Thursday 14 February 2019

माता न तू वैरीणी

माता न तू वैरीणी
डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.
‘मला नाही तुम्ही आईला सांगा डॉक्टर! (आई कसली वैरीण आहे माझी वैरीण.)’ कंसातलं वाक्यं मनातल्या मानत बोललेलं असतं. पण माझ्या सरावल्या कानांना स्पष्ट ऐकू येतं. 
माझ्या सगळ्या सूचना ऐकून घेऊन समोरची नवप्रसवा विनवत असते, ‘डॉक्टर, आईला सांगा प्लीज.’ तिच्या विनंतीला मान देऊन मी सांगतो सुद्धा. पण हे आई प्रकरण मॅनॅज करणे अवघडच. कितीही सांगा, समजावा, शास्त्रीय माहिती द्या, ह्या आपल्या हेका सोडायला तयार नसतात. तोंडावर हो म्हणतात आणि मग घरी गेल्यावर, जे करायचं तेच करतात. त्या जे काही करतात ते प्रेमभरेच करतात. लेकीची आणि बाळाची आत्यंतिक काळजीच घेत असतात त्या. त्यांच्या हेतूबद्दल माझ्या मनात यकिंचितही किंतु नाही. परंतु सदिच्छेच्या भांडवलावर किती आणि काय काय मारून नेणार? 
भर उन्हाळ्यात निव्वळ प्रसूती झाली म्हणून डोळ्यात बिब्ब्याच काजळ, सर्वांगी तेल चोपडलेल, दोन दोन स्वेटर, हातात ग्लोव्ज, पायात मोजे, कानाला फडकं बांधलेलं अशा अवतारातल्या केवीलवाण्या, घामेघूम बायका वॉर्डात बघितल्या की कीव येते. कानाला बांधणे हे तर या बायकांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. त्याशिवाय आपण डिलिव्हर झालोय असं फिलिंगच येत नाही बहुतेक. शिवाय दारे, खिडक्या, एसी, पंखा हे सगळं बंद आणि पाणी मागायचीही चोरी. कारण पाणी म्हणलं की उकळून गार केलेलं, कोंबट, मचूळ पाणी हजर. सेवेसी असलेली मंडळी हौसेहौसेनी थर्मास भरभरून पाणी घेऊन येतात. खरतर पाणी शुद्ध, पिण्यायोग्य असणं महत्वाचं आहे. त्याचं तापमान हा जिच्या तिच्या आवडीचा भाग. हात धुवायला पाय धुवायलासुद्धा गरमागरम पाणी. कारण गार पाण्यात हात घालायचा नाही. ह्या बरोबर शेक-शेगडी, पोटपट्टा अशीही काही पीडातंत्र आणि छळयंत्र आहेत. भर उन्हाळ्यात रुंदच्या रुंद पोटपट्टा कसून वर रसरसते निखारे आणि त्यांचा धूर सहन करणाऱ्या बायका बाळंतपणातून तावून सुलाखून निघतात असंच म्हटलं पाहिजे. घाम फुटत असतो, पट्याखाली खाजत असतं पण नको म्हणायची काय बिशाद! जेंव्हा हे सुखकर असेल तेंव्हा हे सारं वापरायला कोणाचीच ना नाही, पण असह्य उकाड्यातही ह्याचा आग्रह धरणे चुकीचे आहे, अनावश्यक आहे. 
गार हवा लागू नये म्हणून इतक्या कडक बंदोबस्ताची काही गरज नसते. आपल्यासारख्या विषुववृत्तीय हवामानात तर नाहीच नाही. तुम्हाला आम्हाला जितका गारवा किंवा उब लागते तितकीच डिलीव्हरीच्या पेशंटलाही लागते. त्यांनी कम्फर्टेबल असणं महत्वाचं. पण लक्षात कोण घेतो? हे असले प्रकार यथासांग केले नाहीत तर आपण आपल्या आईगिरित कमी पडलो असं या बायांच्या आयांना वाटत असतं. येणारी जाणारी प्रत्येक बाई आपल्या वकुबानुसार सूचना करत असते ते वेगळच. त्यातून पूर्वी फक्त प्रत्यक्ष भेटीत सूचना शक्य होत्या. नापसंत सूचना कानाआड करता येत होत्या. आता मोबाईलवरून व्हिडीओ कॉल लावून सूचनांची अंमलबजावणी होत आहे वा नाही ह्याचा पडताळा चालू असतो. ह्या सगळ्या भानगडीत ती नवजात आई मात्र पार गांजून गेलेली असते.
