Wednesday 30 March 2022

एकटा (प्रस्तावना)

 

एकटा

प्रस्तावना

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.

 

रधों म्हणजेच र. धों. अर्थात रघुनाथ धोंडो कर्वे.  ह्या अवलिया, उपेक्षित, विचारवंत, आचारवंत  आणि एकांड्या शिलेदारावर, एक वाचनीय पुस्तक श्री. उमेश सूर्यवंशी यांनी अत्यंत कळकळीने लिहिलं आहे.  त्याला ‘एकटा’ हे सार्थ आणि समर्पक नाव दिलं आहे. सुमारे शतकभरापूर्वी होऊन गेलेल्या एका माणसाची तळमळ पाहून, आपल्या कार्याप्रतीची निष्ठा पाहून, एका भारावलेल्या अवस्थेत त्यांनी हे लिखाण केले आहे.  

डॉ. य. दि. फडके, डॉ. आनंद देशमुख आणि इतरांनी, रधोंवर भरपूर काम करून ठेवले आहे आहे.  विशेषत: डॉ. अनंत देशमुख यांनी  आठ खंडांमध्ये समग्र रधों  आपल्यापुढे मांडले  आहेत.  ह्या पुस्तकाची जातकुळी जरा  वेगळी आहे. जन्म, बालपण, शिक्षण, कर्तृत्व, मृत्यू अशा रूढ चाकोरीतून हे पुस्तक जात नाही. एक वेगळा आकृतिबंध यासाठी लेखकाने निवडला आहे नाही छोट्या छोट्या लेखांमधून त्या व्यक्तीच्या कार्याचा परिचय, रसग्रहण आणि मूल्यमापन येथे आहे.

कार्याप्रती असीम निष्ठा हे रघुनाथरावांचे वैशिष्ट्य. एक वेळ वैयक्तिक जीवनात काही हानी झाली तरी चालेल पण सार्वजनिक संस्थांमध्ये हिशोब चोख असले पाहिजेत हे तत्व रधों स्वतः जगले.  वैयक्तिक तोशीस  सोसून त्यांनी समाजाचा आणि ‘समाजस्वास्थ्य’चा  संसार कवडीकवडी करून उभा केला. हा द्रष्टा  शब्दश: अखेरपर्यन्त कार्यरत होता. सरकार खटले भरत असतानाच रधोंचा  मृत्यू झाला.  तयार असलेला ‘समाजस्वास्थ्य’चा अखेरचा अंक  त्यांच्या मृत्युनंतर वितरित झाला. त्यांच्या मृत्यूनंतर भारत सरकारने कुटुंब नियोजन हे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारलं. आज ह्या धोरणामुळे भारताचा एनआरआर (जोडप्यास होणारी सरासरी मुले) २.१ आहे! लोकसंख्या वाढ आता स्थिरावली आहे. लोकसंख्येची राक्षसी वाढ हा आज गहन प्रश्न राहिलेला नाही. ही वाट आपल्याला रधोंनी  दाखवून दिलेली  आहे.  मात्र ह्याची कृतज्ञ जाणीव अभावानेच दिसते. महाराष्ट्रातील स्त्रीआरोग्य आणि प्रसूतीशास्त्रज्ञ म्हणवणारे सुद्धा, जेंव्हा ‘कोण रधों?’, असा प्रश्न करतात, तेंव्हा काळजाला क्लेश होतात.

संततीनियमनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांच्या मार्गात अनेक अडथळे होते. वैद्यकीय पदवी नसणे हा प्रमुख. त्यामुळे कुटुंब नियोजनाची साधने आयात करण्यासाठीचा परवाना त्यांना नाकारण्यात आला.  व्यवसाय करणे त्यांना कायदेशीररित्या शक्यच  नव्हते.  पण त्यांचे विचार सरकारने आणि समाजाने त्यांच्या मृत्यूपश्चात  होईना स्वीकारले आणि त्यांना जणू काव्यात्म न्याय मिळाला.

नव्या वाचकांना रधोंचे मूळ लिखाण वाचणे अवघड जाते. त्यातली भाषा आणि संदर्भ आता जुने झाले आहेत.  पण आपल्या टिपण्ण्यातून लेखकाने हा प्रश्न सोडवला आहे. विचार, त्यांचे तात्कालिक आणि सद्यस्थितील  परिणाम याबद्दल लेखकाचे भाष्य वाचनीय आहे.  त्यातून आपल्याला रधों अधिकाधिक कळत जातात. आधी लेखक एखाद्या  तत्कालीन अथवा सद्य सामाजिक प्रश्नावर काही भाष्य करतो.  मग र. धों. कर्व्यांच्या लिखाणाच्या आधारे, त्या प्रश्नावर कर्वे यांचे काय मत होते, हे समजावून सांगतो आणि मग त्यांच्या मतावर स्वतःची मल्लीनाथी देतो. रधोंची मते, विचार तेंव्हा तर काळाच्या पुढे होतेच पण ते आजही काळाच्या पुढे वाटावेत असे आहेत.

