडे खंडूला जॉब सॅटीसफॅक्शन होतं. त्या मानानी मी, म्हणजे अगदीच श्वापद. मी न रडता नुसता बसलो तरी खंडूला कृतकृत्य वाटायचं.
कधी कधी फारच रंगात आला तर खंडू गोष्ट सांगायचा. म्हणायचा, ‘डाक्तरसायेब, भ्वॉकाड बंद करा बघू!’ ही त्याची खास भाषा होती. माझे वडील डॉक्टर, त्या मुळे तो मला त्या वयातही डॉक्टर म्हणायचा. आजोबा वकील, त्यामुळे वडलांना तो धाकलं वकील सायेब म्हणायचा.
‘डाक्तरसायेब, भ्वॉकाड बंद करा बघू!’ खंडू.
‘भॉsss...आय...आय...आय...’ मी.
‘डागदर सायब, ऐका की जरा, गपा...’ खंडू.
त्याची गोष्टही ठरलेली असे. पुंड्या नावाचा एक मुलगा वाडगाभरून खीर हवी म्हणून हट्ट करतो. शेवटी घरातली बाकी सगळी मंडळी पुंड्याला माळ्यावर ठेऊन जत्रेला जातात. तिकडे ती जिलबी खातात, साखरेची चित्र खातात, चक्रात बसतात आणि इकडे पुंड्या  मात्र माळ्यावर रडत बसतो. गोष्टीच्या शेवटी पुंड्याला विंचू चावतो आणि तो माळ्यावर तळमळत असतानाच घरची मंडळी परततात आणि त्याला डॉक्टर कडे घेऊन जातात. तिथे त्याला वृश्चिकदंशावर उतारा म्हणून इंजेक्शनदंश झाला, की आटोपली गोष्ट. विंचू आणि इंजेक्शन या गोष्टी फ्लेक्सिबल होत्या. मी खंडूला त्या दिवशी किती त्रास दिलाय ह्यावर विंचवाचं वागणं अवलंबून असे.
या गोष्टीवरून मी काहीतरी धडा घ्यावा असं खंडूला वाटत असावं. पण माझे आईवडील जिलबी आणि साखरेची चित्र खाण्याची मुळीच शक्यता नव्हती. उघड्यावरचे पदार्थ खाऊ नयेत असं त्यानीच मला सांगितलं होतं. शिवाय चक्रात बसायची मला जाम भीती वाटत असल्यामुळे चक्रवाली जत्रा मला मुळीच आवडायची नाही.
कटिंग झाली की अंघोळ. अंघोळीच्या वेळी खंडूनी कुठे कुठे शस्त्र चालवलेलं आहे ते बरोब्बर कळायचं. कारण कढत पाण्यात सगळ्या जखमा चुरचुरायच्या. गरम पाणी, चुरचुरणाऱ्या जखमा, बंबाचा धूर आणि साबण यातून एकदाचा बाहेर पडलो की मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटायचं.
पुढे खंडू गेला पण जगातल्या कुठल्याही न्हाव्यासमोर धिटाईनं उभं रहायचं धैर्य देऊन गेला. आता बाजारातल्या बाळू न्हाव्याच्या दुकानात माझी रवानगी होऊ लागली. बाळू न्हावी अगदी मिरासदारांच्या गोष्टीतल्या न्हाव्यासारखा होता. एक नंबरचा गपिष्ट. सर्व पोरांचा दोस्त. सर्व पोरं त्याला येता जाता ‘बाळ्या, काळ्या, उंदीर चाळ्या’ म्हणून चिडवायची.
