Tuesday 10 April 2018

टाका रुते कुणाला...


टाका रुते कुणाला...
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
ऑपरेशनबद्दल चर्चा चालू असते. मधूनच बाणासारखा प्रश्न येतो, ‘किती टाके पडतील डॉक्टर?’ विचारते बहुधा ती पेशंट स्वतः.
जितके टाके जास्त तितकं ऑपरेशन मोठं हा घट्ट समज. एके काळी हे सार्वत्रिक सत्य होतं. मोठ्ठ ऑपरेशन करायला, मोठ्ठ पोट फाडावंच लागायचं. जेवढी  मोठी जखम तेवढी ऑपरेशनची किंमत वाढायची. सर्व अर्थानी. मोठ्ठ्या ऑपरेशनवालीची सहनशक्ती मोठी. तिची शान मोठी. तिचा मान मोठा. सन्मान मोठा. ऑपरेशनचा खर्च मोठा. हा खर्च पेलणारा कारभारी मोठा. कौतुक मोठं. अचंबा मोठा. भेटायला येणार लवाजमा मोठा.
कॉलेजमधेही हेच शिकवलं जायचं. पुरेसं लांब इंसिजन (छेद) ही पहिली पायरी. यालाच अडखळला तर मग तो सर्जन कसला? सर्जनला सिंहाची छाती हवी (हे असं इंसिजन घ्यायला), हत्तीचे पाय हवे (बराच वेळ उभं रहायला), गरुडा सारखी नजर हवी आणि स्त्रीचे कोमल हात हवेत; असं वैद्यकीय सुभाषित आहे एक. त्यावेळची परिस्थिती होती खरंच तशी.
आता जग बदललं. भुलीच तंत्र बदललं. नवी नवी औषधं आली. प्रकाश वळवता येतो असा शोध लागला. मग तो वळवून कुठेही नेता यायला लागला. पोटात, गर्भपिशवीत, कानात, नाकात, गुडघ्यात, कवटीत, पाठीच्या मणक्यात... कुठेही. छोटे कॅमेरे, छोटी छोटी इंस्ट्रूमेंट्स निघाली. पोट फाडून जे करावं लागायचं ते आता छोट्याच्या भोकातून शक्य झालं. पोटात काय दडलंय; आत भानगड काय आहे, हे बघायला आता ‘दार उघडण्याची’ गरज नाही. जणू ‘किल्लीच्या भोकातून’ आतली सगळी मज्जा दिसायला लागली.
पण या भानगडीत ते टाक्यांचं कौतुक लोपलं. टाक्यांची असोशी असलेल्या बायका अगदी मनात हिरमुसून जातात. टाके नाहीत म्हणजे भलतंच. टाके नाहीत? मग काय मज्जा?  
सीझर सुद्धा बिन टाक्याचं करता येतं. म्हणजे पोट पूर्वीइतकंच उघडावं लागतं. त्याशिवाय बाळ कसं काढणार? पण शिवताना टाके आतल्या आत रहातील असे घातले जातात. वरून म्हणाल तर दिसायला टाके शून्य! खरंतर ही शिंप्यांची पिढ्यांपिढ्यांची ट्रिक आहे. डॉक्टरांनी ती त्यांच्याकडूनच उचलेली आहे. धावदोरा, कशिदा असे टाके ऑपरेशनमधेही वापरले जातातच. असं काय काय, कुठून कुठून उचललंय डॉक्टरनी. न्हाव्याची कात्री धरायची पद्धत..  गुरख्यांच्या गाठी... लोहाराचं रिबीट... चांभाराची आरी... सुताराची करवत ही आमचीही शस्त्र आहेत. कोणत्याही ऑपरेशनमध्ये पेशंट मोजते ते वरुन दिसणारे टाके. आत बरेच टाके असतात. सीझर झालं तर आत निदान पन्नास टाके तरी असतात, विविध स्तरांना सांधण्यासाठी. वर मात्र दहा पंधरा पासून, शून्य पर्यंत टाके घालून त्वचा शिवता येते. काही वेळा चक्क स्टेपलर आणि पिनाही वापरल्या जातात.
