Saturday 2 March 2024

परंतु रोकडे काही..

 

परंतु रोकडे काही..  

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

 

 

श्री. रामकृष्ण यादव उर्फ रामदेवबाबा यांचं आणि माझं अगदी घट्ट नातं आहे. गेली काही वर्ष कधी अचंब्याने, कधी अविश्वासाने तर क्वचित आसूयेने मी या ब्रह्मचाऱ्याचे  उटपटांग चाळे न्याहाळत आहे. ज्या विखारी आणि विषारी जाहिरातीवर सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच बंदी घातली त्या बाबतही मी पूर्वी  इथे लिहिले होते. (लोकसत्ता १३.१२.२२) त्यांच्या विपणन कौशल्याला उजव्या हाताने सलाम ठोकत, मला देशद्रोही किंवा धर्मद्रोही ठरवून कोणी लाथ घालेल या भयाने डावा हात गांडीवर ठेऊन मी विचार करू लागतो; इतकी सगळी माणसं इतक्या सगळ्या अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय, अर्धशास्त्रीय फसव्या दाव्यांना का भुलतात? याचेही काही शास्त्रीय कारण असेलच ना?

 

तेंव्हा सहजच भुलणाऱ्या  या मानवी मनाचा हा मागोवा.  

 

जादुई रोगमुक्तीची अपेक्षा मानवी मनामध्ये असतेच असते.  दिव्यदृष्टी मिळून आपल्याला गुप्तधन मिळेल अशी सुप्त इच्छा जशी असते, तशीच ही इच्छा. आपल्या लोककथांतून, पुराणांतून  अशा कथा आहेतच. कोड, कुबड, महारोग, अंधत्व, वंध्यत्व असे काय काय  आजार आणि जादुई उपचारांमुळे त्यातून तत्क्षणी मुक्ती. तेंव्हा असं काहीतरी असू शकेल अशीच आपल्या मनाची बैठक असते. साहजीकच आपण अशा दाव्यांकडे सहानुभूतीने पहातो.

 

जे आपल्याला वाटत असतं त्याचे पुरावे आपल्याला आपोआपच आसपास सापडायला लागतात (कन्फर्मेशन बायस).  ही कोणा व्यक्तीची नाही तर एकूणच मानव जातीची मानसिकता आहे. मग अमुक एका उपचाराने गुण येतो म्हटलं की त्याच उपचाराने गुण आलेली माणसं भेटतात, त्याचीच माहिती पेपरात नजरेस येते आणि आपला समज अधिकाधिक घट्ट होतो. गैरसमज रूजण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे. वास्तविक भवताल तोच आणि तसाच  असतो आपण  त्यातून आपल्याला हवे ते वेचत असतो. आपण नवीन सेल्टॉस घेतली की लगेच रस्त्यावर कितीतरी सेल्टॉस दिसतात; तसंच हे.

 

प्रस्थापित आरोग्य व्यवस्था, औषध कंपन्या आणि डॉक्टरांनी पेशंटला लुबाडल्याच्या इतक्या सत्यकथा ऐकू येतात की या साऱ्या व्यवस्थेबद्दल एक प्रकारची सूडभावना आणि अविश्वास लोकांच्या मनात असतोच.  या अविश्वासाच्या खतपाण्यावर कृतक वैद्यकीचं तण माजतं. प्रस्थापित व्यवस्था ‘नफा’ एवढे एकच उद्दिष्ट ठेवून काम करते हे एकदा मनावर ठसलं, की पर्यायी औषधवालेसुद्धा नफाच कमवत असतात हे लक्षातच येत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्या, राक्षसी प्रचार यंत्रणा वगैरे दोन्हीकडे आहे.