बाळूचं दुकान म्हणजे मोठा मझा होता. अगदी छोटंसं बसकं दुकान, रस्त्यावरून दोन पायऱ्या उतरून, बुटक्या चौकटीतून आत जायचं. आत सारवलेली ‘जिमीन’, रंगाचे पोपडे उडालेल्या भिंती, वर बाभळीचे वासे, पेट्रोमॅक्सच्या धुरानं पार काळेबेंद्रे झालेले. भिंती वरच्या दोन आरश्यांसमोर दोन डुगडुगणाऱ्या खुर्च्या, एका कोपऱ्यात दुकानाच्या फळ्या काढून बांधलेल्या आणि दुसऱ्या कोपऱ्यात वस्तऱ्याला धार लावायचा चामडी पट्टा. शिवाय खुंटीला टपली मारली की चालू आणि पुन्हा मारली की गप्प होणारा एक रेडीओ, भारतमातेचं एक कॅलेंडर, वाळका हार-उदबत्ती-धुराची पुटं वगैरे सहित दत्ताची तसबीर  आणि ‘संत सेना महाराज नाभिक समाजोन्नती समाजाचं’ दरपत्रक. एका खुर्चीखाली सिंहासन! सिहासन म्हणजे पोरांना बसायला एक छोटी, गोल, ऊंच, बाकरवडीच्या आकाराची गादी. लहान मुलाचं कटिंग करताना ही खुर्चीत ठेऊन त्यावर पोराला बसवलं जाई. दुकानाच्या आत बाहेर दोन बाकडी. पण बाळूच्या दुकानात कधीही जा, बाकडेफुल्ल गर्दी ठरलेली. याचं मुख्य कारण म्हणजे बाळूचा विलक्षण बोलका स्वभाव. समोरच्याला तो हा हा म्हणता गुंगवून टाकायचा. लहान मुलांना तर खासच. खंडूची ती पुंड्याची गोष्ट, बाळूच्या कथाकथनासमोर काहीच नाही.
दरवर्षी तुफान पाऊस झाला की नदीला पूर ठरलेला. नागपंचमीला नदीकाठच्या वाळवंटातल्या दगडी नागोबाला  पाण्याचा वेढा पडायचा. पाण्यातूनच पूजेला जावं लागायचं. पुलाच्या कमानीला पाणी टेकायचं. अशी ओढ असायची पाण्याला की भले भले पोहायला घाबरायचे. अशाच एका दिवशी पुलावरून आपण कशी उडी ठोकली याची कथा बाळूनं आम्हाला अगदी रंगवून रंगवून सांगितली होती. तो तुफान बरसणारा पाऊस, रोरांवणारं पाणी, बघ्यांची हीsss गर्दी. अशातच पुलाच्या कठड्यावरून बाळूनं बेधडक उडी ठोकली आणि सपसप, सपसप हात पाय मारत तो पलीकडे पोचला देखील! वाट काढताना त्याचं शरीर अगदी देवमाशासारखं लवलवत होत म्हणे. एवढंच नाही तर पलीकडे पोचताच भर पुरात तो पुन्हा निघाला आणि पुन्हा या बाजूला आला!! हे सारं ऐकूनंच आमचा बाल-कलेजा खलास  झाला. पुरात उलटया दिशेनी पोहणारा हा नरपुंगव  आपलं कटिंग करतोय हे आपले केवढं भाग्य,  या कल्पनेनं, अगदी भरून आलं. इतक्यात बाळूला पुरतं ओळखून असणारं एक गिऱ्हाईक मला म्हणालं, ‘अरे पुलावरून त्यांनी उडी ठोकली हे खरं, पलीकडे पोचून परतला हे ही खरं; पण कठड्यावरून त्यानी उडी मारली ती पाण्यात का रस्त्यावर ते विचार की!’
छान, म्हणजे हा देवमासा, भर पावसात, फक्त रस्ता क्रॉस करून परत आला होता तर!
ह्याच बाळू न्हाव्यानं एकदा, मला दोन भोवरे असल्यामुळे माझी दोन लग्नं होणार असं जाहीर केलं. शाळेत मुलांनी चिडवून चिडवून अगदी भंडावून सोडलं. एकानं तर दोन भोवरे विरुद्ध दिशांना असल्यामुळे दोन्ही बायकांशी माझं भांडण होणार असंही भाकीत वर्तवलं.