पोटपट्ट्याचा असाच अनाठायी आग्रह चालतो. त्यानी तुम्हाला बरं वाटत असेल, कंबरेला आराम वाटत असेल, तर जरूर वापरा. पण त्याचा जाच वाटत असेल, तर तो न वापरण्यानी काही बिघडत नाही. पोटपट्ट्यांनी म्हणे पोट सुटत नाही. काहीच्या काही! असं असतं तर ढेरपोट्या पुरुषांनी तत्काळ पोटं आत घालवली असती की. प्रसूतीनंतर पोट रहातं ते काय पोटात हवा गेल्यानी नाही. हवा भरून पोट वाढायला पोट म्हणजे काय ट्रकचा टायर आहे? आणि मग असलं पोट सुई टोचून आत गेलं असतं की!! पोट ओघळतं कारण, ‘बाळंतपण मानवलं पाहिजे’ या समजुतीपोटी आया आपल्या बाळंत कन्यांना खा खा खिलवतात. परिणामी वजन वाढतं. शिवाय गरोदरपणी पोटाचे स्नायू इतके ताणले जातात, इतके ताणले जातात, की ते तत्काळ मूळपदावर येउच शकत नाहीत. एखादं इलॅस्टिक अती ताणलं तर ते जसं लेवाळं होतं तसं काहीतरी होतं. स्नायूंची गेलेली ताकद आणि जोम परत मिळवण्यासाठी, व्यायाम हाच उपाय आहे. पैसेवाल्या बायकांसाठी ‘टमि टक’ नावाचं एक ऑपरेशनही आहे. पोटच का, ओघळलेले गाल, स्तन, कुल्ले सगळं काही पुन्हा जिथल्या तिथे उचलून मिळतं. अशा ऑपरेशनला ‘मम्मी मेकओव्हर’ म्हणतात. कृत्रिम कायापालटच हा. झटपट विना-व्यायाम, विना-डाएट, इलाज.
बाळंतीणीच्या खाण्यावर तर हजारो निर्बंध. ह्याचं उल्लंघन केलं तर बाळाला शी होणार, पोटात दुखणार, अशी सतत भीतीची टांगती तलवार. त्यामुळे ह्या बायका मन मारून मुकाट्यानी पानात पडेल ते गिळतात. बहुदा पहिले काही दिवस इतर पदार्थ बंद. फक्त अळणी तूप-भात. मग नंतर मेथीची अळणी भाजी, बिन तिखटामिठाची आमटी असं काहीतरी पानात पडतं. वर तोंडी लावायला ‘पोटभर का जेवली नाहीस?’ असा सवाल आहेच. असलं पथ्य पाणीही पाळायची गरज नसते. आईने भाकरी खाल्ली, गवार खाल्ली, असा अमुक पदार्थ खाल्यामुळे बाळाला तमुक त्रास होतो, असा कोणताही शोध नाही. इतक्या बेचव अन्नाला तोंड देणे कसं शक्य आहे. जर हे अन्न इतकं आवश्यक असेल तर सहानुभूती म्हणून घरच्या सगळ्यांनी बाळंतीणीबरोबर असाच आहार घ्यावा अशी माझी सूचना आहे. पौष्टिक, भरपूर, चौरस आणि चविष्ट जेवण हवं.
बस्स इतकंच.

1 comment:

  1. ग्रेट डॉक्टर. इतक्या सहज भाषेत आणि तरी खूप स्पष्ट व परखडपणे सगळ्या गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत. अगदी असाच्या असा लेख सर्व बाळंतिनिणी त्यांच्या घरच्यांना पाठवला तरी बरंच काम सोपं होईल त्यांचं.

    ReplyDelete