 

लोककथा, अन्न, कपडेलत्ते, करमणूक याप्रमाणेच वैद्यकीय समजुती, उपाय हे सुद्धा आपल्या संस्कृतीचा भाग असतात. जे आपल्या आज्या-पणज्यांनी  आपल्यासाठी केलं ते आपण आपल्या नातवंडा-पंतवंडांसाठी सुचवत असतो, करत असतो.  त्याविषयी आपल्याला विशेष ममत्व असते. म्हणूनच अशा उपचारांबाबत शंका  म्हणजे धर्मद्रोह, देशद्रोह हे ठसवणंही सोपं असतं. परंपरेने चालत आलेले हे उपचार काळाच्या कसोटीवर टिकले आहेत आणि म्हणून ते सुरक्षितच असणारच   अशी आपली घट्ट समजूत असते.  पण खरं सांगायचं तर काळाची अशी काही कसोटी नसतेच. जरा बरोबर, जरा चुकीच्या अशा अनेक गोष्टी काळाच्या कसोटीवर टिकलेल्याच होत्या.  सापाचं विष उतरवणे, मुलांच्या नाळेला शेण लावणे, रजस्वला अपवित्र असते अशी समजूत  हे सगळं काळाच्या कसोटीवर टिकलेलेच आहे, पण चुकीचे आहे.  तेव्हा काळाची कसोटी लावण्यापेक्षा विज्ञानाची कसोटी लावणं अधिक श्रेयस्कर नाही का?

 

आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी टप्प्यावर आजार गाठतोच आणि आजाराच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर तो असह्य  आणि असाध्य होतोच. याचा वेग आणि वेदना ही व्यक्तीगणिक वेगळी. पण आशा माणसाला स्वस्थ बसू देत नाही. जगायची आणि आपल्या सुहृदाला जगवायची उमेद देत राहते.  शिवाय योग्य उपचार आर्थिक आवाक्यात नसतील, कॅन्सर हॉस्पिटल जर लंकेत असेल, तर उपयोग काय? काहीतरी करणं आणि समाधान मानून घेणं, एवढंच तर हातात उरतं.

 

‘आता ह्याहून अधिक काहीच करता येणार नाही’ असं पर्यायीवाले  कधीच म्हणत नाहीत.शेचा नंदादीप ते तेवत ठेवतात. अर्थात तेल वातीचा खर्च पेशंटकडूनच घेतात. ज्यांना या  नंदादीपाची ऊब आवडते ते तेल वातीच्या खर्चाची तमा बाळगत नाहीत. आधुनिक वैद्यकीत असं करणं गैर मानलं जातं. आजाराबद्दल सत्य आणि संपूर्ण माहिती मिळणे हा पेशंटचा अधिकार मानला जातो. तेंव्हा खोटी आशा लावण्यापेक्षा वस्तुस्थितीला सामोरे जाण्याचे मार्ग आपण जोडीने धुंडाळू, अशी भूमिका असते. टाइप वन मधुमेह, रक्तदाब किंवा  संधिवाताच्या पेशंटना कायम  औषधे लागतील, त्यांचे काही सहपरीणामही असतील,  असंच सांगितलं जातं; केमोथेरपी अथवा शस्त्रक्रियांपूर्वी साऱ्या फायद्या-तोटयांची सविस्तर माहिती दिली जाते, पूर्वसंमती घेतली जाते आणि हेच योग्य आहे.

 

कधी या साऱ्या विकार वेदनेला काही कारण देता येतं तर कधी नाही. साऱ्याच प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला ठाऊक नाहीत. मग असल्या अज्ञानी, अर्धवट, अबल विज्ञानापेक्षा साऱ्याच आजारांवर रामबाण उपाय आहेत; कुठलाही कॅन्सर, लकवा, संधीवात, असाध्य रोग हमखास बरा करतो,  अशा छातीठोक गर्जना मोह घालतात. त्या करणारे ज्ञानवंत आणि त्यांचे ज्ञान बलवंत वाटू लागते. मग ईझ्रायलहून मधुमेहाचं अक्सीर औषध आणायला कुणीही सत्तर रुपये सहज देतो.