पूर्वी सीझर म्हटलं की हे भलं थोरलं इंसिजन, बेंबीपासून ओटीपोटापर्यंत. मोठ्ठा उभा व्रण. मग त्यावर आडव्या रेघांची नक्षी. त्या बाईला मनात आलं तरी बेंबी खाली साडी घालणं अवघड. आता इंसिजन असतं ते आडवं, अगदी खाली, अगदी ओटीपोटावर. बिकिनी घातली तरी दिसणार नाय! ह्याला म्हणतातच ‘बिकिनी इंसीजन’. हे अधिक चांगलं. अनेक अर्थानी. दुखतं कमी. भरून येतं झटपट. नंतर हार्नियाची शक्यता कमी. टाकेही आतल्या आत असतात, आपले आपण विरघळणारे असतात. काढायची भानगड नाही. व्रण अगदी दिसेल न दिसेलसा उमटतो. शिवाय शरीराच्या (सहसा) न दिसणाऱ्या भागावर असतो. त्यामुळे जास्त टाके म्हणजे जास्त मोठ ऑपरेशन असं आता राहिलेलं नाही. बरीच मोठी आणि अत्यंत गुंतागुंतीची ऑपरेशन आता दुर्बिणीतून (टाक्याविना) करता येतात. शक्य असेल तर कोणतही ऑपरेशन बिनटाक्याचंच करणं योग्य. अर्थात त्यासाठी डॉक्टर तशा तयारीचा हवा आणि इतर साधन सामुग्रीही उत्तम प्रतीची हवी. ‘परंतु तेथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे!’ ऑपरेशन टाक्याचं की बिन टाक्याचं हा चॉइस बराचसा डॉक्टरवर सोडायला हवा.
सगळ्यात कॉमनली केलं जाणारं बिनटाक्याचं ऑपरेशन म्हणजे स्त्री-नसबंदी. ‘लाईटीवरचं’, ‘फिरकीचं’, अशी अनेक लाडाची नावं त्याला पेशंटनी ठेवली आहेत. हे ‘फेल जातं’ अशी वदंता आहे. पण अभ्यासात असं दिसून आलेलं नाही. तुलना करता, टाक्याच्या आणि बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेमध्ये ‘फेल जाण्याचं’ प्रमाण सारखंच आहे.
टाके न भिजवण, हे ही एक कर्मकांड आहे. अंघोळीचं पाणी टाक्यात जाऊन त्यात पाणी होत नाही. टाके नीट जुळले नाहीत, इन्फेक्शन झाले, आतल्या आत चरबीचं पाणी होत राहीलं, तर जखमेत ‘पाणी’ होतं. अंघोळीचं पाणी जखमेत ‘शिरून’ साठूनबिठून रहात नाही. जखम शिवल्यावर काही तासात तिथे एक सीलबंद पापुद्रा तयार होतो. मग फारसं काही आत-बाहेर जाऊ शकत नाही. ड्रेसिंग हे रोगजंतूंचा जखमेशी सहज संपर्क येऊ नये म्हणून असतं. ड्रेसिंगमुळे जखमेला कमालीची सुरक्षा वगैरे मिळत नाही. अशी सुरक्षा आपल्या प्रतिकारशक्तीमुळे मिळते.
भात, बटाटा, पावटा आणि वांगं हे नाहक बदनाम पदार्थ आहेत. यांच्यामुळे म्हणे टाके बिघडतात. असं काही होत नाही. भात आणि बटाटा हे रोजच्या आहारात असणारे जगात कित्येक देश आहेत. आख्खी कोकणपट्टी भातावर जगते... आणि तिथली ऑपरेशने निर्विघ्नपणे पार पडत असतात. भात, बटाटा, पावटा, आणि वांगं एकत्र करून खाल्लं तरी टाक्यांना काsssही फरक पडत नाही. (इथे या व्यक्तीला डायबेटीस वगैरे नाही हे गृहीत आहे हं.)
थोडक्यात टाक्यावरून ऑपरेशनची परीक्षा करण्याचे दिवस आता मागे पडले आहेत.




No comments:

Post a Comment