बाळू केस अगदी बारीक कापत असे. तश्या सक्त सूचनाच होत्या बाळूला, माझ्या घरून. माझे केस ताठ, राठ वगैरे असल्यामुळे डोक्यावर अगदी सरळ उभे रहात. संत मंडळींच्या मागून जसे प्रकाशाचे किरण येताना दाखवतात, तशी माझ्या डोक्यातून  ही केसांची किरणं उगवत असत. त्यामुळे काही मित्र मला काटेसाळू म्हणायचे. त्यातून ते दोन भोवरे, त्यामुळे मला भुईचक्कर असंही एक नाव मिळालं होतं. काहींनी माझे केस जास्त कडक आहेत का मोरी घासायचा ब्रश, या वर आपापसात पैजा लावल्या.
मी मात्र या सगळ्या प्रकाराने अगदी वैतागून जायचो. केस बसावेत म्हणून मग मी सुचतील ते प्रयत्न केले. घट्ट टोपी घालून झोपलो, चप्प भांग पाडून उन्हात उभा राहिलो, खूप प्रकार प्रकारची तेलं लावली, एकदा तर कच्च्या अंडयानं अंघोळ केली! पण व्यर्थ! कोणीतरी सांगितलं केस पूर्ण कापा, पुन्हा पहिल्यापासून वाढवा. मग चकोट केला . मित्रांच्या टपला सहन केल्या. पण केसांनी आपला स्वाभिमान सोडला नाही. मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा. उभे केस बसावेत म्हणून मी जीवाचं रान केलं आणि आज पोरं चांगले बसलेले केस उभे करण्याच्या खटाटोपात  असलेली दिसतात. त्यासाठीची क्रीमं, तेलं, जेलं, मेणं सर्रास वापरली जातात. मी तेव्हा काळाच्या कितीतरी पुढे होतो तर! माझ्या केसांशी उभा दावा मांडूनही केस बसायचं नाव घेईनात. शेवटी वैतागून मी केस वाढवायचे ठरवले. स्वतःचेच वजन न पेलल्यामुळे केस माना टाकू लागले. मी मनातल्या मनात जाम सुखावलो. केसांना आता मी पुरतं नमवलं होतं. पण हे सूखही फार काळ टिकलं नाही. एकदा भर वर्गात आमच्या हिंदीच्या सरांनी खड्या आवाजात सवाल केला, ‘क्यूं बे, बालहत्या कब होगी?’
मी गोंधळलोच. पण थोड्याच वेळात प्रश्नाचा रोख ओळखून म्हणालो, ‘उद्या सर.’
घरी येऊन आईला सांगितलं, ‘केस उभे राहू नयेत म्हणून मुद्दाम वाढवलेत अशी चिठ्ठी दे.’
आई म्हणते कशी, ‘काही नको, कापूनच ये उद्या, नाहीतरी बालोद्यानात मित्र खेळायला यायला लागलेच आहेत.’
नाईलाजानं दुसऱ्या दिवशी मी आपला बाळूच्या दुकानी सिंहासनावर हजर.
जरा वेळ बसलं की बाळूच्या दुकानात एक एक पात्र एन्ट्री टाकून जायचं. नेने नावाचा एक अर्धवट माणूस यायचा आणि मान वर करून पाणी, नाकानी पिऊन दाखवायचा. त्याच्या टाळ्याला भलं मोठ भोक होतं. त्यानी जांभई दिली की ते भोक दिसायचं सुद्धा, अगदी आत लोंबणाऱ्या शेंबडासकट! ते बघायला आम्ही शर्थ करत असू. ज्याला दिसेल तो मुलगा इतरांना अगदी रसभरीत वर्णन ऐकवायचा. टाळ्याला भोक असल्यामुळे त्याचे उच्चार समजणं महाकठीण. एकदा दुकानात आलेल्या कुण्या पाहुण्याबरोबर तो काहीतरी हुज्जत घालत होता. पण काही वेळाने नेने तावातावानं  काय बोलतोय याचा पाहुण्याला जाम पत्ता लागेना. पावणा म्हणतो कसा, ‘अहो, मराठीत बोला मराठीत!”
‘अओ अअं काअ कअंताय? मंआटीतच बोअतोए, मंआटीतच बोअतोए!!’ नेने.
पाहुण्याचा आणि नेन्याचा हा संवाद ऐकून आम्ही खो खो हसत सुटलो.