 

 

आधुनिक औषधे म्हणजे सगळी ‘केमिकल’ आहेत अशी भाषा असते. मित्रों, जगी केमिकल नाही असे काय आहे? हा केमोफोबीया, चिरफाडीचे (हा खास त्यांचा शब्द) भय, ही साईड इफेक्टची भीती जाणीवपूर्वक जोपासली जाते. यावर धंदा पोसला जातो. खरंतर सगळ्याच औषधांचे काही ना काही सहपरिणाम, मग त्यात चांगले वाईट दोन्ही आले, असणारच आणि असतातच. फक्त आधुनिक वैद्यकीत असे परिणाम नोंदवण्याची, अभ्यासण्याची आणि सुसह्य करण्याची शिस्तबद्ध पद्धत आहे.  काही दिव्यौषधींना सहपरिणाम नाहीत असं म्हणणं म्हणजे वाळूत तोंड खुपसून बसण्यासारखं  आहे.  ते मुळी अभ्यासलेच  गेलेले नाहीत हे विधान वस्तुस्थितीला धरून आहे. देणारे भक्तीभावाने औषधे देतात, घेणारेही मनोभावे घेतात. अनेक घोटाळे होत रहातात. विषप्रयोग झालेली मूत्रपिंडे आणि यकृते घेऊन पेशंट पुन्हा येतात, त्यावेळी काळीज विदीर्ण होतं.  असे प्रकार आधुनिक औषधांच्या बाबतीतही संभवतात. पण त्याला काहीतरी पूर्वकल्पना, दादफिर्याद, नोंद, प्रसंगी ते औषध बाजारातून मागे घेणे वगैरे प्रकार आहेत. पर्यायी पॅथींमधे औषध मागे घेतल्याचं एक तरी उदाहरण आहे का? हे तर जाऊच  दे, गरोदर स्त्रीने घेऊ नये, डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही असे एकही औषध नसावे? सगळी औषधे लहान, थोर सगळ्यांना चालतात? हा औषधांचा दिव्य प्रभाव नसून इथे अभ्यासाचा अभाव आहे.  कोणी ‘हे घे औषध’ म्हणून नकळत पाणी जरी दिलं तरी आता काहीतरी इष्ट होणार या आशेने रोग्याला किंचित बरं  वाटायला लागतं. (इष्टाशा अर्थात प्लॅसीबो परिणाम) कुठल्याही औषधाची कामगिरी किमान अशा परिणामापेक्षा तरी  सरस हवी. होमिओपॅथी वगैरे ‘शास्त्रांनी’ ही पायरीही पार केलेली नाही.

 

मात्र दावे मोठ्ठे मोठ्ठे केले जातात आणि पेशंटची खुशीपत्रे, खुशी चलचित्रे, कोणी बडयांनी केलेली भलामण पुरावा म्हणून दाखवतात. कुठल्याश शकुंतलाबाईंना कुठलंसं मलम लावून मांडी घालून बसता यायला लागलं हा शास्त्रीय पुरावा ठरत नाही. पण असल्या भावकथांना पेशंट भुलतात, काय काय ऑनलाईन मागवतात आणि गंडतात. करून बघायला काय हरकत आहे?, घेऊन बघायला काय हरकत आहे?, जाऊन बघायला काय हरकत आहे?, तोटा तर नाही ना? अशा प्रकारचे युक्तिवाद करत माणसं करून, घेऊन आणि जाऊन बघतात. न जाणो गुण येणारच असेल तर आपणच गेलो नाही असं नको व्हायला, अशी त्यांची मानसिकता असते. यातूनही  यांचं फावतं. वास्तविक सगळं करून, बघून अभ्यासून मगच औषध बाजारात यायला हवं. करून बघण्याची जबाबदारी पेशंटची नाही आणि काही प्रयोग करून बघायचे असतील तर रीतसर परवानगी, संमती वगैरे असायला हवी.  

 

बाबांच्या औषधीनी भरतभूची प्रकृती सुधारणार असेल तर छानच, फक्त त्या औषधीचे रोकडे मूळ सामर्थ्य दाखवावे लागेल एवढेच.


प्रथम प्रसिद्धी 

लोकसत्ता 

लोकरंग पुरवणी 

रविवार ०३.०३.२०२४ 

No comments:

Post a Comment