एखाद्या ग्रंथाचे प्राचीनत्व किंवा तो ग्रंथ संस्कृतमध्ये असणे याचा अर्थ तो प्रमाण मानता येतो, असे होत नाही.  म्हणूनच आयुर्वेदाच्या संदर्भात आपल्या परंपरेकडे बघण्याची दृष्टी अभिनिवेशरहित आणि वैज्ञानिक असली पाहिजे हे कर्वे नोंदवतात. लैंगिक शिक्षण हा शिक्षणाचा भाग असावा, हे त्यांचे मत आजही अंमलात आलेले नाही. लहान मुलांकडून करून घेतल्या जाणाऱ्या कामूक नृत्याबद्दल त्यांनी  आक्षेप नोंदविला आहे. विवाहित स्त्री आपल्या जोडीदारावर बलात्काराचा आरोप करू शकत नाही तर वेश्या करू शकते, असा भेदक आणि रोखठोक मुद्दा त्यांनी मांडला आहे. नग्न संघ स्थापन करण्याची त्यांची कल्पना देखील अशीच एक जहाल आणि आजही टोकाची म्हणत येईल अशी आहे. त्यामुळेच  त्यांचे महत्त्व समजावून घ्यायला लेखकाची  मोठीच मदत होते. एखाद्या अंधार्या गुहेमधील शिल्प, कोणा मार्गदर्शकाने हातातील मशालीने उजळून दाखवावीत, तसं इथे घडतं.

‘आपण चरित्र किंवा आत्मचरित्र वाचत नाही, कारण लेखक जर चरित्रनायकाच्या प्रेमात असेल तर त्याच्या गुणांचे भारंभार वर्णन तेवढं केलं जातं आणि अवगुण  झाकले जातात’, असं मत, रधोंनीच नोंदवून ठेवले आहे.  या इशारावजा मताशी लेखकाने  इमान राखले आहे.  लेखक जरी कर्वे यांचा आदर करत असला, त्यांची बरीचशी मते लेखकाला मान्य असली,  तरी कर्वेंच्या लिखाणातल्या, वागण्यातल्या, विचारातल्या चुका आणि विसंगती, लेखकाने तितक्याच जळजळीतपणे  दाखवून दिल्या  आहेत. इथे आंधळी नव्हे तर  डोळस भक्ती  आहे आणि म्हणूनच या भक्तीतून  खरीखुरी विवेक-शक्ती प्राप्त होण्याची शक्यता इथे दिसते.

   जे बुद्धीला पटेल तेच करायचे हे रघुनाथरावांच्या जीवनाचे श्रेयस होते.  बिहारच्या भूकंपाचा आणि अस्पृश्यतेचा गांधींनी जोडलेला संबंध किंवा लोकसंख्या नियंत्रणासाठी गांधींनी सुचवलेला संयमाचा मार्ग हास्यास्पदच  होता.  रधोंनी  त्याचा यथास्थित समाचार घेतला. समाजमान्य अशा अनेक व्यक्तींवर ते वेळोवेळी तुटून पडले.  हे असे प्रसंग लेखकाने आपल्या शैलीमध्ये शब्दबद्ध केले आहेत त्यामुळे या लिखाणाची खुमारी वाढते.  

कर्वे हे सतत काही ना काही तरी वाद अंगावर ओढवून घेण्यात जणू पटाईत होते. माणसे अजातशत्रु, जगन्मित्र वगैरे असतात. पण रधों ‘अजातमित्र’ आणि ‘जगन्शत्रू’  होते. पण असे असले तरी त्यांची सत्याची असलेली कळकळ आणि असत्याबद्दलची चीडच  यातून दिसून येते, हे सूर्यवंशी साधार स्पष्ट करतात.

समाजसुधारकांचे काम क्रांतिकारकांनी इतकंच जोखमीचे आणि त्रासाचे आहे. मात्र  क्रांतिकारकांना समाजाची सहानुभूती मिळते, तर समाजसुधारकांना समाजाचे शेणगोटे खावे लागतात. रधोंचीही काही वेगळी अवस्था नव्हती, हे लेखक उत्तमरित्या अधोरेखित करतो.  ते वाचून आपण विमनस्क होतो.

सूर्यवंशींनी बहुतेक ठिकाणी रघुनाथरावांचा उल्लेख, रघुनाथाने असे  केले, तसे केले, असा एकेरीत  केला आहे.  आपल्या आदर्शाप्रती असलेला अतीव आदरच यातून दिसून येतो.  आदरापोटी अहोजाहो म्हटलं जातं पण आत्यंतिक आदरापोटी अरेतुरेच म्हटलं जातं.  हे भाषिक वैशिष्ठ्य इथे अगदी लोभस दिसतंय. कारण हे पुस्तक निव्वळ चरित्र नाही. रधोंचे  विचार अंगी बाणवण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे.  वाचकांपर्यंत देखील विवेकवादी, विज्ञाननिष्ठ, रोखठोक विचार विचारसरणी पोहोचावी,  आपापल्या परीने प्रत्येकाने रधों व्हावे,  ही लेखकाची तळमळ इथे  पानोपानी प्रत्ययास येते.

ह्या पुस्तकाला  जनमानसात स्थान मिळो आणि ही  तळमळ सत्कारणी लागो ह्या सदिच्छा.

 

डॉ. शंतनू अभ्यंकर


प्रतींसाठी 

लेखक संपर्क

उमेश सूर्यवंशी 

९९२२७८४०६५  


 

 

No comments:

Post a Comment