भिकी म्हणून एक भाजीवाली यायची. अत्यंत किडकिडीत, पिंजारलेले पांढरे केस आणि मशेरी लावून काळे झालेले दात.  बाळूच्या दुकानाच्या दारातच पथारी टाकायची. मग बाळूची आणि तिची चांगलीच जुंपायची. शेवटी ती थोडी बाजूला सरकायची, पण सरकता सरकता अशा काही शिव्या द्यायची की त्याचं नाव ते. शिव्या देताना तिच्या जिभेवर सरस्वती नाचायची. (भाषेमध्ये शिव्याही येत असल्यामुळे ती वाग्विलासिनी याही कलेची अधिष्टात्री असणारच.)  शिव्या देण्याचा तिचा पर्फोर्मन्स प्रेक्षणीय, श्रवणीय आणी प्रसंगोपात अनुकरणीय असाच होता. तो तीनही  सप्तकात लीलया फिरणारा आवाज, ते नादमय यमक आणि अनुप्रास, ‘भ’चे ते भयाकारी उच्चारण, ते वटारलेले ताबडे लाल डोळे, ते हातवारे, बोटांच्या अत्यंत सूचक हालचाली... तिच्या शिव्यांमध्ये मंत्रसामर्थ्य होतं जणू. समोरच्यावर इष्ट परिणाम लगेच दिसत असे. हा अनुभव मी स्वतः घेतला आहे. पुढील आयुष्यात  माझा किडलेला दात काढण्यासाठी ज्या वेळी मला जबरदस्तीने डेंटीस्टच्या खुर्चीत डांबण्यात आलं तेव्हा मीही भिकी-प्रकोप-अस्त्राचा वापर केला. माझी रसवंती ऐकून त्या डेंटीस्टनं जो आ वासला, तो अजून मिटला नाही म्हणतात.
ही भिकी चांगली लिहायवाचायची. मटक्याचा आकडा लावायची. मंडईतल्या हमालांना व्याजाने पैसे द्यायची आणि आपल्या जिभेच्या जोरावर वसूलही करायची. रोज विकत घेऊन पेपर वाचायची. तिच्या त्या पेपर वाचनाला पोरं हसली की कर्कश्श, किरट्या आवाजात  म्हणायची, हसू नको एsss ****च्या, ‘ज’ आणि ‘झ’ मधला फरक कळतो मला! बरीच वर्ष मी यावर बारकाईनं विचार करतोय; मराठी भाषा एका मर्मभेदी सत्य सांगणाऱ्या वाक्प्रचाराला मुकली असंच मला वाटतं!!  
रोज सकाळी हरणाबाईची सून यायची बाळूकडे. छकड्यात घालून आणलेलं, विकलांग हरणाबाईचं मुटकुळं कोपऱ्यावर उतरवून ती दुकानात यायची. दिवसभर हरणाबाई फुलं, हार, गजरे  विकत बसायची. फूल ना फुलाची पाकळी खपत असेल. कधी कधी तर, ना फूल ना फुलाची पाकळी. पण ‘घरच्या कोपऱ्यात बसण्यापरीस हिथं बसलं तर चार पैशे तरी मिळतील’; असा सुनेचा हिशेब होता. बाळूचं आणि हरणाबाईच्या सूनेचं ‘आहे’ असं मोठी लोकं बोलायची. हे जे काही ‘आहे’ ते म्हणजे नेमकं काय आहे ते मला काही समजायचं नाही. पण हरणीची सून लांबून दिसली की बाळू अंतर्बाह्य बदलायचा. त्याचा हात संथावायचा. नजर तिच्यावर खिळलेली. गप्पा बंद. दुकानात अचानक एक अवघडलेली शांतता पसरायची. कुणी पेपरात डोकं घालायचा, कुणी रस्त्यावर जाऊन उगीचंच विरुद्ध बाजूला नजर लावून बघायचा. दातकोरणी, कानकोरणी कुरकुरू लागायची. झपतालात पावलं टाकत ती यायची, बाकाखाली ठेवलेली हरिणीची फुलांची टोपली घ्यायची आणि हरिणीला दुकान लावून द्यायला त्याच तालात ती कोपऱ्यावर नाहीशी व्हायची. गोरी, घारी, हनुवटीवर  गोंदण आणि कपाळी लालभडक चिरी  मिरवणारी ती, जातांना बाळूला; ‘हाय मी मळ्यात’ किंवा ‘हाय मी घरात’; यातला काहीतरी निरोप पुटपुटायची. पण ‘मळ्यात’ म्हणजे ‘घरात’ आणि ‘घरात’ म्हणजे ‘मळ्यात’ हे सगळ्या गावाला ठाऊक होतं.
कपाळावर भलंथोरलं टेंगुळ असलेला गज्या ही दुकानात यायचा. म्हणजे तो यायचा नाही. लोकंच त्याला बोलवायची. आपला कार्यभाग आटोपेपर्यंत ही फुकटची करमणूक छान होती.
‘काय गज्या झालं का जेवण?’
‘होsss परवाच!’ गज्याचं भरघोस उत्तर.
गज्याचं जेवण हे असंच चार दोन दिवसांनी एकदा या पद्धतीनं चालायचं. कारण पंचक्रोशीत कुठेही काहीही कार्य असू दे, जिथे जेवणावळ तिथे गज्या हजर. लाचार, भुकेल्या  चेहऱ्यानं अगदी पहिली पंगत बसायच्या आधीच हा दारात उभा रहायचा. कधी काही बोलायचा नाही, मागायचा नाही. लोकं त्याच्याकडे सराईत पणे दुर्लक्ष करायची. हा तितक्याच सराईतपणे त्यांच्या दुर्लक्षाकडे दुर्लक्ष करायचा. येता जाता मुलं चिडवायची, ‘गज्या रे गज्या, काय तुझी मजा; टेंगुळ वाजवतंय बेंडबाजा!’ हा मात्र अन्नावर वासना ठेऊन दारात मख्खासारखा उभा. यजमानही दोन तीन वेळा दारी येऊन त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं ठरवून आत नाहीसे व्हायचे. पण गज्या ढिम्म जागचा हलायचा नाही. ऊन रणरणायला लागायचं. सावल्या पायाखाली गोळा व्हायच्या. पण तश्श्या फुफाट्यात गज्या दाराशी उभाच असायचा. अगदी शेवटची पंगत बसायला लागली की गज्या हळूच जावून पानावर बसायचा. आता या आगंतुक पाहुण्याला पानावरून उठवणार कोण? मनातल्या मनात चरफडत, पानापुढे आदळआपट करत  गज्याला वाढलं जायचं. क्वचित कुणी मायेनं वाढायचं देखील, पण क्वचितच. तोही हुं म्हणून आकंठ जेवून घ्यायचा. उद्याची शाश्वती काय सांगावी? तोरणाचं असो मरणाचं असो, गज्याचं पान ठरलेलं. जाताना उगाच पत्रावळी उचल, खरकटं गोळा कर असं केल्यासारखं करून गज्या धूम ठोकायचा. वर बाळूच्या दुकानात आला की गज्याची अन्न टिपण्णी सुरु.  ‘त्या सुलाबाईची पोरगी... चंद्रा, गेली न्हाय का ती यष्टी खाली सापडून...तीचं बरं का, म्हणजे तिच्या वेळेला सुलाबाईचं मी डोहाळजेवण जेवलोय!’ गज्याला डोहाळजेवणही वर्ज्य नव्हतंच. ‘पुढे चंद्रीचं बारसं जेवलो, लग्न जेवलो, तीचं डोहाळजेवण जेवलो, तिच्या मुलीचं बारसं जेवलो आन चंद्री गेली तर तीचा तेराव्वाबी जेवलो!’
मारवाड्याचं, छगन म्हणून एक छंदी फंदी पोरगं यायचं आणि दुकानातल्याच सिने मासिकातले धर्मेंद्रचे फोटो दाखवून तश्शी स्टाईल कर म्हणायचं. बाळू जमेल तेवढं करायचा आणि म्हणायचा, ‘हं झालं’. पोरगं खुर्चीतनं उठायला लागलं की म्हणायचा ‘थांब. थांब. जरा पुन्हा बस.’ मग बाळू बराच वेळ त्याचा चेहरा निरखून बघायचा. एकदा थेट, एकदा आरशात. त्याची मान एकदा इकडे करून, एकदा तिकडे करून; खाली, वर...मग स्वतःची मान तितक्याच प्रकारे फिरवून हे निरीक्षण चालायचं. डोळे बारीक केलेले, जीभ दातात घट्ट धरलेली, श्वास रोखलेला; मधूनच मासिकातला रेफरन्सच्या फोटोचा अभ्यास, मधूनच छगनच्या केश कलापाकडे दृष्टीक्षेप ...  बाळू इतक्या तल्लीनतेनं हे करायचा, की असं वाटायचं; छगनचा धर्मेंद्रच काय, मनात आणलं तर बाळू धर्मेंद्रचाही छगन करेल! मग दुकानातली इतर गिऱ्हाईकं  छगनच्या या जावळात सामील व्हायची. ‘बाळू, इकडून थोडा कट मार रे’, ‘तिकडून उचलून मागे घे बरं केस’; अशा सूचना चालू व्हायच्या. बऱ्याच वेळा, बऱ्याच वेळ, बऱ्याच ठिकाणच्या झुल्फांची काट-छाट केल्यावर आणि त्या पोराला दोन तीनदा खुर्चीवर चढ-उतर केल्यावर मगच बाळूचं समाधान व्हायचं. हे झालं की छगनची विशेष न आलेली दाढी करण्याचा कार्यक्रम व्हायचा. आलेली दाढी करणे हा या ह्जामतीचा उद्देश नसून, दाढी आलेली आहे हे भासवणे हाच प्रमुख उद्देश होता. त्यामुळे दाढीची लवलवही भादरायची छगनला भारी हौस. छगन हे ‘भारी’ गिऱ्हाईक. बाकीच्या गिऱ्हाईकांसाठी दाढीचा  गोदरेजचा गोल साबण असायचा. पण छगनशेटसाठी महागाईचा, सुवासिक, ट्यूबमधला, खास साबण. मग सर्व चेहऱ्यावर ब्रश घुमवत घुमवत साबण फासला जायचा. त्या ठिपकाभर साबणाचा तोंडभर फेस होताना पहाण्यात आम्ही दंग व्हायचो. ते फेसाळतं तोंड आरशात निरखताना छगन अगदी तृप्त दिसायचा. छगनशेटची हजामत वस्तऱ्यानी नाही तर ब्लेडनं व्हायची. वस्तऱ्याच्या दाढीपेक्षा ब्लेडच्या दाढीचे दर चढे होते. मग बाळू ब्लेडच्या छोट्याश्या पाकिटातून नवं पान काढणार, ते निम्मं तोडणार, मग वस्तऱ्याच्या खाचेत ते सरकवणार. फेसाच्या ढगातून वस्तऱ्याचे लयदार फटकारे एखाद्या चित्रकाराच्या तल्लीनतेनं ओढले जायचे. मधूनच छगनची चेहरे-पट्टी आणि मधूनच फेसाच्या लाटा अशी शोभा दिसायला लागायची. उजव्या हातानी वस्तरा ओढला की त्यावरचा फेस बाळू डाव्या अंगठ्याखालच्या उंचवट्यावर पुसायचा. टप्प्याटप्प्यानं श्मश्रू पूर्ण झाली की पुन्हा एकदा फेस, पुन्हा एकदा पाट काढणे, पुन्हा एकदा गुळगुळीत चेहरा! असं चांगलं तीन डाव तरी करणार. छगन आता चिकणाचोपडा दिसायला लागायचा.  मग छगनच्या चेहऱ्यावर पाण्याचा फवारा मारून, तुरटी फिरवली जायची.  ठिकठिकाणी अफगाण स्नोचे ठिपके लावले जायचे. मग ते पसरत पसरत सगळीकडे फासले जायचे. यावर पावडरचा थर, मग अत्तराचं बोट. छगनचा तर कायाकल्प व्हायचा जणू. अखेरीस मानेभोवतीचे कापड काढून मानेवर पावडरचा शेवटचा पफ फिरवून छगनला पायउतार होण्याची विनंती व्हायची. आरशात बघत मान उडवून, झुल्फ विस्कटून, पुन्हा मानेच्या झटक्यासरशी पूर्ववत करत छगन कंगवा ताब्यात घ्यायचा. आधी मोठया दातांनी, मग बारीक दातांनी अशी कंगव्याची करामत चालायची. अखेर मनासारखा भांग पडला की खुंटीवरचा सॅटीनचा डगला चढवून, सोन्याची चेन त्याच्या बाहेर ओढून, शीळ घालत स्वारी बराच वेळ  आरशात बघत रहायची.  छगन इतका खूष, की बाळूच्या हातावर थेट वीस रुपायची नोट टेकवून छगन चंटगिरी करायला बाहेर. वीस ही रक्कम एरवीच्या दरापेक्षा निदान तिप्पट होती.
छगनचा जाडगुला बाप याच्या एकदम उलट. केस कापुन झाले की हा महाकाय  अगदी वक्रतुंड करून बाळूला निम्मेच पैसे द्यायचा. वर म्हणणार, ‘तीण रुप्याच्च काम सांगिटलं, एक रुप्प्याच्च केलंस, पण राहू दे, हा घे दीड रुपिया. तूsss, तिन्नी मुलगेsss, ने दोन मुल्लीsss, तुझी बायडी, घरच्ये शगळे,  चैन करा... हॅ... हॅ... हॅ’
शिवाय जर्रा डोकावणारी गिऱ्हाईकं हा ही एक घटक होता. हे येणार, आरशात बघून भांग पाडणार; मिशा दाढी, मेंदी, कलप यातील जे लागू असेल त्याचं निरीक्षण करणार आणि बाळूला म्हणणार, ‘जरा एवढं-एवढं कर रे बाळू.’
मग मिशीला कट मारण्याच्या मिषानं बाळूच्या गप्पा सुरु. बाळूच्या दुकानातल्या संवादांनी मला वैश्विक भान आलं!
‘हळदीला भाव काय आला?’... मिशा कट!
‘परवीनबाबीला येड लागलं आहे...’ दाढी शेपमध्ये!
‘मंज्याचा मुलगा सुटलावता; त्यो परत आत गेला का?... गेला?... आता या बारीला का म्हनून गेला?...’ कल्ले वर!
‘आवा जाये पंढरपुरा, येशी पासून येई घरा’ असं तुकारामबोवानी म्हण्लेल्च ह्येsss ए... ए... ए...  आक्च्ची!!’... नाकातले केस कलम!
‘येरवड्याहून कोन कधी बरं होऊन येतंय व्ह्य!’... कलपाचा एकच फटकारा फक्त!
‘पाकीस्तानचं आता काही खरं नाही.’... फक्त भांग!
‘च्या मायला त्या जेम्स बॉन्डच्या; दिसंल ती बाई पटवतंय...’ तंबाकू-चुनाडबी अदलाबदल.
अशा पद्धतीने बोल बोल म्हणता दोस्त बनणारा बाळू जगन्मित्र होता, साधा होता, छोटयाशा आयुष्याकडून त्याच्या छोट्याशाच अपेक्षा होत्या. त्याचं एक आमटीभात मंडळ होतं. दर अष्टमीला ही मंडळी हरिहरेश्वराच्या बखळीत चूल पेटवून आमटी भात जेवायची. फक्त आमटी भात. या आमटीसाठी भाजलेलं खोबरं, कांदा असं काय काय घालून  बाळू खास मसाला बनवायचा. खरपूस भात आणि मसालेदार आमटी असं आकंठ जेवून मंडळी सुस्तावली की बाळू हेमामालीनीला फोन करायचा.
हेमामालीनीला फोन, हा या अड्ड्यातला सगळ्यांचा आवडता कार्यक्रम होता. हवेतल्या हवेत कानाला फोन लावल्यासारखं करून बाळू सुरु व्हायचा; ‘...हा...हेल्लो..कोन? हेमा का? काय झाली का भांडी घासून?...’ इथून सुरुवात व्हायची. पुढे बाळूच्या किंवा अड्ड्यातल्या कुणाच्याही कौटुंबिक प्रश्नांना हेमा उत्तरं द्यायची... स्वतःची गाऱ्हाणी ती बाळूला सांगायची... धर्म्याचं घराकडे लक्षच नाही पासून सवतीची मुलं कशी त्रास देतात इथपर्यंत......यावर बाळू गंभीर पणे तोडगे सांगायचा...यात तीन एकादश्या कर पासून धर्मेंद्रच्या करगोट्याला बिब्बा टोचून बांध इथपर्यंत काहीही असायचं. खट्याळपणा, चावटपणा, आचरटपणा, अघोचरपणा अशी ठेसनं घेत घेत गाडी अश्लीलपणावर यायची...मंडळी लोटपोट हसून हसून लोळायला लागायची. ‘हिक्डं आलीस की ये गं दुकानात, पण आदी कार्ड टाक हा, चांगलं झ्याकपाक करून ठेव्तो दुकान!’ या आवातणावर फोन संपायचा.
पण हेमा कधीच न आल्यामुळे बाळूवर दुकान झ्याकपाक करण्याचा प्रसंग आलाच नाही. आयुष्यात त्यानी कधी दुकान रंगवलं नाही की फर्निचर बदललं नाही. गिऱ्हाईक यायचं ते बाळूशी गप्पा मारायला; आपापसात हास्यविनोद करायला. त्याच्या हस्ते डोई भादरून घेत घेत आम्ही लहानाचे मोठे झालो, कुणाचे काळ्याचे पांढरे झाले, कुणाचे होत्याचे नव्हते झाले. बाळूचे तर काळ्याचे पांढरे व्हायच्या आतच, पूर्णपणे होत्याचे नव्हते झाले होते. चिवट बाळू चांगला लांबलचक जगला. जावळही बाळू हस्ते आणि डोक्यावरचं छत्र हरपल्यावर चकोटही बाळूहस्ते असे कित्येक होते.  लांब स्थायिक झालेला  कोणी गाववाला परत आला की त्याची आल्यावर बाळूकडे चक्कर ठरलेली. कोण गेलं, कोणाला लॉटरी लागली, कोणाच्या कोर्टातल्या केसचं काय झालं हे सगळे अपडेट्स बाळू देत जायचा. बाळू हाच आमचा फेसबुकही होता, ट्वीटर होता आणि व्हॉट्सअॅपही.
देश फिरून, विदेश फिरून; फिरून मी गावी गेलो की मी देखील बाळूकडे जातो. बाळूची रवानगी आता दुकानाबाहेर झाली आहे. तिथेच पथारी टाकून तो बसतो. तो आता थकलाय. माझ्या सारखी जुनी गिऱ्हाईकं तेवढी करतो. नव्या फ्याशनी त्याला येत नाहीत म्हणतो. बाकी त्याचा मुलगाच बघतो दुकान. दुकानही वेडंविद्रं राहीलं नाही. आता तिथे नवीन इमारत आहे, नवीन झ्याकपाक दुकान आहे, एसी ची घरघर आणि टीव्हीची अखंड वटवट आहे. पण गिर्हाईक तोंड मिटून बसतं, मोबाईलमद्ध्ये माना घालून स्वतःशीच हसतं. मी गेलो की बाळू खुलतो. त्याच्या धोकटीतली शस्त्र परजत त्याच्या जिभेचा  पट्टा चालू होतो.
‘कोण गाव आलं म्हणायचं?’
‘पेरू!’
‘ह्ये गाव हाये व्ह्य?’
‘असा देश आहे.’
‘काय असतं तिथे?’
मग मी ‘काय असत तिथे’ ते सांगत रहातो. बाळूचे डोळे लकाकतात. तो म्हणतो ‘कुठले कुठले देश असतात जगाच्या पाठीवर; ती तरी गेली होती का नाही तिथे कुणाला ठाव’
‘कोण ती?’
‘आप्ली हेमामालीनी! आता विचारतोच फोन करून!’
बाळू खळखळून हसतो आणि रंगतदार गप्पांना उत येत जातो.